चंद्राची गाणी – भाग १ – बालगीते
कोजागरी पौर्णिमा https://anandghare2.wordpress.com/2017/10/05/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%8c%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%be/
मी एकदा कोजागरी पौर्णिमेनिमित्य होऊन गेलेले खास चंद्रगीतांचे दोन कार्यक्रम पाहिले होते. यावरून मला आठवले की या ब्लॉगच्या सुरुवातीलाच ‘तोच चंद्रमा नभात’ या नावाची एक दीर्घ मालिका मी ३३ भागात लिहिली होती. तिच्या अखेरीस ‘चंद्र’ या विषयावरील किंवा चंद्राचा उल्लेख असलेली बरीचशी गाणी मी जमवली होती. तिचा संग्रह पुन्हा उघडून पाहिला आणि त्यातली काही निवडक गाणी तसेच त्यात नसलेली पण मी ऐकलेली चांगली गाणी या ब्लॉगवर द्यायचे ठरवले.
आपल्या तान्ह्या बाळाला झोपवण्यासाठी थोपटता थोपटता त्याची आई गुणगुणते.
लिंबोणीच्या झाडामागे चन्द्र झोपला ग बाई ।
आज माझ्या पाडसाला झोप कां ग येत नाही।।
गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिऊताई ।
परसात वेलीवर झोपल्या ग जाईजुई ।
मीट पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई ।।
देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी ।
तुझे दुःख घेण्यासाठी केली पदराची झोळी ।
जगावेगळी ही ममता, जगावेगळी अंगाई ।।
रित्या पाळण्याची दोरी उरे आज माझ्या हाती ।
स्वप्न एक उधळून गेले माय लेकराची नाती ।
हुंदका गळ्याशी येता गाऊ कशी मी अंगाई ।।
आज माझ्या पाडसाला झोप कां ग येत नाही।।
मधुसूदन कालेलकर हे तसे पाहता गद्य लेखक, नाटककार, पटकथाकार वगैरे म्हणून नावाजलेले आहेत, पण बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेली सुमन कल्याणपूर यांच्या गोड आवाजातली ही अंगाई ऐकत ज्या मुली मोठ्या झाल्या त्या आता माता झाल्या आहेत आणि त्यांच्या लहानग्या मुलांना हे गाणे ऐकवत थोपटतांना मी त्यांना पाहिले आहे.
थोपटून थोपटून बाळ झोपी गेल्यावर सुध्दा आईचं लक्ष त्याच्याकडे असतंच. त्याला झोपेतच मंद मंद हंसतांना पाहून ती म्हणते,
चांद मोहरे, चांदणे झरे, झोपेतच गाली असा, हसशी का बरे ?
गगनातील नील परी, उतरुनीया भूमीवरी ।
उचलुनीया नेती तुला, उंच काय रे ?
उंच उंच गगनी तुला, काय दिसे सांग मुला ?
दिसते का हळू विमान, एक संचरे ?
बसून आत कोण हसे, कुशल कुणी तरूण पुसे ?
खचितच तेच प्राणनाथ, सांगू काय रे ?
जाग जरा नीज सोड, पापा दे मजसी गोड ।
फिरुनी जाय लंघुनीया, सात अंबरे ।।
लहान बाळाच्या कल्पनाविश्वात काय काय दडलेले असेल आणि त्यातले काय त्याच्या स्वप्नात येत असेल कोण जाणे, पण लहान मुलांच्या गोष्टीतल्या नीलपरीचा आधार घेऊन आईचे मन बाळाच्या वतीने आभाळात उंच भरारी घेते आणि तिथेही तिला तिचा प्राणनाथ दिसतो. अशी कल्पना कवीवर्य ग. दि. माडगूळकर यांनी केली आहे. याच गदिमांनी अजरामर झालेले गीतरामायण लिहिले. त्यातली श्रीरामाची आई कौसल्यामाई आपल्या तान्हुल्या रामचंद्राचे किती कौतुक करते यावर त्यांनी एक पूर्ण गीत लिहिले आहे.
सावळा गं रामचन्द्र माझ्या मांडीवर न्हातो। रक्तगंधाचा सुवास निळ्या कमळाला येतो।।
या गीतात चंद्राचा उल्लेख दोन जागी आला आहे. एका ओळीत ती माउली म्हणते,
सावळा गं रामचन्द्र रत्नमंचकी झोपतो। त्याला पाहता लाजून चन्द्र आभाळी लोपतो।।
निजलेल्या रामचंद्राला पाहून आभाळातला चंद्र लाजून ढगाआड लपून बसतो पण रामचंद्राला पहायला जेंव्हा चंद्र ढगाबाहेर येतो, तेंव्हा तो रामचंद्राच्या नजरेला पडताच त्याला इतका आवडतो की आपल्या हातात चंद्र हवा म्हणून तो हट्टच धरतो. याबद्दल कौसल्या सांगते,
सावळा गं रामचन्द्र चन्द्र नभीचा मागतो। रात जागवितो बाई सारा प्रासाद जागतो।।
बाळ बोबडे बोल बोलायला लागतं तसे आई त्याला गाणी शिकवायला लागते. गेल्या कमीतकमी तीन पिढ्या एक अत्यंत लोकप्रिय गाणं म्हणत मोठ्या झाल्या आहेत. ते आहे
चांदोबा चांदोबा भागलास कां, लिंबोणीच्या झाडामागे लपलास कां।
लिंबोणीचं झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी।
मामा मामा येऊन जा, तूप रोटी खाऊन जा।
तुपात पडली माशी, चांदोमामा राहिला उपाशी।।
या गाण्यात काय गंमत आहे कोण जाणे. पण त्याची लोकप्रियता पिढ्यान् पिढ्या टिकून आहे. कविवर्य मंगेश पाडगांवकरांनी या गाण्याला शाळकरी मुलांच्या अँगलमधून कांही आशय देण्याचा प्रयत्न केला आहे तो अशा प्रकारे
चांदोमामा चांदोमामा भागलास काय ? घरचा अभ्यास केलास काय ?
चांदोमामा चांदोमामा लपलास काय ? पुस्तक हरवून बसलास काय ?
चांदोमामा चांदोमामा रुसलास काय ? गणितात भोपळा घेतलास काय ?
एके काळी गृहपाठ न करणे, पुस्तक हरवणे, गणीतात शून्य मार्क मिळवणे वगैरे गोष्टींची मुलांनी खूप भीती वाटायची. चांदोबाच्या पळपुटेपणाच्या आणि लपून बसण्याच्या मागे यातलेच काही कारण असावे असा तर्क या गाण्यात आहे.
लहान मुलांना सगळ्यात प्रिय खाऊ म्हणजे चॉकलेट. त्याचाच बंगला बांधला तर त्याच्या आजूबाजूला कसले दृष्य असेल? त्याची कल्पना फुलवतांना मजा आणण्यासाठी चांदोबाही लागतोच.
