स्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान – भाग १०-१२

स्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान …. (खास पुरुषांसाठी)
मागील भाग —
भाग ७ – ९ अग्निदिव्य व विजेचा उपयोग
https://anandghare2.wordpress.com/2022/11/30/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%af%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8-3/

भाग १०. थंडगार

चूल, शेगडी किंवा भट्टीमध्ये आग निर्माण करून त्यावर अन्न शिजवणे म्हणजे स्वयंपाक असे हजारो वर्षांपासून होत आले आहे. पण घरोघरी विजेचा पुरवठा सुरू झाल्यानंतर त्यात क्रांतीकारक बदल झाले. रेफ्रिजरेटर किंवा शीतपेटीची निर्मिती हा त्यातला आणखी एक महत्वाचा बदल मागील शतकामध्ये घडला. माझ्या लहानपणी म्हणजे साठ वर्षांपूर्वी ही थंडगार कपाटे बाजारात आली होती, पण त्या काळात ती खूपच महाग आणि आमच्या आवाक्याच्या पलीकडे असायची. हळू हळू काही लोकांनी कुतूहलापोटी, काहीजणांनी हौसेपोटी आणि काही जणांनी त्यांच्या श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यासाठी फ्रिज खरेदी करून घरी आणले आणि ते घराच्या दर्शनी भागात मांडून ठेवले. पुढे त्यांची संवय झाली, उपयुक्तता पटली, गरज वाटायला लागली आणि किंमती आवाक्यात आल्या, त्यामुळे रेफ्रिजरेटर हा मध्यमवर्गामध्ये सर्वसामान्य स्वयंपाकघरांचा महत्वाचा भाग होऊन बसला. त्यातल्या थंडगार वातावरणात कुठलीही डाळ किंवा तांदूळ शिजणे शक्यच नसते, पण आइस्क्रीम, जेली, कस्टर्ड, कुल्फी यासारखे नवे शीत पदार्थ तयार करणे मात्र त्यामुळे शक्य झाले. उन्हाळ्यात थंडगार पाणी पिण्याची तसेच शीतपेये (कोल्ड ड्रिंक्स), फळांचे रस (फ्रूट ज्यूसेस), पन्हे, सरबते वगैरेंची चांगली सोय झाली.

रेफ्रिजरेटरमागील विज्ञान आणि तंत्रज्ञान अर्थातच वेगळ्या प्रकारचे आहे. आतापर्यंत पाहिलेल्या स्वयंपाकाच्या उपकरणांमध्ये ऊष्णता निर्माण केली जात होती, फ्रिजमध्ये याच्या नेमके उलट घडते. म्हणजे त्यात ठेवलेल्या अन्नामधली ऊष्णता शोषून घेतली जाते. हे कसे घडत असेल हे समजून घेण्यासाठी आपण एक ओळखीचे उदाहरण घेऊ.

आजकाल शहरातल्या बहुतेक सगळ्या इमारतींच्या आवारात जमीनीखाली एक पाण्याची टाकी बांधलेली असते. तसेच प्रत्येक इमारतीच्या गच्चीवर आणखी एक पाण्याची टाकी ठेवलेली असते आणि घरातले नळ त्या टाकीला जोडलेले असतात. घरातली पाण्याची तोटी सोडली की गच्चीवरील टाकीमधले पाणी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पाइपमधून खाली येते आणि तोटीमधून आपोआप बाहेर पडते. पण उंच पातळीवरून खाली येणे हा पाण्याचाच गुणधर्म समजला जातो. “आकाशात् पतितम् तोयम् यथा गच्छति सागरम् ” (आकाशामधून पडलेले पाणी जसे समुद्राकडे वहात जाते) असे एका पुरातन संस्कृत श्लोकात म्हंटलेले आहे. पाण्याप्रमाणे ऊष्णतासुद्धा नेहमी तिच्या उच्च पातळीवरून खालच्या पातळीकडे म्हणजे जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहते. कुठल्याही नदीचा प्रवाह समुद्राकडून पर्वतशिखरांकडे उलट्या दिशेने वाहू शकत नाही, त्याचप्रमाणे ऊष्णतासुद्धा कधीही थंड पदार्थाकडून गरम पदार्थाकडे वहात नाही.

जमीनीखाली असलेल्या टाकीमधले पाणी आपोआप इमारतीच्या गच्चीवर असलेल्या टाकीमध्ये जाणे शक्य नसते. त्यासाठी यांत्रिक पंप बसवलेले असतात. या पंपामधले चक्र वेगाने फिरवले की त्यातले पाणी पंपाच्या डिस्चार्ज पोर्टमधून वेगाने बाहेर फेकले जाते आणि त्या गतीमुळे ते पाणी पाइपामधून चढून गच्चीवरील टाकीमध्ये जाऊन पडते. या क्रियेमध्ये पंपात रिकामी झालेली जागा भरून काढण्यासाठी जमीनीखालील टाकीमधले पाणी वर खेचले जाते. रेफ्रिजरेटरमध्ये एक प्रकारचा ऊष्णतेचा पंप असतो. हा पंप फ्रिजमधील हवा व पदार्थ यांच्यामधील ऊष्णता खेचून घेतो आणि फ्रिजच्या मागील बाजूला असलेल्या नळ्यांच्या जाळीमधून हवेत फेकतो. यामुळे आतले पदार्थ थंड होतात आणि मागील बाजूची हवा गरम होते.

बहुतेक सगळ्या रेफ्रिजरेटरांमध्ये फ्रीझर नावाचा अतिशीत विभाग असतो. फ्रीझ या शब्दाचा अर्थच गोठणे असा आहे. या भागातले तापमान शून्य अंश सेल्सियसच्याही खाली ठेवले जाते. या तापमानाला पाणी गोठून त्याचे बर्फात रूपांतर होते. रेफ्रिजरेटरचा उरलेला भाग त्या मानाने कमी थंड ठेवला जातो कारण त्याात ठेवलेले पदार्थ आपल्याला गोठायला नको असतात. त्या भागातले तापमान शून्य अंशापेक्षा दोन चार अंश जास्त असते. रेफ्रिजरेटरचे यंत्र सुरू झाले की आतला भाग थंड व्हायला लागतो आणि आपण केलेल्या सेटिंगप्रमाणे तो पुरेसा थंड झाला की मशीन (काँप्रेसर) आपोआप बंद होते. फ्रिजचा दरवाजा उघडला की बाहेरील ऊष्ण हवा आत जाते, तसेच आपण गरम पदार्थ आत ठेवतो यामुळे रेफ्रिजरेटरमधले तापमान जरासे वाढले की लगेच त्याचे मशीन सुरू होते आणि आतले तापमान ठरलेल्या पातळीपर्यंत खाली येईस्तोवर ते यंत्र चालत राहते. अशा प्रकारे रेफ्रिजरेटरमधले तापमानाचे स्वयंचलित नियंत्रण (ऑटोमॅटिक कंट्रोल) होत असते.

रेफ्रिजरेटरचा उपयोग करून काही विशिष्ट थंड खाद्यपदार्थ तयार केले जातात किंवा काही खाद्यपदार्थांसाठी लागणारा पिठाचा गोळा तयार केल्यावर तो घट्ट होण्यासाठी थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवला जातो असे त्याचे उपयोग असले तरी रेफ्रिजरेटरचा मुख्य उपयोग हा खाद्यपदार्थ टिकवण्यासाठी केला जातो. ते समजून घेण्यासाठी पदार्थ का नासतात हे माहीत असणे आवश्यक आहे. आपल्या घरांमधील हवा आणि पाणी यांमध्ये लक्षावधी प्रकारचे अतिसूक्ष्म जीवजंतु वावरत असतात. दमट आणि उबदार हवेत त्यांची प्रचंड वेगाने वाढ होते. भाज्या, फळे यांचेसारख्या पदार्थांवर ते जंतु (बॅक्टेरिया, फंगस वगैरे) बसले की कुजण्याची रासायनिक क्रिया सुरू होते. त्या जंतूंची जास्त वाढ झाल्यावर ते बुरशीच्या रूपात दिसतात आणि भाज्या, फळे यांची चंव बदलते, त्यांना घाण वास येऊ लागतो. शिजवलेले अन्न तर त्या जंतूंना फारच आवडते. त्यांचा पराक्रम काही तासांमध्ये दिसू लागतो. रेफ्रिजरेटरच्या थंड तापमानात या जंतूंची वाढ अत्यंत कमी वेगाने होत असल्यामुळे तिथे ठेवलेले अन्न हळू हळू नासत जाते व बराच काळ किंवा काही दिवस सुद्धा टिकते.

फ्रीझरच्या कप्प्यामध्ये ठेवलेल्या अन्नामधील सगळे पाणी गोठून त्याचा बर्फ होत असल्यामुळे तिथे या जंतूंचा टिकाव लागत नाही आणि ते पदार्थ महिनेच्या महिनेसुद्धा टिकू शकतात. पण त्याबरोबर शिजवलेल्या किंवा तळलेल्या अन्नाची सगळी चंवसुद्धा निघून जात असल्यामुळे ते न नासता टिकले तरी फारसे खाण्याजोगे रहात नाहीत. आयस्क्रीम, कुल्फी वगैरे पदार्थ फ्रीझरमध्ये ठेवले नाहीत तर वितळून जातात यामुळे ते मात्र फ्रीझरच्या कप्प्यातच ठेवावे लागतात.

. . . . . . . . . . . .

स्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान – भाग ११ – स्वयंपाक आणि आरोग्य

स्वयंपाक करत असतांना स्वयंपाकघरात जी निरनिराळी कामे केली जातात त्यांच्यामागे असलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान याआधीच्या दहा भागांमध्ये दिले आहे. मुळात स्वयंपाक कशासाठी करतात? त्यामागे कोणती उद्दीष्टे असतात? याबद्दल सुद्धा शरीरशास्त्र आणि आरोग्यशास्त्राच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. आपल्या शरीरामधील हृदय, फुफ्फुसे, मेंदू, यकृत, मूत्रपिंड आदि इंद्रिये दिवसरात्र काम करत असतात, त्यांच्या आणि इतर अवयवांच्या हालचालींसाठी ऊर्जा (एनर्जी) पुरवणे आणि शरीराची झीज भरून काढणे यासाठी अन्नाची गरज लागते. आपण खातो ते अन्न शरीराला पोषक असावे आणि त्या अन्नाच्या खाण्यापासून शरीराला अपाय होऊ नये हे स्वयंपाकामागील मुख्य उद्देश असतातच, शिवाय ते खाण्यामधून आपल्याला आनंद मिळावा हा देखील आणखी एक जरा जास्तच महत्वाचा हेतू चांगला स्वयंपाक करण्यामागे असतो. कित्येक लोक तर जगण्यासाठी खातात की खाण्यासाठी जगतात असा प्रश्न कधी कधी पडावा इतकी खाण्यापिण्याची आवड त्यांना असते.

आपण रोज जे अन्न खातो त्याचे ढोबळ मानाने तीन प्रमुख घटक असतात, कर्बोदके (कार्बोहायड्रेट्स), प्रथिने (प्रोटीन्स) आणि स्निग्ध पदार्थ (फॅट्स). ज्वारी, तांदूळ, गहू आदि तृणधान्ये आणि साखर यांच्यात असलेल्या कर्बोदकांपासून शरीराला मुख्यतः ऊर्जा मिळते, तेल, तूप, लोणी वगैरे स्निग्ध पदार्थांपासूनसुद्धा ऊर्जा मिळते तसेच स्निग्धपणा मिळतो आणि तूर, चणा, मूग, वाटाणा आदि कडधान्यांमधील प्रथिनांपासून नव्या पेशी तयार होऊन स्नायूंची झीज भरून निघते. याशिवाय आपल्या शरीराची कामे व्यवस्थितपणे चालत राहण्यासाठी जीवनसत्वे (व्हिटॅमिन्स) आणि क्षार (मिनरल्स) यांचीही गरज असते. लोह हा रक्ताचा एक प्रमुख घटक असतो, तर हाडे कॅल्शियमपासून बनतात, पचनासाठी क्लोरिनची (हायड्रोक्लोरिक अॅसिडची) तर थायराइड ग्रंथींसाठी आयोडिनची गरज असते. सोडियम व पोटॅशियम यांचे ठराविक प्रमाण रक्तात असणे आवश्यक असते. इतरही अनेक क्षार शरीराला आवश्यक किंवा उपयुक्त असतात. ते मुख्यतः मीठ, भाज्या व फळांमधून मिळतात. दुधामध्ये सगळीच द्रव्ये कमी अधिक प्रमाणांमध्ये असतात. अंडी, मासे आणि इतर मांसाहारी पदार्थांमध्ये प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ जास्त असतात. कोणताच नैसर्गिक शाकाहारी किंवा मांसाहारी पदार्थ फक्त एकाच घटकाने बनलेला नसतो. त्यात इतर घटकसुद्धा असतात. उदाहरणार्थ गव्हामध्ये कर्बोदकांशिवाय प्रथिनेही असतात आणि मक्यामध्ये स्निग्ध पदार्थसुद्धा असतात. ज्या अन्नामध्ये जे घटक अधिक प्रमाणात असतात ते इथे उदाहरणादाखल दिले आहेत. गंमत म्हणजे आपले शरीर एका घटकाचे रूपांतर दुसऱ्यामध्ये करू शकते. जास्तीचे कर्बोदक चरबीच्या रूपात साठवले जातात आणि प्रथिनांपासून बनलेले स्नायूसुद्धा गरज पडल्यास ऊर्जा देतात.

पोटामध्ये गेल्यानंतर तिथे अन्नाचे पचन होते याचा अर्थ त्याचे पूर्णपणे विघटन होते आणि त्याचे सूक्ष्म कण पाण्यात किंवा तेलात विरघळून रक्तामध्ये शोषले जातात आणि शरीरभर पसरतात. त्या अन्नरसाचा प्राणवायूशी संयोग होऊन त्यामधून ऊष्णतेच्या रूपात ऊर्जा बाहेर पडते. साखर आपोआपच पाण्यात विरघळत असल्यामुळे ती पचण्याचा प्रश्नच नसतो. चिमूटभर पिठीसाखर तोंडात टाकल्याटाकल्या ती रक्तात मिसळून शरीरभर पसरून तरतरी देते. पाण्यामध्ये ग्लुकोज मिसळून घोट घोट घेतले तरी लगेच शरीराला ऊर्जा मिळते आणि श्रमाने आलेला थकवा निघून जातो. इतर पिष्टमय पदार्थ मात्र पोटात गेल्यानंतर ते पचायला थोडा वेळ लागतो. त्यातही भाताच्या पेजेसारखे काही पदार्थ जितक्या सहजपणे पचतात तितक्या लवकर साबूदाण्यासारखे इतर काही पदार्थ पचत नाहीत. पण पचन झाल्यानंतर त्यांचेही रूपांतर एका प्रकारच्या साखरेतच होते. शरीराच्या आवश्यकतेहून अधिक कर्बोदके खाल्ली गेली तर ती खर्च होत नाहीत आणि मेदाच्या रूपाने जागोजागी साठून राहतात. कर्बोदकांच्या मानाने प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ पचायला जड असतात आणि ते पचलेच नाहीत तर त्यांचा शरीराला उपयोग तर होत नाहीच, उलट अपचनामुळे त्रास मात्र होतो. बहुतेक प्रकारचे अन्न कच्चे खाण्याऐवजी शिजवून खाल्यामुळे त्यांचे पचन होण्यास मदत होते. चोथट किंवा तंतुमय पदार्थ (फायबर) पोटामध्ये पचून रक्तात जात नाहीत, पण त्यांचे उत्सर्जन होतांना ते आतड्यांना साफ करत जातात. या दृष्टीने पाहता अन्नामध्ये थोडासा कोंडा किंवा सालपटे असणे हितकारक असते.

प्रत्येक माणसाची शरीरप्रकृती निराळी असते आणि त्याची पचनशक्ती किती कार्यक्षम आहे किंवा तो नियमितपणे किती व्यायाम व अंगमेहनतीची कामे करतो यावरून त्याला अन्नामधील कोणत्या प्रकारच्या घटकांची किती गरज असते हे ठरते. यामध्ये थोडेफार इकडे तिकडे होऊ शकते कारण आपल्या पचनसंस्थेमध्ये बरीच लवचीकता असते. एकाद्या वेळी आवडले म्हणून जास्त जेवण केले किंवा एकाद्या वेळेला उपास केला किंवा घडला तर ते चालून जाते. पण रोजच जर खाण्यापिण्याचा अतिरेक किंवा कडकडित उपास केला तर मात्र त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. अती तेथे माती म्हणतात ते पचनसंस्थेच्या बाबतीत खरे असते. गरजेपेक्षा जास्त खाल्ले गेलेले अन्न कदाचित पचणारच नाही आणि पचले पण खर्च झाले नाही तर ते शरीरामध्ये साठून राहते. काही प्रमाणात असा राखीव साठा उपयुक्त तसेच आवश्यक असतो. पण त्याच्याकडे दुर्लक्ष केले तर स्थूलपणा वाढतो आणि मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे विकार उद्भवू शकतात. अन्नपदार्थांच्या घटकांमध्ये समतोल राखणे आवश्यक असते. विशेषतः साखर, मीठ, मिरच्या, तेल, तूप वगैरेंचे प्रमाण मर्यादेच्या बाहेर गेले तर त्यामुळेही निरनिराळ्या आजारांना निमंत्रण मिळते.

माणसाची पचनशक्ती आणि त्याच्या आहाराच्या गरजासुद्धा वयानुसार बदलत असतात. तान्ह्या मुलांना लागणारे सर्व पोषक अन्न त्याच्या मातेकडून दुधामधून मिळते. ती तीन चार महिन्यांची झाल्यानंतर त्यांना सहजपणे पचेल असे गुरगुट शिजवलेले अगदी थोडेसे मऊ अन्न दिले जाते आणि त्याचे प्रमाण वाढवत नेले जाते. मुलांना दात येऊन ते व्यवस्थित चावून चावून खायला लागल्यानंतरसुद्धा त्यांची पचनशक्ती नाजुकच असते आणि ती हळूहळू वाढत असते. त्या काळात त्यांना चांगले शिजवलेले आणि ताजे अन्न खायला दिले जाते. त्यांना आंबट, तिखट, तळकट किंवा मसालेदार पदार्थ कदाचित सोसणार नाहीत म्हणून सुरुवातीला ते फारसे खाऊ देत नाहीत. त्यांचे प्रमाण हळूहळू जपून वाढवले जाते. मुलांच्या वाढत्या वयामध्ये त्यांच्या शरीराची वाढ होण्यासाठी नव्या पेशी निर्माण होत असतात. या वेळी त्यासाठी त्यांच्या शरीराला प्रथिनांची जास्त गरज असते. सतरा अठरा वर्षे वयानंतर शरीराची वाढ थांबली तरी हालचाल खूप वाढलेली असते, त्यासाठी ऊर्जेची जास्त गरज असते. त्या वयात पचनशक्तीही उत्तम असते. काहीही आणि कितीही खाल्ले तरी ते पचून जाते. मध्यम वय उलटल्यानंतर मग अन्नाची गरज कमी कमी होऊ लागते पण त्यानुसार खादाडीवर नियंत्रण ठेवले नाही तर स्थूलपणा आणि सुस्तपणाही वाढत जातो आणि प्रकृतीच्या कुरबुरी सुरू होतात. पचनशक्ती कमी होणे, चांगली भूक न लागणे, वारंवार अपचन होणे ही वयस्कपणाची लक्षणे दिसू लागतात. त्यानंतर पुन्हा लहान मुलांप्रमाणे शक्यतो ताजे आणि चांगले शिजवलेले अन्न खावे. तिखट, तळकट व मसालेदार पदार्थ खाणे तर कमी करायचेच, पण गोड पदार्थसुद्धा टाळलेलेच बरे असते.

रोगजंतूंपासून आणि जंतुनाशक केमिकल्सपासून आपला बचाव करण्यासाठी ते आपल्या पोटात जाणार नाहीत याची कशी काळजी घ्यावी हे या लेखमालेच्या सुरुवातीलाच लिहिले आहे. त्यात मुख्यतः स्वच्छतेवर भर दिला आहे. कीटक किंवा जंतू यांचा अन्नावर परिणाम होऊ नये, अन्न दीर्घकाळ टिकून रहावे यासाठी इतर काही पारंपारिक उपाय आहेत, तर काही नव्या तंत्रज्ञानामधून आले आहेत. तेल, मीठ, साखर, व्हिनेगार वगैरे काही द्रव्ये जंतूंच्या वाढीला विरोध करतात. यामुळेच शेव, चकल्या, कडबोळी यासारखे खरपूस तळलेले पदार्थ अनेक दिवस टिकतात. भरपूर मीठ व तेल घालून तयार केलेली लोणची काही महिने टिकतात, तसेच साखरेच्या पक्क्या पाकात मुरवून ठेवलेले मुरंबेसुद्धा खूप काळ टिकतात. पाणी हे जसे आपल्याला जीवन असते तसेच जंतूंना सुद्धा मदत करणारे असते. टिकाऊ पदार्थांमध्ये सुद्धा पाण्याचा थोडासा शिरकाव झाला की त्यामुळे या जंतूंची झपाट्याने वाढ होते आणि ते नासतात, कुजतात, त्यांना वास येतो, बुरशी लागते आणि ते खाण्यालायक रहात नाहीत. अशा पदार्थांमध्ये हवेमधील आर्द्रतेचा सुद्धा शिरकाव होऊ नये म्हणून त्यांना हवाबंद डबे, बाटल्या किंवा बरण्यांमध्ये ठेवतात.

शून्य अंश सेल्शियस तापमानाच्या खाली म्हणजेच बर्फामध्ये या जंतूंची वाढ होत नाही. मटरचे दाणे डीप फ्रीझरमध्ये ठेवले तर दीर्घकाळ टिकतात. पण त्यांचेमधली रुचकर आणि पोषक द्रव्ये उडून जाऊ नयेत यासाठी त्यांना सीलबंद करून ठेवायला मात्र हवे. कीटक व जंतूंना मारण्यासाठी तीव्र अशा गॅमा रेडिएशनचा उपयोग करता येतो आणि अखाद्य वस्तूंवर ही प्रक्रिया करण्याची सोय आता उपलब्ध आहे. पण या विकीरणाचा उपयोग अन्नपदार्थांवर करावा की करू नये याबद्दल शास्त्रज्ञांमध्ये एकमत झालेले नाही.
. . . . . . . . . . . . . . . . .

स्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान – भाग १२ – चविष्ट भोजन

“The Proof of the pudding is in the eating.” अशी एक इंग्रजी म्हण आहे. खवैयांनी पुडिंग खाणे हाच ते रुचकर झाले असण्याचा मुख्य पुरावा आहे असा त्याचा अर्थ होतो. पुडिंगचे भांडे चाटून पुसून खाऊन त्याचा चट्टा मट्टा केला गेला तर मग ते नक्कीच अप्रतिम झालेले असणार. स्वयंपाकघरातले सगळे विज्ञान शिकून घेऊन आणि सारी तंत्रे वापरून स्वयंपाक केला तरी अखेर जेंव्हा खाणारे लोक तो आवडीने खातात तेंव्हाच तो स्वयंपाक करणाऱ्या पाककर्त्याला त्याने केलेल्या श्रमाचे सार्थक आणि समाधान वाटते.

“पिंडे पिंडे रुचिर्भिन्ना” असेही एक संस्कृत सुभाषित आहे. खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी तर पूर्णपणे वैयक्तिक स्वरूपाच्या असतात. त्यात विज्ञानाप्रमाणे सूत्रे किंवा नियम नसतात. एकाद्या माणसाला वांग्याचे भरीत खूप आवडते तर दुसरा त्याच्याकडे ढुंकून पहायलाही तयार नसतो, त्याला पुरणाची पोळी प्रिय असते तर तिसरा कोणी पुरणपोळी म्हणताच नाक मुरडतो. अशा ज्याच्या त्याच्या निरनिराळ्या आवडीनिवडी असल्या तरी बिघडलेला स्वयंपाक कोणालाच आवडणार नाही. चार लोक जेवायला येणार म्हणून चार पदार्थ केले आणि त्यातले वडे करपून गेले, मसालेभात खारट झाला, रस्सा फारच झणझणित झाला आणि सुकी भाजी कच्चीच राहिली, यामुळे कोणालाही काहीच आवडले नाही असेही होऊ शकते. चविष्टपणातले थोडेसे शास्त्र या भागात सांगून मी या मालिकेची सांगता करणार आहे.

आपल्यासमोर जेवणाचे ताट आल्यावर आधी ते आपल्या दृष्टीला पडते, ताज्या अन्नाचा घमघमाट आपल्या नाकपुड्यांमध्ये शिरतो, आपल्या हाताच्या बोटांनी त्यातला एक एक घास करून आपण तो तोंडात टाकतो. जिव्हा हे जरी अन्नाला चाखून बघण्याचे प्रमुख इंद्रिय असले तरी जेवणाची चंव जिभेला कळायच्या आधीच डोळे, नाक आणि बोटांची त्वचा यांनी त्याचे परीक्षण केलेले असते आणि त्यांची संमती मिळाल्यानंतर आपण त्या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतो आणि जिभेनेही तिची पसंती दिल्यानंतर तो घास घशाखाली ढकलतो, अजीबातच आवडला नाही तर कदाचित तो थुंकून टाकतो. अशा प्रकारे शरीराने अन्नग्रहणावर केवढे गुणवत्ता परीक्षण (क्वालिटी कंट्रोल चेक्स) ठेवले आहे हे पाहून मन थक्क होते. या सगळ्या ज्ञानेंद्रियांकडून मिळालेली माहिती पडताळून पाहून त्यावरील अखेरचा निर्णय घ्यायचे काम मात्र मेंदूमधली बुद्धी करते. एकाद्या पदार्थाचे रूप, रंग, वास, स्पर्श किंवा रुचि आवडली नसली तरीसुद्धा इतर कारणांमुळे कधी कधी आपण तो खातो किंवा आपल्याला तो खावाच लागतो.

एकादा पदार्थ करपून काळा ठिक्कर पडला असला किंवा त्याचा रंग निळा, भगवा, लालचुटुक असा अपेक्षेपेक्षा खूप वेगळा असला, त्यात किडा किंवा अळी दिसली तर आपण तो पदार्थ खायचा विचारही करणार नाही. चपातीचा आकार आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलिया खंडासारखा असला तरी त्यातले कर्बोदक किंवा प्रथिने तितकीच असतात, तिच्यापासून तेवढ्याच कॅलरीज मिळतात यामुळे आपण ती निस्संकोचपणे खाऊ शकतो, तरीही ती पोळी चांगली दिसावी यासाठी तिला शक्यतो वर्तुळाकार करण्याचा प्रयत्न केला जातो. भाताची गोल आकाराची मूद घालून तिच्या माथ्यावर वरणाची सजावट केली, भाजीच्या फोडी एकसारख्या आकाराच्या असल्या तर ते पदार्थ आकर्षक दिसतात. पोहे किंवा मसालेभात यावर खोवलेले खोबरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर यांचा एक हलकासा थर पसरवतात, आइस्क्रीमवर पिठीसाखर आणि लोणी यांचे आइसिंग करतात. यामध्ये त्या पदार्थांची रुची वाढवत असतांना त्यांना आकर्षक (प्रेझेंटेबल) करण्याचा हेतूसुद्धा असतो. अन्नपदार्थ वाढतांना अशा प्रकारची थोडी आकर्षक सजावट केली तर ते खाण्याची इच्छा प्रबळ होते.

