श्यामची आई आणि साने गुरुजी

माझ्या पिढीमधल्या बहुधा प्रत्येक मुलाने शाळेत असतांना श्यामची आई हे पुस्तक वाचलेलेच असायचे आणि त्याने तो भारावून गेलेलाही असायचा. यातला श्याम म्हणजे लहानपणीचे साने गुरुजी अशी माझी तरी ठाम समजूत होती. त्यांची देशसेवा वगैरे गोष्टी मोठा झाल्यानंतर समजल्या.
मी अकरा वर्षांपूर्वी ‘श्यामची आई’ या चित्रपटावर लिहिलेला लेख आणि साने गुरुजींची माहिती देणारा वॉट्सअॅपवर मिळालेला एक लेख खाली दिले आहेत.

श्यामची आई

श्यामची आई

छम्‌ छम्‌ छम्‌ ….. छम्‌ छम्‌ छम्‌ ।
छडी लागे छ्मछ्म, विद्या येई घमघम ।।
छम्‌ छम्‌ छम्‌ ….. छम्‌ छम्‌ छम्‌ ।।

मोठ्या मोठ्या मिश्या, डोळे एवढे एवढे लाल ।
दंतोजींचा पत्ता नाही, खप्पड दोन्ही गाल ।
शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम ।।
छम्‌ छम्‌ छम्‌ ।।

तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी भिंती झाल्या घाण ।
पचापचा शिव्या देई खाता खाता पान ।
“मोऱ्या मूर्खा- !”, “गोप्या गद्ध्या !”, देती सर्वा दम ।।
छम्‌ छम्‌ छम्‌ ।।

तोंडे फिरवा, पुसती गिरवा, बघु नका कोणी ।
हसू नका, रडू नका, बोलु नका कोणी ।
म्हणा सारे एकदम, ओनामा सिद्ध्म्‌ ।।
छम्‌ छम्‌ छम्‌ ।।

हे गाणे माझ्या लहानपणी सगळ्या मुलांना अतीशय आवडत असे. माझ्या पुढच्या पिढीमधल्या मुलांनी ते क्वचितच ऐकले असेल, पण त्यानंतरच्या पिढीतल्या लिटल् मॉनिटर मुग्धा वैशंपायन हिने हे गाणे सारेगमप लिटल् चँप्सच्या स्पर्धेत सादर केले आणि सर्वांनी ते अक्षरशः डोक्यावर घेतले. सारेगमपच्या महाअंतिम फेरीत तिनेच ते गायिले, मुग्धावर झालेल्या खास भागात या गाण्याचा समावेश होता आणि वाशीला झालेला या लिटल् चँप्सचा एक कौतुकसोहळा मी पाहिला त्यातसुध्दा तिने सादर केलेल्या या गाण्याला अमाप टाळ्या पडल्या. पंडरत्न या नांवाने निघालेल्या सीडीमध्ये हे गाणे घेतलेले असल्याने अनेक लोक ते ऐकत राहणार आहेत. विख्यात कवी आणि गीतकार वसंत बापट यांनी लिहिलेले हे मजेदार गाणे सुप्रसिध्द संगीत दिग्दर्शक वसंत देसाई यांनी १९५३ साली निघालेल्या श्यामची आई या चित्रपटासाठी स्वरबध्द केले आणि त्यावेळी बालवयात असलेले आताचे ज्येष्ठ संगीतज्ञ पं.हृदयनाथ मंगेशकर यांनी ते गायिले होते. माझ्या आईच्या वयाच्या स्त्रिया एकत्र येऊन जेंव्हा गाणी वगैरे म्हणायच्या त्यात एक गाणे हमखास असायचे. त्याचे शब्द होते,

भरजरी ग, पितांबर, दिला फाडुन, द्रौपदिसी बंधु शोभे नारायण ।
हे गाणे त्या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक आचार्य अत्रे यांनी स्वतः लिहिले होते आणि आशा भोसले यांनी गायिले होते. कवी यशवंत यांचे एक अजरामर असे मातृप्रेमाने ओथंबलेले गीत आशा भोसले यांच्याच आवाजात या चित्रपटात घातले होते. ते होते,
’आई !’ म्हणोनी कोणी । आईस हाक मारी , ती हाक येइ कानी । मज होय शोककारी ।।
या गाण्यातली “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” हा ओळ तर आता मराठी भाषेतली एक म्हण बनली आहे. श्यामची आई या चित्रपटाला स्व. वसंत देसाई यांनी इतके मधुर संगीत दिले असले तरी गाणी हा कांही या चित्रपटाचा आत्मा नव्हता. स्व.साने गुरूजींनी लिहिलेल्या याच नांवाच्या पुस्तकातल्या
कथेवर तो काढला होता आणि या पुस्तकाद्वारे साने गुरूजींनी दिलेल्या शिकवणीवर त्याहून जास्त महत्व होते.
ही शिकवण समर्थपणे मांडलेला आणि या सर्व अमर गाण्यांनी नटलेला’श्यामची आई’ हा अजरामर चित्रपट प्रदर्शित होऊन आता छपन्न वर्ष पूर्ण झाली. शुक्रवार, ६ मार्च १९५३ रोजी मुंबईच्या कृष्णा टॉकीज (आताचे ड्रीमलॅन्ड) मध्ये या सिनेमाचा पहिला खेळ श्री. आचार्य अत्रे ह्यांच्या मातोश्री, श्री. व्ही.शांताराम ह्यांच्या मातोश्री, श्री. साने गुरुजींच्या मावशी व भगिनी, श्री. माधव वझे ह्यांच्या मातोश्री आणि श्री. माधव अलतेकर ह्यांच्या मातोश्री या पंचमातांच्या उपस्थितीत झाला.
‘श्यामची आई’ हा मराठी बालसाहित्यातला अनमोल संस्कारांचा ठेवा आहे. हा ठेवा घरोघरी नेऊन पोचवण्याचे महान कार्य ७६ वर्षाचे श्री. पुराणिक हे गेली १३ वर्षे सतत करत आहेत. रोज एक तरी पुस्तक विकले गेलेच पाहिजे नाहीतर त्या दिवशी एक जेवण करायचे नाही असा त्यांचा संकल्प आहे, पण गेल्या तीन वर्षात अशी वेळ फक्त तीन दिवशी आली. सरासरीने पाहता त्यांची रोज तीन पुस्तके विकली गेली आहेत. “दुस-याकडून आदर, विश्वास, सत्याची अपेक्षा करण्याआधी स्वत: ते आधी आचरणे म्हणजेच संस्कार. संस्कार ही काही अचानक माणसांत येणारी शक्ती नव्हे. संस्कार हे घडवावे लागतात, हळूहळू रूजवावू लागतात.” असे ते सांगतात. पुस्तकातला आणि चित्रपटातली श्यामची आईसुध्दा रोज घडणा-या लहान सहान प्रसंगातून वेळोवेळी श्यामला समज देऊन किंवा समजावून सांगून आणि स्वतःच्या आचरणातून त्याच्या मनावर संस्कार करत असते.
ही सर्व सचित्र माहिती मराठीवर्ल्ड या संकेतस्थळावर भाग्यश्री केंगे यांनी दिली आहे. मी त्यांचा आभारी आहे.

—————————————–

साने गुरुजी

साने गुरुजी

पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी यांचा स्मृतिदिन (११ जून,१९५०)

साने गुरूजी हे प्रसिद्ध, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि मराठी साहित्यिक होते. साधी, सरळ, ओघवती भाषा, भावपूर्ण संस्कारक्षम निवेदनशैली हे त्यांच्या लिखाणाचे विशेष गुण होते. ‘श्यामची आई’, ‘नवा प्रयोग’, ‘सुंदर पत्रे’, ‘हिमालयाची शिखरे’, ‘क्रांती’, ‘समाजधर्म’, ‘आपण सारे भाऊ’ इत्यादी त्यांचे विपुल साहित्य प्रसिद्ध आहे.

साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. गावची खोती त्यांच्या घराण्यात होती.खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशीच होती. पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशा रितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात २४ डिसेंबर,१८९९ रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचे जीवन घडले . त्यानी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती.

शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे (१९२४ ते १९३०) नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतीगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील प्रताप तत्वज्ञान केंद्र येथे त्यांनी तत्वज्ञानाचा अभ्यासही केला.

१९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीच वापरत असत. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी ‘काँग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढले , दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले , जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन (१९३६) यशस्वी होण्यासाठी कार्य केले . १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार या माध्यमांतून त्यांनी राजकीय कार्य केले. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचरसरणीस अनुसरून त्यांनी ‘मैला वाहणे’ व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली. त्यानी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली. ‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांच्या देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील बलसागर भारत होवो सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या.

समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वतः तमिळ, बंगाली आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे-रचित ‘गीता प्रवचनेसुद्धा विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात (१९३२) सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला. तसेच पुढे बंगलोर येथील तुरुंगात असताना त्यांनी तिरुवल्लिवर नावाच्या कवीच्या ‘कुरल’ नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर केले. नंतर फ्रेंच भाषेतील Les Misérables या कादंबरीचे ‘दु:खी’ या नावाने मराठीत अनुवादन केले. डॉ. हेन्‍री थॉमस या जगप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाच्या The story of human race या पुस्तकाचे मराठीत ‘मानवजातीचा इतिहास’ असे भाषांतर केले. ‘करील रंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे’ हे गुरुजींच्या जीवनाचे सार होते. मनोरंजनातून मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी गुरुजींनी अनेक पुस्तके लिहिली. साने गुरुजींचे भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मावर निरतिशय प्रेम होते. त्यानी भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला. तसेच भारतीय संस्कृतीतील अनेक महापुरुषांची चरित्रे लिहिली. त्यांचे ‘मोरी गाय’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

गुरुजींनी लिहिलेली ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ ही कविता त्या काळी सर्व शाळांमधून शिकवली जायची

मातृहृदयी गुरुजींनी आईच्या प्रेमावर ‘मोलकरीण’ नावाची अप्रतिम कादंबरी लिहिली ज्यावर पुढे याच नावाचा मराठी चित्रपट निघाला. रमेश देव ,सीमा,इंदिरा चिटणीस यांनी सुंदर अभिनय करून गुरुजींच्या कादंबरीला न्याय दिला .

आचार्य अत्र्यांसारख्या डोंगराएवढ्या प्रचंड माणसाने १०००० वर्षात पुन्हा होणार नाही असा अजरामर चित्रपट “श्यामची आई ” निर्माण केला. या चित्रपटाला भारत सरकारने त्याच वर्षी (१९५४)सुरु केलेला सुवर्ण कमळ पुरस्कार दिला.

१९३० मध्ये साने गुरुजी त्रिचनापल्लीच्या तुरुंगात होते. त्यावेळी दक्षिणेकडच्या अनेक भाषातज्ज्ञांशी त्यांच्या संबंध आला होता. अनेक भाषांचे वैभव आपल्याला अज्ञात असल्याचे त्यांना जाणवले. आपण भारतात राहत असूनही इथल्या वेगवेगळ्या प्रांतांत बोलल्या जाणाऱ्या भाषांची माहिती आपल्याला नसते; या भाषा शिकायच्या असल्यास तशी संस्थाही आपल्याकडे नाही याची खंत नेहमी साने गुरुजींना वाटायची. यातूनच ‘आंतरभारती’ची संकल्पना त्यांना सुचली.

प्रांतीयता या भारतीयाच्या एकत्वाला बाधक ठरणार असे त्यांना वाटू लागल्यामुळे त्यांनी प्रांताप्रांतांतील द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधुत्वाचे वातावरण वाढावे, यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात, चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. त्यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनाप्रमाणे काही सोय करावी, ही मनीषा त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलनामध्ये याच ठरावावर बोलताना व्यक्त केली होती

माणगावचे सानेगुरुजी स्मारक

साने गुरुजींच्या स्मरणार्थ ‘सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारक’ या नावाची संस्था महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातल्या माणगाव नजीकच्या वडघर या निसर्गरम्य गावात आहे. १९९९मध्ये ३६ एकर जागेवर या संस्थेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे.. यामध्ये विद्यार्थांच्या शिबिरासाठी दोन डॉरमेट्री आणि कॅम्पिंग ग्राउंड बांधण्यात आल्या होत्या. साडेतीनशे विद्यार्थी मावतील इतकी या डॉरमेट्रीची क्षमता आहे. युवा श्रमसंस्कार छावणी, वर्षारंग, प्रेरणा प्रबोधन शिबिर मालिका, मित्रमेळावा, अभिव्यक्ती शिबिर, राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरे, साहित्यसंवाद, भाषा अनुवाद कार्यशाळा असे अनेक उपक्रम या संस्थेत नियमित होत असतात. शाळांच्या अनेक उपक्रमांसाठीही या डॉरमेट्री उपलब्ध करून दिल्या जातात.

या संस्थेने आता (२००९ साली) प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम हाती घेतले आहे. या दुसऱ्या टप्प्यात ‘सानेगुरुजी भवन’ आणि ‘आंतरभारती अनुवाद केंद’ अशा दोन प्रकल्पांची योजना आखली आहे. साने गुरुजींच्या कार्याचा आढावा घेणारे कायमस्वरूपी प्रदर्शन ‘सानेगुरुजी भवना’मध्ये होणार आहे. सानेगुरुजींचे स्मारक उभारणे हा या भवनामागचा उद्देश आहे. तसेच ‘आंतरभारती अनुवाद केंद्र’ हे साने गुरुजींनी पाहिलेल्या स्वप्नांची प्रतिकृती असेल. हे केंद काँप्युटर, इंटरनेट, ऑडियो-व्हिज्युअल रूम अशा सोयीसुविधांनी सज्ज असेल. इथे सुसज्ज लायब्ररीही सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. या लायब्ररीमध्ये लेखक, अभ्यासक, साहित्यिक शांतपणे संशोधन, अभ्यास करू शकतील, अशी संस्थेची योजना आहे. सानेगुरुजींचे आंतरभारतीचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ही संस्था झटत आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सामाजिक समानता येईल असे त्यांना वाटत होते परंतु समाजातील असमानता वाढतच गेली.तशातच महात्मा गांधीजींचा खून झाला त्या मुळे हळव्या मनाचे गुरुजी निराश झाले होते आणि त्यांनी २१ दिवसांचा उपवास देखील केला आणि शेवटी आपला मनोभंग झाला म्हणून ११ जून,१९५० रोजी त्यांनी झोपेच्या गोळ्यांचा ओव्हर डोस घेऊन जीवन संपवले आणि सारा देश एका महान देशभक्ताला मुकला.

सुधीर फडके यांनी गुरुजींचे बलसागर भारत होवो हे गाणे गायले आहे.

विद्यार्थ्यांवर संस्कार करून त्यांना देशाचे सुसंस्कृत नागरिक तयार करणाऱ्या शुचिर्भूत व्यक्तिमत्वाच्या परमपूज्य सानेगुरुजींची आठवण सगळ्यांना कायमच होत राहील.

आजच्या स्मृतीदिनी त्यांना भावपूर्ण आदरांजली

…… लेखक अज्ञात – वॉट्सअॅपवरून साभार दि.११-०६-२०२०

नवी भर दि.२४-१२-२०२०

लेखक,कवी ,स्वातंत्र्यसैनिक, अध्यापक, साहित्यिक, पत्रकार, समाजसेवक, लोकशाही समाजवादाचे भाष्यकार आणि आंतर-भारती चळवळीचे प्रवर्तक. पांडुरंग सदाशिव साने, तथा परंतु साने गुरुजी यांची आज जयंती . त्यांचा जन्म पालगड (ता. दापोली; जि. रत्नागिरी ) येथे झाला. प्राथमिक शिक्षण पालगडला; माध्य-मिक शिक्षण दापोली, औंध, पुणे येथे. बी. ए. ची पदवी घेऊन (१९२२) मुंबई विद्यापीठाची एम. ए. ची पदवी (१९२४) त्यांनी संपादन केली. अमळनेर ( जि.जळगांव ) येथील तत्त्वज्ञान मंदिरात अधिछात्र (फेलो); पुढे तिथल्याच ‘प्रताप हायस्क्रूल’ मध्ये शिक्षक व वसतिगृहप्रमुख म्हणून काम केले. १९३०–३२ च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीतील सहभागामुळे धुळे, नासिक आणि तिरुचिरापल्ली येथे तुरुंगवास भोगला.नासिक जिल्ह्यातील चांदवड येथे बिटिश सरकारविरुद्घ परखड भाषण केल्याबद्दल पुन्हा एकदा धुळे येथील तुरुंगात त्यांची रवानगी झाली (१९४०). दरम्यानच्या काळात साक्षरतेचे वर्ग चालविणे, खादी विकणे, काँग्रेससाठी निधी जमविणे, देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतलेल्यांच्या तसेच देशासाठी बलिदान केलेल्यांच्या कुटुंबियांना साहाय्य करणे इ. कार्यांत त्यांनी स्वतःला झोकून दिले.जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता ह्यांचे निर्मूलन झाले पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. १९४६ मध्ये पंढरपूरचे विठ्ठलमंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे, म्हणून त्यांनी प्राणांतिक उपोषण केले आणि त्यांच्या मंदिरप्रवेशाचा मार्ग मोकळा करून दिला.
तिरुचिरा-पल्लीच्या तुरुंगात असताना त्यांनी विश्वभारतीच्या धर्तीवर ‘आंतर-भारती’ ही संस्था स्थापन करण्याचा संकल्प केला. भारतात ‘आंतरभारती’चे केंद्र असावे; त्याच्या शाखा निरनिराळ्या राज्यांत असाव्यात; त्यांच्या माध्यमातून विविध राज्यांतील भाषा, चालीरीती, परंपरा, कला, कारागिरी, लोकसाहित्य, नृत्ये ह्यांचा अभ्यास व्हावा आणि अशा तऱ्हेने राष्ट्रीय एकात्मता साधावी, अशी त्यांची कल्पना होती. १९४८ साली त्यांनी साधना हे साप्ताहिक पुण्यात सुरू केले .समाजवादी विचारप्रणालीच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक बंधुभाव वाढीला लागावा व समतेची प्रस्थापना व्हावी, हा त्यामागील हेतू होता. विद्यार्थी (मासिक), काँग्रेस (साप्ताहिक), कर्तव्य (सायंदैनिक) अशी अन्य नियतकालिकेही त्यांनी चालवली. युवकांच्या आणि किसानांच्या संघटना बांधण्याचाही त्यांनी प्रयत्न केला.पुणे येथे १९४७ साली भरलेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
साने गुरुजींनी कादंबरी, कथा, बालसाहित्य, कविता, निबंध, चरित्र इ. साहित्यप्रकारांत विपुल लेखन केले. त्यात बालांसाठी आणि कुमारांसाठी केलेले लेखन ठळकपणे नजरेत भरते. ‘करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे’ ही त्यांची ह्या लेखनामागची भूमिका होती; तथापि मनोरंजनाबरोबरच मुलांवर उत्तम नैतिक संस्कार व्हावेत, हेही त्यांचे उद्दिष्ट होते. त्या दृष्टीने श्यामची आई (१९३५) हे त्यांचे आत्मकथनपर पुस्तक विशेष उल्लेखनीय होय.त्यात श्याम हा आपल्या आईच्या आठवणी सांगत आहे आणि त्या स्मृतींतून भारतीय संस्कृतीतल्या उदात्त पैलूंनी समृद्घ झालेले एका मनस्वी स्त्रीचे व्यक्तिमत्त्व विलोभनीयपणे आकारत गेलेले आहे. आपल्या मुलांचे आयुष्य उन्नत करण्याची केवढी मोठी अंतःशक्ती आईमध्ये असू शकते, ह्याचा प्रत्यय ह्या पुस्तकातून अत्यंत प्रभावीपणे येतो. श्यामची आईचे अर्धेअधिक यश प्रांजळ, सरळ आणि निश्चल आत्मनिवेदनात आहे. मराठी कादंबरीवर झालेला गांधीवादाचा अनुकूल प्रभाव लक्षात घेता कादंबरी आणि स्मृतिचित्रे यांच्या मीलनरेषेवर उभी असलेली साने गुरुजींची एकमेव कृती श्यामची आई हीच सर्वार्थाने गांधीवादी व अजरामर ठरलेली कृती होय. ‘मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र’ म्हणून वर्णिल्या गेलेल्या ह्या पुस्तकावरून आचार्य अत्रे यांनी काढलेल्या श्यामची आई ह्या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपट-निर्मितीचा स्वतंत्र भारतातील पहिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला (१९५४).(मराठी विश्वकोष )

