सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रसार

 

माणसांच्या मनात विचार येतात, त्यांना कल्पना सुचतात, अनुभव आणि ज्ञान यांच्या कसोट्यांवर त्यांची पारख होते, विवेक व संयम यांच्या गाळणीतून गाळून घेतल्यानंतर त्यातले इतरांना सांगण्याजोगे असे विचार व्यक्त केले जातात, त्या कल्पना मांडल्या जातात. मनातले हे व्यवहार आपल्या नकळत चालले असतात. भाषेवर चांगले प्रभुत्व, आपले विचार सुसंगतपणे मांडण्याचे कौशल्य, छाप पाडणारे व्यक्तिमत्व आणि वाक्चातुर्य हे गुण अंगी असले तर मनातल्या कल्पना शब्दातून स्पष्टपणे व्यक्त करण्यासाठी त्या गुणांचा चांगला उपयोग होतो, मनात आलेले नवे विचार, नव्या कल्पना प्रभावीपणे मांडल्या जाऊ शकतात. समाजामधील रूढ समजुतींना त्यातून धक्का बसण्याची शक्यता असली तर ते वेगळे विचार व्यक्त करण्याचे धैर्य लागते. लोकमान्य टिळकांसारख्या अलौकिक व्यक्तींमध्ये हे सगळे गुण एकवटले होते, तसेच त्यांच्यासमोर असलेले उद्दिष्ट स्पष्ट होते आणि ते गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची त्यांची तयारी होती, टीका किंवा विरोधाने विचलित न होता आपल्या भूमिकेवर ठामपणे उभे राहण्यासाठी लागणारे मनोधैर्य ही त्यांच्या अंगी होते. यामुळे ते असे नवे विचार समाजापुढे मांडून सामाजिक परिवर्तन घडवून आणू शकले.

कोणत्याही नव्या कल्पनेवर त्या ऐकणाऱ्या लोकांच्या अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येतात. पहिली म्हणजे खूप लोकांकडून तिचे उत्साहाने स्वागत होते. त्यांच्यातल्या ज्यांना ती कल्पना पटलेली आणि आवडलेली असते, ते लोक तिचा पुढे पाठपुरावा करतात, तिला वास्तवात आणण्याच्या कामात सहभागी होतात, त्यात जमेल तेवढी आपली भर टाकतात. अशा लोकांचा नव्या कार्यात हातभार लागतो. पण त्यातल्या इतर अनेक जणांना नव्याची नवलाईच तेवढी प्रिय असते. ती संपली किंवा आणखी एकादी वेगळी कल्पना पुढे आली की त्यांचा उत्साह ओसरतो, मग ते लोक दुसऱ्या नव्या कल्पनेच्या मागे धावतात. अशा लोकांचा पाठिंबा फसवा आणि तात्पुरता असतो. त्यामुळे अवसानघात होतो. त्यांच्यावर विसंबून राहिल्यास ते काम बिघडते किंवा खोळंबून राहते.

काही लोकांना टिंगल, टवाळी, चेष्टा, मस्करी यात खूप गोडी असते. प्रस्थापित गोष्टींच्या तुलनेने नव्या विचारांची टर उडवणे सोपे आणि सुरक्षित असते. असे लोक त्यातील कमकुवत दुवे, त्याबद्दलचे गैरसमज वगैरेंना यथेच्छ झोडून घेतात. त्यात त्यांना गंमत वाटतेच, इतरांनाही ते ऐकतांना मजा वाटते. त्यामुळे कार्यकर्ता नाउमेद झाला तर तो आपले काम सोडून देतो आणि त्याला प्रत्युत्तर देत बसला तर त्यातच त्याचा वेळ आणि श्रम खर्च होतात. त्यामुळेही कार्यातली प्रगती मंद होते.

काही लोकांना विरोध करण्याचीच आवड असते. विशेषतः रूढी प्रिय असणाऱ्या लोकांना कोणताही बदल नको असतो. त्यांना बदलामधील अनिश्चिततेचे भय वाटते. ज्या लोकांचे हितसंबंध आधीच्या व्यवस्थेत गुंतलेले असतात त्यांचे त्यातील बदलामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. असे लोक सरळ सरळ विरोधात उभे राहतात किंवा प्रच्छन्नपणे अडथळे आणतात. ते बलिष्ठ असल्यास नव्या विचारानुसार काम होऊ देत नाहीत किंवा चालू झालेले काम बंद पाडू शकतात. अशा वेळी शक्ती किंवा युक्तीचा वापर करून त्यांच्यावर मात करावी लागते.

अशा प्रकारे बहुतेक सगळ्या नव्या कल्पनांना उत्साह, उपहास, विरोध आणि त्यानंतर स्वीकृती या अवस्थांमधून जावे लागते. त्यात काही दिवस, महिने किंवा कदाचित काही वर्षे जातात. पण ती कल्पना मुळात चांगली आणि उपयुक्त असेल तर ती पहिल्या तीन अवस्थांमध्ये तग धरून राहते आणि अखेर स्वीकारली जाते. त्यानंतर ती खूप फैलावते आणि दीर्घ काळ टिकून राहते. नवी वैद्यकीय उपचारपध्दती, शिक्षणाची नवी पध्दत, विज्ञानातले नवे सिध्दांत किंवा नवे तंत्रज्ञान अशा निरनिराळ्या प्रयोगांमध्ये असेच अनुभव येतात, पंचवीस तीस वर्षांपूर्वी संगणकाचे आगमन झाले तेंव्हाचा इतिहास आपण पाहिला आहेच. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातसुध्दा असे अनुभव येतात. एवढेच काय, घरात आणलेल्या एकाद्या नव्या वस्तूचेसुध्दा कोणाकडून उत्साहाने स्वागत होते, तर कोणी त्याला नावे ठेवतात, कोणी त्यातल्या उणीवा शोधतात, तर कोणाला त्यात धोके दिसतात. पण ते उपकरण खरोखर चांगले असले तर अखेर सगळे त्याचा उपयोग करू लागतात आणि तसे नसले तर ते अडगळीच्या खोलीत जाऊन धूळ खात पडते.

सार्वजनिक गणेशोत्सवाचा जो उपक्रम श्री. भाऊसाहेब रंगारी आणि लोकमान्य टिळकांनी १८९२-९३ साली सुरू केला त्याच्या संदर्भातसुध्दा आपल्याला या चार प्रतिक्रिया दिसतात. त्या वेळी बाळ गंगाधर टिळक अजून ‘लोकमान्य’ झाले नव्हते. झुंजार वृत्तपत्रकार अशी त्यांची ख्याती झालेली होती आणि पुण्यामधील शिक्षणसंस्था, सभा, संमेलने वगैरेंशी त्यांचा निकटचा संबंध असल्यामुळे त्यांची खास प्रतिमा तयार झाली होती. त्यांचा चाहता वर्ग तयार झाला होता. त्या लोकांनी गणेशोत्सवाचा उत्साहाने पुरस्कार केला. पण अनेकांनी त्याचा उपहास आणि विरोधही केला. कर्मठ धर्मनिष्ठांनी त्याला ‘धर्मबुडवा’ म्हंटले तर कुचाळकी करणाऱ्यांनी त्याला जातीयतेचा रंग दिला, कोणी त्याला परधर्मीयांचे अनुकरण ठरवले तर कोणी परकीय लोकांचे. कोणाला मेळ्यामधील कार्यक्रमात बरेच काही आक्षेपार्ह वाटले तर कोणाला सजावट आणि आणखी कोणाला विसर्जनाची मिरवणूक पसंत पडली नाही. त्यांनी या सर्वांची टिंगल केली किंवा त्यांचा निषेध केला. पण त्यांनी केलेल्या निंदेमुळे टिळक विचलित झाले नाहीत की त्यांनी निंदकांना अवास्तव महत्व दिले नाही. ते आपल्या ध्येयाच्या दिशेने शांतपणे आणि खंबीरपणे मार्गक्रमण करत राहिले आणि गणेशोत्सवामुळे समाजाला होणारे फायदे दाखवत राहिले. टिळकांच्या आवाजाचा एक नमूना शतकानंतर अलीकडे आपल्याला ऐकायला मिळाला. त्यावरून असे दिसते की गणेशोत्सवात आलेल्या श्रोत्यांना शास्त्रीय संगीत ऐकायची संधी मिळावी अशी योजना टिळकांनी केली तसेच हे दिव्य संगीत त्यांनी गोंधळ गडबड न करता शांतपणे ऐकून घ्यावे अशी सक्त ताकीदही त्यांनी दिली.

टिळकांचे कळकळीने केलेले सांगणे लोकांनाही पटत गेले आणि अल्पावधीतच गणेशोत्सवाची लोकप्रियता वाढत गेली. टिळकांनी दाखवलेल्या उदाहरणाचे असंख्य लोकांनी अनुकरण केले. वर्षभरानंतर पुण्यातच शेकडो ठिकाणी हा उत्सव साजरा केला गेला आणि त्याच्या पुढल्या वर्षी तो गावोगावी साजरा होऊ लागला. पंढरपूरसारखी यात्रा आणि सार्वजनिक गणेशोत्सव यातला हाच मोठा फरक होता आणि टिळकांनी तो नेमका हेरला होता असे त्यांच्या लिखाणावरून दिसते. देवस्थानांमध्ये जमणारी यात्रा ही फक्त त्या एकाच ठिकाणी भरते पण टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव गावोगावीच नव्हे तर प्रांताप्रांतांमध्ये पसरवायला कसलीच मर्यादा नव्हती. त्या निमित्याने ठिकठिकाणी तिथले अनेक लोक एकत्र येतील आणि त्यांना देशाभिमान व देशप्रेमाची प्रेरणा मिळू शकेल अशी दूरदर्शी व्यवस्था त्यात होती. टिळकांचा हा होरा अचूक ठरला आणि पाहता पाहता गणेशोत्सवाचा प्रसार सर्व दिशांना झाला. त्यांनी लावलेल्या रोपट्याचा फक्त एकच विशाल वृक्ष झाला नाही, त्यातून असंख्य वृक्ष निर्माण झाले.

. . . . . . . . . .

सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात

पुढील लेख : सार्वजनिक  गणेशोत्सवाचा प्रसार इथे पहा
https://anandghare2.wordpress.com/2018/09/19/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%aa/

कुंभमेळा, पंढरपूरची यात्रा, इतर अनेक ठिकाणच्या जत्रा, उरूस वगैरे धार्मिक स्वरूपाचे मेळावे भारतामध्ये कित्येक शतकांपासून चालत आले आहेत. विशिष्ट तिथीला विशिष्ट दैवतांचे दर्शन घेण्याने महान पुण्य मिळते, पापाचा क्षय होतो, या जन्मात सुखाची प्राप्ती आणि दुःखाचा अंत होतो, तसेच मृत्यूनंतर स्वर्गात जागा मिळते, मनुष्य योनीमध्ये पुनर्जन्म मिळतो किंवा जन्म मरणाच्या चक्रामधून मुक्ती मिळून मोक्षप्राप्ती होते वगैरे आमिषे काही भाविकांना त्यात दाखवली जातात. पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या परंपरा त्यात खंड न पाडता चालवत राहून पुढील पिढीकडे सोपवणे हे आपले परमकर्तव्य आहे आणि काहीही करून ते पार पाडणे अत्यावश्यक आहे अशा निष्ठेने काही लोक या यात्रांना जातात. त्याशिवाय एक वेगळा अनुभव, गंमत, हौस म्हणून जाणाऱ्यांची संख्या सुध्दा मोठी असते. या निमित्याने इतकी माणसे एकत्र येतात, त्यांची सेवा करण्याची संधी, किंवा त्यांच्याकडून काही ना काही अर्थप्राप्ती करून घेण्याचा मोह, अशा विविध कारणांमुळे अनेक लोक या यात्रांमध्ये सामील होतात. हे सगळे कित्येक शतकांपासून आजतागायत चालत आले आहे आणि जसजशा वाहतुकीच्या सोयी वाढत गेल्या तशी त्या यात्रेकरूंची संख्या कैकपटीने वाढत चालली आहे.

हे बहुतेक उत्सव एकाद्या पुरातन आणि जागृत समजल्या जाणाऱ्या देवस्थानाच्या ठिकाणी साजरे होत असतात. त्या यात्रांमध्ये काळ आणि स्थानमहात्म्याला फार मोठे महत्व असते. एकाद्या परमभक्ताला यात्रेच्या काळात त्या ठिकाणी जाऊन पोहोचणे काही कारणामुळे शक्य झाले नव्हते, तेंव्हा देवाने प्रत्यक्ष किंवा त्याच्या स्वप्नात येऊन त्याला दर्शन दिले अशी हकीकत अनेक देवस्थानांच्या बाबतीत सांगितली जाते. त्यातून नव्या श्रध्दास्थानांचा उगम होतो, नवी सुरस कथा बनते आणि नव्या यात्रेकरूंची नवी परंपरा सुरू होते. अशा प्रकारे त्यात भर पडत जाते.

अठराव्या शतकातल्या पेशवाईच्या काळातच गणेशोत्सव साजरा करण्याची सुरुवात झालेली होती. त्यानिमित्य शनिवारवाड्याची सजावट आणि दिव्यांची रोषणाई केली जात असे तसेच भजन कीर्तन, गायन, नृत्य आदि कार्यक्रम होत असत. पेशव्यांचे इतर सरदार हा उत्सव आपापल्या संस्थानांच्या ठिकाणी करू लागले. पुण्यामध्येच कसबा पेठेतील सरदार मुजुमदार यांच्या वाड्यात सन १७६५ साली हा उत्सव सुरू झाला आणि गेली २४८ वर्षे तो चालत आला आहे. लोकमान्य टिळकांच्या काळाच्या आधीपासूनच अशा प्रकारे कांही ठिकाणी गणेशोत्सव साजरा होत होता. पण तो मुख्यतः धार्मिक स्वरूपाचा होता किंवा तो साजरा करणाऱ्या श्रीमंत मंडळींच्या ऐश्वर्याचे प्रदर्शन त्यात केले जात असे. लोकमान्यांनी त्याला लोकाभिमुख आणि मनोरंजक तसेच उद्बोधक असे वेगळे रूप दिले, त्याला देशभक्तीची जोड दिली आणि तो इतका लोकप्रिय केला की सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनकत्व त्यांनाच दिले जात होते. पण पुण्यातला पहिला सार्वजनिक गणेशोत्सव भाऊसाहेब रंगारी यांनी सन १८९२ मध्ये सुरू केला असल्यामुळे लो.टिळकांचा उत्सव पहिला ठरत नाही असा आक्षेप अलीकडे घेतला गेला होता. त्या वेळी जेवढे माझ्या वाचनात आले त्यावरून पाहता ते स्वतः लोकमान्य टिळकांचे चाहते किंवा सहकारी असावेत, प्रतिस्पर्धी किंवा विरोधक नसावेत असाच माझा ग्रह झाला. हे दोन्हीही उत्सव सव्वाशे वर्षांपासून अव्याहत चाललेले आहेत.

लोकमान्य टिळकांच्या मनात देवभक्तीपेक्षा देशभक्तीची भावना जास्त प्रखर होती. जास्तीत जास्त सर्वसामान्य लोकांच्या मनात देशप्रेम आणि देशाभिमान रुजवावे, त्यांना देशकार्यासाठी उद्युक्त करावे हा लोकमान्य टिळकांचा अंतस्थ हेतू होता, पण देशभक्तीवर केलेली भाषणे लोकांना रुक्ष वाटली असती आणि मुळात ती ऐकण्यासाठी फारसे लोक जमलेच नसते. शिवाय तत्कालीन इंग्रज सरकारने त्यावर लगेच अंकुश लावला असता. त्यामुळे लोकांना एकत्र आणण्यासाठी वेगळी युक्ती योजणे आवश्यक होते. धार्मिक स्वरूपाच्या उत्सवांच्या निमित्याने खूप माणसे एकत्र जमतात हे लोकमान्य टिळकांनी पाहिले आणि त्यातून आपल्याला हवी असलेली जनजागृती करता येईल हे त्यांनी ओळखले, पण त्यांचे अनुयायी बनण्यासाठी लोकांनी त्यांना महंत, स्वामी, बाबा अशा प्रकारचा धर्मगुरू म्हणून मखरात बसवावे हा त्यांचा उद्देश नव्हता. स्वतः एकाद्या देवाचे लाडके परमभक्त असल्याचे न भासवता पण ईशभक्तीचे निमित्य पुढे करून लोकांना कसे आकर्षित करावे हा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे होता. सार्वजनिक गणेशोत्सव हा त्यावर एक नामी उपाय त्यांनी शोधून काढला आणि अंमलात आणला.