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला । चंदेरी सोनेरी चमचमता चांगला ।।
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार । शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार ।।
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन । हेलो हेलो करायला छोटासा फोन ।।
बिस्किटांच्या गच्चीवर मोर छानदार । पेपेरमींटच्या अंगणात फूल लाल लाल ।।
यानंतर त्या बंगल्याची कल्पना फुलवतांना त्यात मजा आणण्यासाठी चांदोबाही लागतोच.
चांदीच्या झाडामागे चंदोबा रहातो । छोट्याश्या फुलाशी लपाछपी खेळतो ।।
उंच उंच झोक्याचा खेळ रंगला । मैनेचा पिंजरा वर टांगला ।।
किती किती सुंदर चॉक्लेटचा बंगला ?
कधी कधी मुलाचा सख्खा मामा त्याला हंसत खेळत बाराखडी शिकवण्यासाठी अ आ आई म म मका, मी तुशा मामा दे मला मुका ।। हे गाणं म्हणतो त्यातसुध्दा चांदोमामा पाहिजेच
प प पतंग आभाळात उडे। ढ ढ ढगात चांदोमामा दडे।।
एखादी चिमुरडी पोर एक गोरी गोरी पान आणि फुलासारखी छान वहिनी आणण्यासाठी आपल्या दादाच्या मागे लागते. या खास वहिनीला घरी कशी आणायची?
वहिनीला बसायला चांदोबाची गाडी । चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी ।
हरणांची जोडी तुडवी गुलाबाचे रान। ….. असा सगळा तिचा थाटमाट!
दुसरी एक छकुली चन्द्राला ( किंवा चन्द्रिकेला) चंदाराणी म्हणते आणि विचारते
चंदाराणी, चंदाराणी, कां ग दिसतिस थकल्यावाणी ?
शाळा ते घर घर ते शाळा, आम्हा येतो कंटाळा,
रात्रभर तू चाल चालसी, दिवसा तरी मग कोठे निजसी?
वाडा, घरकुल, घरटे नाही, आई नाही, अंगाई।
म्हणुनिच कां तू अवचित दडसी, लिंबामागे जाऊन रडसी।।
चंद्राला कोणी चंदाराणी म्हणते तर कोणी चंदाराजा म्हणत बोलावते,
चंदाराजा ये ये, चंदाराजा ये ।।
निळ्या निळ्या आभाळात, लखलखत्या चांदण्यात ।
शुभ्र रुपेरी रथात, बसुनि इथे ये ।।
शुभ्र रुप्याची गाडी, पळवी सशाची जोडी ।
दूर करुन अंधारा, उजळित नभ ये ।।
या इथे नि तुजवाचुन, व्याकूळ हो तूच जाण ।
एक दिनी मनोरथा, पुरविण्यास ये।।
आपल्या घरामध्येच गोजिरवाणे हंसरे तारे असतांना आभाळातल्या चांदण्या पहायची गरजच कुठे आहे असं विचारीत एक आई म्हणते,
घरात हंसरे तारे असता, मी पाहू कशाला नभाकडे ? असा प्रश्न विचारून ती पुढे असे सांगते.
गोकुळ येथे आनंदाचे, झरे वाहती शांतिसुखाचे ।
वैभव पाहुन मम सदनीचे ढगाआड गं चंद्र दडे ।। मी पाहू कशाला नभाकडे ?
आमच्या लहानपणी शाळेत पहिल्या इयत्तेमध्ये पहिली कविता होती
देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो ।
सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे ।
आणि शेवटी
इतुके सुंदर जग तुझे जर, किती तू सुंदर असशील ।।
आमच्या शालेय शिक्षणाची सुरुवात अशा सुंदर आणि सकारात्मक विचाराने व्हायची.
———–
चंद्राची गाणी – भाग २ – प्रेमगीते
चंद्र आणि प्रेम यांचे अतूट नाते युगायुगापासून चालत आले आहे. महाकवी कालीदासांपासून ते आजच्या नवकवींपर्यंत ज्यांनी ज्यांनी प्रेम या विषयावर साहित्यिक कृती निर्माण केल्या आहेत त्यात कुठे ना कुठे चंद्र डोकावतांना दिसतोच. चांदण्या रात्रीच्या धुंद करणाऱ्या वातावरणाचे वर्णन मराठी कवितेत विविध तऱ्हेने आले आहे.
मुख्यतः शास्त्रीय संगीताला प्राधान्य देऊन त्यातल्या गाण्यांना एकत्र गुंफण्यापुरते प्रसंग टाकून अनेक संगीत नाटके तयार करण्यात आली. त्या नाटकांमधल्या गाण्यांमध्ये शब्दांना फार जास्त महत्व नसे, किंबहुना ती नाट्यगीते एकाद्या बंदिशीसारखी अगदी लहानशी असत आणि त्यातल्या ओळी पुनःपुन्हा घोळवून गायिल्या जात तरीसुध्दा अनेक गाण्यांचे बोल स्पष्टपणे ऐकू येत नाहीत. ते शब्द आलाप तानांच्या गुंत्यांमध्ये हरवून जातात. काही सुंदर गीते मात्र याला अपवाद आहेत. अशा एका भावपूर्ण आणि सुप्रसिध्द नाट्यगीताचे बोल आहेत,
उगवला चंद्र पुनवेचा, मम हृदयी दरिया उसळला प्रीतिचा ।
दाही दिशा कशा खुलल्या, वनिवनि कुमुदिनी फुलल्या,
नववधु अधिर मनि जाहल्या, प्रणयरस हा चहुकडे वितळला स्वर्गिचा।।
चंद्रामुळे समुद्राला भरती येते त्याचबरोबर हृदयातल्या प्रीतीच्या सागरालाही येते आणि चंद्रोदयानंतर सारा निसर्गच आनंदमय होतो आणि प्रणयरसाने भारला जातो असे वर्णन या गीतात आहे.
