आनंदघन या नावाचा माझा ब्लॉग मी १ जानेवारी २००६ ला सुरू केला आणि अजूनही चालवत आहे. त्यात पहिल्या वर्षापासून दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात मी काही ना काही लिहीत आलो आहे. त्यातले गणपतीविषयक २९ निवडक लेख मी क्रमाक्रमाने या ब्लॉगवरदेखील सादर केले आहेत. उरलेले लेख एकत्र करून या वर्षी या ब्लॉगच्या वाचकांसाठी इथे सादर करीत आहे.
2009 : यंदाचा आमचा गणेशोत्सव
फार पूर्वीपासून म्हणजे माझ्या जन्मापूर्वीपासून आमच्या घरी पांच दिवसाचा गणेशोत्सव होत आला आहे. आमचे घर बांधतांनाच त्यातल्या सोप्याच्या मधोमध एक खास ‘गणपतीचा कोनाडा’ ठेवण्यात आला होता. एकादा लहान मुलगा त्यात चढून बसू शकेल इतका तो रुंद, उंच आणि खोल होता. त्याच्या आजूबाजूच्या भिंतीसुध्दा थोड्या सजवलेला होत्या. एरवी त्या कोनाड्यात इतर शोभेच्या किंवा अत्यावश्यक वस्तू ठेवल्या जात. गणेशचतुर्थीच्या आधी तो रिकामा करून रंगरंगोटी करून तयार ठेवला जाई. घरातली मुले आपले कलाकौशल्य पणाला लावून दरवर्षी नवे मखर आणि इतर सजावट करीत असत. कॉलेजला गेल्यानंतर दरवर्षी दिवाळीला घरी जायचे असायचेच. त्यापूर्वी गणपतीसाठी एक वेगळी ट्रिप करणे शक्य नसल्यामुळे स्थानिक नातेवाईकांना भेट देणे आणि सार्वजनिक गणेशोत्सवांची आरास पहात तिथले थोडे गाण्याबिण्याचे कार्यक्रम पाहणे एवढाच माझा गणेशोत्सवात सहभाग होत असे. लग्न करून घर थाटल्यानंतर दोन खोल्यांच्या इवल्याशा घरात गणपतीची पिटुकली मूर्ती आणून आमचा वेगळा घरचा गणेशोत्सव सुरू केला. बदलत्या परिस्थितीनुसार दरवर्षी कांहीतरी नवे आणि चांगले करण्याच्या प्रयत्नामधून त्यात सुधारणा होत गेली.
सेवानिवृत्तीनंतर प्रशस्त सरकारी निवास सोडून लहानशा सदनिकेत रहायला गेलो. त्यानंतर कांही महिन्यांनी एक मोठे दुखणे येऊन गेले. २००६ च्या गणेशोत्सवापर्यंत मी त्यातून हळूहळू मार्गावर येत होतो, पण अजून हिंडू फिरू लागलो नव्हतो आणि काही काम करायला अंगात फारसे त्राण नव्हते. त्यामुळे नव्या घरात पुन्हा एकदा अगदी लहान प्रमाणात गणेशोत्सव सुरू केला. त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे २००७ साली पुण्याला मुलाकडे गणपती ठेवायचे ठरवले. सर्वांनी खूप उत्साहात हा सण साजरा केला. मागल्या वर्षी घरात आम्ही दोघेच राहिलो होतो, त्यामुळे जुन्या आठवणी काढत आणि शेजारपाजारच्या लोकांना बोलवत गणेशोत्सव साजरा केला.
यंदा मात्र मुले सहकुटुंब घरी येऊन पुन्हा एकदा गणेशचतुर्थीला घराचे गोकुळ झाले होते. त्यामुळे सर्वांच्या आनंदाला आणि उत्साहाला उधाण आले होते. पण आता दिवस बदलले आहेत. पूर्वीप्रमाणे आपल्या कलाकौशल्याला वाव देऊन कांही नवी निर्मिती करण्याला तितकेसे महत्व राहिलेले नाही. उगाच आपल्या डोक्याला ताप देण्यापेक्षा बाजारातून रेडीमेड वस्तू आणणे सोईचे वाटते. नाना प्रकारची मखरे आणि सजावट करण्यासाठी असंख्य प्रकारच्या सुबक आणि झगमगीत गोष्टी बाजारात खचाखच भरलेल्या असतात. उपलब्ध जागा आणि खिशाचा विचार करून त्यातल्या कांही आणल्या आणि फटाफट जोडून टाकल्या. गणपतीच्या नैवेद्यापुरते एक दिवस तळलेले आणि एकदा उकडीचे मोदक घरी केले होते. त्याशिवाय पुण्याहून चितळे बंधूंची आंबाबर्फी आणि बाकरवडी आणली होती, हल्दीरामची सोनपापडी, बिकानेरची दाळमोठ आणि गुलाबजाम, शिवकृपाचे फरसाण आणि काजू कटली, गोडबोल्यांचे लाडू आणि शंकरपाळी, आणखी कोठले कांही, कोठले कांही अशा नाना तऱ्हेच्या मिठाया आणि नमकीन खाद्यवस्तूंची लयलूट होती. या निमित्याने अनेक आप्तेष्ट येऊन भेटून गेले. त्या गडबडीत पाच दिवसाचा उत्सव कसा संपला ते कळलेच नाही.
ब्लॉगगिरी सुरू केल्यापासून दरवर्षी गणेशोत्सवात कांही तरी प्रासंगिक लिहायचे असे ठरवले होते. पहिल्या वर्षी म्हणजे २००६ साली घरबसल्याच वृत्तपत्रे आणि टीव्हीवर जेवढे गणेशोत्सव पाहिले त्यावरून गणेशाच्या ‘कोटी कोटी रूपां’वर एक लेखमालिका लिहिली. सलग अकरा दिवस मी स्वतः, माझा संगणक आणि आंतर्जाल सक्षम राहिलो आणि रोज एक लेख लिहून तो ब्लॉगवर टाकू शकलो ही त्या श्रीगणेशाची कृपाच. पुढील वर्षी मी मुंबईत नव्हतोच, पण आधीपासून थोडी तयारी केली आणि आंतर्जालावर भ्रमण करून थोडी शोधाशोध केली आणि पुण्याला राहूनच रोज एक गजाननाचे गीत ब्लॉगवर टाकत राहिलो. मागल्या वर्षी ‘गणेशोत्सव आणि पर्यावरण’ या विषयावर एक लेखमाला लिहिली होती. या वर्षी काय करायचे किंवा काय करता येईल हे ठरत नव्हते. योगायोगाने काही विचार सुचले, कांही जुने कागद हाताशी लागले आणि त्यातून ‘आधी वंदू तुज मोरया’, ‘मूषक आणि माउस’, ‘लोकमान्य टिळक आणि गणेशोत्सव’ हे लेख लिहिले गेले. आणि आजचे हे पुनरावलोकन.