हे काम वाटते तेवढे सोपे नव्हतेच. ते यशस्वी करण्यासाठी लोकमान्यांना भरपूर परिश्रम करावे लागले, अनेकांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले. एरवी साधा वाडा असलेल्या वास्तूमध्ये काही दिवसांसाठी गणपतीची तात्पुरती प्रतिष्ठापना करणे आणि उत्सव संपल्यानंतर त्याची बोळवण करून त्या जागेत पुन्हा पूर्ववत परिस्थिती निर्माण करणे हे भाविक लोकांना पटणे कठीण होते. गणपती या देवाची पूजा अर्चा ही व्यक्तीगत बाब आहे, ती विधीवत (सोवळे वगैरे नेसून) प्रकारे करायला हवी, त्यातले विशिष्ट पूजाविधी, मंत्रोच्चार वगैरेमध्ये कसलीही उणीव येता कामा नये असे समजणारे आणि सांगणारे लोक शंभरावर वर्षे उलटून गेली तरी आजही आपल्याला भेटतात. लोकमान्य टिळकांच्या काळामधल्या कर्मठ लोकांनी तर यात कसलीही हयगय होणे मान्य केलेच नसते. देवघरातल्या देवाला सार्वजनिक जागी आणून ठेवले आणि कोणीही उठून त्याची पूजा करू लागला. यामुळे पावित्र्याचा भंग झाल्याने गणपतीमहाराज रुष्ट झाले आणि त्या पातकाचे शासन म्हणून त्यांनी प्लेगाच्या साथीला पाठवून दिले असे अकलेचे तारेसुध्दा काही मंडळींनी त्या काळात तोडले होते.

हा विरोध इतर काही वेगळ्या मुद्द्यांवर आणि वेगवेगळ्या स्तरांवर झाला होता. यात पूजेच्या पावित्र्याचा भंग होतो अशी ओरड कर्मठ धर्ममार्तंड करत होते,तर दुसऱ्या बाजूला हा ब्राह्मणांना पुढे पुढे करून समाजावर वर्चस्व गाजवण्याचा टिळकांचा एक कुटील डाव आहे असा दुष्ट आरोप कांही लोक करत होते. ही मुसलमानांच्या मोहरमच्या ताबूतांची नक्कल आहे असे सांगून हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना भडकवण्याचा उद्योग इतर कोणी करत होते. अशा तात्विक मुद्द्यांशिवाय सजावट आणि मेळ्यांचे कार्यक्रम यांचा दर्जा, त्यावर होणारा खर्च आणि त्यात वाया जाणारा वेळ याबद्दल नाक मुरडणारे बरेच लोक होते. या सर्वांनी उडवलेल्या राळीमुळे विचलित न होता त्यांचे मुद्देसूद खंडन करून समाजातल्या जास्तीत जास्त लोकांचा विश्वास संपादन करणे आणि आपल्या या नव्या उपक्रमाला त्यांची मान्यता मिळवून त्यांना मोठ्या संख्येने त्यात सहभागी करून घेणे हे अत्यंत कठीण काम लोकमान्यांनी त्या काळात करून दाखवले. लोकमान्यांनी या गोष्टी कशा प्रकारे लोकांच्या गळी उतरवल्या, त्यासाठी कोणकोणते युक्तीवाद केले हे त्या काळामधील लोकच जाणोत.

भाऊसाहेब रंगारी यांनी सन १८९२ मध्ये आणि लोकमान्य टिळकांनी सन १८९३ मध्ये पुण्यात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आणि वर्षभरानंतर सन १८९४ साली शेकडो ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले गेले. त्यानंतर ते लोण झपाट्याने पसरत गेले. आज जगभरातल्या सर्व खंडांमध्ये (अंटार्क्टिक सोडून) जिथे जिथे भारतीय लोक गेले आहेत तिथे तिथे ते लोक मोठ्या उत्साहाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात.

गणेश आणि लेखनकला

Ganapati vedavyasa

आजच्या काळात निरनिराळ्या प्रकारची लेखनसामुग्री मुबलक प्रमाणात सर्वत्र उपलब्ध असते आणि ज्याला कोणाला काही लिहायची इच्छा असेल तो ते लिहू शकतो. जगातील प्रत्येक माणसाने साक्षर व्हावे या दृष्टीने प्रयत्न चालले आहेत. माझ्या लहानपणी म्हणजे साठ वर्षांपूर्वीसुद्धा कागद आणि शाई सहजपणे मिळत होती तरी ग्रामीण भागातली साक्षरता वीस टक्क्याहून कमी होती. ज्या काळात कागदच अस्तित्वात आला नव्हता तेंव्हा ती अगदीच नगण्य प्रमाणात असणार. काही महान सम्राट आणि बादशहासुध्दा निरक्षर होते असे म्हणतात. असे असले तरी अगदी प्राचीन काळापासून लेखन व वाचन चालत आले आहे. भाषांच्या विकासाबरोबरच किंवा पाठोपाठ त्या लिपीबध्द केल्या गेल्या. काही विद्वान मंडळी निरनिराळ्या भाषांमध्ये आणि निरनिराळ्या लिपींमध्ये लेखनाचे कार्य करीत असत. ऐतिहासिक शिलालेख, ताम्रपट, भूर्जपत्रे वगैरे साधनांवरून अशा लेखनांचे पुरावे मिळतात. अशा लेखनामधून प्राचीन काळातले काही उत्कृष्ट दर्जाचे साहित्य आपल्यापर्यंत येऊन पोचले आहे.

आजच्या काळातले बहुतेच लोक व्यक्तीगत स्वरूपाचे लेखन स्वतःच करतात, पण पत्रव्यवहार, रिपोर्ट्स किंवा रेकॉर्ड्स यासारख्या व्यावसायिक लेखनासाठी अनेक ठिकाणी खास प्रशिक्षण घेतलेले लिपिक (स्टेनोटायपिस्ट) नेमलेले असतात. इतिहासकाळातसुध्दा मुनीम, चिटणिस वगैरेंकडून लेखनाचे काम करून घेतले जात असे. लिहिलेला मजकूर वाचणाऱ्याला नीट समजावा या दृष्टीने तो सुवाच्य अक्षरात लिहिलेला असणे आणि व्याकरणदृष्ट्या निर्दोष असणे आवश्यक असते. तशा पध्दतीने तो लिहिण्यासाठी भाषेवर प्रभुत्व मिळवावे लागते तसेच सुलेखनकला अवगत असावी लागते. विद्या आणि कला या दोन्हीमध्ये प्राविण्य मिळवावे लागते.

बरेचसे वैदिक वाङ्मय अपौरुषेय आहे, ते कोणा माणसाने लिहिले नसून साक्षात ब्रह्मदेवापासून ते ज्ञान काही निवडक ऋषींना मिळाले आणि पुढे त्याचा प्रसार गुरूशिष्यपरंपरेनुसार मौखिक रीतीने होत गेला अशी काही लोकांची श्रध्दा असते. गुरूने सांगायचे आणि शिष्याने त्याचा वारंवार उच्चार करून ते तोंडपाठ करायचे अशी ज्ञानदानाची पध्दत प्राचीन काळात होती. अनेक सूक्ते, श्लोक, स्तोत्रे वगैरे अमक्या तमक्या ऋषीने विरचित केली असा उल्लेख त्यात केला जातो. सर्वाधिक प्रसिध्द आणि प्रचंड आकाराचे असे महाभारत हे महाकाव्य व्यासमहर्षींनी रचले आणि प्रत्यक्ष गणेशाने ते लिहिले असे समजले जाते. त्याचा विस्तार पाहता हे काव्य तोंडपाठ करणे जवळ जवळ अशक्यप्रायच वाटते. ते चिरकाळ टिकून रहावे यासाठी ग्रंथरूपाने लिहून ठेवणे आवश्यक होते. ते लिहून काढणे हे सुध्दा सोपे काम नव्हते. ते कोण करू शकेल याचा विचार करता केवळ श्रीगणेशच हे करू शकेल असे दिसले.

त्यासाठी व्यासमहर्षींनी गणेशाची आराधना केली. त्याने प्रसन्न होऊन वरदान मागितले तेंव्हा महाभारताचे लेखनकार्य त्याने करावे असा वर व्यासांनी मागितला. हे काम करण्यासाठी गणेशाने एक अट घातली. ती म्हणजे व्यासांच्या सांगण्यात खंड पडला तर लगेच हे काम तिथेच थांबवून गणेशजी अंतर्धान होतील आणि पुन्हा परत येणार नाहीत. व्यासांनी ती अट मान्य केली आणि एका बैठकीत हजारो श्लोक रचून सांगितले आणि गणेशाने ते तत्परतेने लिहून हा ग्रंथ पूर्ण केला. अशी कथा मी ऐकली होती. माझ्या वाचनात आलेल्या एका लेखात असे लिहिले होते की गणेशाने अशी अट घातली की व्यासांच्या सांगण्यात खंड पडला तर गणपती आपल्या मनाने काही तरी लिहीत जाईल. अशा प्रकारे त्याने लिहिलेला मजकूर इतका गूढ आहे की त्याचा अर्थ कोणालाच कधी नीटपणे समजला नाही.

सर्वात पहिला कुशल लेखनपटु गणेशच होता याबद्दल एकमत दिसते. कोणत्याही लेखनाच्या सुरुवातीला गणेशाला वंदन, त्याची स्तुती करून ग्रंथनिर्मितीचे कार्य निर्विघ्नपणे संपूर्ण होऊ द्यावे असा आशिर्वाद गणपतीकडे मागण्याचा प्रथा पडली आणि शतकानुशतके चालत राहिली. आधुनिक काळातील काही इतिहासकारांना असे वाटते की महाभारत हा ग्रंथ शतकानुशतके लिहिला जात होता. तसे असल्यास ते रचणारे सगळे विद्वान व्यास म्हणवले जात असतील आणि लिहिणारे विद्वान गणेशाचे अंश.

गणश

संस्कृत या देववाणीची देवनागरी ही लिपी गणेशानेच तयार केली असेही त्या लेखात लिहिले होते. या लिपीची रचना करतांना त्यात अशी खुबी केली आहे की ग, ण आणि श ही तीन अक्षरे इतर व्यंजनाहून वेगळी आहेत. फक्त या तीन व्यंजनांनाच एक स्वतंत्र अशी उभी रेघ आहे. ही तीन अक्षरेसुध्दा गणेश या नावात ज्या क्रमाने येतात त्याच क्रमाने देवनागरी लिपीच्या मुळाक्षरांमध्ये येतात. आहे की नाही गंमत ?

विठ्ठल किती गावा ? (भाग ४)

VitthalBW

विठ्ठल किती गावा ? (भाग ४)

आपल्याकडे गोरा रंग हे सौंदर्याचे एक महत्वाचे लक्षण समजले जाते, किंबहुना बहुतेक वेळा कोणाचेही सौंदर्य ठरवतांना पन्नास टक्क्यांहून जास्त मार्क रंगाला आणि नाक, डोळे, ओठ, गाल वगैरेंना उरलेले मार्क विभागून दिले जातात असे कधीकधी वाटते. आपल्या मुलासाठी मुलगी पहातांना मुलगा जर गोरा असेल तर त्याला अनुरूप म्हणून गोरी मुलगी हवीच आणि मुलगा काळासावळा असला तरी पुढे त्यांना गोरी मुले व्हावीत असे म्हणून त्याचे आईवडीलसुध्दा गोरीच मुलगी पसंत करतात. यामुळे कृत्रिम गोरेपणा देण्यासाठी अंगाला लावायच्या क्रीम्सच्या जाहिरातींचा सारखा भडिमार होत असतो आणि त्या बाजारात खपतातसुध्दा. गोरेपणाचे एवढे स्तोम माजलेले असले तरी भक्तांचा अत्यंत प्रिय असा विठ्ठल मात्र काळा सावळाच आहे. पंढरपुरातल्या देवळातली विठोबाची मूर्ती काळ्या दगडामधून बनवलेली आहेच, गावोगावी असलेल्या विठ्ठलाच्या मंदिरांमध्येही त्या बहुधा काळ्या रंगाच्याच दिसतात. संतांपासून ते आजकालच्या गीतकारांपर्यंत सर्वांनी एकमुखाने ‘या सावळ्या तनूचे’ भरपूर गुणगान केले आहे.

त्याचे सावळे सुंदर रूप सदोदित आपल्या हृदयात राहू दे आणि त्याचे गोड नामस्मरण घडत राहू दे एवढीच आपली एकमेव इच्छा आहे आणि तिची पूर्तता आपण जन्मोजन्मी मागितली आहे, असे संत तुकाराम महाराजांनी खाली दिलेल्या अभंगात सांगितले आहे. पांडुरंगासारखा दयाळू कुठेही शोधून सापडणार नाही अशी त्याची स्तुती करून आपले एवढेसे मागणे तो सहजगत्या देऊन टाकेल असी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

सावळें सुंदर रूप मनोहर ।
राहो निरंतर हृदयीं माझे ॥१॥
आणिक कांही इच्छा, आम्हां नाहीं चाड ।
तुझें नाम गोड, पांडुरंगा ॥२॥
जन्मोजन्मीं ऐसें, मागितलें तुज ।
आम्हांसी सहज, द्यावें आतां ॥३॥
तुका म्हणे तुज, ऐसे दयाळ ।
धुंडितां सकळ, नाहीं आम्हां ॥४॥

स्व.श्रीनिवास खळे यांनी बांधलेल्या गोड चालीवर पं.भीमसेन जोशी यांनी हा सुंदर भजन गायिले आहे.
https://www.youtube.com/watch?v=S21sHLDyCF8

माझ्या लहानपणी खूप गाजलेल्या आधुनिक भक्तीगीतांमध्ये सुध्दा सावळ्या विठ्ठलाच्या अनुपम रूपाचे आणि त्याचे दर्शन करताच देहभान हरपून गेल्याच्या अनुभवाचे वर्णन केले आहे. त्याने आपल्यावर कृपा करावी, आपला उध्दार करावा अशी प्रार्थना केली आहे. श्यामलवर्णी विठ्ठलाच्या रूपाचे आणि गुणांचे वर्णन करून असा लाखात एक पति मिळाल्याबद्दल रखुमाईचे भाग्य किती थोर आहे हे तिलाच उद्देशून तिसऱ्या गाण्यात सांगितले आहे. ही अतीशय गोड आणि अर्थपूर्ण गाणी अनुक्रमे कवी रा.ना.पवार, कवी सुधांशु आणि कवयित्री शांताबाई जोशी यांनी लिहिली असली तरी स्व.दशरथ पूजारी यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली सुमन कल्याणपूर यांनीच ती तीनही गीते गायिली आहेत.

सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले ।
विसरूनी गेले देहभान ।।ध्रु.।।
गोजिरे हे रूप पाहुनिया डोळां ।
दाटला उमाळा अंतरि माझ्या ।
तुकयाचा भाव पाहुनी निःसंग ।
तारिले अभंग तूच देवा ।।१।।
जगी कितीकांना तारिलेस देवा ।
स्वीकारी ही सेवा आता माझी ।
कृपाकटाक्षाचे पाजवी अमृत ।
ठेव शिरी हात पांडुरंगा ।।२।।

कवि रा.ना.पवार, सुमन कल्याणपूर

देव माझा विठू सावळा। माळ त्याची माझिया गळा ।।ध्रु.।।
विठु राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी ।
भीमेच्या काठी डुले, भक्तिचा मळा ।।१।।
साजिरे रुप सुंदर, कटि वसे पितांबर।
कंठात तुळशीचे हार. कस्तुरी टीळा ।।२।।
भजनात विठू डोलतो, किर्तनी विठू नाचतो
रंगूनी जाई पाहूनी भक्ताचा लळा ।।३।।

कवि सुधांशु , गायिका सुमन कल्याणपूर
https://www.youtube.com/watch?v=pbVXc5Z7zCA

लाखात लाभले भाग्य तुला ग बाई ।
विटेवरच्या विठ्ठलाची झालिस रखुमाई ।।ध्रु.।।
मेघासम जो हसरा श्यामल ।
चंद्राहुनि तो अधिकहि शीतल ।
नाम जयाचे मुखात येता ।
रूप दिसे ग ठायी ठायी ।।१।।
भक्‍तांचा जो असे आसरा ।
या विश्वाचा हरी मोहरा ।
क्षणात इकडे क्षणात तिकडे ।
हाकेला ग धाव घेई ।।२।।

कवयित्री शांताबाई जोशी, गायिका सुमन कल्याणपूर
https://www.youtube.com/watch?v=0-AVvTppRhw

स्वरसम्राज्ञी लतादीदींनी गायिलेले गीतकार पी.सावळाराम यांचे एक गाणे माझ्या लहानपणी म्हणजे आकाशवाणीच्या जमान्यात खूप लोकप्रिय होते. त्यातही विठ्ठलाच्या सावळ्या आणि दिव्य अशा रूपाचे वर्णन केले आहे. या गाण्यातली भक्ती संत मीराबाईने केली होती तशी मधुरा भक्ती आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी राधेचे उदाहरण दिले आहे. शेवटच्या कडव्यात संत जनाबाईचे उदाहरण देऊन त्या भक्तीमधले आध्यात्मही दाखवले आहे.