चित्रपट या माध्यमात मात्र आणि विशेषतः मराठी चित्रपटांमध्ये अनेक भावपूर्ण गीते पहायला मिळतात आणि ऐकून ऐकून तोंडपाठ होतात. गीतकार जगदीश खेबूडकर यांनी लिहिलेले असेच एक सदाबहार गीत आहे,
पान जागे फूल जागे, भाव नयनी जागला ।
चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षिला ।।
चांदण्याचा गंध आला, पौर्णिमेच्या रात्रिला।
चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षिला ।।
स्पर्श हा रेशमी, हा शहारा बोलतो ।
सूर हा, ताल हा, जीव वेडा डोलतो ।
रातराणीच्या फुलांनी देह माझा चुंबिला ।।
चंद्र आहे साक्षिला ।।
लाजरा, बावरा, हा मुखाचा चंद्रमा ।
अंग का चोरिसी दो जीवांच्या संगमा ।
आज प्रीतीने सुखाचा मार्ग माझा शिंपिला ।।
चंद्र आहे साक्षिला ।।
चांदण्या रात्रीमधल्या अशा धुंद वातावरणाचा लाभ प्रेमिकांनी घ्यायलाच पाहिजे ना? रेडिओवरील भावसरगम नावाच्या कार्यक्रमातल्या या विषयावरील पहिल्याच गाण्याने पन्नास वर्षांपूर्वी इतिहास घडवला होता. त्या काळात या गाण्याने धमाल उडवून दिली होतीच, त्यानंतर असंख्य वेळा असंख्य कार्यक्रमात ते गायिले जाऊनही आणि ऐकूनही त्याची गोडी अजून अवीट राहिली आहे. मराठी भावगीतामध्ये हा मैलाचा दगड ठरला. कवी मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेल्या या गाण्याचे बोल, श्रीनिवास खळे यांनी लावलेली चाल आणि अरुण दाते व सुधा मलहोत्रा यांचे आवाज यामध्ये सर्वात जास्त सरस काय आहे ते सांगता येणार नाही. प्रेम या भावनेचा इतका तरल आविष्कार आणखी कुठे पहायला मिळणार नाही. दुसरे तिसरे काही नको, चंदेरी रातीत फक्त एकमेकांच्या जवळ असणे एवढेच या गीतातील प्रेमिकांना हवे आहे. हे प्रेमी युगल म्हणते,
शुक्रतारा मंद वारा, चांदणे पाण्यातूनी ।
चंद्र आहे स्वप्न वाहे, धुंद या गाण्यातूनी ।
आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा ।
तू अशी जवळी रहा ॥ १ ॥
मी कशी शब्दांत सांगू, भावना माझ्या तुला?
तू तुझ्या समजून घे रे, लाजणाऱ्या या फुला ।
अंतरीचा गंध माझ्या, आज तू पवना वहा ।
तू असा जवळी रहा ॥ २ ॥
लाजऱ्या माझ्या फुला रे, गंध हा बिलगे जिवा ।
अंतरीच्या स्पंदनाने, अन् थरारे ही हवा ।
भारलेल्या या स्वरांनी, भारलेला जन्म हा ।
तू अशी जवळी रहा ॥ ३ ॥
शोधिले स्वप्नात मी, ते ये करी जागेपणी ।
दाटूनी आलास तू रे, आज माझ्या लोचनी ।
वाकला फ़ांदीपरी, आता फुलांनी जीव हा ।
तू असा जवळी रहा ॥ ४ ॥
हेच कवी, संगीतकार आणि गायकगायिका यांचे आकाशवाणीच्या त्याच मालिकेतले त्या काळातले दुसरे अप्रतिम गाणे आहे. त्यातले प्रेमी युगुलही चांदण्या रात्री एकत्र आले आहे आणि हातात हात घेऊन बसले असतांना त्यांना रोजचाच चंद्र वेगळा आणि नवा नवा वाटू लागतो.
हात तुझा हातात अन् धुंद ही हवा ।
रोजचाच चंद्र आज भासतो नवा नवा ।।ध्रु।।
रोजचेच हे वारे, रोजचेच तारे ।
भासते परि नवीन विश्व आज सारे ।
ही किमया स्पर्शाची भारिते जिवा ।।१।।
या हळव्या पाण्यावर मोहरल्या छाया ।
मोहरले हृदय तसे मोहरली काया ।
चांदण्यात थरथरतो मधुर गारवा ।।२।।
जन्म जन्म दुर्मिळ हा क्षण असला येतो ।
स्वप्नांच्या वाटेने चांदण्यात नेतो ।
बिलगताच जाईचा उमलतो थवा ।।३।।
…… आणि त्या सुखाचा उपभोग घेता घेता..
क्षणभर मिटले डोळे, सुख न मला साहे ।
विरघळून चंद्र आज रक्तातून वाहे ।
आज फुले प्राणातून केशरी दिवा ।।४।।
रोजचाच चंद्र आज भासतो नवा नवा ।।
फक्त हातात हात घेऊन एकमेकांच्या जवळ राहण्यात सर्वच प्रेमिकांचे समाधान होत नाही. ते एक एक पाऊल पुढे जाण्यासाठी आतुर झालेले असतात. अशी एक अधीर झालेली प्रेमिका म्हणते,
शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा झुलतो झुला ।
थंड या हवेत, घेऊन कवेत, साजणा झुलव मला ।
साजणा रे मोहना रे ऐक ना रे, तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी,
सगे सोयरे मी सांडिले पाटी ।।
मोहन मधुर राती, भराला येऊ दे प्रीती ।
प्रीतीची हीच ना रीती, कशाला कुणाची भीती ।
झाडामागे चांद हा वरती आला, ये ना ये ना जीव आतुर झाला।
मी भुलावे, स्वैर व्हावे, गीत गावे ।।
साजणाने तिला प्रतिसाद दिल्यावर मग तर काय विचारता? आता ही चांदरात मनात केवढा कल्लोळ माजवणार आहे अशा विचाराने ती म्हणते,
चांदण्यात फिरताना माझा धरलास हात ।
सखया रे आवर ही सावर ही चांदरात ॥धृ.॥
निजलेल्या गावातून आले मी एकटीच ।
दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच ।
या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात ॥१॥
सांग कशी तुजविणाच पार करु पुनवपूर ।
तुज वारा छळवादी अन् हे तारे फितूर ।
श्वास तुझा मालकंस, स्पर्श तुझा पारिजात ॥२॥
जाऊ चल परत गडे, जागले न घर अजून ।
पण माझी तुळस तिथे गेली हिरमसून ।
तुझिया नयनात चंद्र, माझ्या हृदयी प्रभात ॥३॥
तर एका नाट्यगीतामधला नायक असे उद्गार काढतो,
चांद माझा हा हासरा, नाचवी कसा प्रेमसागरा, प्रीतलहरी ये भरा।।
गुण कनकाचा नवकोंदणी गे, शोभसी सखे तू हिरा ।।
प्रेमाचे रंग अनेक आहेत. एकमेकांच्या प्रेमाची खात्री पटल्यानंतर ते सहजपणे समजू नये यासाठी कधी कधी लपवाछपवीचे खेळ सुरू होतात, पण ते शक्य असते का? मग..
लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा छपेल का ?
प्रीत लपवुनी लपेल का ?
जवळ मने पण दूर शरीरे, नयन लाजरे, चेहरे हसरे ।
लपविलेस तू जाणून सारे, रंग गालिचा छपेल का ?
क्षणात हसणे, क्षणात रुसणे, उन्हात पाउस, पुढे चांदणे
हे प्रणयाचे देणे-घेणे, घडल्यावाचुन चुकेल का ?