2009 : पुढच्या वर्षी लवकर या … की एकदा येऊच नका?
‘पुढच्या वर्षी एकदा येऊच नका’ य मथळ्याखाली श्री.संजय पेठे यांनी लोकसत्तामधल्या आपल्या ‘थर्ड आय’ या सदरात एक लेख लिहिला आहे. गणेशोत्सव आणि विसर्जनाची मिरवणूक याला आज जे स्वरूप आले आहे त्याबद्दल खेद आणि सात्विक संताप व्यक्त करून गणरायांनासुध्दा कदाचित पुढच्या वर्षी येऊ नये असे वाटत असेल असे मत त्यांनी या लेखात व्यक्त केले आहे. “या उत्सवात धार्मिकपणा नाही”, “या निमित्याने कांही लोक मिरवण्याची हौस भागवून घेतात”, “बहुतेक लोक मनाची करमणूक करून घेतात”, “यातले कार्यक्रम दर्जेदार नव्हते”, “यात पैशाचा अपहार व अपव्यय होतो”, “लोकांचा वेळ वाया दवडला जातो” आणि “परदेशी लोक यातून आपल्या देशाची बदनामी करतात” हे मुख्य मुद्दे त्यांनी आपल्या लेखात मांडले आहेत. मागील आठवड्यात मी या ब्लॉगवर लिहिलेल्या दोन लेखात लोकमान्य टिळकांनी सन १८९४ आणि १८९५ मध्ये केसरीत लिहिलेल्या दोन अग्रलेखांबद्दल लिहिले होते. एकशे पंधरा वर्षांपूर्वीसुध्दा नेमके हेच मुद्दे टिळकांच्या विरोधकांनी मांडले होते असे त्यातून दिसते. आज गणेशोत्सवाचे संयोजन करणाऱ्या लोकांना लोकमान्य टिळकांच्या पायाच्या नखाचीसुध्दा सर येणार नाही हे ते स्वतः देखील मान्य करतील. असे असले तरी विरोधकांचे मुद्दे जसेच्या तसेच राहिले असल्याचे पाहून गंमत वाटली. आज या उत्सवाचे दृष्य स्वरूप बदलले आहे, त्याचा आवाका शतपटीने वाढला आहे आणि त्यातल्या वाईट प्रकारांचे समर्थन करता येणे शक्यच नाही. गणेशोत्सवावर होत असलेल्या टीकेचा जसा खरपूस समाचार लोकमान्यांनी आपल्या अग्रलेखात घेतला होता तसा आता कोणालाच घेता येणार नाही. याचे मुख्य कारण म्हणजे या उत्सवाच्या निमित्याने लोकसंग्रह करून त्यांना देशभक्तीच्या मार्गाला लावण्याचे लोकमान्यांच्या डोळ्यासमोर असलेले उदात्त उद्दिष्ट आज आपल्यापुढे राहिलेले नाही. तरीसुध्दा लोकमान्यांपासून प्रेरणा घेऊन कांही चांगले उपक्रम कांही ठिकाणी होत आहेत हे संजयनेसुध्दा मान्य केले आहे.
शंभर वर्षातल्या परिस्थितीत एक महत्वाचा फरक दिसतो. “एरवी मद्यपान करून लोळत पडणारे बरेच लोक गणेशोत्सवाचे दहा दिवस व्यसनापासून दूर राहतात” असा एक मोठा फायदा लोकमान्यांनी नमूद केला होता. आज याच्या नेमकी उलट परिस्थिती दिसते. अनेक प्रकारच्या धुंदीत उत्सव साजरा करणारेच कांही लोक ‘वहावत’ जातांना पहायला मिळतात. पण सारेच त्या अवस्थेत नसतात. माझ्या आजूबाजूच्या कित्येक गणेशोत्सवांच्या मंडपांत डोकावून पाहिल्यावर, आतापर्यंत झालेले कांही विसर्जन सोहळे प्रत्यक्ष पाहून झाल्यावर आणि आज या क्षणाला गांवोगांवी होत असलेल्या अनंतचतुर्दशीच्या भव्य मिरवणुकांचे थेट प्रक्षेपण पाहतांना ज्या समाजात आज आपण राहतो त्याचेच प्रतिबिंब मला त्या गर्दीत दिसत आले आहे. “त्या समूहात फक्त आपल्यासारखे निवडक लोक तेवढे धुतल्या तांदळाचे दाणे आहोत आणि बाकीचे सरसकट सारे लोक टाकाऊ खडे आहेत” असा आव आणणे मला योग्य वाटत नाही. आपल्या भोंवताली असलेला समाज जसा आहे तसा असल्याच्या सत्याचा स्वीकार करून आपल्या परीने आपल्या कार्यक्षेत्रात जेवढे बदल करता येणे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न अगदी आपल्या घरापासून करणे हेच माझ्या मते महत्वाचे आहे. सर्व समाजाला नाक मुरडून नाकारण्याने कांही साध्य होणार नाही किंवा कांही गोष्टी व्यक्तीशः आपल्याला आवडल्या नसतील तर सरसकट त्या सगळ्या चुकीच्याच किंवा हिणकसच असतात असे समजण्याचेही कारण नाही.