विठ्ठला, समचरण तुझे धरिते ।
रूप सावळे दिव्य आगळे अंतर्यामी भरते ।।ध्रु.।।
नेत्रकमल तव नित फुललेले ।
प्रेममरंदे किती भरलेले ।
तव गुण-गुंजी घालीत रुंजी ।
मानस-भ्रमरी फिरते ।।१।।
अरुण चंद्र हे जिथे उगवती ।
प्रसन्‍न तव त्या अधरावरती ।
होऊन राधा माझी प्रीती ।
अमृतमंथन करिते ।।२।।
जनी लाडकी नामयाची ।
गुंफुन माला प्राणफुलांची ।
अर्पुन कंठी मुक्‍तीसाठी ।
अविरत दासी झुरते ।।३।।

कवि पी.सावळाराम, गायिका लता मंगेशकर
https://www.youtube.com/watch?v=kg4AODDkqFg
स्व,माणिक वर्मा यांच्या गोड आवाजातले खाली दिलेले गाणेसुध्दा माझ्या लहानपणी खूप लोकप्रिय होते. त्यातही विठ्ठलाच्या सावळ्या आणि दिव्य अशा रूपाचे वर्णन केले आहे. या गाण्यातली भक्तीसुध्दा थोडीशी मधुरा भक्ती वाटते.

विठ्ठला रे, तुझे नामी, रंगले मी रंगले मी ।
विठ्ठला रे, रूप तुझे साठविते अंतर्यामी ।।ध्रु।।
तुझ्या कीर्तनाचा गंध, करितसे जीव धुंद ।
पंढरीचा हा प्रेमानंद, भोगिते मी अंतर्यामी ।।१।।
तुझी सावळीशी कांती, पाडी मदनाची भ्रांती ।
ध्यान तुझे लावियले, सुंदराचा तूच स्वामी ।।२।।
तुझ्या भजनी रंगता, न उरे काम धाम चिंता ।
रुक्मिणीच्या रे सखया कांता, मोहरते मी रोमरोमी ।।३।।

माणिक वर्मा

दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमाराला विठ्ठलाचे अभंग आणि भक्तीगीते यांचे सुरेल असे कार्यक्रम आयोजित केले जातात. बहुतेक वेळा त्यातल्या एकाद्या कार्यक्रमाला मी हजेरी लावत असे. याचे मुख्य कारण म्हणजे मला ते अभंग, ती गाणी ऐकायला आवडतात. मला ती का आवडतात हे एक गूढ आहे. विठोबाचे नाव उच्चारल्याने आणि त्याचे दर्शन घेतल्याने अतीव आनंद होतो, देहभान हरपून जाते वगैरे सुरस वर्णने संतमंडळींनी केली आहेतच, माडगूळकर आणि खेबूडकरांसारख्या आधुनिक गीतकारांनीही केली आहेत. तसा थोडा फार अनुभव आपल्यालाही येतो असे सांगणारी माणसे आपल्याला भेटतात, देवळांमध्ये दर्शनाला आलेल्या काही भाविक लोकांच्या चेहेऱ्यांवर ते भाव उमटलेले दिसतात, पण मला स्वतःला मात्र कधी असा उत्कट अनुभव आला नाही. कुठल्याही देवाचे नाव घेताच गोड मिठाई खाल्ल्याचा भास झाला नाही किंवा त्याच्याकडे पहात असतांना आजूबाजूला काय चालले आहे याची जाणीवही राहू नये अशी उन्मन अवस्था झाली नाही. देवाचे नुसते नाव जिभेवर घेतले किंवा त्याचे चित्र डोळ्यांनी पाहिले की पापाच्या राशी जळून जातील आणि पुण्याचे डोंगर उभे राहतील हे ही मला कधी पटले नाही. पण असे असले तरी भजन, अभंग, भक्तीगीते वगैरे गाणी ऐकतांना मला खूप चांगले वाटते आणि मी त्यात इतके समरस होऊन ते गायन ऐकतो की क्वचित कधी तिथल्या श्रोत्यातला एकादा मुलगा किंवा मुलगी जाता जाता माझ्याही पाया पडून जाते.

एका वर्षी मी आषाढी एकादशीच्या सुमाराला पुण्याला असतांना तिथे सुद्धा एक चांगला कार्यक्रम पाहिला होता आणि त्याबद्दल या ब्लॉगवर लिहिलेही होते. पुढच्या वर्षी एकादशीच्या दहा बारा दिवसांपूर्वीच त्यानिमित्याने वाशीला पहिला सांगीतिक कार्यक्रम होऊन गेला. त्या वेळी सादर केली गेलेली गाणी ऐकता ऐकता त्या अनुरोधाने मला आणखी काही प्रसिध्द गाणी आठवत गेली. तेंव्हा त्यांचेच एक संकलन करायचे ठरवले. मराठी भाषेत अशी असंख्य गीते आणि अभंग आहेत, त्यातली माझ्या माहितीतली आणि आवडती अशी काही लोकप्रिय गाणी मी या लेखमालिकेसाठी निवडली.

‘विठ्ठल किती गावा ?’ असे या लेखाचे शीर्षक ठेवले असल्यामुळे ज्या गीतांमध्ये विठोबाच्या गायनभक्तीचा उल्लेख आहे अशी गाणी आणि अभंग पहिल्या भागात निवडले. यात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि स्व.माणिक वर्मा यांनी गायिलेली भक्तीगीते होती. संत नामदेवांनी आणि संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले अभंग दुसऱ्या भागात घेतले होते. संत नामदेवांच्या अभंगांमधले तीन विठ्ठलाच्या दर्शनासंबंधी आणि तीन त्याच्या नावाच्या उच्चारावर लिहिलेले होते. सगुण आणि निर्गुण अशा विठ्ठलाच्या दोन्ही प्रकारच्या रूपांमधून मिळणाऱ्या अवर्णनीय आनंदाचे वर्णन ज्ञानदेवांनी केले आहे. संत एकनाथ, संत कान्होपात्रा, संत चोखामेळा आणि त्यांची पत्नी संत सोयराबाई यांचे अभंग तिसऱ्या भागात घेतले होते आणि विठ्ठलाला मातेच्या जागी मानून त्याला विठू माउली, विठाबाई वगैरे नावांनी संबोधन करून लिहिलेले अभंग आणि गीते सुद्धा याच भागात घेतली होती. विठ्ठलाच्या सावळ्या पण मनोहर अशा रूपाचे वर्णन करणारे अभंग आणि गीते आणि निरनिराळ्या वैशिष्ट्यपूर्ण प्रकारांची उरलेली गीते या चौथ्या भागात एकत्र करून मी ही मालिका संपवत आहे.

संतांनी विठोबाला ‘माउली’ असे म्हंटले आहे, अर्थातच ही संतमंडळी त्याची आवडती ‘लेकरे’ झाली. अशा या लेकुरवाळ्या विठ्ठलाचे वर्णन खाली दिलेल्या अभंगात केले आहे. त्यात संत जनाबाईंनी हे वर्णन केले असल्यामुळे त्यांच्या काळामधले निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताबाई, गोरा कुंभार, चोखा मेळा, जीवा, बंका आणि नामदेव यांचे उल्लेख या अभंगात आहेत. संत एकनाथ आणि संत तुकाराम हे त्यानंतरच्या शतकांमध्ये होऊन गेले. या अभंगाच्या शेवटी ‘जनी म्हणे’ असे लिहिले असले तरी ‘नामयाची जनी’ अशी त्यांची नेहेमीसारखी सही नाही. कदाचित “संत जनाबाईंनी असा विचार केला असेल” अशी कल्पना करून हा अभंग आणखी कोणी तरी लिहिला असेल.

विठु माझा लेकुरवाळा । संगे गोपाळांचा मेळा ।।
निवृत्‍ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी ।।१।।
पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्‍ताबाई सुंदर ।।२।।
गोराकुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी ।।३।।
बंका कडेवरी, नामा करांगुली धरी ।।४।।
जनी म्हणे गोपाळा, करी भक्‍तांचा सोहळा ।।५।।
अनुराधा पौडवाल

संत नामदेव महाराज विठ्ठलाचे लाडके भक्त होते. त्यांची विठ्ठलाशी इतकी जवळीक होती की त्याचे गुणगान करणे, दर्शन करणे एवढ्यावरच ते थांबले नाहीत, त्याच्याशी एकेरीवर येऊन (खोटे खोटे) भांडलेसुध्दा. असेच थोडेसे उद्दामपणाचे वाटणारे गा-हाणे त्यांनी खाली दिलेल्या अभंगात केले आहे. त्यांनी या अभंगात विठ्ठलाला जवळ जवळ जाबच विचारला आहे.

पंढरी निवासा सख्या पांडुरंगा ।
करी अंग संगा, भक्‍ताचिया ॥१॥
भक्‍त कैवारीया होसी नारायणा ।
बोलता वचना, काय लाज ॥२॥
मागे बहुतांचे फेडियले ऋण ।
आम्हासाठी कोण, आली धाड ॥३॥
वारंवार तुज लाज नाही देवा ।
बोल रे केशवा, म्हणे नामा ॥४॥
पं.भीमसेन जोशी

कवीवर्य ग.दि.माडगूळकरांनी चित्रपटांसाठी लिहिलेल्या काही गीतांमध्ये संतांच्या रचनांमधला पूर्वापार भाव सुंदर रीत्या आणला आहे. सकाळी उठल्यानंतर भूपाळी गाऊन देवाची प्रार्थना करून त्यालाही जागवायचे अशी परंपरा आहे. ‘उठा उठा हो गजमुख’ यासारख्या पारंपारिक रचना आणि ‘घनःशायामसुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला’ यासारख्या ‘अमर भूपाळ्या’ प्रसिध्द आहेत. विठ्ठलाला जाग आणण्यासाठी गदिमांनी लिहिलेली भूपाळी खाली दिली आहे.

प्रभातसमयो पातला, आता जाग बा विठ्ठला ।।ध्रु.।।
दारी तव नामाचा चालला गजरू ।
देव-देवांगना गाती नारद-तुंबरू ।
दिंड्या-पताकांचा मेळा, तुझिया अंगणि थाटला ।।१।।
दिठी दिठी लागली तुझिया श्रीमुखकमलावरी ।
श्रवणिमुखी रंगली श्रीधरा, नामाची माधुरी ।
प्राणांची आरती, काकडा नयनी चेतविला ।।२।।

अजित परब https://www.youtube.com/watch?v=KPNzbc–aL0

स्व.ग.दि.माडगूळकरांनीच लिहिलेले एक अप्रतिम गीत अजरामर झालेले आहे. हे अत्यंत भावपूर्ण आणि अर्थपूर्ण गीत मला इतके आवडले की या एका गीतातल्या शब्दरचनेच्या मागे दडलेला अर्थ समजावून सांगण्यासाठी मी एक स्वतंत्र लेखमाला लिहिली होती. एक कुंभार आणि त्याने बनवलेली गाडगीमडकी यांच्या रूपकामधून त्यांनी परमेश्वर आणि मनुष्यप्राणी, आत्मा आणि व्यक्तीमत्व यांचे चित्रण या गीतात केले आहे.

फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार ।
विठ्ठला, तू वेडा कुंभार ।।ध्रु.।।
माती, पाणी, उजेड, वारा, तूच मिसळसी सर्व पसारा ।
आभाळच मग ये आकारा ।
तुझ्या घटांच्या उतरंडीला, नसे अंत, ना पार ।।१।।
घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे ।
तुझ्याविना ते कोणा नकळे ।
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार ।।२।।
तूच घडविसी, तूच फोडिसी, कुरवाळिसि तू, तूच ताडीसी ।
न कळे यातुन काय जोडीसी ।
देसी डोळे परि निर्मिसी तयांपुढे अंधार ।।३।।

चित्रपट प्रपंच, गायक आणि संगीत सुधीर फडके
https://www.youtube.com/watch?v=EeNd0JJbM-U

स्व.वसंत प्रभू यांचे संगीत दिग्दर्शन आणि कवी पी.सावळाराम यांची शब्दरचना यांच्या संगमामधून अत्यंत अवीट अशा गोडीची अनेक भावगीते मराठी भाषिक रसिकांना मिळाली आहेत. त्यात काही गीते विठ्ठलरखुमाईंच्या संबंधी आहेत, पण त्यात सामाजिक आशय, मानवता वगैरे विषयांना वाचा फोडली आहे. परंपरागत समजुतीप्रमाणे टाळ कुटून भजन न करता आणि देवदर्शनासाठी पंढरीची वारी न करता, आपले रोजचे जीवन मंगलमय ठेवल्यानेसुध्दा देव प्रसन्न होतो असा भाव खाली दिलेल्या पहिल्या गाण्यात आहे.

विठ्ठल तो आला, आला, मला भेटण्याला ।
मला भेटण्याला आला, मला भेटण्याला ।।ध्रु.।।
तुळशी-माळ घालुनि गळा, कधी नाही कुटले टाळ ।
पंढरीला नाही गेले, चुकूनिया एक वेळ ।
देव्हार्‍यात माझे देव. ज्यांनी केला प्रतिपाळ ।
चरणांची त्यांच्या धूळ, रोज लावी कपाळाला ।।१।।
सत्य वाच माझी होती, वाचली न गाथा पोथी ।
घाली पाणी तुळशीला, आगळीच माझी भक्‍ती ।
शिकवण मनाची ती, बंधुभाव सर्वांभूती ।
विसरून धर्म जाती, देई घास भुकेल्याला ।।२।।

लता मगेशकर
हे गाणे परंपरागत प्रथांना सरळ सरळ धक्का देणारे असल्यामुळे ते ऐकून लहान मुलांच्या मनांवर ‘वाईट संस्कार’ होतील म्हणून “त्यांना ते ऐकू देता कामा नये” असा विचार करणारे काही वडीलधारी लोक माझ्या लहानपणी होते. पी.सावळाराम आणि वसंत प्रभू याच जोडीने आणलेल्या खाली दिलेल्या गाण्यात तर त्यांच्या मते कहर झाला होता. “पंढरपूर सोडून विठ्ठलाने निघून जावे” असा आग्रह खुद्द रखुमाईच करते असे या गाण्यात म्हंटले आहे. पण गंमत म्हणजे यातल्या कशाचाच काही अर्थ समजून न घेता त्या निमित्याने ‘विठ्ठल’ हे नाव कानावर पडते म्हणून हेसुध्दा ‘देवाचे गाणे’ आहे असे समजणारेही काही लोक त्या काळात होते.