….. या खेळात सुध्दा चंद्र असा येतो …
पुरे बहाणे गंभिर होणे, चोरा, तुझिया मनी चांदणे ।
चोरहि जाणे, चंद्रहि जाणे, केली चोरी छपेल का ?
प्रीत लपवुनी लपेल कां?
चंद्राच्या साक्षीने सगळे होत असते, तो सुध्दा लपून छपून ते पहात असतो, शिवाय प्रेमिकांच्या मनातही चांदणे फुललेले अलते, त्यामुळे ते गुपित उघड होणारच. अशा अवस्थेत कोणी सावधगिरीचा इशारा देते.
हसले मनी चांदणे, जपुनि टाक पाउल साजणी, नादतील पैंजणे ।।
बोचतील ग, फुलं जाइची तुझी कोमला काय ।
चांदण्यातही सौंदर्याने पोळतील ना पाय ?
पानांच्या जाळीत लपोनी चंद्र पाहतो गडे ।
सांग कुणाच्या भेटीसाठी जीव सारखा उडे ।
कुजबुजुनी कानात सांगतो मधुप, नको ग रुसू ।
लाजलाजर्या कळ्याफुलांना खुद्कन् आलं हसू ।
हो जरा, बघा की वरी, कळू द्या तरी, उमटु द्या वाणी ।
का आढेवेढे उगाच, सांगा, काय लाभले राणी ?
का ग अशा पाठीस लागता मिळुनी सार्या जणी ?
आज लाभला मला माझिया सर्वस्वाचा धनी ।।
किति, किति ग भाग्याची, भलतीच ओढ ही कामसुंदराची ।
नव्हे ग श्यामसुंदराची ।।
नव्या संसाराची चित्रे कल्पनेमध्ये रंगवतांना एक युवती म्हणते,
लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची ।।ध्रु।।
सौख्यात वाढलेली, प्रेमात नाहलेली ।
कळिकळि फुलून ही चढते, मंडपी वेल मायेची ।।१।।
संपताच भातुकली, चिमुकली ती बाहुली ।
आली वयात खुदुखुदू हसते, होऊनी नवरी लग्नाची ।।२।।
हे माहेर , सासर ते, ही काशी, रामेश्वर ते ।
उजळिते कळस दो घरचे, चंद्रिका पूर्ण चंद्राची ।।३।।
गीतकार पी. सावळाराम, संगीतकार वसंत प्रभू आणि गायिका लता मंगेशकर या त्रिकूटाने अनेक अतीशय गोड गाणी दिली आहेत. त्यांच्या या अजरामर झालेल्या गीतातसुध्दा शेवटी चंद्र आलाच. ल या अक्षराने सुरू होणारी मराठी गाणी कमी आहेत, पण हे अक्षर गाण्याच्या शेवटी खूप वेळा येते. त्यामुळे भेंड्यांच्या कोणत्याही खेळात हे गाणे हटकून येतेच.
रोजचाच चंद्र प्रेमिकांना नवा नवा वाटतो हे वर आलेलेच आहे. दुसरा एक प्रेमी आपल्या सखीला असेच सांगतो आणि अर्थातच तीही त्याला सुरेख प्रतिसाद देते.
नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी ।
मनी नवीन भावना, नवेच स्वप्न लोचनी ।।
अनादि चंद्र अंबरी, अनादि धुंद यामिनी ।
यौवनात तू नवी मदीय प्रीत-स्वामिनी ।
घर न प्रीतिकुंज हा, बैस ये सुहासिनी।।
दूर बाल्य राहिले, दूर राहिल्या सखी ।
बोलण्या कुणासवे सूर दाटले मुखी ।
अननुभूत माधुरी आज गीत गायनी ।।
अनादि चंद्र अंबरी, अनादि धुंद यामिनी ।
यौवनात तू नवी मदीय प्रीत-स्वामिनी ।
घर न प्रीतकुंज हा बैस ये सुहासिनी ।।
कोण बाइ बोलले वाणि ही प्रियंवदा ।
या मनात नांदते तुझीच प्रीतसंपदा ।
कशास वेगळेपणा जवळ ये विलासिनी ।।
मुंबईचा जावई या चित्रपटातली लग्न होऊन सासरी आलेली एक लाजरी बुजरी नववधु आधी लहानशा घरातल्या नातेवाईकांच्या बुजबुजाटाने बावरून गेलेली असते. त्या जोडप्याला एकांत मिळावा म्हणून एकदा घरातली इतर सारी मंडळी बाहेर जातात. ऑफीसमधून घरी येणार असलेल्या पतीची वाट पहात असतांना ती विचार करते,
कशी करू स्वागता, एकांताचा आरंभ कैसा, असते कशी सांगता?
कशी हसू मी, कैसी बोलू ?
किती गतीने कैसी चालू ?
धीटपणाने मिठी घालु का, कवळू तुज नाथा ?
फुलते कळि की फुलवी वारा ?
चंद्र हसवि की हसवी तारा ?
कुठले आधी कुठले नंतर, येई ना सांगता ।।
कुणी न पुढती कुणी न पाठी ।
घरात आहे मीच एकटी ।
प्रथमदर्शनी बोलायाचा, भाव तरी कोणता ?
चंद्राचा उल्लेख असलेली अशी किती प्रेमगीते सांगावीत?
. . . . . . . . . . . . . . . . . . .
चंद्राची गाणी – भाग ३ – विरहगीते
चंद्र आणि प्रेम यांच्यात किती जवळचा संबंध आहे हे मागील भागात दिलेल्या गीतांवरून पाहिलेच आहे. चंद्राच्या आभाळातल्या अस्तित्वानेच जशा समुद्रात लाटा उठतात तशाच प्रेमिकांच्या मनातही उठतात. ते एकमेकांच्या सहवासात असतील तर त्यांच्या मनातल्या भावनांचा आवेग जास्तच वाढतो. पण असे चांदण्या रात्रीच्या धुंदीमध्ये एकत्र येऊन न्हाऊन निघणे सर्वच प्रेमिकांच्या नशीबात नसते. त्यातले अनेक दुर्दैवी जीव विरहव्यथा भोगत असतात. त्यातलीच कुणी आर्जवे करते (किंवा करतो) की या पौर्णिमेच्या रात्री एकदा तरी येऊन मला भेटून जा, कधीपासून माझ्या मनात साठून राहिलेल्या मृदु भावना इतक्या प्रबळ आहेत की त्या वाळवंटातही फुलबाग फुलवतील, अंधालाही दिसतील आणि सुखवतील. गीतकार शांताराम नांदगावकर यांनी रचलेल्या या गीतामधील भावना कवीमनाच्या संगीतकार यशवंत देव यांनी अचूक ओळखून सुमन कल्याणपूर यांच्या मधुर आवाजातून रसिक श्रोत्यांपर्यंत या गाण्यातून पोचवल्या आहेत. या गाण्यात विरहव्यथेपेक्षा आर्जव आणि आशा यांना जास्त महत्व आहे.