महाराष्ट्रात जेवणावळींमध्ये सर्वात शेवटी तूप वाढायची पद्धत आहे. साजुक तुपाचा सुवास मनाला प्रसन्न करतो. शिजवलेल्या ताज्या भाज्या, तळलेले गरमागरम वडे, भजी असे पदार्थ त्यांच्यासोबत खमंग वाससुद्धा घेऊन येतात. बासमती, आंबेमोहोर वगैरे सुवासिक जातींच्या तांदुळाच्या भाताचा घमघमाट सुटतो. केशर, वेलदोडे, लवंगा, जायफळ वगैरे सुवासिक मसाले पदार्थाची लज्जत वाढवतात. आजकालच्या नव्या खाद्य पदार्थांमध्ये व्हॅनिलासारखे इसेन्स घालतात. स्वयंपाकघरात तयार होत असलेल्या खाद्य पदार्थांपासून दरवळणारा गंध घरभर पसरतो आणि त्यांच्या आगमनाची चाहूल देतो. यातले विज्ञान असे आहे की प्रत्येक सुवासिक किंवा दुर्गंधी पदार्थांमधून त्याचे अत्यंत सूक्ष्म असे कण निघून वातावरणात पसरत असतात. ते आपल्या नाकपुडीमध्ये शिरताच तिथे असलेल्या अत्यंत संवेदनशील (सेन्सिटिव्ह) त्वचेला त्यांचा स्पर्श होतो आणि त्या गंधाचा एक विशिष्ट संदेश मेंदूकडे पाठवला जातो. माणसाच्या मेंदूमध्ये शेकडो निरनिराळे वास ओळखून आठवणीत ठेवण्याची क्षमता असते. गरम खाद्यपदार्थांपासून निघणारा हा सुगंध ते निवत असतंना आणि वेळेनुसार कमी कमी होत जातो. त्यातूनही तो पदार्थ उघडा ठेवला तर त्याचा सुवास लवकर उडून जातो. यामुळे या कारणासाठी सुद्धा ताजे अन्न पदार्थ नेहमी झाकून ठेवावेत. ते फ्रिजमध्ये तर ठेऊ नयेतच कारण फ्रिजमध्ये हवेचा प्रवाह सतत खेळत असतो. आणि त्यात ठेवलेल्या सगळ्या पदार्थांचा सुगंध किंवा दर्प एकमेकांमध्ये मिसळून एक विचित्र असा वास आतल्या सगळ्याच पदार्थांना लागतो. तो वास आकर्षक असण्याऐवजी नकोसा वाटतो.

आपल्या समोर आलेला अन्नपदार्थ आपल्या नकळतच डोळ्यंना दिसतो आणि त्याच्यापासून निघणारा गंध आपल्याला समजतो. त्यानंतर आपण त्या अन्नाला स्पर्श करतो. त्या पदार्थाला बुरा आला असेल किंवा घाणेरडा वास येत असेल तर तो नासका कुजका पदार्थ आपण टाकून देतो. काही लोकांना कांदा व लसूण खाणे वर्ज्य असते तर काहीजणांना मुळा, शेपू वगैरे उग्र दर्प असलेल्या भाज्या आवडत नाहीत. या गोष्टी पाहून किंवा वासाने समजून येतात. आजकाल काट्याचमच्याने खाणे रूढ होऊ लागले असले तरी अजूनही बरेचसे भारतीय लोक हातानेच जेवतात. खायला दिलेला पदार्थ किती गरम किंवा थंड आहे, तो मऊ आहे की निबर आहे, कोरडा आहे की ओला किंवा लिबलिबीत आहे, तेलकटतुपकट किंवा बुळबुळित आहे की चिकट आहे यासारख्या अनेक गोष्टी आपल्याला आपल्या हाताच्या बोटांना स्पर्शानेच कळतात. ते पाहून झाल्यानंतर आपण तो घास तोंडात घालतो. हे सगळे आपल्या इतक्या सवयीचे झाले आहे की एरवी लक्षातही येत नाही, पण त्यात काही तरी खटकले तर मात्र आपण लगेच सावध होतो. आपल्या तोंडातल्या त्वचेच्या मानाने बोटाची त्वचा अधिक कणखर असते आणि तिला दुखापत झालीच तर त्यावर औषध लावणे सोपे असते. यामुळे तोंड भाजून घ्यायचे नसेल तर बोटाने घास करून खाणे फायद्याचे असते.

आपली जीभ अत्यंत संवेदनशील असते. खाद्यपदार्थांच्या सूक्ष्म कणांचा तिला स्पर्श होताच त्यांचा संदेश मेंदूकडे पाठवला जातो आणि पूर्वीच्या अनुभवांच्या आठवणीमधून त्या पदार्थाची चंव आपल्याला समजते. लहान मुले त्यांना दिसेल तो पदार्थ उचलून तोंडात घालत असतात त्याच्या मागे चंव घेऊन पहाण्याची नैसर्गिक स्वयंप्रेरणा (इन्स्टिंक्ट) असते. आपल्या मेंदूमध्ये हजारो प्रकारच्या रुचींची आठवण साठवून ठेवण्याची क्षमता असते. नाकाने घेतलेला वास किंवा जिभेने घेतलेली चंव या गोष्टी शब्दांमध्ये व्यक्त करणे अशक्य असते, त्यांचा अनुभवच घ्यावा लागतो. गुलाबाचा सुगंध किंवा मोरीमधला दुर्गंध अशा उदाहरणांमधून ते वास व्यक्त करता येतात, त्यांचे विशिष्ट प्रकार केलेले नाहीत. रुचींचे मात्र गोड, तिखट, आंबट, खारट, तुरट आणि कडू असे सहा ढोबळ स्वरूपाचे गट केलेले आहेत आणि साखरेसारखा गोड, मिरचीसारखा तिखट, मिठासारखा खारट, कारल्यासारखा कडू अशा काही प्रमाणभूत (स्टँडर्ड) चवींशी तुलना करून त्यांचा प्रकार आणि त्यांची तीव्रता सांगता येते.

चविष्टपणाची प्रत्येक माणसाची व्याख्या वेगवेगळी असते हेच पिंडे पिंडे रुचिर्भिन्ना या सुभाषितात सांगितले आहे. माणसाच्या एकंदर आवडीनिवडींमधील निम्म्यापेक्षा जास्त त्याच्या खाण्यापिण्याच्या बाबतीतल्या असाव्यात. यामुळे रुचि हा शब्द इतर बाबतीतसुद्धा वापरला जातो. कुठल्या प्रकारची पुस्तके वाचायला आवडतात, नाटकसिनेमे पहायला आवडतात, संगीत ऐकावेसे वाटते हे सगळेसुद्धा ‘अभिरुचि’ या शब्दात येते. सहा रुचींमधली गोड ही रुचि चांगलेपणाचे लक्षण असते. सुरेख लहान बाळे गोड दिसतात, मधुर आठवणी सुखावतात, संगीत कानाला सुमधुर वाटते वगैरे. याउलट कडू म्हणजे वाईट. कुणाच्या बोलण्यातला ‘कडवट’पणा आपल्याला खुपतो, नकोसे वाटणारे ‘कटु’ प्रसंग आपण टाळतो, निराशाग्रस्त माणसाच्या स्वभावात ‘कडवट’पणा येतो वगैरे. तिखट ही झोंबणारी रुचि आहे. जास्त तिखटपणामुळे जिभेची आग होते. “कानामागून आली आणि तिखट झाली”, “लवंगी मिरची कोल्हापूरची” वगैरे म्हणी व वाक्प्रचार माणसांच्या वागण्यातला झणझणीतपणा दाखवतात. पण अशी गंमत आहे की तिखट ही चंव किंचित त्रासदायक असली तरी अतीशय आवडीची सुद्धा असते. आपण रोज उठून नुसते गोड गोड खाऊ शकत नाही. तिखटपणा हीच रोजच्या जेवणातल्या आमटी, भाजी, चटणी, कोशिंबीर वगैरे पदार्थांची मुख्य रुचि असते. खारटपणा ही फार विशिष्ट चंव असते. ती अजीबात नसली तर पदार्थ एकदम बेचंव आणि आळणी लागतो आणि जास्त झाली तर खाऊन उलटी सुद्धा होऊ शकते. त्यामुळे तो तोलून मापून आणावा लागतो. आंबटपणा ही चंव थोडासा रुचिपालट करण्यापुरती वापरली जाते. त्यातही नुसताच आंबटपणा फारसा रुचत नसला तरी गोड आणि तिखट या दोन्ही प्रकारच्या काही पदार्थांची लज्जत त्याने भरपूर वाढते. श्रीखंड आणि जिलबीसारखे गोड पदार्थ थोडे आंबटही असावे लागतात तर चिंच, आमचूर किंवा आमसुलांमुळे भाज्या, आमटी, सांभार वगैरे चविष्ट होतात. जेवणातल्या इतर पदार्थांवर लिंबू पिळले की त्याची झकास चंव त्या पदार्थांची मजा वाढवतात. तुरटपणा या चंवीला कोणीच फारसे महत्व देत नाही. ही चंव कोणाला विशेष आवडण्यासारखीही नसते आणि त्रासदायकही नसते. स्वयंपाक चविष्ट बनवण्यासाठी त्यात तुरटपणा आणण्याचा वेगळा प्रयत्न कोणी करत नाही. उलट तिखट, मीठ, मसाला वगैरेंमधून तो झाकून टाकला जातो.

इंद्रधनुष्यातले सात रंग आणि त्यांच्या अनेक छटांच्या प्रकाशलहरींची लांबी (वेव्हलेंग्थ), कंपनसंख्या (फ्रिक्वेन्सी) आणि तीव्रता प्रयोगशाळेत मोजता येतात आणि आंकड्यांमध्ये मांडता येतात. त्यानुसार हे प्रकाशकिरण आपण कृत्रिमरीत्या निर्माण करू शकतो. टेलिव्हिजन व काँप्यूटरच्या स्क्रीनवरील विविध रंगांचे ब्राइटनेस, कॉन्ट्रास्ट यांचे नियंत्रण करता येते. ध्वनिलहरींच्या वेव्हलेंग्थ, कंपनसंख्या (फ्रिक्वेन्सी) आणि तीव्रता सुद्धा प्रयोगशाळेत मोजता येतात. सात सूर आणि बावीस श्रुतींच्या आधारावर शास्त्रीय संगीत उभे राहिले आहे. हे स्वर किंवा ध्वनिसुद्धा यंत्रांमधून निर्माण करता येतात. या दोन्ही बाबतीत भरपूर प्रमाणात विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा विकास झाला आहे. पण गोडी किंवा कटुता वगैरे चंवींचे मोजमाप करणारी उपकरणे मिळत नाहीत. एकादा पदार्थ तयार करण्याची कृती (रेसिपी) लिहितांना एक कप अमूक आणि दोन चमचे तमूक असे गणित सांगितले जाते. याऐवजी इतके ग्रॅम व तितके मिलीलिटर लिहिले तर ते जरा शास्त्रीय वाटेल, पण त्यातून तयार झालेला पदार्थ जिभेने चाखून पहाण्याला पर्याय नाही. माझ्या माहितीत तरी रुचिचे मोजमाप करणारे यंत्र अजून तयार झालेले नाही. चहाची भुकटी तयार करणाऱ्या लिप्टन आणि ब्रुपबाँडसारख्या कंपन्या प्रत्येक लॉटमधील चहाचे सँपल चाखून पाहण्यासाठी मानवी ‘टी टेस्टर’ नेमतात म्हणे. हे काम यंत्र करू शकत नाही.

गोड, तिखट, खारट वगैरे चंवींपेक्षा निराळ्याही काही रुचि आहेत आणि लोकांना त्या खूप आवडतात. कुठलाही पदार्थ भाजल्यामुळे किंवा तळल्यामुळे कुरकुरीत आणि खमंग होतो, मग तो गोड असो किंवा तिखट. चणे आणि शेंगादाणे जात्याच रुचकर असतात, ते भाजून, तळून किंवा शिजवून अख्खे खाल्ले तरी छान लागतात आणि त्याचे पीठ करून ते बेसन किंवा दाण्याचे कूट कुठल्याही पदार्थात मिसळले की तिला चंव आणतात. खंवलेला नारळ (ओले खोबरे) हा देखील असाच पदार्थ आहे. ज्या प्रदेशात यातला जो पिकतो तिकडे तो अधिक प्रमाणात वापरला जातो. तीळ आणि परवडत असतील तर काजू व बदाम यांचा ही उपयोग चंव वाढवण्यात होतो. चणे सोडल्यास यातले सगळे पदार्थ स्निग्ध या सदरात मोडतात. कांदा, लसूण, आले, कोथिंबीर आणि कढीलिंब या भाज्यांना एक विशिष्ट चंव असते ती बहुतेक सगळ्यांना आवडते. यामुळे इतर भाज्यांना रुचकर बनवण्यासाठीसुद्धा यांचा सढळ हाताने उपयोग केला जातो. मसाल्याचे पदार्थ अगदी अल्प प्रमाणात वापरल्याने चंवीत मोठा फरक घडवून आणतात. हिंग, धणे, जिरे, मिरे, लवंगा, दालचिनी, वेलदोडे वगैरे हे पदार्थ नुसतेच खाल्ले तर चंवीला उग्र लागतील, पण योग्य त्या प्रमाणात मिसळले की अन्नाला बेमालूम रुचकर करतात.

दूध हे तर पूर्ण अन्न समजले जातेच, पण दही, ताक, लोणी, तूप आदि दुग्धजन्य पदार्थसुद्धा पोषक तसेच रुचकरही असतात. त्यांचा उपयोग केल्यामुळे स्वयंपाक चविष्ट तसेच पौष्टिक होतो. त्यात काही परंपरागत संकेत पाळले जातात. दुधाचा उपयोग खीर, बासुंदी यासारख्या गोड पक्वान्नासाठी करतात तसेच लाडू, शिरा या सारखे गोड पदार्थ तुपात केले जातात. चटणी, कोशिंबीर, भरीत यासारख्या तिखट चंवीच्या पदार्थात दही मिसळतात. ताकामध्ये साखर मिसळली की गोड लस्सी आणि मीठ टाकले की खारी लस्सी होते. ताकापासून कढी हा आंबट, तिखट पदार्थ करतात आणि काही पालेभाज्या, पिठले वगैरेंमध्येसुद्धा ताक घालून त्याची चंव वाढवतात. “तक्रम् शक्रस्य दुर्लभम्” अशी त्याची ख्याती आहे. नासलेले दूध तापवतांना आपोआप फाटतेच, पण चांगल्या ऊष्ण दुधांतसुद्धा एकादा आंबट पदार्थ मिसळला तरी ते फाटते, म्हणजे त्यातली घनरूप प्रथिने आणि बाकीचे द्रव वेगवेगळे होतात. महाराष्ट्रात हे फारसे लोकप्रिय नाही, पण उत्तर भारतात असे मुद्दाम केले जाते. त्यातून निघालेल्या घनरूप ‘छेन्या’मधून रसगुल्ले, सोंदेश यासारख्या गोड बंगाली मिठाया तयार केल्या जातात तर पंजाबमध्ये त्याला ‘पनीर’ म्हणतात आणि आलू पनीर, पालक पनीर यासारख्या लोकप्रिय चविष्ट भाज्या बनवतात.

अन्नाला चविष्ट बनवण्यात विज्ञानाचा वाटा कमी असतो आणि कला व कौशल्याचा खूप जास्त असतो हे वरील विवेचनावरून लक्षात येतेच. पण स्वयंपाकाचा हा भाग सर्वाधिक महत्वाचा असल्यामुळे त्याचा एक अत्यंत त्रोटक आढावा घेण्याचा प्रयत्न मी या भागात केला आहे. तर पुरुषमित्रांनो, आता स्वयंपाकघरात बिनधास घुसा आणि आपल्याला हवा तो पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ करायला लागा. त्यातून काही अडले तर मदतीला मी आहेच.

. . . . . . . . . . . . . . . . (समाप्त)

परतलो मातृभूमीला

आम्ही दोघे २००८-०९ मध्ये अमेरिकेला जाऊन तिथे काही दिवस राहून आलो होतो. आमच्या त्या वेळच्या आठवणी आणि गंमती जंमती मी ४०-५० भागांमध्ये सविस्तर लिहून ठेवल्या होत्या. त्या इथे वाचायला मिळतील.
https://anandghare2.wordpress.com/category/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%a8/%e0%a4%85%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be/page/5/

या आठवणींमधला एक राहून गेलेला लेख या पोस्टमध्ये देत आहे. त्यानंतर २०१९-२० मध्ये मी पुन्हा अमेरिकेला जाऊन आलो. त्या वेळच्या वेगळ्या गंमतीजमती मी आता या ब्लॉगवर क्रमाक्रमाने देणार आहेच. पण त्याची सुरुवात मी परतीच्या प्रवासापासून करीत आहे कारण तोसुद्धा या शीर्षकाखाली चपखल बसतो.

१. परतलो मातृभूमीला

मला पहिल्यापासूनच प्रवासाची आवड आहे. प्रवास करण्यात मला कसलाही त्रास वाटत नाही किंवा कधी कंटाळा येत नाही अशा नकारार्थी कारणांमुळे नव्हे तर त्यात पहायला मिळणारी अनुपम दृष्ये, कानावर पडणारे मंजुळ ध्वनी, चाखायला मिळणारे चविष्ट खाद्यपदार्थ, भेटणारी वेगवेगळी माणसे आणि निरनिराळ्या वातावरणात रहाण्याचा मिळणारा अनुभव या सर्वांमधून जी एक सर्वांगीण अनुभूती होते ती मला सुखावते. त्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या निमित्याने मी प्रत्येकी कांहीशेहे वेळा परगांवी जाऊन आलो आहे. असे असले तरी नोकरीत असेपर्यंत कधीही सलग दोन तीन आठवड्यापेक्षा जास्त काळ बाहेरगांवी जाऊन तिथे राहिलेलो मात्र नव्हतो. मला तशी संधीच मिळाली नसेल असे कोणी म्हणेल, किंवा नाइलाजाने कुठेतरी जाऊन राहण्याची आवश्यकता पडली नसेल असेही कोणी म्हणेल. दोन्हीही कारणे खरीच असतील, तसे घडले नाही एवढे मात्र खरे.

सेवेतून निवृत्त झाल्यानंतरच्या काळात प्रवासाला गेल्यावर घरी परतण्याची एवढी घाई नसायची आणि त्यासाठी सबळ अशी कारणे देता येत नव्हती त्यामुळे हा कालावधी चार पाच आठवड्यांपर्यंत लांबत गेला. आम्ही मागच्या वर्षी (२००८ मध्ये) मुलाला भेटून येण्यासाठी अमेरिकेला जायचे ठरले तेंव्हा त्यासाठी सहा आठवडे एवढा कालावधी माझ्या मनात आला होता. त्यासंबंधी सखोल अभ्यास, विश्लेषण वगैरे करून त्यावर मी कांही फार मोठा विचार केला होता अशातला भाग नव्हता, पण सहा आठवड्याहून जास्त काळ आपण परदेशात राहू शकू की नाही याची मला खात्री वाटत नव्हती. उन्हाळ्यात अमेरिकेतले हवामान अनुकूल असते, त्यामुळे बहुतेक लोक तिकडे जायचे झाल्यास उन्हाळ्यात जाऊन येतात, पण आम्हाला गेल्या वर्षी ते कांही जमले नाही. उद्योग व्यवसायात आलेली जागतिक मंदी आणि अमेरिकेची होत चाललेली पीछेहाट पाहता पुढच्या वर्षीच्या उन्हाळ्यापर्यंत वाट न पाहता त्याआधीच जाऊन यायचे ठरले. शिवाय उद्या कुणी पाहिला आहे हा एक प्रश्न होताच. घरातला गणेशोत्यव झाल्यानंतर इकडून निघायचे आणि दिवाळी साजरी करून कडाक्याची थंडी सुरू होण्याच्या आधी परतायचे असा माझा बेत होता.

आमच्या चिरंजीवांच्या डोक्यात वेगळे विचारचक्र फिरत होते. आमचे अमेरिकेला जायचे नक्की झाल्यापासून सर्व संबंधित दस्तावेज गोळा करून त्यासाठी लागणारी सरकारी अनुमती मिळवणे आणि त्यानंतर प्रत्यक्ष प्रवासाला निघण्यासाठी बांधाबांध करणे यात कित्येक महिन्यांचा काळ लोटला होता. एवढ्या सायासाने अमेरिकेला जाऊन पोचल्यानंतर तिथे सहा महिने राहण्याची परवानगी मिळाली होती तिचा पुरेपूर फायदा आम्ही घेतला पाहिजे असे त्याचे म्हणणे होते. तर्कदृष्ट्या ते अगदी बरोबर होतेच आणि तशी त्याची मनापासून इच्छा होती. सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यामुळे ‘पोटापुरता पसा’ तो ‘देणाऱ्याच्या हाता’ने अगदी घरबसल्या मिळत होता आणि जास्तीची ‘पोळी पिकण्या’साठी मी भारतातसुध्दा कसलीच हालचाल करत नव्हतो. अमेरिकेत तर मला कुठलाही कामधंदा करून अर्थार्जन करायला तिकडच्या कायद्याने बंदी होती. तसे झाल्याचे आढळल्यास तडकाफडकी माझी उचलबांगडी करण्यात येईल असा दम मला प्रवेश करण्याची परवानगी देतांनाच भरला गेला होता. माझा तसा इरादाही नव्हता. मी स्वतःला इथल्या कुठल्या समाजकार्यात गुंतवून घेतलेले नव्हते. इथे भारतात राहतांना मी कधी लश्करच्या भाकऱ्याही भाजल्या नाहीत तेंव्हा परदेशात जाऊन तिथल्या कुणा परक्यासाठी कांही करायला मी कांही अमेरिकन नव्हतो. त्यामुळे इथे असतांनाही माझा सगळा वेळ स्वतःच्या सुखासाठी आणि आपल्या माणसांसाठी यातच खर्च होत असे आणि ते करणे मला अमेरिकेतसुध्दा शक्य होते. मग भारतात परत जायची घाई कशाला करायची? या युक्तीवादाला माझ्यापाशी तोड नव्हती.

अमेरिकेतील आमचे वास्तव्य अत्यंत सुखासीन रहावे यासाठी मुलाने चंगच बांधला होता असे दिसत होते. भारतात आमच्या घरात असलेल्या एकूण एक सुखसोयी तिथे उपलब्ध होत्याच, त्या चांगल्या दर्जाच्या असल्यामुळे सहसा त्यात बिघाड उत्पन्न होत नसे. पाणी टंचाई, विजेचे भारनियमन यासारख्या कारणांमुळे त्या कधी बंद ठेवाव्या लागत नसत. यात घरकाम आणि आराम करण्याची साधने आली तसेच करमणुकीचीसुध्दा आली. तिकडच्या टेलीव्हिजनवर शेकडो वाहिन्यांवर चाललेले कार्यक्रम लागायचे, शिवाय दीडशेच्या वर चित्रपट ‘ऑन डिमांड’ म्हणजे आपल्याला हवे तेंव्हा पाहण्याची सोय होती. भारतात जर आपल्याला पहायचा असलेला चित्रपट टीव्हीवर लागणार असेल तर आधीपासून ठरवून त्या वेळी करायची इतर कामे बाजूला सारून टीव्हीच्या समोर फतकल मारून बसावे लागते आणि दर दहा मिनिटांनी येणा-या जाहिराती पहाव्या लागतात तसे तिथे नव्हते. आपल्या सोयीनुसार आपल्याला हवा तेंव्हा तो सिनेमा पाहता येत असेच, शिवाय वाटल्यास आपणच पॉज बटन दाबून त्यात लंचब्रेक घेऊ शकत होतो. ब्लॉकबस्टर नांवाच्या कंपनीकडून दोन नवीन सिनेमांच्या डीव्हीडी घरपोच येत, त्या पाहून झाल्यानंतर दुकानात देऊन आणखी दोन डीव्हीडी निवडून घ्यायच्या आणि त्या परत केल्या की लगेच आणखी दोन नव्या डीव्हीडी घरी यायच्या अशी व्यवस्था होती. त्यातून नवनव्या तसेच गाजलेल्या जुन्या चित्रपटांचा एक प्रवाहच वहात होता असे म्हणता येईल.

असे असले तरी इतके इंग्रजी पिक्चर्स पाहण्यात आम्हाला रुची नसेल म्हणून हवे तेवढे हिंदी चित्रपट पहायची वेगळी व्यवस्था होती. मुलाने भारतातून जातांनाच अनेक सीडी आणि डीव्हीडी नेल्या होत्या, इतर जाणाऱ्या येणाऱ्यांकडून काही मागवल्या होत्या, तसेच आमच्याकडील हिंदी आणि मराठी डिस्क आम्हीही नेल्या होत्या. अशा प्रकारे घरात जमवून ठेवलेला बऱ्यापैकी मोठा स्टॉक होताच, त्याशिवाय आता अमेरिकेतसुध्दा हिंदी चित्रपटांच्या डीव्हीडीज विकत किंवा भाड्याने मिळू लागल्या आहेत. मुलाच्या मित्रांच्याकडून कांही मिळाल्या आणि किती तरी सिनेमे चक्क इंटरनेटवर सापडले. मी त्यापूर्वी आयुष्यातल्या कुठल्याही तीन महिन्यात, अगदी कॉलेजात असतांनासुध्दा पाहिले नसतील इतके हिंदी, मराठी आणि इंग्रजी सिनेमे मी या वेळी अमेरिकेत पाहून घेतले.

सिनेमा पाहणे हा मनोरंजनाचा एक थोडा जुना झालेला भाग झाला. आज टेलिव्हिजन पाहणे हा एक मनोरंजनाचा भाग न राहता जीवनाचा भाग बनून गेला आहे. आपली आवडती मालिका पाहिल्याखेरीज चैन पडेनासे झाले आहे. पण कांही हरकत नाही. भारतात जे कार्यक्रम पाहण्याची संवय जडली आहे तेसुध्दा वॉच इंडिया नांवाच्या वेबसाइटवर जगभर दाखवले जातात. त्याचेही सभासदत्व घेऊन ठेवले होते. भारतात रात्री प्रक्षेपित होत असलेले कार्यक्रमच आम्ही मुख्यतः पहात असू, पण त्यावेळी अमेरिकेत सकाळ असे एवढा फरक होता. त्यामुळे आपली रोज सकाळी करायची कामे विशिष्ट कार्यक्रमांच्या वेळा पाहून त्यानुसार करीत होतो.

निवृत्तीनंतर रिकामेपणाचा उद्योग म्हणून आणि कांही तरी करीत असल्याचा एक प्रकारचा आनंद प्राप्त करण्यासाठी मी ब्लॉगगिरी सुरू केली आहे. त्यात खंड पडू नये याची संपूर्ण व्यवस्था करून ठेवली होती. अमेरिकेत दुर्लभ असलेली मराठी (देवनागरी) लिपी घरातल्या संगणकावर स्थापित झाली होती. अत्यंत वेगवान असे इंटरनेट कनेक्शन तर चोवीस तास उपलब्ध होतेच. मला एकाच कॉम्प्यूटरवर टेलिव्हिजन पाहणे आणि लेखन या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करता येणार नाहीत म्हणून चक्क एक वेगळा संगणक घरी आणला.

बहुतेक दर शनिवार रविवार आसपास असलेल्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यात जात असे. आता भारतातसुध्दा मॉल संस्कृती आली आहे, तिकडे ती पूर्णपणे विकसित झालेली आहे. त्यामुळे एक एक मोठा मॉल किंवा स्टोअर म्हणजे एक भव्य असे प्रदर्शनच असते. सगळीकडे दिव्यांचा झगमगाट, अत्यंत कलात्मक रीतीने सजवून आणि व्यवस्थित रीतीने मांडून ठेवलेल्या वस्तू पहातांना मजा येते. त्यातले शोभेच्या वस्तू असलेले दालन म्हणजे तर एकादे म्यूजियमच वाटावे इतक्या सुंदर कलाकुसर केलेल्या वस्तू तिथे पहायला मिळतात. त्या दुकानांत कोणीही वाटेल तितका वेळ हिंडावे, कांही तरी विकत घ्यायलाच पाहिजे असा आग्रह नाही. इतक्या छान छान गोष्टी पाहून आपल्यालाच मोह होतो यातच त्यांचे यश असते. दिवसभर भटकंती केल्यानंतर बाहेरची खाद्यंतीही ओघानेच आली. त्यासाठी मेक्सिकन, इटॅलियन ते चिनी आणि थाय प्रकारची भोजनगृहे आहेतच, पण उत्कृष्ट भारतीय भोजन देणारी निदान चार पांच हॉटेले मिळाली.