पंढरीनाथा झडकरी आता, पंढरी सोडून चला ।
विनविते रखुमाई विठ्ठला ।।ध्रु.।।
ज्ञानदेवे रचिला पाया, कळस झळके वरि तुकयाचा ।
याच मंदिरी आलो आपण प्रपंच करण्या भक्‍तजनांचा ।
भक्‍त थोर ते गेले निघुनी, गेला महिमा तव नामाचा ।
विक्रय चाले देवपणाचा, रहायचे मग इथे कशाला ।।१।।
धरणे धरुनी भेटीसाठी, पायरीला हरिजन मेळा ।
भाविक भोंदु पूजक म्हणती, केवळ आमुचा देव उरला ।
कलंक अपुल्या महानतेला, बघवेना हो रखुमाईला ।
यायचे तर लवकर बोला, ना तर द्या हो निरोप मजला ।।२।।
आशा भोसले

गेले अनेक दिवस पायपीट करून पुढे पुढे जात असलेल्या भक्तजनांच्या सगळ्या दिंड्या आज पंढरपूरला पोचल्या असतील. भक्तजनांचा इतका मोठा मेळा दर्शनाला येत आहे हे पाहून विठ्ठलाने आणि रखुमाईनेही पंढरपूरामध्येच आपला मुक्काम युगे अठ्ठावीस ठेवला असणार. पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे चंद्रभागेचे वाळवंट संकुचित झालेले असले तरी सगळे भक्तजन मिळेल तेवढ्या जागेत झेंडा रोवून हरिनामाचा गजर करत राहतील. याचे वर्णन करणारे एक गाणे मी लहानपणी शिकलो होतो ते असे होते.
विठूचा, गजर हरिनामाचा, झेंडा रोविला ।
वाळवंटी, चंद्रभागेच्या काठी, डाव मांडिला ॥

याच विषयावरचे भारुडाच्या अंगाने जाणारे एक वेगळे गाणे आता उपलब्ध आहे ते असे आहे.

या विठूचा गजर हरीनामाचा झेंडा रोविला ।
या संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला ॥१॥
कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण ।
नांगर धरिला सत्वाचा बैल मन पवनाचा ॥२॥ झेंडा रोविला ।
उखळण प्रेमाची काढिली, स्वस्थ बसुनी सद्‍गुरूजवळी ।
प्याला घेतला ज्ञानाचा, तोच अमृताचा ॥३॥ झेंडा रोविला ।
पचतत्वांची गोफण, क्रोध पाखरे जाण ।
धोंडा घेतला ज्ञानाचा करीतसे जागरण ।
केशवदास म्हणे संतांचा मेळा गोपाळांचा ॥४॥ झेंडा रोविला ।
https://www.youtube.com/watch?v=wk00gJeEy9s

उद्याच्या आषाढी एकादशीला क्षेत्र पंढरपूर इथे जमलेल्या असंख्य भाविकांना इथूनच नमन करून आणि त्यांच्या गजराचा आनंद टेलिव्हिजनवरून पहात ही मालिका आवरती घेत आहे.
. . . . . . . . . . . . . . . .. . (समाप्त)

<—————- मागील भाग ३

विठ्ठल किती गावा ? (भाग ३)

विठ्ठलाला पाहतांना आपली काय अवस्था होते, कसे देहभान हरपून जाते, मन मुग्ध होते वगैरे अनुभव संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या अभंगात सांगितले आहेत. संत तुकाराम आणि संत नामदेवांनीसुध्दा वेगळ्या पध्दतीने असेच काहीसे सांगितले आहे. हे आपण यापूर्वीच्या भागांमध्ये पाहिले. लेखाच्या या भागात इतर संतमंडळींचे अभंग पाहू.

संत एकनाथ महाराज तर काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल असे म्हणत पांडुरंगाशी एकरूप झाले होते. विठ्ठल हा वेगळा कोणी नसून आपला अंतरात्मा आहे असे तत्वज्ञान त्यांनी या अभंगात सांगितले आहे. त्या अनुषंगाने भावभक्ती म्हणजे चंद्रभागा नदीतले पाणी, दया क्षमा शांती हे गुण म्हणजे तिच्या तीरावरले वाळवंट, ज्ञान ध्यान पूजा विवेक म्हणजे वाद्याचा नाद, पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये हे सगळे मिळून झालेले शरीर म्हणजेच पंढरपूर अशी एकाहून एक वरचढ रूपके त्यांनी या अभंगात दिली आहेत. थोडक्यात सांगायचे झाल्यास विठ्ठलाच्या दर्शनासाठी दूर पंढरपुराला जाण्याची गरज नाही. तो या इथे तुमच्या शरीरात आत्म्याच्या रूपाने सदैव वास करत असतो असे त्यांना सांगायचे आहे असे दिसते.

काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल ।
नांदतो केवळ पांडुरंग ॥१॥
भाव-भक्‍ति भीमा उदक ते वाहे ।
बरवा शोभताहे पांडुरंग ॥२॥
दया क्षमा शांती हेंचि वाळुवंट ।
मिळालासे थाट वैष्णवांचा ॥३॥
ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद ।
हाचि वेणुनाद शोभतसे ॥४॥
दश इंद्रियांचा एक मेळ केला ।
ऐसा गोपाळकाला होत असे ॥५॥
देखिली पंढरी देहीं-जनी-वनीं ।
एका जनार्दनी वारी करी ॥६॥
हा अभंग  पं.भीमसेन जोशी यांच्या आवाजात

संत कान्होपात्रा ही एका गणिकेची मुलगी होती, पण चिखलातून कमळ उगवावे याप्रमाणे ती वेगळी होती. आईचा पेशा न पत्करता तिने विठ्ठलाची भक्ती केली. या अभंगात तिने विठ्ठलाला आपला सखा म्हणून त्यालाच आपले रक्षण करण्याची विनंती केली आहे.

अगा वैकुंठीच्या राया ।
अगा विठ्ठल सखया ॥१॥
अगा नारायणा ।
अगा वासुदेवनंदना ॥२॥
अगा पुंडलिक वरदा ।
अगा विष्णू तू गोविंदा ॥३॥
अगा रखुमाईच्या कांता ।
कान्होपात्रा राखी आता ॥४॥
बालगंधर्वांच्या आवाजात https://www.youtube.com/watch?v=FRAY6avIy9w
नाट्यगीत

“ऊस डॊंगापरी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलीया रंगा?” यासारख्या अभंगांमधून समाजाला निरुत्तर करणारा प्रश्न विचारणा-या संत चोखा मेळा यांनी विठ्ठलाच्या नामाच्या गजराने दुमदुमलेल्या पंढरपूर नगरीचे वर्णन असे केले आहे. विठ्ठलाचा नामघोष. त्याचे भजन कीर्तन वगैरेंची त्यांनासुध्दा किती गोडी होती हे यात दिसते.
विठ्ठल विठ्ठल गजरी गजरी ।
अवघी दुमदुमली पंढरी ॥१॥
होतो नामाचा गजर ।
दिंड्या पताकांचा भार ॥२॥
निवृत्‍ती ज्ञानदेव सोपान ।
अपार वैष्णव ते जाण ॥३॥
हरि कीर्तनाची दाटी ।
तेथें चोखा घाली मिठी ॥४॥
श्री.जी एम लोंढे यांच्या आवाजात https://www.youtube.com/watch?v=DEGdQrcqOUc

संत चोखा मेळा यांची पत्नी संत सोयराबाईसुध्दा परम विठ्ठलभक्त होती. तिनेही स्वतः सुंदर अभंग लिहिले आहेत, पण त्यांच्या शेवटच्या ओळीत स्वतःचा उल्लेख मात्र चोखियाची महारी असा केला आहे. या काहीशा अपरिचित कवयित्रीचे दोन प्रसिध्द अभंग खाली दिले आहेत. विठोबाचे नाम गायिल्याने संसार सुखाचा होईल, कामक्रोध आदि गळून जातील वगैरे जो उपदेश इतर संतांनी केला होता तोच तिच्या पहिल्या अभंगांमध्येही आहे. विठ्ठलाच्या दर्शनामुळे मीपण गळून पडले, देहभान राहिले नाही वगैरे मनाची उन्मन झालेली अवस्था दुस-या अभंगात वर्णलेली आहे. तेराव्या शतकातल्या संत कान्होपात्रा, संत चोखामेळा आणि संत सोयराबाई या व्यक्ती त्या काळातल्या समाजाच्या तळागाळातल्या समजल्या जात होत्या असे त्यांच्यासंबंधी असलेल्या माहितीत सांगितले जाते. यावरून त्या बहुधा अशिक्षित असाव्यात असे वाटेल, पण हे अभंग पाहिले तर असे दिसते की त्यांनासुध्दा मराठी भाषा उत्तम प्रकारे अवगत होती आणि त्यांनी चांगल्या साहित्यरचना करून ठेवल्या आहेत.

सुखाचें हें नाम आवडीनें गावें ।
वाचे आळवावें विठोबासी ॥१॥
संसार सुखाचा होईल निर्धार
नामाचा गजर सर्वकाळ ॥२॥
कामक्रोधांचें न चलेचि कांही ।
आशा मनशा पाहीं दूर होती ॥३॥
आवडी धरोनी वाचें म्हणे हरिहरि ।
म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Sukhache_He_Naam

हा दुसरा अभंग किशोरीताईंनी किती अप्रतिम गायिला आहे हे ऐकाच.
अवघा रंग एक झाला । रंगि रंगला श्रीरंग ॥१॥
मी तूं पण गेले वाया । पाहतां पंढरीच्या राया ॥२॥
नाही भेदाचे ते काम । पळोनि गेले क्रोध काम ॥३॥
देही असोनि विदेही । सदा समाधिस्त पाही ॥४॥
पाहते पाहणें गेले दूरी । म्हणे चोखियाची महारी ॥५॥
किशोरी आमोणकर यांच्या आवाजात

————–
“त्वमेव माता पिता त्वमेव ..” असा एक संस्कृत श्लोक आहे, “तुमही हो माता पिता तुमही हो। …” असे त्याचे हिंदीमधले रूपांतरही प्रसिध्द आहे. “देव हाच आपला माता, पिता. भ्राता. त्राता, मित्र, सखा वगैरे सगळे काही असतो.” किंवा “माता, पिता. भ्राता. त्राता, मित्र, सखा वगैरे सगळी रूपे घेऊन देवच आपल्या पाठीशी सदैव उभा असतो.” अशी सुवचने ऐकण्यात आणि वाचण्यात येत असतात. सर्वव्यापी असा एकच परमेश्वर या सर्वांमध्ये अभिप्रेत असतो. पण संत नामदेव मात्र त्यांच्या परमप्रिय विठ्ठलाला या सर्व आप्तेष्टांच्या रूपांमध्ये तर पहातातच, शिवाय तीर्थक्षेत्रासारखे ठिकाण आणि देवपूजेसारखा विधी हे देखील खालील अभंगाप्रमाणे त्यांना विठ्ठलमय झालेले दिसतात.

तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल । देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल ॥१॥
माता विठ्ठल, पिता विठ्ठल । बंधु विठ्ठल, गोत्र विठ्ठल ॥२॥
गुरू विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल । निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल ॥३॥
नामा म्हणे मज विठ्ठल सापडला । म्हणुनि कळिकाळा पाड नाही ॥४॥
पं.भीमसेन जोशी यांनी गायिलेला हा अत्यंत लोकप्रिय अभंग

सर्व विश्वात भरलेला एकच परमेश्वर असला तरी हिंदू धर्मामध्ये त्याची उपासना अनेक नावांनी केली जाते. त्यातही लक्ष्मीनारायण आणि शंकरपार्वती अशा पतिपत्नींच्या काही जोड्या आहेत. त्यांच्यातल्या लक्ष्मी, पार्वती आणि अंबाबाई, भवानी, दुर्गा, काली वगैरे त्यांची रूपे मातेच्या ठिकाणी मानली जातात. भगवान विष्णू, महादेव, मारुती, गणपती आदि पुरुष देवांना कोणी “आई” अशी साद घातलेली सहसा ऐकण्यात किंवा वाचण्यात येत नाही. विठ्ठल हे भगवंताचे रूप मात्र याला अपवाद म्हणावे लागेल. विठोबा हा देवच मुळी त्याच्या भक्तांना फार जवळचा, अगदी घरातल्या व्यक्तीसारखा वाटतो. तो कुठे तरी दूर स्वर्गात, कैलास पर्वतावर किंवा वैकुंठधामामध्ये वास करत नसून त्याच्या भक्तांच्या अगदी जवळपास असतो. घरातल्या माणसांमध्येसुध्दा आईच सर्वांना अत्यंत जवळची असते. यामुळे अनेक संतांनी विठ्ठलाला प्रेमाने आई असे संबोधले आहे.

संत नामदेवांनीच लिहिलेल्या विठोबाच्या आरतीमध्ये त्याला आईच्या रूपामध्ये येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. आईच्या येण्याची आपण किती आतुरतेने वाट पहात आहोत हे लिहिल्यानंतर विठोबाची स्तुतीही केली आहे. एका अभंगामध्येसुध्दा नामदेवांनी असेच आवाहन करतांना विठ्ठलाला फक्त स्वतःची आई न म्हणता सर्व विश्वाची जननी असे संबोधित केले आहे आणि फक्त स्वतःला येऊन भेटण्याऐवजी सर्व भक्तांचा उध्दार करायला सांगितले आहे.

येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥
निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥
आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ॥
पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥
येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ १ ॥
पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ॥
गरुडावरी बैसून माझा कैवारी आला ॥
येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ २ ॥
विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी ॥
विष्णुदास नामा जीवेंभावे ओंवाळी ॥
येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ ३ ॥
पारंपारिक आरती

येई वो विठ्ठले भक्तजनवत्सले। करुणाकल्लोळे पांडुरंगे ।।१।।
सजलजलदघन पितांबरपरिधान । येई उद्धरणे केशिराजे भक्तजनवत्सले ।।२।।
नामा म्हणे तू विश्वाची जननी । क्षीराब्धीनिवासिनी जगदंबे ।।३।।

श्री.सुरेश वाडकर यांच्या गोड आवाजात
स्वतःला नामयाची दासी म्हणवून घेणा-या संत जनाबाईंनीसुध्दा विठ्ठलाला विठाबाई करून आईचे स्थान दिले आहे. तिला बोलावणे करतांना तिच्यासोबत भीमा आणि चंद्रभागा यांनाही घेऊन येण्याची विनंती जनाबाईंनी केली आहे. आशा भोसले यांनी गायिलेली या अभंगाची ध्वनिमुद्रिका प्रसिध्द असली तरी हा अभंग मी इतर काही सुप्रसिध्ध गायकांच्या शास्त्रीय संगीताच्या मैफलींमध्ये सुध्दा आळवून आळवून गायिलेला ऐकला आहे.
येग येग विठाबाई, माझे पंढरीचे आई ॥१॥
भीमा आणि चंद्रभागा, तुझे चरणीच्या गंगा ॥२॥
इतुक्यासहित त्वां बा यावें, माझे रंगणी नाचावें ॥३॥
माझा रंग तुझे गुणीं, म्हणे नामयाची जनी ॥४॥
आशा भोसले यांचे अजरामर गीत

चित्रपट या आजच्या युगामधल्या माध्यमातले प्रसिध्द गीतकार स्व.जगदीश खेबूडकर यांनी लिहिलेल्या एका गीतामध्ये त्यांनीसुध्दा “विठुमाऊली” अशी साद घालून तिला “तू माऊली जगाची” असे सांगतांनाच आपल्या माउलीत विठ्ठलाची मूर्ती पाहिली आहे.

विठुमाऊली तू माउली जगाची।
माउलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ।।ध्रु.।।

काय तुझी माया सांगु शिरीरंगा ।
संसाराचि पंढरी तू केली पांडुरंगा ।
डोळ्यांतून वाहे माय चंद्रभागा।
अमृताची गोडी आज आलीया अभंगा, विठ्ठला पांडुरंगा ।
अभंगाला जोड टाळचिपळ्यांची ।
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ।।१।।
लेकरांची सेवा केलीस तू आई ।
कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई ।
तुझ्या उपकारा जगी तोड नाही ।
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई, विठ्ठला मायबापा ।
जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची ।
माउलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ।।२।।

चित्रपट – अरे संसार संसार, संगीत – अनिल अरुण
गायक सुधीर फडके, जयवंत कुळकर्णी, सुरेश वाडकर
https://www.youtube.com/watch?v=0bt66pFaMro

 

<——- मागील भाग २                       पुढील भाग ४ ———>

विठ्ठल किती गावा ? (भाग २ )

विठ्ठल किती गावा ? (भाग २ )

संत तुकाराम महाराजांनी सुध्दा सर्वांगाने विठ्ठलाची भक्ती करण्याचा उपदेश दिला असला तरी वाणीमधून त्याचे गोड नाम घेण्यावर जास्त भर दिला आहे हे यापूर्वीच्या भागात पाहिले. संत नामदेवांचा जास्त भर विठोबाच्या दर्शनावर दिसतो. संत नामदेव महाराज विठ्ठलाचे अत्यंत लाडके भक्त समजले जातात. विठोबा त्यांच्याशी बोलतो, त्यांनी नैवेद्यासाठी दिलेली खीर प्रत्यक्ष प्रकट होऊन खातो वगैरे कथा प्रसिध्द आहेत. त्यांच्या अभंगांमध्येसुध्दा विठ्ठलाबरोबर असलेली त्यांची सलगी कधी कधी दिसून येते. विठ्ठलाच्या मुखाकडे पाहताच तहान भूक यांचाही विसर पडतो, पाप, ताप, दुःख नाहीसे होऊन जातात, वासना गळून पडतात. त्याला भेटतांना आईच्या कुशीत शिरल्यासारखा आनंद होतो. चकोर पक्षी चंद्राला पाहण्यासाठी आसुसलेला होऊन अत्यंत आतुरतेने त्याच्या उगवण्याची वाट पहात असतो, आकाशात ढग जमलेले पाहून मोराला आनंदाचे भरते येते आणि तो थुई थुई नाचू लागतो, अशाच प्रकारे नामदेवांनाही विठ्ठलाच्या मुखकमलाच्या दर्शनाची अतीव ओढ लागलेली असते आणि ते होताच त्यांना अत्यानंद होतो असे ते खाली दिलेल्या अभंगात सांगतात.