संजयने मांडलेले एकूण एक चांगले विचार आणि त्याने केलेल्या सर्व सूचना यांच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. हा कदाचित योगायोग असेल किंवा आम्हाला मिळालेल्या समान प्रकारच्या संस्कारांचा भाग असेल. त्या सूचना अंमलात आणल्यास त्यातून समाजाचे भलेच होईल यात व्यक्तीशः मला कांही शंका नाही. फक्त इतक्या बलिष्ठ मांजरांच्या गळ्यात कोण कोण, कशा आणि कधी घंटा बांधणार हाच एक प्रश्न आहे. पण संजय माझ्यापेक्षा वयाने तरुण असला तरी मी मात्र त्याच्या एवढा निराश झालेलो नाही आणि गणपतीबाप्पाला पुढच्या वर्षी येऊच नका असे म्हणणार नाही.
या निमित्याने लोक एकमेकांना भेटतात हीच माझ्या दृष्टीने एक महत्वाची गोष्ट आहे. वर्षभरातून थोडे दिवस तरी ते एकत्र उभे राहून देवाच्या पारंपरिक आरत्या म्हणतात, त्यातले कांही शब्द तरी त्यांच्या मनाच्या आंतपर्यंत जाऊन पोचत असतील. माणूस हा मुळातच उत्सवप्रिय असतो आणि कांही ना कांही निमित्य काढून मनातल्या उत्साहाला उधाण आणत असतो आणि ते तो करत राहणारच. त्यात एकमेकांचे अनुकरण होत असते तसेच प्रसारमाध्यमांमधून जे दाखवले जाते त्याचा परिणाम होत असतो. हे लक्षात घेता त्यामुळे इतर अप्रिय गोष्टी होतात म्हणून उत्सवच बंद करावा असे मी म्हणणार नाही आणि लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या अग्रलेखांचा मतितार्थ जर मला समजला असेल तर त्यांनीसुध्दा असे सांगितले नसते असे मला वाटते. या निमित्याने लोक एका प्रकारे एकत्र वेळ घालवतात हीसुद्धा साधी सुधी गोष्ट नाही. एकदाचे ते एकत्र जमले म्हणजे त्यांना आपल्याला हवे तसे वळण लावणे हे आपले काम आहे असे त्यांनी लिहिलेल्या अग्रलेखात स्पष्ट केले होते.
2010
यंदाच्या गणेशोत्सवातील आगळेपण
“नेमेचि येतो बघ पावसाळा । हे पृथ्वीचे कौतुक जाण बाळा ।।” या उक्तीमुळे तो दरवर्षी येतो आणि त्यातच गणेशोत्सवसुध्दा आपली हजेरी लावतो. हे सगळे ठरल्याप्रमाणे घडत असते आणि ते का घडते हे सुध्दा आता बहुतेक लोकांना माहीत झाले असल्यामुळे यात कौतुक करण्यासारखे कोणालाच फारसे काही दिसत नाही. त्या उत्सवातल्या मूर्ती, सजावट, गर्दी, उत्साह, भक्तीभाव, गजर, गोंगाट, रस्त्यातले अडथळे, वाहतूकीचे नियमन, सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजन, स्पर्धा, बक्षिससमारंभ, पुढारी आणि नटनट्यांचे गणपतीसोबत काढलेले फोटो, लोकमान्य टिळक आणि त्यांची उद्दिष्टे, पर्यावरण, त्याचा ऱ्हास आणि त्याचे दुष्परिणाम, विसर्जनातली सुसूत्रता तसेच त्यातले अपघात वगैरे वगैरे वगैरे सगळेच विषय आता इतके नेहमीचे झाले आहेत आणि त्यावर इतके चर्वितचर्वण होऊन गेले आहे की त्यासंबंधीच्या बातम्या आणि लेख पाहून त्या न वाचताच वर्तमानपत्राचे पान उलटले जाते. या विषयांवर मीसुध्दा पूर्वी बरेच वेळा लिहिले आहे. त्यात आणखी भर टाकली तर हे पानसुध्दा वाचले न जाण्याची शक्यता वाटते. यामुळे या वर्षी थोडा वेगळा प्रयत्न केला आहे. उत्सवाच्या तयारीवरील एक मजेदार अल्पकथा मागच्या भागात दिली होती. या वेळी एक वेगळा विषय हातात घेतला आहे.
आजकाल सगळ्याच क्षेत्रात नेहमी चढाओढ चाललेली असते आणि रोजच कोणी ना कोणी कसला ना कसला विक्रम मोडून नवा उच्चांक प्रस्थापित करत असतो. तसेच चाकोरीबाहेरचे काहीतरी वेगळे करून दाखवत असतो. गणेशोत्सव वर्षाकाठी एकदा येत असल्यामुळे त्यातसुध्दा दरवर्षी कोणी ना कोणी काही तरी वेगळे करत असतो. यंदाचे नाविन्यवीर कोण आहेत ते थोडक्यात पाहू.
लालबागचा राजा दरवर्षीच अतिशय प्रखर अशा प्रकाशझोतात असतो. तिथल्या उत्सवाच्या पूर्वतयारीपासून त्याच्या खोल सागरात केल्या जाणाऱ्या विसर्जनापर्यंत खडान् खडा बातमी रोजच्या रोज वाचायला आणि ऐकायला मिळत असते. त्याचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या आणि त्यांनी उदारपणे केलेले दान याची मोजदाद होत असते आणि तो आकडा वाढत असतो. तरीसुध्दा यंदा त्यात नाविन्याचा भागही दिसला. दर्शनोत्सुक भक्तांचे कष्ट कमी करण्याच्या दृष्टीने या वर्षी त्यांच्यासाठी वातानुकूलित मंडप उभारला होता. तसेच त्यांना खाद्यपेयेसुध्दा पुरवली जात होती. देवदर्शनासाठी केलेल्या कष्टाच्या प्रमाणात पुण्यप्राप्ती होते असा काही लोकांचा समज आहे. घरात गाडी असतांनासुध्दा अन्नपाणी वर्ज्य करून उपाशीपोटी दहा दहा किलोमीटर पायपीट करून देवदर्शनाला जाणारे महानुभाव मी पाहिले आहेत. त्यांना कदाचित अशा सोयी करणे आवडले नसेल, तसेच या सगळ्या खर्चातून समाजाचा किंवा देशाचा काय फायदा झाला? असा मूलगामी प्रश्न विचारून हा सगळा आटापिटा अनाठायी आहे असा सूर अश्रध्द लोकांनी लावला असेल. तसेच एवढ्या पैशात किती लोकांना पोटभर अन्न, अंगभर कपडे मिळाले असते, किती मुले शाळेला जाऊ शकली असती वगैरेंचे आकडेदेखील देतील.