अशा प्रकारे आमची मजाच मजा चालली असली तरी घरी परतायची एक ओढ लागतेच. शिवाय घरात करता येण्याजोग्या सगळ्या गोष्टींची व्यवस्था करता आली तरी घराबाहेरचे वातावरण कांही आपल्याला बदलता येत नाही. तिथल्या कडाक्याच्या थंडीशी जमवून घेण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ती आपला हात दाखवते आणि शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यानंतर तो त्रास सहन करत तिथे राहणे सुखावह वाटत नाही. अशा कारणांमुळे मी योजलेले सहा आठवडे आणि मुलाने ठरवलेले सहा महिने म्हणजे सव्वीस आठवडे यातला सोळा हा सुवर्णमध्य अखेर साधला गेला आणि अमेरिकेत गेल्यापासून सोळा आठवड्यांनी आम्ही अमेरिकेचा निरोप घेऊन जानेवारी २००९च्या अखेरीस आम्ही मातृभूमीकडे परत आलो. आम्ही ज्या मार्गाने अमेरिकेला आलो होतो त्याच मार्गाने म्हणजे अॅटलांटा- नेवार्क- मुंबई असे परत आलो. परतीचा प्रवासही तसाच झाला. त्यात काही वेगळा अनुभव आला नाही. या भेटीत तिकडे पाहिलेल्या बहुतेक सगळ्या जागांची वर्णने मी या ब्लॉगवर केलेली आहेत.
Posted by Anand Ghare June 11, 2009

२. चीनमार्गे परतीचा प्रवास

आजकाल विमानाच्या प्रवासाची तिकीटे इंटरनेटवरूनच काढली जातात आणि त्यांची किंमत ठरलेली नसते. समजा मला आज पुण्याहून बंगलोरला जायचे तिकीट पाच हजाराला मिळाले असेल तर माझ्या शेजारच्या प्रवाशाला कदाचित सहा हजार रुपये मोजावे लागले असतील किंवा त्याला ते तिकीट फक्त चार हजारालाही पडले असेल. ‘मेक माय ट्रिप’ सारख्या काही कंपन्या हे बुकिंग करतात. आपल्याला कुठून कुठे आणि कधी प्रवास करायचा आहे ही माहिती कांप्यूटरवरून किंवा सेलफोनवरून दिली की त्या तारखेला जात असलेल्या अनेक विमान कंपन्यांच्या विमानाच्या उड्डाणाच्या व पोचण्याच्या वेळा आणि तिकीटाची यादी समोर येते. त्यातला सगळ्यात स्वस्त किंवा सोयिस्कर पर्याय निवडून आपण काय ते ठरवायचे आणि लगेच तितके पैसे क्रेडिट कार्डाने भरून ते बुकिंग करून टाकायचे. परदेशाला जाणाऱ्या विमानांच्या तिकीटांच्या दरांमध्ये तर प्रचंड तफावत असते. दोन महिने आधीपासून बुकिंग केले तर ते तिकीट अर्ध्या किंवा पाव किंमतीतही मिळू शकते आणि आयत्या वेळी काढल्यास कदाचित तीन चारपट जास्त पैसे मोजावे लागतात किंवा ते विमान रिकामेच जात असेल तर आयत्या वेळी ते तिकीट अगदी स्वस्तातही मिळू शकते. जे लोक केवळ मौजमजेसाठी दोन चार दिवस कुठे तरी फिरायला जाऊन येत असतात ते अशा दुर्मिळ संधीचा लाभ उठवतात, पण त्यात खूपच अनिश्चितता असते. त्यामुळे आधीपासून ठरवून प्रवासाला जाणारे माझ्यासारखे रिकामटेकडे पर्यटक दोन महिने आधीपासून नियोजन करतात.

मी मागल्या वर्षी अमेरिकेला जाऊन आलो होतो. तिथे तीन महिन्याचा मुक्काम होऊन गेल्यावर मला परतीच्या प्रवासाचे वेध लागले. ख्रिसमसच्या सणाच्या काळात जगभर सगळीकडेच पर्यटकांची गर्दी होत असल्याने विमानांच्या तिकीटांना जास्त मागणी असते आणि अमेरिकेत राहणारे बरेचसे भारतीय लोकही तिथली थंडी टाळून उबदार भारताचा दौरा काढत असतात. त्यामुळे त्या काळात तिकीटांचे दरही वाढलेले असतात. म्हणून तो काळ संपल्यावर म्हणजे जानेवारीच्या अखेरीकडे मी भारतात परत यायचे असे नोव्हेंबरमध्येच ठरले. त्यानुसार निरनिराळ्या तारखांना उपलब्ध असलेल्या तिकीटांची चौकशी करतांना एक प्रचंड सवलतीची ‘डील’ मिळाली. वीस जानेवारीला लॉस एंजेलिसहून निघून बेजिंगमार्गे मुंबईला जायच्या प्रवासाचे तिकीट फक्त प्रत्येकी साडेतीनशे डॉलर्सला मिळत होते. यावर क्षणभर तरी माझा विश्वासच बसला नाही कारण मी अमेरिकेला जातांना एमिरेट्सच्या विमानाने दुबईमार्गे गेलो होतो तेंव्हा ते सहा सातशे डॉलर्स पडले होते. माझ्या मुलाने लगेच एअर चायनाची टिकीटे बुक करून टाकली. यात काही फसवाफसवी तर नसेल ना अशी शंका मला आली, पण माझा मुलगा गेली अनेक वर्षे याच कंपनीतर्फे बुकिंग करत आला होता आणि नेहमी त्याला चांगलाच अनुभव आला होता म्हणून तो निर्धास्त होता.

माझ्या मनात लहानपणापासूनच चीनबद्दल संमिश्र भावना होत्या. मी शाळेत शिकतांना भूगोल या विषयात मला चीनबद्दल जी माहिती मिळाली ती अद्भुत होती. आपल्या भारताच्या अडीचपट एवढा विस्तार असलेल्या या अवाढव्य देशात भारताच्या दीडपट एवढी माणसे रहातात, तरी ते सगळे लोक एकच भाषा बोलतात आणि एकाच लिपीत लिहितात हे कसे याचे मला मोठे गूढ वाटायचे. तिथेही काही हजार वर्षांपासून चालत आलेली जुनी संस्कृती आहे आणि हजारो वर्षांच्या इतिहासात तो देश अखंडच राहिला आहे. मुसलमानी आणि युरोपियन लुटारूंच्या धाडींना त्यांनी दाद दिली नाही आणि कडेकडेचा किंवा किनाऱ्यावरला थोडा भाग सोडला तर चीनच्या मुख्य भूमीवर कुणाही परकीयांना कधी कबजा करू दिला नाही. दुसऱ्या महायुद्धातला अगदी थोडासा काळ सोडला तर इतर सर्व काळ हा संपूर्ण देश स्वतंत्रच राहिला होता. कम्युनिस्टांनी आधी रशीयाची मदत आणि शस्त्रास्त्रे घेऊन उठाव केला आणि हा देश जिंकून घेऊन आपली सत्ता स्थापित केली, पण रशीयाच्या सैनिकांना तिथे शिरकाव करू दिला नाही. चीनने आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून धरले होते एवढेच नव्हे तर थोड्याच कालावधीत रशीयाचे बहुतेक सगळे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून घेतले होते. त्या काळात भारताचे चीनबरोबरचे संबंध चांगले होते. माओझेदुंग आणि चौएनलाय या दुकलीने भारताला भेट दिली तेंव्हा त्यांचे प्रेमाने स्वागत केले गेले होते आणि “हिंदी चीनी भाई भाई” च्या घोषणा दिल्या गेल्या होत्या. कम्युनिस्टांच्या राज्यात तिथल्या जनतेवर प्रचंड दडपशाही केली जात होती असे काहीसे ऐकले असले तरी मला लहान वयात त्याचा अर्थ समजत नव्हता. त्यामुळे लहानपणी मला तरी चीनबद्दल कौतुक, गूढ आणि आकर्षण वाटत होते.

१९६२ साली चीनने विश्वासघात करून सीमाप्रदेशावर आक्रमण केले आणि तेंव्हा झालेल्या लढाईत भारताचे अनेक जवान मारले गेले, तसेच आपल्या देशाची नाचक्की झाली. यामुळे चीन हा एकदम एक नंबरचा शत्रू झाला आणि ते देश व तिथले लोक यांच्याबद्दल मनात द्वेष निर्माण झाला तो जवळजवळ कायमचा. मध्यंतरीच्या काळात तो राग हळूहळू कमी होत होता, पण गेल्या वर्षी घडलेल्या घटना आणि सीमेवर झालेल्या चकमकींमुळे तो आता पुन्हा वाढत गेला आहे.

असे असले तरी मी मुंबईला रहायला गेल्यावर आधी गंमत म्हणून तिथल्या चिनी हॉटेलांमध्ये जाऊन चिनी खाद्यपदार्थ खात होतो. पुढील काळात सरसकट सगळ्याच हॉटेलांमध्ये चायनीज अन्न मिळायला लागले, इतकेच नव्हे तर त्याचा थेट आमच्या स्वयंपाकघरातही प्रवेश झाला. परदेशांमध्ये तर बहुतेक सगळीकडे मला चायनीज फूड मिळत असे आणि ते सर्वात जास्त आवडत असे. मी पश्चिम अमेरिका दर्शनाची लहानशी ट्रिप केली होती ती एका चिनी कंपनीने काढली होती आणि त्यातले निम्म्याहून जास्त पर्यटक चिनी होते. त्यातले किती चीनमधून आलेले होते आणि किती अमेरिकेत स्थाईक झालेले चिनी होते कोण जाणे. पण त्यांच्यासोबत फिरतांना ना मला शत्रुत्व वाटले होते, ना त्या लोकांना. गेल्या काही वर्षांमध्ये जगभरातल्या सगळ्या बाजारपेठांमध्ये जिकडे तिकडे चीनमधून आलेल्या वस्तू प्रचंड प्रमाणात दिसत होत्या आणि त्या कमालीच्या स्वस्त भावाने विकल्या जात असल्यामुळे हातोहात खपत होत्या आणि घरोघरी जाऊन पोचत होत्या. इतकेच नव्हे तर मी कामानिमित्य ज्या कारखान्यांमध्ये जात होतो तिथेही यंत्रसामुग्री आणि कच्चा माल वाढत्या प्रमाणात चीनमधून यायला लागला होता. या सगळ्यांमुळे मला चीनविषयी अधिकाधिक कुतूहल वाटायला लागले होते.

माझ्या आयुष्यातल्या बहुतेक कालखंडामध्ये चीन हा देश बांबूच्या दाट पडद्याआड दडला होता आणि परकीय पर्यटकांना तिथे प्रवेश नव्हता, त्यामुळे मी कधी चीनला जाण्याचा विचारही करू शकत नव्हतो. पण पंधरावीस वर्षांपूर्वी चीनने आपली धोरणे बदलली आणि अर्थव्यवस्था थोडी मुक्त करून युरोपअमेरिकेतील भांडवलदारांना चीनमध्ये गुंतवणूक करायला परवानगी दिली. त्यानंतर अनेक लहानमोठ्या कंपन्यांनी चीनमध्ये कारखाने स्थापन केले, ऑफीसे उघडली आणि त्यानिमित्याने अनेक लोक चीनला जाऊन यायला लागले. काही प्रमाणात पर्यटकांचेही जाणेयेणे सुरू झाले. माझ्या माहितीतलेही काही लोक चीनचा दौरा करून आले. पण आता वयोमानाने माझ्यातच फिरायचे त्राण उरले नसल्यामुळे मला ते शक्य नाही. त्यामुळे असा अचानक चीनमार्गे प्रवास करायचा योग आला याचा मला मनातून थोडा आनंदच झाला. खरे तर वाटेत दोन दिवस बैजिंगला मुक्काम करून फिरायला मला आवडले असते, पण ते शक्य नव्हतेच. निदान तिथला विमानतळ तरी पहायला मिळेल, आभाळातूनच थोडे दर्शन घडेल आणि जमीनीवर आपले पाय टेकतील एवढे तरी होईल याचेच समाधान.

काही दिवसांनी आमच्याकडे भारतातला एक पाहुणा आला. त्याला आयटी उद्योगातला उदंड अनुभव होता आणि त्याने अनेक वेळा निरनिराळ्या मार्गांनी पृथ्वीप्रदक्षिणा केलेली होती. त्यात चीनमार्गे केलेला प्रवासही होता. तो म्हणाला, ” ते ठीक आहे, पण तुम्ही जेवणाचे काय करणार आहात?”
मी म्हंटले, ” मस्त दोन वेळा चायनीज फूड खाऊ, मला तर खूप आवडते.”
त्यावर तो म्हणाला, “अहो आपण पुण्यामुंबईला किंवा इथे अमेरिकेत जे चायनीज खातो तसले काही खरे चिनी लोक खातच नाहीत. ते लोक मीट म्हणून जे काय खायला घालतील त्याचा भयंकर वाससुद्धा तुम्हाला सहन होणार नाही. तुम्ही आपले तुमच्यासाठी ‘हिंदू फूड’ बुक करा.” असा सल्लाही त्याने दिला. आम्ही तो ऐकून घेतला, पण त्यावर काही कारवाई केली नाही, कारण माझी सून एकदा चायना ए्रअरने प्रवास करून आली होती आणि ती तर पक्की शाकाहारी होती. ब्रेड, भात, बटाटे असे काही ना काही पोटभर अन्न तिला प्रवासात मिळाले होते.

वीस जानेवारीला आमचे उड्डाण होते. त्यासाठी आधी काही चौकशी करायची गरज आहे का असे मी मुलाला विचारले, पण त्याला पूर्ण खात्री होती. एक दोन दिवस आधी विमानकंपनीकडून का ट्रॅव्हलएजंटकडूनच आम्हाला स्मरणपत्र आले आणि प्रवासासाठी तयार रहाण्याची सूचना आली. मी आपले सगळे कपडे आणि औषधे वगैरे इतर सामान माझ्या बॅगेतच ठेवले होते. रोजच्या वापरातले कपडे हँगरला टांगले होते. ते गोळा करून बॅगेत ठेवायला तासभरसुद्धा लागला नसता. मी स्वतःसाठी अमेरिकेत काहीच खरेदीही केली नव्हती कारण मला लागणारे सगळे काही इथे पुण्यातच मिळते हेही मला ठऊक होते. पण भारतातल्या इतर नातेवाईकांना देण्यासाठी काही खेळणी, कॉस्मेटिक्स, खाऊ आणि इतर काही सटरफटर लहानशा गोष्टी घेऊन ठेवल्या होत्या त्या सगळ्या वस्तूंना कपड्यांबरोबर अॅडजस्ट करून प्रवासाच्या बॅगा भरल्या.

ठरल्याप्रमाणे वीस जानेवारीला आम्ही लॉसएंजेलिस विमानतळाकडे जायला निघालो. विमानतळावरच काही बांधकाम सुरू केले होते आणि तिथे जाणारा मुख्य रस्ताच वहातुकीसाठी बंद केला होता. त्यामुळे टॅक्सीवाल्याने वळसा घालून आम्हाला विमानतळाच्या दुसऱ्या भागात नेऊन सोडले. त्यात थोडा जास्तीचा वेळ खर्च झाला, पण थोडी घाई करून आम्ही आमच्या विमानाच्या निर्गमन स्थानावर वेळेवर जाऊन पोचलो. त्या भागात गेल्यागेल्याच मला चीनमध्ये गेल्याचा भास झाला. आमच्या चहूबाजूला सगळे चिनीच दिसत होते. कॅलिफोर्नियामध्ये चीन, जपान, कोरिया या भागातून आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. त्यांच्यातले काही लोक चीनला जायला निघाले असतील, तसेच चीनमधून अमेरिकेला फिरायला आलेले लोक परत जात असतील अशा लोकांमध्ये सगळे आपल्याला तर सारखेच दिसतात. तसे थोडे गोरे किंवा काळे अमेरिकन आणि भारतीय वंशाचे लोकही होते, पण ते सगळे मिळून पंधरावीस टक्के असतील.

आम्ही ज्या ठिकाणी बसलो होतो तिथे आमच्या समोरच शाळेतल्या मुलामुलींचा एक घोळका बसला होता आणि किलबिलाट करत होता. आठदहा वर्षाची ती गोल गोबऱ्या चेहेऱ्याची गुटगुटित मुले खूपच गोड दिसत होती. ती वीसपंचवीस मुले आईवडिलांना सोडून शिक्षकांच्या सोबतीने चीनच्या सहलीला निघाली असावीत किंवा चीनमधून अमेरिकेला येऊन आता परत मायदेशी चालली असावीत. त्यांच्या धिटाईचेच आम्हाला कौतुक वाटले. प्रत्येकाच्या हातात एक लेटेस्ट मॉडेलचा सेलफोन होता आणि ती त्यावर काही तरी आजूबाजूच्या मुलांना चढाओढीने दाखवत होती आणि ते पाहून खिदळत होती. मधून मधून त्यांचा गाईड त्यांना काहीतरी सूचना देत किंवा दटावत होता. मला त्यातले अक्षरही समजत नव्हते, पण पहाण्यतच मजा येत होती आणि वेळ चांगला जात होता.

विमानात जाऊन बसायला ठरवून दिलेल्या वेळेला अजून दहापंधरा मिनिटे अवकाश असतांनाच काही लोकांनी गेटच्या दिशेने रांगेत उभे रहायला सुरुवात केली आणि ते पाहून मला भारताची आठवण झाली. आमची जी सीट ठरलेली होती तीच आम्हाला मिळणार होती, आधी विमानात शिरून जागा पकडायचा प्रश्नच नव्हता. तरीही लोक का घाई करतात ते मला काही समजत नाही. म्हणून आम्ही आपल्या जागी शांतपणे बसून राहिलो होतो. पण ती रांगच मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढत वाढत आमच्यापर्यंत आली तेंव्हा नुसते उठून उभे राहिलो आणि पाय मोकळे करून घेतले. तेवढ्यात ती रांग पुढे सरकायलाही लागली आणि आम्ही सगळे आपापल्या जागेवर जाऊन स्थानापन्न झालो. ती गोड चिनी बालके मात्र अदृष्य झाली होती. त्यांना विमानाच्या वेगळ्या भागात जागा दिली गेली असणार आणि बहुधा आधी आत नेऊन बसवले असावे.

ते एक महाकाय जंबो जेट होते, तरीही त्यातल्या सगळ्या म्हणजे चारपाचशे जागा भरल्या असल्यासारखे दिसत होते. आमच्या आजूबाजूला तसेच मागेपुढे सगळे चिनीच होते. त्यांच्याशी काही संवाद साधायचा प्रश्नच नव्हता आणि मी तसा प्रयत्नही केला नाही. समोरच्या स्क्रीनवर काय काय दिसते ते पहायचा प्रयत्न केला, पण तो स्क्रीन, त्याची बटने आणि त्यावर दिसणारी हलणारी चित्रे या कशाचीच क्वालिटी वाखाणण्यासारखी नव्हती, त्यामुळे जे दिसेल ते कसेबसे पहावे लागत होते. मी घरी येईपर्यंत त्यातले काहीसुद्धा माझ्या लक्षात राहिले नाही. आता तर त्यात कुठले प्रोग्रॅम होते हेसुद्धा आठवत नाही.

विमानात ठरल्याप्रमाणे जेवणे आणि नाश्ते मिळाले ते अगदीच काही वाह्यात नव्हते. चिकन किंवा फिश मागून घेता येत होते त्यामुळे बैल, उंदीर किंवा बेडूक असे काही खायची वेळही आली नाही की नुसते उकडलेले बटाटेही खावे लागले नाहीत. विमानप्रवासात कुठेच झणझणीत पदार्थ देत नाहीत. सगळीकडे मिळतात तितपत सौम्य किंवा बेचव जेवण या विमानप्रवासातही मिळाले. आमच्या मित्राने घातलेली भीती सत्यात उतरली नाही.

लॉसएंजेलिसहून निघाल्यावर आम्ही पश्चिमेच्या दिशेने पॅसिफिक महासागरावरून झेप घेऊ अशी माझी अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात आमचे विमान उत्तरेकडेच झेपावले आणि अमेरिकेच्या भूप्रदेशावरूनच पुढे जात राहिले. मला खिडकीजवळची सीट मिळाली नसल्याने बाहेरचे फारसे दिसत नव्हतेच, पण दूर क्षितिजावरसुद्धा पाणी दिसत नव्हते. पृथ्वी गोलाकार असल्यामुळे उत्तरेच्या दिशेनेही आपण दुसऱ्या गोलार्धात जाऊ शकतो याचा अनुभव मी या आधीही घेतला होता, तसा या प्रवासातही आला. आमच्या विमानाने पुढे गेल्यावर कुठेतरी वळून पॅसिफिक महासागर ओलांडलाही असेल, पण ते माझ्या लक्षात आले नसेल.

आम्ही बैजिंगच्या जवळपास पोचलो तोपर्यंत तिथला स्थानिक सूर्यास्त व्हायची वेळ झाली होती आणि प्रत्यक्ष तिथे पोचेपर्यंत तर अंधारच पडला. त्यामुळे त्या शहराचे फारसे विहंगम दर्शन झालेच नाही. तिथे उतरल्यानंतर पुढे मुंबईला जाणारे विमान पकडण्यासाठी आमच्याकडे दीड तासांचा वेळ होता. त्यामुळे इकडेतिकडे रेंगाळायला जास्त फुरसत नव्हती. तरीही आपण ट्रान्जिट लाउंजमध्ये जाऊन आधी पुढील विमानाचे गेट पाहून घेऊ आणि बैजिंगची आठवण म्हणून एकादी शोभेची वस्तू विकत घेऊन तिथला चहा किंवा कॉफी प्यायला वेळ मिळेल असे मला वाटले होते.

सर्व प्रवाशांबरोबर विमानातून उतरल्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत चालायला लागलो. मी आतापर्यंत जेवढे आंतरराष्ट्रीय विमानतळ पाहिले आहेत त्या सगळ्या ठिकाणी प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी ठळक अक्षरातले इंग्रजी बोर्ड जागोजागी लावलेले पाहिले होते, पण बैजिंगला ते सापडतच नव्हते. आमच्या विमानातले बहुतेक प्रवासी बहुधा शहरातच जाणार हे मला अपेक्षित होतेच, पण ट्रँजिट लाउंज किंवा इंटरनॅशनल कनेक्शन्सकडे जाणारा रस्ता असा बोर्डच कुठे दिसला नाही. विचारपूस करायला कोणता काउंटरही नव्हता. सगळ्या प्रवाशांबरोबर बाहेर जाणाऱ्या रस्त्यावरून पुढे जात असतांना एक युनिफॉर्म घातलेली महिला दिसली. ती बहुधा गर्दीवर लक्ष ठेवणारी सिक्यूरिटीवाली असावी. तिलाच आम्ही मुंबईला जायच्या विमानाकडे जायची वाट विचारली. भाषेचा प्रॉब्लेम तर होताच. त्यामुळे तिला आमचे बोलणे कळले की नाही ते ही आम्हाला समजत नव्हते. पण तिने एका बाजूला बोट दाखवले आणि आम्ही त्या बाजूला वळून चालायला लागलो.

त्या अरुंद रस्त्यानेही बरेच प्रवासी पुढे जात होते, त्यांच्या मागोमाग पुढे गेल्यावर तिथे एक सिक्यूरिटी चेक लागला. कदाचित दुसऱ्या देशांमधील सुरक्षातपासणीवर चिनी लोकांचा विश्वास नसावा. त्यामुळे विमानातून आलेल्या प्रवाशांनीसुद्धा पुढल्या विमानात शिरायच्या आधी तिथल्या सिक्यूरिटीमधून जाणे आवश्यक होते. रांगेमध्ये शंभरावर लोक होते आणि फक्त दोनच एक्सरे मशीने होती. त्यांचे कामही सावकाशपणे चाललेले होते. तिथे गेल्यावर अंगातले जॅकेट, कंबरेचा पट्टा, पायातले बूट आणि खिशातल्या सगळ्या वस्तू काढून ट्रेमध्ये ठेवल्या, एका सैनिकाने पायापासून डोक्यापर्यंत अगदी कसून तपासणी केली आणि पुढे जायची परवानगी दिली. पुन्हा सगळे कपडे अंगावर चढवून आणि पर्स, किल्ल्या, घड्याळ, मोबाईल वगैरे गोष्टी काळजीपूर्वक जागच्या जागी ठेवायचे सोपस्कार केले.

तोपर्यंत एक तास होऊन गेला होता आणि पुढे जाणारे विमान कुठे मिळेल हेही आम्हाला अजून समजले नव्हते. इकडे तिकडे पहातांना एका ठिकाणी सगळ्या फ्लाइट्सची यादी दिसली त्यावरून आम्हाला प्रस्थान करायचे गेट समजले. ते गेट कुठे आहे हे शोधून काढून तिथे जाऊन पोचेपर्यंत आमच्या फ्लाइटचे बोर्डिंग सुरू होऊन गेले होते. आता कुठले सोव्हनीर आणि कुठली कॉफी? तिथे आजूबाजूला कसली दुकाने आहेत, ती आहेत तरी की नाहीतच हेसुद्धा पहायला वेळ नव्हता. आम्हीही घाईघाईने विमानात जाऊन बसलो.

या विमानातले बहुसंख्य प्रवासी भारतीय होते. त्यामुळे एक वेगळा फील आला. हे विमान लहान आकाराचे असले तरी एअर चायनाचेच असल्यामुळे तिथली सर्व्हिसही पहिल्या विमानासारखीच होती. तसेच स्क्रीन, त्यावर तसलेच व्हीडिओ, तशाच हवाई सुंदरी आणि तसेच जेवण होते. बाहेर सगळा अंधारगुडुपच होता. थोडे स्क्रीनकडे पहात आणि थोड्या डुलक्या घेत वेळ काढला. स्थानिक वेळेनुसार रात्रीचे एक दीड वाजता मुंबई विमानतळ जवळ आल्याची आणि थोड्याच वेळात विमान खाली उतरणार असल्याची घोषणा झाली आणि त्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या सूचना देण्यात आल्या त्याबरोबर एक खास आणि वेगळी सूचना दिली गेली. “जर कोणता प्रवासी वूहानहून आला असेल आणि त्याला ताप किंवा सर्दीखोकला असेल तर त्याने मुंबई विमानतळावरील आरोग्य अधिकाऱ्याला भेटावे.” असे त्यात सांगितले गेले. आम्हाला त्याचे थोडे नवल वाटले, पण आम्हाला तर वूहान नावाची एक जागा आहे हेसुद्धा माहीत नव्हते आणि आम्ही थेट अमेरिकेतून आलो असल्यामुळे ती सूचना आम्हाला लागू होत नव्हतीच. पण हा काय प्रकार असेल याचा पत्ता लागत नव्हता.

मुंबई विमानतळावर उतरल्यावर इमिग्रेशन काउंटरकडे जायच्या रस्त्यावर एक मोठा उभा बोर्ड ठेवला होता आणि त्यावर ‘करोनाव्हायरस’ असा मथळा होता. ते वाचून मला पहिल्यांदा हा शब्द समजला. पुढे तो सगळ्यांच्या जीवनात इतके थैमान घालणार असेल याची मात्र तेंव्हा पुसटशी कल्पनाही आली नाही. त्या बोर्डावर खाली बरेच काही लिहिले होते, पण ते वाचायला त्यावेळी कुणाकडेच वेळ नव्हता. त्या काळात रात्रीच्या वेळी परदेशांमधून अनेक विमाने मुंबईला येत असत. त्यामुळे इमिग्रेशन काउंटरसमोर ही भली मोठी रांग होती. त्यातून पुढे सरकत सरकत आमच्या पासपोर्टची पाहणी झाल्यावर आम्ही सामान घ्यायला गेलो.

आम्हाला उशीर झाल्यामुळे आमच्या विमानातले थोडे सामान आधीच येऊन कन्व्हेयर बेल्टवर आले होते आणि काही सामान कुणीतरी उचलून बाजूला काढून ठेवले होते. परदेशातून आल्यावर बेल्टवरली आपली बॅग ओळखणे हेही एक मोठे दिव्य असते. एक तर आपण असल्या अवाढव्य बॅगा एरवी कधी कुठेच नेत नाही, त्यामुळे त्यांचे रंग, आकार वगैरे आपल्या ओळखीचे नसतात आणि इतर अनेक प्रवाशांकडेही तशाच दिसणाऱ्या बॅगा असतात. म्हणून आपली बॅग ओळखून येण्यासाठी मी त्यांवर मोठी लेबले चिकटवतो, त्यांना रंगीत रिबिनी बांधतो अशा खुणा करून ठेवतो, पण वाटेत बॅगांची जी आदळआपट होते त्यात कधीकधी त्या खुणा नाहीशा होण्याचीही शक्यता असते.

आम्ही आमच्या बॅगा शोधल्या, त्यात आमच्या दोन बॅगा आम्हाला सापडल्या आणि दोन सापडल्याच नाहीत. आता त्या आल्याच नाहीत की भामट्यांनी पळवून नेल्या हे कळायला मार्ग नव्हता. आम्ही एअरलाइन्सच्या काउंटरवर चौकशी करायला गेलो. तिथे बॅगा न मिळालेले वीसपंचवीस प्रवासी तावातावाने भांडत होते. काउंटरवाल्या माणसावर जोरजोरात ओरडत होते. तो तरी काय करणार? मुकाट्याने सगळे ऐकून घेत होता. थोडी शांतता झाल्यावर त्याने सगळ्यांना एकेक फॉर्म दिला आणि तो भरून द्यायला सांगितले. आपले नावगाव, पत्ता, फ्लाइट नंबर, सामानाच्या रिसीटचे नंबर वगैरे सगळा तपशील भरून आम्ही तो फॉर्म परत दिला. तोपर्यंत त्याच्याकडे विमानकंपनीकडून काही माहिती आली होती त्यात बैजिंगलाच राहून गेलेल्या सामानाचा तपशील होता. आमच्या नशीबाने त्यात आमच्या बॅगाही होत्या असे वाटले आणि थोडा धीर आला.