सुखाचें हे सुख श्रीहरी मुख ।
पाहतांही भूक तहान गेली ॥१॥
भेटली भेटली विठाई माऊली ।
वासना निवाली जिवांतील ॥२॥
चंद्रासी चकोर मेघासी मयूर ।
वाटे तैसा भर आनंदाचा ॥३॥
नामा म्हणे पाप आणि ताप दुख: गेले ।
जाहलें हें सुख बोलवेना ॥४॥

पं.जितेंद्र अणिषेकी

संत नामदेव महाराजांना विठ्ठलाच्या दर्शनाची किती तीव्र ओढ लागलेली असायची हे वरील अभंगात त्यांना सांगितले आहे. खालील अभंगात हेच व्यक्त करून विठोबाची भेट झाल्यानंतर काय काय करायचे त्यांनी मनात योजलेले असते त्याचीही यादी ते देतात. विठ्ठलाचे मुखकमल आधीच मनोरम आहेच, त्याच्या अंगाला उटी लावून, कपाळावर कस्तुरीचा टिळा लावून आणि जाईजुईच्या फुलांच्या माळा त्याच्या गळ्यात घालून त्याला अधिक सुशोभित आणि सुगंधित करायचे. हे झाल्यावर मग तर त्याच्या दर्शनाने डोळ्याचे पारणे फिटल्याशिवाय राहणार नाही.

पाहू द्या रे मज विठोबाचे मुख ।
लागलीसे भूक डोळां माझ्या ॥१।।
कस्तुरी कुंकुम भरोनिया ताटी ।
अंगी बरवी उटी गोपाळाच्या ।।२।।
जाई-जुई पुष्पे गुंफुनिया माळा ।
घालू घननीळा आवडिने ॥३।।
नामा म्हणे विठो पंढरीचा राणा ।
डोळिंया पारण होत असे ॥४।।
http://www.aathavanitli-gani.com/Song/Pahu_Dya_Re_Maj
विठ्ठलाच्या दर्शनाची इतकी गोडी संत नामदेवांना लागली होती की ते रोज त्रिकाल घेता यावे यासाठी पंढरपूरलाच कायमचे वास्तव्य करावे, फक्त या जन्मातच नव्हे तर जन्मोजन्मी ते करायला मिळावे अशी प्रार्थना ते विठोबाला करतात. पंढरीला रहायचे झाल्यास रोज चंद्रभागा नदीत स्नान, संतमंडळींचे दर्शन आणि विठ्ठलमंदिराच्या महाद्वारापाशी त्याचे कीर्तन वगैरे अनेक लाभ त्यातून मिळवता येतील. पंढरपूरच्या विठोबाच्या देवळाच्या पायरीपाशीच नामदेवांची समाधी आहे. त्यामुळे त्यांची ही इच्छा विठ्ठलाने मान्य केली असे दिसते. पण संत नामदेव कायम पंढरपूरला राहिले नाहीत, त्यांनी त्या काळात भारतभ्रमण केले, उत्तरेला अगदी पंजाबपर्यंत जाऊन आले आणि त्यांनी सगळीकडे भागवतधर्माचा प्रसार केला असे म्हणतात. त्यांनी लिहिलेल्या कृतींचा समावेश शीखधर्मीयांच्या ग्रंथसाहेबातसुध्दा केलेला आहे. त्याआधी ते पंढरीला केवढे मानाचे स्थान देतात ते या अभंगात लिहिले आहे.

पंढरीचा वास, चंद्रभागे स्‍नान ।
आणिक दर्शन विठोबाचे ॥१॥
हेची घडो मज जन्मजन्मांतरी ।
मागणे श्रीहरी नाही दुजे ॥२॥
मुखी नाम सदा संतांचे दर्शन ।
जनी जनार्दन ऐसा भाव ॥३॥
नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी ।
कीर्तन गजरी सप्रेमाचे ॥४॥
पं.भीमसेन जोशी

पंढरपूरला वास्तव्य करण्याची संत नामदेवांनी विठ्ठलाला मागणी केली होती हे वरील अभंगात स्पष्ट होतेच. पंढरीच्या रहिवाशांना ही संधी मिळत असल्यामुळे ते सगळे पावन झाले आहेत कारण त्यांचे देणे, घेणे, काम करणे वगैरे संपूर्ण जीवन कसे विठ्ठलमय आणि त्यामुळे आनंदमय झालेले आहे, हे त्यांनी पुढील अभंगात सांगितले आहे.

पंढरीचे जन अवघे पावन ।
ज्या जवळी निधान पांडुरंग ॥१॥
विठ्ठलनामें घेणें विठ्ठलनामें देणें ।
विठ्ठलनामें करणें सकळ काम ॥२॥
विठ्ठलनामी गोडी धरोनी आवडी ।
विठ्ठलनामीं बुडी दिल्ही जेणें ॥३॥
नामा म्हणे अवघें विठ्ठलचि झालें ।
विठ्ठलें दिधलें प्रेमसूख ॥४॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Pandhariche_Jan_Avaghe

संत नामदेवांनी विठ्ठलाच्या दर्शनावर अनेक अभंग लिहिलेले आहेतच, त्यांनीही विठ्ठलाच्या नाममहात्म्याबद्दलसुध्दा अभंग लिहिलेले आहेतच. त्यातल्या एका अभंगाला श्रीधर फडके आणि सुरेश वाडकर या द्वयीने नवीन पध्दतीच्या संगीतामधून खूपच श्रवणीय असे रूप दिले आहे.

विठ्ठल आवडी प्रेमभावो । विठ्ठल नामाचा रे टाहो ।
तुटला हा संदेहो । भवमूळ व्याधीचा ॥१॥
म्हणा नरहरी उच्‍चार । कृष्ण हरी श्रीधर ।
हेची नाम आम्हा सार । संसार करावया, प्रेमभावो ॥२॥
नेणो नामाविण काही । विठ्ठल कृष्ण लवलाही ।
नामा म्हणे तरलो पाही । विठ्ठल विठ्ठल म्हणताची ॥३॥
http://www.youtube.com/watch?v=gO8A_ivui7s

संत नामदेवांना विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागली आहे, त्याचे नामस्मरण करण्याची खूप इच्छा मनात उफाळली आहे, पण कां कुणास ठाऊक, ते इतस्ततः भरकटते आहे, मनात इतर विकार, वासना वगैरेंनी थैमान मांडले आहे, कधी झोपेची पेंग येते आहे, पण त्यांचे मन विठ्ठलाच्या नामावर एकाग्र होत नाही. यामुळे चिंतित होऊन ते देवालाच विचारतात की “आज माझे मन तुझे गोड नाव का घेत नाही आहे?, मी त्यासाठी आता काय करू?” यातल्या भावाचा काडीमात्र अर्थ मला लहान असतांना समजत नव्हता. “केशवा, पंढरीराया” अशी विठ्ठलाला हाक मारून पुन्हा “तुझं नावसुध्दा मनात का येत नाही?” असे नामदेव का म्हणत आहेत ते समजत नव्हते. पण त्याची अतीशय गोड चाल खूप आवडत असल्यामुळे स्व.माणिक वर्मा यांनी गायिलेले हे गाणे माझ्या मनात पक्के घर करून बसले आहे. माझ्या लहानपणीच्या टॉप टेन गाण्यात हे अजरामर गीत नक्कीच होते. आजही जुन्या सुगम संगीताच्या काही कार्यक्रमांमध्ये हे गाणे हमखास ऐकायला मिळते.

अमृताहुनी गोड नाम तुझे देवा ।
मन माझे केशवा का बा न घे ॥१॥
सांग पंढरीराया काय करु यांसी ।
का रूप ध्यानासी न ये तुझे ॥२॥
किर्तनी बैसता निद्रे नागविले ।
मन माझे गुंतले विषयसुखा ॥३॥
हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती ।
न ये माझ्या चित्‍ती नामा म्हणे ॥४॥
 माणिक वर्मा  https://www.youtube.com/watch?v=J0ePeuD4pWg

संत ज्ञानेश्वरांनी विठ्ठलभक्तांच्या संप्रदायाचा पाया घातला, संत नामदेवांनी त्यावर भव्य इमारत उभी केली आणि संत तुकारामांनी त्यावर कळस चढवला असे म्हंटले जाते. या संतशिरोमणी तुकोबांनी ज्ञानेश्वरांना “ज्ञानियांचा राजा गुरू महाराव” असे म्हंटले आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला संस्कृत भाषेत केलेल्या गीतोपदेशाची सविस्तर उकल मराठी भाषेत केल्याबद्दल “ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता” असे मराठी भाषा म्हणते असे गीतकार स्व.पी.सावळाराम लिहितात. संत ज्ञानदेवांचे ज्ञान, प्रतिभा, कल्पनाशक्ती वगैरे अलौकिक गुणांचा स्पर्श त्यांच्या काव्यरचनांना झालेला जाणवतो.

दृष्टी, ध्वनि, स्पर्श, गंध आणि चंव हे गुण आपल्या ज्ञानेंद्रयांकडून आपल्याला समजतात. यांच्या बाबतीत दुसऱ्याला आलेले अनुभव आपण स्वतःच्या अनुभवावरून समजून घेऊ शकतो. अॅबस्ट्रॅक्ट गोष्टींची फक्त कल्पनाच करू शकतो. आपल्या मनातली अमूर्त कल्पना स्पष्टपणे व्यक्त करून ती इतरांना सांगता येत नाही. यामुळे चराचरामध्ये व्यापलेला निर्गुण निराकार असा परमेश्वर सामान्य कुवतीच्या माणसाला समजणे फार कठीण आहे. ज्ञानमार्गाने जाणारे साधकच त्या संकल्पनेचा विचार करू शकतात. त्या मानाने सोपा असा भक्तीमार्ग संतांनी दाखवला, सर्वसामान्य लोकांना तो पटला आणि त्यांनी त्यानुसार त्याचा अवलंब केला. कोणत्याही दैवतावर भक्ती करण्यासाठी त्याचे एक सगुण साकार रूप असले तर त्याची मूर्ती किंवा चित्र आपण डोळ्यांनी पाहू शकतो, त्याचे वर्णन कानाने ऐकू शकतो किंवा बोलण्यातून व गायनातून करू शकतो. संत तुकारामांनी विठ्ठलाच्या गुणगानाला कसे महत्व दिले होते आणि संत नामदेवांनी त्याच्या दर्शनाला प्राधान्य दिले होते याची उदाहरणे आपण या आधीच्या भागांमध्ये पाहिली. ही सगळी त्याच्या सगुण रूपाची भक्ती होती.

संत ज्ञानेश्वरांनीसुध्दा विठ्ठलाला भेटण्याची आणि त्याला डोळे भरून पाहण्याची महती काही अभंगांमधून केली आहे. विठ्ठलाच्या भजनाची सुरुवात संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला रूपाचा अभंग गाऊन करायची वारकरी संप्रदायाची एक प्रथा आहे. काही देवळांमधले भजन नेहमी या अभंगापासून सुरू केले जाते. विठ्ठलाचे रूप पाहून खूप आनंद झाला, पूर्वपुण्याईमुळेच विठ्ठलाविषयी आवड निर्माण झाली असा साधा संदेश त्यांनी या अभंगात दिला आहे.

रूप पाहतां लोचनी । सुख जाले वो साजणी ।।१।।
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ।।२।।
बहुतां सुकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठली आवडी ।।३।।
सर्व सुखाचे आगर । बाप रखुमादेवीवर ।।४।।
पं.भीमसेन जोशी – https://www.youtube.com/watch?v=jccB-GulANQ

याच कल्पनेचा विस्तार करून हा आनंद मिळवण्यासाठी पंढरपूरला जाऊन त्याला भेटेन, मला माझ्या माहेरी गेल्याचे आणि माहेरच्या मायेच्या आप्तांना भेटण्याचे सुख त्यातून मिळेल, माझ्या पुण्याईचे फळ मला त्यात मिळेल, माझे सारे विश्वच आनंदाने भरून जाईन वगैरे वर्णन त्यांनी खाली दिलेल्या अभंगात दिले आहे.

अवघाचि संसार सुखाचा करीन ।
आनंदें भरीन तिन्ही लोक ॥१॥
जाईन गे माये तया पंढरपुरा ।
भेटेन माहेरा आपुलिया ॥२॥
सर्व सुकृतांचे फळ मी लाहीन ।
क्षेम मी देईन पांडुरंगी ॥३॥
बाप रखुमादेविवरु विठ्ठलेचे भेटी ।
आपुले संवसाटी करुनी राहे ॥४॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Avaghachi_Sansar_Sukhacha
मंजुषा कुलकर्णी पाटील – https://www.youtube.com/watch?v=PsEzUrh8O4M

संत ज्ञानेश्वर महाज्ञानी होते, निर्गुण परमेश्वराची उपासना करणे त्यांना साध्य होते, पण इतरेजनांसाठी विठ्ठलाच्या सगुण रूपाची भक्ती करणे शक्य आहे हे त्यांनी जाणले होते. यामुळे सगुण आणि निर्गुण या दोन्ही रूपांचा त्यांनी पुरस्कार केला. सगुण निर्गुण ही दोन्ही रूपे विलक्षण आहेत असे सांगतांना त्याच्या दृष्य (सगुण) रूपाचे कसलेच वर्णन न करता पतितांना पावन करणारा, मनाला मोह घालणारा अशासारखे त्याचे महात्म्य आणि ध्येय, ध्यास, ध्यान वगैरे मानसिक क्रियांमधून चित्ताला भेटणारा असा हा परब्रह्म हे विठ्ठलाचे वर्णन या अभंगात दिले आहे.

सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण । ब्रह्म सनातन विठ्ठल हा ।।१।।
पतितपावन मानसमोहन । ब्रह्म सनातन विठ्ठल हा ।।२।।
ध्येय ध्यास ध्यान चित्‍त निरंजन ।। ब्रह्म सनातन विठ्ठल हा ।।३।।
ज्ञानदेव म्हणे आनंदाचे गान । ब्रह्म सनातन विठ्ठल हा ।।४।।
माणिक वर्मा – https://www.youtube.com/watch?v=8n39AGuANEM

संगीताबरोबरच वाङ्मयाचासुध्दा सखोल अभ्यास केलेल्या पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी ज्ञानदेवांचे काही वैशिष्टपूर्ण असे अभंग निवडले, त्यांचा भावार्थ समजून घेऊन त्यांना अप्रतिम चाली लावल्या आणि लतादीदी व आशाताई यांनी त्या तितक्याच सुरेलपणे गायिल्या. यामधून काही अपूर्व अशी भक्तीगीते तयार झाली आहेत. पं.हृदयनाथ यांच्या बहुतेक सगळ्या कार्यक्रमांमध्ये यातली एक दोन तरी गीते असतातच. त्यावेळी त्यातल्या गहन अर्थाबद्दल जे निरूपण ते करतात तेसुध्दा त्या मधुर गाण्याइतकेच सुश्राव्य असते. विठ्ठलाचे गुणगान करण्यासंबंधीची त्यातली तीन गाणी खाली दिली आहेत.