गौडसारस्वतब्राह्मण म्हणजेच जीएसबी समाजाचा गणपती अत्यंत श्रीमंत समजला जातो. त्याचे सिंहासन, अंगावर चढवलेले दागदागीने आणि मुकुट वगैरे सगळ्याच गोष्टी सोन्याने बनवलेल्या आणि रत्नजडित असतात. हे ऐश्वर्य पहाण्यासाठी भाविक तसेच उत्सुक लोक दूरदूरहून येतात. कोट्यवधी रुपये किंमतीच्या या दौलतीचा कायमचाच विमा उतरवलेला असतोच. या वर्षी तिथे येणाऱ्या प्रेक्षकांचासुध्दा विमा उतरवला होता म्हणे. विघ्नहर्ता गणपती सर्वांचे रक्षण करेलच. तरीही जर काही अनुचित घटना घडली तर त्यात हताहत होणाऱ्या प्रेक्षकांना त्यांच्या नुकसानीची भरपाई करून मिळणार होती. सुदैवाने प्रत्यक्षात तशी वेळ आली नाही.
परंपरेनुसार गणेशाची मूर्ती शाडू मातीची असायची. यांत्रिकीकरण झाल्यानंतर प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा प्रामुख्याने वापर होऊ लागला. पर्यावरणवाद्यांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा शाडूमातीकडे ओघ वळू लागला आहे. आजकाल काही लोक कसलीच मूर्ती ठेवत नाहीत, चित्राची पूजा करतात, तर काही लोक कायम स्वरूपाची मूर्ती ठेवतात, तिचे विसर्जन करत नाहीत. काही कल्पक लोक वेगळ्याच पदार्थांपासून गणेशाची मूर्ती तयार करतात. नारळांच्या ढिगातून गजाननाचा आकार तयार केलेला मी पूर्वी पाहिला आहे. यंदा काही निराळे प्रकार केले गेले. “असावा सुंदर चॉकलेटचा बंगला” असे लहान मुलांचे स्वप्न असते. ६०० चॉकलेटे आणि २०००० बिस्किटे यांचा वापर करून एक गणपतीची मूर्ती या वर्षी तयार केली गेली होती, तर दुसऱ्या एका जागी गणपतीच्या सर्वांगावर टूटीफ्रूटीचे तुकडे चिकटवले होते. अर्थातच यातला एकादा तुकडा जरी कोणी तोंडात टाकला तो गणपतीभक्षक ठरेल. यामुळे कोणीही असे करणार नाही. या मूर्तींचे विसर्जन कुठे केले आणि त्या जलाशयातील जलचर प्राण्यांना मेजवानी मिळाली की प्रदूषणाने जिवाला मुकावे लागले ते कांही समजले नाही.
ओरिसाच्या समुद्रकिना-यावर वाळूची शिल्पे बांधणाऱ्या कलाकरांना जगभर प्रसिध्दी मिळाली आहे. एका जागी असा वालुकामय गणपती तयार केला गेला. एका कलाकाराने १२ लक्ष साबूदाणे घेतले, त्यांना वेगवेगळ्या रंगांमध्ये रंगवून त्यांचा उपयोग केला आणि त्यातून अप्रतिम सुंदर रांगोळी सजवली. गिनेस बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये या प्रयत्नाची नोंद झाली आहे.
2010
यंदाच्या गणेशोत्सवातील आणखी काही आगळ्या गोष्टी
लालबागच्या राजाच्या उत्सवासाठी या वर्षी दक्षिण भारतातल्या प्राचीन मंदिराची सजावट केली होती, पण यात फारसे नाविन्य वाटणार नाही कारण दरवर्षी कुठल्या ना कुठल्या प्रसिध्द देवालयाच्या प्रतिकृती केलेल्या पहायला मिळतात. या वर्षीचे खास वैशिष्ट्य म्हणायचे झाले तर या गणपतीमंडळाचा गेल्या ७५ वर्षांचा इतिहास पुस्तकरूपाने प्रसिध्द केला गेला. गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या अनेक लोकांनी भक्तीभावाने हे पुस्तक विकत घेतले असणारच. गेली काही वर्षे वर्तमानपत्रात किंवा टीव्हीवर या राजाचे जे दर्शन घडते त्यातल्या मूर्तीचा आकार सारखाच वाटतो. लालबागचा राजा फोटोवरून ओळखता यावा इतका ओळखीचा झाला आहे. पुण्यातला दगडूशेट हलवाई गणपतीसुध्दा जेंव्हापासून प्रसारमाध्यमात प्रामुख्याने दिसायला लागला आहे, त्याच्या रूपात काही फरक पडलेला नाही. पण लालबागचा राजा मात्र पहिल्यापासून असा एकाच रूपात येत नव्हता. राजकीय आणि सामाजिक परिस्थितीनुसार तो वेगवेगळी रूपे घेऊन साकारला आहे. १९४६ सालच्या उत्सवात सिंहाच्या पाठीवर पाय ठेऊन उभारलेल्या नेताजी सुभाषचंद्रांच्या रूपात तो दिसतो, तर १९४८ साली महात्मा गांधीजींच्या रूपात. १९४७ साली स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात तो दिल्लीच्या लाल किल्ल्यासमोर पंडितजींच्या रूपात बैलगाडी चालवत होता.
गणेशोत्सवाच्या निमित्याने येणाऱ्या दर्शकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या जाहिराती लावण्याची कल्पना कोणाच्या सुपीक मेंदूतून निघाली कोण जाणे, पण सिनेमाची पोस्टर्स लावण्याची सुरुवात लालबागच्या राजापासूनच झाली. त्याचसोबत सिनेकलावंतांनी प्रत्यक्ष लालबागला येऊन या राजाचे दर्शन घेण्याला सुरू केल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी वाढू लागली. तो गणपती नवसाला पावतो अशी श्रध्दा उत्पन्न झाली आणि मग दर्शनोत्सुकांची गर्दी वाढता वाढता वाढत उच्चांक करू लागली, तसे तिचे नियोजन करण्याचे कामही वाढत गेले. लालबागला सुरू झालेले जाहिरातबाजीचे लोण पुढे कानाकोपऱ्यापर्यंत पोचले आणि त्यात कशाची जाहिरात करावी याचा नेम राहिला नाही. एक दोन वर्षांखाली जिकडे तिकडे माणिकचंद दिसत असे. या वर्षी मात्र तंबाखू, मद्य आदि व्यसनांना उत्तेजन देणाऱ्या द्रव्यांची जाहिरात करायची नाही असा निर्बंध पाळला गेला असे दिसले.