  • माधव विद्वांस यांच्या फेसबुकावरून साभार

संगीत साधना – पूर्वीच्या काळातली आणि आताची

हा लेख मी तीन भागात लिहिला होता. त्यांना एकत्र करून आणि थोडे संपादन करून या स्थळावर दिला आहे.

——————————–
संगीत साधना – पूर्वीच्या काळातली आणि आताची (भाग १)

bhimsen_s

स्वरभास्कर पं.भीमसेन जोशी यांनी त्यांच्या घरातल्या वडीलधारी लोकांच्या विरोधात जाऊन, एक प्रकारचे बंड पुकारून कलेची साधना, किंबहुना त्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. भीमसेनजी वयाच्या अकराव्या वर्षी घर सोडून संगीतशिक्षणासाठी बाहेरच्या जगात निघून गेले होते हे आता सर्वांना माहीत आहे. पण त्यांना संगीताचे बाळकडू त्यांच्या घरीच मिळाले होते, घरात त्यांच्या कानावर पडलेल्या सुरांमुळेच त्यांना बालवयातच संगीताची गोडी लागली होती, ते शिकण्याची उत्कट प्रेरणा त्यातूनच मिळाली होती, मग त्यासाठीच त्यांना आपले ते घर सोडण्याचा एवढा टोकाचा धाडसी निर्णय कां घ्यावा लागला होता?

आजच्या जगात शहरातल्या कॉस्मोपॉलिटन वस्तीतल्या सेल्फकन्टेन्ड ब्लॉकमध्ये, म्हणजे स्व.पु.ल.देशपांडे यांच्या भाषेत ‘बंद दरवाजाच्या’ पण खूप मोकळ्या विचारांच्या संस्कृतीत राहणाऱ्या लोकांना या विरोधाभासाचा नीटसा उलगडा कदाचित होणार नाही. पण भीमसेनजींच्या उत्तर कर्नाटक प्रदेशातला साठसत्तर वर्षांपूर्वीचा कालखंड मी स्वतः अनुभवला असल्यामुळे मला तो निदान किंचित तरी समजू शकतो. त्या काळात घरात विजेचे दिवे नव्हते, पाण्याचे नळ नव्हते, रेफ्रिजरेटर, टेलीव्हिजन, वॉशिंग मशीन यासारख्या कसल्याच यांत्रिक सुखसोयी नव्हत्या. सर्वसामान्य माणसाचे जगणे आजच्या तुलनेत शारीरिक दृष्टीने कष्टमय होते. रोज पहाटे झुंजूमुंजू उजाडले की सारे जण उठायचे, दरवाजा उघडून अंगणात सडारांगोळी घालायची आणि कामाला लागायचे. त्यानंतर रात्र होईपर्यंत घराचा दरवाजा उघडाच असे. एकत्र कुटुंबातल्या घरात भरपूर माणसे असत आणि आजूबाजूच्या सगळ्या शेजाऱ्यांचे दरवाजे उघडेच असल्यामुळे एका घरात खुट्ट झाले तरी ते सर्वांना समजत असे आणि काय झाले ते पहाण्यासाठी आणि गरज असल्यास मदतीसाठी सर्वजण धावून येत असत. गावातली सगळी माणसे ओळखीची असायची. त्यामुळे दिवसा ढवळ्या कोणी अज्ञात चोर घरात शिरण्याची शक्यताच नव्हती. घरातला सगळा कारभार उघड असल्यामुळे तो सर्वांच्या समोर असे आणि “लोक काय म्हणतील?” या प्रश्नाला जबरदस्त महत्व होते.

त्या काळच्या समाजात टोकाचा जातीभेद होता. मात्र याचा अर्थ भिन्न जातींमध्ये वितुष्ट होते असा नाही. पण बहुतांश लोक आपापल्या जातीजमातीच्या लोकांमध्येच राहणे पसंत करत असत. त्यामुळे खेड्यापाड्यांमध्ये जातीनिहाय वस्त्या, वाडे, गल्ल्या किंवा आळी असत. परंपरागत लोकसंगीताचे सुध्दा ध्रुवीकरण झाले होते. ज्या भागात श्लोक किंवा स्तोत्रांचे पठण किंवा घंटानाद आणि झांजांच्या साथीने आरत्या म्हंटलेल्या ऐकू येत असत त्या भागात ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर उच्चारलेले लावणीचे शब्द कधीच ऐकू आले नसते. मराठी संतांची अभंगवाणी आणि कानडी संतांची पदे मात्र याला अपवाद होती. विठोबा पांडुरंगाच्या भजनात सगळे लोक सामील होत असत. ग्यानबा तुकोबांचे अभंग घराघरात गायले जात असत. त्या काळातला स्त्रीवर्ग अजीबात घराबाहेर पडत नसला तरी घरातल्या घरात आणि शेजारणी-पाजरणींच्या घोळक्यात त्यांचे लोकसंगीत बहराला येत असे.

बाल भीमण्णांच्या आईला मधुर स्वरांची स्वर्गीय देणगी लाभलेली होती. संत पुरंदरदास वगैरेंची भजने ती तन्मयतेने गात असे. गायनाचा सार्वजनिक प्रयोग करणे त्या काळात वर्ज्य असले तरी घरातल्या भीमण्णांच्या कानावर ते गायन पडत होतेच आणि कुशाग्र बुध्दीमत्तेमुळे त्यांनी ती पदे आत्मसात केली होती. त्याशिवाय भजन, कीर्तन वगैरेंमधून त्यांचे संगीताचे श्रवण होत होतेच. त्यांना क्वचित कधी शास्त्रीय संगीत ऐकण्याची संधीसुध्दा मिळत असे. त्यातून ते इतके भारावून गेले की असे दिव्य संगीत आपल्यालासुध्दा शिकायलाच पाहिजे असे त्यांच्या मनाने घेतले.

लहान मुलाची इच्छा काय आहे ते पाहून ती पुरवायची पध्दत त्या काळी नव्हती. त्याच्या हिताच्या दृष्टीने त्याने काय शिकावे ते घरातली वडिलधारी मंडळीच पहात असत. परंपरागत रूढ समजुतींप्रमाणे जोशांच्या मुलाने संस्कृत शिकून वेदशास्त्रसंपन्न व्हावे, शास्त्री पंडित म्हणून मिरवावे ही अपेक्षा असेल. ऐंशी नव्वद वर्षापूर्वीच्या त्या काळातला नवा रोख पाहून त्या काळात तो इंग्रजी शिकून वकील किंवा सरकारी ऑफिसर झाला असता तर त्याने चांगले यश कमावले असते, शिक्षक झाला असता, रेल्वे, पोस्ट ऑफिस किंवा मामलेदार कचेरीत नोकरीला लागला असता तरी त्याला मान होता. गाणे बजावणे हे मात्र प्रतिष्ठित लोकांचे काम नव्हते. कलावंत या शब्दाला मान नव्हता, कलावंतीण हा तर अपशब्द होता. भीमसेन जर आधी व्यवस्थितपणे सरधोपट मार्गाला लागला असता आणि त्याने आपला शौक पुरा करण्यासाठी थोडे गायन वगैरे केले असते तर ते कदाचित त्याच्या घरच्यांना चालले असते. त्या काळातल्या समाजात देवाला प्रसन्न करण्यासाठी कोणी त्याचे गुणगान संगीतामधून केले तर त्याचे कौतुक होते, पण माणसांचे मनोरंजन करणे अत्यंत कमीपणाचे मानले जात असे. गायक वादक वगैरे मंडळी संस्थानिक, सरदार, जहागिरदार वगैरेंच्या पदरी असत. फारशी प्रसारमाध्यमेच अस्तित्वात नसल्यामुळे त्यांना लोकाश्रय नव्हता. देवल किर्लोस्कर वगैरेंच्या प्रयत्नामुळे नाटक कंपन्या चालत होत्या. संगीत शिकलेला मुलगा फार फार तर गायक नट बनू शकेल एवढीच त्याची झेप अपेक्षित होती. पण त्या व्यवसायाला नाके मुरडणारे लोकच अधिक होते.

अशा त्या काळात लहानग्या भीमाला शास्त्रीय संगीत शिकायचा ध्यास लागला. त्यासाठी घरी कोणीही त्याला पाठिंबा दिला नसता, त्या शिक्षणाची व्यवस्था करणे अशक्यप्राय होते. गावात राहून त्याची सोय होणे शक्यच नव्हते. त्यासाठी परगावी जाऊन रहायला परवानगी मागितली असती तर ती मिळाली नसती, उलट त्यात नक्कीच खोडा घातला गेला असता. असा विचार केल्यानंतर गुपचुपपणे घरातून पळून जाणे हा एकमेव पर्याय भीमण्णांना दिसला आणि तो पत्करून त्याचे होतील ते सारे परिणाम भोगण्याचे अतुलनीय मनोधैर्य अकरा वर्षाच्या वयात त्यांनी दाखवले. घर सोडल्यानंतर ते जर जवळपासच्या गावात गेले असते तर लगेच सापडले गेले असते, म्हणून ते मुद्दाम दूरवरच्या गावांमध्ये फिरत राहिले आणि कणाकणाने संगीतविद्या वेचत राहिले. त्यात थोडेफार यश मिळाल्यानंतर आपल्या गावाजवळच असलेल्या कुंदगोळ गावी जाऊन ते पं.रामभाऊ कुंदगोळकर ऊर्फ सवाई गंधर्व यांचेकडे गेले आणि मनोभावे त्यांची सेवा करून त्यांचे पट्टशिष्य झाले.

संगीत साधना – पूर्वीच्या काळातली आणि आताची (भाग २)

इसवी सन १९३०-३५ चा काळ आजच्यापेक्षा खूप वेगळा होता. त्या काळात देशांतर्गत दूरच्या प्रवासासाठी रेल्वे हे बहुधा एकमेव साधन होते. त्यातसुध्दा लांब पल्ल्याच्या गाड्या अगदी कमी होत्या. स्लीपर कोचची कल्पनासुध्दा निघालेली नव्हती. बहुतेक प्रवासी जवळपासच्या गावांना जाणारे असल्यामुळे गाडीत झोपायची आवश्यकता भासत नव्हती. कोळशाच्या इंजिनावर चालणाऱ्या त्या काळातल्या झुक झुक झुक झुक अगीनगाडीच्या डब्यात प्रवाशांना बसण्यासाठी लाकडाच्या फळकुट्यांची बाकडी असत. त्यात बोट बोट भर रुंदीच्या फटी असत आणि रोज नवनव्या माणसांच्या रक्ताची चव चाखायला चटावलेल्या ढेकणांच्या फौजा त्या फटींमध्ये दडलेल्या असायच्या. हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा झाली नव्हती. हिंदी बोलपट अद्याप बाल्यावस्थेत होते. त्यातली गाणी लोकांच्या तोंडात बसली नव्हती. त्यामुळे दक्षिण भारतातल्या लोकांसाठी हिंदी ही काहीशी अनोळखी भाषा होती.

अशा काळात दहा बारा वर्षे वयाचे भीमसेन दक्षिण भारतातून निघून एकट्याने प्रवास करीत उत्तर भारतात जाऊन पोचले होते. या काळात ते आजूबाजूच्या लोकांबरोबर कोणत्या भाषेत कशा प्रकारचा संवाद साधत होते ते तेच जाणो. त्यांनी आपल्या गोड आवाजात खड्या सुरात गायिलेले एकादे भजन किंवा पद ऐकल्यानंतर अधिक काही सांगायची त्यांना गरज पडत नसावी आणि कानावर पडलेल्या शब्दांवरून ते नवी भाषा लगेच शिकून घेत असावेत.

त्या दहा बारा वर्षाच्या मुलाकडे उपजीविकेचे कोणते साधन असणार? गुणग्राही आणि दयाळू लोकांच्या औदार्यावरच त्यांची गुजराण होणे शक्य होते. मिळेल ते अन्न पूर्णब्रह्म मानून गिळणे आणि जमेल तिथे हातपाय पसरून झोपणे त्यांना भाग होते. पण ते उपजीविकेच्या शोधार्थ घराबाहेर पडलेच नव्हते. हक्काचा अन्नवस्त्रनिवारा आणि मायेची पाखर देणारे आईवडिलांचे घर, जिवलग सखे या सर्वांचा त्याग करून त्यांनी हा मार्ग एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन पत्करला होता. त्यामुळे संगीताचे शिक्षण घेणे हा उद्देश सतत नजरेसमोर ठेवून जातील त्या जागी चौकशी करून आणि त्यासाठी मिळेल ती माहिती काढून जिवाचा आटापिटा करून ते प्रयत्न करत राहिले, सतत त्या मार्गावर पुढे जात राहिले आणि अखेर कुंदगोळला सवाई गंधर्वांकडे जाऊन पोचले.

शिष्यांची निवड करण्याच्या बाबतीत पं.सवाई गंधर्व अत्यंत चोखंदळ होते. योग्यता आणि निष्ठा यांची कसोशीने पारख करून घेतल्यानंतरच ते कोणाला आपले शिष्यत्व देत असत. पहिले काही महिने त्यांनी भीमसेनांना काहीच शिकवले नाही. तरीही ते त्यांच्याकडे राहून पडेल ते काम करून आणि श्रवणभक्तीमधून शास्त्रीय संगीताचे कण वेचत राहिले. अखेरीस गुरूंनी त्यांच्यावर खूष होऊन त्यांना गायनकला शिकवायला सुरुवात केल्यानंतरदेखील ते आठवड्यातून फक्त एक दिवस प्रत्यक्ष थोडेसे शिकवत असत. त्यानंतर आठवडाभर शिष्याने ते स्वर पुन्हा पुन्हा घोटून घोटून आपल्या गळ्यावर चांगले बसवले आणि गुरूला व्यवस्थितपणे गाऊन दाखवले तरच पुढचे शिकवत असत. अशा प्रकारे सुरुवातीला एकेक रागाचे शिक्षण महिनोगणती चालत असे. पं.भीमसेन जोशी यांनीच याबद्दल अनेक वेळा त्यांच्या मुलाखतीत सांगितले होते.

असे असले तरी कधीसुध्दा अगदी चुकूनही त्यांच्या बोलण्यात त्याबद्दल तक्रारीचा किंचितसा सूर देखील आला नव्हता. नेहमी त्यांच्या गुरूंबद्दल त्यांचे मन अतीव आदरानेच भरलेले असायचे. त्यांच्या काळात आजच्यासारखी यांत्रिक साधने नव्हती आणि घरकामासाठी गडीमाणसे, नोकरचाकर वगैरे ठेवणे श्रीमंतांनाच परवडत असे. त्यामुळे पाणी भरणे, झाडलोट करणे यासारखी कामे घरातले लोकच करत असत आणि घरातल्या मुलांचा त्यात सहभाग असणे साहजीक असे. माझ्या लहानपणी आमच्या घरी मी ही सगळी कामे आनंदाने केली आहेत. तेंव्हा त्यांचे श्रम वाटत नव्हते की त्यात कमीपणा वाटत नसे. उलट अभिमान वाटायचा. पं.भीमसेन जोशी यांनी लहानपणी सवाई गंधर्वांच्या घरी असली तथाकथित हलकी कामे केली असली तर त्यात काहीच जगावेगळे नव्हते. उलट ते त्यांच्या घरी मुलासारखे राहिले ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे.