रात्र आहे पौर्णिमेची, तू जरा येऊन जा ।
जाणिवा थकल्या जिवांच्या एकदा ऐकून जा ।।
निथळला तो भाव सारा वितळल्या चंद्रातुनी ।
मिसळल्या मृदु भावनाही झोपल्या पानांतुनी ।
जागती नेत्रांतली ही पाखरे पाहून जा ।।१।।
पाखरे पाहून जा, जी वाढली पंखाविना ।
सूर कंठातील त्यांच्या जाहला आता जुना ।
त्या पुराण्या गीतिकेचा अर्थ तू ऐकून जा ।।२।।
अर्थ तू ऐकून जा, फुलवील जो वैराणही ।
रंग तो पाहून जा, जो तोषवी अंधासही ।
ओंजळीच्या पाकळ्यांचा स्पर्श तू घेऊन जा ।।३।।
उंबरठा या चित्रपटात एका महिलासुधारगृहात रहात असलेली एक मदनिका तिथल्या नीरस वातावरणात अस्वस्थ होत असते. तेथे यायच्या आधी ती पुरुषांच्या सहवासाला चटावलेली असते. चांदण्या रात्री त्या कामिनीला हा मदनावेग अनावर झाला आहे. तिच्याच शब्दात सांगायचे तर,
चांद मातला मातला, त्याला कशी आवरू ?
अंगी वणवा चेतला, मला कशी सांवरू ?
अशी पुनवेची निशा, चढे चांदण्याची नशा,
गेल्या हरवून दिशा, झाले खुळे पाखरू ।।
आला समुद्र ही रंगा, त्याचा धिटाईचा दंगा,
वेड्या लहरींचा पिंगा, बाई झाला की सुरू ।।
गोड गारव्याचा वारा, देह थरारला सारा,
लाख चुंबनांचा मारा, चांद लागला करू ।।
याची प्रेमपिशी दिठी, लावी चंदनाची उटी,
झाली अनावर मिठी, कुठे धीर मी धरू ?
चांद अंगणी गगनी, चांद नांदतो भुवनी,
चांद अमृताचा मनी, बाई लागला झरू ।।
कवी वसंत बापट, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या सर्व सोज्ज्वळ स्वभावाच्या कलाकारांनी मिळून हे वेगळ्या प्रकारचे अप्रतिम मादक गीत आपल्याला दिले आहे.
आधा है चंद्रमा रात आधी, रह न जाये तेरी मेरी बात आधी, मुलाकात आधी हे हिंदी गाणे एके काळी खूप गाजले होते आणि अजून सर्वांच्या स्मरणात राहिले आहे. अशाच अर्थाचे एक मराठी गीत कवी मधुकर जोशी यांनी लिहिले आणि कवीमनाचे संगीतकार यशवंत देव यांनी कृष्णा कल्ले या गुणी गायिकेकडून गाऊन घेतले.
कुणा जोडप्याची भेट झाली आहे पण अर्धेमुर्धे बोलणे होईपर्यंत पुन्हा त्यांच्या विरहाचा क्षण आला आहे. त्यांची व्यथा ते सांगतात,
चंद्र अर्धा राहिला, रात्र अर्धी राहिली,
भेट अर्धी, गीत अर्धे, प्रीत अर्धी राहिली ।।
मोकळे बोलू कसे मी, शब्द ओठी थांबले,
लाजऱ्या डोळ्यात माझ्या चित्र अर्धे रेखिले,
ओठ अर्धे विलगले, अर्ध उकले पाकळी ।।
बिलगुनी रमल्या तरूंशी पेंगलेल्या साउल्या,
तो निळा एकांत तेथे भावना भारावल्या,
धुंद झाल्या दशदिशा, रात्रही ओलावली ।।
वाकले आकाश खाली दूरच्या क्षितिजावरी,
चांदणे चुंबीत वारा झोपला वेलीवरी,
भेट घ्याया सृष्टि ही अर्ध झुकली, वाकली ।।
कधी कधी असे होते की प्रियकर आपल्या प्रियेला भेटलेला आहे, पण तो बिचारा इतका थकलेला भागलेला असतो की ती जवळ असतांनासुध्दा तो चक्क झोपून जातो, चांदण्या रात्रीचा आनंद पूर्णपणे उपभोगण्याचं त्राणच त्याच्यात नसतं. या अवस्थेत वियोग नसतांनासुध्दा तिचे मन विरहावस्थेच्या जवळ असते. तेंव्हा अतृप्तावस्थेतील ती म्हणते,
तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास कां रे?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे?
अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला ।
अजुन मी विझले कुठे रे? हाय ! तू विझलास का रे?
सांग, ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू ?
उमलते अंगांग माझे, आणि तू मिटलास का रे?
बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गार वारा ।
रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे?
उसळती हुदयात माझ्या अमृताच्या धुंद लाटा ।
तू किनार्यासारखा पण कोरडा उरलास का रे?
कवीवर्य स्व. सुरेश भट त्यांच्या कवितांमधून आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातात. त्यातली मध्यवर्ती कल्पनाच अफलातून असते आणि त्यातून हवे तेवढे निरनिराळे अर्थ काढता येतील अशी गूढ पण कुशल शब्दरचना असते. वर वर दिसणाऱ्या अर्थाहून वेगळा आणि अधिक भेदक अर्थ त्यात दडलेला आहे असे कोणा विद्वानाने सांगितले होते. अकाली निधन पावलेल्या पतीच्या पत्नीचा आकांत त्याला त्यात दिसला. कोणाला यात पुरुष आणि प्रकृती किंवा जीव आणि आत्मा यांची अवेळी झालेली ताटातूट सापडली.
संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर सुरेश भटांचे चांगले मित्र होतेच आणि त्यांच्या कवितांचा अर्थ समजून घेऊन त्याला तितकीच अफलातून चाल लावत असत. या गाण्यातला भाव पाहता त्यांनी हे गाणे आशा भोसले यांच्याकडून गाऊन घेतले आणि या दोघांनी मिळून या गाण्यात किती आर्ततेचे भाव आणले आहेत याला तोड नाही.
मधुचंद्र चित्रपटातल्या बिचाऱ्या नायक नायिकांचे नशीबच विचित्र असते. त्या दोघांना त्यांच्या लग्नानंतर मधुचंद्राची रात्रसुध्दा तुरुंगवासामध्ये वेगवेगळी घालवावी लागते. बिच्चारे म्हणतात,
मधू इथे अन चंद्र तिथे, झुरतो अंधारात, अजब ही मधुचंद्राची रात।
एक चंद्र अन् अगणित तारे, दो हृदयांवर किती पहारे?