आंतर्जालावर नवे आभासी (व्हर्च्युअल) जग निर्माण झाले आहेच, त्याची वाढही पटीने होत चालली आहे. गणरायाचा यात प्रवेश होऊन त्याने आपले स्थान निर्माण करणे ओघाने आले. अनेक उत्सव मंडळांनी या वर्षी आपापल्या वेबसाइट्स उघडल्या आणि वर्गणी गोळा करण्यापासून बाप्पांचे दर्शन, पूजा आरती वगैरे दाखवण्यापर्यंत सेवा प्रदान केली. या वर्षीचा उत्सव आता संपून गेला आहे, पण पुढच्या वर्षी आधीपासून तयारी केलीत तर संगणकीय मूषकाच्या पाठीवर दोन बोटांनी टिचक्या मारत जगभरातल्या गणेशाच्या उत्सवांची चित्रे पहात विहरण करता येईल तसेच गांवोगांवच्या किंबहुना देशोदेशींच्या गणपतींची विविध रूपे पहाता येतील. ज्यांना संगणकाची एवढी आवड नाही अशा लोकांनासुध्दा लालबागचा राजा आणि प्रभादेवीचा सिध्दीविनायक यांच्या आरत्या घरबसल्या पाहण्याची सोय वाहिन्यांनी केली होती आणि काही भक्तगण या वेळी घरात बसूनच टाळ्या वाजवत त्या आरत्यांमध्ये सहभागी होत होते.
लोकसत्ता या दैनिकाने गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये एक लेखमालिका सादर केली होती. जपान, चीन, श्रीलंका, जावा, बाली, कंपूचिया, व्हिएटनाम आदि परदेशांमध्ये निरनिराळ्या नावाने आणि रूपांमध्ये पूजल्या जाणाऱ्या गजाननाची माहिती दिली होती. सुप्रसिध्द अष्टविनायकांची माहिती देणाऱ्या लेखमालिका दरवर्षीच येतात. या वर्षी एका जाहिरातीमध्ये ती दिली होती, तर दुसऱ्या एका जाहिरातदाराने आरत्या आणि मंत्रपुष्प यांच छापील पुस्तिका वर्तमानपत्रांसोबत दिली होती. या निमित्याने महाराष्ट्रातल्या खेडोपाडी असलेल्या अप्रसिध्द पण जागृत समजल्या जाणाऱ्या काही अनोळखी देवस्थानांची माहिती या काळात प्रसिध्द झाल्यामुळे वाचायला मिळाली.
हिंदुस्थान टाइम्स हे दिल्लीचे वर्तमानपत्र मुंबईमध्ये जम बसवू पहात आहे. त्याने या वर्षी एक आगळा प्रयत्न केला. मोबाइल फोनवर एसएमएस देणाऱ्या वाचकांमधून लकी डॉ काढून भाग्यवान विजेत्यांना हॅलिकॉप्टरमधून गणपती विसर्जनाची दृष्ये दाखवण्यात येतील अशा अर्थाच्या मोठमोठ्या जाहिराती रोज छापून येत होत्या. ही संधी फक्त ७ ते १२ वर्षे वयोगटामधील मुलामुलींना उपलब्ध होती. प्रत्यक्षात असे दर्शन घडवण्यात आल्याची बातमीही आली.
2011 / 2012
या ब्लॉगवरील गणेशोत्सव
मी शाळेत असतांनासुध्दा गणेशोत्सवात घरी, शाळेत आणि गावात त्याची धामधूम चालत असे. ते दिवस अगदी वेगळे वाटायचे. पुण्यामुंबईकडे आल्यानंतर इकडल्या उत्सवाबद्दल तर विचारायलाच नको. त्याचे स्वरूप बदलत चालले असले तरी त्यामागे दिसणारा उत्साह तसाच आहे किंबहुना तो वाढतो आहे. गणेशोत्सवातले दिवस त्यामुळे काहीसे वेगळे आणि संस्मरणीय असेच असतात.
आनंदघन या ब्लॉगचा श्रीगणेशा २००६ सालाच्या सुरुवातीला केला. त्याचे नांव ‘श्रीगणेशा’ असे दिले असले तरी त्यात गणेश या देवाचा उल्लेखही केला नव्हता. तेंव्हाच्या नव्या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये असतांना आलेल्या एका वेगळ्या अनुभवाची हकीकत त्यात दिली होती. पुढे त्या वर्षी मी एका मोठ्या आजारामुळे अंथरुणाला खिळलो होतो आणि इतर कामे तर करू शकत नव्हतोच, हा ब्लॉगही कदाचित बंदच पडेल असे वाटत होते. त्या निराशाग्रस्त मनस्थितीत असतांना त्या वर्षीचा गणेशोत्सव आला. त्या वर्षी गणेशोत्सवाच्या सुमारास मी त्या मोठ्या आजारातून देवाच्या कृपेने बरा होण्याच्या मार्गावर होतो. अजून हिंडायफिरायला लागलो नव्हतो त्यामुळे घराच्या बाहेरील उत्साहाच्या वातावरणात सामील होणे मला शक्य नव्हते. घरात बसल्याबसल्याच किंवा अंथरुणावर पडल्या पडल्या गणरायाची विविध रूपे मनात आठवून आणि टेलिव्हिजन, इंटरनेट वगैरेवर पाहून त्यावर ‘कोटी कोटी रूपे तुझी’ ही लेखमालिका लिहून आपल्या परीने ती विविध रूपे वाचकांना दाखवण्याचा प्रयत्न करायचे ठरवले. गणपतीच्या कृपेनेच मी त्याच्या कोटी कोटी रूपांपैकी काही निवडक रूपे सचित्र लेखांमध्ये दाखवू शकलो. अशा प्रकारे ‘कोटी कोटी रूपे तुझी’ ही मालिका मी ओळीने ११ दिवस ११ भागात लिहू शकलो. त्या काळात माझ्या अंगात काही काम करायचे फारसे त्राण नव्हते आणि मनोबलसुध्दा बरेच ढासळलेले होते. पण तरीही नेटाने अकरा दिवस रोज काही लिहू शकलो आणि त्या काळात माझ्या काँप्यूटर आणि इंटरनेटनेही साथ दिली, घरातली वीज गेली नाही की बाहेरची इंटरनेटची केबल तुटली नाही. ही विघ्नहर्त्याची कृपा असावी असे वाटायला लागले. त्यानंतर माझ्या शारीरिक परिस्थितीतही सुधारणा होत गेली आणि मनातला आत्मविश्वास पूर्ववत होत गेला. या ब्लॉगवरील लेखनात इतके सातत्य त्यापूर्वी कधी आले नव्हते आणि नंतरही ते क्वचितच घडले असेल.
