
विठ्ठल किती गावा ? (भाग ४)
आपल्याकडे गोरा रंग हे सौंदर्याचे एक महत्वाचे लक्षण समजले जाते, किंबहुना बहुतेक वेळा कोणाचेही सौंदर्य ठरवतांना पन्नास टक्क्यांहून जास्त मार्क रंगाला आणि नाक, डोळे, ओठ, गाल वगैरेंना उरलेले मार्क विभागून दिले जातात असे कधीकधी वाटते. आपल्या मुलासाठी मुलगी पहातांना मुलगा जर गोरा असेल तर त्याला अनुरूप म्हणून गोरी मुलगी हवीच आणि मुलगा काळासावळा असला तरी पुढे त्यांना गोरी मुले व्हावीत असे म्हणून त्याचे आईवडीलसुध्दा गोरीच मुलगी पसंत करतात. यामुळे कृत्रिम गोरेपणा देण्यासाठी अंगाला लावायच्या क्रीम्सच्या जाहिरातींचा सारखा भडिमार होत असतो आणि त्या बाजारात खपतातसुध्दा. गोरेपणाचे एवढे स्तोम माजलेले असले तरी भक्तांचा अत्यंत प्रिय असा विठ्ठल मात्र काळा सावळाच आहे. पंढरपुरातल्या देवळातली विठोबाची मूर्ती काळ्या दगडामधून बनवलेली आहेच, गावोगावी असलेल्या विठ्ठलाच्या मंदिरांमध्येही त्या बहुधा काळ्या रंगाच्याच दिसतात. संतांपासून ते आजकालच्या गीतकारांपर्यंत सर्वांनी एकमुखाने ‘या सावळ्या तनूचे’ भरपूर गुणगान केले आहे.
त्याचे सावळे सुंदर रूप सदोदित आपल्या हृदयात राहू दे आणि त्याचे गोड नामस्मरण घडत राहू दे एवढीच आपली एकमेव इच्छा आहे आणि तिची पूर्तता आपण जन्मोजन्मी मागितली आहे, असे संत तुकाराम महाराजांनी खाली दिलेल्या अभंगात सांगितले आहे. पांडुरंगासारखा दयाळू कुठेही शोधून सापडणार नाही अशी त्याची स्तुती करून आपले एवढेसे मागणे तो सहजगत्या देऊन टाकेल असी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
सावळें सुंदर रूप मनोहर ।
राहो निरंतर हृदयीं माझे ॥१॥
आणिक कांही इच्छा, आम्हां नाहीं चाड ।
तुझें नाम गोड, पांडुरंगा ॥२॥
जन्मोजन्मीं ऐसें, मागितलें तुज ।
आम्हांसी सहज, द्यावें आतां ॥३॥
तुका म्हणे तुज, ऐसे दयाळ ।
धुंडितां सकळ, नाहीं आम्हां ॥४॥
स्व.श्रीनिवास खळे यांनी बांधलेल्या गोड चालीवर पं.भीमसेन जोशी यांनी हा सुंदर भजन गायिले आहे.
https://www.youtube.com/watch?v=S21sHLDyCF8
माझ्या लहानपणी खूप गाजलेल्या आधुनिक भक्तीगीतांमध्ये सुध्दा सावळ्या विठ्ठलाच्या अनुपम रूपाचे आणि त्याचे दर्शन करताच देहभान हरपून गेल्याच्या अनुभवाचे वर्णन केले आहे. त्याने आपल्यावर कृपा करावी, आपला उध्दार करावा अशी प्रार्थना केली आहे. श्यामलवर्णी विठ्ठलाच्या रूपाचे आणि गुणांचे वर्णन करून असा लाखात एक पति मिळाल्याबद्दल रखुमाईचे भाग्य किती थोर आहे हे तिलाच उद्देशून तिसऱ्या गाण्यात सांगितले आहे. ही अतीशय गोड आणि अर्थपूर्ण गाणी अनुक्रमे कवी रा.ना.पवार, कवी सुधांशु आणि कवयित्री शांताबाई जोशी यांनी लिहिली असली तरी स्व.दशरथ पूजारी यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली सुमन कल्याणपूर यांनीच ती तीनही गीते गायिली आहेत.
सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले ।
विसरूनी गेले देहभान ।।ध्रु.।।
गोजिरे हे रूप पाहुनिया डोळां ।
दाटला उमाळा अंतरि माझ्या ।
तुकयाचा भाव पाहुनी निःसंग ।
तारिले अभंग तूच देवा ।।१।।
जगी कितीकांना तारिलेस देवा ।
स्वीकारी ही सेवा आता माझी ।
कृपाकटाक्षाचे पाजवी अमृत ।
ठेव शिरी हात पांडुरंगा ।।२।।
कवि रा.ना.पवार, सुमन कल्याणपूर
देव माझा विठू सावळा। माळ त्याची माझिया गळा ।।ध्रु.।।
विठु राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी ।
भीमेच्या काठी डुले, भक्तिचा मळा ।।१।।
साजिरे रुप सुंदर, कटि वसे पितांबर।
कंठात तुळशीचे हार. कस्तुरी टीळा ।।२।।
भजनात विठू डोलतो, किर्तनी विठू नाचतो
रंगूनी जाई पाहूनी भक्ताचा लळा ।।३।।
कवि सुधांशु , गायिका सुमन कल्याणपूर
https://www.youtube.com/watch?v=pbVXc5Z7zCA
लाखात लाभले भाग्य तुला ग बाई ।
विटेवरच्या विठ्ठलाची झालिस रखुमाई ।।ध्रु.।।
मेघासम जो हसरा श्यामल ।
चंद्राहुनि तो अधिकहि शीतल ।
नाम जयाचे मुखात येता ।
रूप दिसे ग ठायी ठायी ।।१।।
भक्तांचा जो असे आसरा ।
या विश्वाचा हरी मोहरा ।
क्षणात इकडे क्षणात तिकडे ।
हाकेला ग धाव घेई ।।२।।
कवयित्री शांताबाई जोशी, गायिका सुमन कल्याणपूर
https://www.youtube.com/watch?v=0-AVvTppRhw
स्वरसम्राज्ञी लतादीदींनी गायिलेले गीतकार पी.सावळाराम यांचे एक गाणे माझ्या लहानपणी म्हणजे आकाशवाणीच्या जमान्यात खूप लोकप्रिय होते. त्यातही विठ्ठलाच्या सावळ्या आणि दिव्य अशा रूपाचे वर्णन केले आहे. या गाण्यातली भक्ती संत मीराबाईने केली होती तशी मधुरा भक्ती आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी राधेचे उदाहरण दिले आहे. शेवटच्या कडव्यात संत जनाबाईचे उदाहरण देऊन त्या भक्तीमधले आध्यात्मही दाखवले आहे.
विठ्ठला, समचरण तुझे धरिते ।
रूप सावळे दिव्य आगळे अंतर्यामी भरते ।।ध्रु.।।
नेत्रकमल तव नित फुललेले ।
प्रेममरंदे किती भरलेले ।
तव गुण-गुंजी घालीत रुंजी ।
मानस-भ्रमरी फिरते ।।१।।
अरुण चंद्र हे जिथे उगवती ।
प्रसन्न तव त्या अधरावरती ।
होऊन राधा माझी प्रीती ।
अमृतमंथन करिते ।।२।।
जनी लाडकी नामयाची ।
गुंफुन माला प्राणफुलांची ।
अर्पुन कंठी मुक्तीसाठी ।
अविरत दासी झुरते ।।३।।
कवि पी.सावळाराम, गायिका लता मंगेशकर
https://www.youtube.com/watch?v=kg4AODDkqFg
स्व,माणिक वर्मा यांच्या गोड आवाजातले खाली दिलेले गाणेसुध्दा माझ्या लहानपणी खूप लोकप्रिय होते. त्यातही विठ्ठलाच्या सावळ्या आणि दिव्य अशा रूपाचे वर्णन केले आहे. या गाण्यातली भक्तीसुध्दा थोडीशी मधुरा भक्ती वाटते.