संगीत साधना – पूर्वीच्या काळातली आणि आताची (भाग ३)

ऐंशी नव्वद वर्षापूर्वीच्या काळातल्या मध्यम वर्गीय घरांमधले वातावरण आजच्या मानाने खूप रूढीग्रस्त आणि काहीसे असहिष्णु होते. घरातल्या वडीलधारी माणसांनी सांगायचे आणि लहानांनी ते निमूटपणे ऐकायचे असा दंडक होता. मोठ्या मंडळींच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग त्यात होत असे आणि त्यांच्या दृष्टीने कुटुंबासाठी जे चांगले असेल तेच ते सांगत असत. त्यात सर्वांचा फायदा असायचा हे खरे असले तरी लहानांच्या मनात काही वेगळा विचार आला तरी तो व्यक्त करायला ते घाबरत असत, कोणी धीटपणाने तो बोलून दाखवला तर इतर मंडळी त्याच्याकडे लक्ष देऊन त्याचे सांगणे ऐकून घेत नसत आणि ऐकून घेतल्यानंतर त्यात काही गैर दिसत नसले तरीसुध्दा, “ते ठीक आहे, पण लोक आमच्या तोंडात शेण घालतील त्याचं काय?” असे म्हणून त्याला उडवून लावत असत. स्वतंत्रपणे विचार करू शकणाऱ्या ज्या व्यक्तींना हा मनाचा कोंडमारा असह्य होत असे त्यांना निमुटपणे बाहेरची वाट धरावी लागत असे. देशभक्ती किंवा समाजसेवा यासारख्या उदात्त कारणासाठीसुध्दा कुटुंबातून बाहेर पडावे लागलेल्या लोकांची अनेक उदाहरणे आहेत.

आजकाल मुंबईसारख्या शहरातल्या सेल्फकंटेन्ड फ्टॅटमध्ये (बंद दरवाजाच्या संस्कृतीत) राहणारे लोक घरी काय करतात ते इतरांना समजतही नाही, कोणी त्याची चौकशी करत नाही की त्यांना काही म्हणत नाही. त्यामुळे व्यक्तीस्वातंत्र्यात अनेकपटीने वाढ झाली आहे आणि लोकापवादाचा धाक उरलेला नाही. “लोक काय म्हणतील?” ही भीती उरलेली नाहीच, उलट “लोक किती कौतुक करतील?” असा विचार केला जात आहे. सिनेमा आणि टेलीव्हिजनच्या माध्यमातून पाश्चात्य संस्कृती आणि त्यातली मुक्त विचारसरणी या गोष्टी आज घराघरात जाऊन पोचल्या आहेत. कला आणि क्रीडा या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या लोकांना लहान वयातच अमाप प्रसिध्दी, गडगंज पैसा आणि भरपूर मानसन्मान मिळतात त्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याची समाजाची दृष्टी पूर्णपणे बदलली आहे. झटपट यशाच्या आशेमुळे त्या क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांची गर्दी आता वाढत आहे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे कोचिंग क्लासेस गल्ल्यागल्ल्यांमध्ये उघडले जात आहेत. त्याशिवाय चांगल्या गायकांचे गायन ऐकून त्याप्रमाणे गाण्याचा प्रयत्न करण्यासाठी अनेक इलेक्ट्रॉनिक साधने उपलब्ध झाली आहेत. खेळ किंवा गाण्याची उपजत आवड असली तरी त्यात प्रगती करून प्राविण्य मिळवण्याची सुलभ सोय पूर्वीच्या काळी नसायची. आताच्या काळात त्यात यत्किंचित रस किंवा गती नसलेल्या मुलांनासुध्दा आजकालचे पालक जबरदस्तीने तशा क्लासेसना पाठवतांना दिसतात. त्या विद्यार्थ्यांमधील स्पर्धा अनेकपटीने वाढल्यामुळे त्या क्षेत्रांमध्ये पुढे येण्यासाठी आजसुध्दा जबरदस्त संघर्ष करावा लागतोच पण या कारणासाठी आता कोणाला घर सोडून जाण्याची गरज उरली नाही, न सांगता पळून जाण्याची तर नाहीच नाही.

दुसऱ्या बाजूने विचार केला तर असे दिसते की पूर्वीच्या काळातला घरात असहिष्णू वाटणारा समाज प्रत्यक्षात बराच सहृदय होता. माझ्या लहानपणी आमच्या घरातले रोजचे जेवण अतीशय साधे असायचे. बहुतेक दिवस त्यात फक्त एकच कालवण असे. पण रोजचे साधे जेवण असो किंवा सणासुदीचे पंचपक्वान्नांचे असो, ठराविक दिवशी वार लावून जेवायला येणारा एकादा गरीब विद्यार्थी नेहमी पंगतीला असायचा. बदाम पिस्ते. मनुका, बेदाणे वगैरेंनी भरलेल्या बरण्या आमच्या स्वयंपाकघरातल्या फडताळांमध्ये नसायच्या, पण माधुकरी मागायला आलेल्या कोणाच्याही झोळीमध्ये सढळ हाताने ओंजळभर जोंधळे घातले जात असत. एकाद्या सधन कुटुंबाच्या आधारावर मोठी झालेली माझ्या पिढीमधली काही आश्रित माणसे मला माहीत आहेत. लहानपणीच घर सोडून कर्नाटकातून बाहेर पडलेले भीमसेन महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब वगैरे अनेक भागांमध्ये जाऊन पुन्हा कर्नाटकात परत आले. या सगळ्या ठिकाणी त्यांना अन्नदाते आणि आश्रयदाते लाभले. सद्गुणी, कष्टाळू आणि गरजू लोकांना त्या काळातला समाज अनेक हातांनी आधार देत असे.

आजचे दृष्य वेगळे दिसते. ‘वार लावून जेवणे’, ‘माधुकरी’. ‘आश्रित’ यासारखे शब्द आता मराठी भाषेतून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत. नव्या पिढीमधल्या मुलांना त्याचा अनुभव नसल्याने त्या शब्दांचा अर्थही लागत नसेल. आजचे लोक सुध्दा उदारहस्ताने मदत करतात, म्हणजे समाजसेवी संस्थांना देणग्या देतात, पण फ्लॅटमध्ये राहणाऱ्या कोणाच्याही घरात त्या कुटुंबाच्या बाहेरच्या एकाद्या मुलाला रहाण्याजेवण्यासाठी आणून ठेवल्याचे एकही उदाहरण मला तरी दिसत नाही. आपल्या मुलांना सर्व काही उत्कृष्ट आणि जास्तीत जास्त द्यावे अशी धडपड आजचे पालक करत असतात आणि ते करण्यासाठी आपल्या मुलांची संख्या एक किंवा दोनवर मर्यादित ठेवतात. कुटुंबनियोजनाच्या प्रसारामुळे हे शक्य झाले आहे. त्यामुळे “दुसऱ्यांच्या मुलांना घरी आणून पोसण्यापेक्षा आपल्याच मुलांना जन्म दिला नसता का?” किंवा “त्या दुसऱ्यांना जर मुलांना पोसण्याची ऐपत नव्हती तर त्यांना जन्म कशाला दिला?” अशा स्वरूपाचे प्रश्न आजच्या काळातल्या कोणाच्याही मनात उठणे साहजीक आहे. पूर्वीच्या काळात हे देवाच्या मर्जीनुसार ठरत असे आणि देवाने या जगात पाठवलेल्या जीवाला आधार देणे हे आपले कर्तव्य आहे अशी भावना लोकांच्या मनात असे. ते चित्र आता बदलले असल्यामुळे एकाद्या गुरूच्या घरी राहून आणि त्याची सेवा करून शिक्षण मिळवणे ही गोष्ट आता बहुधा संभवत नाही. असा भाबडा विचार करून एकादा मुलगा भीमण्णांप्रमाणे घर सोडून परागंदा झाला तर त्याला कुठे थारा मिळणार नाही, उलट आता तो समाजकंटकांच्याच हातात सापडण्याचा फार मोठा धोका आहे.

पूर्वीचा काळ चांगला होता की आताचा असा प्रश्न विचारून त्याचे उत्तर मला द्यायचे नाही. त्या काळात काही जटिल समस्या होत्या, आताच्या काळातही कसोटी पाहणाऱ्या वेगळ्या अडचणी आहेत. त्या काळात वेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध होत्या, आता निराळ्या स्वरूपाचे मार्ग निर्माण झाले आहेत. अलौकिक गुणवत्ता, अदम्य उत्साह आणि पडतील तेवढे सारे कष्ट सहन करण्याची तयारी असेल तर तशा असामान्य व्यक्ती पूर्वीच्या काळातही सगळ्या अडचणी बाजूला सारून पुढे आल्या आणि यशाच्या शिखरापर्यंत पोचल्या, भविष्यातसुध्दा तसे होत राहणारच अशी माझी श्रध्दा आहे. त्यांचे मार्ग वेगळे असतील पण ध्येय गाठण्याची ऊर्मी आणि त्यासाठी लागणारी धडपड असेल तर ते यशस्वी होतील.

. . . . . . . . . . . . (समाप्त)

नृत्य आणि नाच

नृत्य आणि नाच

प्रत्येक माणसाला सूर आणि ताल याची थोडीफार जाण व देणगी निसर्गतःच मिळते. कांही लोकांना त्यांचे वरदान मिळते आणि ते कलाकार त्या वरदानाचा प्रयत्नपूर्वक विकास करून संगीत व नृत्याच्या क्षेत्रात प्राविण्य मिळवतात. इतर लोक सुद्धा कधी ना कधी ओठातल्या ओठात गाण्याची ओळ गुणगुणतांना किंवा बसल्या बसल्या हाताच्या बोटांनी कसलातरी ठेका धरतांना दिसतातच. जन्माला आलेले लहान मूल वर्षभराच्या आंतच कसल्या तरी आधाराला धरून उभे रहायला शिकते त्याच्या पाठोपाठ “एक पाय नाचीव रे गोविंदा, घागरीच्या छंदा” करीत तालावर पाय नाचवू लागते. चालायला लागल्यावर तर ती सतत स्वतः नाचत असतात आणि मोठ्या लोकांना नाचवत असतात.

नाचणे हा जगभरातील सगळ्या समाजांमधील पारंपरिक संस्कृतींचा भाग आहे. काश्मीरपासून केरळपर्यंत आणि कच्छपासून मणिपूरपर्यंत भारतातील प्रत्येक भागातील लोकांची आगळी वेगळी लोकनृत्ये आहेत. मग त्यात कुठे जलदगती असेल तर कुठे संथ लय असेल. भांगडा वा गरबा यासारखे परप्रांतातील लोकप्रिय नाच किंवा आपल्याकडील कोळी किंवा धनगर यांच्या पारंपरिक नाचांमध्ये भाग घेणारे सगळेच लोक उत्साहाने नाचतात. विठ्ठलाच्या नांवाचा गजर करीत उभे राहून भजन करतांना टाळमृदुंगांच्या तालावर भक्तगण तल्लीन होऊन नाचतांना दिसतात. याला ‘नाच’ म्हणणे कदाचित कांही लोकांना आवडणार नाही. पण “वाळवंटी नाचू आम्ही वाळवंटी गाऊ”आणि “दिंड्या पताका वैष्णव नाचती” असे संतांनीच म्हंटले आहे. भारूड हा प्रकार तर नाचत नाचतच गाइला जातो. झिम्मा फुगड्या वगैरे गोष्टी मंगळागौरीला हव्यातच. फेर धरून हदग्याचा नाच पूर्वी रूढ होता. हे सगळे नाचाचे प्रकार आपल्या मनातला उत्साह व्यक्त करून त्यातून स्वतःच आनंद मिळवण्यासाठी उत्फूर्तपणे होतात. त्यासाठी तालिम किंवा शिक्षण घेण्याची आवश्यकता नसते. तसे घेतले तर अधिक चांगल्या प्रकारे करता येईल, पण या लोकांच्या कला आहेत आणि त्यांना त्या एकमेकांचे पहात आपोआप येतात.

तमाशा, नौटंकी, मुजरा, यक्षगान बैलाटा आदि लोककलांचे प्रकार करणाऱ्या कलावंतांनी त्यांना लोकाभिमुख असे व्यावसायिक स्वरूप दिले. ते खेळ खाजगी बैठकींमध्ये आणि सार्वजनिक रंगमंचावर सादर होऊ लागले. त्यांच्या नाचात सर्वसामान्य लोक करीत असलेल्या नाचापेक्षा वेगळ्या हालचाली, वेगळे हावभाव आले. त्यापासून समाजाला रंजवण्याचे काम करणारा एक वर्ग निर्माण झाला. मनोरंजनाची इतर साधने निर्माण होण्यापूर्वीच्या काळात त्यांचा मोठा प्रभाव होता.
इतर कलांप्रमाणेच नृत्यकलेचा विकास होत गेला तेंव्हा त्याची शास्त्रे तयार झाली. ते पाहणारा चोखंदळ रसिक प्रेक्षकवर्ग तयार झाला. दक्षिणेकडे भरतनाट्यम, कथाकली, मोहिनी अट्टम, कुचीपुडी तर उत्तरेला कथ्थक आणि पूर्वेला ओडिसी, मणिपुरी या प्रसिद्ध नृत्यकलांच्या शास्त्रीय शैली विकसित झाल्या. कित्येक लोकांनी जन्मभर साधना करून त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाचे स्थान मिळवून दिले.

ढोबळ मानाने पाहता सर्वसामान्य लोकांचे आनंदाने उत्स्फूर्तपणे ताल धरून नाचणे, कलावंत व कलावतींनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी त्यांच्यासमोर त्यांना आवडेल असे आविर्भाव करीत नाचणे आणि नृत्यकलांचे शास्त्रोक्त कलाविष्कार असे तीन मुख्य प्रकार दिसून येतात.

पौराणिक काळापासून नृत्यकला भारतात प्रचलित आहे. “गणराज रंगी नाचतो” हे गाणे आजच्या काळातले असले तरी आपली तुंदिल तनु एका पायावर तोलून धरीत नृत्य करणाऱ्या गजाननाच्या अनेक प्राचीन प्रतिमा उपलब्ध आहेत. श्रीकृष्णाचे वर्णन “देहुडा चरणी वाजवितो वेणू” असे करतांना त्याची एक मुद्रा दाखवली आहे. कालियामर्दन करतांना तो कालिया नागाच्या मस्तकावर थयथया नाचला होता. शंकराचे ‘नटराज’ हे रूप प्रसिद्ध आहे. संतापाच्या भरात तांडवनृत्य करून त्याने चराचराचा संहार केल्याची कथा आहे. देवराज इंद्राचा दरबार म्हणजे गंधर्वांचे गायन आणि अप्सरांचा नाच हे समीकरण रूढ आहे. तपश्चर्येच्या सामर्थ्याने कोणी ऋषी आपले इंद्रपद हिरावून घेईल या भीतीने त्या ऋषीचे तपोभंग करण्यासाठी तो इंद्र कधी कधी एकाद्या अप्सरेला त्याच्याकडे पाठवून देत असे आणि ती अप्सरा मोहक नृत्य करून त्या तपस्व्याचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत असे. बहुतेक प्राचीन मंदिरांच्या गोपुरांवर किंवा भिंतींवर नृत्याच्या विविध मुद्रामधील मूर्ती चितारून त्यांना शोभिवंत केलेले असते. भक्तीमार्गामध्ये ज्या नवविधा आहेत त्यात आपले देहभान हरपून परमेश्वराचे चरणी लीन होण्याला महत्व आहे. म्हणूनच “नाचत नाचत गावे, ब्रम्हानंदी तल्लीन व्हावे” असे म्हंटलेले आहे. “पग घुंगरू बांध मीरा नाची रे ” म्हणणारी मीराबाई आणि दोन्ही हातात चिपळ्या घेऊन हरिभजनात तल्लीन होऊन नाचणारे चैतन्य महाप्रभू यांच्या अशाच मुद्रा डोळ्यासमोर येतात.

चित्रपटसृष्टीमध्ये नाचाच्या या सर्वच प्रकारांचा भरपूर उपयोग केला जातो. सिनेमा चांगला चालावा, जास्तीत जास्त प्रेक्षकांना त्याकडे आकर्षित करावे यासाठी त्यात नाचगाण्यांची भर घालण्यात आली व अजूनही घालण्यात येते यात शंका नाही. पण कालांतराने चित्रपटांच्या प्रभावामुळे नृत्य व गायन कला अधिक लोकमान्य आणि लोकप्रिय झाल्या असेसुद्धा म्हणावे लागेल. एक जवळचे उदाहरण द्यायचे झाल्यास आपल्या महाराष्ट्रात पूर्वीच्या काळातील लग्नसमारंभात नाचगाणे कुठे होते? नाही म्हणायला दोनच प्रसंगी थोडेसे गायन व्हायचे. लग्नघटीच्या मुहूर्ताच्या वेळी शार्दूलविक्रीडित वृत्तात रचलेली मंगलाष्टके एका विशिष्ट चालीत संथ गतीने म्हंटली जात आणि विहिणीच्या पंक्तीमध्ये “ओटीत घातली मुलगी विहीणबाई, सांभाळ करावा हीच विनवणी पायी।” यासारखी गाणी गाऊन तिला लोणी लावले जाई. आता काळ बदलला आहे. अजूनही मंगलाष्टके असतात, पण त्यात शार्दूलविक्रीडित कमी होऊन केदार आणि कलावती रागातील गीते घुसली आहेत. विहिणीची पंगत बहुतेक ठिकाणी इतिहासजमा झाली आहे. आणि नव्या जमान्यात तिला उगीच कशाला भाव द्यायचा? वाटलेच तर “गळ्यात बांधली मुलगी विहीणबाई, सांभाळून रहा आता तुमची धडगत नाही।” असा इशारा द्यावा. पूर्वीच्या लग्नात नाचाचा प्रकार नव्हताच. आता मात्र सर्रास सगळे नवरदेव बोहल्यावर चढण्यापूर्वी त्यांची आप्तेष्ट व मित्रमंडळी मुक्तपणे नाचण्याचा जल्लोष करीत येतात. अनेक ठिकाणी डी.जे.ला बोलावून जलद ठेक्याची ठसकेदार गाणी ध्वनिक्षेपकावर लावतात, उघडझाप करणारे लखलखते दिवे आणि चमचमते व्यासपीठ बनवलेले असतेच. नवरा नवरी आणि व्याहीविहिणीसह समस्त लोक त्यावर मनमुराद “शाव्वा शाव्वा” करून घेतात. त्यात कांहीसुद्धा गैर नाही. आनंदाच्या प्रसंगी मनातला आनंद दिलखुलासपणे कोणीही व्यक्त करावा. पण तो करण्याच्या पद्धतीमधील हा बदल हिंदी सिनेमामुळे आला आहे असे मला वाटते.