२००७ मध्ये गणपतीचा सण साजरा करण्यासाठी मी पुण्याला गेलो होतो. त्या वर्षी हा ब्लॉग कोमात गेला होता, पण याहू ३६० वर आनंदघन याच नावाचा दुसरा ब्लॉग चालत होता. (पुढे तो बंद पडला) माझा मराठीभाषी संगणकसखा त्या वेळेस पुण्याला माझ्यासोबत नव्हता. मुलाक़चा एक इंग्रजीभाषी लॅपटॉप माझ्या हाताशी आला, पण त्याला मराठी भाषा कशी शिकवायची याचे ज्ञान माझ्याकडे नव्हते. मला या घोळाची पूर्वकल्पना असल्यामुळे मी थोडी पूर्वतयारी करून पुण्याला गेलो होतो. त्या वेळेस गजाननाची कांही विशेष रूपे आणि त्याची कांही लोकप्रिय गाणी चित्ररूपाने दाखवण्याचा प्रयत्न मी याहूवर केला. तीच गाणी मी नंतर २००८ साली ‘गणपतीबाप्पा मोरया’ या मथळ्याखाली या ब्लॉगवर दिली. शिवाय ‘उंदीरमामाकी जय’ हा नवा लेख लिहिला.
त्यानंतरच्या काळातसुध्दा या ब्लॉगवर मी गणेशोत्सव साजरा करत राहिलो. ‘गणेशोत्सव आणि पर्यावरण’ या विषयावर लेखमाला लिहून त्यात दोन्ही बाजूचे मुद्दे मांडले. गणेशोत्सवात होणारी सजावट आणि गणेशमूर्तींचे विसर्जन यांचा पर्यावरणावर किती परिणाम होतो, तो कसा आणि किती कमी करता येईल याबरोबरच यात किती सत्य आणि तथ्य आहे, किती विपर्यास किंवा अतीशयोक्ती आहे, हे परिणाम टाळण्यासाठी जे पर्यायी मार्ग सुचवले जातात त्यांचे कोणते चांगले किंवा वाईट परिणाम होऊ शकतात, ज्या वस्तूंच्या गणेशोत्सवामध्ये होत असलेल्या वापरावर आक्षेप घेतले जातात त्याच वस्तूंचा इतर कोणत्या प्रकारे किती प्रमाणात वापर होत असतो, मुळात समाजाला उत्सवांचीच किती गरज असते किंवा उपयोग होतो वगैरे सर्व बाजूने विचार करणारे लेख या मालिकेत दिले होते.
गणेशोत्सवाचे ऐतिहासिक महत्व सांगून झाल्यावर त्याच्याशी तुलना करून आज त्याला आलेले रूप हा एक टीका करणाऱ्यांचा आवडता विषय आहे. लोकमान्य टिळकांच्या वेळच्या गणेशोत्सवाची आठवणही या वेळी केली जाते. मलाही याबद्दल लिहिण्याचा मोह झाला. इतका जुना भूतकाळ मी काही प्रत्यक्ष पाहिलेला नाही. त्याबद्दल फक्त वाचले आहे. गेल्या दोन तीन दशकात म्हणजे तुलनेने आजच्या काळात होत असलेल्या उत्सवाबद्दल लिहितांना त्यातल्या काही सकारात्मक बाबींकडे लक्ष वेधण्याचा आणि नकारात्मक किंवा वादग्रस्त गोष्टींच्या मागची कारणपरंपरा शोधण्याचा अल्पसा प्रयत्नही केला. गणेशोत्सवातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या, कोणत्या खटकल्या आणि कोणत्या गोष्टींची उणीव भासली याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
२०११ साली गणेशोत्सवाला चारच दिवस राहिले असतांना मला पुन्हा एकदा हॉस्पिटलाची वारी करावी लागली होती. गणेशचतुर्थीच्या आदले दिवसापर्यंत तबेत थोडी नरम गरमच होती. गणेशाची स्थापना झाली, अनेक आप्तस्वकीयांच्या भेटी झाल्या, घरातले वातावरण चैतन्याने भारले गेले आणि त्यातून मलाही ऊर्जा मिळाली असावी. पुन्हा एकदा या दिवसात फक्त गणेशाबद्दल लिहायचे ठरवले. अगदी रोजच्या रोज लिहायले जमले नाही पण आठ लेख लिहिले गेले. त्यांना यथायोग्य अशी नवी चित्रे मात्र देता आली नाहीत. त्यात मी गणपतीची स्तोत्रे, कहाण्या, गाणी वगैरेंकडे लक्ष पुरवले. या निमित्याने काही जुनी, काही नवी गीते, काही स्तोत्रे, काही स्तोत्रांचे अर्थ वगैरे देण्याचा प्रयत्न केला होता. गणपती आणि चंद्रदेव, स्यमंतकमणी यांच्या कहाण्या सांगितल्या .
२०१२ साली आलेल्या गणेशोत्सवात मी ‘गणपती बाप्पा वर्तमानपत्रांमधला’ हा विषय घेऊन त्यात गणित आणि लेखनकलांचा गणपतीशी असलेला संबंध दाखवला तसेच लोकमान्य टिळकांच्या काळापासून आजकालच्या परिस्थितीपर्यंत या उत्सवात कसा बदल होत गेला याचाही वर्तमानपत्रांमधून आलेल्या लेखांच्या आधारे आढावा घेतला.