विठ्ठला रे, तुझे नामी, रंगले मी रंगले मी ।
विठ्ठला रे, रूप तुझे साठविते अंतर्यामी ।।ध्रु।।
तुझ्या कीर्तनाचा गंध, करितसे जीव धुंद ।
पंढरीचा हा प्रेमानंद, भोगिते मी अंतर्यामी ।।१।।
तुझी सावळीशी कांती, पाडी मदनाची भ्रांती ।
ध्यान तुझे लावियले, सुंदराचा तूच स्वामी ।।२।।
तुझ्या भजनी रंगता, न उरे काम धाम चिंता ।
रुक्मिणीच्या रे सखया कांता, मोहरते मी रोमरोमी ।।३।।
माणिक वर्मा
दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमाराला विठ्ठलाचे अभंग आणि भक्तीगीते यांचे सुरेल असे कार्यक्रम आयोजित केले जातात. बहुतेक वेळा त्यातल्या एकाद्या कार्यक्रमाला मी हजेरी लावत असे. याचे मुख्य कारण म्हणजे मला ते अभंग, ती गाणी ऐकायला आवडतात. मला ती का आवडतात हे एक गूढ आहे. विठोबाचे नाव उच्चारल्याने आणि त्याचे दर्शन घेतल्याने अतीव आनंद होतो, देहभान हरपून जाते वगैरे सुरस वर्णने संतमंडळींनी केली आहेतच, माडगूळकर आणि खेबूडकरांसारख्या आधुनिक गीतकारांनीही केली आहेत. तसा थोडा फार अनुभव आपल्यालाही येतो असे सांगणारी माणसे आपल्याला भेटतात, देवळांमध्ये दर्शनाला आलेल्या काही भाविक लोकांच्या चेहेऱ्यांवर ते भाव उमटलेले दिसतात, पण मला स्वतःला मात्र कधी असा उत्कट अनुभव आला नाही. कुठल्याही देवाचे नाव घेताच गोड मिठाई खाल्ल्याचा भास झाला नाही किंवा त्याच्याकडे पहात असतांना आजूबाजूला काय चालले आहे याची जाणीवही राहू नये अशी उन्मन अवस्था झाली नाही. देवाचे नुसते नाव जिभेवर घेतले किंवा त्याचे चित्र डोळ्यांनी पाहिले की पापाच्या राशी जळून जातील आणि पुण्याचे डोंगर उभे राहतील हे ही मला कधी पटले नाही. पण असे असले तरी भजन, अभंग, भक्तीगीते वगैरे गाणी ऐकतांना मला खूप चांगले वाटते आणि मी त्यात इतके समरस होऊन ते गायन ऐकतो की क्वचित कधी तिथल्या श्रोत्यातला एकादा मुलगा किंवा मुलगी जाता जाता माझ्याही पाया पडून जाते.
एका वर्षी मी आषाढी एकादशीच्या सुमाराला पुण्याला असतांना तिथे सुद्धा एक चांगला कार्यक्रम पाहिला होता आणि त्याबद्दल या ब्लॉगवर लिहिलेही होते. पुढच्या वर्षी एकादशीच्या दहा बारा दिवसांपूर्वीच त्यानिमित्याने वाशीला पहिला सांगीतिक कार्यक्रम होऊन गेला. त्या वेळी सादर केली गेलेली गाणी ऐकता ऐकता त्या अनुरोधाने मला आणखी काही प्रसिध्द गाणी आठवत गेली. तेंव्हा त्यांचेच एक संकलन करायचे ठरवले. मराठी भाषेत अशी असंख्य गीते आणि अभंग आहेत, त्यातली माझ्या माहितीतली आणि आवडती अशी काही लोकप्रिय गाणी मी या लेखमालिकेसाठी निवडली.