घराजवळ कावळा कावकाव करायला लागला तर तो पाहुणा येणार असल्याची पूर्वसूचना देतो अशी एक समजूत आहे. त्याचा आधार घेऊन प्रत्यक्ष पंढरीनाथ विठोबाच येणार आहेत अशी कल्पना ज्ञानेश्वरांनी खाली दिलेल्या अभंगात रंगवली आहे. त्या विठ्ठलाबद्दल काही तरी सांग, तो कधी येणार आहे, केंव्हा भेटणार आहे हे सांगितलेस तर मी तुला दूधदहीभात खायलाप्यायला देईन, तुझ्या पायात सोन्याचे दागीने घालीन वगैरे लालूच त्याला दाखवतात, आपली आतुरता त्यातून दर्शवतात. या सगळ्यांच्या मागे गहन आध्यात्मिक अर्थ दडलेला असणार.

पैल तो गे काऊ कोकताहे ।
शकुन गे माये सांगताहे ॥१॥
उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ ।
पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥
दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी ।
जीवा पढिये तयाची गोडी सांग वेगी ॥३॥
दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी ।
सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥
आंबिया डहाळी फळें चुंबी रसाळीं ।
आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥
ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणें ।
भेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६॥
लता मंगेशकर – https://www.youtube.com/watch?v=fWJbLGI_Jv8

खाली दिलेल्या अभंगात त्यांनी सगुण आणि निर्गुण रूपांना एकत्र आणले आहे. विठ्ठलाच्या दिव्य तेजस्वी रूपाची शोभा केवळ अवर्णनीय आहे असे सांगून झाल्यावर पुढच्या कडव्यातल्या शब्दांवरून ‘कानडा हो विठ्ठलू’ची मूळ भाषा कानडी होती त्यामुळे पुढे ‘बोलणेच खुंटले’ आणि ‘शब्देविण संवादू’ झाला असे कोणाला कदाचित वाटेल, पण ते तसे नाही. कानडा या शब्दाचा अर्थ या अभंगात ‘आपल्याला न समजण्यासारखा, अगम्य, अद्भुत’ असा आहे. तो नाना तऱ्हेची नाटके रचत असतो, त्याची लीला दाखवीत असतो. ती पाहून मन थक्क होऊन जाते. त्याच्या दिव्य तेजाने डोळे दिपतात, त्याचे अवर्णनीय लावण्य पाहून मन मुग्ध होते. अवाक् झाल्यामुळे बोलायला शब्द सांपडत नाहीत, पण मनोमनी संवाद होतो. त्याच्या दर्शनाने दिग्मूढ होऊन कांही कळेनासे झाले. पाया पडायला गेले तर पाऊल सांपडेना इतकेच नव्हे तर त्याचे अमूर्त रूप आंपल्याकडे पाहते आहे की पाठमोरे उभे आहे ते सुध्दा समजत नाही. त्याला भेटण्यासाठी दोन्ही हांतानी कवटाळले पण मिठीत कांहीच आले नाही. असा हा ‘कानडा हो विठ्ठलू’ आहे. शरीरातील इंद्रियांकरवी तो जाणता आला नाही पण हृदयाने त्याचा रसपूर्ण अनुभव घेतला. असे त्याचे अवर्णनीय वर्णन ज्ञानोबारायांनी या अभंगात केले आहे. या अभंगाला अत्यंत मधुर अशी चाल पं.हृदयनाथ मंगेशकरांनी लावली आहे. त्यांच्याच ‘भावसरगम’ या कार्यक्रमात त्यांनी हा अभंग गातांना त्याविषयी ही माहिती सांगितली.

पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती ।
रत्‍नकीळ फांकती प्रभा ।
अगणित लावण्य तेजःपुंजाळले ।
न वर्णवे तेथीची शोभा ॥१॥
कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु ।
तेणें मज लावियला वेधु ।
खोळ बुंथी घेऊनि खुणाची पालवी ।
आळविल्या नेदी सादु ॥२॥
शब्देंविण संवादु दुजेंवीण अनुवादु ।
हें तंव कैसेंनि गमे ।
परेहि परतें बोलणें खुंटलें ।
वैखरी कैसेंनि सांगें ॥३॥
पाया पडूं गेलें तंव पाउलचि न दिसे ।
उभाचि स्वयंभु असे ।
समोर कीं पाठिमोरा न कळे ।
ठकचि पडिलें कैसें ॥४॥
क्षेमालागी जीव उतावीळ माझा ।
म्हणवूनि स्फुरताती बाहो ।
क्षेम देऊं गेलें तंव मीचि मी एकली ।
आसावला जीव राहो ॥५॥
आशा भोसले – https://www.youtube.com/watch?v=4lp6WHPA25Y

संत तुकाराम आणि संत नामदेव यांनी विठ्ठलाच्या नामाचा घोष, त्याच्या रूपाचे दर्शन वगैरेंमधला आनंद दाखवून दिला. संत ज्ञानेश्वरांनीही तो दाखवलाच, पण खाली दिलेल्या अभंगात ते सांगतात की त्याच्या सान्निध्यामुळे वातावरणात एक अद्भुत सुगंध दरवळला. मला त्यामधून त्याचे आगमन झाल्याचे समजले आणि पुढे होऊन त्याचे दर्शन घेतल्यावर तर माझे देहभान हरपून गेले. हे गोड गाणे लतादीदी आणि किशोरीताई या दोघींनीही गायिले आहे.

अवचिता परिमळू, झुळुकला अळुमाळू ।
मी म्हणु गोपाळू, आला गे माये ॥१॥
चांचरती चांचरती बाहेरी निघाले ।
ठकचि मी ठेलें काय करू ॥२॥
तो सावळा सुंदरू कांसे पितांबरू ।
लावण्य मनोहरू देखियेला ॥३॥
बोधुनी ठेलें मन तव जालें आन ।
सोकोनी घेतले प्राण माझे गे माये ॥४॥
बाप रखुमादेवीवरू विठ्ठल सुखाचा ।
तेणें काया मने वाचा वेधियेलें ॥५॥
लता मंगेशकर
किशोरी आमोणकर -https://www.youtube.com/watch?v=URiwSFKeN3s
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

 

<——- मागील भाग १                            पुढील भाग ३ ———>

विठ्ठल किती गावा ? (भाग १)

हा लेख मी चार वर्षांपूर्वी लिहिला असला तरी आजही तितकाच समर्पक आहे. मूळच्या आठ भागांचे एकत्रीकरण करून तो ३-४ भागांमध्ये देण्याचा प्रयत्न आहे. 

भाग १

बरोबर पंचावन्न वर्षांपूर्वी जून महिन्यात मी पुण्यनगरीत पहिल्यांदा पाऊल ठेवले. त्यापूर्वी या शहराबद्दल माझ्या वाचनात थोडे फार आले होते. ‘शिक्षणाचे माहेरघर’, ‘महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी’ वगैरे पुण्याची ख्याती होतीच. महात्मा फुले, लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे आदि थोर पुरुषांची ती कर्मभूमी होती. ना.सी.फडक्यांच्या कादंबऱ्यांमधली वर्णने वाचतांना ते एक रम्य आणि रोमँटिक ठिकाण वाटत होते. “रोज सकाळी फोडणीच्या वरणासोबत साधा भात आणि संध्याकाळी फोडणीचा भात आणि साधे वरण खाऊन उरलेली पै न पै शिल्लक टाकायची आणि त्या शिल्लकेमधून आयुष्याच्या अखेरीला (त्या काळातल्या गावाबाहेरच्या आणि ओसाड अशा) डेक्कन जिमखान्यावर ‘श्रमसाफल्य’ यासारख्या नावाची एक लहानशी बंगली बांधायची यात जीवनाची इतिकर्तव्यता मानणारा म्हणजे पुणेकर.” अशा अर्थाचे वाक्य पुलंनी एका ठिकाणी असे लिहिले होते. वाचलेल्या अशा काही वर्णनांमधून पुण्याची एक प्रतिमा मनात तयार झाली होती. डेक्कन जिमखाना म्हणजे श्रमपरिहार करण्यासाठी नेहमी निवांतपणे आरामखुर्चीवर बसून राहणाऱ्या वृध्दांचा शांत परिसर असावा आणि त्या भागातल्या शाळाकॉलेजांमधली मुले मुली थोडासा गोंगाट करून त्या शांततेचा भंग करीत असावेत अशी त्या भागासंबंधीची एक विचित्र कल्पना माझ्या मनात होती. त्यापेक्षा फारच वेगळे दृष्य मला पहिल्याच दिवशी तिथे पहायला मिळाले.

इंजिनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमधून निघून जंगली महाराज रोडवरून डेक्कन जिमखान्यापर्यंत फेरफटका मारतांना तो रस्ता माणसांनी तुडुंब भरलेला दिसला. बाजूच्या फर्ग्यूसन रोडवर तर त्याहीपेक्षा जास्त गर्दी होती. त्या काळातसुध्दा मुंबई म्हणजे अती गजबजलेले शहर होते, पण मला पुण्यामधली त्या दिवशीची गर्दी कमालीची वाटली. त्याहूनही जास्त आश्चर्याची गोष्ट अशी होती की धोतर नेसलेले, कपाळावर गंधाचा टिळा आणि बुक्का लावलेले आणि डोक्यावर पांढरी टोपी किंवा पागोटे धारण केलेले पुरुष आणि नऊ वार लुगडी नेसलेल्या स्त्रिया अशा खेडुतांची संख्या त्यात प्रचंड प्रमाणात होती. डेक्कन जिमखान्यासारख्या पॉश समजल्या जाणाऱ्या भागात मला याची अपेक्षा नव्हती. होस्टेलवरच्या अनुभवी विद्यार्थ्यांकडून याचा उलगडा झाला. आळंदीहून निघालेली ज्ञानेश्वर महाराजांची आणि देहूहून आलेली तुकाराम महाराजांची अशा दोन्ही पालख्यांचा त्या दिवशी पुण्यात मुक्काम होता. त्यापूर्वी मला या पालख्यांची माहिती नव्हती. तिथून ते सगळे वारकरी पुढे पायी चालत पंढरपूरला जाणार होते आणि आषाढी एकादशीपर्यंत तिथे पोचणार होते. ‘आषाढीकार्तिकी’ला पंढरपुरात ‘चंद्रभागातीरी’ गोळा होणा-या असंख्य ‘भक्तजनां’विषयी मी ऐकले होते, पण तिकडे जायला निघालेल्या भक्तांचा तो पुण्यातच जमा झालेला महासागर पाहून मी चकित होऊन गेलो. त्या गर्दीतले सगळेच भाविक लोक ‘विठूनामा’चा गजर करीत पंढरपूरपर्यंत चालत जाणारे नसले तरी न जाणारे लोक सुध्दा संतांच्या पालख्यांच्या दर्शनासाठी भक्तीभावाने तिथे जमले होते. मागे राहिलेले विठ्ठलभक्तसुध्दा एकादशीच्या दिवशी उपास करणार, घराजवळच्या देवळात जाऊन विठोबाचे दर्शन घेणार, निदान घरात ठेवलेल्या त्याच्या प्रतिमेची भक्तीभावाने पूजा करणार, त्याच्यासमोर अभंगवाणी गाऊन त्याची स्तुती आणि प्रार्थना करणार होते यात शंका नव्हती.

आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या वारीला पंढरीला जाणाऱ्या भाविकांची गर्दी दरवर्षी वाढत जाते आणि त्याचे नवनवे उच्चांक स्थापित होतात असेच दिसते. इतक्या लोकांच्या मनात हा अमाप भक्तीभाव, ही गाढ श्रध्दा वगैरे भावना कशामुळे उत्पन्न होतात याचा तर्कशुध्द उलगडा मला आजवर झालेला नाही. ज्याला विठ्ठल, विठोबा, विठूराया, पांडुरंग वगैरे अनेक नावांनी त्याचे भक्त आळवतात, विठाई, विठू माउली अशा नावांनीसुध्दा ज्याला संबोधतात, अशा त्या विठ्ठलाचे एवढे जबरदस्त आकर्षण कशामुळे निर्माण होते याबद्दल अनेक संतांनी त्यांच्या रचनांमध्ये सांगून ठेवले आहे. पिढ्यानपिढ्या लहानपणापासून ज्या लोकांच्या कानावर हे अभंग पडत गेले असतील, त्यांच्या मनावर त्यांचा अर्थ खोलवर बिंबत गेला असणार, आपल्या परंपराप्रिय समाजात वारीला जाण्याची प्रथा सुध्दा वडिलांकडून मुलाकडे अशी पुढे पुढे चालत राहिली असणार. पण तो उपक्रम नुसताच जुलुमाचा रामराम असता तर पुढल्या पिढीतल्या लोकांनी एकादे निमित्य दाखवून कधीच बंद करून टाकला असता. तसे न करता अधिकाधिक लोक उत्स्फूर्तपणे यात सामील होऊ लागले आहेत, याचा अर्थ त्यातून त्यांना आर्थिक फायदा नसला तरी मानसिक लाभ तरी मिळत असणार.

दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमाराला मुंबईपुण्यासह सगळ्या शहरांमध्ये खास सांगीतिक कार्यक्रम केले जातात. योजना प्रतिष्ठान या संस्थेतर्फे झालेल्या या अभंगवाणीच्या कार्यक्रमाला मी ओळीने अनेक वर्षे हजेरी लावलेली आहे. स्व.पं.शिवानंद पाटील, योजनाताई, अजित कडकडे, सुरेश वाडकर, साधना सरगम यासारख्या लोकप्रिय गायकांनी गायिलेले अभंग त्यात ऐकले आहेत. एकादशीच्याच दिवशी या कार्यक्रमाला येणे अनेक प्रेक्षकांना सोयीचे नसल्यास त्याच्या तीन चार दिवश आधीपासून ते ठेवले जातात. या मालिकेतल्या सगळ्याच कार्यक्रमांना सर्व वयोगटांमधल्या श्रोत्यांनी चांगली हजेरी लावली आणि नवोदित कलाकारांच्या गायनाला देखील उत्स्फूर्त दाद दिली.

या विठ्ठलाबद्दल इतिहासकाळामधल्या संतांपासून आजच्या युगातल्या गीतकारांपर्यंत अनेकांनी काय सांगितले आहे याचा अत्यंत त्रोटक आढावा या लेखमालिकेत घेण्याचा एक लहानसा प्रयत्न यंदाच्या वारीच्या निमित्याने मी करणार आहे. संतश्रेष्ठ तुकाराम यांच्यासाठी तर विठ्ठल हे त्यांचे सर्वस्व होते. काया, वाचा. मनसा ते सतत त्याचेच ध्यान करत असत. तो त्यांच्या चित्ती वास करत असला तरीसुध्दा त्याचे नाव जिभेवर घेतांना, त्याची गीते गातांना त्यांना अतीशय आनंद वाटत असे. त्यांना लौकिक धनदौलतीचा मोह नव्हताच. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना उंची वस्त्रालंकारांचा नजराणा भेट म्हणून पाठवला तेंव्हा ही संपत्ती आम्हाला तृणासमान आहे असे म्हणून त्यांनी तो साभार परत पाठवला. विठ्ठलाचे भजन गात असतांना साथीसाठी उपयोगी पडणारे टाळ आणि चिरळ्या त्यांच्यासाठी अनमोल द्रव्यासारख्या होत्या. विठ्ठलाचे नाव घेतल्याने त्यांना अमृताचा घोट घेतल्याप्रमाणे संजीवनी प्राप्त होत असे. त्यातून त्यांच्या सर्वांगाला चैतन्य मिळत असे.