बोलपट सुरू झाल्यापासून त्यात गाणी आली तसेच नाचही आले. वर दिलेल्या प्रकारांशिवाय सिनेमातील गाणी हावभाव करून सादर करणे सुरू झाले. या प्रकारात चेहेऱ्यावरील भावांनाच महत्व असते आणि ते क्लोजअप्समधून व्यवस्थित दाखवले जातात. या प्रकारातल्या नाचण्यात अगदी मोजक्या मुद्रा असतात, त्यापेक्षा धांवाधांवच जास्त असते. त्यामुळे या प्रकाराला नृत्यातून वगळले तरी चालेल. कोळीनृत्य, धनगरनृत्य वगैरे नाच विशिष्ट प्रसंगानुसार टाकतात. दिंडी, भारूड, जोगवा, गोंधळ, वाघ्या मुरळी, वासुदेव वगैरे विविध पारंपरिक आविष्कार ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटातून दिसतात. “धौम्यऋषी सांगतसे रामकथा पांडवा” किंवा “उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर” अशा गाण्यातून अत्यंत सोज्ज्वळ गीतांवरील समूहनृत्ये दाखवली आहेत.

तमाशातील गण, गौळण, सवाल जबाब आणि मुख्यतः लावणी हे मात्र हुकुमाच्या एक्क्यासारखे अनंत चित्रपटांमध्ये वापरले गेले. जुन्या काळातील “लटपट लटपट तुझं चालणं मोठ्या नख-याचं” पासून सिनेमातील लावणी फुलतच गेली. कधी “नेहमीच राया तुमची घाई, नका लावू गठुडं बांधायला” किंवा “फड सांभाळ तुऱ्याला ग आला, तुझ्या उसाला लागंल कोल्हा” यासारखी अस्सल ग्रामीण भाषा तर कधी “पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा” किंवा “तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडुन जाऊ रंगमहाल” अशी अलंकारिक भाषा, कधी “चढाओढीनं चढवीत होते, ग बाई मी पत्तंग उडवीत होते”, “मला लागली कुणाची उचकी” असे वेगळेच विषय घेऊन ती अनंत अंगाने बहरली. लतादीदी आणि आशाताई यांच्यासारख्या प्रख्यात व ज्येष्ठ गायिकांनी त्या गायिल्या. उषाताई व सुलोचना चव्हाण यांनी तर ढंगबाज लावणी गायिका म्हणून आपापले वेगळे स्थान निर्माण केले. लीला गांधी, हंसा वाडकर, जयश्री गडकर, माया जाधव, सुरेखा पुणेकर आदि नृत्यात निपुण अभिनेत्रींनी आपल्या पदलालित्याने ती सगळी गाणी अविस्मरणीय केली. सिमेनातील लावण्या इतक्या तुफान यशस्वी झाल्या की गांवोगांवच्या तमाशांच्या फडांमध्ये त्या बोर्डावर सादर होऊ लागल्या.

विशुद्ध शास्त्रीय नृत्याला मराठी सिनेमात फारसा वाव मिळाला नाही. कनक रेळे, रोहिणी भाटे, सुचेता भिडे, झेलम परांजपे आदि कित्येक महाराष्ट्र कन्यका अभिजात नृत्याच्या क्षेत्रात विख्यात झाल्या आहेत. पण अर्चना जोगळेकरांसारखा सन्माननीय अपवाद वगळता शास्त्रीय नृत्यात पारंगत असे अभिनेते वा अभिनेत्री मराठी सिनेमाच्या पडद्यावर विशेष दिसत नाहीत. गोपीकृष्णासारख्या कसलेल्या नर्तकाला मुख्य भूमिका देऊन बनवलेल्या झनक झनक पायल बाजे व नवरंग यासारखे नृत्यप्रधान चित्रपट मराठीमध्ये निघाले नाहीत. सिनेमातील गोष्टीमध्ये एखादा सांस्कृतिक कार्यक्रम घडवून आणून “अगं नाच नाच नाच राधे उडवूया रंग” यासारखी गाणी घालायचे तुरळक प्रयत्न झाले एवढेच.

पाश्चिमात्य संस्कृतीशी संबंध आल्यावर त्याचा प्रभाव सिनेमातील नाचगाण्यांवर पडला. “नंबर फिफ्टी फोर … हाउस ऑफ बँबू” सारखी इंग्रजी गाणी चालीसकट मराठी सिनेमात आली. तशा पद्धतीचे नाच त्याबरोबर येणारच. अलीकडच्या काळात एकसारखे कपडे घातलेले पंधरा वीस एक्स्ट्रॉ गाण्याच्या ठेक्यावर कवायतीच्या खेळासारख्या हालचाली करीत येतात. त्या नाचासाठी एक गाणे असले तरी त्यातील शब्द नीट ऐकूसुद्धा येत नाहीत आणि त्यांना कांही महत्व नसतेच. कधी कधी त्यांचा अर्थही लागत नाही आणि ती गाणी तोंडात बसतही नाहीत. त्यात नाचणारा ‘आयटम गर्ल’ हा नट्यांचा नवीनच वर्ग निर्माण झाला आहे.
लहान मुला मुलींचे नाच पूर्वीपासून चित्रपटात दिसत. या प्रकारात “भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे, दावित सतत रूप आगळे” किंवा “माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू” अशासारखी कितीतरी गाणी सांगता येतील. “नाच रे मोरा आंब्याच्या वनात” हे गाणे तर पन्नास वर्षाहून अधिक काळ जाऊनसुद्धा अजून लोकांना आवडते. आज आजीबाई झालेल्या प्रौढ वयाच्या स्त्रिया स्वतः परकर पोलक्यात असतांना या गाण्यावर नाचल्या असतील, त्यांनी आपल्या स्कर्टमधील मुलींचे नाच या गाण्यावर बसवले असतील आणि आज त्या मुली माता होऊन जीन्स व पँट्स परिधान केलेल्या आपापल्या मुलींना हेच गाणे शिकवत असतील, इतकी याची गोडी अवीट आहे.

घरोघरी, समाजजीवनात, रंगमंचावर आणि सिनेमाच्या मोठ्या किंवा टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यावर नाचाला कसे महत्व दिले जात आले आहे याचा अगदी संक्षिप्त आढावा घेण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.

सुप्रसिद्ध संगीतकार स्व. सलिल चौधरी

 

salil1दहा वर्षांपूर्वी आम्ही आमच्या वैज्ञानिकांच्या वसाहतीत स्व.सलिल चौधरी यांच्या जीवनकार्यावर एक परिसंवाद ठेवला होता. त्या वेळी मी सात भागात लिहिलेला हा लेख एकत्र संकलित करून या ठिकाणी दिला आहे.

विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणारी माणसे अरसिक आणि रुक्ष मनोवृत्तीची असतात असा एक गैरसमज उगाचच पसरवला जातो. नेहमी आपल्याच धुंदीत रहात असल्यासारखी भासणारी ही माणसे किती कलाप्रेमी असतात हे इतरांना चांगले कळावे अशा प्रकारच्या कांही उपक्रमांचे आयोजनदेखील ते अधून मधून करत असतात. प्रामुख्याने वैज्ञानिक व तंत्रज्ञांची वस्ती असलेल्या अणुशक्तीनगरमधील कलाप्रेमी लोकांनी मागील वर्षी एक वेगळ्याच प्रकारचा कार्यक्रम तिथल्या सभागृहात घडवून आणला होता. सुप्रसिद्ध संगीतकार स्व.सलिल चौधरी यांच्या जन्मदिनानिमित्य त्यांच्या सांगीतिक जीवनावर या वैज्ञानिक लोकांनी चक्क एक परिसंवाद ठेवला.

विषयांवरील परिसंवाद, चर्चासत्रे, कार्यशाळा वगैरेंच्या थाटातच या कार्यक्रमाची एकंदरीत आंखणी केली होती. स्वागत गीत, दीप प्रज्वलन, विधीवत उद्घाटन, स्मरणिकेचे प्रकाशन, मान्यवरांचे सत्कार, प्रमुख पाहुण्यांचे अभिभाषण, इतर वक्त्यांची व्याख्याने व त्यावर चर्चा वगैरे सारी रूपरेषा तशीच होती. फक्त त्यातला विषय मात्र आगळा वेगळा होता. “संगीत हे ऐकायचे असते. त्यावर चर्चा कसली करताहेत?” किंवा “असल्या कार्यक्रमासाठी रविवारची सुटी कोण वाया घालवणार आहे?” असे प्रश्न कोणाच्या मनात आले असतील तर त्याला सडेतोड उत्तर मिळावे इतकी चांगली उपस्थिती या कार्यक्रमाला झाली आणि तीही त्याच्या प्रवेशशुल्कासाठी पदरमोड करून आलेल्या रसिकजनांची. हा कार्यक्रम इतका रंगला की सर्व प्रेक्षक व श्रोते दिवसभर आपल्या आसनाला खिळून राहिले होते. सकाळचे चहापान व दुपारचे जेवण यांची सोयही तिथेच केली होती. त्यासाठी मध्यंतरात थोडा वेळ उठावे लागत होते तेवढेच.

सलिल चौधरी यांच्या पत्नी व बंगालीमधील सुप्रसिद्ध गायिका श्रीमती सबिता चौधरी या प्रमुख पाहुण्या होत्या. त्यांनी फार म्हणजे फारच सुंदर भाषण केले. या भाषणातून त्यांनी सलिलदांचे मधुर संगीत, त्यांच्या बहुमुखी प्रतिभेचे इतर अनेक क्षेत्रातील आविष्कार आणि कांही हृद्य व्यक्तीगत आठवणी यांचा सुंदर मिलाफ घडवून आणलाच. शिवाय आपल्या कोकिळकंठातून त्यांच्या अनेक गाण्यांच्या ओळी कोठल्याही साथीविना ऐकवून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. उतारवयातसुद्धा त्यांनी दाखवलेली आवाजावरील मजबूत पकड, संगणकासारखी तल्लख स्मरणशक्ती आणि मुद्देसूद उत्तरे या सगळ्याच गोष्टी अचंभित करण्यासारख्या होत्या. नंतर सादर करण्यात आलेल्या कार्यक्रमातसुद्धा त्या पदोपदी आपल्या आठवणीतून अधिकाधिक माहिती सांगत होत्या. मी कधीही न ऐकलेल्या किंवा न वाचलेल्या किती तरी गोष्टी सबितादींनी त्या दिवशी सांगून आमच्या ज्ञानात मोलाची भर टाकली. त्यातली थोडी माहिती पुढील भागात देईन.

पहिले व्याख्यान सलिलदांचे सुपुत्र संजय चौधरी यांनी दिले. ‘लोकसंगीत आणि पाश्चात्य संगीत यांचा सलिलदांच्या रचनांवर पडलेला प्रभाव’ हे शीर्षक असले तरी त्यांनी फारसे अभ्यासपूर्ण असे गंभीर वक्तव्य केले नाही. या प्रकारच्या संगीताशी सलिलदांचा संपर्क कसा आला याबद्दलच ते जास्त बोलले. त्यांना स्वतःला बॉक्सिंगची आवड होती आणि त्यांनी त्यात प्राविण्यसुद्धा मिळवले होते. घरातच संगीत असल्यामुळे सलिलदांनी त्यांना संगीताच्या क्षेत्रात कांहीसा जोर लावून खेचूनच आणले असे ते म्हणाले, पण त्यांनी स्वतः दिलेले सुरेल संगीत ऐकल्यावर त्यांनासुद्धा मनापासून संगीतात रुची व प्रतिभा होतीच हे स्पष्ट दिसते.

भाभा अणुसंधान केंद्रातील संगणक विभागाचे प्रमुखपद सांभाळणारे पण साहित्य व संगीतात प्रवीण असलेले श्री आल्हाद आपटे यांचे अतीशय प्रगल्भ असे भाषण झाले. ‘सलिल चौधरी यांची जीवनरेखा व त्यांच्या रचना’ हा या परिसंवादाचा गाभा असलेला विषय निवडून त्याचा विस्तृत अभ्यास त्यांनी केला होता. सलिलदांच्या जीवनातील प्रमुख टप्पे थोडक्यात सांगून त्यांनी केलेल्या अनेकविध प्रकारच्या रचनांचे उत्तम रसग्रहण त्यांनी सादर केले. शास्त्रीय संगीत, लोकगीते, क्लब डान्स, प्रेमगीते, विरहगीते, भारतीय पद्धतीची सुरावटीवर आधारलेली गाणी तसेच थिरकत्या लयीवर रचलेल्या उडत्या स्वरांच्या चाली असे अनेक प्रकार सलिलदांनी समर्थपणे हाताळले होते.

यातील प्रत्येक प्रकारातली गाणी उच्च कोटीची होती आणि आजवर लोकप्रिय आहेत. त्यांची मार्मिक माहिती आपटे यांनी थोडक्यात पण मुद्देसूदपणे दिली. साहिती या गुणी गायिकेने नमून्यादाखल त्यातील कांही गाणी ऐकवून व्याख्यानातील मुद्दे स्पष्ट होण्यास मदत केली. शिवाय अधून मधून सबितादींनी कांही गाण्यांचा इतिहास किंवा कांही ‘अंदरकी बाते’ सांगून मजा आणली. उदाहरणार्थ मधुमती या चित्रपटातील ‘आजारे परदेसी’ हे अप्रतिम गाणे त्या चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक बिमल रॉय यांना कथानकाशी अनुरूप वाटत नव्हते आणि हे गाणे चित्रपटातून गाळण्याचा विचारसुद्धा ते करीत होते. पण सलिलदांनी आग्रह धरल्यामुळे ते गाणे राहिले आणि सुपर डूपर हिट होऊन अजरामर झाले.

लघुपट आणि मालिका निर्माण करणारे श्री.कृष्णराघव यांनी सलिल चौधरी यांनी चित्रपटांव्यतिरिक्त इतर क्षेत्रांमध्ये केलेल्या सांगीतिक कार्याचा गोषवारा दिला. त्यांनी रचलेल्या मधुर गाण्यांच्या चाली आपल्याला माहीत आहेत. पण अत्यंत प्रभावी पार्श्वसंगीत देऊन वातावरणनिर्मिती करण्यात ते कुशल होते आणि अनेक लघुपटांमध्ये व मालिकांमध्ये त्यांच्या या कौशल्याचा वापर करण्यात आला होता. त्यासाठी ते किती खोलवर विचार करत असत, विशिष्ट परिणाम साधण्यासाठी कोणत्या वाद्याचा कसा उपयोग करून घेत असत याबद्दल कृष्णराघव यांनी सांगितले. एकदा तर पार्श्वसंगीतासाठी सरकारकडून मंजूरी मिळालेले बजेट खर्च होऊन गेले होते तरी त्यानंतरसुद्धा त्यांनी एका विशिष्ट प्रसंगासाठी आपल्या खर्चाने वादकाला बोलावून घेऊन त्यांच्या मनातले सनईचे सूर दिल्याची आठवण त्यांनी सांगितली. सलिल चौधरी यांनी अनेकविध वाद्यांचा चपखल उपयोग तर करून घेतलाच पण मानवी आवाज, पक्ष्यांची किलबिल, गुरांचे हंबरणे यासारखे नादसुद्धा त्यांनी पार्श्वसंगीतात आणले. सलिल चौधरी यांचे पार्श्वसंगीत इतके लोकप्रिय झाले होते की कानूनसारख्या गाणी नसलेल्या कांही चित्रपटांचे पार्श्वसंगीत दिग्दर्शन आवर्जून त्यांना दिले गेले. एकंदर सिनेमासाठी त्यांचे पार्श्वसंगीत आणि त्यातली गाणी तेवढी दुस-याच संगीत दिग्दर्शनाने दिल्याची उदाहरणेसुद्धा आहेत.
केरळमधील श्री.टी.उन्नीकृष्णन यांनी केलेल्या भाषणात सलिल चौधरी यांनी इतर भारतीय भाषांमधील चित्रपटांना दिलेल्या संगीताबद्दल माहिती भाषणात दिली. ‘चेम्मीन’या मल्याळी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर मल्याळी सिनेमाच्या विश्वात सलिल चौधरी खूपच लोकप्रिय झाले. भारतातील जवळ जवळ सर्व भाषांमध्ये निघालेल्या चित्रपटांना संगीत देणारे ते एकमेव संगीत दिग्दर्शक असावेत. एका मराठी सिनेमालासुद्धा त्यांनी संगीत दिले होते, पण तो तेवढा गाजला नाही. एका भाषेतील चित्रपटातल्या गाण्याच्या चाली ते अनेक वेळा दुस-या भाषेतल्या गाण्याला देत असत. एवढेच नव्हे तर एका गाण्याच्या सुरुवातीच्या आधी दिलेल्या किंवा दोन कडव्यांमधल्या वाद्यसंगीताच्या लकेरीवर नंतर स्वतंत्र गाण्याची चाल रचल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. पण असे करतांना ते त्या चित्रपटातील प्रसंग व वातावरणाचे भान ठेऊन त्यानुसार त्यात फेरफार करीत व त्यासाठी योग्य त्याच वाद्यांची जोड त्याला देत असत. श्री.उन्नीकृष्णन स्वतः संगीतज्ञ व उत्कृष्ट गायक आहेत. ते खैरागढ संगीत विद्यापीठात अध्यापनाचे काम
करतात. उदाहरणादाखल त्यांनी आपल्या खड्या आवाजात फक्त कीबोर्डच्या कॉर्डच्या आधारावर कांही छान गाणी म्हणून दाखवली. तसेच गायकाच्या आवाजातील वैशिष्ट्यानुसार सलिलदा कोणत्या प्रकारच्या गाण्यासाठी कोणाची निवड करायची ते कसे ठरवत असत तेही दाखवून दिले.
salil2

स्व.सलिल चौधरी यांची जीवनयात्रासुद्धा त्यांच्या संगीतासारखीच विलक्षण होती असे म्हणता येईल. त्यांचे वडील आसाममधील चहाच्या मळ्यांमध्ये डॉक्टर म्हणून काम करीत. या मळ्यांचे मालक त्या काळी बहुधा ब्रिटीश असत तर मजूरवर्ग भारतीय, त्यातही बहुतांश गिरीजन असे. त्यांच्याबद्दल डॉक्टरांना जास्त आपुलकी वाटत असे आणि वेळ पडल्यास ते मालकांविरुद्ध मजूरांना साथ देत असत. हल्ली सुरू असलेल्या ‘असंभव’ या मालिकेमध्ये आलेल्या ‘श्रीरंग रानडे’ हे पात्र पाहून मला सलिलदांच्या पिताजींची आठवण झाली.