‘विठ्ठल किती गावा ?’ असे या लेखाचे शीर्षक ठेवले असल्यामुळे ज्या गीतांमध्ये विठोबाच्या गायनभक्तीचा उल्लेख आहे अशी गाणी आणि अभंग पहिल्या भागात निवडले. यात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि स्व.माणिक वर्मा यांनी गायिलेली भक्तीगीते होती. संत नामदेवांनी आणि संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले अभंग दुसऱ्या भागात घेतले होते. संत नामदेवांच्या अभंगांमधले तीन विठ्ठलाच्या दर्शनासंबंधी आणि तीन त्याच्या नावाच्या उच्चारावर लिहिलेले होते. सगुण आणि निर्गुण अशा विठ्ठलाच्या दोन्ही प्रकारच्या रूपांमधून मिळणाऱ्या अवर्णनीय आनंदाचे वर्णन ज्ञानदेवांनी केले आहे. संत एकनाथ, संत कान्होपात्रा, संत चोखामेळा आणि त्यांची पत्नी संत सोयराबाई यांचे अभंग तिसऱ्या भागात घेतले होते आणि विठ्ठलाला मातेच्या जागी मानून त्याला विठू माउली, विठाबाई वगैरे नावांनी संबोधन करून लिहिलेले अभंग आणि गीते सुद्धा याच भागात घेतली होती. विठ्ठलाच्या सावळ्या पण मनोहर अशा रूपाचे वर्णन करणारे अभंग आणि गीते आणि निरनिराळ्या वैशिष्ट्यपूर्ण प्रकारांची उरलेली गीते या चौथ्या भागात एकत्र करून मी ही मालिका संपवत आहे.
संतांनी विठोबाला ‘माउली’ असे म्हंटले आहे, अर्थातच ही संतमंडळी त्याची आवडती ‘लेकरे’ झाली. अशा या लेकुरवाळ्या विठ्ठलाचे वर्णन खाली दिलेल्या अभंगात केले आहे. त्यात संत जनाबाईंनी हे वर्णन केले असल्यामुळे त्यांच्या काळामधले निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताबाई, गोरा कुंभार, चोखा मेळा, जीवा, बंका आणि नामदेव यांचे उल्लेख या अभंगात आहेत. संत एकनाथ आणि संत तुकाराम हे त्यानंतरच्या शतकांमध्ये होऊन गेले. या अभंगाच्या शेवटी ‘जनी म्हणे’ असे लिहिले असले तरी ‘नामयाची जनी’ अशी त्यांची नेहेमीसारखी सही नाही. कदाचित “संत जनाबाईंनी असा विचार केला असेल” अशी कल्पना करून हा अभंग आणखी कोणी तरी लिहिला असेल.
विठु माझा लेकुरवाळा । संगे गोपाळांचा मेळा ।।
निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी ।।१।।
पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताबाई सुंदर ।।२।।
गोराकुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी ।।३।।
बंका कडेवरी, नामा करांगुली धरी ।।४।।
जनी म्हणे गोपाळा, करी भक्तांचा सोहळा ।।५।।
अनुराधा पौडवाल
संत नामदेव महाराज विठ्ठलाचे लाडके भक्त होते. त्यांची विठ्ठलाशी इतकी जवळीक होती की त्याचे गुणगान करणे, दर्शन करणे एवढ्यावरच ते थांबले नाहीत, त्याच्याशी एकेरीवर येऊन (खोटे खोटे) भांडलेसुध्दा. असेच थोडेसे उद्दामपणाचे वाटणारे गा-हाणे त्यांनी खाली दिलेल्या अभंगात केले आहे. त्यांनी या अभंगात विठ्ठलाला जवळ जवळ जाबच विचारला आहे.
पंढरी निवासा सख्या पांडुरंगा ।
करी अंग संगा, भक्ताचिया ॥१॥
भक्त कैवारीया होसी नारायणा ।
बोलता वचना, काय लाज ॥२॥
मागे बहुतांचे फेडियले ऋण ।
आम्हासाठी कोण, आली धाड ॥३॥
वारंवार तुज लाज नाही देवा ।
बोल रे केशवा, म्हणे नामा ॥४॥
पं.भीमसेन जोशी
कवीवर्य ग.दि.माडगूळकरांनी चित्रपटांसाठी लिहिलेल्या काही गीतांमध्ये संतांच्या रचनांमधला पूर्वापार भाव सुंदर रीत्या आणला आहे. सकाळी उठल्यानंतर भूपाळी गाऊन देवाची प्रार्थना करून त्यालाही जागवायचे अशी परंपरा आहे. ‘उठा उठा हो गजमुख’ यासारख्या पारंपारिक रचना आणि ‘घनःशायामसुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला’ यासारख्या ‘अमर भूपाळ्या’ प्रसिध्द आहेत. विठ्ठलाला जाग आणण्यासाठी गदिमांनी लिहिलेली भूपाळी खाली दिली आहे.