विठ्ठल हा चित्तीं । गोड लागे गातां गीतीं ॥१॥
आम्हां विठ्ठल जीवन । टाळ चिपुळिया धन ॥२॥
विठ्ठल विठ्ठल वाणी । अमृत हे संजीवनी ॥३॥
रंगला या रंगे । तुका विठ्ठल सर्वांगें ॥४॥

विठ्ठलाची गीते गातांना त्यांच्या अंतरंगात होणारे परिणाम या अभंगात आहेत, तर या गायनभक्तीमुळे सर्वांचाच उध्दार व्हावा यासाठी खाली दिलेल्या अभंगातून ते सगळ्या जनतेला उपदेश करत असतात. विठ्ठलाचे मनात स्मरण करावे, मुखाने त्याची गीते गावीत आणि विटेवर उभे असलेले त्याचे रूप डोळ्यांनी पहावे असे ते सांगतात. हे करण्यामध्ये त्यांचाच फायदा कसा आहे हे पुढील कडव्यांमध्ये दिले आहे. अनाथ लोकांसाठी तो भाऊ होऊन त्यांची काळजी घेतो. हाच आशय जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे या अलीकडच्या गाण्यामध्ये आहे. आपला सध्याचा जन्म म्हणजे एक पासिंग फेज आहे. याच्या आधी अनेक जन्म होऊन गेले असतील आणि नंतरही होणार आहेत अशी हिंदू धर्माची परंपरागत शिकवण आहे. संत तुकारामाच्या काळात तर याबद्दल कोणालाही शंका नव्हती. त्यामुळे सर्वगुणसंपन्न आणि सर्वशक्तीमान विठ्ठलाला जो कोणी शरण जाईल त्याला तो मुक्ती देईल हे खूपच मोठे आमिष त्यांनी दाखवले आहे. त्याचे नाव घेऊन त्याचे गीत गातांना त्यात तल्लीन होऊन समाधी लागली तर त्या अनुभवामधून तोंड तर गोडावणारच ना ?

विठ्ठल गीतीं गावा, विठ्ठल चित्तीं ध्यावा ।
विठ्ठल उभा पहावा विटेवरी ॥१॥
अनाथांचा बंधु विठ्ठल कृपासिंधु ।
तोडी भवबंधु यमपाश ॥२॥
तो चि शरणांगतां विठ्ठल मुक्‍तिदाता ।
विठ्ठल या संतांसमागमें ॥३॥
विठ्ठल गुणनिधि विठ्ठल सर्वसिद्धि ।
लागली समाधि विठ्ठल नामें ॥४॥
विठ्ठलाचें नाम घेतां झालें सुख ।
गोडावलें मुख तुका म्हणे ॥५॥

https://www.aathavanitli-gani.com/Song/Vitthal_Giti_Gava

मी जो अभंगवाणीचा कार्यक्रम ऐकला होता त्यातल्या गायकाचे अस्पष्ट उच्चार, मायक्रोफोनमधून होणारे डिस्टॉर्शन आणि कदाचित माझ्या ऐकण्यात होणारी गफलत या सगळ्यांचा मिळून असा परिणाम झाला की मला हा अभंग सारखा “विठ्ठल किती गावा” असा ऐकू येत होता. मग मनात विचार आला की संत तुकारामांचे शब्द वेगळे असले तरी निरनिराळ्या संतांनी, कवींनी आणि गायकांनी विठ्ठलाचे गुणगायन किती प्रकारे केले आहे हे सांगणारा एक लेख लिहिण्यासाठी ‘विठ्ठल किती गावा’ हे शीर्षक चांगले आहे.

. . . . . . . . . . . . . . . . . . . . .. . .. .. . . . . .. .

५३० संत

आपल्या संतांच्या काळात फोटोग्राफर नव्हते की प्रिंटिंग प्रेस नव्हत्या. त्या काळातल्या चित्रकारांनी त्या विभूतींची चित्रे रंगवून ठेवली असली तरी ती आता कुठे असतील कोण जाणे? अलीकडल्या म्हणजे गेल्या शंभर वर्षांमधल्या काळात रंगवलेल्या त्यांच्या तसबिरीच आपल्याला घरोघरी पहायला मिळतात. यात संत ज्ञानेश्वर हे बहुधा मांडी घालून बसलेले आणि हातात पोथीचे एक पान धरून ते वाचतांना किंवा काही तरी नवे लिहितांना दिसतात, तर समर्थ रामदासस्वामी हातात कमंडलू घेऊन कुठे तरी जाण्याच्या तयारीत असतात. संत तुकारामांनी एका हातात छोटीशी वीणा आणि दुसऱ्या हातात चिपळ्या धरलेल्या दाखवतात. हे चित्र पाहता ते वीणेच्या झंकाराचा सुर आणि चिपळ्यांचा ताल धरून अभंग गात असावेत किंवा “जय जय रामकृष्ण हरी”, “जय जय विठ्ठल रखुमाई” असा नामघोष करत असावेत असे वाटते. विठ्ठलाच्या नावाचा उच्चार करणे किती आनंददायी आहे, तसेच लाभप्रद आहे हे तुकोबांनी आपल्या अनेक अभंगांमधून सांगितले आहे. “विठ्ठल हा चित्तीं । गोड लागे गातां गीतीं ॥” आणि “विठ्ठल गीतीं गावा, विठ्ठल चित्तीं ध्यावा ॥” या दोन अभंगांबद्दल मी या लेखाच्या वरील भागात लिहिले होते. संतश्रेष्ठ तुकारामांचेच अत्यंत अर्थपूर्ण आणि लोकप्रिय असे आणखी दोन अभंग खाली दिले आहेत.

फक्त वाचेनेच विठोबाचे गोड नाव उच्चारून तिथे थांबू नका, तर शरीराच्या इतर ज्ञानेंद्रियांना आणि मनालासुध्दा त्याचा लाभ घेऊ द्या असे पहिल्या अभंगात त्यांनी सांगितले आहे. डोळ्यांनी त्याची मूर्ती पहा आणि ते सुंदर रूप साठवून ठेवा, पण त्यावेळी मन मात्र त्याच्या चरणापाशी लीन झालेले असू दे, आपल्या जिवाचे कान करून विठ्ठलाचे गुणगान लक्षपूर्वक ऐका, असे केलेत तर देहभान हरपून जाईल, जिवाला विठोबापासून दूर होण्याची इच्छा होणार नाही. असे तुकाराम महाराज या अभंगात सांगतात. पुढल्या काळात पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात भक्तांची इतकी गर्दी होईल की कुणालाही त्याच्या पाया पडून एक मिनिटसुध्दा तिथे थांबू दिले जाणार नाही याची त्यांना कल्पना नसेल. देवाचे दर्शन घेण्यासाठी त्याने मानवाला डोळे दिले आहेत, त्याचे नाव घेण्यासाठी जिव्हा दिली आहे, ते ऐकण्यासाठी कान दिले आहेत, दान देण्यासाठी हात दिले आहेत वगैरे गोष्टी एका प्रसिध्द हिंदी संताच्या रचनेमध्येसुध्दा सांगितल्या गेल्या आहेत. संत तुकारामांचे सांगणे देखील साधारणपणे असेच आहे.

घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचें ॥१॥
डोळे तुम्ही घ्या रे सुख । पहा विठोबाचें मुख ॥२॥
तुम्ही ऐका रे कान । माझ्या विठोबाचें गुण ॥३॥
मना तिथें धांव घेई । राहे विठोबाचे पायी ॥४॥
रूपी गुंतले लोचन । पायी स्थिरावले मन ॥५॥
देहभाव हरपला । तुज पाहता विठ्ठला ॥६॥
तुका म्हणे जीवा । नको सोडूं या केशवा ॥७॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Ghei_Ghei_Majhe_Vache

हाच उपदेश तुकारामांनी खाली दिलेल्या अभंगातही केला आहे. विठ्ठलाच्या दर्शनाने, गुणगानाने मनातले काम. क्रोध लोभ आदी षड्रिपू मनातून चालले जातात आणि त्चांनी रिकामी केलेली पोकळी विठ्ठलाने भरली जाते. भक्त विठ्ठलमय होऊन जातो. असे संत तुकाराम या अभंगात सांगतात.

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥
येणें सोसें मन जालें हांवभरे । परती माघारें घेत नाहीं ॥२॥
बंधनापासुनि उकलल्या गांठी । देतां आली मिठी सावकाश ॥३॥
तुका म्हणे देह भरिला विठ्ठलें । कामक्रोधें केलें घर रीतें ॥४॥

हा अंभंग पं. जितेंद्र अभिषेकी आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर या दोन सुप्रसिध्द गायक गायिकांनी निरनिराळ्या पध्दतीने गायिला आहे हे या अभंगाचे एक वैशिष्ट्य आहे.
http://www.aathavanitli-gani.com/Song/Bolava_Vitthal_Pahava_Vitthal

संत तुकारांमांना स्वर्गलोकी जाऊन तीन साडेतीनशे वर्षे होऊन गेल्यानंतरच्या आजच्या काळातल्या कवींनीसुध्दा विठ्ठलाच्या नामाच्या उच्चारण्याबद्दल गीते लिहिली आहेत. खाली दिलेले गाणे आजच्या काळात लिहिले गेले असले तरी त्यात संतांच्या काळाचेच वर्णन केलेले आहे. “माझा मऱ्हाटाचि बोलू कवतुके। तरी अमृताते पैजा जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।” असे आत्मविश्वासाने लिहिणारे संत ज्ञानदेव, “पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती । चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग।।” असे सांगणारे संत चोखा मेळा आणि “नामा म्हणे तरलो पाही । विठ्ठल विठ्ठल म्हणताची ॥” अशी भावना बाळगणारे संत नामदेव हे सारे जण पंढरपूरच्या इंद्रायणीकाठी वाळवंटावर गोळा झाले आहेत. विठ्ठलाच्या नामसंकीर्तनात दंग झाल्याने ते निस्संग होऊन नाचत आहेत आणि त्यांच्यासाठी एकतारीच विठ्ठलाचे गीत गात आहे असे या गाण्यात कवीने लिहिले आहे. कवीच्या कल्पनेमध्ये हे संत प्रत्यक्षात एकाच वेळी पंढरपूरला एकत्र आले आहेत.

एकतारि गाते, गाते गीत विठ्ठलाचे ।
वाळवंटी ध्वजा, ध्वजा वैष्णवांची नाचे ।।
मराठीचा बोल, बोल जगी अमृताचा ।
ज्ञानियांचा देव, देव ज्ञानदेव नाचे ।।
नाचे चोखामेळा, मेळा नाचे वैष्णवांचा ।
नाचे नामदेव, देव कीर्तनात नाचे ।।
अनाथांचे नाथ, नाथ माझे दीनानाथ ।
भाग्यवंत संत, संत रूप अनंताचे ।।
http://www.aathavanitli-gani.com/Song/Ektari_Gate_Geet_Vitthalache

खाली दिलेल्या गीतात कवीने पांडुरंगाचे वर्णन एका विणकराच्या रूपकात केलेले आहे. एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे या गाण्यात हेच रूपक वापरले आहे. पण माझ्या आठवणीप्रमाणे खाली दिलेले गाणे जास्त जुने असावे. या गाण्यात त्या महान विणकराचे नामस्मरण करण्याचा संदेश दिलेला आहे. अक्षांश आणि रेखांशाचे आडवे, उभे धागे आहेत अशी कल्पना करून यामधून पृथ्वीचा पृष्ठभाग तयार झाला आहे (विठ्ठलाने अशी रचना केली आहे). अशी वेगळी (भौगोलिक स्वरूपाची) कल्पना कवीने केली आहे. आणि पृथ्वीपुरता विचार करायचा झाल्यास तेच सर्वात पहिले विणकाम असे म्हणता येईल. या गाण्याच्या दुस-या चरणात कवी माणसांच्या जगात येतो. हात आणि पाय ही त्याची कर्मेंद्रिये असली तरी मनाने (किंवा बुध्दीने) दिलेल्या आज्ञांचे ते फक्त यंत्रवत पालन करतात, म्हणून त्यांना मागाची उपमा दिली आहे. माणसांनी मनांमध्ये मने गुंतवून त्याचा बहारदार शेला विणावा, बंधुभावाच्या चरख्यावर एकजुटीचा मजबूत धागा तयार करावा वगैरे सूचना केल्या आहेत. त्यात विठ्ठलाच्या भक्तीपेक्षा चांगल्या आचरणावरच जास्त भर दिला आहे.

धागा धागा अखंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया ।।
अक्षांशाचे रेखांशाचे, उभे आडवे गुंफुन धागे ।
विविध रंगी वसुंधरेचे, वस्त्र विणिले पांडुरंगे ।
विश्वंभर तो विणकर पहिला, कार्यारंभी नित्य स्मरुया ।।१।।
करचरणांच्या मागावरती, मनामनांचे तंतू टाका ।
फेकुन शेला अंगावरती, अर्धी उघडी लाज राखा ।
बंधुत्वाचा फिरवित चरखा, एकत्वाचे सूत्र धरूया ।।२।।

http://www.youtube.com/watch?v=vNdCT3psfcA
. . . . . . . . . . . . . . . . . . . .

…………   पुढील भाग २

 

अनंतचतुर्दशी

मी हा लेख अनेक वर्षांपूर्वी एका अनंतचतुर्दशीच्या दिवशी लिहिला होता. कोरोनाच्या दहशतीमुळे मधली दोन वर्षे या दिवशी मोठ्या प्रमाणात गणपतींचे विसर्जन होत नव्हते. या वर्षी मात्र सगळे निर्बंध उठवले असल्यामुळे धूमधडाक्यात  विसर्जनाच्या मिरवणुकी निघाल्या आहेत. सगळीकडे ढोलाचे आवाज दुमदुमत आहेत.

‘अनंत’ या शब्दाने माझा लहानपणापासून पिच्छा पुरवला आहे. साठसत्तर वर्षांपूर्वी हे नाव खूपच प्रचलित असायचे. अनंतराव, अंतूशेठ, अनंता, अंत्या वगैरे नावांनी ओळखली जाणारी निदान शंभर तरी लहानमोठी मुलेमाणसे आमच्या गावात होती आणि त्यातली चारपाच तरी आमच्या अगदी जवळची आणि नेहमी आमच्या घरी येणारी होती. माझ्या आधीच्या पिढीतली ‘आनंद’ हे नाव धारण करणारी मोठी माणसे नव्हतीच आणि तेंव्हा या नावाची मुलेसुध्दा अनंतांच्या मानाने अगदी कमी होती. त्यामुळे कुठेही माझे नाव मी ‘आनंद’ असे सांगितले तरी ऐकणारा माणूस ते ‘अनंत’ असेच लिहून घेत असे आणि हे आजतागायत होत आले असल्याने मी केलेल्या खर्चासाठी मिळालेल्या शेकडो पावत्या ‘अनंत’ या नावाने फाडल्या गेल्या आहेत, या नावाने मला प्रवास करावा लागला आहे आणि या नावाने माझ्यासाठी उद्घोषणा (अनाउन्समेंट्स) झालेल्या ऐकून मी त्यांना प्रतिसाद दिला आहे. हळूहळू मलाही त्याचे काही वाटेनासे झाले.

सरकारदरबारी महत्व असलेल्या कागदपत्रांमध्ये मात्र माझे नाव चुकीचे लिहिले जाऊ नये यासाठी मला थोडी धडपड करावी लागली आणि ते तसे झाल्यानंतर त्या चुका दुरुस्त करून घेण्यासाठी अनेक हेलपाटे घालावे लागले आहेत.  मुंबईला स्थाइक झाल्यानंतरच्या काळात मात्र ‘अनंत’ नावाची माणसे भेटणे कमी कमी होत गेले आणि मला भेटणाऱ्या ‘आनंदां’ची संख्या वाढत गेली, काही चिदानंद, परमानंद, नित्यानंद आणि सदानंदही भेटले. नंतर त्यांची संख्याही कमी होत गेली आणि स्वानंद, आमोद वगैरे त्या नावाचे नवे अवतार येत गेले. सध्याच्या नव्या पिढीतले कोणतेच जोडपे त्यांच्या मुलाला ‘अनंत’ हे नाव आता ठेवत नसेल.

‘अनंत’ या नावाचा अर्थ खरे तर खूप मोठा आहे. ‘ज्याला अंत नाही’ असा तो होतो. अमित, अगणित, असंख्य, इन्फिनिटी यासारखी ही एक अचाट कल्पना आहे किंवा कल्पनातीत अशी संख्या आहे, त्याचा कालावधी कधीही न संपणारा इतका आहे. असे स्वरूप फक्त परमेश्वराचेच असू शकते. भगवान विष्णूच्या सहस्रनामांमधले हे एक प्रमुख नाव आहेच, पण नवनागस्तोत्राची सुरुवात अनंतं वासुकी शेषं अशी होते. केरळची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम् (त्रिवेन्द्रम्) येथील पद्मनाभस्वामीचे मंदिर खूप मोठे आणि प्रसिध्द आहे. त्याला अनन्तपद्मनाभदॆवालय असेही म्हणतात. त्यामधले अनंत हे नाव शेषाचे आहे की विष्णूचे आहे की त्या दोघांचे आहे असा संभ्रम पडतो. शेषशायी विष्णूची भव्य अशी आडवी मूर्ती या देवळात आहे.