हवी झोपडी, मिळे कोठडी, सरकारी खर्चात, अजब ही मधुचंद्राची रात।।
माहेराला सोडुन फसले, नशिबी आले सासर असले ।
ताटातुटीने सुरेख झाली, संसारा सुरवात ।
अजब ही मधुचंद्राची रात ।।
किती पाहुणे किती निमंत्रित, जमले सारे एका पंक्तीत ।
अशी निघाली लग्नानंतर, वार्यावरची वरात ।
वार्यावरची वरात, अजब ही मधुचंद्राची रात ।।
अशा बिकट पण विनोदी प्रसंगाला साजेसे गीत ग. दि. माडगूळकर यांनी लिहिले. संगीतकार एन्. दत्ता हे मुख्यतः हिंदी चित्रपटांना संगीत देत असत. त्यातले काही खूप गाजलेही होते. या मराठी चित्रपटासाठी हे द्वंद गीत आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायिले.
वरील गाण्यातला चंद्र दोघांना उदासच बनवतो. तरुण आहे या गाण्यात त्याची जादू पुरेशी ठरत नाही, तशीच प्रेमाचा भर ओसरून गेला किंवा काही कारणाने त्यांच्यात कटुता आली तरी होते. काही जोडप्यांच्या बाबतीत असं होतं की प्रेमाचा पहिला बहर ओसरून गेल्यावर वास्तवाचे कांटेकुटे बोचू लागतात आणि व्यथित अंतःकरणाने तो म्हणतो,
तोच चंद्रमा नभात, तीच चैत्रयामिनी,
एकांती मजसमीप तीच तूही कामिनी ।।
नीरवता ती तशीच, धुंद तेच चांदणे ।
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे ।
जाईचा कुंज तोच, तीच गंधमोहिनी ।।
सारे जरी ते तसेच, धुंदी आज ती कुठे ?
मी ही तोच तीच तू ही, प्रीति आज ती कुठे ?
ती न आर्तता उरात, स्वप्न ते न लोचनी ।।
त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा ।
वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा ।
गीत ये न ते जुळून भंगल्या सुरांतुनी ।।
कवयित्री शान्ताबाई शेळके आणि संगीतकार व गायक सुधीर फडके यांचे हे गीत म्हणजे भावगीतांच्या क्षेत्रातला एक मैलाचा दगड ठरले किंवा ते त्यातले एक उत्तुंग असे शिखर आहे असेही म्हणता येईल.
प्रत्येकाचे प्रेम सफल होतेच असे नाही. त्यात अनेक अडचणी येतात. काही वेळा त्यातून मार्ग काढणे अशक्यच असते. अशा अपरिहार्य अशा प्राप्त परिस्थितीपुढे नमते घेऊन कुणाकुणाला प्रेम वगैरे विसरून जावेच लागते. अशी एक अभागिनी म्हणते,
चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा ।
मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा ।।
आणिले धागे तुझे तू मीहि माझे आणिले ।
गुंफिला जो गोफ त्याचा पीळ तू विसरून जा ।।
मी दिली वचने तुला अन् वाहिल्या शपथा खुळ्या ।
शब्द केवळ ते तयांचा अर्थ तू विसरून जा ।।
प्रीतिचे हितगूज ते, कुजबुज ती, रुसवेहि ते ।
ते हसू अन् आंसवे ती, आज तू विसरून जा ।।
चंद्र ज्याला साक्ष होता, जे फुलांनी पाहिले ।
रेखिले प्राणांत जे मी तेच तू विसरुन जा ।।
कवयित्री शान्ता शेळके यांच्याच या गाण्यातला चंद्र साक्षीला होता, पण तो कसली मदत करू शकणार ? वसंत पवार यांनी रचलेल्या चालीवर माणिक वर्मा यांनी ही काकुळतीची विनंती किती प्रभावीपणे केली आहे ?
चंद्र किंवा चांदणे यांचा ओझरता उल्लेख तर अनेक गीतांमध्ये येतो. कुणाच्या मनात पूर्वीच्या गोड आठवणी येतात. त्या आपल्या येतात आणि जातात आणि कधी कधी ते क्षण पुन्हा अनुभवायची आशाही त्यांना चंद्र दाखवतो.
चंद्र कोवळा पहिला वहिला, झाडामागे उभा राहिला,
जरा लाजुनी, जाय उजळुनी, काळोखाच्या राती,
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती ।।
किंवा
अजून फिक्कट चंद्राखाली, माझी आशा तरळत आहे,
गीतामध्ये गरळ झोकुनी अजून वारा बरळत आहे ।।
अजून त्या झुडुपांच्या मागे सदाफुली दोघांना हसते ।
अजून अपुल्या आठवणींनी शेवंती लजवंती होते ।।
————–
चंद्राची गाणी – भाग ४ – इतर गीते
निसर्गातून सगळ्या चांगल्या गोष्टी वेचून घेण्याच्या इच्छेने एक प्रेमिका चंद्रिकेकडे प्रीतीचे वरदान मागते. चंद्राला यावेळी चंद्रिका असे संबोधून ती तिला आपली मैत्रिण बनवते. यासाठी पौर्णिमेचा पूर्ण चंद्र कामाचा नाही, द्वितीयेची नाजुक कौरच हवी.
दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी, रानहरिणी दे गडे भीती तुझी ।।
मोहगंधा पारिजाता रे सख्या, हांसशी कोमेजतां रीती तुझी ।।
रे कळंका छेदितां तुज जीवनी, सुस्वरे जन भारिते गीती तुझी ।।
सोशितोशी झीज कैसी चंदना, अपकारिता उपकार ही नीती तुझी ।।
या गाण्यामधील सर्व उदाहरणे ही त्यागाची आहेत. पारिजाताचे फूल, वेळूचे (बांबूचे) झाड, चंदनाचे खोड हे सर्व स्वतः नष्ट होऊन त्यातून दुसऱ्यांना सुखी करतात. सुरेख दिसणारी चंद्राची कोर आणि भित्री हरिणी यांना त्यांच्या पंक्तीत का बसवले आहे ते कवीवर्य राजा बढेच जाणोत. संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आणि त्यांच्या दीदी लताताई यांनी जनसंमोहिनी रागामधील मधुर सुरावटीतून श्रोत्यांवर अजब मोहिनी घातली आहे.
पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राची उपमा सुंदर चेहेऱ्याला नेहमी दिली जातेच तर द्वितीया आणि तृतीयेची चंद्रिका अत्यंत आकर्षक असते. अंगाने थोड्या भरलेल्या चवतीच्या चंद्रकोरीचा सुध्दा केवढा झोक?
कशी झोकांत चालली कोळ्याची पोर ?
जशी चवतीच्या चंद्राची कोर ।।
फेसाळ दर्याचं पाणी खारं ।
पिसाट पिऊनी तुफान वारं ।
उरात हिरव्या भरलं हो सारं ।
भरतीच्या ज्वानीला त्याहून जोर ।।१।।
टाकून टाकशील किती रं जाळी ?