प्रभातसमयो पातला, आता जाग बा विठ्ठला ।।ध्रु.।।
दारी तव नामाचा चालला गजरू ।
देव-देवांगना गाती नारद-तुंबरू ।
दिंड्या-पताकांचा मेळा, तुझिया अंगणि थाटला ।।१।।
दिठी दिठी लागली तुझिया श्रीमुखकमलावरी ।
श्रवणिमुखी रंगली श्रीधरा, नामाची माधुरी ।
प्राणांची आरती, काकडा नयनी चेतविला ।।२।।
अजित परब https://www.youtube.com/watch?v=KPNzbc–aL0
स्व.ग.दि.माडगूळकरांनीच लिहिलेले एक अप्रतिम गीत अजरामर झालेले आहे. हे अत्यंत भावपूर्ण आणि अर्थपूर्ण गीत मला इतके आवडले की या एका गीतातल्या शब्दरचनेच्या मागे दडलेला अर्थ समजावून सांगण्यासाठी मी एक स्वतंत्र लेखमाला लिहिली होती. एक कुंभार आणि त्याने बनवलेली गाडगीमडकी यांच्या रूपकामधून त्यांनी परमेश्वर आणि मनुष्यप्राणी, आत्मा आणि व्यक्तीमत्व यांचे चित्रण या गीतात केले आहे.
फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार ।
विठ्ठला, तू वेडा कुंभार ।।ध्रु.।।
माती, पाणी, उजेड, वारा, तूच मिसळसी सर्व पसारा ।
आभाळच मग ये आकारा ।
तुझ्या घटांच्या उतरंडीला, नसे अंत, ना पार ।।१।।
घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे ।
तुझ्याविना ते कोणा नकळे ।
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार ।।२।।
तूच घडविसी, तूच फोडिसी, कुरवाळिसि तू, तूच ताडीसी ।
न कळे यातुन काय जोडीसी ।
देसी डोळे परि निर्मिसी तयांपुढे अंधार ।।३।।
चित्रपट प्रपंच, गायक आणि संगीत सुधीर फडके
https://www.youtube.com/watch?v=EeNd0JJbM-U
स्व.वसंत प्रभू यांचे संगीत दिग्दर्शन आणि कवी पी.सावळाराम यांची शब्दरचना यांच्या संगमामधून अत्यंत अवीट अशा गोडीची अनेक भावगीते मराठी भाषिक रसिकांना मिळाली आहेत. त्यात काही गीते विठ्ठलरखुमाईंच्या संबंधी आहेत, पण त्यात सामाजिक आशय, मानवता वगैरे विषयांना वाचा फोडली आहे. परंपरागत समजुतीप्रमाणे टाळ कुटून भजन न करता आणि देवदर्शनासाठी पंढरीची वारी न करता, आपले रोजचे जीवन मंगलमय ठेवल्यानेसुध्दा देव प्रसन्न होतो असा भाव खाली दिलेल्या पहिल्या गाण्यात आहे.