ते सामान पुढच्या फ्लाइटने मुंबईला पाठवतील असे आश्वासन मिळाले, पण बैजिंगहून मुंबईला येणारे पुढचे विमान तीन दिवसांनंतर येणार होते. पण आम्हाला तर पुण्याला जायचे होते, मुंबईत राहणे शक्यच नव्हते. मग आमचे सामान कूरियरने पुण्याला पाठवले जाईल असे सांगून त्याने आमचा पुण्याचा पत्ता लिहून घेतला. या गोंधळामध्ये आणखी तासदीडतास गेला. पण जास्त सामान नसल्यामुळे कस्टममध्ये वेळ लागला नाही. आम्ही ग्रीन चॅनेलमधून लवकर बाहेर आलो. आम्ही पुण्याला जाण्यासाठी गाडी बुक केलेली होतीच आणि तिचा सज्जन ड्रायव्हर आमची वाट पहात थांबला होता. पुढे मात्र आम्ही दिवस उजाडेपर्यंत सुरळीतपणे पुण्याला घरी येऊन पोचलो आणि एकदाचे हुश्श म्हंटले. तीन दिवसांनंतर आमचे राहिलेले सामानही आले.

अमेरिकेतले लोक सहसा घरात वर्तमानपत्रे घेतच नाहीत. मी तिथे असतांना रोज टीव्हीवरल्या बातम्यासुद्धा पहात नसे. अधून मधून जेंव्हा ऐकल्या होत्या त्यात कधीच करोनाव्हायरसचा उल्लेखही झाला नव्हता. २० जानेवारी २०२० रोजी आम्ही लॉसएंजेलिस विमानतळावर चांगले दीडदोन तास बसलो होतो किंवा इकडेतिकडे फिरत होतो. तिथून तर दररोज कितीतरी विमानांची बैजिंग किंवा शांघायला उड्डाणे होत असतात, पण तिथेही या साथीच्या वृत्ताचा मागमूससुद्धा नव्हता. कुठेही मुंबईतल्यासारखा बोर्ड नव्हता आणि कोणीही प्रवासी मास्क लावून बसले नव्हते. बैजिंगच्या विमानतळावरसुद्धा आम्हाला काही वेगळे जाणवले नाही. तिथे काही लोकांनी मास्क लावलेले दिसले, पण त्या लोकांना काही त्रास असेल किंवा प्रदूषणामुळे त्रास होण्याची भीती वाटत असेल असे मला त्यावेळी वाटले असेल. खरे तर आम्हाला त्याबद्दल विचार करायला सवड नव्हती. त्यामुळे २२ जानेवारीला मी मुंबईला येऊन पोचेपर्यंत कोरोना हे नावही ऐकले नव्हते.

मी पुण्याला आल्यावर मात्र रोजच्या वर्तमानपत्रात त्याविषयी उलटसुलट काहीतरी छापून आलेले समोर येत होते. त्या काळात तो फक्त चीनमधल्या वूहान या शहरापुरताच मर्यादित होता, पण तिथे तो झपाट्याने वाढत होता आणि टीव्हीवर दाखवली जाणारी त्या शहरातली दृष्ये भयानक असायची. आम्हा दोघांना सर्दीखोकला, ताप असले काही लक्षण नसल्यामुळे आम्ही बचावलो अशी खात्री होती, पण पुढे बातम्यांमध्ये असे यायला लागले की ती लक्षणे २-३ दिवसांनंतर दिसायला लागतात. आम्ही इथे येऊन पोचल्याच्या २-३ दिवसानंतर हा कालावधी क्रमाक्रमाने ४-५, ७-८, १०-१२ दिवस असा वाढतच गेला आणि त्याप्रमाणे आमच्या मनातली सुप्त भीतीही रेंगाळत राहिली. शिवाय असेही समजले की ज्याला अजीबात लक्षणे कधी आलीच नाहीत असा माणूससुद्धा संसर्गाचा वाहक असू शकतो. त्यामुळे मी शक्यतो स्वतःला इतरांपासून दूर दूरच ठेवत राहिलो. मी चीनमार्गे प्रवास केला आहे असे कुणाला सांगायचीही सोय राहिली नव्हती. त्यामुळे मी तो विषयच टाळत राहिलो. यातून पूर्णपणे मुक्त व्हायला जवळजवळ महिनाभर लागला, पण त्यानंतर लवकरच हा कोरोना इतर मार्गांनी भारतात आलाच आणि सगळा देश लॉकआउट झाला. त्यातून तो आजवर पूर्णपणे सावरलेला नाही.

थोडक्यात सांगायचे झाल्यास चीनमार्गे भारतात परत येण्याच्या प्रवासात किंवा त्यानंतर मला तसा काही त्रास झाला नाही. तो सुरळीतच झाला असे म्हणता येईल, पण त्यात काही मजा मात्र आली नाही आणि तो संस्मरणीय वगैरे काही झाला नाही.

विधिलिखित आणि योगायोग

बहुतेक सर्वसामान्य माणसे कांही प्रमाणात दैववादी आणि कांही प्रमाणात प्रयत्नवादी असतात. माझ्या बाबतीत प्रयत्नवादाचे प्रमाण जास्त असल्यामुळे माझे दैववाद्यांबरोबर खटके उडत असतात. अशाच एका चर्चेत एकाने मला विचारले, “तुमचा नशीबावर विश्वासच नाही कां?”
मी सांगितले, “म्हंटलं तर आहे, म्हंटलं तर नाही.”
“म्हणजे?”
“कधी कधी एकादा हुषार, समजूतदार आणि कष्टाळू माणूस खूप धडपड करतो, पण त्याला मिळावे तेवढे यश मिळत नाही आणि बेताची बुध्दी आणि कुवत असलेला दुसरा आळशी माणूस सगळे कांही मिळवून जातो. एकाद्या गोष्टीसाठी आपण जीवतोड मेहनत करूनही ती हाती येत नाही आणि दुसरी एकादी गोष्ट आपसूक पदरात पडते. कोणाला बंपर लॉटरी लागते तर कोणी विमान अपघातात सापडून दगावतो. हे सगळे नशीबामुळेच घडले असेच इतर सगळ्यांच्याबरोबर मीसुध्दा म्हणतो. याचा अर्थ मी सुध्दा नशीबावर विश्वास दाखवतो असा होतो. पण खरे सांगायचे तर माझ्या मते या सर्व घटना परिस्थितीजन्य असतात आणि आपल्याला त्या परिस्थितींचे पूर्ण आकलन होऊ शकत नाही. ढोबळपणे विचार करतां लॉटरीमध्ये नंबर निघणे एवढे कारण बक्षिस मिळण्यासाठी पुरेसे असते आणि कोसळलेल्या विमानात तो प्रवासी बसला होता यापलीकडे त्याच्या मृत्यूसाठी दुसरे कारण असायची गरज नसते, पण आपले विचार इथे थांबत नाहीत. लॉटरीतले नंबर काढण्याची पध्दत किंवा विमानाची रचना समजून घेणे आपल्याला शक्य नसते. त्यामुळे आपल्याला अगम्य असलेल्या गोष्टींच्या खोलात जाण्याऐवजी ईश्वराची इच्छा किंवा त्या माणसाचे भाग्य, पूर्वसंचित वगैरे कारणे दाखवून आपण तो विषय आपल्यापुरता संपवतो.”
“म्हणजे या गोष्टी नसतात कां?”
“ते मला माहीत नाही. पण त्या असतात असे म्हणण्यात बरेच फायदे नक्की असतात. आपण भांडून मिळवलेली गोष्टसुध्दा नशीबाने मिळाली असे म्हणून विनयशील होता येते आणि आपल्या गाढवपणामुळे हातातून निसटलेली गोष्ट आपल्या नशीबातच नव्हती अशी मखलाशी करून तो दोष लपवता येतो. तसेच दुसऱ्याच्या उत्कर्षाचे श्रेय त्याच्या भाग्याला देऊन त्याची मिजास उतरवता येते किंवा त्याच्या लबाडपणाकडे काणाडोळा करता येतो आणि काही बिनसले असेल तर त्याच्या नशीबाला दोष देऊन त्याच्या चुकांवर पांघरूण घालता येते, त्याची मर्जी राखणे किंवा त्याची समजूत घालणे वगैरे जमते. ”
“लॉटरी लागण्यात आणि विमान अपघातात तर त्या माणसाचे कर्तृत्व किंवा चूक नसतेच. त्या गोष्टी तर निव्वळ दैवयोगानेच घडतात ना?”
“नाही. त्या घटना घडण्याची कारणे निश्चितपणे असतात, पण त्या माणसाच्या बाबतीत ते घडावे हे योगायोग असतात असे मला वाटते. आपले भाग्य जन्माच्या वेळीच सटवाई कपाळावर लिहून ठेवते, दुसरी कोणती देवता ते तळहातावरील रेषांमध्ये पेरून ठेवते, भृगुमहर्षींनी संस्कृत भाषेत, नाडीग्रंथात तामीळमध्ये आणि नोस्ट्रॅडॅमसने कुठल्याशा युरोपियन भाषेत ते आधीच लिहून ठेवले आहे आणि त्यानुसारच सर्व घटना घडत आल्या आहेत आणि पुढे घडणार आहेत वगैरे गोष्टी माझ्या बुध्दीला पटत नाहीत. ज्यांच्या अस्तित्वाबद्दलच मला शंका आहे असल्या या संकल्पनांचा अभ्यास करण्यात मी आपला वेळ वाया घालवत नाही. उलट जे लोक विधीलिखित अगदी अटळ आहे असे सांगतात आणि ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतात तेच लोक बोटात अंगठ्या आणि गळ्यात ताईत घालून, कपाळाला अंगारा लावून, नवससायास, उपासतापास करून ते भविष्य बदलायचा प्रयत्न करतांना दिसतात याची मला गंमत वाटते. अगदी मुंगीच्या पायाला जेवढी माती चिकटली असेल तेवढासुध्दा विश्वास मी असल्या गोष्टींवर ठेवत नाही. त्यामुळे नशीबावर माझा विश्वास नाही असेसुध्दा मीच सांगतो असेही म्हणता येईल.”
“पण तुमच्याशिवाय बाकी सगळ्यांना त्याची प्रचीती येते म्हणून तर ते या गोष्टी करत असतील ना?”
“इतरांचे मी सांगू शकत नाही. कोणत्याही उपायाने कोणाचेही भले होत असेल तर मला त्याचा आनंदच वाटेल. शिवाय या तथाकथित उपायांचे इतर अनेक फायदे मला दिसतात. दुःखाने पिचलेल्या आणि अपयशामुळे निराश झालेल्यांना त्या प्रयत्नांमधून दिलासा आणि धीर मिळतो, हताशपणाच्या अवस्थेत असलेल्यांना आशेचा किरण दिसतो, आपल्या पाठीशी कोणती तरी अद्भुत शक्ती उभी आहे असे वाटल्याने त्याच्या आधारामुळे आत्मविश्वास वाढतो, मनाला खंबीरपणा मिळतो, अंगात उत्साह संचारतो, काम करायला हुरुप येतो, दैववादी माणूससुध्दा आपण कांही प्रयत्न करत आहोत असे समजतो आणि त्याचे समाधान त्याला मिळते. एका दृष्टीने पाहता तोसुद्धा त्याला सुचतील ते प्रयत्न करतच असतो, या सगळ्या गोष्टींचा आयुष्यात प्रत्यक्ष लाभ मिळतोच. शिवाय उपास केल्याने पचनसंस्थेला विश्रांती मिळते, तीर्थक्षेत्राला जाऊन देवदर्शन करण्याच्या निमित्याने प्रवास घडतो, वेगवेगळ्या जागा पाहून होतात, चार वेगळी माणसे भेटतात, त्यातून अनुभवविश्व समृध्द होते. खास नैवेद्यासाठी तयार करण्यात येणारे खाद्यपदार्थ तर अफलातून असतात. तुम्ही मला साजुक तुपातला शिरा, खव्याचा कंदी पेढा किंवा गूळखोबरे असे कांही खायला दिलेत तर मला त्याचा आनंदच वाटेल आणि मी ते आवडीने खाईन. माझ्या कपाळाला अंगारा लावलात तर मी तो पुसून टाकणार नाही याचे कारण मला तुम्हाला दुखवायचे नाही. इतरांचा विचार करूनही आपण कांही गोष्टी करत असतो. कोणा ना कोणाला बरे वाटावे म्हणून मी वर दिलेल्या अनेक गोष्टी करत आलो आहे. पण त्यामुळे माझ्या आधीव्याधी नाहीशा होतील, इडापिडा टळतील आणि माझा भाग्योदय होईल अशी अपेक्षा मात्र मी ठेवत नाही. तशा प्रकारचा अनुभव आजपर्यंत कधी मला आलेला नाही.”
“तुमच्या मनात श्रध्दाच नसेल तर त्याचे फळ कसे मिळणार? नैवेद्य म्हणून खाल्लात तर त्याचा गुण येईल, खोबरे म्हणून खाल्लेत तर तो येणार नाही, फक्त कोलेस्टेरॉल वाढेल.”
“प्रसाद म्हणून एकदम पंचवीस पेढे खाल्ले तर ते पचणार आहेत कां? माझे जाऊ द्या, पण इतरांना आलेली प्रचीती तरी दिसायला हवी ना.”
“अहो, हांतच्या कांकणाला आरसा कशाला? आपल्या गाडगीळांच्या सुजाताच्या पत्रिकेतला मंगळ जरा जड होता. मागच्या गुरुपुष्यामृताला तिने बोटात लाल खड्याची अंगठी घातली आणि सहा महिन्यात तिचे लग्न जमले सुध्दा.”
“अरे व्वा! ती एका नदीच्या रम्य किनारी उभी होती आणि तिच्या बोटातल्या अंगठीच्या प्रभावाने ओढला जाऊन एक उमदा राजकुमार अबलख घोड्यावर बसून दौडत तिच्यापाशी आला असे तर झाले नाही ना? आता सगळी राज्ये खालसा झाली आहेत आणि नद्यांचे पाणी दूषित झाल्यामुळे त्यांचे किनारे रम्य उरले नाहीत, अबलख घोडे आता रेसकोर्सवरच धांवतात, त्यामुळे अशी परीकथा कांही प्रत्यक्षात आली नसेल. ती एकाद्या मॉलमधल्या मॉडेलला निरखत असतांना एकादा तरुण कारखानदार तिथे आला आणि अंगठीमुळे तिच्यावर मोहित होऊन तिला आपल्या बीएमडब्ल्यूमध्ये बसवून घेऊन गेला असेही झाले नाही. पूर्वी ज्या स्थळांकडून तिला नकार आला होता, त्यांना उपरती होऊन आता ते सोयरीक करण्यासाठी गाडगीळांना शरण आले असेही ऐकले नाही. मुलीच्या बोटात लाल खड्याची अंगठी घातल्यानंतरही गाडगीळ तिच्यासाठी वरसंशोधन करत होतेच. मग त्या अंगठीने असा कोणता चमत्कार केला?”
“पण आधी तिचे लग्न जमत नव्हते आणि आता ते जमले याला तुम्ही काय म्हणाल, फक्त योगायोग? बोटात लाल खड्याची अंगठी घातल्यानंतर सुजाताचं लग्न ठरलं ही ज्योतिषविद्येची प्रचीती नाही तर काय फक्त योगायोग आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे कां?” त्या गृहस्थांनी मला विचारले.
मी सांगितले, “तसे म्हणता येईल, पण मी म्हणणार नाही.”
“तुमचा नशीबावर विश्वास नाही आणि हा योगायोगही नाही, मग आहे तरी काय?”
“योगायोग म्हणजे ‘कोइन्सिडन्स’ या शब्दाचा अर्थ एकाच वेळी दोन घटना घडणे एवढाच होतो. त्या अर्थाने हा एक योगायोग ठरतो. पण अशा असंख्य घटना क्षणोक्षणी घडत असतात. सगळ्यांनाच योगायोग म्हंटले तर त्याचे महत्व राहणार नाही. आपल्याला महत्वाच्या वाटणाऱ्या आणि परस्परसंबंध नसलेल्या दोन घटना अनपेक्षितपणे एका वेळी घडल्या तरच त्याला ‘योगायोग’ असे सर्वसाधारणपणे म्हंटले जाते. दोनापैकी एक जरी अनपेक्षित असली तरी कधीकधी तो योगायोग धरला जातो. सुजाताचे लग्न त्या अंगठीच्या प्रभावामुळे जमले असे तुम्हाला वाटते, या दोन घटनांमध्ये कार्यकारण संबंध आहे असे वाटत असल्यामुळे तुमच्या दृष्टीने तो योगायोग नव्हता. मला तसे वाटत नसल्यामुळे कदाचित त्याला योगायोग म्हणता येईल. पण सुजातामध्ये कसलीच उणीव नाही आणि गाडगीळांची परिस्थितीही चांगली आहे. तिच्या बोटात अंगठी असो वा नसो तिचं लग्न आज ना उद्या ठरणारच होतं. गाडगीळांच्या घरातल्या सगळ्याच लोकांच्या बोटात निरनिराळ्या रंगाच्या खड्यांच्या अंगठ्या नेहमीच दिसतात. म्हणजे यातही अनपेक्षित असे कांही घडलेले नाही. दोन अपेक्षित घटना घडल्या तर मला त्यात योगायोगही दिसत नाही. ज्या गोष्टीसाठी काही लोक नवससायास वगैरे करतात ती गोष्ट घडण्याची अपेक्षा तर असतेच, फक्त खात्री नसते. मनासारखे झाले की प्रचीती आली असे म्हणायचे आणि नाही झाले तर श्रध्दा कमी पडली, पूर्वसंचित आडवं आलं वगैरे स्पष्टीकरणे तयारच असतात. त्यामुळे यात अचानक घडणाऱ्या योगायोगाचं प्रमाण कमी असतं. ”
“आयुष्यातल्या ज्या गोष्टी भाग्यानुसार घडत असतात, त्यांना तुम्हीच योगायोग म्हणता ना!”
“रोजच्या जीवनात अपेक्षित असलेल्या घटना बहुतेक वेळा ठरल्यानुसार घडत असतात. त्यांना योगायोग म्हणायची गरज नाही. पण कधीकधी जीवनाला अनपेक्षितपणे कलाटणी मिळते. एकाद्याचे नशीब अचानक फळफळलं किंवा दैवाने घात केल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसटला, निश्चित वाटणाऱ्या विनाशातून एकादा भाग्यवंत थोडक्यात बचावला किंवा दुसऱ्या कोणावर अचानक आकाशातून कुऱ्हाड कोसळली वगैरे जे आपण म्हणतो तशा गोष्टींबद्दल बोलतांना तसे योगायोगाने घडले असेल असे मी म्हणेन. सगळेच योगायोग परिणामकारक असतातच असे नाही. अनेक वेळा योगायोगाने घडणाऱ्या घटनांचा आपल्या जीवनावर कांहीच प्रभाव पडत नाही. दूरदेशी राहणारा एकादा जुना मित्र ध्यानी मनी नसतांना आपल्याला प्रवासात कुठे तरी भेटतो. अशा योगायोगातून चार घटका मजेत जातात आणि पूर्वीच्या आठवणींना उजाळा मिळतो एवढेच होते. असले योगायोग आपण कांही काळाने विसरूनही जातो. एकादी प्रसिध्द व्यक्ती अकस्मात भेटली तर ती आठवण आपण जपून ठेवतो पण त्यातून आपल्या जीवनात कांही बदल येत नाही. अशा एकाद्या आकस्मिक भेटीतून उत्कर्षाच्या नव्या संधी मिळाल्या किंवा फसगत झाली, जीवनाची दिशाच बदलली असे झाले तर तो टर्निंग पॉइंट ठरतो आणि कायम लक्षात राहतो.”
“अशा गांठीभेटींचे योग आपोआप येत नाहीत. परमेश्वराने ते जुळवून आणले तरच ते येतात.”
“हे ज्याने त्याने ठरवायचे आहे.”

योगायोगाबद्दल बोलायचे झाले तर कधीकधी ज्याला आपण योगायोग समजतो त्याची योजना कोणीतरी ठरवून केलेली असते पण आपल्याला ती गोष्ट माहीत नसते. कधीकधी आपल्या अज्ञानामुळे आपण तशी समजूत करून घेतो आणि नंतर जास्त माहिती मिळाल्यावर ती बदलते असेही होते. याचे उदाहरण पाहिजे असेल तर कोणतीही टीव्ही सीरीयल पहावी. याचे एक उदाहरण पहा.

बंगलोरचा बसवण्णा, चेन्नैचा चेंगप्पा आणि जयपूरचा जयसिंग हे तीन गृहस्थ १ जूनच्या सकाळी ९ वाजून ५९ मिनिटांनी अंधेरीला एकाच ठिकाणी धांवतपळत जाऊन पोचले ……… योगायोग असेल.
ते तीघेही त्या ऑफीसात नोकरीला आहेत. ……….. मग ते एकत्र येणारच, त्यात योगायोग नाही.
ते तीघेही वेगवेगळ्या भागात राहतात तरीही ते नेमके एका वेळी कसे पोंचले? ….. योगायोगाने?
त्या दिवशी त्यांच्या ऑफीसच्या तिजोरीमध्ये बरीच रोकड होती ….. कदाचित योगायोगाने?
तो पगाराचा दिवस होता. ….. मग ती असणारच …. योगायोग नाही
सकाळी १० वाजून १० मिनिटांनी तिथे सशस्त्र दरोडेखोरांचे एक लहानसे टोळके आले. …… ते ठरवूनच आले असणार …. योगायोग नाही.
पण नेमके त्याच जागी कां आले? …. कदाचित योगायोगाने? किंवा कदाचित ठरवूनही आले असतील!
आल्या आल्या त्यांनी बंदुकीतून एक गोळी झाडली ….. दहशत बसवण्यासाठी असेल … योगायोग नाही
तिने थेट चेंगप्पाचा वेध घेतला ….. योगायोग ?
ते दरोडेखोर आपसात तामिळ भाषेत बोलले … कुठेतरी पाणी मुरतेय्.
कांही क्षणातच तिथे पोलीस येऊन पोचले ….. प्रचंड योगायोग …. त्यांना कसे समजले ???
ते पोलीस या दरोडेखोरांच्या मागावर होते ……. ???
ते दरोडेखोर तर बसवण्णाचा माग घेत तेथे पोचले होते. …….. कां?
त्याच्या ऑफीसात १ तारखेला बराच माल असतो असे त्याने बंगलोरला असतांना कोणाला तरी फुशारकी मारून सांगितले होते आणि त्याच्या संरक्षणासाठी कांही खास बंदोबस्त नसतो हेसुध्दा तो अनवधानाने बोलून गेला होता. ती माहिती तिकडच्या एका गँगला कळली होती …. योगायोग
आणि त्या पैशांवर डल्ला मारण्याचा बेत करून त्यांचे टोळके अंधेरीला आले होते. …. म्हणजे ठरवून, .. योगायोग नाही.
त्यांच्यातल्या एकाला कदाचित चेंगप्पाचा चेहेरा ओळखीचा वाटला ….. योगायोग
कदाचित त्या चोराला आपण ओळखले जाऊ अशी शंका आली म्हणून त्याने आधी त्यालाच गोळी घातली …… योगायोग संपला
ते दरोडेखोर बसवण्णाला शोधत मुंबईत अंधेरीला आले असल्याची माहिती त्याच्या बंगलोरच्या मित्राला कुठून तरी समजली होती …. योगायोग
आणि त्याने सकाळीच फोन करून बसवण्णाला सावध केले. ….. योगायोग नाही
बसवण्णा जाम घाबरला, त्याने चेंगप्पा आणि जयसिंगला बोलावून घेतले. त्यांनी धीर दिल्यावर त्यांच्यासोबतीने तो ऑफीसात आला. …… योगायोग संपला
जयसिंगचा एक मित्र अंधेरीला पोलिस इन्स्पेक्टर होता …… योगायोग
जयसिंगने लगेच ही बातमी आपल्या मित्राला सांगितली. अशीच माहिती पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांकडूनही मिळाली होती. पोलिसांनी त्यांच्या ऑफीसवर नजर ठेवलेलीच होती. ……. योगायोग संपला.
चोर तिथे आल्यानंतर लगेचच पोलीस तिथे आले आणि त्यांनी चोरांना ताब्यात घेतले. …. योगायोग नव्हता
चेंगप्पाने ही नोकरी सोडायचे ठरवले होते. फक्त पगार घेण्यासाठी तो थांबला होता आणि त्याच दिवशी त्याला गोळी लागली …. योगायोग
त्या धक्क्याने तो खाली कोसळला असला तरी त्याची जखम गंभीर नव्हती. दोन आठवड्यात तो बरा होऊन हिंडू फिरू लागला. त्याच्या औषधोपचाराचा सगळा खर्च त्याच्या ऑफीसने केलाच, शिवाय अट्टल गुन्हेगारांना पकडून दिल्याबद्दल त्या तीघांना बक्षीसही मिळाले. …….. योगायोग म्हणावे की नाही?
आता चेंगप्पाने नोकरी सोडली नाही. मात्र तीघांनीही बदल्या करून घेतल्या. त्या वेगवेगळ्या ठिकाणी झाल्यामुळे ते एकमेकांपासून दूर गेले.

या सगळ्या गोष्टी त्यांच्या नशीबात लिहिल्या होत्याच असे कांही लोकांना वाटते. चेंगप्पा आणि बसवण्णा यांच्या कुंडलीत अपमृत्यूचा योग होता किंवा त्यांच्या तळहातावरील लाइफलाईनला छेद गेलेले होते म्हणे. ते दोघे मिळून नुकतेच तिरुपतीला जाऊन व्यंकटेशाचे दर्शन घेऊन आले होते आणि सकाळी घरातून निघतांना आठवणीने तिथला अंगारा कपाळाला लावून आले होते. त्यानेच त्यांचे रक्षण झाले अशी त्यांना खात्री आहे.

मला तरी हे सगळे योगायोग वाटतात, बरेचसे योगायोग आपल्याला वाटते तेवढे दुर्मिळ नसतात, त्यांची शक्यता बरीच मोठी असते हे मी या लेखात संख्याशास्त्रामधून दाखवले आहे.
योगायोगांचे संख्याशास्त्र
https://anandghare2.wordpress.com/2010/07/29/%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4/

तरीसुद्धा इतके योगायोग कसे जुळून आले असा प्रश्नही पडतो.

 

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय

ABGMM

गांधर्व महाविद्यालय (भाग १)

मुंबईचे सी.एस.टी. (पूर्वीचे व्हीटी) स्टेशन, राजाबाई टॉवर, हायकोर्ट वगैरे जुन्या इमारतींनी आपली जन्मशताब्दी साजरी केली असेल. ज्या कारणासाठी त्या बांधल्या गेल्या होत्या त्या रेल्वे, युनिव्हर्सिटी, न्यायालये आदि ब्रिटीशांच्या कालखंडात सुरू झालेल्या संस्था तर नक्कीच शंभर वर्षापेक्षा जुन्या आहेत आणि आजही कार्यरत आहेत. उद्योग व्यवसायक्षेत्रातील कांही घराणीसुध्दा गेल्या शंभर वर्षांपासून चालत आलेली असतील. शंभर वर्षांपूर्वीच्या म्हणजे लोकमान्य टिळकांच्या काळात अनेक देशभक्तांनी समाजाला उपयुक्त पडतील अशा संस्था विविध क्षेत्रात सुरू केल्या होत्या. त्यातल्या कांही संस्थांची त्या वेळी ठरवलेली उद्दिष्टे पूर्ण झाली, कालांतराने बदललेल्या परिस्थितीत त्यांचे महत्व कमी झाले, मूळ संस्थापकानंतर त्याच तळमळीने कार्य करणारे कार्यकर्ते उपलब्ध झाले नाहीत अशा वेगवेगळ्या कारणांमुळे त्यातल्या कांही संस्था अस्तंगत झाल्या, तर कांही संस्थांनी नवनवी कामे हाती घेऊन कार्याचा आवाका वाढवत नेला. आज त्यांचे मोठे वटवृक्ष फोफावले आहेत.