******************
2014
गणेशोत्सवानिमित्य
तुझ्या कांतिसम रक्तपताका पूर्वदिशी फडकती।
अरुण उगवला, प्रभात झाली, ऊठ महागणपती ।।
सूर्याआधी दर्शन घ्यावे तुझे मूषकध्वजा ।
शुभद सुमंगल सर्वाआधी तुझी पाद्यपूजा ।
छेडुनि वीणा जागविते तुज सरस्वती भगवती ।।
आवडती तुज म्हणुनि आणिली रक्तवर्ण कमळे ।
पांचमण्याच्या किरणांसम ही हिरवी दुर्वादळे ।
उभ्या ठाकल्या चवदा विद्या घेउनिया आरती ।।
शुर्पकर्णका, ऊठ गजमुखा, उठी रे मोरेश्वरा ।
तिन्ही जगांचा तुच नियंता, विश्वासी आसरा ।
तुझ्या दर्शना अधीर देवा हर, ब्रम्हा, श्रीपती ।।
दर वर्षी गणेशोत्सवाच्या वेळी एकादा मुद्दा (थीम) घेऊन त्यावर लिहायचे ठरवले होते. या वर्षी तीन दिवस उलटून गेले तरी या ब्लॉगवर यायला वेळच मिळत नव्हता. त्यामुळे या सुंदर भूपाळीने सुरुवात करून हे पान उघडले आहे. आता जसे सुचेल, जमेल तसे या पानावरच रोज लिहायचे असे ठरवले आहे.
दर वर्षी गणेशोत्सवाच्या वेळी एकादा मुद्दा (थीम) घेऊन त्यावर लिहायचे ठरवले होते. या वर्षी तीन दिवस उलटून गेले तरी या ब्लॉगवर यायला वेळच मिळत नव्हता. त्यामुळे या सुंदर भूपाळीने सुरुवात करून हे पान उघडले आहे. आता जसे सुचेल, जमेल तसे या पानावरच रोज लिहायचे असे ठरवले आहे.
मी शाळेत शिकत असतांना दरवर्षी गणेशचतुर्थी हा एकमेव सण आमच्या हायस्कूलमध्ये धूमधडाक्यात साजरा होत असे. इतर सणवारांसाठी फक्त सुटी असे. त्या दिवशी ते सण घरीच साजरे केले जात असत. गणेशचतुर्थीच्या दिवशी मात्र आपापल्या घरातले गणपती बसवून झाले की सगळी मुले शाळेकडे धाव ठोकत असत. घरून निघायला उशीर झाला तर गावात जिथे कुठे आमच्या शाळेची मिरवणूक चालत असेल तिथे येऊन त्यात सामील होत असत. ढोल ताशा, झांजा वगैरेंच्या आवाजावर “गणपती बाप्पा मोरया”चा घोष करत आमची वानरसेना गणपतीच्या मूर्तीसह गावात फिरून शाळेत येत असे. तिथल्या सेंट्रल असेंब्ली हॉलमध्ये त्या मूर्तीची स्थापना केली जात असे. त्या काळात ज्या वस्तू आजूबाजूच्या निसर्गात किंवा स्थानिक बाजारात उपलब्ध असायच्या त्यामधून सजावट केलेली असायची. शाळेचा हॉल तर मुलांनी गच्च भरलेला असायचा त्याच्या पुढच्या बाजूचा कॉरीडॉर मुलांनी आणि मागच्या बाजूचा मुलींनी भरलेला असायचा. पूजा, आरती वगैरे करून चिमूटभर प्रसाद खाऊन घरी गेल्यावर संध्याकाळी पुन्हा सगळे शाळेत येत. त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा वाजत गाजत आणि फटाके उडवत गणपतीची मिरवणूक निघे पण ती फक्त शाळेच्या आवारातच असलेल्या विहिरीपर्यंतच जात असे. तिथे पोचल्यावर पट्टीचे पोहणारी चार पाच मुले गणपतीच्या मूर्तीला हातात धरून पाय-यांवरून खाली उतरत आणि पाण्यात बुडी घेऊन विहिरीच्या पार तळापर्यंत पोचत आणि तिला अलगदपणे तळाशी ठेऊन वर येत असत. बाकीची काही मुले पाय-यावर तर काही काठावर उभी राहून ते दृष्य पहात असत. शिक्षकवर्ग फक्त मार्गदर्शन करण्यापुरते काम करत असत, मुख्य हौस मुलांचीच असे. शाळेतल्या गणपतीचे विसर्जन करून झाल्यावर सगळेजण आपापल्या घरातल्या गणपतीच्या संध्याकाळच्या आरतीच्या तयारीला लागत.
असा अर्ध्याच दिवसाचा गणपती मी फक्त आमच्या शाळेतच पाहिला. आमच्या गावात काही लोकांकडे दीड दिवसांचा, कुणाकडे तीन, पाच किंवा सात दिवसांचा असायचा. काही लोकांकडे बाप्पाचा मुक्काम अनंतचतुर्दशीपर्यंत असायचा तर काही लोकांचे गणपती गौरीसोबत जायचे. ते सहा किंवा सात दिवस रहात असत. गणेशोत्सवाच्या बाबतीतले हे वैविध्य मुंबईतसुद्धा दिसते. दीड दिवसांचा गणपती उत्सव साजरा करणा-या एकाला त्याच्या मित्राने विचारले, “तुम्ही लोक इतके कसे रे चिक्कू? गणपती आला ना आला तेवढ्यात त्याला निरोप देऊन मोकळे होता. आम्ही बघा कसे बाप्पाला चांगले दहा दिवस आमच्याकडे ठेवून घेतो.”
त्यावर पहिला मित्र म्हणाला, “बरं तू साग, गणपती हा काय देणारा देव आहे?”
“बुद्धी देणारा.”
“मग त्यासाठी आम्हाला दीड दिवस पुरेसे आहेत, तुम्हाला लागत असतील बाबा दहा बारा दिवस.”