सलिलदांचे बालपण चहाच्या मळ्यांच्या निसर्गरम्य परिसरात गेले. ब्रिटीश मालकवर्गाच्या सहवासामुळे आणि जात्याच आवड असल्यामुळे सलिलदांच्या वडिलांनी पाश्चात्य संगीताच्या ध्वनीमुद्रिकांचा प्रचंड संग्रह केला होता. त्यातली गाणी ऐकत मोझार्ट आणि बिथोवन यांच्या रचनामधून सलिलदांनी स्वरांची ओळख करून घेतली. कुशाग्र बुद्धीमत्ता आणि ग्रहणशीलता असल्यामुळे कुठल्याही गुरूच्या मार्गदर्शनाशिवायच ते स्वरमालिका शिकले एवढेच नव्हे तर ऐकलेले किंवा सुचलेले स्वर लिपीबद्ध करू लागले. पियानो, हार्मोनियम व व्हायलिनसारखी पाश्चात्य वाद्ये आणि बांसुरीसारखी भारतीय वाद्येदेखील ते आपल्या स्वतःच्या प्रयत्नानेच वाजवायला शिकले. मजूरांच्या सान्निध्यात राहून त्यांनी ईशान्य भारतातील लोकसंगीत भरपूर ऐकले आणि तेही आत्मसात केले. शांत निसर्गरम्य ठिकाणी बसून पांव्याचे मधुर स्वर आळवायचा नाद त्यांना लागला.

संगीताच्या क्षेत्रात अशी एकट्याने वाटचाल सुरू असतांना त्यांच्या मनावर साम्यवादी विचारांचा प्रभाव पडत होता. गरीब मजूरांना एकत्र आणून त्यांच्या समस्यासाठी लढा देणे वगैरे गतिविधींना सुरुवात झाली. त्या विषयांना अनुरूप अशी ज्वलंत गाणी रचून व त्यांना आकर्षक चाली लावून ती कामगारांकडून म्हणवून घेणे, त्यांच्यासाठी नाटके व पथनाट्ये लिहून ती बसवणे हा सुद्धा लढ्याचा एक भाग म्हणून त्यांनी केला. अशा विविध माध्यमांमधून आपले क्रांतिकारी विचार दीनदुबळ्या जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या कार्यात गुंतल्यामुळे दुस-या महायुद्धाच्या काळात त्यांना भूमीगत व्हावे लागले. पुढील काळात ते संगीताकडे वळले नसते तर खचितच राजकीय पुढारी झाले असते, किंवा कदाचित प्रसिद्ध साहित्यिकही झाले असते. या सगळ्या क्षेत्रात त्यांना रुची होती तसेच चांगल्यापैकी गतीसुद्धा होती आणि मुख्य म्हणजे शिखरापर्यंत चढून जाण्याची जिद्द व क्षमता होती.
त्यांनी गाणी लिहिली तसेच कथासुद्धा लिहिल्या आणि त्या चांगल्या गाजल्या. त्यांनी लिहिलेली नाटके बंगाली रंगभूमीवर आली आणि लोकप्रिय झाली. बंगाली भाषेतील चित्रपटांसाठी कथा व गाणी लिहिली ती सुद्धा यशस्वी झाली. बंगाली चित्रपटक्षेत्रात त्यांचे नांव झाले. कोलकाता शहरात मोलमजूरी करून आपली गांवाकडील जमीन सावकाराच्या पाशातून सोडवण्याची स्वप्ने पाहणा-या गरीब बिचा-या माणसाच्या जीवनाची कशी फरपट होते या गोष्टीवर त्यांनी लिहिलेली कथा ‘रिक्शावाला’ या नांवाने बंगाली सिनेमाच्या पडद्यावर आली.

ती पाहून तिचे हिंदीत रूपांतर करण्यासाठी स्व.बिमल रॉय यांनी सलिल चौधरी यांना मुंबईला पाचारण केले आणि या कथेवर आधारित ‘दो बीघा जमीन’ हा चित्रपट करण्यासाठी ते मुंबईला आले. हा चित्रपट चांगला गाजला. बिमल रॉय यांचे कुशल दिग्दर्शन व बलराज साहनी यांनी विलक्षण ताकदीने साकारलेली त्यातली प्रमुख भूमिका तर लक्षात राहिलीच. पण सलिल चौधरींची कथा, त्यांनी दिलेले प्रभावी पार्श्वसंगीत आणि त्यातील ‘धरती कहे पुकारके … मौसम बीता जाये’ हे गाणे खूप गाजले. त्यानंतर अनेक वर्शे ते बिमलदांच्या बरोबर राहिले. बंगाली चित्रपट सुरूच होते. हिंदी व इतर भारतीय भाषांमधील चित्रपट त्यांना एकामागोमाग एक मिळत गेले.

आधी गीतकार गाणे लिहितो, संगीत दिग्दर्शक त्याला चाल लावतो आणि गायक ते गाणे त्या चालीवर म्हणतो अशी बहुतेक लोकांची एक ढोबळ समजूत असते. हा सुद्धा तसा एक महत्वाचा मार्ग आहे. मध्ययुगात होऊन गेलेल्या संतांनी रचलेले अभंग, दोहे, भजने किंवा भा.रा.तांबे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यासारख्या कवींनी कित्येक दशकांपूर्वी केलेल्या उत्तमोत्तम कविता गाण्याच्या रूपात याच मार्गाने आपल्या कानापर्यंत पोचल्या आहेत. “मी कधीही आधी ठरवून कविता लिहीत नाही. ती आपल्याला स्फुरत जाते.” असे कवी मंगेश पाडगांवकर नेहमी आपल्या मुलाखतींमध्ये सांगतात. अर्थातच त्या कवितेला चाल लावणे ही त्यानंतरची गोष्ट झाली. “ज्या वेळी काव्याचे शब्द माझ्या समोर असतात तेंव्हाच मी त्यांना चाल लावतो.” असे संगीतकार श्रीनिवास खळे यांनी एका मुलाखतीत सांगितल्याचे मला आठवते. श्री.यशवंत देवांनी तर ‘शब्दप्रधान गायकी’ या विषयावर खास कार्यक्रम केले आहेत आणि पुस्तकसुद्धा लिहिले आहे. बोलपटांचा जमाना आल्यानंतर ते अधिक आकर्षक व मनोरंजक करण्यासाठी त्यात गाणी घालणे सुरू झाले. त्यासाठी पाहिजे तशी तयार गाणी आयती मिळणे कठीणच असल्यामुळे बव्हंशी ती मुद्दाम लिहिली जाऊ लागली. सुरुवातीच्या काळात आधी सिनेमातील प्रसंगानुसार गीत लिहून ते नंतर स्वरबद्ध केले जात असे. हा सगळा या प्रक्रियेचा एक भाग झाला.

पण जसजशी सिनेमातली गाणी लोकप्रिय होत गेली, लोकांच्या तोंडात बसली तेंव्हा त्यांमधील स्वरांना व ठेक्याला अधिकाधिक महत्व निर्माण झाले. कांही गाणी त्यातील सुंदर अर्थामुळे लक्षात रहायची तर बरीचशी गाणी त्यांच्या गोड किंवा आकर्षक चालीमुळे मनात भरायची. त्यामुळे गीतकार आणि संगीतकार यांनी एकत्र बसून गीतरचना करणे सुरू झाले. संगीतकारांनी धुन ऐकवायची, गीतकारांनी त्यावर शब्द लिहायचे, त्या शब्दांच्या अर्थाला उठाव देतील अशा जागा संगीतकाराने निर्माण करायच्या आणि गायक वा गायिकेकडून त्या घटवून घ्यायच्या, त्या ऐकल्यावर वाटल्यास थोडे शब्द इकडे तिकडे करायचे वगैरे प्रकारे सर्वांच्या सहकार्याने गाणी बनू लागली. ग.दि.माडगूळकर किंवा शांता शेळके यांच्यासारखे संगीताची जाण असलेले गीतकार आणि सुधीर फडके किंवा हृदयनाथ मंगेशकरांसारखे साहित्यप्रेमी संगीतकार एकत्र आल्यावर त्यांनी एकत्र येऊन कित्येक अजरामर अशी गाणी निर्माण केली.

आजच्या काळात सिनेमातील गाणी म्हणजे त्याच्या ठेक्यावर नाचून घ्यायचे एक साधन अशीच लोकांची समजूत झालेली असावी असे कधी कधी दिसते. त्यामुळे त्यातला एक नशा आणणारा, धुंद करणारा जलद ठेका जोरजोरात कानावर आदळत असतो. हिंदी, इंग्रजी, मराठी, पंजाबी अशा कुठल्याही भाषेतले कांही शब्द त्या ठेक्यावर ओढून ताणून बसवलेले असतात. एकतर ते नीट स्पष्टपणे ऐकू येत नाहीत, ऐकू आले तरी समजत नाहीत आणि समजले तरी लक्षात रहात नाहीत कारण त्यातून कांही अर्थाचा बोध व्हावा अशी अपेक्षाच नसते. निवांतपणे बसून ऐकत रहावीत अशी कांही गाणीसुद्धा अधून मधून येतात पण त्यांची टक्केवारी हल्ली कमी झाली आहे.

संगणक क्रांती आल्यानंतर ध्वनीसंयोजनाच्या तंत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत. कोठलेही वाद्य प्रत्यक्ष न वाजवता अनंत प्रकारचे नाद कृत्रिम रीत्या निर्माण करणे आता शक्य झाले आहे. स्व.सलिल चौधरी यांच्या काळात ते तंत्र असते तर त्याचा देखील त्यांनी कुशलतेने उपयोग करून घेतला असता यांत शंका नाही. भारतीय व पाश्चात्य संगीतातील सर्व छटा त्यांनी त्यांच्या संगीतात आणल्याच. बंगाली चित्रपटामधील गीते ते स्वतःच लिहीत असत. त्यामुळे आधी चाल की आधी शब्द हे सांगता येणे कठीण आहे. कदाचित या दोन्ही गोष्टी त्यांच्या मनात एकत्रच जन्म घेत असाव्यात. पण बंगालीमध्ये लोकप्रिय झालेल्या चालीवर हिंदी गाणे करायचे असेल तर ते नंतरच लिहावे लागणार. त्यांची बरीचशी गाणी आधी कवी शैलेंद्र यांनी लिहिली आणि नंतर योगेश यांनी. ते दोघेही प्रतिभासंपन्न कवी असल्यामुळे ती गाणी ऐकायला जितकी मधुर वाटतात तितकेच त्यातले भाव सुंदर असतात.

पारंपरिक भारतीय संगीतामध्ये साथीला जी वाद्ये असतात त्यातला तबला किंवा ढोलक वगैरे वाजवून ताल धरतात आणि तानपुरा सुरांचा संदर्भ देत असतो. पेटी, सारंगी वगैरे वाजवणारे साथीदार गायकाने आळवलेले सूरच त्याच्या मागोमाग वाजवून त्याच्या गायनात एक प्रकारचा भराव घालत असतात. या सर्व साजांचे वाजणे सतत चालूच असते. त्यात सुसंवाद साधण्यासाठी केलेले तंबोरे जुळवण्याचे ट्याँव ट्याँव आणि तबल्याची ठाकठूक श्रोत्यांना निमूटपणे ऐकून घ्यावीच लागते. सिनेमामधील गाण्यात मात्र कधी मुख्य गाणे सुरू होण्यापूर्वीच त्याची चाहूल देणारे कांही ध्वनी ऐकू येतात, मुख्य गाण्याच्या सोबतीने दुसरेच कांही वाजत असते आणि ध्रुपद व कडव्यांमधल्या जागा इतर वाद्यांच्या वादनातून भरलेल्या असतात. सारी वाद्ये सहसा सलगपणे वाजत नाहीत. कधी पन्नास व्हायलीन वाजत असल्याचा सामूहिक ध्वनी येईल तर मध्येच एका बांसुरीवर घातलेली शीळ, कुठे मेंडोलिनचा पीस तर कुठे ड्रम्सचे तुकडे. अशा शेकडो व्हरायटीज त्या गाण्यांमध्ये असतात. या सगळ्या वाद्यवृंदाचा सांभाळ करणारा अरेंजर नांवाचा वेगळाच तज्ञ असतो.

सलिलदा संगीत दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरले त्यापूर्वीच पाश्चात्य देशात प्रचलित असलेला ऑर्केस्ट्रा त्यात येऊन स्थिरावला होता. त्यांना तर पाश्चिमात्य संगीताचे बाळकडूच प्यायला मिळाले होते. मनात भारतीय शास्त्रीय तसेच लोकसंगीताची आवड होती. त्या सर्वांचा सुंदर मिलाफ त्यांनी केला. एकदा ते आपण बसवलेले गाणे रेकॉर्ड करत असतांना बोलावलेल्या ऑर्केस्ट्राच्या अरेंजरने “त्यांना यातलं काय कळतंय्?” असा कांहीसा आव आणला. ते सलिलदांना सहन झाले नाही. त्यांना सर्व वाद्यांची माहिती होतीच, स्वरलिपीही समजत होती. त्यांनी त्या अरेंजरलाच रजा देऊन टाकली आणि स्वतःच त्या गाण्याचे ध्वनिसंयोजन केले अशी आठवण कोणी सांगितली. केवळ आपल्याला येतात म्हणून कांही कोणी सगळी कामे आपल्या स्वतःच्या डोक्यावर घेत नाही. पण कोणाशिवाय आपले अडत नाही हा मुद्दा त्यांना दाखवून द्यायचा असणार.

दो बिघा जमीन हा बिमल रॉय यांचा चित्रपट १९५३ साली प्रदर्शित झाला या गोष्टीला आता पन्नास वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. सलिल चौधरी हे मुख्यतः या चित्रपटाचे कथालेखक होते, पण त्यांनी त्याचे संगीत दिग्दर्शनही केले. त्यासाठी त्यांनी स्वरबद्ध केलेली त्यातली चारही गाणी तेंव्हा तर गाजलीच, पण आजदेखील अधून मधून ऐकू येतात. पर्जन्यराजाच्या आगमनाने शेतक-यांच्या मनातले मोर कसे थुई थुई नाचू लागतात त्याचे चित्र “हरियाला सावन ढोल बजाता आया।” या समूहगीताने साक्षात डोळ्यापुढे उभे राहते, तर “भाई रे, धरती कहे पुकारके” या गाण्यात जमीनीपासून दूर जाऊ पाहणा-या किसानाला ती हांका मारते, “कुछ तो निशानी छोड जा ” असे विनवते तसेच “तू फिर आये ना आये” असा इशारा देते. अशा प्रकारे हे गाणे सामाजिक आशयाने भरलेले आहे. सलिलदांच्या सामाजिक जाणीवांचे दर्शन त्यात घडते. “अजब तेरी दुनिया, ओ मोरे रामा” हे एक खास उत्तर भारतीय ढंगाचे, ग्रामीण भागातून महानगरात आलेल्या ‘भय्या’ लोकांचे लोकसंगीत कसे असते त्याचे चांगले उदाहरण आहे. “आजा तू आ, निंदिया तू आ” ही लता मंगेशकरांच्या आवाजातली एक गोड अंगाई आहे.

त्यानंतर पाठोपाठ आलेल्या चित्रपटांमधील गाणीसुद्धा लोकप्रिय होत गेली. कांही गाण्यांच्या चित्रपटांची नांवे आता कदाचित आठवणार नाहीत, किंवा ते कधी पाहिलेसुद्धा नसतील, पण त्या गाण्याची चाल लक्षात राहिली असेसुद्धा सांगता येईल. “नौकरी” हा चित्रपट किती लोकांना आठवत असेल? पण त्यातले “छोटासा घर होगा बादलोंकी छांवमें” या गाण्यात किशोरकुमारने केलेले “हा हा हुइ हुइ हुइहई” मात्र सगळ्यांना आठवते. सलिलदा एकदा काठमांडूला हॉटेलमध्ये उतरले असतांना तिथले गुरखे लोक म्हणत असलेले एक नेपाळी गाणे त्यांच्या कानांवर पडले. त्यांनी ती धुन लक्षात ठेवली आणि तिच्यावर आपले संस्कार करून ती चाल या गाण्याला दिली.

हंसध्वनी या कर्नाटक संगीताकडून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात आलेल्या रागावर आधारलेले “जा तोसे नहीं बोलू कन्हैया। राह चलत पकडी मोरी बैंया।” हे गीत सलिलदांनी “परिवार” या चित्रपटामध्ये दिले आणि लतादीदी आणि मन्ना डे यांनी ते अप्रतिमरीत्या गायिले आहे. त्यात रागदारीच्या सुंदर ताना आहेतच, शिवाय कृष्ण आणि गोपिका यांच्यामधल्या लटक्या रुसव्याफुगव्याचे इतके लोभसवाणे दर्शन घडवणारे ते एक अजरामर गाणे ठरले.