गांधर्व महाविद्यालय ही एक संस्था गेली शंभराहून अधिक वर्षे मुख्यतः मूळ उद्देशाला चिकटून उभी आहे आणि त्याचबरोबर काळानुसार आवश्यक तेवढे बदल घडवून आणून तंत्रज्ञानातल्या प्रगतीचा लाभ घेत आली आहे. इसवी सन १९०१ साली सुरू झालेल्या या संस्थेचा वर्धापन दिन परवा ५ मे रोजी वाशी येथील गांधर्वनिकेतनाच्या प्रांगणात साजरा झाला. हा एक साधेपणाने पण जिव्हाळ्याने घडवून आणलेला आटोपशीर असा समारंभ होता. सुरुवातीला सध्याच्या पदाधिकारी वर्गाने उपस्थित मान्यवरांचे तसेच श्रोत्यांचे स्वागत केले. जास्त लांबण न लावता मोजक्याच पण अर्थपूर्ण शब्दात हा औपचारिक कार्यक्रम आटोपल्यावर पं.गोविंदराव पलुस्कर यांनी आपल्या मुख्य भाषणात श्रोत्यांना थेट शंभर वर्षांपूर्वीच्या काळात नेले.

गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक स्व.विष्णू दिगंबर पलुस्कर हे एक ऋषितुल्य व्यक्तीमत्व होऊन गेले. सन १८८६-८७ च्या सुमारास त्यांनी मिरजेचे स्व.पं.बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण सुरू केले. संगीताचे शिक्षण घेताघेता ते तत्कालीन भारतीय समाजातील परिस्थितीकडे डोळसपणे पहात होते. ( खरे तर त्यांची दृष्टी अधू होती. ती तशी असली तरी मनःचक्षू समर्थ होते).

त्या काळात शास्त्रीय संगीताला समाजात प्रतिष्ठेचे स्थान नव्हते. एका बाजूला भजन, कीर्तन, भारुडे इत्यादी भक्तीसंगीत आणि दुसऱ्या बाजूला शाहिरी पोवाडे, लावण्या वगैरे गाणी अशा पध्दतीने लोकसंगीत जनमानसाच्या रोमारोमात भिनले असले तरी शास्त्रशुध्द संगीत मात्र लोकांच्या कानापर्यंत पोचतच नव्हते. त्या काळात रेडिओ, टीव्ही सारखी प्रसारमाध्यमे नव्हती, ग्रामोफोनच्या रेकॉर्डसुध्दा नव्हत्या. मोठमोठे उस्ताद, खाँसाहेब, पंडित, बुवा वगैरे शास्त्रीय संगीतातले बहुतेक गुणीजन त्या काळातल्या राजेरजवाडे, संस्थानिक, नवाब किंवा किमानपक्षी जहागिरदार, सधन व्यापारी अशा धनाढ्य लोकांच्या आश्रयाने रहात असत. त्यांच्या मनोरंजनासाठी त्यांचे राजवाडे, महाल, हवेल्या वगैरे जागी त्याच्या मैफली होत आणि त्यात मालकांच्या मर्जीतील निवडक मंडळींनाच प्रवेश मिळत असे. यामुळे सामान्य जनतेला अभिजात संगीताचा आनंद मिळत नसे. त्या काळातील या कलाकारांतले कांही महाशय जास्तच लहरी असत, कांही शीघ्रकोपी म्हणून तर कांही चंगीभंगीपणासाठी ओळखले जात. इतर कांही लोकांबद्दल विनाकारण अशा वावड्या उठवल्या जात. एकंदरीत संगीत आणि संगीतकार यांबद्दल सर्वसामान्य सभ्य लोकांचे मत फारसे चांगले नसल्यामुळे ते त्यांच्याशी फटकून वागत असत. संगीत रंगभूमीने शास्त्रीय संगीताची थोडीशी झलक लोकांपर्यंत पोचवायला नुकतीच सुरुवात केली होती. पण नाटकवाल्यांपासूनही लोक थोडे दूरच रहात असत.

स्व.पलुस्करांना याचे फार वाईट वाटत असे. ही परिस्थिती बदलायला पाहिजे, सर्वसामान्य लोकांना दैवी शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेता आला पाहिजे, संगीतज्ञांची प्रतिमा उजळली पाहिजे, त्यांचा जनसंपर्क सुधारला पाहिजे, संगीत आणि संगीतज्ञ यांना प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे असे त्यांना सारखे वाटत असे. यावर गंभीरपणे विचार करून त्यांनी स्वतःला या कार्याला वाहून घ्यायचे ठरवले. नुसतेच ठरवले नाही तर त्या कार्याची दिशा निश्चित केली आणि स्वतःला त्या कार्यात झोकून दिले.
……….

गांधर्व महाविद्यालय (भाग २)

gandahrva

आज झिम्बाब्वे किंवा ग्वाटेमालासारख्या देशात काय चालले आहे ते आपण घरबसल्या टीव्हीवर पाहू शकतो. शंभर वर्षांपूर्वी कसलीच दृक्श्राव्य माध्यमे उपलब्ध नव्हती. त्यामुळे प्रत्यक्ष जाऊन पाहणे किंवा वाचन, श्रवण एवढीच माहिती मिळवण्याची साधने असायची. त्यामुळे स्व.विष्णू दिगंबर पलुस्करांनी आपले ध्येय साध्य करण्यासाठी आधी स्वतः देशभर भ्रमण करायचे ठरवले. त्या कामासाठी आपल्या गुरूजींचा आशिर्वाद आणि निरोप घेऊन त्यांनी मिरज सोडले आणि ते प्रथम बडोद्याला गेले. त्या काळातले बडोद्याचे महाराज त्यांच्या कलासक्तीसाठी प्रसिध्द होते. गायन, वादन, चित्रकला. शिल्पकला आदी सर्व कलांना ते सढळ हाताने मदत करून प्रोत्साहन देत असत. त्यामुळे बडोदा हे शहर पूर्वी अनेक कलाकारांना आकर्षित करीत असे.

असे असले तरी स्व.पलुस्कर थेट बडोद्याच्या महाराजांच्या चरणी मस्तक ठेवायला गेले नाहीत. त्यांनी तिथल्या एका देवळात आपल्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम ठेवला. देवदर्शनाला येणारी भक्तमंडळी व आजूबाजूला राहणारे लोक यांना तोंडी सांगणे, कांही हँडबिले वाटणे, जाहीर फलक लावणे अशा साधनाने प्रसिध्दी करण्यात आली. अशा प्रकारचे संगीत ऐकणे लोकांना नवीनच होते, पण त्यांना ते खूप आवडले व त्यांच्या कार्यक्रमाला गर्दी होऊ लागली. याची बातमी महाराजांना लागली आणि त्यांनी सन्मानाने स्व.पलुस्करांना बोलावणे पाठवले. त्यांचे गायन ऐकून त्यांना राजगायकाचे पद देऊ केले.

त्या काळात ही एक मोठी गोष्ट होती. ते पद स्वीकारल्यावर राहण्याजेवण्याची उत्तम सोय होणार होती आणि आयुष्याची ददात मिटणार होती. महाराजांची मर्जी राखून ठेवण्यापुरते त्यांच्या दरबारात गायन केल्यानंतर उरलेला सारा वेळ संगीताची साधना करण्यात घालवता आला असता. पण पलुस्करांना मनापासून जे कार्य करायचे होते ते असे नोकरीत अडकून पडल्यावर करता आले नसते. त्यामुळे त्यांनी विनम्रपणे नकार दिला आणि आपला मुक्काम हलवला. पुढील तीन चार वर्षे ते भारतभर फिरत राहिले. जागोजागी आपले कार्यक्रम करून दाखवून श्रोत्यांमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी निर्माण करायची तसेच इतर कलाकारांचे गायन ऐकून त्यातल्या बंदिशी, चिजा, गाण्याच्या पध्दती वगैरेंचा अभ्यास करायचा आणि त्यातून आपले ज्ञान व कौशल्य समृध्द करायचे असा दुहेरी कार्यक्रम त्यांनी सुरू ठेवला.

दि.५ मे १९०१ रोजी लाहोरला असतांना त्यांनी गांधर्व महाविद्यालय ही संस्था स्थापन केली आणि तिच्यामार्फत संगीताचे रीतसर शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्या काळी ही कल्पना नवीनच होती. परंपरागत गुरू शिष्य परंपरेने शिकवणारे बुवा किंवा उस्ताद आपापल्या मर्जीप्रमाणे किंवा कल्पनेप्रमाणे आणि शिष्याची कुवत व ग्रहणशक्ती पाहून त्यानुसार त्यांना संगीत शिकवत असत. शाळेय शिक्षणासारखा पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तके, परीक्षा पध्दती वगैरे कांहीसुध्दा या क्षेत्रासाठी त्या काळात अस्तित्वात नव्हते, कदाचित इतर कोणी त्याची कल्पनाही केली नसेल. पलुस्करांनी मात्र हे सगळे योजून ठेवले होते.

त्यांनी संगीताच्या शिक्षणातील प्रगती मोजण्याच्या पायऱ्या निर्माण केल्या. पुढील काळात या कल्पनेचा विकास होऊन प्रारंभिक, प्रवेशिका (प्रथम व पूर्ण), मध्यमा (प्रथम व पूर्ण), विशारद (प्रथम व पूर्ण), अलंकार (प्रथम व पूर्ण) अशा श्रेणी निर्माण झाल्या. सुरुवातीला लहान मुलांच्या लक्षात राहतील अशी गाणी त्यांना चालीवर शिकवायची. यासाठी त्या काळातल्या शास्त्रीय संगीतातल्या अवघड बंदिशी न घेता पलुस्करांनी सोपी भजने निवडून त्यांना रागदारीवर आधारलेल्या चाली लावल्या आणि ती शिकवायला सुरुवात केली. चाली लक्षात राहिल्यावर त्यांच्या आधाराने थोडे आलाप, ताना घ्यायला शिकवायच्या असे करत मुलांना गोडी वाटेल अशी हळू हळू प्रगती करीत त्यांना रागदारीचे ज्ञान ते देत जात असत. गोविंदराव पलुस्करांनी याची कांही उदाहरणे गाऊन दाखवली. अशा गाण्यांच्या छोट्या पुस्तिका स्व.विष्णू दिगंबरांनी खास तयार करवून घेतल्या होत्या.

स्व.विष्णू दिगंबर पलुस्करांनी विद्यार्थ्यांची दोन गटात विभागणी केली होती आणि ते त्यांना वेगवेगळ्या स्तरावर शिक्षण देत असत. सर्वसाधारण विद्यार्थ्यांना वर सांगितलेल्या पध्दतीने शिकवीत असत, तर कांही निवडक विद्यार्थ्यांना ते पुढे जाऊन संगीतशिक्षक बनावेत अशा हेतूने वेगळ्या पध्दतीने शिकवत असत. स्वतः उत्तम गाता येणे आणि शास्त्रशुध्द गायन समजून ते शिकवता येणे या वेगळ्या गोष्टी आहेत हे त्यांना पूर्णपणे माहीत होते. त्यामुळे ज्यांनी शिक्षक बनावे असे त्यांना वाटले त्यांना ते स्वर, ताल, लय यांचेविषयीचे मूलभूत ज्ञान विस्तारपूर्वक देत, रागदारीमधील बारकावे समजावून सांगत, स्वरलिपीमध्ये प्राविण्य मिळवायला शिकवीत अशा अनेक प्रकाराने त्यांची उत्तम तयारी करवून घेत असत. कांही लोकांना दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे जमतात अशीही उल्लेखनीय उदाहरणे आहेत. मात्र परंपरागत पध्दतीत स्वतः अधिकाधिक नैपुण्य मिळवण्यावर भर असे, तर पलुस्करांनी द्रष्टेपणाने संगीतशिक्षकांची पिढी तयार केली आणि संगीताच्या प्रसारकार्यासाठी त्यांना लखनऊ, काशी वगैरे ठिकाणी पाठवून दिले. तिथे जाऊन त्यांनी वेगवेगळ्या संस्थांमधून कार्य करून शास्त्रीय संगीताचा प्रसार केला अशी कांही उदाहरणे गोविंदरावांनी सांगितली.

शास्त्रीय संगीताला आता उच्चभ्रू वर्गात सन्मानाचे स्थान मिळाले आहे. आकर्षक वाटणाऱ्या पाश्चात्य संगीताच्या कोलाहलातसुध्दा अभिजात हिंदुस्थानी संगीत आपली लोकप्रियता टिकवून आहे. हे सगळे होण्यामागे स्व. विष्णू दिगंबर पलुस्करांनी केलेल्या तपश्चर्येचा मोठा वाटा आहे असे म्हणावेच लागेल. त्यांनी सुरू केलेल्या गांधर्व महाविद्यालय या संस्थेने शंभर वर्षाहून अधिक काळ हा ज्ञानयज्ञ प्रज्वलित ठेवला आहे. पुढील काळात या संस्थेचे नामकरण “अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ” असे झाले. येणाऱ्या काळात त्यांचे काम पुढे नेण्यासाठी कांही नव्या योजना विचाराधीन आहेत असे सूतोवाच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले. ठराविक कालावधीने या संस्थेच्या निवडणुका होतात आणि नवी मंडळी तिच्या कार्याची धुरा खांद्यावर घेऊन मोठ्या उत्साहाने आणि समर्थपणे ती वाहून नेतात हे गेली पंचवीस तीस वर्षे मी दुरूनच कां होईना, पण पहात आहे. त्यामुळे ती यापुढेही अशीच चैतन्याने भारलेली राहील अशी मला खात्री वाटते.

आज या संस्थेचा खूप विस्तार झाला आहे. तिचे रजिस्टर्ड ऑफीस मिरज येथे आणि मुख्य कार्यालय वाशी इथे आहे. तिच्याशी संलग्न अशा १२०० संस्था भारताच्या कान्याकोपऱ्यात पसरल्या आहेत आणि ८०० केंद्रांवर तिच्यातर्फे परीक्षा घेतल्या जातात. त्यात दरवर्षी सुमारे एक लाख विद्यार्थी परीक्षा देतात. येणआऱ्या काळातही तिचा विस्तार होत राहो आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचाही प्रसार होत राहो अशा या पोस्टमधून शुभेच्छा.

कौटुंबिक संमेलन

नऊ वर्षांपूर्वी सात भागात लिहिलेला हा वृत्तांत एकत्रित करून या लेखात दिला आहे.

कौटुंबिक संमेलन – १

अनीशच्या मुंजीला खूप लोक आले होते. त्याच्या आईकडचे आणि वडिलांकडचे नातेवाईक, बिल्डिंगमधले शेजारी, अनीशच्या शाळेतले त्याचे दोस्त, त्याच्या आईवडिलांची आणि आजोबाआजींची घनिष्ठ मित्रमंडळी आणि त्यांच्या ऑफिसांमधले सहकारी वगैरे वेगवेगळ्या कारणांनी त्या कुटुंबाशी जोडले गेलेले लोक आपापल्या ओळखीतल्या लोकांच्या लहान लहान कोंडाळ्यात जमून गप्पा मारत होती. त्यातले काही लोक एक ग्रुप सोडून त्यांच्या परिचयातल्या दुसऱ्या तिसऱ्या घोळक्यांमध्ये सामील होत होते, पण आधीपासून असलेल्या ओळखींच्या पलीकडे कोणीच फारसा जात नव्हता. त्यामुळे तो समुदाय एकजिनसी असा वाटत नव्हता.

प्रसादच्या डोक्यात त्यावेळीच एक कल्पना चमकून गेली की आधीपासून तो ठरवून आला होता कोण जाणे, त्याने आमच्याकडच्या सगळ्या आप्तांना बोलावून एकत्र जमवले. तो पंचवीस तीस लोकांचा जमाव झाला असेल. त्यांच्यापुढे त्याने एक प्रस्ताव मांडला, “इतर कसलेही कारण नसतांना आपण सगळ्यांनी एकदा निव्वळ एकमेकांना भेटण्यासाठी म्हणून एका ठिकाणी जमायचे, आपले जे नातेवाईक आज उपस्थित नाहीत त्यांनाही बोलवायचे आणि एकादा दिवस एकमेकांच्या सहवासात गप्पागोष्टी करण्यात घालवायचा. प्रत्येकजण आपापल्या येण्याजाण्याचा खर्च करतोच, त्या दिवशी राहण्याजेवण्याचा खर्च सर्वांनी समान वाटून घ्यायचा, यात कोणी यजमान नसेल की कोणी पाहुणा नसेल. आदरातिथ्य, मानपान, देणे घेणे असले कांही नाही. किती लोकांची तयारी आहे?”

आधी तर सर्वांना ही कल्पना जराशी धक्कादायक वाटली. पूर्वीच्या काळी वाहतुकीची फारशी सोय नसल्यामुळे प्रवास करणे जिकीरीचे वाटत असे. माझ्या मागच्या पिढीतले लोक फक्त महत्वाच्या कारणापुरता अगदी किमान अत्यावश्यक तेवढाच प्रवास करत असत. माझ्या पिढीतल्या लोकांनी कधी तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्यासाठी, तर कधी निसर्गसौंदर्य, प्रेक्षणीय स्थान किंवा ऐतिहासिक स्थळे पहाण्यासाठी पर्यटन करायला सुरुवात केली होती. कधी ऑफीसकडून मिळणाऱ्या लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशन किंवा असिस्टन्स वगैरेमधून तर कधी स्वतःच्या खर्चाने यासाठी कारणाशिवाय भ्रमण करणे सुरू झाले होते. पुढच्या पिढीमधली मुले एक दोन दिवस मजेत घालवण्यासाठी एकाद्या रिसॉर्टमध्ये सर्रास जायला लागली होती. पण अशा रीतीने सगळ्या आबालवृध्द नातेवाइकांनी एका ठिकाणी जमायचे ही कल्पना भन्नाट वाटत होती. एक दोन सेकंद सारे एकमेकांच्या तोंडाकडे पाहून अंदाज घेत राहिले. सर्वांना ती कल्पना आवडली आणि ती प्रत्यक्षात आणायचे एकमुखाने ठरले. ठरले खरे, पण कशी हा प्रश्न होता. लग्नकार्य वगैरे ज्याच्याकडे असेल ते कुटुंब सारी व्यवस्था करते, पण अशा संमेलनाची व्यवस्था कोण करणार? अशी शंका अनेकांच्या मनांना चाटून गेली.

या प्रश्नावर सविस्तरपणे विचार विनिमय झाला. व्यवस्था करण्यासाठी ती किती माणसांची आणि कुठे करायची याचा अंदाज करायचा होता. त्यासाठी या कार्यक्रमात कोणाकोणाला सहभागी करून घ्यायचे हे आधी ठरवायला पाहिजे. एरवी पिकनिकसाठी जातांना एकाद्या भागात राहणारे लोक एका जागी जमून बसने प्रयाण करतात. बसमध्ये जागा शिल्लक असली तर जवळचे आप्त, मित्र वगैरेंना घेऊन जातात, पण तसे केले तर सर्वांना बांधणारे समान सूत्र त्यात राहणार नाही, लहान लहान ग्रुप होतील आणि आम्हाला हे टाळायचे होते. त्यामुळे फक्त जे सगळे एकमेकांचे नातेवाईक आहेत अशांनाच बोलवायचे असे ठरले. माझे आजोबा आणि त्यांची मुले म्हणजे आमचे बाबा, काका आणि आत्या यातले कोणीच आता हयात नाहीत. पण या लोकांच्या पुढल्या पिढीतले आम्ही सर्वजण सख्खे, चुलत, आत्तेमामे भावंडे आहोत. ते आणि त्यांची मुले, नातवंडे एवढाच परिवाराचा आवाका निश्चित करण्यात आला. एकाद्या बहिणीचा दीर आणि तिच्या भावाची मेहुणी असे नातेवाईक त्या लोकांना कितीही जवळ वाटत असले तरी इतरांना ते परकेच वाटणार. त्यामुळे समान सूत्र रहाणार नाही. असा गोंधळ होऊ नये याचा विचार करून नातेवाइकांसाठी ही मर्यादा ठरवण्यात आली. त्या दिवशी मुंजीच्या ठिकाणी ज्या लोकांना या चर्चेसाठी एकत्र आणलेले होते ते सारे या व्याख्येत बसणारे असेच होते. ते आणि त्यांच्या परिवारातले इतर मेंबर किती आहेत त्यांची संख्या मोजली. तसेच जे आले नव्हते त्यांची नांवे लिहून संपूर्ण यादी तयार केली आणि तिथल्या तिथे त्यांना मोबाईलवरून फोन करून त्यांचे मत विचारले गेले. एकंदरीत सगळ्यांनाच उत्साह दिसत असल्यामुळे ही कल्पना पुढे रेटायचे एकमताने ठरले.

माझ्या आजोबांच्या आणि वडिलांच्या काळात संततीनियमन, कुटुंबनियोजन वगैरे शब्दसुध्दा निर्माण झाले नव्हते. त्यामुळे सरसकट सगळ्या कुटुंबांमध्ये आठ दहा मुले असतच. त्यातले अपमृत्यू, वैराग्य, आजारपण वगैरेमध्ये गाळले गेलेले वगळून घरटी सरासरी पाच धरले तरी दोन पिढ्यांमध्ये त्यांची संख्या पंचवीसपर्यंत जायचीच. माझ्या पिढीमधल्या भावंडांची संख्या त्यांच्या जोडीदारांसह पन्नासापर्यंत पोचते. त्यांनी हम दो हमारे दो या मंत्राचा अवलंब केला तरी माझ्या मुलांच्या पिढीत घरातल्या चाळीस पन्नास व्यक्ती आणि तितकेच त्यांचे जोडीदार धरून ऐंशी नव्वद होतात. त्यांच्या पुढच्या पिढीमधल्या म्हणजे आताच्या लहान बालकांची गणना धरून एकंदर संख्या दीडशेच्या वर गेली.

यातली अर्ध्याहून अधिक मंडळी पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर या भागात राहतात आणि उरलेली मंडळी कर्नाटक, गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये विखुरली आहेत. काही जण तर परदेशात गेलेले आहेत, त्यातले कोणी मुद्दाम या संमेलनासाठी येतील अशी शक्यता फार कमी होती. महाराष्ट्रातले ऐंशी टक्के आणि इतर राज्यांमधले पन्नास टक्के लोक येतील असे धरले तरी ऐंशीच्या वर उपस्थिती अपेक्षित होती. सर्वांना येण्याच्या दृष्टीने पुणे हे मध्यवर्ती शहर सोयिस्कर पडत असल्यामुळे त्याची निवड झाली. शहरातल्या एकाद्या कार्यालयात किंवा हॉलमध्ये जमलेले लोक तेवढ्यातल्या तेवढ्यात बाजारात जाऊन खरेदी करायचा, आणखी कुणाला भेटून यायचा किंवा असेच दुसरे एकादे काम करून यायचा विचार करतात असा अनुभव येतो. ते करायची संधी मिळू नये म्हणून शहरापासून दूर एकाद्या निवांत जागी असलेल्या रिसॉर्टवर जमायचे असे सर्वानुमते ठरले आणि पुण्यातल्या उत्साही तरुण मंडळींनी त्याची चौकशी करायची असे ठरले. दोन तीन आठवड्याच्या काळात सर्वांनी आपापल्या कुटुंबातल्या माणसांची संख्या सांगायची आणि लगोलग दर डोई पाचपाचशे रुपये जमा करायचे असेही ठरवण्यात आले.
. . . . . . . . . . . . .

कौटुंबिक संमेलन – २

संमेलनाची जागा ठरवल्यानंतर लगेच सर्वानुमते त्याची तारीखसुध्दा ठरवणे आवश्यकच होते, कारण ही पंचवीस तीस मंडळी आपापल्या घरी गेल्यानंतर पुन्हा सर्वांनी एकत्र जमून परस्पर विचार विनिमय करणे कठीण झाले असते. फार दूरवरचा विचार करण्यात बरीच अनिश्चितता येते आणि तयारी करण्यासाठी किमान थोडा तरी अवधी हवा. या दृष्टीने दीड दोन महिन्यात हे संमेलन भरवून घ्यायचे असे मत पडले आणि ते सर्वांना मान्य झाले. चातुर्मासात अनेक सणवार येतात, कोणाकोणाची व्रते वैकल्ये असतात, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी वगैरेंचे ठरलेले कार्यक्रम चुकवता येत नाहीत वगैरेंचा विचार करता त्याआधीच हे संमेलन भरवायचे ठरले. लगेच कॅलेंडर पाहून २४-२५ जुलैच्या तारखा ठरल्या आणि त्या दिवशी दुसरा तिसरा कोणताही कार्यक्रम कोणीही ठरवायचा नाही असा सर्वांना दम दिला. परगावी राहणाऱ्यांनी आताच रेल्वेचे रिझर्वेशन करून ठेवावे असे त्यांना सांगून टाकले.

हा कार्यक्रम करायचाच असे पक्के ठरवून सगळे आपापल्या घरी परतले. पुढच्या महिन्याभरात नक्की येणाऱ्यांची यादी तयार झाली आणि बरेचसे पैसेही गोळा झाले. कार्यक्रमाची जागा ठरवण्याचे काम पुण्यात रहात असलेल्या संजयने इतर पुणेकर मंडळींशी सल्लामसलत करून केले. सिंहगडाच्या पायथ्याशी, खडकवासला धरणाच्या जलाशयाच्या किनारी आणि पानशेत धरणाच्या रस्त्यावर शांतीवन नावाचे एक रिसॉर्ट आहे. ध्यानधारणा, योगविद्या वगैरेंच्या कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग वगैरे तिथे चालत असावेत. शंभर लोकांची उतरण्याची आणि खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था या जागी ठेवले जाते असे रिपोर्ट मिळाले. ही जागा आमच्या बजेटमध्ये बसतही होती. जागेचे बुकिंग करून सर्वांना कळवून टाकले.

शांतीवनाची जागा इतर दृष्टीने जरी खूप चांगली असली तरी तिथे पोचण्यासाठी आवश्यक असलेली वाहतुकीची व्यवस्था मात्र फारशी सोयिस्कर नाही. किंबहुना ती जवळ जवळ अस्तित्वातच नाही असेही म्हणता येईल. बाहेरगावच्या लोकांनी आधी पुण्यातल्या नातेवाइकांकडे यायचे आणि पुण्याहून तिकडे जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करायची असा विचार सुरुवातीला केला होता. त्यासाठी एक मोठी बस भाड्याने घ्यायची की लहान मिनिबसने दोन तीन खेपा करायच्या असे पर्याय होते. जसजशी संमेलनाची तारीख जवळ येऊ लागली तसतसे लोकांचे कार्यक्रम निश्चित होऊ लागले.

वेळ वाचवण्याच्या दृष्टीने मुंबई, ठाणे परिसरातल्या कांही लोकांनी आपल्या गाडीनेच पुण्याला जाऊन परत जायचा विचार केला आणि आपापल्या गाडीत आणखी कोणाकोणाला आपल्यासोबत घेतले. नाशिक आणि बार्शीची मंडळीही आपापल्या गाड्या घेऊन आली. डोंबिवलीतल्या नातेवाइकांनी ट्रॅक्स किंवा तवेरासारखे वाहन भाड्याने घेऊन एकत्र जायचे ठरवले. म्हणजे ही सगळी मंडळी थेट शांतिवनातच पोचणार असे निश्चित झाले. उरलेल्या कांही जणांनी एक दिवस आधी पुण्याला जाऊन आपल्या आप्तांच्या घरी मुक्काम केला. आता पुण्याहून जाणारी किती मंडळी आहेत आणि त्यातल्या किती जणांच्या मोटारी आहेत यांची मोजणी आणि चर्चा झाली आणि थोडी दाटी वाटी करून बहुतेकजणांना सामावून घेता आले. ते लोक पुण्याच्या वेगवेगळ्या भागात रहात असले तरी कुणी कुणी कुणाकुणाला कुठून कुठून पिक अप करायचे हे ठरवून त्याची पध्दतशीरपणे अमलबजावणी केली. कांही लोकांचे पुण्यात असलेले नातेवाईक आमच्या कुटुंबाच्या परीघात बसत नव्हते, पण त्यांनीही मदत करून काही जणांना शांतीवनापर्यंत पोचवून दिले.