मेघाची सावली कुणाला घावली ?
वाऱ्यानं अजूनी पाठ नाही शिवली ।
वाटेला बांग दिली हिच्यासमोर ।।२।।
केसाची खूणगाठ चाचपून पाहिली ।
फुलांची वेणी नखऱ्यानं माळली ।
कुणाला ठाव रं कुणावर भाळली ।
प्रीतीचा चोर तिला राजाहून थोर ।।३।।
चवतीच्या चंद्रासारखे देखणे रूप मिळालेल्या पोरीने ते अधिक खुलून दिसावे यासाठी थोडा साजश्रुंगार केला कारण राजापेक्षासुध्दा जास्त महत्वाचा असा तिच्या प्रीतीचा चोर तिला भेटणार असावा. कोळ्याच्या देखण्या मुलीचे वर्णन करतांना कविवर्य गदिमांनी ग्रामीण भागातील जीवनाचे सुंदर दर्शन या गीतात घडवले आहे. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमधील चित्रपटांना मधुर संगीत देऊन ज्यांनी अमर केले अशा वसंत देसाई यांनी बांधलेल्या स्वररचनेला आपल्या गोड आवाजातल्या ठसक्याने आशा भोसले यांनी अधिकच बहार आणली आहे.
प्रेम, सौंदर्य वगैरे दर्शवणारी चन्द्राची इतकी रूपे पाहिली. आता थोडी वेगळी रूपे पाहू. यमुनेच्या पलीकडे रहाणाऱ्या कुब्जेला पहाटेच्या वेळी श्रीकृष्ण भेटायला गेला त्या प्रसंगाचे वर्णन करतांना कवयित्री इंदिरा संत म्हणतात,
अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ ।
अशा अवेळी पैलतीरावर, आज घुमे का पांवा मंजुळ ।।
मावळतीवर चंद्र केशरी, पहाटवारा भंवती भणभण ।
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती, तिथेच टाकुन अपुले तनमन ।।
विश्वचि अवघे ओठा लावुन, कुब्जा प्याली तो मुरलीरव ।
डोळ्यामधले थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव ।।
अशा अवेळी पैलतीरावर आज घुमे कां पांवा मंजुळ ।
अजून नाही जागी राधा अजून नाही जागे गोकुळ ।।
एरवी नुकताच उगवलेला ‘चंद्र पुनवेचा’ नेहमी कौतुकाचा असतो, पण मधुर गळ्याची गायिका सुमन कल्याणपूर आणि संगीतकार दशरथ पुजारी या द्वयीने दिलेल्या या भावगीतात मावळतीवर आलेल्या केशरी चंद्राच्या उल्लेखाने पहाटेची वेळ दाखवली आहे.
संत जनाबाई विठ्ठलाची इतकी लाडकी होती की तिला घरकामात मदत करण्यासाठी तो स्वतः तिच्या घरात येत असे. गीतकार शांताबाई जोशी यांनी लिहिलेल्या एका जुन्या गाण्याची चाल एका काळातले भावगीतांचे सम्राट गजानन वाटवे यांनी बांधली होती आणि माणिक वर्मा यांनी ते गायिले होते. जनाबाईची श्रध्दा पाहून तिचा कामाचा भार हलका करण्यासाठी प्रत्यक्ष पांडुरंग तिला दळण दळायला मदत करतो तेंव्हा ती हर्षभरित होऊन म्हणते,
आभाळीचा चांद माझ्या आज अंगणात ।
पंढरीचा रावा दळी जनीच्या घरात ।।
किती करी काम देवा, घेई रे विसावा ।
हेच ऐक एवढे रे, मान किती घ्यावा ।
घनश्याम विठ्ठला रे, पंढरीच्या राया ।
धावुनिया भक्तांपाठी, वृथा शिणवाया ।
जरा थांबू दे रे देवा, कोमल दे हात ।।
किती माझ्यासंगे, गाउनिया गाणी ।
भागलास आता, तू रे चक्रपाणी ।
कटी पितांबर शोभे, गळा वैजयंतीमाळा ।
असा हरी गरीबांच्या, झोपडीत झोपी गेला ।
सावळीच गोजिरी ही, मूर्ती सदा नयनात ।।
सूर्य आणि चंद्र पृथ्वीवर प्रकाशकिरणांचा वर्षाव करतात. त्या उजेडात उजळून निघालेल्या पृथ्वीकडे आकाशातले देवच सूर्य व चंद्र या डोळ्यांनी पहात असतात अशी कल्पना आहे. मृत्यू पावलेले जीव स्वर्गात म्हणजे देवलोकात गेल्यानंतर ते सुध्दा असेच पहात असतील अशी कल्पना कवी पी. सावळा राम यांनी केली आहे. आपल्या लाडक्या कन्येचे आयुष्य सुखात जावे, तिला कशाची ददात पडू नये यासाठी तिला चांगले शिक्षण, कला कौशल्य वगैरेंमध्ये निपुण करून एका तऱ्हेने तिच्यासाठी कल्पवृक्ष लावून गेलेल्या बाबांची आठवण काढून त्यांची यशस्विनी झालेली लाडकी लेक म्हणते,
सूर्य चंद्र तुमचे डोळे, दुरूनीच हो बघतात ।
कमी नाही आता कांही, कृपादृष्टीची बरसात ।
पांच बोटे अमृताची, पंचप्राण तुमचे त्यात ।
पाठीवरी फिरवा हात, या हो बाबा एकच वेळा ।।
या गाण्यातले भाव लता मंगेशकरांच्या व्यक्तीगत आयुष्यालासुध्दा लागू पडत असल्यामुळे त्यांनी अत्यंत समरसतेने गाऊन हे गीत अजरामर केले आहे. संगीतकार वसंत प्रभू यांनी या गीताला दिलेली चालही अप्रतिम अशी आहेच.
पी.सावळाराम, वसंत प्रभू आणि लतादीदी यांनी जी अप्रतिम गीते मराठी रसिकांना दिली आहेत त्यातलेच दुसरे एक गीत आहे.
श्रीरामा, घनश्यामा, बघशिल कधी तू रे, तुझी लवांकुश बाळे ।
वनवासाच्या घरात माझ्या, अरुण चंद्र हे सवे जन्मता ।
विरह प्रीतीचे दुःखही माझे, हंसते रघुनाथा ।
विश्वाची मी मंगल माता, तुझी लाडकी सीता ।
तुझ्याविना रे आनंदाला गालबोट लागले ।।
‘चंदा है तू मेरा सूरज है तू’ अशा शब्दात सगळ्या माता आपल्या मुलांचे कोतुक करत असतात. सूर्य आणि चंद्र ही तेज आणि सौंदर्य यांची प्रतीके आहेत. वाल्मिकी मुनींच्या आश्रमात आपल्या मुलांना वाढवत असतांना सीतामाई वर दिलेले गाणे म्हणते अशी कल्पना आहे.