राजकपूरच्या चित्रपटांना बहुधा शंकर जयकिशन यांचेच संगीत असायचे. त्याला अपवाद असलेले जे थोडे सिनेमे आले त्यात “जागते रहो” हे नांव पटकन डोळ्यासमोर येते. हा देखील सामाजिक जाणीव असलेला त्या काळातला एक कलात्मक चित्रपट होता. त्याला कार्लोव्ही व्हेरी इथल्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात प्रथम क्रमांक मिळाला होता. पण त्याच्या कथानकात गाण्यांना योग्य अशा जागा नव्हत्या. तरीसुद्धा सलिलदांनी स्वरबद्ध केलेली त्यातली गाणी तुफान लोकप्रिय झाली, कदाचित ती त्या सिनेमापेक्षाही अधिक चालली. स्व.मोतीलाल यांच्या सकस अभिनयाने सजलेले “जिंदगी ख्वाब है, ख्वाबमें झूठ क्या? और भला सच है क्या?” हे दारुड्याचे गाणे जीवनाचे वास्तव स्वरूप सहजपणे सांगते. त्यात एक भांगडा नाच टांकला आहे. मोहंमद रफी आणि बलबीरसिंग यांनी खड्या आवाजात म्हंटलेल्या त्या गाण्यात पहिल्यांदाच हिंदी प्रेक्षकांनी इतके जोरकस “याँहूँ याँहूँ” आणि “बल्ले बल्ले” ऐकले असेल. घोटभर पाण्यासाठी रात्रभर तडफड केल्यानंतर सकाळी नायकाची तृषा मोठ्या कलात्मक रीतीने शांत होते त्या प्रसंगी दिलेले सकारात्मक जीवन जगण्याचा संदेश देणारे पहिल्या प्रहरी गायल्या जाणा-या भैरव रागावर आधारलेले “जागो मोहन प्यारे” या गाण्याला तर तोड नाही. इतकी गोड आणि शांतरसपूर्ण दुसरी कोणतीही भूपाळी हिंदीमध्ये नसेल.

“अपराधी कौन?” हा रहस्यपट त्यातील कथेच्या त्या काळातल्या नाविन्याने जसा धक्का देणारा होता तसेच त्यातले “द्वार दिलका खुल गया, हाथी निकल गया, दुम रह गयी मगर” हे गाणे गुदगुल्या करणारे होते. रेशमी मुलायम आवाजाचा गायक तलत मेहमूद “एक गांवकी कहानी” या चित्रपटाचा नायक होता. “नीला अंबर झूमे, धरतीको चूमे” आणि “रातने क्या क्या ख्वाब दिखाये” यासारखी तलतने गायिलेली गाणी प्रसिद्ध झाली.

“रातने क्या क्या ख्वाब दिखाये” या गाण्याबद्दल एक मजेदार आठवण माझ्या जीवनाला जोडली गेली आहे. स्टार चॅनेलवर एका काळी गाजलेल्या “मेरी आवाज सुनो” या ‘रिअँलिटी शो’ कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्या वेळी प्रेक्षकात बसण्याची संधी आम्हाला मिळाली होती. अन्नू कपूर हे त्या गाण्याच्या स्पर्धेचे सूत्रसंचालक होते. त्यातल्या एका फैरीमध्ये त्यांनी चिठ्ठ्यांनी भरलेला एक वाडगा प्रेक्षकांसमोर धरला आणि एका कन्यकेला त्यातून गाण्याचे नांव असलेली एक चिठ्ठी काढून ती वाचून दाखवायला सांगितले. तिने उचललेल्या चिठ्ठीवर “रातने क्या क्या ख्वाब दिखाये” या गाण्याचे नांव होते. तिला याची चाल ठाऊक नसल्यामुळे ती ते नांव गद्यातच वाचत होती. “प्रेक्षकांमध्ये कोणाला याची चाल येते काय?” असा प्रश्न अन्नू कपूरने विचारताच लगेच मी हांत वर करून ते गाणे गुणगुणून दांखवले. टीव्हीच्या पडद्यावर झळकण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. तो कार्यक्रम त्या काळी खूप लोकांनी पाहिला आणि माझ्या त्या ‘चमकण्याचे’ सार्थकही झाले.

त्यानंतर आलेल्या “मुसाफिर” सिनेमातील “मुन्ना बडा प्यारा, अम्मीका दुलारा” हे एक मजेदार बालगीत एका कोंकणी लोकगीताच्या चालीवर आधारलेले आहे. त्याच चित्रपटातले “लागी नाही छूटे रामा, चाहे जिया जाये” हे प्रेमगीतसुद्धा खूप चांगले आहे. अशी वाटचाल करत सलिलदांनी पांच वर्षाच्या आंत म्हणजे १९५८ साली ‘मधुमती’ नांवाचे हिंदी चित्रपटांच्या इतिहासातले एक महत्वाचे शिखर गांठले.
salil5

ज्याने मधुमती हा चित्रपट अजून पाहिला नाही किंवा पाहिल्यानंतर त्याला तो आवडला नाही असा हिंदी सिनेमाचा शौकीन आपल्याला सहसा मिळणार नाही. मला तरी अद्याप असा माणूस भेटलेला नाही. अगदी आलमआरा पासून ते काल परवा आलेल्या स्लमडॉग मिलिऑनेअर पर्यंत सर्व हिंदी सिनेमांमधील संगीताच्या दृष्टीने ‘टॉप टेन’ ची यादी बनवल्यास त्यात मधुमतीचे नांव निश्चितपणे येईल असे मला वाटते. खुद्द सलिल चौधरी यांनीसुद्धा मधुमतीच्या यशानंतर पन्नासावर चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले आणि त्यातून उत्तमोत्तम गाणी दिली पण एकंदरीत पाहता मधुमतीची सर त्यातील कोणत्याही चित्रपटाला येऊ शकली नाही असे माझे मत आहे.

असे एवढे काय त्या चित्रपटाच्या संगीतात होते ? यापेक्षा त्यात काय नव्हते या प्रश्नाचे उत्तर देणे अधिक कठीण जाईल. चित्रपटाची सुरुवात होऊन थोडाच वेळ झाल्यावर एका निसर्गरम्य अशा जागेचे दृष्य पडद्यावर येते, चिमण्यांची चिंवचिंव कानावर पडते, धनगराची लकेर ऐकू येते आणि अचानकपणे मुकेशच्या स्वरात एक गाणे सुरू होते, “सुहाना सफर है ये मौसम हंसी” जणु ते आपल्यालाच त्या नयनरम्य ठिकाणी घेऊन जाते. आपण सुद्धा “हमें डर है हम खो न जाये कहीं” असे मनात म्हणतो. दूरवर असलेल्या पहाडीवरून लता मंगेशकरांच्या आंवाजात एक कमालीची मधुर साद ऐकू येते, “आ जा रे, परदेसी, मै तो कबसे खडी उस पार, अँखियाँ थक गयी पंथ निहार।”. महल या चित्रपटांमधल्या “आयेगा, आनेवाला” या गीतापासून गूढ आर्त अशी साद घालणा-या गाण्यांची मालिकाच सुरू झाली. “नैना बरसे रिमझिम रिमझिम”, “कहीं दीप जले कहीं दिल”, “अनजान है कोई”, “या डोळ्यांची दोन पांखरे”, “तू जहाँ जहाँ चलेगा” वगैरे अशा प्रकारची किती तरी ‘हॉँटिंग’ गाणी त्यानंतर आली आहेत. “आ जा रे, परदेसी” हे सुद्धा त्याच पद्धतीचे आणि त्या गूढ आवाजाचा वेध घेण्यास भाग पाडणारे असे गाणे आहे. माझ्या टॉप टेनमध्ये त्याची जागा पक्की आहे.

या गाण्याच्या इंटरल्यूडमध्ये आपल्याला “घडी घडी मोरा दिल धडके” या पुढे येणा-या दुस-या एका गोड गाण्याची चाल ऐकू येते. प्रेमिकाच्या मीलनासाठी आतुर झालेल्या नायिकेच्या हृदयाची तो अमूल्य क्षण जवळ आल्यानंतर जी नाजुक अवस्था होईल ती या गाण्यात अचूक टिपली आहे. “जुल्मीसंग आँख लडी, सखी मै कासे कहूँ।” हे एक प्रेमगीत आणि कुमाँऊँमधील लोकसंगीत यांचे अप्रतिम मिश्रण आहे. प्रेमी जनांच्या जिवाची होणारी तडफड “दिल तडप तडपके कह रहा है आ भी जा। तू हमसे आँख ना चुरा तुझे कसम है, आ भी जा।” या गाण्यात प्रभावीपणे दाखवली आहे. प्रेमिकेशी मीलन न होऊ शकल्याने सर्वस्व गमावून बसलेल्या नायकाचा तीव्र आक्रोश “टूटे हुवे ख्वाबोंने हमको ये सिखाया है। दिलने जिसे पाया था आँखोंने गँवायाहै।” या महंमद रफीच्या गाण्याने प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतल्याशिवाय रहात नाही.

याच्या अगदी उलट “जंगलमें मोर नाचा किसीने ना देखा। हम जो थोडीसी पीके जरा झूमे तो हाय रे सबने देखा।” हे महंमद रफीनेच गायिलेले विनोदी गाणे मनावरचा ताण हलका करते. “हम हालेदिल सुनायेंगे सुनिये के न सुनिये” ही एक खास उत्तर भारतीय ढंगाची ठुमरीसुद्धा मुबारक बेगम यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमध्ये या सिनेमात ऐकायला मिळते आणि “कांची रे कांचीरे” हे नेपाळी पद्धतीचे समूहगीत सुद्धा यात आहे. “दैया रे दैया रे चढ गयो पापी बिछूआ।” हे गाणे तर मला लोकसंगीतातल्या समूहनृत्याचा अगदी परमोच्च बिंदू वाटतो. त्यानंतरच्या काळात मी किती तरी लावण्या, कोळीगीते, गरबा वगैरे पाहिले आहेत. भांगड्याचा धांगडधिंगा तर आजकाल फारच बोकाळला आहे. अलीकडे आलेल्या “ढोल बाजे”, “चोलीके पीछे क्या है” किंवा “बीडी जलैले” यासारख्या गाण्यांना वाद्यांची अप्रतिम साथ आहे. असे असले तरी “दैया रे दैया” ने पन्नास वर्षांपूर्वी मनावर घातलेली जादू त्या “पापी बिछूआ” च्या विषासारखी उतरत नाही.

अशा प्रकारे भरपूर विविधतेने नटलेली खूप गाणी या चित्रपटांत आहेत. “सुहाना सफर” आणि “दिल तडप तडपके” यासारख्या गाण्यात उडते सूर आणि थोडे खालचे स्वर घेतले आहेत आणि त्यातले शब्द थबकत थबकत पुढे जात आहेत असे वाटते. त्यातल्या ललाल्लाच्या लकेरी पश्चिमेकडल्या दिसतात. ही गाणी गाण्यासाठी मुकेशचा भरदार आवाज वापरला आहे, तर “टूटे हुए ख्वाबोंने” हे थोड्या चढ्या स्वरात आणि मींडचा वापर करून सलगपणे म्हंटलेले गाणे महंमद रफी यांनी गायिले आहे. “आ जा रे परदेसी” व “दैया रे दैया” या अप्रतिम दर्जाच्या गाण्यांसाठी लतादीदींचा स्वर निवडला आहे, ठुमरीसाठी मुबारक बेगम आणि समूहगीतासाठी आशा भोसले, सबिता वगैरेंचा आवाज घेतला आहे. गायक वा गायिकेची अचूक निवड, वाद्यांची उत्तम साथ आणि मुख्य म्हणजे मनमोहक मुखडे या सगळ्या बाबतीत विचारपूर्वक काम केले असल्याने ही गाणी नुसती कानाला संतोष देऊन थांबत नाहीत, त्यांतले तर शैलेंद्र यांचे सुंदर अर्थपूर्ण शब्द थेट मनाला जाऊन भिडतात आणि दीर्घकाळ लक्षात राहतात.

मधुमती हा चित्रपट १९५८ सालचा सर्वोत्तम चित्रपट ठरला. या चित्रपटाला त्या वर्षातली अर्ध्याहूनही अधिक पारितोषिके मिळाली. त्यात सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचे पारितोषिक सलिल चौधरी यांना मिळाले. त्या चित्रपटालातील गाणी तुफान लोकप्रिय झालीच. १९५३ साली निघालेल्या दो बिघा जमीन पासून मधुमती पर्यंतचा पांच वर्षांचा प्रवास सलिलदा आणि बिमलदा यांनी एकत्र केला होता. बिराज बहू, नौकरी, अमानत, परिवार, अपराधी कौन आदि चित्रपटांसाठी दोघांनीही काम केले होते. मधुमतीच्या यशानंतर मात्र त्यांनी एकत्र केलेला फक्त उसने कहा था हा एकच सित्रपट आला. बंदिनी, सुजाता आदि बिमलदांच्या सिनेमांना सचिनदेव बर्मन यांनी संगीत दिले.

मधुमतीनंतरसुद्धा सलिलदांनी दिलेली गोड व आकर्षक गाणी कांही काळ येतच होती. परखमधील ” ओ सजना, बरखाबहार आय़ी, रसके फुहार लायी, अँखियोंमे प्यार लाय़ी।” हे गाणे आतांपर्यंत आलेल्या सर्व पर्जन्यगीतात सर्वात मधुर म्हणता येईल तर ” मिला है किसीका झूमका” हे गाणे त्याच्या चालीमधल्या लडिवाळपणानुळे छान वाटते. उसने कहा था मधले “मचलती आरजू, खडी बांहे पुकारे ओ मेरे साजना रे, धडकता दिल पुकारे” या गाण्यात आर्त अशी साद आहे तर “आहा रिमझिमके ये प्यारे प्यारे गीत लिये, आय़ी रात सुहानी देखो प्रीत लिये” या उडत्या चालीवरल्या गाण्यात प्रेमाची धुंदी आहे. याच सिनेमातील “जानेवाले सिपाहीसे पूछो के कोई कहाँ जा रहा है” हे गंभीर प्रकृतीचे गाणे आहे. या गाण्याला समूहाच्या कोरसने एक विलक्षण सखोलपणा प्राप्त झाला आहे.

छाया चित्रपटातील “छम छम नाचत आयी बहार” हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतावर आधारलेले गाणे आहे तर “इतना ना मुझसे तू प्यार बढा कि मै इक बादल आवारा ” गाणे मोझार्टच्या सिंफनीचे भारतीय रूप आहे. “आँखोमें मस्ती शराबकी” हे धुंद करणारे गाणे आहे तर “आँसू समझके क्यूँ मुझे आँखसे तूने गिरा दिया” ही एक अतिशय सुंदर गजल आहे. अशी विविधता छाया सिनेमातल्या गाण्यांत आहे. काबुलीवाला सिनेमातले “गंगा आये कहाँसे, गंगा जाये कहाँ रे” या गाण्याला उत्तर भारतीय लोकगीताची चाल आहे तर “ऐ मेरे प्यारे वतन” हे देशभक्तीपर गाणे आहे. त्यात उल्लेख केलेला देश अफगाणिस्तान आहे ही गोष्ट वेगळी. त्याच वर्षी आलेल्या माया सिनेमातली गाणीसुद्धा खूप गाजली. “कोई सोनेके दिलवाला, कोई चाँदीके दिलवाला, शीशेका ऐ मतवाले मेरा दिल”, “तसवीर तेरी दिलमे इस दिलने उतारी है”, “जा आरे जारे उड जारे पंछी, बहारोंके देस जारे”, “ऐ दिल कहाँ तेरी मंजिल” इत्यदि अमर गाणी खास सलिलदांची किमया दाखवतात. आजसुद्धा ही गाणी ऐकू येतात आणि ऐकावीशी वाटतात.

विनोदी प्रकारची गाणी हा एक सलिलदांचा हातखंडा झाला होता. किशोरकुमारचा हाफ टिकट हा सिनेमाच पूर्णपणे विनोदी होता. त्यातले “चील चील चिल्लाके” हे बालगीत मजेदार आहे. किशोरकुमार आणि प्राण यांनी “आके सीधी लगी दिलपे जैसी ये कटरिया, ओ गुजरिया” या गाण्यात जो धुमाकूळ घातला आहे, त्याला तोड नाही. उडत्या सुरांचे हे गाणे हंसवून पोट दुखवते. “वो एक निगाह क्या मिली”, “आँखोंमे तुम दिलमे तुम हो” आणि “चाँद रात, तुम हो साथ” ही द्वंदगीतेसुद्धा श्रवणीय आहेत.

हिंदी चित्रपटसृष्टीत आल्यानंतर सलिल चौधरी यांनी आपला दबदबा निर्माण केला होता. सलिलदांनी संगीतबद्ध केलेली दोन तीन गाणी तरी त्या काळी अत्यंत लोकप्रिय असलेल्या बिनाका गीतमाला या कार्यक्रमात दर बुधवारी वरच्या ‘पादान’वर लागत असत आणि त्यामधली कित्येक गाण्यांना ‘सरताज’ मिळत असे. अशी सात आठ वर्षे गेली. त्यानंतर मधला कांही काळ सलिलदांची एवढी गाणी एका पाठोपाठ आली नाहीत. चाँद और सूरज आणि पूनमकी रात यासारखे कांही सिनेमे आले, पण ते फारसे गाजले नाहीत. “बागमें कली खिली बगिया मेहकी, पर बेवफा भँवरा नही आया” यासारखे नटखट गाणे, “झनन झन बाजे” हे शास्त्रीय संगीत असलेले गीत, आणि “तेरी याद न दिलसे जा सकी” हे विरहगीत अशी कांही गाणी अजून स्मरणात टिकून आहेत. पूनमकी रातमधले “साथी रे, तुझबिन जिया उदास .. आजा, आजा, आजा” हे गूढतामय गाणेसुद्धा अमर झाले. पण एकंदरीत सलिलदांचे अस्तित्व पूर्वीइतके उठून दिसत नव्हते.