अनंतचतुर्दशी हा वर्षातला एक दिवस अनंताच्या नावाने ओळखला जातो. भाद्रपद महिन्याच्या शुध्द चतुर्थीला हे नाव दिलेले आहे. या दिवशी अनंतचतुर्दशीचे एक व्रत केले जात असे. त्या दिवशी शेषशायी विष्णूच्या प्रतिमेची आणि एका विशिष्ट दोऱ्याची पूजा करून तो मंतरलेला दोरा मनगटावर गुंडाळायचा आणि पुढल्या वर्षी अनंतचतुर्दशीला पूजा करून तो बदलायचा असे चौदा वर्षे करायचे असे नियम होते. हे फार कडक व्रत आहे आणि ते पाळले गेले नाही तर फार मोठे दुष्परिणाम होतात वगैरे भीतीपोटी सहसा कोणी ते व्रत करत नसत. असे मी लहानपणी ऐकले होते. आता तर या व्रताचा मागमूसही कुठे दिसत नाही.

पण दरवर्षी अनंतचतुर्दशी प्रचंड प्रमाणात गाजते ती मात्र गणपतीविसर्जनासाठी. त्याचा गाजावाजा, गोंगाट आणि धामधूम वाढतच आहे. गणेशचतुर्थीला प्रतिष्ठापना केलेल्या गणपतीच्या मूर्तीची दहा अकरा दिवस भक्तीभावाने पूजा केल्यानंतर अनंतचतुर्दशीच्या दिवशी तिचे समारंभपूर्वक पाण्यात विसर्जन केले जाते. घरांमध्ये बसवलेल्या गणपतींच्या उत्सवांचे दीड, तीन, पाच, सात वगैरे दिवस कालावधी असतात. वंशपरंपरेमधून ते चालत आलेले असतात. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाल्यापासून त्यांचा कालावधी अनंतचतुर्दशीपर्यंत ठरवला गेला आणि त्याचे पालन होत राहिले आहे. ज्या मंडळांना इतके दिवस उत्सव करणे शक्य नसते ते आपल्या गणपतींचे विसर्जन आधी करून घेतात, पण बहुतेक सगळे प्रमुख गट मात्र त्यांच्या उत्सवमूर्तीचे अनंतचतुर्दशीच्या दिवशीच विसर्जन करतात. हा कार्यक्रम प्रचंड मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि त्यात सामील होणाऱ्यांची संख्याही अगणित असते.

नोकरीसाठी मी मुंबईला आल्यानंतर पहिली अनेक वर्षे माझे ऑफिस दक्षिण मुंबईत होते. अनंतचतुर्दशीच्या दिवशी बाहेर कुठेही मीटिंग किंवा व्हिजिटला जाण्याचा प्रश्नच नसायचा, आमच्या ऑफिसातली उपस्थितीही रोडावत असल्यामुळे त्या दिवशी महत्वाच्या बैठका ठेवल्या जात नसत. रस्त्यावरील तुडुंब वाहणारी गर्दी, त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी वगैरेंचा विचार करून दोन तीन तास आधीच घरी जाण्याची परवानगी मिळत असे. त्यानंतर आम्ही तीनचार मित्र मिळून ठिकठिकाणच्या मिरवणुका पहात हिंडत असू आणि आमच्या ग्रुपमधल्या शेवटच्या मित्राला कंटाळा येईपर्यंत फिरून झाल्यानंतर आपापल्या निवासस्थानी परतत असू.  लहानमोठे असंख्य गणपती, त्यांचे देखावे वगैरेंमधून त्याची कोटीकोटी रूपे त्या काळात मला पहायला मिळाली. लग्न झाल्यानंतर  मात्र या तोबा गर्दीत सहकुटुंब जाणे आणि परतणे शक्य नसल्यामुळे आम्ही थोडा लहानसा फेरफटका मारून सुखरूप परतत होतो.

योजना प्रतिष्ठानशी आमचा संबंध आल्यानंतर दर वर्षी अनंतचतुर्दशीला एक वेगळा कार्यक्रम निश्चित झाला. परळच्या ऑव्हरब्रिजला लागूनच असलेल्या एका चाळीतल्या खोलीत या प्रतिष्ठानातर्फे दरवर्षी अनंतचतुर्दशीच्या दिवशी संगीत भजनाचा लहानसा घरगुती पण चांगल्या दर्जाचा कार्यक्रम केला जात असे आणि त्यात स्व.शिवानंद पाटील, योजनाताई आणि त्यांचे निवडक शिष्यगण भक्तीपूर्ण गायनसेवा सादर करीत असत. बाहेरील रस्त्यावरून जात असलेल्या मिरवणुकांमध्ये चाललेला ढोलताशांचा गजर आणि त्याच्यावर आवाज काढून बंदिस्त खोलीत केलेले ते गायन यात एक वेगळा रंग येत असे. संध्याकाळच्या सुमारास घरी परत येतांना आमची बस मुंगीच्या पावलाने चालत असे आणि उलट दिशेने समुद्राकडे जाणारे खूप गणपती पहायला मिळत असत.

आज अनंतचतुर्दशी आहे. मुंबई, पुणे, नागपूर, इन्दौर वगैरे सर्वच प्रमुख शहरांमध्ये या विसर्जनांच्या भव्य मिरवणुकी निघायला सुरुवात झाली आहे. प्रत्येक मंडळामधील गणपतीसोबत त्या भागातले किंवा त्याच्याशी संबंधित असलेले सगळे लोक त्या मिरवणुकींमध्ये सामील होतातच, शिवाय या मिरवणुकी पहायला ज्याला ज्याला शक्य असेल तो त्या पहायला जातो. मुंबईला मोठा समुद्रकिनारा लाभलेला असल्यामुळे गिरगाव, दादर, जुहू वगैरे अनेक ठिकाणी हे विसर्जन होते, पण त्यांच्या जागा ठरलेल्या आहेत. लालबागपासून दादर जवळ असले तरी लालबागचा राजा आणि त्या भागातले मोठे गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवरच वाजत गाजत नेले जातात. टेलिव्हिजनवर या मिरवणुकींचे वृत्तांत दाखवले जात असल्याने घरात राहिलेले सगळेजण आता टीव्हीसमोर बसलेले आहेत. तेंव्हा मीसुध्दा हा लेख इथे आटोपता घेऊन आता तिकडे चाललो आहे.
गणपतीबाप्पा मोरया । पुढच्या वर्षी लवकर या।।

हा लेख पूर्वी लिहिलेला आहे आणि यात वर्णन केलेली मिरवणुकींची धमाल दर वर्षी होत असे. या वर्षी (२०२० साली) कोरोनोच्या दहशतीमुळे सगळीकडे सामसूमच आहे.
—————————————–

आधी वंदू तुज मोरया

गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया असे एक लोकप्रिय गीत आहे. आपण प्रत्येक महत्वाच्या कामाचा शुभारंभ गणपतीच्या स्तवनाने करतो. पूर्वीच्या काळात ‘श्रीगणेशायनमः’ लिहून मुलांची अक्षर ओळख होत असे. बालमानसशास्त्र वगैरेचा विचार करून आता ‘गमभन’ ने सुरुवात केली तरी त्यात सुध्दा सर्वात पहिल्यांदा ‘ग गणेशाचा’च येतो. सर्व मंत्रांची सुरुवात ओंकाराने होते. इतर देवतांच्या पूजेच्य़ा आधी गणपतीची पूजा केली जाते. कुठल्याही पोथीचे वाचन श्रीगणेशायनमः ने सुरू होते. अशा प्रकारे सर्व धार्मिक कृत्यात तसेच इतर महत्वाच्या प्रसंगी श्रीगजाननाला अग्रपूजेचा मान मिळतो. ही प्रथा पूर्वीपासून चालत असावी. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथाची सुरुवात ॐ नमोजी आद्या या गणेसस्तवनाने सुरू केली होती. विठ्टलभक्त संत तुकाराम, आणि श्रीरामाचे परमभक्त समर्थ रामदास यांनी सुध्दा गणपतीची स्तुती करण्यासाठी सुंदर रचना केल्या आहेत.

असे असले तरी जसे एकादे यंत्र सुरू होऊन व्यवस्थितपणे चालायला लागले की त्याचे स्टार्ट बटन किंवा सर्किट बाजूला राहते, त्याप्रमाणे एकादी मोठी पूजा करतांना सुरुवातीला गणेशपूजा झाल्यानंतर शेवटी आरतीच्या वेळेपर्यंत गणेशाची आठवण रहात नाही. उत्तर आणि दक्षिण भारतात बहुतेक सर्व देवतांच्या मंदिरात प्रवेशद्वारावरती किंवा एकाद्या कोनाड्यात गणपतीची प्रतिमा असते. अशा प्रकारे तो सगळीकडे उपस्थित असतो, पण खास गणपतीची प्रसिध्द मंदिरे मुख्यतः महाराष्ट्रात दिसतात. पुण्याच्या आजूबाजूच्या प्रदेशात प्रसिध्द अष्टविनायक आहेत. त्याखेरीज पुळ्याचा गणपती, दिवेआगरचा सोन्याचा गणपती, पुण्यातला कसबा गणपती, मुंबईचा सिध्दीविनायक वगैरे देवस्थानांच्या ठिकाणीही भक्तांची गर्दी असते.

कोकणातून बाळाजी विश्वनाथ भट पुण्याला आले आणि त्यांना पेशवेपद मिळाले. पुढील सुमारे शंभर वर्षाच्या काळात मराठ्यांच्या साम्राज्याची धुरा पेशव्यांकडे होती. गणपती हे पेशव्यांचे कुलदैवत होते आणि त्याच्या कृपाप्रसादानेच त्यांची भरभराट झाली अशी त्यांची श्रध्दा असल्यामुळे पुणे शहरात आणि त्याच्या परिसरात गणेशाच्या उपासनेला महत्वाचे स्थान प्राप्त झाले. पेशव्यांनी त्यांच्या शनिवारवाडा या निवासस्थानात गणेशोत्सव सुरू केला आणि तो धामधुमीत चालवला. पटवर्धन, रास्ते, मेहेंदळे आदि कोकणातली काही कुटुंबे पेशव्यांबरोबर पुण्यात आली आणि सरदारपदापर्यंत त्यांची प्रगती झाली. त्यांनीसुध्दा आपापल्या वाड्यात आणि संस्थानात गणपतीची सुरेख मंदिरे बांधली आणि त्याची भक्तीभावाने उपासना केली. पण हे सगळे मुख्यतः व्यक्तीगत पातळीवर चालायचे आणि त्यांच्या खास मर्जीतले लोकच त्यात सहभागी होत असत.

पुण्यातच राहणा-या लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाचे महत्व ओळखून त्याला सार्वजनिक रूप दिले आणि त्या निमित्याने लोकसंग्रह सुरू केला. भारतीय लोकांच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करायचा नाही असे इंग्रजांचे धोरण असल्यामुळे त्यांनी त्याला विरोध केला नाही आणि पौराणिक गोष्टींच्या आधाराने भारतीयत्वाचा विचार पसरवणे लोकमान्यांना शक्य झाले. त्यांनी सुरू केलेला उत्सव लोकप्रिय होत गेला आणि आता तर गणेशोत्सव ही महाराष्ट्राची एक ओळख झाली आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यात आणि परदेशातसुध्दा अनेक ठिकाणी तो उत्साहाने साजरा होत आहे.
या गणेशोत्सवाच्या दिवसात श्रीगजाननाला शतशः सादर प्रणाम.

मूषक आणि माउस

मूषक माउस

घोडा, बैल, रेडे, उंट यासारख्या प्राण्यांना पाळीव बनवून माणसाने त्यांचा उपयोग आपली ओझी वाहण्यासाठी प्राचीन काळातच सुरू केला. राजा महाराजांकडे पाळलेले हत्तीसुध्दा असत. जगाच्या कांही भागात गाढवे आणि खेचरे यांचा उपयोग वहनासाठी केला जाऊ लागला. ध्रुवप्रदेशात स्लेज ओढण्यासाठी कुत्र्यांचा उपयोग होतो. आकाराने त्याहून लहान असलेल्या मांजरीचे पालन मात्र बहुतेक करून फक्त जवळ घेऊन कुरवाळण्यासाठी आणि घरात शिरू पाहणा-या उंदरांवर अंकुष ठेवण्यासाठी होते. उंदीर हा मात्र कधीच घरातला पाळीव प्राणी बनला नाही. प्रयोगशाळांमध्ये उंदीर पाळून त्यांच्यावर प्रयोग करण्यात येतात, तेवढाच याला अपवाद म्हणायचा.

त्यामुळे उंदीर हा प्राणी एक वाहन म्हणून कधीच आपल्या डोळ्यासमोर येत नाही, पण गणपतीचे वाहन मात्र उंदीर मानले जाते. मोर हा मोठ्या आकाराचा पक्षी सुध्दा गणपतीचे वाहन म्हणून ओळखला जातो. त्यावरून मयूरेश, मोरेश्वर आदि नांवे गजाननाला दिली आहेत. याचा उलगडा करण्यासाठी गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारात त्याची वेगवेगळी वाहने होती असा खुलासा केला जातो. उंदीर हे गणपतीचे वाहन कसे बनले यासंबंधी एक पौराणिक कथा प्रसिध्द आहे. मूषकराज नांवाच्या दैत्याला गजाननाने पराभूत केल्यानंतर तो शरण आला आणि त्याने गयावया करून गणपतीचे वाहन होण्याचे कबूल केले असे सांगतात.

या गोष्टीचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न कांही विद्वानांनी केला. प्राचीन काळात मूषक या नांवाने ओळखली जाणारी एक जमात होती. ते लोक चांचेगिरी करत असत. सर्व गणांचा प्रमुख असलेल्या गणाधिपाच्या नेतृत्वाखाली त्यांचा पाडाव केल्यानंतर त्यांनी शरणागती पत्करून गणपतीचे दास्यत्व स्वीकारले असा निष्कर्ष कोणा विद्वानाने काढला आहे. उंदीर हा प्राणी देखील एक उपद्रव देणारा प्राणीच समजला जातो. बिळातल्या चोरवाटेने घरात शिरून तो अन्नधान्य, कागदपत्रे, कपडेलत्ते वगैरे सगळ्यांची नासधूस करत असतो. त्यावरून तसे करणा-या मूषक जमातीचे नांव पडले असेल आणि त्यांना आटोक्यात आणणा-या गणपतीला त्याच्यावर स्वार झालेले दाखवले गेले असेल.

उंदीर हा उपद्रवी असला तरी अत्यंत चपळ आणि तल्लख प्राणी आहे. त्याला मारण्यासाठी मांजर पाळले तरी अनेक वेळी तो त्याला मुळीच दाद देत नाही. टॉम अँड जेरीच्या कारटून्समध्ये तर जेरीच्या उपद्व्यापामुळे नेहमी टॉम अगदी जेरीला आलेला दिसतो. टॉम अँड जेरी, मिकी माऊस यासारख्या कारटून्समधून उंदीरमामा लहान मुलांचा लाडका तर झाला आहेच, केसरी टूरबरोबर फिरत असतांना मोठी माणसे सुध्दा प्रत्येक प्रवासाच्या सुरुवातीला गणपतीबाप्पा मोरया च्या बरोबर उंदीरमामाकी जय चा गजर करत असत.

संगणकक्रांती आल्यापासून माऊस नांवाच्या आधुनिक उंदीरमामाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. या माऊसला हाताशी धरून आपण काँप्यूटरकडून विविध प्रकारची कामे करून घेतोच, आंतर्जालावर भ्रमण करून विश्वरूपदर्शन करून घेऊ शकतो. हे काम कधी इतके सोपे होऊ शकेल असे पूर्वीच्या काळात स्वप्नातसुध्दा वाटले नव्हते. गणपती या बुध्दीच्या देवतेच्या उपासकांना गणपतीचे हे वाहन मनाने क्षणार्धात कुठल्या कुठे घेऊन जाते. एकाद्या शब्दावरून त्याबद्दल असलेली प्रचंड माहिती शोधयंत्रावरून आपल्याला चुटकीसरशी मिळू शकते. अशा प्रकारे या माऊसने आपल्याला ज्ञानमार्गातील नवनव्या गोष्टींच्या अगदी जवळ आणले आहे.