अखेरीस अपवादात्मक दोन तीन लोकच उरले होते, जिथपर्यंत सार्वजनिक बससेवा उपलब्ध होती तिथपर्यंत ते आले आणि कोणीतरी तिथपर्यंत जाऊन त्यांना आपल्या गाडीतून घेऊन आले. मोबाईलवरून सतत एकमेकांच्या संपर्कात असल्यामुळे कोण कोण कुठपर्यंत आणि कसे येऊन पोचले आहेत याची वित्तंबातमी कळत होती आणि एकमेकांना मार्गदर्शन करणे शक्य होते. एकमेकांबद्दल मनात असलेल्या आत्मीयतेचा प्रत्यय या पूर्वतयारीतच दिसून येत होता. ज्याला ज्याला जे जे शक्य होते ते ते तो आपणहून करत होता. कुणालाही कुणाची मदत मागायची गरज पडली नाही की कुणी त्यात आढेवेढे घेतले नाहीत. डझनभर कारगाड्या, काही मोटरसायकली आणि एक व्हॅन यातून लहानमोठी सगळी मिळून नव्वद माणसे संध्याकाळपर्यंत शांतीवनाला जाऊन पोचली.

जुलैमधला दिवस ठरवतांना पाऊस पडण्याची थोडी शक्यता धरली होती आणि त्या दृष्टीने सर्वांनी छत्र्या, रेनकोट वगैरे आणले होते, पण तो आला नसता तरी चालले असते. आदल्या दिवशी पुण्यात पाऊस पडत नव्हता, त्या दिवशीसुध्दा आधी नुसतेच ढगाळ वातावरण होते. त्यामुळे सगळेजण खूष होते. पण घरातून निघण्याच्या सुमाराला रिमझिम पाऊस सुरू झाला. जसजसे खडकवासला जवळ यायला लागले तसतसा पावसाचा जोर वाढत गेला आणि शांतीवनात पोचेपर्यंत तो धो धो कोसळायला लागला. आम्हाला या अगांतुक पाहुण्याचे स्वागत करण्याशिवाय गत्यंतरच नव्हते.

शांतीवनामध्ये वस्तीसाठी अनेक वेगवेगळी कुटीरे आहेत आणि एकत्र येऊन बसण्यासाठी प्रशस्त हॉल आहेत. आमच्या कार्यक्रमासाठी जो हॉल ठरवला होता, त्यात पावसाचे पाणी येऊन साठायला लागले. त्यामुळे त्याऐवजी दुसऱ्या एका जास्त बंदिस्त जागेत आमची व्यवस्था करावी लागली. खरे तर या दुसऱ्या एका हॉलमध्ये गाद्या अंथरून झोपण्याची व्यवस्था केली होती. त्यावरच वाटले तर गप्पा मारत बसावे, वाटले तर पाय पसरावे असे करण्याची सोय होती. पण तिथेच कार्यक्रम करावा लागल्यामुळे सुरुवातीला सर्वांनी स्टेजच्या समोर येऊन बसायचे आणि नंतर ज्याला जेंव्हा झोप येईल तेंव्हा त्याने मागच्या बाजूला पसरलेल्या पथारीवर पहुडावे असे ठरवले. याला दुसरा पर्याय तरी कुठे होता?

निरनिराळ्या दिशेने येणारी मंडळी बरोबर ठरलेल्या वेळी येऊन पोचणार नाहीत हे माहीत होतेच. पुण्याच्या स्थानिक मंडळींनी आधी पुढे जाऊन सर्व व्यवस्था पाहिली. वृध्द, महिला आणि बालकांना आत पाठवून दिले आणि युवकवर्ग येणाऱ्या मंडळींना मार्गदर्शन करण्यासाठी प्रवेशद्वारापाशी उभा राहिला. एक एक ग्रुप येताच आधी आलेल्या मंडळींना भेटत होता. वडिलाधाऱ्यांच्या पाया पडणे, कडकडून मिठी मारणे, मुलांना उचलून घेणे, पाठ थोपटणे वगैरे अनेक मार्गांनी भावना व्यक्त होत होत्या. एकाची विचारपूस होईपर्यंत मागोमाग दुसरे येत होते आणि त्यात सामील होत होते. तासभर तरी हा कार्यक्रम चालला होता. चहा पुरवणाऱ्याला काय इन्स्ट्रक्शन्स होत्या कोण जाणे, बाहेर कोसळणारा पाऊस पाहून खरे तर त्याने चहाबरोबर कांद्याची भजी आणावीत असे वाटत होते, पण चहासुद्धा येता येत नव्हता. याबद्दल कोणाला आणि कोणी सांगायला हवे हे जो तो एकमेकांना विचारत होता. अखेर आमची आर्जवे त्याच्यापर्यंत पोचली आणि चहाने भरलेले पिंप घेऊन तो आला तेंव्हा टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत झाले.

. . . . . . . . . .

कौटुंबिक संमेलन – ३

या कौटुंबिक मेळाव्यासाठी पुण्याजवळील शांतीवनात सर्वजणांनी संध्याकाळी पाच ते सहा पर्यंत पोचायचे अशा सूचना दिल्या होत्या आणि बहुतेक सर्वांनी तसा प्रयत्न केला होता. पण घरातून निघतांना शेवटच्या क्षणी कोणाचा फोन वाजणे, दरवाजा बंद करतांना कांहीतरी लक्षात येणे, जिन्यातून खाली उतरल्यानंतर अचानक काहीतरी आठवणे, लहान मुले असल्यास त्यांना आयत्या वेळी तहान, भूक लागणे किंवा निसर्गाची हाक येणे वगैरे प्रकार होतातच. शिवाय रस्त्यातली गर्दी, पावसामुळे संथगतीने चालणारी रहदारी अशा कारणाने विलंब होत जातो. त्यामुळे स्थानिक संयोजक मंडळी जरी वेळेवर जाऊन पोचली असली तरी सहा वाजेपर्यंत थोडेसेच लोक शांतीवनापर्यंत येऊन पोचले होते. पण त्यानंतर ते एकामागोमाग एक येत गेले आणि अंधार पडण्यापूर्वी म्हणजे सातच्य़ा आत जवळजवळ सगळे आले आणि स्वच्छतागृहाला भेट देऊन ताजेतवाने झाले. बाहेरगावाहून आलेल्या आणि पावसात भिजलेल्या लोकांनी कपडे बदलले. लहान मुलांच्या आयांनी आधीच गोड दिसणाऱ्या आपल्या मुलांना आकर्षक कपडे घालून छान सजवले. चहाचा घोट घशाखाली गेल्यानंतर सर्वांना तरतरी आली आणि औपचारिक कार्यक्रमासाठी सगळे तय्यार होऊन बसले.

इतर कसलेही कारण नसतांना आपण सगळ्यांनी एकदा निव्वळ एकमेकांना भेटण्यासाठी म्हणून एका ठिकाणी जमायचे आणि एकादा दिवस एकमेकांच्या सहवासात गप्पागोष्टी करण्यात घालवायचा. अशी सुरुवात झाली होती आणि त्यासाठी मुबलक वेळ ठेवला होता. तरीसुध्दा हा कार्यक्रम मनोरंजक आणि संस्मरणीय व्हावा, त्यात सर्वांनी उत्साहाने भाग घ्यावा, सर्वांना मनसोक्त आनंद मिळावा म्हणून त्याची एक रूपरेखा आखायचे ठरवले आणि आमच्यातल्या कांही उत्साही तसेच अनुभवी लोकांनी पुढाकार घेऊन फोनाफोनी केली आणि आपसातच कांही गोष्टी ठरवल्या. एकमेकांची माहिती आणि विविधगुणदर्शन ही दोन मुख्य सूत्रे ठरवून कांमाची वाटणी करून घेतली. त्यातले पहिले काम मी करायचे ठरले आणि पंधरा वीस दिवस आधीपासूनच मी त्यासाठी कामाला लागलो.

फार पूर्वीच माझ्या माहितीनुसार मी एक वंशावळ तयार करून ठेवलेली होती. श्रीरंगनानाने त्याच्याकडली लिस्ट पाठवली. दोन्ही पाहून झाल्यावर गरजेप्रमाणे काही लोकांना फोन करून त्यातले कांही तपशील पडताळून पाहिले आणि नव्या सदस्यांची भर घालून ती वंशावळ अद्ययावत केली. आजोबा आजींपासून नवजात बालकांपर्यंत सुमारे दोनशे लोकांची ही यादी कशी सादर करता येईल याचा विचार करत असतांनाच पॉवर पॉइंटमध्ये ते काम करायची कल्पना श्रीने सुचवली आणि मी ती लगेच उचलली. वरपासून सुरुवात करून एक जोडपे आणि त्यांची अपत्ये एवढीच नांवे एका स्लाइडमध्ये घातली. त्यातली एक एक मुले, त्यांच्या पत्नी किंवा पती आणि त्यांची मुले पुढल्या स्लाइडमध्ये दाखवली. अशा वीस पंचवीस स्लाइड्स तयार केल्या. पॉवर पॉइंट या दृष्य माध्यमाचा अधिक उपयोग करून घेण्यासाठी स्लाइडमध्ये दाखवलेल्या नांवांच्या पाठोपाठ त्यांची छायाचित्रे दाखवायचे ठरवले. त्यासाठी माझ्याकडे असलेले सारे आल्बम काढून त्यातले फोटो निवडले. अनेक जणांनी आपापल्या कुटुंबांचे फोटो मेलने पाठवले. चैतन्य आणि उत्कर्ष आपटे कुटुंबाचा आल्बम घेऊन माझ्याकडे आले. माझ्या जन्मापूर्वी काढलेला माझ्या आजीआजोबांचा एक ऐतिहासिक फोटो मिळाला. माझ्या लहानपणच्या आमच्या घरात असलेला ऐतिहासिक आल्बमच बार्शीहून आला. त्यातली लहान लहान बालके आता आजोबा किंवा आजी झाल्या आहेत. त्यातल्या फोटोंचे संकलन करून एक अमूल्य असा ठेवाच मिळाला. आमचे आजोबा आजी आणि आईवडील ज्या खेडेगावांमध्ये रहात होते त्या गावाचे स्थान दाखवण्यासाठी गूगलअर्थवरून नकाशा काढला आणि त्यात खुणा करून कोण कोण कुठे रहात होते किंवा आता राहतात ती गावे दाखवली. हे सगळे काम करतांना जी मजा आली तिचे वर्णन शब्दात करणे अशक्य आहे.

पॉवर पॉइंटवर तयार केलेले हे प्रेझेंटेशन दाखवायची सोय कशी करायची हे पहायचे काम उदयला दिले. शिवाय शंभर लोकांना ऐकू येईल एवढ्या मोठ्याने बोलणे सर्वांना शक्य नसते. त्यासाठी ध्वनिसंवर्धक, ध्वनिप्रक्षेपक असली उपकरणे (माइक, स्पीकर वगैरे) हवीतच. त्यांची सोय शांतीवनाच्या हॉलमध्ये असल्याचे समजले. पण तिथे प्रोजेक्टरची सोय मात्र नव्हती. ती करणे आवश्यक होते. त्या वेळी असा प्रक्षेपक कोणाच्याही घरी नव्हताच आणि कोणीच या व्यवसायात नसल्यामुळे माझ्या काँप्यूटरशी सख्य साधू शकेल असा प्रोजेक्टर शोधून काढून तो भाड्याने आणणे हे एक जास्तीचे काम होऊन बसले. (आज फक्त एक टीव्ही आणि एक मोबाईल स्मार्टफोनवर हे काम करता येते पण तेंव्हा तशी सोय नव्हती.) सोयीच्या दृष्टीने शांतीवनात घेऊन जाण्यासाठी मी आपला लॅपटॉप पुण्याला नेला आणि त्याच्याबरोबर कम्पॅटिबल असा प्रोजेकेटर बाजारात निवडून त्याची ट्रायल घेतली. तोपर्यंत तिकडे जाण्यासाठी निघण्याची वेळ झालीच होती. त्यातून आयत्या वेळी गोंधळ झालाच तर वेळ निभावून नेण्यासाठी पुरेसे प्रिंटआउट काढून नेले होते. त्यात चित्रे आली नसली तरी सुवाच्य अक्षरात नामावली तरी दिसली असती आणि सर्वांना वाचता आली असती.

इतर लोकांनीसुध्दा आपापल्या परीने पुरेपूर तयारी केली होती. गायन वादनात प्रवीण असणारे कलाकार आपापली वाद्ये घेऊन आले. तबले, डग्गे, हार्मोनियम वगैरे आलेच, ढोलक, कोंगो बोंगो, कीबोर्ड आणि गिटार वगैरे सर्व वाद्यांनी सुसज्ज असा वाद्यवृंद तयार झाला. मंचावर त्याची मांडणी करणे, त्यांना वीजपुरवठा जोडणे वगैरे तयारी पाहून आता इथे काहीतरी घडणार आहे हे सर्वांना समजले आणि ते सज्ज होऊन पुढे येऊन बसले.

. . . . . . . . . . . . . .
कौटुंबिक संमेलन – ४

कौटुंबिकसंमेलन
आमचा हा कौटुंबिक मेळावा २४- २५ जुलैला करायचा ठरवला होता आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यातच एक अत्यंत दुःखद अशी घटना घडली. आमच्यातल्या एका अत्यंत घनिष्ठ आणि ज्येष्ठ व्यक्तीचे म्हणजे विमलताईचे देहावसान झाल्याच्या वृत्ताने साऱ्या कुटुंबावर शोकाचे सावट पसरले. आता या मेळाव्याचे ठरल्याप्रमाणे आयोजन करावे की करू नये, यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले. पण दुःखाचा पहिला आवेग ओसरल्यानंतर सर्वांनी फोनवर विचारविनिमय केला. पुढच्या पिढीमधल्या मुलांनी पुढाकार घेऊन या मेळाव्याची आखणी केली होती, त्यांच्या, मागल्या आणि पुढल्या पिढीमधल्या लोकांना एकत्र आणण्याचा त्यातला प्रयत्न आणि उद्देश स्तुत्य आणि महत्वाचा होता हे पाहून त्याला हिरवा कंदील मिळाला आणि नियोजित कार्यक्रमाची गाडी पुढे सरकली. पण आमच्या कुटुंबाच्या एका शाखेतून मात्र कोणीच आले नाहीत. ती मंडळी आली असती तर उपस्थितांची एकंदर संख्या सहज शंभरावर गेली असती. या मेळाव्याबद्दल स्वतः विमलताईला खूप इंटरेस्ट होता आणि प्रकृती तितकीशी ठीक नसतांनाही तिथे यायचे ती ठरवत होती. जर तिला ते शक्य झाले असते तर बाकीचेही सगळेच आले असते आणि आमचे संमेलन परिपूर्ण झाले असते. पण काळाला ते मंजूर नव्हते. त्यामुळे निरुपाय झाला.

या मेळाव्यातल्या औपचारिक कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत गांभिर्याने झाली. सभामंचावरील रंगीत पडद्यावर एक शुभ्र बेडशीट लावून तयार केलेल्या कामचलाऊ स्क्रीनवर आधी विमलताईचे छायाचित्र दाखवले. अदृष्यपणे तीसुध्दा त्या ठिकाणी आली असेल अशी मनात कल्पना करून साश्रु नयनांनी तिला भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आणि त्यानंतर मी माझ्या प्रेझेंटेशनची सुरुवात केली. आमच्या पिढीमधल्या सर्वांचे आजोबा आणि आजी यांची थोडक्यात माहिती सांगून त्यांचे वास्तव्य असलेले खेडेगांव नकाशात दाखवले. आमची पिढी त्या गावाच्या जवळपासच्या परिसरात वाढलेली आहे, पण पुढील पिढीमधल्या मुलांपैकी काहीजणांनी तो भाग पाहिला नसण्याची शक्यता आहे. त्यांच्यासाठी त्या भागाची झलक दाखवली. माझ्या वडिलांच्या पिढीमधले सारेच लोक आजोबांचे खेडे सोडून आधी तालुक्याच्या गावात येऊन स्थाइक झाले होते. नंतरच्या काळात सगळे तिथूनही चारी दिशांना पांगले.

सत्तर वर्षांपूर्वीच्या एका ऐतिहासिक पण अजूनपर्यंत शाबूत असलेल्या छायाचित्रात मागील पिढीतल्या बहुतेक मंडळींचे दर्शन घडले. ती पिढी आता काळाआड गेली आहे. आमच्या पिढीमधले बरेचजण बालकांच्या स्वरूपात या फोटोत दिसतात. त्यातल्याही कांही व्यक्ती आता नाहीत, तर माझ्यासकट कांही भावंडांचे जन्मसुध्दा तेंव्हा झालेले नसल्यामुळे आम्ही त्या फोटोत दिसत नाही. ही सारी मंडळी जवळची आणि नेहमीच्या पाहण्यातली असल्यामुळे त्यांचे जुने बालरूप पाहून त्यातल्या लोकांना बालपणीच्या अंधुक झालेल्या आठवणी ताज्या झाल्या आणि इतरांना ते खूपच मनोरंजक वाटले.

त्यानंतर आमच्या पिढीमधील एक भाऊ किंवा बहिण आणि तो संपूर्ण परिवार यांची नावे स्क्रीनवर आली की त्यांच्यापैकी जेवढे लोक आले आहेत त्यांनी मंचावर यायचे आणि आपली ओळख करून द्यायची, त्यांच्या परिवाराचे निवडक फोटो दाखवायचे, जे आले नसतील त्यांची माहिती सांगायची असा क्रम सुरू केला. भिडस्तपणामुळे स्वतःबद्दल कोणी सहसा जास्त बोलत नाही हे पाहून एकेकाने इतरांबद्दल सांगितले आणि त्यातून निसटलेल्या कांही महत्वाच्या आणि मजेदार गोष्टी मी किंवा प्रेक्षकांमधून कोणीतरी मंचावर येऊन सांगितल्या. अशा प्रकारे हा ओळख करून घेण्याचा कार्यक्रम खूप रंगला आणि जवळ जवळ दोन तास चाललेला होता. तो संपत आलेला असतांनाच अचानक वीज गेल्यामुळे प्रोजेक्टर बंद पडला. तोपर्यंत भोजनाची तयारी झाली होती आणि लोकाच्या पोटात भुकाही लागल्या होत्या. त्यामुळे इमर्जन्सी लाइट्सच्या उजेडात सारे भोजनालयाकडे रवाना झालो.

भोजनालय शांतीवनातल्याच दुसऱ्या ठिकाणी होते. चांगला मोसम असता तर त्या रम्य परिसरात हिंडत फिरत जायला मजा आली असती. पण वरून कोसळणाऱ्या पावसाच्या धारा, खाली शेवाळ साठून निसरडा झालेला रस्ता, तोसुध्दा अनेक जागी उंच सखल, चढउतार आणि पायऱ्या वगैरेंने भरलेला, वीज गेल्यामुळे गुडुप काळोख यामुळे हे लहानसे अंतर चालणेसुध्दा जिकीरीचे वाटत होते. कांही लोकांनी दूरदर्शीपणा दाखवून टॉर्च आणले होते, कांही लोकांनी मोबाइलचा उजेड दाखवला. विशेषतः पायऱ्या असलेल्या जागी कोणी ना कोणी उभे राहून मागून येणाऱ्यांना सावध करत होता. जेवण मात्र छान असल्यामुळे केलेल्या श्रमांचे सार्थक झाले. बहुतेकांच्या आवडीचा कोणता ना कोणता पदार्थ त्यात असल्याने सर्व मंडळी तृप्त होऊन हॉलमध्ये परतली. जास्तच वयोवृध्द लोकांसाठी भोजनाची ताटे भरून त्यांना हॉलमध्ये नेऊन दिली.

कार्यक्रमाची रूपरेषा आखतांना सहा साडेसहाला सुरुवात करायची आणि तासाभरात ओळखीचा भाग संपल्यावर भोजनापूर्वी पुष्कळ वेळ शिल्लक असेल त्यात आपल्या कुटुंबाचा इतिहास थोडक्यात सादर करायचा असा विचार मी केला होता. गेल्या शंभर वर्षांचा त्रोटक आढावा घेतांना त्यातील प्रत्येक दशकातली जागतिक आणि देशामधली परिस्थिती आणि घटना यांच्या बरोबरीने त्या काळखंडात घडलेल्या आपल्या कुटुंबातल्या महत्वाच्या घटना सांगत जाणारा एक माहितीपट मी तयार केला होता. तो ऐकायला कदाचित रुक्ष वाटेल म्हणून त्यातील महत्वाच्या टप्प्यांवर त्या काळात लोकप्रिय असलेले एक गाणे टाकून लोकांचे थोडे मनोरंजन करायची कल्पना होती आणि त्यासाठी बरीच माहिती जमवली होती. चांगल्या आवाजाची देणगी लाभलेल्या मुलांमुलींमध्ये ही गाणी वाटायची, त्यांनी ती तयार करून ठेवायची आणि ठरलेल्या स्लॉटमध्ये गायची असा विचार होता. पण इतर अनेक उद्योग आणि अडचणी सांभाळता सांभाळताच वेळ निघून गेल्यामुळे या कार्यक्रमाचे पध्दतशीर नियोजनच करता आले नाही. रिहर्सल करायचा प्रश्नच उद्भवला नाही. हा कार्यक्रम करण्यासाठी ठेवलेला टाइमस्लॉटही मिळाला नाही. ज्यांनी यासाठी थोडी तयारी केली होती तिचा उपयोग भोजनोत्तर कार्यक्रमात केला.

. . . . . . . . . . . . .

कौटुंबिक संमेलन – ५

MusicProgramblog5F

शनिवार रात्रीचे जेवणखाण उरकून सारी मंडळी शांतीवनातल्या हॉलवर परत येईपर्यंत वीज आली होती, रंगमंचावर तबला, पेटी, सिंथेसाइजर, गिटार वगैरे वाद्यांची मांडणी करून ठेवली होती आणि वादक मंडळी तयारीत होती. लोक परत येताच विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सुरू झाला. रात्रीचे साडेदहा वाजून गेले असले तरी अख्खा बालचमू टक्क जागा होता आणि उत्साहाने या कार्यक्रमाची वाट पहात होता. काही मुलांनी त्यासाठी बरीच पूर्वतयारी केली होती. पाच वर्षाच्या निधीने काही उत्कृष्ट कविता आणि गद्य उतारे पाठ करून ठेवले होते, ते अस्खलित वाणीत सादर केले. पाठांतराची आणि सादरीकरणाची तिची क्षमता बघून सगळे थक्क झाले. सहा वर्षाच्या इराला राधा ही बावरी हे गाणे आधीपासूनच तोंडपाठ होते आणि त्या गाण्याची चालही तिच्या ओठावर होती, तरीही आदले दिवशी ती हे गाणे सतत तासभर ऐकत होती. त्यातल्या आआआ, ईईई, एएए वगैरे खास लकेरींच्या जागा आणि रिकाम्या जागा (पॉजेस) लक्षपूर्वक ऐकून तिने घटवून ठेवल्या आणि वादक साथीदारांनी दिलेल्या ठेक्यावर जशाच्या तशा सादर करून तुफान टाळ्या मिळवल्या. तीन साडेतीन वर्षांच्या चिटुकल्या आणि धिटुकल्या प्रियाने बडबडगीते, प्रार्थना, नर्सरी ऱ्हाइम्स वगैरे जे जे त्या क्षणी सुचेल ते बिनधास्तपणे गाऊन घेतले. अजय-अतुल यांची गाणी श्रेयस आणि सर्वेश ही भावंडे फर्मास गातात. त्यांचे मल्हार वारी तर अफलातून झाले. केतकी, अक्षय, प्रणीता, सानिका वगैरे इतर मुलांनाही या गाण्यांवरून स्फूर्ती मिळाली आणि त्यांनी एकेकट्याने किंवा समूहात निरनिराळी गाणी गाऊन धमाल आणली. शुभंकरोती ते अग्गोबाई ढग्गोबाई आणि ट्विंकल् ट्विंकल ते ऑल ईज वेल् पर्यंत अनेक लोकप्रिय मराठी, हिंदी आणि इंग्रजी गाणी या मुलांनी म्हंटली. त्यात बालगीते, बडबडगीते ते भक्तीगीते आणि चित्रपटगीते वगैरे सगळ्या प्रकारची गाणी झाली. बहुभाषी तृप्तीने मराठी आणि हिंदीशिवाय कन्नड आणि तामीळ भाषेतली गाणी गाऊन दाखवली. जवळजवळ तासभर मुलांनीच रंगमंच गाजवला.

मुलांचा उत्साह ओसरल्यानंतर मोठ्या लोकांना संधी मिळाली. सुधा आणि अलका या पट्टीच्या गायिकांनी अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन रसिक श्रोत्यांची वाहवा मिळवलेली आहे. त्यांनी त्यांची निवडक गाणी गायिलीच, कांही खास गाण्यांची फरमाईशही त्यांना झाली. प्रशांत आणि प्रिया (मोठी) आता तयार झाले आहेत. उदय, जितेंद्र आणि मंजिरी यांचे गळे चांगले आहेत आणि त्यांना गाण्याची आवड आहे. त्यांनी थोड्या गाण्यांची तयारी करून ठेवली होती, ती सराईतपणे सादर केली. शिवाय प्रेक्षकांमध्ये बसलेल्या अनेकांना आग्रह करकरून एक दोन गाणी म्हणायला लावली. सर्वांचा सहभाग हे या कार्यक्रमाचे मुख्य सूत्र होते. एका लहानशा ग्रुपने कार्यक्रम करायचा आणि इतरांनी तो ऐकायचा असे त्याचे स्वरूप नव्हते. ज्यांना मंचावर यायला संकोच वाटत होता त्यांना बसल्या जागी माईक देण्यात आला. सत्तरीतल्या विजयावहिनी आणि सुलभावहिनी यांनीसुध्दा सुरेल गाणी गायिली.

आमच्याकडल्या संगीताच्या घरगुती बैठकींमध्ये हार्मोनियमची साथ नेहमी प्रभाकर करतात, तशी त्यांनी बराच वेळ केली. अधून मधून इतरांनीही पेटी वाजवून त्यांना विश्रांती दिली. प्रशांतला तबलावादनामध्ये तालमणी हा खिताब मिळालेला आहे. त्याला साजेशी कामगिरी थोडा वेळ करून त्याने तबला डग्गा मीराच्या स्वाधीन केला आणि तो स्वतः सिंथेसाइजरवर बसला. पुढले दोन अडीच तास तबला वाजवून मीराने सर्वांना चकित केले. प्राचीने शास्त्रीय संगीताची झलक दाखवली. मैत्रेय अगदी सुरुवातीपासून अखेरपर्यंत गिटार वाजवून साथ देत होता. त्याने कांही सोलो पीसेसही वाजवून दाखवले. अच्युत, मिलिंद, चैतन्य वगैरे अधून मधून इतर तालवाद्यांवर ठेका धरत होते. यातली गंमत म्हणजे ही सगळी मंडळी वेगवेगळ्या गांवाहून आली होती आणि शांतीवनातल्या स्टेजवरच एकत्र जमली होती. त्यांनी कुठल्याच गाण्यांची आधी प्रॅक्टिस केलेली नव्हती. कोणची गाणी कोण गाणार आहे हेच मुळी ठरलेले नव्हते. संगीतसंयोजन, स्वरलिपी वगैरे प्रकार नव्हतेच. सर्वांनीच आपापल्या हातातली वाद्ये उत्स्फूर्तपणे सुचेल आणि जमेल तशी वाजवूनसुध्दा त्यात सुरेख मेळ जमून येत होता. अशा बैठकांमध्ये सूर ताल लय वगैरेंचा फारसा कीस कोणी काढत नाही, पण गोंगाट आणि संगीत यातला फरक कानाला समजतोच. संपूर्ण कार्यक्रमात गोगाटाचा अनुभव अगदी क्वचित आला आणि बहुतेक वेळ सुरेल संगीतच ऐकायला मिळत गेल्याने त्याची रंगत वाढत गेली.