त्यांची जादू ओसरली की काय असे वाटत असतांनाच सन १९७१ च्या सुमारास त्यांच्या सदाबहार गाण्यांची नवी लाट घेऊन आनंद हा सिनेमा आला. त्यामधली “जिंदगी कैसी ये पहेली हाये, कभी तो हंसाये कभी ये रुलाये”, “कहीं दूर जब दिन ढल जाये, चाँदसी दुलहन बदन चुराये, चुपके से आये”, “मैने तेरे लियेही सात रंगके सपने चुने ” आणि “ना जिया लागे ना ” ही चारही वेगवेगळ्या प्रकृतीची गाणी एकदम ताजी तवानी आणि मनोहारी वाटत होती. त्याच वर्षी आलेल्या मेरे अपने चित्रपटातले “कोई होगा अपना जिसको हम अपना कह देते यारो” हे किशोरकुमारचे गाणेही गाजले. त्याच्या पाठोपाठ आलेल्या अन्नदातामधले “गुजर जाये दिन, दिन, दिन ” हे गाणे सलिलदांच्या खास ढंगातले गाणे होते. ते ऐकायला सोपे वाटत असले तरी त्याची चाल अचूकपणे येण्यासाठी कितीतरी वेळा त्या गाण्याचे रिटेक करावे लागले.

त्यानंतर आलेल्या रजनीगंधा सिनेमातले “एक बार यूँ भी देखा है ” हे मुकेशचे गाणे आणि “रजनीगंधा फूल तुम्हारे” हे लता मंगेशकरांनी गायिलेले गाणे ही दोन्हीही गाणी सुरेख होती. छोटीसी बात सिनेमातली “जानेमन जानेमन तेरे दो नयन” आणि “न जाने क्यूँ होता है ये जिंदगी के साथ” ही गाणीसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण होती. हे सगळे सिनेमे फाँर्म्यूल्यापासून जरा ‘हटके’ असे होते. लोकप्रिय चित्रपटांच्या मुख्य प्रवाहापासून सलिलदा थोडे दूर गेले होते.

हिंदी चित्रपटांमध्ये सुरुवातीपासूनच शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत यांवर आधारलेली गाणी दिली जात होती। इंग्रजी चित्रपटांबरोबर पाश्चात्य संगीताचा प्रभाव त्यावर गेला. हे सगळे सलिल चौधरींनी या क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वीच होऊन गेलेले होते. नौशाद, मदनमोहन, शंकर जयकिशन आदि समकालीन संगीत दिग्दर्शकांनी सुद्धा या तीन्हींचा उत्तम उपयोग केला आहे. त्यातही प्रत्येकाची आपापली लैशिष्ट्ये होती. सलिलदांनी आपली खास अशी स्वतंत्र शैली निर्माण केली.

मेलडी किंवा सुरेलपणा हा गाण्याचा आत्मा असतो असे म्हणतात. सलिलदांच्या संगीतात त्यांनी हा आत्मा मुख्यतः भारतीय ठेवला. पश्चिमेकडून आलेल्या ठेक्यांची साथ देऊन व लय कमी अधिक करून गाण्यांच्या चाली आकर्षक बनवल्या. अनेक प्रकारचे वाद्यसंगीत वापरून त्याची जोड देत गाणी अधिकाधिक चांगली बनवली. भारतीय मूळ संगीताला त्यांनी पाश्चात्य संगीताचा उपयोग करून अलंकृत केले असे म्हणता येईल. फक्त वाद्यसंगीतच नव्हे तर मानवी स्वरांचा उपयोगसुद्धा पार्श्वसंगीतात खुबीने केला. सलिलदांच्या गाण्यात समूहगानाचे स्वर आलेले दिसतात. एक उदाहरणच घ्यायचे झाल्यास जागते रहो या चित्रपटातल्या जागो मोहन प्यारे गाण्यातले “जागोरे जागोरे सब कलियाँ जागी” हा तुकडा पहा.

नंतरच्या काळात पाश्चिमात्य संगीतातली मेलडीच कमी होत जाऊन कर्णकर्कश तालवाद्यांचा प्रभाव वाढला. गाण्यापेक्षा नाचालाच महत्व आले. या प्रकारचे बदल सलिलदांनी केले नाहीत. त्यांचे शैलीदार संगीत हळूहळू लोप पावत गेले.
(समाप्त)

जब रफीसाहब याद आये ।

Rafistamp

मी हा लेख सुमारे दहा वर्षांपूर्वी मी मोहम्मद रफी यांच्याच गाण्यांवर आधारलेला एक सांगीतिक कार्यक्रम पाहून आल्यावर लिहिला होता. आज त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्याने त्याचे थोडे संपादन करून आज हा लेख या स्थळावर देत आहे.

वो जब याद आये

या ठिकाणी लिहितांना मी नेहमी माझ्या लहानपणच्या आठवणी सांगत असतो असे कोणाला वाटेल. उतारवय आल्यावर बहुतेक लोकांना ती खोड लागत असावी. त्यात आणखी एक गंमत अशी आहे की त्या गोष्टी ऐकणे लोकांना आवडते अशी त्यांची आपली (कदाचित गैर)समजूत असते. तर मी एकदा बाहेरगांवाहून येणार असलेल्या कोणाला तरी बसमधून उतरवून घेण्यासाठी एस्टीस्टँडवर जाऊन मोटारीची वाट पहात बसलो होतो. तेंव्हा तशी पध्दतच होती. आपल्या इवल्याशा जगाच्या बाहेर काय चालले आहे ते पहाण्याची तीही एक खिडकी असल्यामुळे आम्हालाही ते काम हवेच असायचे. गृहपाठाचा बोजा नसल्यामुळे स्टँडवर जाऊन थोडा वेळ बसून रहायला फावला वेळ असायचा. खांद्यावर गांठोडे घेऊन चिल्ल्यापिल्ल्यांचे लटांबर सांभाळत दूरवरच्या खेड्यातून पायपीट करत दमून भागून येणाऱ्या खेडुतांपासून ते प्रवासात घामाघूम झाल्यामुळे खिशातून रुमाल काढून त्याने घाम पुसत आपला चुरगळलेला मुळातला झकपक पोशाख ठीकठाक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोठ्या शहरातल्या पांढरपेशा पाहुण्यापर्यंत माणसांचे वेगवेगळे नमूने, त्यांचे कपडे, त्यांचे हांवभाव वगैरे पाहण्यात आणि त्यांच्या निरनिराळ्या बोलीतले आगळे वेगळे हेलकावे ऐकण्यात आमचा वेळ चांगला जात असे. तर एकदा असाच बसच्या येण्याची प्रतीक्षा करत बसलो होतो. त्या दिवशी बुधवार होता आणि रात्रीची वेळ होती. स्टँडवरल्या कँटीनमधल्या रेडिओतून बिनाका गीतमालेचे सूर ऐकू येत होते. अमीन सायानींनी त्यांच्या विशिष्ट लकबीत घोषणा केली, “अब अगली पादानपर आप सुनेंगे मोहम्मद रफीकी आवाजमें एक फडकता हुवा गीत …” आणि लगेच एक अद्भुत आवाजातली लकेर आली, “ओ हो हो…, ओ हो … हो, खोया खोया चाँद, खुला आसमान, ऐसेमें कैसे नींद आयेगी …..” त्यातला झोप न येणे वगैरेचा अनुभव नसल्यामुळे तो भाग कळण्यासारखा नसला तरी ते ओहोहो तेवढे थेट काळजापर्यंत जाऊन भिडले आणि तिथेच कायमचा मुक्काम ठोकून राहिले.

पुढे तो दिव्य आवाज नेहमी कानावर पडत आणि मनाचा ठाव घेत राहिला. रफीसाहेबांनी हजारो गाणी गायिली आणि त्यातली निदान शेकडो अजरामर झाली. आपल्या कारकीर्दीच्या बहरात असतांनाच ते अचानकपणे कालवश झाले. भूतकाळातल्या आठवणींना सतत उराशी बाळगून वर्तमानकाळ हातातून घालवायचा नसतो हे खरे असले तरी त्यांनीच गायिलेल्या ‘वो जब याद आये, बहुत याद आये’ या गाण्यानुसार जेंव्हा कांही लोकांची आठवण येते तेंव्हा त्यांच्या चाहत्यांना ती उत्कटपणे येते हेसुध्दा तितकेच खरे आहे. रफीसाहेबांच्या निधनाला अडतीस वर्षे एवढा काळ लोटून गेला असला तरी अजून त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे कार्यक्रम होतात आणि त्यांच्या मागून आलेल्या पिढीतले लोकसुध्दा तो पहायला व ऐकायला गर्दी करतात. रफीसाहेबांचीच गाणी गात गात किती तरी गायक पुढे नावारूपाला आले आहेत.

पूर्वी एकदा असाच एक कार्यक्रम पहायचा योग आला होता. मोहम्मद रफींच्या आवाजातली खूपशी उत्तमोत्तम सुरेल गाणी श्री. प्रभंजन मराठे यांनी त्या कार्यक्रमात गायिली. ‘मेंदीच्या पानावर’ या अत्यंत लोकप्रिय झालेल्या वाद्यवृंदातून ते मराठी माणसांना परिचित झालेले होतेच. सारेगमप या स्पर्धात्मक कार्यक्रमातल्या प्रौढांच्या पर्वात त्यांनी भाग घेतल्यामुळे ती ओळख दृढ झाली होती. दोन कीबोर्ड आणि एक सेक्साफोन एवढीच सुरांची संगत देणारी वाद्ये साथीला होती आणि तबला, ढोलक, खुळखुळे व ऑक्टोपॅड ही तालवाद्ये गरजेनुसार वाजवणारे तीन वादक होते. पण या सर्वांच्या अप्रतिम कौशल्याची दाद द्यायलाच हवी. त्यांनी सतार, व्हायलिन किंवा फ्ल्यूटवर वाजवलेल्या खास जागासुध्दा घेऊन आणि कोंगोबोंगो किंवा ड्रम्सवरील नाद आपापल्या वाद्यांमधून काढून त्यांची उणीव भासू दिली नाही. ड्यूएट्स गाण्यासाठी विद्या आणि आसावरी या दोन नवोदित गायिका होत्या. रफींनी गायिलेली आणि त्याच चालीवर एकाद्या गायिकेने गायिलेली अशी कांही गाणी त्यांनी स्वतंत्रपणे गायिली. वेगवेगळ्या गीतकारांनी रचलेली, निरनिराळ्या संगीतकारांनी, त्यात पुन्हा अनेक प्रकारच्या संगीताच्या आधाराने स्वरबध्द केलेली, विविध भाव व्यक्त करणारी अशी गाणी निवडून त्यात शक्य तेवढी विविधता आणण्याचा संयोजकांचा प्रयत्न स्तुत्य होता. मोहम्मद रफीसाहेबांच्या गाण्यांची रेंज दाखवण्याचा उद्देश त्यामागे होता. पण त्यातले वैविध्य थोडे कमी करून माझ्या आवडीची आणखी कांही गाणी घेतली असती तर मला ते अधिक आवडले असते. तरीसुध्दा जी घेतली होती ती सगळीच गाणी त्या त्या काळी लोकप्रिय झाली होती आणि माझ्या ओळखीचीच होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल दोन दोन शब्द लिहिण्याचा मोह होतो. कुठल्या तरी एका प्रकारच्या वर्गवारीनुसार क्रम घेतला तर तो दुसऱ्या प्रकारात बसणार नाही. यामुळे ज्या क्रमाने ती सादर केली गेली त्याच क्रमाने त्यांच्याबद्दल लिहिलेले बरे. हा क्रम ठेवण्यामागे आयोजकांचासुध्दा कांही उद्देश असणारच ना !

कवयित्री वंदना विटणकर यांनी लिहिलेली आणि श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबध्द केलेली मोजकीच गाणी गाऊन मोहम्मद रफी यांनी मराठी सुगमसंगीताच्या विश्वात त्यांचा खास ठसा उमटवला आहे. बहुतेक मराठी वाद्यवृंदांच्या कार्यक्रमात त्यातले एकादे गाणे असतेच. या कार्यक्रमाची सुरुवात ‘शोधिसी मानवा राउळी मंदिरी । नांदतो देव हा आपुल्या अंतरी ।।’ या गाण्याने झाली. ‘काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल ।’ या शब्दांत संत नामदेवांनी सांगितलेले मानवतेचे तत्वज्ञान शिकवून अंतर्मुख करणारे हे गंभीर स्वरूपाचे मराठी गीत एका परभाषिक आणि परधर्मीय गायकाने गायले असेल असे वाटतच नाही.
त्यानंतर रफींच्या खास अंदाजातले नायकाच्या प्रेमिकेच्या रूपाचे कौतुक करणारे गाणे सादर झाले आणि चाळीस पन्नास वर्षांपूर्वीच्या सिनेमात असणारी रोमँटिक दृष्ये नजरेसमोर आली. नायकाने किंचित झुकून तिची वाहवा करायची आणि तिने लाजत मुरडत त्याला साद द्यायची वगैरे त्यात आले.
ऐ फूलोंकी रानी बहारोंकी मलिका । तेरा मुस्कुराना गजब हो गया ।। न होशमें तुम न होशमें हम । नजरका मिलाना गजब हो गया ।।
ऊँचे लोग या त्या काळातल्या ऑफबीट सिनेमातले चित्रगुप्त यांनी संगीतबध्द केलेले एक वेगळ्या प्रकारचे गाणे त्यानंतर आले. त्यातले उच्च प्रकारचे उर्दू शब्दप्रयोग ओळखीचे नसल्यामुळे त्यातला भाव बहुतेक लोकांपर्यंत पोचत नव्हता. फक्त सुरावलीतली मजा तेवढीच समजत होती.
जाग दिल ए दीवाना रुत आयी रसिल ए यार की ।
प्रेमगीतांच्या या मालिकेतले पुढचे गाणे जरतर करणारे पण त्याबरोबरच आशावाद दर्शवणारे होते,
गर तुम भुला न दोगे, सपने ये सच भी होंगे । हम तुम जुदा न होंगे ।।
त्यानंतरच्या गाण्यात एक खोटी खोटी प्रेमळ तक्रार करून एक लटका सल्ला (न मानण्यासाठी) दिला होता.
आवाज देके हमें तुम बुलाओ । मोहब्बतमें इतना न हमको सताओ ।।
यापुढच्या द्वंद्वगीतात एकरूप होऊन साथसाथ राहण्याचा निर्धार व्यक्त केला होता.
तेरे मेरे सपने अब एक रंग हैं । ले जहाँ भी ये राहे, हम संग हैं ।।
‘त्यां’च्या जवळ येण्यामुळे आपण सगळ्या जगापासून दूर गेल्याची भावना पुढच्या गाण्यात होती.
दो घडी वो जो पास आ बैठे । हम जमानेसे दूर जा बैठे ।।
तर प्रेमाच्या धुंदीत धुंद झालेला प्रेमिक सगळे जगच आपल्या मालकीचे करत असल्याचा दावा त्यापुढील गाण्यात केला होता. है दुनिया उसीकी जमाना उसीका । मोहब्बतमें जो भी हुवा है किसीका ।।

चित्रपट बनवण्याचे तंत्र आणि त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री पाश्चात्य देशातून आपल्याकडे आली. तिच्या सोबतीने किंवा त्याअगोदरपासून हॉलीवुडमध्ये तयार होत असलेले इंग्रजी सिनेमे भारतात प्रदर्शित होऊ लागले. त्यांची छाप भारतात तयार होणाऱ्या चित्रपटांवर पडणे साहजीक होते. इथल्या प्रेक्षकांना तो सिनेमा आपला वाटावा यासाठी कथावस्तू आणि वातावरण भारतीय ठेऊन तांत्रिक बाबतीत तिकडच्या कांही कल्पना उचलल्या जात होत्या.

चित्रपटसंगीतावर सुध्दा त्याचा प्रभाव पडलेला दिसतो. अभिजात भारतीय संगीत आणि सिनेसंगीत यात एक महत्वाचा फरक मी पहात आलो आहे. आपल्या शास्त्रीय संगीतात पेटी, सारंगी, वीणा, व्हायलिन वगैरे स्वरसाथ देणारी वाद्ये गायनाबरोबर सारखी वाजत असतात आणि गायकाने आळवलेल्या सुरांची पुनरावृत्ती त्यातून होत असते. सिनेमातल्या गाण्यात मुख्य गाणे सुरू होण्यापूर्वी आणि दोन कडव्यांच्या मध्ये त्या गाण्याशी सुसंगत पण वेगळ्या चालीवरचे वाद्यसंगीताचे तुकडे असतात. वादकांनी तर ते तुटकपणे वाजवायचे असतातच, गायकाने त्यात मधून मधून गायचे असते. एकाद्या रागाचा पध्दतशीर सलग विस्तार करत जाणे आणि तुटकतुटकपणे एकदम खालचे किंवा वरचे स्वर गळ्यातून काढणे या अगदी वेगळ्या कला आहेत. ऐकणाऱ्याला त्यातून वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. कांही कलाकारांना या दोन्ही कला साध्य होतात, पण प्रत्येकाची आपापली आवड असते, मर्यादा असतात, इतर कारणेसुध्दा असतात, त्यामुळे शास्त्रीय संगीत गाणारे गायक आणि चित्रपटांचे पार्श्वगायक असे वेगळे वर्गीकरण झालेले आपल्याला दिसते.