ज्या गणपतींचे विसर्जन दुस-या दिवशी केले जाते त्यांना दीड दिवसाचा असे कदाचित खिजवण्यासाठी म्हणत असतील, पण तिस-या दिवशी विसर्जन होत असलेल्या गणपतींना मात्र अडीच दिवसाचे न म्हणता तीन दिवसाचे असे का म्हणायचे हे गणित मला कधी समजले नाही. दीड, अडीच असे करत हाच क्रम पुढे वाढवत नेला तर मग साडे चार, साडेसहा, साडे नऊ असे आडमोडी आकडे येतील म्हणून कदाचित अडीच दिवसांना राउंड ऑफ करून तीन दिवस म्हंटले जात असेल. आमच्या घरातला गणपती मात्र मोजून पाच दिवसांचाच असायचा. ही प्रथा माझ्या वडिलांनी सुरू केली की आजोबांनी की पणजोबांनी ते माहीत नाही. आमच्या लहानपणी असले प्रश्न मनात उठले तरी ते विचारायची कोणाची प्राज्ञा नसायची. मी मात्र माझ्या मुलांना सांगण्यासाठी एक एक्स्प्लेनेशन तयार केले.
गणपतीची आरास आणि इतर तयारी करण्यात बराच वेळ खर्च केला जातो, सजावट करण्यात हौसेने कलाकुसरत केली जाते, नवनवीन कल्पनांना आकार दिला जातो. आपले कलाकौशल्याचे काम चार लोकांनी येऊन पहावे असे वाटते. गावातली मित्र मंडळी, नातेवाईक वगैरे लोक या निमित्याने भेटायला येतात. त्यांना सवडीने येऊन जायला थोडी फुरसत द्यायला पाहिजे. घरातल्या सर्वांनी मिळून एकत्र जमून गजाननाची पूजा, आरती वगैरे करण्यात थोडी मजा येऊ लागलेली असते. ती गोडी दीड दोन दिवसात संपवून टाकावी असे वाटत नाही. असे असले तरी या उत्सवाच्या दिवसात रोजच्या भरगच्च कामांमध्ये या कार्यक्रमांची भर पडलेली असते. शाळा, ऑफीस वगैरेंची व्यवधाने सांभाळून ते सगळे कार्यक्रम अगदी साग्रसंगीत रीतीने रोज नियमितपणे करणे जास्त दिवस अशक्य नसले तरी कठीण असते. शिवाय घरात गणपती बसलेला असतांना शक्य तोवर कोणी ना कोणी नेहमी घरात हजर राहण्याची गरज असते. त्या काळात मला अनेक वेळा फिरतीवर परगावी जावे लागत असे, ते जास्त दिवस पुढे ढकलता येत नसे. या सगळ्याचा विचार करता घरातल्या गणेशोत्सवासाठी पाच दिवस हा चांगला आणि ऑप्टिमम पीरियड वाटतो. बाप्पासाठी काही करत असल्याचे समाधानही मिळते आणि त्याचा ताणही पडत नाही. हे लॉजिक मुलांना बहुधा पटले असावे.
ःःःःःःःःःःःःःःःःः
२०१५ साली आम्ही दोघेही एका अपघातात जबर जखमी झालो होतो. परमेश्वराच्या कृपेने त्यातून वाचलो, पण दीर्घकाळ आजारी होतो आणि हॉस्पिटलच्या वाऱ्या करत होतो. त्यामुळे त्या वर्षीचा गणेशोत्सव मनासारखा साजरा करणे शक्य झाले नाही. याची खंतच मी दोन लेखांमधून व्यक्त केली होती. मी त्यातून हळूहळू सावरलो, पण अलकाचे दुसरे गंभीर दुखणे बळावले आणि तिची तब्येत खालावत जाऊन २०१६ च्या श्रावणमहिन्याच्या अखेरीस ती देवाघरी गेली. त्यामुळे त्या वर्षी आम्ही घरी गणेशोत्सव साजरा केरू शकलो नाहीच, ब्लॉगवरही काही लिहिण्याच्या मनःस्थितीत मी नव्हतो. २०१७, २०१८ आणि २०१९ साली लिहिलेले लेख या ब्लॉगवर वेगळे चढवणार आहे.
************
गेल्या दहा वर्षातील लेखांची यादी खाली दिली आहे.
२००६ : कोटी कोटी रूपे तुझी – पुष्प १ ते ११
२००७ साली हा ब्लॉग बंद होता.
२००८ : गणपतिबाप्पा मोरया भाग १ ते ३
उंदीरमामाकी जय
गणेशोत्सव आणि पर्यावरण १ ते ५
२००९ : आधी वंदू तुज मोरया
मूषक आणि माउस
लोकमान्य टिळक आणि गणेशोत्सव -१, २
यंदाचा आमचा गणेशोत्सव
पुढच्या वर्षी लवकर या … की एकदा येऊच नका?
२०१० : गणेशोत्सवातली उणीव
यंदाच्या गणेशोत्सवातील आगळेपण
यंदाच्या गणेशोत्सवातील आणखी काही आगळ्या गोष्टी
२०११ : गणपती, तुझी नावे किती ?
ॐकार गणेश
अथर्वशीर्षामधील गणपतीचे वर्णन
पुराणातला गणपती
पारंपरिक पध्दतीची गणपतीची गाणी -१ ते ४
२०१२ : गणपती बाप्पा वर्तमानपत्रांमधला – भाग १ – गणपती आणि गणित
भाग २ – गणेश आणि लेखनकला
भाग ३ – सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात
भाग ४ – सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रसार
भाग ५ – टिळकांच्या काळातली आणि आताची परिस्थिती
भाग ६ – टिळकांच्या काळातली आणि आताची परिस्थिती (उत्तरार्ध)
२०१३ : गणेशोत्सवातली उणीव
अनंतचतुर्दशी
वक्रतुंड महाकाय
गणपतीची आरती – २ – शेंदुर लाल चढायो
गणपतीची आरती – सुखकर्ता दुखहर्ता
२०१४ : गणेशोत्सवानिमित्य
२०१५ : गणपतीबाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
गणपतीबाप्पांची इच्छा
हे सर्व लेख खालील दुव्यावर एकत्र उपलब्ध आहेत.
https://anandghare2.wordpress.com/category/%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%95/%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80/
Filed under: अनुभव, गणपती, धार्मिक | Leave a comment »