तबला, पेटी, सिंथेसायजर, गिटार वगैरे वाद्ये आणि वादक मंडळींनी तिथला लहानसा मंच भरून गेला असल्यामुळे नृत्य किंवा नाटक सादर करायला जागाच नव्हती. स्टेजच्या समोर असलेल्या लहानशा मोकळ्या जागेत काही लहान मुले उडत्या चालीच्या गाण्यांच्या तालावर नाचून घेत एवढेच. पण गाण्यांखेरीज इतर काही आयटम सुध्दा या कार्यक्रमात सादर झाले. शुक्रतारा मंदवारा या गाण्याच्या चालीवर प्रसाद आणि सुनीतीने ‘दे आता करुनी चहा’ हे विनोदी द्वंद्वगीत गाऊन दाखवले तर देहाची तिजोरीच्या चालीवर यशवंत देवांची ‘पत्नीची मुजोरी’ ही कविता प्रसादने ऐकवली. कोल्हापूर रेडिओस्टेशनवर चालत असलेले पैलवानांच्या शरीरसौष्ठवावरचे भाषण आणि सांगली केंद्रावर चालत असलेली एक पाककृती यातली वाक्ये आलटून पालटून वाचून त्यातून येणारी धमाल या जोडीने ऐकवून पोट धरधरून हसायला लावले. स्वतःचे हंसू आवरून ठरलेली वाक्ये न विसरता गंभीरपणे म्हणणे हे कठीण काम त्यांनी सहज केले. टीव्ही येण्याच्या आधीच्या काळात अशा प्रकारचे विनोदी मिश्रण खूप पॉप्युलर होते. पण जवळ जवळ वेव्हलेंग्थ असलेली दोन आकाशवाणी केंद्रे एकाच वेळी रेडिओवर लागणे शक्य होते, तसे दोन टीव्ही चॅनल लागत नाहीत, शिवाय दृष्य चित्रांची मिसळ करणे जास्त कठीण असते यामुळे रेडिओबरोबरच विनोदाचा हा प्रकार मागे पडत गेला.

कॉलेजकुमार उत्कर्ष मासिकासारखे दिसणारे एक पुस्तक हातात धरून स्टेजवर आला आणि त्याने दोन अर्थपूर्ण कविता वाचून दाखवल्या. तो प्रसादनंतर लगेचच आल्याने त्यानेसुध्दा त्याला आवडलेल्या पण फारशी प्रसिध्दी न मिळालेल्या कविता वाचल्या असाव्यात असे वाटले. त्या कविता त्याने स्वतः रचल्या होत्या, त्याच्या कॉलेजच्या स्मरणिकेत त्या प्रसिध्द झाल्या होत्या आणि प्रत्यक्ष कवीवर्य विंदा करंदीकर यांनी त्याबद्दल त्याला शाबासकी दिली होती हे नंतर बोलण्यातून कळले. माणसाने विनयी असावे, पण आपल्या गुणांची आणि मिळालेल्या यशाची थोडी प्रसिध्दी करावी किंवा खुबीने करवून घ्यावी असा सल्ला मी त्याला दिला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोणीच करत नव्हता. सगळा उत्स्फूर्त मामला होता. पण अधून मधून स्टेजवर येऊन विनोदी चुटके सांगायचे काम मिलिंद करत होता. त्याच्याकडे विनोदी किश्श्यांचा भरपूर स्टॉक होता आणि होऊन गेलेल्या गाण्याशी सांगड घालून त्यातला नेमका जोक नाट्यपूर्ण पध्दतीने सांगण्याचे कसब त्याने आत्मसात केले आहे. त्याच्या खुसखुशीत कॉमेंट्समुळे कार्यक्रमाला जीवंतपणा येत होता.

रंगत गेलेल्या या कार्यक्रमात जेंव्हा सध्याचे टॉपहिट गाणे ‘आता वाजले की बारा’ सुरू झाले तेंव्हा घड्याळात अडीच वाजले होते. त्यानंतर तो आवरता घ्यायचे ठरले. तरीही आणखी एक आणखी एक असे करत भैरवी संपेपर्यंत तीन वाजले होते. हॉलभर गाद्या बिछवून ठेवल्या असल्याने बरीचशी मंडळी गाणी ऐकता ऐकता जागीच आडवी झाली होती. पाच सहा कॉटेजेसमध्ये ज्येष्ठ सदस्यांची सोय केलेली होती. आपापल्या जागी जाऊन निजानीज होईपर्यंत आणखी अर्धा तास गेला. पाऊस पडतच होता. कॉटेजच्या वर पत्र्याचे छप्पर असल्यामुळे तव्यावर लाह्या फुटाव्यात तसे पावसाचे थेंब त्यावर तडतड करत होते. पावसाच्या जोराबरोबर त्याची लय कमी जास्त होत होती. पण त्या लयीवरच निद्रादेवीची आराधना करत असतांना ती प्रसन्न झाली आणि तिने सर्वांना आपल्या आधीन करून घेतले.

. . . . . . .

कौटुंबिक संमेलन – ६

खडकवासला धरणाच्या विस्तीर्ण तलावाच्या किनारीच पानशेतकडच्या बाजूला असलेल्या डोंगराच्या उतारावर शांतीवन उभे केले आहे. सरोवराच्या काठी रम्य दृष्य आहेच, शिवाय मुलांना खेळण्यासाठी अनेक प्रकारची व्यवस्था आहे. रविवारी सकाळच्या वेळी सर्वांनी तिथल्या निसर्गसौंदर्याचा मनसोक्त आस्वाद घेत हिंडावे, फिरावे, मुलांनी खेळावे, बागडावे यासाठी भरपूर वेळ दिला होता. त्यानंतर हॉलमध्ये कांही पार्टी गेम्स खेळायचे योजले होते. दुपारचे जेवण झाल्यानंतर पुन्हा सर्वांनी थोडा वेळ एकत्र बसून जुन्या आठवणी, मजेदार अनुभव, पुढील योजना, सूचना, मार्गदर्शन, चर्चा वगैरे ज्याला जे योग्य वाटेल ते करण्यात तो वेळ सत्कारणी लावायचा आणि चहापानानंतर परतण्यासाठी प्रस्थान करायचे अशी या कार्यक्रमाची सर्वसाधारण रूपरेषा आखली होती. पण पाऊस आणि वीजकपात या गोष्टींनी येत गेलेल्या अडथळ्यांमुळे त्यात आयत्या वेळी बरेच बदल करावे लागले.

आदले दिवशी झोपायला उशीर झाल्यामुळे रविवारी सकाळी लवकर उठण्याची कोणालाच घाई वाटली नाही. ढगाळ हवामानामुळे दिवसाचे उजाडणे मंदच होते. त्या दिवशी लख्ख ऊन पडलेच नाही. त्यामुळे ते अंगावर येण्याचा प्रश्नच नव्हता. एकमेकांच्या आवाजानेच आजूबाजूचे लोक हळूहळू जागे झाले. प्रातर्विधीसाठी थोड्या अंतरावर वेगळा टॉयलेट ब्लॉक होता. त्यात टॉयलेट्सची पुरेशी संख्या असल्यामुळे चाळीत राहणाऱ्या लोकांप्रमाणे लाइनीत नंबर लावून उभे राहण्याची गरज पडत नव्हती. पण सर्वजण गीजर, शॉवर वगैरेंनी युक्त असे पाश्चात्य पध्दतीचे अटॅच्ड बाथरूम बेडरूममध्येच असलेल्या घरात रहात असल्यामुळे सर्वांना आता त्याची संवय झाली आहे आणि नुसता पंचा गुंडाळून बाहेर फिरायला लाज वाटते. त्यामुळे बाहेर जाण्यायोग्य कपडे अंगावर चढवून आणि हातात छत्री घेऊन टॉयलेट ब्लॉकपर्यंत जाणे येणे अडचणीचे वाटले. हवेतल्या गारव्यामुळे आंघोळ करण्याची आवश्यकता तशी कमीच झाली होती. त्यातून आंघोळ करण्यासाठी म्हणून पावसामध्ये आणखी एक फेरी मारण्यापेक्षा गोळ्या घेणेच बरे असे अनेक जणांनी ठरवले.

नाश्त्यासाठी डायनिंग हॉलला भेट देणे गरजेचे होते. गरम गरम इडल्यांचे घाण्यावर घाणे येत होते. प्रत्येकाने किती इडल्या खायच्या यावर बंधन नसले तरी आपल्याला इतरांनी हावरट म्हणू नये म्हणून सगळ्यांनी आधी फक्त दोन दोनच इडल्या प्लेटमध्ये वाढून घेतल्या आणि त्या संपल्यानंतर मात्र कोणी इडलीची, कोणी सांबाराची तर कोणी चटणीची तारीफ करीत बहुतेक जणांनी आपल्या प्लेट पुन्हा भरून आणल्या.

न्याहारी झाल्यानंतर बहुतेक मंडळी थोडा वेळ इकडे तिकडे हिंडून परत आली, पण पाऊस आणि निसरडे रस्ते यांना पाहून तशा अवस्थेत चढउतार करण्याचे धाडस करण्याचे वयस्क लोकांनी टाळले. थोड्या वेळाने जेंव्हा सारे लोक हॉलमध्ये परत आले तेंव्हा दोन चार चेहेरे दिसत नव्हते. ते लोक सकाळी उठल्यानंतर लगेच अंतर्धान पावले होते असे समजले. त्यांच्यामधल्या कोणाची प्रकृती ठीक नव्हती आणि कोणाला अधिक महत्वाचे काम होते. त्यामुळे सर्वांच्या भेटीगाठी होण्याचा मुख्य उद्देश सफळ झाल्यानंतर जास्त गाजावाजा न करता ते पुण्याला परत गेले होते. पावसाचा जोर वाढतच होता, वीज कधी येत होती, कधी जात होती याचा भरवसा नव्हता. सर्वांना रात्री मुक्कामाला वेळेवर आपापल्या गावाला जाऊन पोचणे श्रेयस्कर वाटत होते आणि पावसामुळे प्रवासात कोणत्या अडचणी येऊ शकतील ते सांगता येत नव्हते. त्यामुळे बाहेरगांवाहून आलेल्या बहुतेक सर्व मंडळींनी जेवण झाल्यानंतर लगेच निघण्याचा निर्णय घेऊन तो सांगून टाकला.

आता हातात असलेल्या दीड दोन तासांमध्ये काय करायचे याचा पुनर्विचार केला गेला. शनिवारी संध्याकाळी आलेल्या सदस्यांची ओळख करून देतांना वीज गेल्यामुळे प्रेझेंटेशनचा अखेरचा थोडा भाग दाखवायचा राहून गेला होता. शिवाय परांजप्यांची मोटर वाटेत नादुरुस्त झाल्यामुळे ते कुटुंब शांतीवनात उशीरा येऊन पोचले होते. त्यांची ओळख करणे आणि जोशी कुटुंबाची माहिती दाखवायचे राहिले होते. हे पाहता आदले दिवशी दाखवलेल्या प्रेझेंटेशनच्या स्लाइड्स पुन्हा एकदा भराभर दाखवल्या. परांजपे कुटुंबाची स्लाइड आल्यावर त्यांची सविस्तर ओळख करून घेतली आणि राहून गेलेला भाग पूर्णपणे दाखवला. या प्रेझेंटेशनमध्ये प्रत्येक कुटुंबामागे फक्त एकच चित्र दाखवले होते, पण या निमित्याने जुन्या फोटोंचा खजिना हाती लागला होता. त्याचे एक वेगळे प्रेझेंटेशन तयार केले होते. ते दाखवतांना प्रत्येक फोटोमधल्या व्यक्ती ओळखणे आणि त्यानंतर एकेकाला त्या काळी तू कोण होतास, होतीस आणि आता काय झालास, झालीस असे म्हणतांना खूप गंमत आली. आपल्या आईवडिलांना आणि आजीआजोबांना लहान असतांना पहातांना मुलांना तर खूपच मौज वाटत होती. पण हा प्रोग्रॅम संपण्याच्या आधीच पुन्हा लाइट गेले आणि तो बंद पडला.

वीज गेल्यामुळे प्रोजेक्टरबरोबर माईकही बंद झाला. ऐंशी पंचाऐंशी लोकांना ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात जो कोणी बोलू शकेल असे लोकच आता काही सांगू शकतील हा एक नवा मुद्दा समोर आला. सर्वांना त्यासाठी शक्य तितक्या जवळ बोलावून कोंडाळे केले. त्या दिवशी गुरुपौर्णिमा होती. या निमित्याने सर्वांनी सामूहिक आवाजात गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू हा श्लोक म्हणून गुरुवंदना केली. गुरूंचे महात्म्य आणि आपल्या जीवनातले स्थान, आपल्याला ते कोणकोणत्या रूपात भेटतात, आदर्श गुरू शिष्याला कसे घडवतात, तसे गुरू नाही भेटले तरी आपण कोणाकोणाला गुरुस्थानी मानून एकलव्यासारखे विद्याग्रहण करू शकतो, त्यासाठी मनात विनम्रभाव असणे कसे महत्वाचे आहे वगैरेचे थोडक्यात मार्गदर्शन केले.

. . . . . . .. . . . . . . . . . . . .

कौटुंबिक संमेलन – ७ (अंतिम)

GhareMelava_blog7

मधुकरला पहिल्यापासूनच नाटकाची आवड आणि अभिनयाचे अंग असल्यामुळे तो गेली चाळीस पन्नास वर्षे या क्षेत्रात वावरतो आहे. बरीच वर्षे हैद्राबादला असतांना तो तिथल्या महाराष्ट्रमंडळाचा अत्यंत उत्साही आणि सक्रिय कार्यकर्ता होता. दरवर्षी नवनवी नाटके बसवून तिथल्या मराठी समाजापुढे सादर करण्यात तो नेहमीच पुढाकार घेत असे. पुण्याला स्थायिक झाल्यानंतरही तो त्याच्या वसाहतीतील सांस्कृतिक विश्वात सक्रिय आहे. आमच्या कौटुंबिक संमेलनात त्याच्या अभिनयकौशल्याची झलक दाखवायचे ठरलेलेच होते, पण शनिवारी रात्री झालेल्या विविधगुणदर्शनाच्या कार्यक्रमात संगीताचेच प्राधान्य होते आणि शांतीवनातल्या छोट्याशा मंचावर मांडलेली वाद्ये बाजूला करून मोकळी जागा करणे व पुन्हा ती सारी मांडून त्यांची विजेशी जोडणी करणे बरेच कठीण होते. त्यामुळे मधुकरचा नाट्याविष्काराचा कार्यक्रम रविवारी सकाळी करायचे ठरवले. त्या दिवशीही अनपेक्षितपणे वीज गेली. तरीही मायक्रोफोनच्या मदतीशिवाय त्याने शारदा नाटकातला एक प्रवेश अप्रतिम पध्दतीने सादर केला. त्यातल्या निरनिराळ्या पात्रांच्या बोलण्यातल्या वेगवेगळ्या लकबी आणि हावभावांमधले बारकावे वगैरे सारे त्याने एकट्याने सादर करून शारदा नाटकातला तो प्रसंग केवळ आपल्या अभिनयकौशल्याने जसाच्या तसा उभा करून दाखवला.

नाटकांचे लेखन, दिग्दर्शन, अभिनय वगैरे सबकुछ जबाबदाऱ्या प्रभाकर एकट्याने पेलतात. त्यांनी स्वतः लिहिलेल्या आणि बसवलेल्या एका नाटकातला प्रवेश त्यांनी सादर केला. त्या नाटकाचे कथानक, त्यातली पात्रे आणि तो विशिष्ट प्रसंग वगैरेंचे मार्मिक विवेचन करून त्यांनी नाट्यसृष्टीतले अंतरंग थोडेसे उलगडून दाखवले. नटाने नाटकातल्या एकाद्या भूमिकेत शिरणे वगैरे सगळ्या गप्पा असतात, तसे करणे शक्य तर नसतेच आणि इष्टही नसते, कोणीही तसे प्रत्यक्षात करत नाही. आपल्या अभिनयाच्या जोरावर आणि शब्दांच्या फेकीतून तसा आभास तो निर्माण करतो. नाटक पहातांना आपल्यालाही त्या नटाचे अस्तित्व जाणवल्याशिवाय रहात नाही. असे त्यांनी ठामपणे सांगितले. मागे एकदा पुलंच्या एका मुलाखतीत त्यांनीसुध्दा असेच काहीतरी सांगितल्याचे मला आठवते.

सुधा, शैला वगैरेंनी त्यांच्या बालपणातल्या काही डोळ्यात पाणी आणणाऱ्या हृदयस्पर्शी आठवणी तर गुदगुद्या करणाऱ्या काही खुसखुशीत हकीकती सांगितल्या. इतरांनीही त्यात भर घातली. पंचवीस वर्षांपूर्वी आमच्या आईने रचलेले अंबरीशाचे आख्यान सरोजला अजून तोंडपाठ आहे. ते तिने केवळ स्मरणातून पूर्ण ऐकवले. आईने केलेल्या आणखी कांही निवडक कवनांचे मी वाचन केले. नंतर आपण केलेले एक विडंबनही वाचून दाखवले. मानसीने रंगवलेल्या अप्रतिम चित्रांचे एक लहानसे प्रदर्शन त्या हॉलमध्ये भरवले होते. तिने काढलेली सुंदर चित्रे त्यासाठी रंगमंचावरील पडद्यावरच चिकटवली किंवा टाचली होती. प्रभाकरांनी आपल्या सुवाच्य अक्षरात लिहून आणि रेखाचित्रांनी सजवून प्रदर्शनात ठेवलेल्या कवितांचे नमूनेही हॉलमधल्या भिंतीवर लावले होते.

या प्रसंगी आलेल्या ज्येष्ठ सदस्यांचा त्यांच्या नातवंडांकडून सत्कार करण्यात आला. एक पुष्पगुच्छ आणि नारळ देणे आणि वाकून नमस्कार करणे एवढेच त्याचे स्वरूप होते. ज्यांची नातवंडे हजर नव्हती त्यांचा सत्कार त्यांच्या कुटुंबातल्या तिथे आलेल्या सर्वात लहान असलेल्या व्यक्तींनी केला. या कार्यक्रमाचे संयोजन आणि त्यासाठी सारी धावपळ करणाऱ्या युवकांचाही नामनिर्देश करून वडिलधाऱ्यांच्या हस्ते त्या सर्वांना फूल आणि नारळ दिले. तोपर्यंत भोजनाची व्यवस्था झाली असल्याची वर्दी आली.

पुण्यातले कांही लोक जेवणासाठीही शांतीवनात न थांबता सरळ आपल्या घरी परतले आणि बाहेरगावाहून आलेले काही लोक जेवण आटोपून लगेच परतीच्या प्रवासाला निघाले. त्यामुळे भोजनोत्तर कार्यक्रमासाठी अर्धेच लोक शिल्लक राहिले होते. त्यांनाही परत जावेसे वाटायला लागले होते, पण त्यानंतर जादूचे प्रयोग असल्याची घोषणा केली गेल्यामुळे छोट्या मुलांनी त्यांना जाऊ दिले नाही. हा खेळ शांतीवनातर्फे दाखवला जाणार होता. सर्वांनी भोजनालयात जाऊन आणि जेवण करून परत हॉलमध्ये येईपर्यंत स्टेजवर टेबल ठेवून जादूच्या खेळाची तयारी सुरू झाली होती, पण विजेचा मात्र पत्ता नव्हता. आता मात्र ती येईपर्यंत थांबून तिची वाट पहायची कोणाचीही तयारी नव्हती आणि जादूगारालासुध्दा संध्याकाळी आणखी कुठे जायचे असावे. त्यानेही लाइटिंग आणि माइकशिवायच प्रयोग सुरू करून दिला. कदाचित त्याच्यासाठी हे रोजचेच असेल. तुकडे तुकडे केलेल्या रिबीनीमधून अखंड रिबीन काढून दाखवणे, एकादी वस्तू टेबलावरून अदृष्य करून कोणाच्या खिशातून किंवा टोपीतून ती बाहेर काढणे, रिकाम्या थैलीमधून कबुतरे काढणे वगैरे हातचलाखीचे नमूने दाखवून त्याने छान मनोरंजन केले. यातली ट्रिक शोधून काढण्याचा निष्फळ प्रयत्न करण्यापेक्षा त्या जादूगाराच्या हुषारीची मजा घेत त्याला दाद देणेच मी जास्त पसंत करतो. मुलांना तर ते खरेच वाटते आणि ती विस्मयचकित होतात.

जादूचे प्रयोग संपल्यावर मात्र तिथे जास्त वेळ थांबायची कोणाची तयारी नव्हती. पावसाचा जोर वाढतच होता आणि तो कमी होण्याची लक्षणे दिसत नव्हती. रविवारी संध्याकाळी खडकवासला धरणाच्या काठावर पिकनिकला किंवा भटकंतीला येणाऱ्या पर्यटकांची भरपूर गर्दी असणार हे माहीत होते. त्यामुळे शक्य तितक्या लवकर निघणे चांगले होते. परतीच्या प्रवासात कोणाकोणाच्या गाडीत कोणाकोणाला घ्यायचे याची चर्चा करून ते नक्की केलेले होतेच. आमच्या गाडीमधल्या पॅसेंजरांना गोळा करून आम्हीही परतीला निघालो. बरोबर नेलेल्या सगळ्या सामानाची आवराआवर करून आणि बिले भागवणे वगैरे उरलीसुरली कामे आटोपून शेवटची बॅचसुध्दा तासाभरात परतली.

औपचारिक रीतीने या कार्यक्रमाचा समारोप सोहळा असा झालाच नाही. टेलीफोनवर आणि ईमेल, ऑर्कुट, फेसबुक वगैरे माध्यमातून एकमेकांशी संवाद चालत राहिला आणि अजून तो चालला आहे. एकंदरीत पाहता मजा आली असाच सूर यातून निघत आहे.

———————————————-

हे लिखाण मी नऊ वर्षांपूर्वी केले होते. त्या वेळी जमलेल्यातल्या काही व्यक्ती दुर्दैवाने आज आमच्यात नाहीत. त्यानंतर असे कौटुंबिक संमेलनही पुन्हा होऊ शकले नाही.
. . . . . . . . . . . . .. . . . . . . . . . . . (समाप्त)

वर्ल्डकपचे साइड इफेक्ट्स

हे लेख मी चार वर्षांपूर्वी मागच्या वर्ल्डकप क्रिकेटच्या वेळी लिहिले होते.  दुर्दैवाने या वेळीसुद्धा आपला संघ उपांत्य सामन्यातच पराभूत झाला. दि.१०-०७-२०१९

भाग १ : आपण आधीचे क्रिकेटचे सामने कसे जिंकले?

इसवी सन २०११ या वर्षातल्या वर्ल्डकपसाठी झालेले बहुतेक सगळे सामने टीव्हीवर पाहून मी स्टार स्पोर्ट चॅनेलसाठी भरलेले जास्तीचे पैसे वसूल करून घेतले. त्या वर्षी भारताच्या संघाने पहिले सात सामने ओळीने जिंकले होते. ते कशामुळे जिंकले असतील? खरे तर कोणालाही असा प्रश्न पडायचे कारण नव्हते. आपला कप्तान महेंद्रसिंह धोनी ऊर्फ आपला लाडका माही याने या खेळाचा तसेच ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधली पिचेस, हवामान वगैरेचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून ठेवला होता. प्रत्येक सामन्यातल्या प्रत्येक क्षणी तिथल्या पिचची अवस्था, त्या वेळचे हवामान, वाहत्या वा-याची गती आणि दिशा, खेळत असलेल्या विरुद्ध बाजूच्या फलंदाजाच्या संवयी आणि त्याचे वीक पॉइंट्स वगैरे पाहून कोणाला गोलंदाजी द्यायचे हे तो ठरवत होता. त्या बॉलरने कशा प्रकारचा चेंडू टाकावा, आखूड पल्ल्याचा (शॉर्टपिच्ड) की यॉर्कर, ऑफ ब्रेक की गुगली वगैरेंच्या बारीकसारिक सूचनाही माही त्या गोलंदाजांना सारखा देत होता आणि तंतोतंत तसेच बॉल ते गोलंदाज टाकू शकत होते. पिचवरल्या विशिष्ट पॉइंटवर ठरलेल्या वेगाने ते चेंडू पडत होते आणि अपेक्षेइतकेच वळत होते. यामुळे विरोधी फलंदाजांच्या फटकेबाजीवर नियंत्रण येत होते, तसेच ते पटापट बाद (आउट) होऊन जात होते. अशा प्रकारे आपण सातही सामन्यांमधल्या सात विरोधी संघांना सर्वबाद करून एक नवा विक्रम नोंदवला.

आपले फलंदाजही फलंदाजी करतांना प्रत्येक चेंडूकडे निरखून पहात होते, त्यातल्या कुठल्या चेंडूला नुसतेच अडवावे, कुठल्या बॉलला जरासे ढकलून एकादी धांव काढावी, केंव्हा त्याला सीमारेषेच्या बाहेर टोलवून चार किंवा सहा रन्स मिळवाव्यात आणि कुठल्या चेंडूला शांतपणे जिकडे जायचे असेल तिकडे जाऊ द्यावे हे ओळखून त्यांनी तुफान फलंदाजी केली आणि प्रत्येक सामन्यात धावांचे पर्वत रचले. यामुळेच आपण हे सातही सामने जिंकू शकलो. असेच कोणाला वाटेल. मला त्यातले तंत्र फारसे काही समजत नाही, पण या सामन्याचे धावते वर्णन (कॉमेंटरी) करत असलेल्या आणि तज्ज्ञ म्हणून त्या खुर्च्यांवर बसलेल्या आपल्या संघातल्या पूर्वीच्या दिग्गजांनीच हे सगळे रोजच्या रोज सांगितल्यामुळे मलाही त्या वेळी ते पूर्णपणे पटले होते.

असे सगळे काही सुरळीत चालले होते, पण मग उपांत्य सामन्यात काय झाले कोण जाणे? या वेळी आपल्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना एकापाठोपाठ एक अगदी सोपे सोपे बॉल्स टाकले आणि त्यांनी त्या चेंडूंना मनसोक्त फटकारून आपल्या संघासमोर धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर आपल्या मुख्य फलंदाजांनी नको त्या चेंडूंना नको त्या वेळी बॅटने निष्कारण स्पर्श करून आपल्या विकेट्स घालवल्या. अशा प्रकारे परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर खेळायला आलेला माहीसुद्धा आपल्या संघाची थोडीबहुत लाज राखण्यापलीकडे फारसे काही करू शकला नाही. यामुळे आपण पहिले सात सामने नक्की कशामुळे जिंकले असतील? हा प्रश्न मनात डोकावायला लागला. त्याचे उत्तर मला दुसरे दिवशी सकाळच्या टीव्हीवरील आणि वर्तमानपत्रांधील बातम्या पहात असतांना मिळाले.

त्या बातम्यांमधल्या हकीकतींबद्दल लिहितांना मी त्यातल्या पात्रांची नावे आणि गावे बदललेली आहेत. तरीही त्याच नावांच्या व्यक्ती त्या गावांमध्ये प्रत्यक्षात रहात असल्यास हा एक योगायोग समजावा आणि या लेखाशी त्यांचा काहीही संबंध असणे अभिप्रेत नाही हे ध्यानात घ्यावे. अशी एक बातमी होती की लखनऊच्या लखनसिंग यादव नावाच्या युवकाने आधी त्याच्या मिशा सफाचट केल्या होत्या. त्या मूछमुंड्याने महिनाभरापूर्वीपासून त्याच्या मिशा पुन्हा चांगल्या वाढवल्या आणि त्यांना पीळ भरू शकण्याइतपत त्या भरघोस वाढल्या. वर्ल्डकपचा प्रत्येक सामना टीव्हीवर पहात असतांना लखन आपल्या मिशांना आलटून पालटून पीळ भरत असे. आपल्या टीमची बॅटिंग चाललेली असतांना इकडे त्याने मिशीला पीळ भरला की तिकडे फलंदाजाला चौका मिळत असे आणि जरा जोरात पीळ भरला की सरळ सिक्सर. विरुद्ध संघाची फलंदाजी चाललेली असतांना याने इकडे पीळ भरला की तिकडे विकेट पडायचीच म्हणे. तर वाराणशीच्या बनारसीदासने त्याच्या डोक्यावर चांगली जाड आणि लांबलचक शेंडी वाढवून ठेवली होती. तोसुद्धा आपल्या शेंडीला मागेपुढे किंवा डाव्याउजव्या बाजूला झटके देऊन तिकडे चौकार, षट्कार घडवून आणत होता किंवा विकेट्स घेत होता म्हणे. हे दोघे भय्ये इथे टीव्हीसमोर बसल्याबसल्या मिशी आणि शेंडीच्या रिमोट कंट्रोलने तिकडे दूर देशात चाललेले सामने खेळवत होते.