भारतीय संगीतातले सूर, ताल, लय आणि वेस्टर्न क्लासिकल म्यूजिकमधली मेलडी, हार्मनी आणि रिदम यांचा सुरेख मिलाफ करून त्यातून आपल्या प्रतिभेचा आविष्कार शंकर जयकिशन या जोडगोळीने कसा केला होता याचे उदाहरण देणारे एक गाणे यानंतर सादर करण्यात आले. शिवरंजनी रागाची आठवण करून देणारी सुरावली थिरकत्या ठेक्यावर गातांना त्यात भावनांचा ओलावा निर्माण करण्याची अद्भुत किमया मोहम्मद रफी यांनी या गाण्यात करून दाखवली आहे. वादकवृंदाने तर कमालच केली. मोजक्या वाद्यांमधून मोठ्या ऑर्केस्ट्राचा आभास निर्माण करून या गाण्याचे प्रिल्यूड, इंटरल्यू़ड वगैरे बहुतेक सगळे तपशील त्यांनी व्यवस्थितपणे दाखवले. ब्रम्हचारी या चित्रपटातले हे गाणे तेंव्हा तर गाजले होतेच, अजूनही ऐकतांना मजा येते. सभागृहातल्या सगळ्या प्रेक्षकांनी त्या गाण्याचा ठेका धरला होता. ते गाणे होते
दिलके झरोकेमें तुझको बिठाकर । यादोंको तेरी मै दुलहन बनाकर । रक्खूंगा मै दिलके पास । मत हो मेरी जाँ उदास ।।

या गाण्यानंतर एक हाँटिंग मेलडी सादर करण्यात आली. महल चित्रपटातील आयेगा आनेवाला या गाण्यापासून थरारनाट्य असलेल्या चित्रपटात (सस्पेन्स मूव्हीजमध्ये) लतादीदींच्या आवाजात अशा प्रकारचे एक गाणे घालून ते वेगवेगळ्या सीनमध्ये पुन्हा पुन्हा वाजवण्याची रूढीच पडली होती. मधुमती, वो कौन थी, मेरा साया, गुमनाम वगैरे त्याची अनेक उदाहरणे देता येतील. या कार्यक्रमात सादर केलेले गाणे होते, अकेले हैं, चले आओ, चले आओ ।
खूप वर्षांपूर्वी आलेल्या, मी न पाहिलेल्या, रतन नावाच्या सिनेमासाठी नौशाद यांनी स्वरबध्द केलेले आणि जोहराबाई या गायिकेने गायिलेले जुन्या अनुनासिक ढंगाचे गाणे यानंतर आले. अजूनही ते कधीतरी ऐकायला मिळते. ते होते, अँखियाँ मिलाके, जिया भरमाके, चले नही जाना, ओओओ ….. चले नही जाना।
अशी खास वेगळ्या प्रकारची गाणी झाल्यानंतर नौशाद यांनीच संगीतबध्द केलेले कोहिनूर चित्रपटातले हमीर रागातले सुप्रसिध्द गाणे प्रभंजन मराठे यांनी अप्रतिम रीतीने गाऊन दाखवले. त्यातल्या तराण्यावर तबलजीने अशी कांही साथ दिली की मुद्दाम त्याच्या तबलावादनासाठी वन्समोअरचा आग्रह धरण्यात आला.
मधुबनमें राधिका नाची रे, गिरिधरकी मुरलियाँ बाजी रे ।।
नौशाद अलींच्याच संगीतरचनेतला खास उत्तर प्रदेशातल्या लोकसंगीताचा बाज पुढील गाण्यात दिसला. त्यानुसार यावेळी तबल्याऐवजी ढोलक या त्या भागात लोकप्रिय असलेल्या तालवाद्यावर ठेका धरला होता. भांगेच्या तारेत असतांनासुध्दा आपण पू्र्णपणे शुध्दीवर असल्याचा विनोदी आव आणत आपली चाल दाखवण्याचे आव्हान देण्याचा अजब प्रकार या गाण्यात आहे.
मेरे पैरोंमें घुंघरू बँधा दो के फिर मेरी चाल देख लो ।।
त्यानंतर खास शम्मीकपूर स्टाइलचे गाणे आले. मला ते पूर्वीसुध्दा विशेष आवडले नव्हते
ये आँखें उफ् युम्मा ।
शास्त्रीय संगीत, लोकसंगीत वगैरे झाल्यानंतर एक अनोखे देशभक्तीपर गाणे झाले. स्व.मदनमोहन या गजलसम्राटाने हकीकत या चित्रपटासाठी स्वरबध्द केलेले हे आवेशपूर्ण गाणे स्वातंत्र्यदिनासारख्या प्रसंगी हमखास ऐकायला मिळते. युध्दात वीरगती प्राप्त झालेले सैनिक अखेरच्या क्षणी आपल्या देशवासियांचा निरोप घेताघेता त्यांना जे आवाहन करतात त्या प्रसंगातले कारुण्य आणि त्यांच्या मनातली देशप्रेमाची भावना याचे सुरेख मिश्रण असलेली मनाला भिडणारी शब्दरचना, ते भाव दाखवणारी स्वररचना आणि त्यात रफीसाहेबांनी आपल्या धीरगंभीर आवाजाने भरलेली जादू असे काँबिनेशन क्वचितच ऐकायला मिळते.
कर चले हम फिदा जान ओ तन साथियों । अब तुम्हारे हवाले वतन साथियों ।।
या गाण्यानंतर गाडी पुन्हा एकदा प्रेमगीतांवर आली. एक गजल सादर झाली,
मुझे दर्द ए दिलका पता न था, मुझे आप किसलिये मिल गये ।
मैं अकेला यूँ ही मजेमे था, मुझे आप किसलिये मिल गये ।।
त्यानंतर एकदम वेगळ्या मूडमधले प्यासा चित्रपटातले विनोदी आणि खटकेबाज गाणे आले. मोहम्मद रफी यांनी फक्त कथानायकांनाच आवाज दिला नव्हता, तर त्यांनी जॉनी वॉकर आदी विनोदवीरांनासुध्दा साजतील अशी अनेक गाणी गायिली आहेत त्यातले आजतागायत सर्वाधिक लोकप्रिय गाणे आहे,
सर जो तेरा चकराये, या दिल डूबा जाये, आजा प्यारे पास हमारे काहे घबराए ।।
गायकाची एवढी दमछाक झाल्यानंतर गायिकेच्या आवाजातले एक गाणे घेऊन प्रभंजन मराठे यांना थोडी विश्रांती दिली गेली. तुम कमसिन हो नादाँ हो या रफी यांनी गायिलेल्या नायकाच्या गाण्याच्या चालीवरच हे गीत सिनेमातल्या नायिकेने म्हंटले आहे.
मैं कमसिन हूँ, नादाँ हूँ, नाजुक हूँ । थाम लो मुझे मै तेरी इल्तजाँ करूँ ।।
त्यानंतर एक युगलगीत झाले.
ओ आ जा पंछी अकेला है । ओ सो जा नींदियाकी बेला है ।।
एक गायक आणि दोन गायिका यांनी एकत्र गायिलेले लोकगीताच्या ढंगातले बैजूबावरा या चित्रपटातले आणखी एक गाणे यानंतर आले, दूर कोई गाये, धुन ये सुनाये, तेरे बिन छलिया रे, बाजे ना मुरलिया रे ।। होजीहो … होहो … होहो…..
त्यानंतर पंचमदांनी (आर.डी.बर्मन यांनी) संगीतबध्द केलेली नव्या धर्तीच्या संगीताने सजलेली गाणीसुध्दा रफी यांनी कशी गायिली याची झलक दाखवण्यात आली. पुढे अशा प्रकारची गाणी किशोरकुमार यांनी गायिली असली तरी सुरुवातीला त्यातली कांही रफी यांच्या आवाजात स्वरबध्द केली गेली. याची उदाहरणे आहेत,
गुलाबी आँखें, ये जो है तेरी, शराबी ये दिल, हो गया ।।
तसेच हे मादक द्वंद्वगीत,
ओ हसीना जुल्फोंवाली जान ए जहाँ, ढूँढती है शातिर आँखे जिसका नशा । मेहफिल मेहफिल ओ शमा, फिरती हो कहाँ ।।
वो अनजाना ढूँढती हूँ, वो परवाना ढूँढती हूँ ………
यानंतर पुन्हा एकदा शंकर जयकिशन यांची मेलडी आली,
अजी रूठकर अब कहाँ जाइयेगा, जहाँ जाइयेगा हमें पाइयेगा ।।
आणि रोशन यांचे काळजाला भिडणारे सूर, दिल जो न कह सका, वोही राज ए दिल, कहनेकी रात आयी है।।
मी सुरुवातीपासून ज्या गाण्याची वाट पहात होतो ते काळीज पिळवटून टाकणारे पहाडी रागातले अजरामर गाणे अखेर आलेच. इतकी आर्तता, इतके शांत आणि सावकाशपणे आंदोलन घेत असलेले स्वर, त्यातला ठहराव वगैरे खुबी फार कमी गाण्यात ऐकायला मिळतात. त्यामुळे असे गाणे दीर्घकाळपर्यंत स्मरणात राहते. सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगे । हवा भी रुख बदल चुकी, ना जाने तुम कब आओगे ।।
कार्यक्रमाची अखेर रफीसाहेबांनी गायिलेल्या आणि अनेक लोकांच्या टॉपटेनमध्ये असलेल्या अजरामर अशा गाण्याने झाली. बैजूबावरा चित्रपटातले हे गाणे त्या काळी लोकप्रियतेच्या शिखरावर चढलेले होते. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातले माधुर्य या गाण्यातून व्यक्त झाले होते.
तू गंगाकी मौज मैं जमुना की धारा । ये हमारा तुम्हारा मिलन ये हमारा तुम्हारा ।।
श्री.प्रभंजन मराठे यांनी कितीही चांगल्या रीतीने आणि जीव तोडून ही सगळी गाणी गायिली असली तरी मोहम्मद रफी यांच्या गाण्याची पातळी त्यांनी गाठली होती असे त्यांनाही वाटले नसेल. तसे शक्य असते तर त्यांचे स्वतःचेच नांव झाले असते. पण त्यांच्या गाण्यातून रफी यांची जुनी गाणी आठवली आणि पुन-प्रत्ययाचा आनंद मिळाला. नवोदित गायिकांनी चांगला प्रयत्न केला, पण त्यांना अजून बराच पल्ला गाठायचा आहे हे जाणवत होते.

या कार्यक्रमात न घेतलेली आणखी किती तरी मोहम्मद रफी यांची गाणी अजून लोकांच्या ओठावर आहेत. त्यातली कोणती सांगू आणि कोणती वगळू ? पण मला अतीशय आवडत असलेल्या काही लोकप्रिय गाण्यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे.
मन तरपत हरीदरसन को आज, ओ दुनिया के रखवाले (बैजू बावरा)
ऐ दिल मुश्किल जीना यहाँ … ये है बॉम्बे मेरी जान (सी आई डी)
हम लाए हैं तूफ़ान से कश्ती निकाल के (जागृति)
बाबुल की दुआएँ लेती जा (नीलकमल)
बार बार दिन ये आये … हॅप्पी बर्थ डे टू यू (फर्ज)

मोहम्मद रफीसाहेबांच्या स्मृतीला आज त्यांच्या जन्मदिवसानिमित्य सलाम. दि.२४-१२-२०१८

भक्ती आणि शक्ती

BhaktiShakti

आजच्या जमान्यातले प्रसिध्द शिल्पकार श्री. मदन गर्गे यांचे दहा वर्षांपूर्वी अत्यंत दुर्दैवी अपघाती निधन झाले. त्यापूर्वीच घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीचे प्रक्षेपण ईटीव्हीच्या संवाद या कार्यक्रमात दाखवण्यात आले होते. ते ऐकून त्या वेळी मी हा लेख लिहिला होता. एक असामान्य कलाकार सामान्य माणसापेक्षा किती वेगळ्या प्रकाराने विचार करत असतो याचे प्रत्यंतर या मुलाखतीतील वाक्यावाक्यात येत होते. कै.गर्गे यांनी मुंबईच्या जे.जे. कला महाविद्यालयामध्ये शिल्पकलेचे रीतसर शिक्षण प्राप्त करून त्यात सुवर्णपदक मिळवले होते. पाश्चात्य व भारतीय अशा दोन्ही प्रकारच्या विविध परंपरागत शैलींचा तसेच आधुनिक शिल्पकलेचा अभ्यास त्यांनी केला होताच, ब्राँझ, दगड व सिमेंट या टिकाऊ माध्यमांचा कुशलतेने वापर करण्यात प्राविण्य मिळवले होते. त्यांनी घडवलेली अनेक शिल्पे गांवोगांवी उभी आहेत. आपल्या शिल्पांना ‘पुतळा’ म्हणणे त्यांना पसंत नव्हते. संपूर्ण मुलाखतीत ते त्यांचा उल्लेख शिल्प किंवा शिल्पकृती असाच करत होते. त्यांनी दोनशेवर सुरेख शिल्पे घडवली असून ती देशातच नव्हे तर परदेशातही नांवाजली गेली आहेत. पॅरिसमधील महात्मा गांधी यांचे पंधरा फूट उंचीचे शिल्प आणि पुण्याजवळ निगडी येथे उभे केलेले छत्रपती शिवाजी आणि संतसिरोमणी तुकाराम यांची भेट दाखवणारे पस्तीस फूट उंचीचे शिल्प ही शिल्पे त्यांच्या कलाविष्कारांची सर्वोच्च शिखरे दाखवतात.

या कलाकृतीबद्दल बोलतांना त्यांनी जी माहिती सांगितली त्यातून त्यांचे विलक्षण वेगळेपण दिसत होते. आपले शिल्प कशा प्रकारचे असावे याबद्दल ते कल्पनातीत खोलवर विचार करतात. त्यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी आणि संत तुकाराम हे समकालीन होते हे तर नक्कीच, पण त्यांची भेट नेमकी कधी आणि कुठे झाली याबद्दलचा ऐतिहासिक दस्तऐवज सापडला नाही. या दोन्ही महान व्यक्तींबद्दल सर्वसामान्य सुशिक्षित मराठी माणसाला जसा मनापासून आदर वाटतो आणि बरीचशी माहिती असते तशी त्यांना होतीच. त्यातही सामान्य माणसाला जेवढे डोळ्यासमोर असते तेवढे दिसते पण कलाकार नेहमी त्याच्या पलीकडे जाऊन पहाण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे कै. गर्गे यांच्या मनात या दोन्ही विभूतींच्या रेखीव प्रतिमा जास्तच खोलवर कोरलेल्या होत्या. तरीसुध्दा प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी त्यांनी इतिहासाच्या पानांची पुन्हा उजळणी केली, ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या आणि त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ते तिथली ‘व्हायब्रेशन्स’ घेऊन आले. शिल्पाचा विषय अशा प्रकारे स्वतःच्या रोमरोमात भरून घेतला आणि त्या कामात स्वतःला झोकून दिले.

संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचा प्रसंग कै. शांतारामबापूंनी तयार केलेल्या चित्रपटात मोठ्या नाट्यमय पध्दतीने रंगवला आहे. महाराजांचे हितशत्रू ही खबर त्यांच्या वैऱ्याला देतात आणि कोठलासा खान त्यांना पकडण्यासाठी त्या जागेवर अचानक सशस्त्र हल्ला करतो. त्यावेळी विठ्ठलाच्या मायेने त्याला सगळेच श्रोते हुबेहूब शिवाजीसारखे दिसू लागतात आणि त्यामुळे चक्रावून तो माघारी जातो असा चमत्कार त्या सिनेमात दाखवला आहे. कै. गर्गे यांनी असे कांही दाखवण्याचा विचारही मनात आणला नसता. बहुतेक चित्रकारांनी या प्रसंगात शिवाजी महाराजांनी आपले मस्तक संत तुकारामांच्या चरणावर ठेवल्याचे दाखवले आहे. ज्या लोकांनी हे शिल्प उभे करायचे ठरवले होते त्यांचाही असाच मानस होता, पण कै.गर्गे यांच्या मनात वेगळी कल्पना होती ती त्यांनी त्या लोकांना पटवून दिली.

या शिल्पातून फक्त संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोन महान व्यक्तीच न दाखवता त्यातून भक्ती आणि शक्ती यांचा सुरेख संगम दाखवावा अशी संकल्पना त्यांनी मांडली. वयाने संत तुकाराम शिवाजी महाराजांपेक्षा वीसबावीस वर्षांनी मोठे होते हा फरक त्यात दिसायला हवा. शिवाजी महाराजांनी तुकारामांच्या पायावर डोके ठेवले असलेल्या प्रसंगात त्यांच्या अंगातील शक्तीचे प्रदर्शन करता आले नसते. त्यामुळे ते एका वीराच्या पवित्र्यात ताठ उभे आहेत आणि फक्त त्यांनी आपली नजर खाली वळवली आहे, तसेच तुकारामांनी एक हात त्यांच्या खांद्यावर ठेऊन त्यांना शाबासकी तसेच आशिर्वाद देत दुसरा हात वर उंचावला आहे असे गर्गे यांनी दाखवले आहे. शक्ती आणि भक्ती या दोन भावना अशा प्रकारे त्यांच्या देहबोलीतून स्पष्ट होतात. दोघांच्याही भव्य प्रतिमांमधून कलाकाराचे अद्भुत कौशल्य तर दिसतेच. आजूबाजूला मांडलेल्या इतर कलाकृतीसुध्दा अतीशय देखण्या आणि चैतन्यपूर्ण आहेत.

या दोन भव्य प्रतिमांच्या बाजूला त्यांच्या अनुयायांच्या छोट्या छोट्या सुबक प्रतिमा आहेत. त्यात हातात भगवा ध्वज घेतलेले, तलवार पाजळून लढाईच्या मोहिमेवर निघालेले मावळे पुण्याच्या दिशेने एका रांगेत दाखवले आहेत तर टाळ, मृदुंग, वीणा धारण करून भजनात दंग असलेले वारकरी देहूच्या दिशेला आहेत. पराक्रम करून युध्द जिंकायला निघालेले मावळे बहिर्गामी वर्तुळाच्या (कॉन्व्हेक्स) चंद्रकोरेच्या आकारात दाखवले आहेत तर अंतर्मुख होऊन परमार्थसाधना करणारे वारकरी अंतर्गामी (कॉन्केव्ह) वक्ररेषेत उभे आहेत. इतका सूक्ष्म विचार कै. गर्गे यांच्यासारखा संवेदनशील आणि व्यासंगी कलाकारच करू जाणे. सामान्य माणूस तितका विचार करेल किंवा करणार नाही पण याचा प्रभाव त्याच्या मनावर पडतोच.

असे हे अद्भुत शिल्प समस्त पुणेकरांनी पाहिले असेलच, मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या लोकांनीही कधी तरी जुन्या पुणे मुंबई मार्गाने चिंचवड, निगडी, देहू रोड या वाटेने जातांना ते पाहिले असेल आणि क्षणभर थांबून डोळ्यात सांठवून घेतले असेल. नसेल तर पुढच्या ट्रिपमध्ये तसे जरूर करावे.