विठ्ठल तो आला, आला, मला भेटण्याला ।
मला भेटण्याला आला, मला भेटण्याला ।।ध्रु.।।
तुळशी-माळ घालुनि गळा, कधी नाही कुटले टाळ ।
पंढरीला नाही गेले, चुकूनिया एक वेळ ।
देव्हार्यात माझे देव. ज्यांनी केला प्रतिपाळ ।
चरणांची त्यांच्या धूळ, रोज लावी कपाळाला ।।१।।
सत्य वाच माझी होती, वाचली न गाथा पोथी ।
घाली पाणी तुळशीला, आगळीच माझी भक्ती ।
शिकवण मनाची ती, बंधुभाव सर्वांभूती ।
विसरून धर्म जाती, देई घास भुकेल्याला ।।२।।
लता मगेशकर
हे गाणे परंपरागत प्रथांना सरळ सरळ धक्का देणारे असल्यामुळे ते ऐकून लहान मुलांच्या मनांवर ‘वाईट संस्कार’ होतील म्हणून “त्यांना ते ऐकू देता कामा नये” असा विचार करणारे काही वडीलधारी लोक माझ्या लहानपणी होते. पी.सावळाराम आणि वसंत प्रभू याच जोडीने आणलेल्या खाली दिलेल्या गाण्यात तर त्यांच्या मते कहर झाला होता. “पंढरपूर सोडून विठ्ठलाने निघून जावे” असा आग्रह खुद्द रखुमाईच करते असे या गाण्यात म्हंटले आहे. पण गंमत म्हणजे यातल्या कशाचाच काही अर्थ समजून न घेता त्या निमित्याने ‘विठ्ठल’ हे नाव कानावर पडते म्हणून हेसुध्दा ‘देवाचे गाणे’ आहे असे समजणारेही काही लोक त्या काळात होते.
पंढरीनाथा झडकरी आता, पंढरी सोडून चला ।
विनविते रखुमाई विठ्ठला ।।ध्रु.।।
ज्ञानदेवे रचिला पाया, कळस झळके वरि तुकयाचा ।
याच मंदिरी आलो आपण प्रपंच करण्या भक्तजनांचा ।
भक्त थोर ते गेले निघुनी, गेला महिमा तव नामाचा ।
विक्रय चाले देवपणाचा, रहायचे मग इथे कशाला ।।१।।
धरणे धरुनी भेटीसाठी, पायरीला हरिजन मेळा ।
भाविक भोंदु पूजक म्हणती, केवळ आमुचा देव उरला ।
कलंक अपुल्या महानतेला, बघवेना हो रखुमाईला ।
यायचे तर लवकर बोला, ना तर द्या हो निरोप मजला ।।२।।
आशा भोसले
गेले अनेक दिवस पायपीट करून पुढे पुढे जात असलेल्या भक्तजनांच्या सगळ्या दिंड्या आज पंढरपूरला पोचल्या असतील. भक्तजनांचा इतका मोठा मेळा दर्शनाला येत आहे हे पाहून विठ्ठलाने आणि रखुमाईनेही पंढरपूरामध्येच आपला मुक्काम युगे अठ्ठावीस ठेवला असणार. पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे चंद्रभागेचे वाळवंट संकुचित झालेले असले तरी सगळे भक्तजन मिळेल तेवढ्या जागेत झेंडा रोवून हरिनामाचा गजर करत राहतील. याचे वर्णन करणारे एक गाणे मी लहानपणी शिकलो होतो ते असे होते.
विठूचा, गजर हरिनामाचा, झेंडा रोविला ।
वाळवंटी, चंद्रभागेच्या काठी, डाव मांडिला ॥
याच विषयावरचे भारुडाच्या अंगाने जाणारे एक वेगळे गाणे आता उपलब्ध आहे ते असे आहे.
या विठूचा गजर हरीनामाचा झेंडा रोविला ।
या संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला ॥१॥
कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण ।
नांगर धरिला सत्वाचा बैल मन पवनाचा ॥२॥ झेंडा रोविला ।
उखळण प्रेमाची काढिली, स्वस्थ बसुनी सद्गुरूजवळी ।
प्याला घेतला ज्ञानाचा, तोच अमृताचा ॥३॥ झेंडा रोविला ।
पचतत्वांची गोफण, क्रोध पाखरे जाण ।
धोंडा घेतला ज्ञानाचा करीतसे जागरण ।
केशवदास म्हणे संतांचा मेळा गोपाळांचा ॥४॥ झेंडा रोविला ।
https://www.youtube.com/watch?v=wk00gJeEy9s
उद्याच्या आषाढी एकादशीला क्षेत्र पंढरपूर इथे जमलेल्या असंख्य भाविकांना इथूनच नमन करून आणि त्यांच्या गजराचा आनंद टेलिव्हिजनवरून पहात ही मालिका आवरती घेत आहे.
. . . . . . . . . . . . . . . .. . (समाप्त)
<—————- मागील भाग ३
Filed under: धार्मिक, विठ्ठल, विवेचन | 1 Comment »