पुण्यवान लोक मरणानंतर स्वर्गाला जातात. तेंव्हा चंद्र तारे यासारखे आकाशस्थ देव त्यांचे स्वागत करतात. देशकार्यासाठी धारातीर्थी पडलेल्या मुलाचा पिता आपला शोक आवरून म्हणतो,
पोचशी तू दिव्यलोकी सूर्यमंडळ भेदुनी ।
चंद्र तारे धन्य तुजला आरती ओवाळुनी ।
गौरवाचा ग्रंथ लाभे जीवनी तव भारता ।।
झुंजता रणभूवरी तू, अमर होशी रे सुता ।
भाग्य माझे थोर म्हणुनी जाहलो तव मी पिता ।।
सूर्य हा सर्वात जास्त प्रकाशमान आहेच, चंद्र हा त्याच्या खालोखाल तेजस्वी दिसतो. पण हे दोघेही साध्या डोळ्यांना दिसणारा प्रकाश देऊन अंधःकार दूर करतात. सद्गुरूच्या कृपेने मन उजळून निघते. ज्ञानाचा हा प्रकाश इतका प्रखर असतो की तो सूर्यचंद्रांनासुध्दा लाजवतो. ओंकारस्वरूप समर्थ सद्गुरूंना नमन करतांना संत एकनाथ म्हणतात,
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश, त्यापुढे उदास चंद्र रवि ।
रवि, शशि, अग्नि, नेणति ज्या रूपा, स्वयंप्रकाशरूपा नेणे वेद ।।
ओंकारस्वरूपा सद्गुरूसमर्था, अनाथांच्या नाथा तुज नमो ।।
विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेले संत गोरा कुंभार आळवणी करतात,
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर ।
चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर ।।
बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले ।
वृध्दपणी देवा आता, दिसे पैलतीर ।।
जन्म मरण नको आता, नको येरझार ।
नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडिवार ।।
चराचरापार न्याहो लागला उशीर ।
पांडुरंग पांडुरंग मन करा थोर ।।
गीतकार अशोकजी परांजपे यांनी लिहिलेल्या या नाट्यगीताला संगीतकार जितेंद्र अभिषेकी यांनी दिलेली चाल इतकी सुरेख आहे की गायनाच्या अनेक मैफलींची सांगता या भैरवीने केली जाते.
ज्ञानेश्वरी ग्रंथाचे शेवटी पसायदान मागतांना संत ज्ञानदेव विनंति करतात,
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वाही सदा सज्जन । सोयरे होतु ।।
जगातल्या सर्व लोकांचे प्रत्यक्ष सूर्य चंद्राबरोबर नाते जुळावे, ते सुध्दा काळिमा नसलेला चंद्र आणि दाहक नसलेला सूर्य यांच्याबरोबर, असे मागणे ज्ञानेश्वरांनी केले आहे. सर्व लोकांनी सज्जन आणि तेजस्वी व्हावे पण त्याबरोबर निष्कलंक रहावे आणि तापदायक होऊ नये असा संदेश या पसायदानांमध्ये दिलेला आहे.
. . . . . . . (समाप्त)
नवी भर दि. १९-१०-२०२१
चंद्रावरील लोकप्रिय हिंदी गाणी
1 आधा है चंद्रमा
2 चांद मेरा दिल चांदनी हो
3 ये चांद सा रोशन चेहरा
4 ये रात भीगी भीगी
5 तू मेरा चांद मै तेरी चाँदनी
6 चांद जाने कहा को गया
7 चांद को क्या मालूम
8 चांद फिर निकला मगर
9 चौधवी का चांद हो
10 धीरे धीरे चल चांद गगनमें
11 एक रात में दो दो चांद खिले
12 ना ये चांद होगा
13 ओ रात के मुसाफिर चंदा
14 तुझे सूरज कहूं या चंदा
15 वो चांद खिला वो तारे हँसे
16 ये रात ये चांदनी फिर कहाँ
17 खोया खोया चांद
आज कोजागिरी पौर्णिमा आहे.
योगायोग की काय कुणास ठाऊक, मी ही छतावर आणि ती ही आली होती.
असे वाटले चंद्र छतावर उतरला होता, ती माझ्यासमोर आली आणि माझ्या लक्षात आले…
“तुम आये तो आया मुझे याद
गली में आज चाँद निकला।
जाने कितने दिनों के बाद
गली में आज चाँद निकला!”
चंद्र खळखळून हसला. मग त्याला मी विचारले,
“मैंने पूछा चाँद से के देखा है कहीं, मेरे यार सा हसीं?
चाँद ने कहा, चाँदनी की कसम, नहीं, नहीं, नहीं।”
“रुक जा रात ठहर जा रे चंदा!”असं म्हणत मी चंद्राला थांबण्यासाठी आर्जव केली. त्याला आकाशात रेंगाळत चालण्याची मनधरणी केली..
“धीरे धीरे चल चाँद गगन में
कहीं ढल ना जाये रात,
टूट ना जायें सपने
धीरे धीरे चल, चाँद गगन में!”
कदाचित, चंद्राचा सुद्धा कोजागिरी पौर्णिमेलाच वाढदिवस असावा. नाहीतर शरदाच एवढ सुंदर चांदणं दिसलं नसतं. इतकी वर्ष झाली पण अजूनही..
“तोच चंद्रमा नभात आहे अन् तिच ‘अश्विन’ यामिनी आहे, आणि मज समेत तिच ती कामिनी आहे”.
अरे! पण हे काय बघतोय मी?..
“एक रात में दो दो चांद खिले,
एक घुँघट में एक बदरीमें”
ती लाजली अन् मी बावरून गेलो.
“चाँद सा मुखड़ा क्यों शरमाया
आँख मिली और दिल घबराया”
नक्कीच काल रात्री काय घडले म्हणुन उद्या सारे चर्चा करतील,.
“कल चौदहवी की रात थी,
शब्बभर रहा चर्चा तेरा।
कुछ ने कहा ये चाँद है,
कुछ ने कहा चेहरा तेरा।।”
यामध्ये माझी काही चुक आहे का? मी विचारतो,
“ओ रात के मुसाफिर,
चंदा ज़रा बता दे
मेरा कसूर क्या है,
तू फ़ैसला सुना दे!!”
परंतु काही असो आजतरी…..
“वो चाँद खिला, वो तारे हँसे
ये रात अजब मतवाली है;
समझने वाले समझ गये है,
ना समझे, न समझे वो अनाड़ी हैं !”
कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना संगीतमय शुभेच्छा !!
Filed under: काव्यरचना, चंद्रमा | 3 Comments »