भारताच्या खेळाडूंच्या कपड्यांचा रंग निळा असल्यामुळे प्रेक्षकांमध्येसुद्धा बहुतेक लोक तर निळ्या रंगाचे टी शर्ट घालून मॅच पहायला येत होतेच, पण इकडे भारतात रहात असलेले बरेचसे प्रेक्षक नीलकमल, नीलकांत, निळूभाऊ किंवा निळे कोल्हे बनून टीव्हीसमोर बसून ते सामने पहात होते. यामुळे निळ्या रंगाच्या लहरी इकडून निघून त्या खेळाडूंपर्यंत पोचत असा त्यांचा दावा होता. पण पुण्यातले कॅप्टन कर्णिक मात्र ‘अंग्रेजोंके जमानेके’ कर्नल असल्यामुळे क्रिकेटसाठी ‘प्रॉपर’ असा पांढरा शुभ्र पोशाख घालूनच मॅच पहायला बसत. गांधीनगरचे डाह्याभाईसुद्धा त्या दिवशी सफेद खादीचा कुर्ता, धोती आणि टोपी परिधान करत असत. त्या दोघांच्या मते शुभ्र रंगामध्ये अचाट सामर्थ्य असते आणि त्याचा फायदा आपल्या संघाला होत असे. सुरतेचा छगनभाई ड्रेसवाला मात्र मुद्दाम विरोधी संघाच्या गणवेशाच्या रंगाचे कपडे घालून बसत. यामुळे ते कन्फ्यूज होऊन सामने हरत असत असे त्याचे म्हणणे पडले.

क्रिकेटच्या मैदानात स्लिप, गली, कव्हर, मिडऑन, मिडऑफ, लाँग लेग, शॉर्ट लेग वगैरे ठिकाणी क्षेत्ररक्षकांना उभे करून व्यूहरचना केली जाते. आपल्या हैद्राबादच्या तिम्मय्याने त्याच्या घरातल्या हॉलमध्येच टीव्हीच्या समोर अनेक खुर्च्या मांडून ठेवल्या होत्या आणि सामने पहात असतांना तो घरातल्या मंडळींना या किंवा त्या खुर्चीवर बसायला सांगत असे. त्याने इकडे अशी व्यूहरचना केली की प्रत्यक्षातल्या मॅचमध्ये एकादा कॅच उडून बरोबर त्या ठिकाणच्या फील्डरकडे जात असे आणि तो पकडला जात असे असे त्याचे सांगणे होते. यातल्या एकाद्या ठिकाणच्या खुर्चीवरून तिथे बसलेली व्यक्ती उठून गेली की नेमका तिकडे मॅचमध्ये एक कॅच ड्रॉप होत असे असाही त्याचा अनुभव होता.

याशिवाय कित्येक लोकांनी प्रत्येक मॅचच्या दिवशी कडकडीत उपास पाळले होते आणि मॅचमध्ये विजय मिळाल्यावर पोटभर गोडधोड खाऊन ते सोडले होते. कित्येक लोकांनी आपापल्या देवांना साकडे घातले होते तर कोणी विजयासाठी नवस बोलले होते. अशा प्रकारांचे असंख्य वैयक्तिक प्रयत्न तर होत होतेच, शिवाय गावोगावच्या लोकांच्या समुदायांनी एकत्र येऊन अनेक सांघिक उपाय योजले होते. काही ठिकाणी मंत्रोच्चारासह होमहवन, यज्ञयाग वगैरे चाललेले होते, काही ठिकाणी खूप लोक एकत्र येऊन एकाद्या मंत्राचा हजारो किंवा लाखो वेळा जप करत होते, काही लोक एकाद्या स्तोत्राचे शेकडो किंवा हजारो वेळा पारायण करत होते. या सगळ्या लोकांच्या अशा प्रकारच्या प्रयत्नामुळेच आपला संघ वर्ल्ड कपमधल्या एकापाठोपाठ एक सामन्यांमध्ये विजयी होत होता अशी त्या सर्वांची गाढ श्रद्धा होती.

पण मग उपांत्य सामन्यात काय झाले? याचे समाधानकारक उत्तर मात्र कोणाकडेच नव्हते. बहुधा त्या वेळी कुणातरी ऑस्ट्रेलियन माणसाने तिथल्याच एकाद्या पॉवरफुल बाबाकडून जादूटोणा करवून घेतला असेल आणि तो प्रभावी झाल्यामुळेच आपल्या खेळाडूंची मति भ्रष्ट झाली असेल असे झाले असेल असे माझे आपले साधे अनुमान आहे कारण मला जसे क्रिकेट समजत नाही तसेच चेटूकही समजत नाही.

भाग २ : वर्ल्डकपचे साइड इफेक्ट्स – देशभक्त आणि द्वेषभक्त

वर्ल्डकपाचे सगळे सामने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दक्षिण गोलार्धातल्या दोन देशांमध्ये खेळले गेले होते. तरीसुद्धा हजारो भारतीयांनी यातल्या प्रत्येक सामन्याला प्रेक्षकांच्या कक्षांमध्ये गर्दी केली होती. भारतातले सर्वसामान्य नागरीक तर नाहीच, पण उच्च मध्यमवर्गीय लोकसुद्धा स्वतःच्या खर्चाने तिकडे जाऊन हे सामने पाहू शकतील एवढी सुबत्ता अजून आपल्याकडे आलेली नाही. बडे उद्योगपती, सिनेकलाकार किंवा राजकारणी अशा अतीश्रीमंत वर्गातले लोकच हे काम करू शकतात. ग्राहक, प्रेक्षक किंवा करदाता या नात्याने त्याचा बोजा अखेर आपल्यावरच पडत असला तरी तो कोट्यावधी लोकांमध्ये विभागून जात असल्यामुळे आपल्याला त्याचा वेगळा भार जाणवत नाही. अर्थातच हे सामने पहायला आलेले बहुतेक सर्व भारतीय वंशाचे प्रेक्षक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांमध्ये वास्तव्य करणारेच असणार. कदाचित त्यातले काही जण अमेरिका, सिंगापूर, दुबई वगैरे देशांमधून तिकडे गेलेले असले तरी तेसुद्धा गडगंज झालेले अनिवासी भारतीयच (नॉनरेसिडेंट इंडियन्स) असणार.

यातले काही लोक थोड्या काळासाठी तिकडे जाऊन परत येणारे असले तरी बरेचसे लोक कायमसाठी तिकडे स्थायिक झाले तरी आहेत किंवा तसा प्रयत्न करीत आहेत. तरीसुद्धा हे सगळे प्रेक्षक भारतीय खेळाडूंना अगदी मनापासून भरभरून दाद आणि खूप प्रोत्साहन देत होते. त्याते काही जण मोठमोठे तिरंगी झेंडे हातात धरून मोठ्या उत्साहाने जोरजोरात फिरवतांना दिसत होते, तर काही लोकांनी आपले चेहेरे तीन रंगांमध्ये रंगवून घेतले होते. हा म्हणजे आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमान आहे असा सूर काढणारे काही अतीशिष्ट लोक आपल्याकडे आहेत. पण त्यांच्या नकारात्मक दृष्टीकडे दुर्लक्ष केल्यास या सगळ्या लोकांना आपल्या भारत देशाबद्दल मनातून काही तरी आपुलकी वाटते हे जाणवत होते. केवळ हौस किंवा गंमत म्हणून त्यांना एकादा झेंडा फिरवायचा असता किंवा आपले तोंड रंगवून घ्यायचे असते तर त्यांनी मलेशिया, ग्वाटेमाला, झुलूलँड असल्या कुठल्याही देशाचा छान दिसणारा झेंडा किंवा चित्रविचित्र रंगांमध्ये रंगवलेले कसलेही फडके आणले असते किंवा आपल्या चेहेऱ्यावर कुठलेही चित्र रंगवून घेतले असते. पण या प्रसंगी त्यांनी यासाठी तिरंग्याचीच निवड का केली? त्यांच्या मनात खोलवर कुठेतरी देशभक्तीची एक लहानशी ज्योत अजूनही तेवत आहे याचेच हे लक्षण होते. परदेशी गेलेल्या भारतीयांच्या मनातसुद्धा अशी देशभक्तीची झलक दिसलीच, भारतातल्या लोकांचा उत्साह तर अमाप होता. टेलिव्हिजनवर सामना पाहणारे लोक आपल्या संघाच्या फलंदाजांनी मारलेल्या प्रत्येक चौकार किंवा षट्कारावर आणि मिळवलेल्या प्रत्येक विकेटवर जागच्याजागीच उड्या मारत होते, आरडाओरडा करून नाचत होते, प्रत्येक सामना जिंकल्यानंतर सगळीकडे फटाक्यांचे दणदणीत आवाज कानावर पडत होते. यातही एका प्रकारे त्यांची देशभक्ती दिसून येत होती.

पण स्वतःच्या अत्यंत जाज्वल्य राष्ट्रभक्तीचा नगारा सदैव वाजवत असणाऱ्या काही लोकांना मात्र क्रिकेट या शब्दाचेसुद्धा वावडे आहे असेही दिसले. असे लोक प्रामुख्याने सोशल मीडियावर आपली मुक्ताफळे उधळत असतात. गोऱ्या रंगाच्या आणि ख्रिश्चन धर्म पाळणाऱ्या परकीय आक्रमक लोकांचा हा खेळ भारतीय लोकांनी खेळावा हाच मुळात त्यांना देशद्रोह वाटतो. इथल्या कोट्यावधी लोकांनी तो विदेशी खेळ पहाण्यात आपला अमूल्य वेळ वाया घालवावा म्हणजे तर त्यांच्या मते देशद्रोहाची परिसीमा झाली. यामुळे क्रोधाने लालपिवळे होऊन त्यांनी सगळ्या जनतेवरच सैरभैर आगपाखड सुरू केली. जगभरातली आजची परिस्थिती काय आहे? आजच्या काळातले इंग्रज हे आपले शत्रू राहिले आहेत का? त्यांनी पूर्वीच्या काळात सुरू केलेला खेळ आता फक्त त्यांचा राहिला तरी आहे का? खेळ हा द्वेष करण्याचा विषय असू शकतो का? असा कोणताही विचार त्यांच्या मनाला शिवत नाही इतके ते द्वेषाने भरून गेलेले आहे. त्यांच्या मते आजच्या काळातल्या भारतातल्या लोकांच्या मनाला किंवा त्यांना मिळणाऱ्या आनंदाला कवडीइतके महत्व देण्याचे कारण नाही. देशामधली माणसेच वगळली तर कुठला देश शिल्लक राहतो? या शिष्ट लोकांना स्वतःला नक्की कशाचा अभिमान वाटतो? देश किंवा राष्ट्र या शब्दाची कसली संकल्पना या लोकांच्या डोक्यात भरलेली आहे? हेच मला समजत नाही.

हे लोक स्वतःला अत्यंत प्रखर राष्ट्रनिष्ठ असे मानतात आणि तसे ते उठताबसता सारखे सांगतही असतात. अशा लोकांना देशभक्त म्हणावे की द्वेशभक्त असा प्रश्न पडतो.

क्रिकेट क्रिकेट

मी कधीच खास अंगात ड्रेस घालून, डोक्यावर कॅप चढवून आणि पायाला पॅड्स, हातात ग्लोव्ह्ज वगैरे जामनिमा करून मैदानावर पाऊल ठेवलेले नाही. पण माझ्या साध्यासुध्या आयुष्याला विविध प्रकाराने क्रिकेटचा निसटसा स्पर्श झाला त्याच्या काही मजेदार आठवणी

क्रिकेट क्रिकेट – भाग १

आमच्या घराजवळ फक्त तीन चार इमारतींना जोडणारी एक लहानशी गल्ली  आहे. ही गल्ली लांबीला फारशी नसली तरी टाउन प्लॅनिंग करतांना तिला चांगली प्रशस्त रुंद बांधून ठेवली आहे पण सकाळ संध्याकाळचा थोडा कालावधी वगळता एरवी तिच्यावर वाहनांची विशेष वर्दळ नसते. शाळेला सुटी लागलेली असल्याने बरेच वेळा गल्लीतली मुले त्यावरच ‘क्रिकेट क्रिकेट’ खेळत असतात. परवा मी त्या गल्लीमधून चाललो असतांना सात आठ मुले तिथे ‘गल्ली क्रिकेट’ खेळत होती. लाकडाच्या एका आडव्या ठोकळ्यावर तीन वर्तुळाकार भोके पाडून त्यात तीन उभे दांडे बसवलेले पोर्टेबल स्टम्प्स अलीकडे मिळतात. त्या मुलांनी एका बाजूला असले स्टम्प्स ठेवले होते. अर्थातच हे डांबरी रस्त्याचे सुपर हार्ड पिच होते आणि त्यांचा खेळ टेनिसच्या सॉफ्ट बॉलने चालला होता. पिचच्या दुसऱ्या बाजूला रस्त्यावरच खडूने रेघा मारून ‘क्रीज’ बनवली होती. गल्लीच्या तोंडाशी एकादी मोटरगाडी य़ेतांना दिसली की लगेच स्टंप्सना उचलून बाजूला ठेवून आणि स्वतः रस्त्याच्या कडेला जाऊन ती मुले गाडीला वाट करून देत होती. पायी चालणाऱ्यांनी मात्र स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची असल्यामुळे मी चेंडूवर लक्ष ठेवून रस्त्याच्या कडेने फुटपाथवरून जपून चालत होतो.

मी हा खेळ पहात पहात पुढे जात असतांना बॅट्समनने टोलवलेला चेंडू थोडा जास्तच उडाला आणि रस्त्याच्या कडेला लावलेल्या एका मोठ्या वृक्षाच्या फांदीला निसटता लागून त्याच्या दाट पानांमध्ये घुसला आणि एक दोन सेकंदांनंतर पानांमधून वाट काढून सरळ घरंगळत खाली उतरला. तिथे उभ्या असलेल्या मुलाने त्याला अलगदपणे झेलून घेऊन झपाट्याने रस्त्यावर स्टम्पच्या ऐवजी मारलेल्या रेषेला लावला आणि “औट, औट” असा पुकारा केला. विरुध्द संघाची मुले प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पहायला लागताच तो मुलगा म्हणाला, “मी हा त्याचा कॅच पकडला आहे आणि याला रनआउट केले आहे. म्हणजे दोघेही औट ना?”
“चल रे, एका बॉलवर कधी दोघेजण औट होतात का?” एक मुलगा उद्गारला.
“पण त्यांच्यातला कोणी तरी औट व्हायलाच पाहिजे ना?”
यावर बॅट्समन म्हणाला, “अरे, माझा टोला तुझ्या डोक्याच्या किती तरी वरून जात होता आणि मागे दुसरा कोणी फील्डरही नव्हता. म्हणजे हे झाड मध्ये आले नसते तर बॉल नक्की बाउंडरीच्या पार जाऊन चौका किंवा छक्का होणार होता. त्यासाठी मला चार किंवा सहा रन मिळायला पाहिजेत.”
“आणि बाउंडरीपलीकडे गेला की बॉल डेड होतो. मग रनआउटचा प्रश्नच येत नाही.” त्याचा मित्र म्हणाला,
“पण प्रत्यक्षात काय झालं आहे ते बघा ना. बाउंडरीच्या आतच आणि जमीनीवर टप्पा पडायच्या आधीच मी या बॉलचा कॅच पकडला आहे ना? आणि तो डेड व्हायच्या आतच मी याला रनआउटही केले आहे.”
“टप्पा म्हणजे फक्त जमीनीवरच बॉल पडायला पाहिजे असे काही नाही हं, भिंतीला किंवा झाडाच्या फांदीला आपटून बॉल उडाला तरी तो टप्पाच झाला. आज आपण “वन टप्पा औट गेम” खेळत नाही आहोत. त्यामुळे मी काही औट झालेलो नाही.” बॅट्समन म्हणाला. दुस-या बाजूचा बॅट्समन लगेच म्हणाला, “अरे मी काही रन काढायसाठी पळालो नव्हता. आपला बॉल कुठे गडप झाला ते पहायसाठी थोडा पुढे आलो होतो. आजच आत्ताच मी हा नवीन बॉल विकत आणला होता, अजून एक ओव्हरपण झाली नाही, एवढ्यात तो हरवला असता तर पंचाईत झाली असती. म्हणून मी बॉल कुठे जातो आहे ते पहात होतो.”
“म्हणून तू असा रडी खेळणार का?”
“मी नाही काही, तूच रडी खेळतोय्स.”
अशी हमरातुमरी सुरू होताच त्यांच्यातला एक मोठा आणि समंजस मुलगा पुढे होऊन म्हणाला, “अरे, असे भांडताय्त काय? आपण आज असे रूल्स करूया की असं झालं तर औट, तसं झालं तर नॉटऔट ….. वगैरे.”
तोंपर्यंत मी पुढे चालला गेलो होतो, त्यामुळे त्याने हा विवादग्रस्त बॉल कॅन्सल केला, की ती ओव्हर किंवा मॅचचा तो भागच रद्द करून नव्याने सुरुवात केली ते काही मला समजले नाही. माझ्या मनात विचार येत होते की खऱ्याखुऱ्या क्रिकेटमध्ये किती शेकडोंनी नियम आहेत! तरीसुध्दा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्वान आणि अनुभवी मंडळी जमून त्यात सारख्या सुधारणा करत असतात, ते नियम शिकून घेऊन व्यवस्थित प्रशिक्षण मिळालेले अंपायर प्रत्येक मॅचसाठी नेमले जातात आणि तेच प्रत्येक मॅचवर नियंत्रण ठेवतात. कुठल्याही सामन्यात सारखे ऐकू येणारे ‘हौज्झॅट्’चे आवाज आणि त्यावर पंचाने कोठलाही निर्णय दिला की तो ज्या बाजूच्या विरोधात गेला असेल त्यातल्या खेळाडूंनी दिलेली प्रतिक्रिया पाहता या खेळाडूंना तरी सगळे नियम नीटपणे समजलेले आहेत की नाही किंवा या नियमांची त्यांना किती पर्वा करावीशी वाटते याबद्दल शंका येते. या वेळी खेळाडूंनी काढलेले उद्गार, त्यांच्या चेहेऱ्यावरील हावभाव आणि त्यांच्या देहबोलीमधून व्यक्त झालेली नाराजी हीसुध्दा किती प्रमाणात असली तर चालेल याविषयी सभ्यपणाचे नियम केले आहेत आणि त्यांचे उल्लंघन झाल्यास खेळाडूंना दंड केला जातो असे आपण पाहतो. या ऑफिशियल क्रिकेटबद्दल इतके छापले आणि सांगितले जात आहे की ते वाचणाऱ्या आणि ऐकणाऱ्यांना अजीर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे मला त्यात भर घालायची नाही.

पण आपल्या देशात असे जागतिक नियमांनुसार खेळले जाणारे क्रिकेट फार फार तर एकादा टक्का असेल आणि आपापले नियम तयार करून स्वैरपणे खेळले जाणारे क्रिकेट नव्याण्णऊ टक्के असणार असे मला वाटते. याचे कारण क्रिकेट या अद्भुत खेळात विलक्षण लवचिकपणाही आहे. दोन तीन पासून वीसपंचवीसपर्यंत कितीही मुले जमलेली असली तरी त्यांचे दोन गट पाडून ती क्रिकेट खेळायला लागतात. तसेच घरातल्या अंगणापासून विशाल क्रीडांगणापर्यंत कुठल्याही मोकळ्या जागेत तो खेळला जातो. लगान किंवा इकबाल या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे खेड्यापाड्यातली मुले रिकाम्या शेतांमध्ये देखील क्रिकेट खेळतात. शहरांमधल्या गल्ल्यांमध्ये हा खेळ सर्रास खेळला जातोच, शहरांमध्ये कोणी ‘बंद’ पुकारला असल्यास मोठमोठ्या हमरस्त्यांवरसुद्धा क्रिकेट खेळणे सुरू होते. आझाद मैदान, क्रॉसमैदान, शिवाजी पार्क यासारख्या मोठ्या मैदानांवर एकाच वेळी अनेक गट क्रिकेट खेळतांना दिसतात. खेळण्यासाठी उपलब्ध असलेल्या जागेचा आकार, खेळणाऱ्यांची उपस्थिती, हवामान वगैरे पाहून आपापसातच रोजच्या रोज सोपे असे नवे नियम तयार केले जातात आणि पाळले जातात. पुढे जगभरात नावलोकिक मिळालेल्या कितीतरी खेळाडूंनी आपल्या खेळाची सुरुवात गल्लीतल्या किंवा चाळीमधल्या क्रिकेटमधून झाली असल्याचे मुलाखतींमध्ये सांगितलेले मी ऐकले आहे.

खेळाडूचा विशिष्ट गणवेश अंगावर धारण करून, पॅड्स आणि गार्ड्स वगैरे बांधून औपचारिक स्वरूपाचा क्रिकेटचा सामना खेळण्याचे भाग्य माझ्या आयुष्यात कधीच माझ्या वाट्याला आले नाही कारण मला टोपी (क्रिकेटची कॅप) घालण्याचे धैर्य कोणालाही झाले नाही. पण मला कळायला लागल्यापासून ‘क्रिकेट क्रिकेट’चा खेळ मात्र माझ्या आवडीचा होता. अगदी लहान असतांना कचाकड्याच्या ‘बॅटबॉल’ने आमच्या घराच्या गच्चीवर सुरुवात करून मी हळूहळू गल्लीपासून मैदानापर्यंत प्रगती केली, पण चुकूनसुध्दा कधीही मैदान गाजवले मात्र नाही. शाळेत असतांना मी माझ्या वर्गातला वयाने सर्वात लहान मुलगा होतो कारण अॅडमिशन घेण्याच्या वेळी माझ्या वयाच्या मानाने बुध्दीची वाढ जरा जास्तच झाली होती आणि अक्षरे व अंक यांचे ज्ञान घरातच झाले होते. त्यामुळे पहिलीच्या मास्तरांनी मला काय काय येते हे पाहून दुसरीत आणि त्या मास्तरांनी थेट तिसरीत नेऊन बसवून दिले होते. त्या काळात फॉर्म भरणे आणि त्याला बर्थसर्टिफिकेट जोडणे वगैरे भानगडी नव्हत्याच. माझ्या शरीराची वाढ मात्र वयाच्या मानाने थोडी हळू हळूच होत असावी. त्यामुळे माझ्या वर्गात माझे वय कमी होते तसेच वजनही सर्वात कमी होते. आमच्या वर्गातला गिड्ड्या रास्ते सुरुवातीपासून शालांत परीक्षेपर्यंत उंचीने ‘डेढफुट्या’च राहिला असला तरी तोसुध्दा शक्तीच्या बाबतीत मला जरा भारीच पडत असे. यामुळे हुतूतूपासून क्रिकेटपर्यंत सगळ्या मैदानी खेळात मी नेहमी ‘लिंबूटिंबू’च मानला जात असे. या परिस्थितीत क्रिकेटच्या बाबतीत मी अभिमानाने सांगावे असे काहीच माझ्या जीवनात कधीच घडले नाही, पण लहानपणच्या काही मजेदार आठवणी मात्र आहेत.

. . . . . . . . . .

क्रिकेट क्रिकेट – भाग २

क्रिकेटच्या खेळात दोन्ही बाजूच्या संघांमध्ये प्रत्येकी अकरा खेळाडू असतात, त्यातला जो संघ बॅटिंग करत असतो त्याचे फक्त दोनच खेळाडू मैदानात प्रत्यक्ष खेळत असतात, उरलेले मैदानाबाहेर बसलेले असतात. खेळणारा एक बॅट्समन औट झाल्यावर तो मैदानाच्या बाहेर जातो आणि दुसरा त्याची जागा घेतो. दुसरा संघ बॉलिंग आणि फील्डिंग करत असतो त्याचे सारे म्हणजे अकराही खेळाडू मैदानावर उतरून खेळात भाग घेत असतात. एवढी तरी प्राथमिक माहिती आजकाल सगळ्यांनाच असते. पण आमच्या मुलांच्या क्रिकेटमध्ये असले मूलभूत नियमसुध्दा नसायचे. दुपार टळली की मित्रमंडळी एकमेकांना बोलावून आणि ज्याच्याकडे बॅट, बॉल, स्टंप्स वगैरे जी सामुग्री असेल ती घेऊन मैदानाकडे येऊ लागत आणि जितकी मुले जमतील तेवढ्यावर खेळ सुरू करून देत. त्यासाठी दोन टीम बनवण्याचीसुध्दा गरज पडत नसे. मुलांची आपापसातच आळीपाळीने बॅटिंग आणि बॉलिंग चालत असे. एक मुलगा बॉल टाकायचा आणि दुसरा बॅटिंग करायचा. तिसरा वाट पहात फील्डिंग करायचा. बॅटिंग करणारा मुलगा औट झाला तर तिसरा त्याची जागा घ्यायचा आणि पूर्ण ओव्हरमध्ये तो औट नाही झाला तर तिसरा मुलगा बॉलिंग करायचा. चौथा, पाचवा, सहावा वगैरे मुले अशाच प्रकारे आपल्याला आळीपाळीने बॅटिंग किंवा बॉलिंग मिळायच्या संधीची वाट पहात फील्डिंग करत रहायचे. टीमच नसल्यामुळे धावा मोजायची गरज नसायची. कधी कधी तर असे व्हायचे की बॅट्समन औट होताच ती ओव्हर अर्धवट सोडून बॉलरच “माझी पाळी आली” म्हणून बॅट हातात घ्यायचा आणि त्याची उरलेली ओव्हर औट झालेला मुलगा पूर्ण करायचा. म्हणजे एका ओव्हरमध्येच बॉलर आणि बॅट्समन यांचे ‘रोल रिव्हर्सल’ होत असे. दोन गट बनवण्याएवढी म्हणजे दहा बारा इतकी गणसंख्या झाल्यावर लीडर टाइपची दोन मुले कॅप्टन होत आणि “मन्या, तू माझ्या टीममध्ये”, “पक्या तू माझ्याकडे”, “सुऱ्या तू इकडे ये”, “रम्या, इकडे”, “चंद्या”, “नंद्या” ….. असे करून सगळ्या मुलांची दोन गटात वाटणी करून घेत. त्यानंतर उशीराने येऊन पोचलेली मुलेही एकजण या आणि दुसरा त्या अशा प्रकारे या ना त्या संघात सामील होत जात.

जमलेल्या मुलांची संख्या वीस पंचवीस इतकी मोठी संख्या कधी झाली तरच क्रिकेटच्या नियमाप्रमाणे एक ‘बॅटिंग साइड’ आणि दुसरी ‘फील्डिंग साइड’ अशी विभागणी होत असे. एरवी दोन लहान लहान संघ बनले असले तरी त्यातले दोन बॅट्समन सोडून इतर सगळी मुले आनंदाने फील्डिंग करत, बॉलिंग मात्र फक्त विरुध्द संघाच्या मुलांनी करायची. फिल्डिंग करतांना आपल्या संघातल्या खेळाडूचा कॅच सोडायचा, त्याने मारलेला फटका अडवायचा नाही अशा प्रकारची ‘चीटिंग’ कोणी करत नसे. कोणीही तसे मुद्दाम केलेले आढळल्यास त्याला बॅटिंगचा चान्स मिळणार नाही एवढीशी शिक्षा असायची. शिवाय त्या दिवशीचे दोन संघ त्या खेळापुरते, दुसऱ्या दिवशी इकडची काही मुले तिकडे आणि तिकडची इकडे असे होणार असल्यामुळे त्या तात्पुरत्या संघात संघभावना कशी तयार होणार? रोजच्या खेळातला डाव जिंकण्याहरण्याला फार महत्व असायचेही नाही. खेळण्यातला आनंद उपभोगणे इतका साधा उद्देश मनात ठेवून खेळणे होत असे.

आजकाल क्रिकेटच्या मॅचसाठी मुद्दाम वेगळी खेळपट्टी (पिच) तयार केली जाते. त्यासाठी दक्षिण आफ्रिकेमधून वाळू आणि न्यूझीलंडमधून खडी आणली अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जातात. अमाप खर्च आणि श्रम करून ती तयार केली असली तरी मॅच सुरू झाल्यानंतर संपण्याच्या आधीच ही नखरेल खेळपट्टी आपले गुण पालटत राहते. सुरुवातीला तिच्यावर टाकलेला चेंडू चांगली उसळी घेतो त्यामुळे ती जलदगती गोलंदाजांना (पेस बोलर्सना) साथ देते. तेच पिच जुने झाल्यानंतर त्यावर बॉल चांगले वळायला लागतात. त्यामुळे ते फिरकी गोलंदाजांना (स्पिनर्सना) मदत करते. असे असे घडले असे कॉमेंटेटर्स कधी कधी सांगत असतात. काही खेळपट्ट्या फलंदाजांच्या सोयीसाठी अशा प्रकारे बनवल्या जातात की त्या कुठल्याच प्रकारच्या बोलरला कसलीच साथ देत नाहीत. पिचच्या या गुणधर्मांमुळे टॉस जिंकून झाल्यावर आधी बॅटिंग करायची की फील्डिंग असा एक मोठा निर्णय कॅप्टनने घ्यायचा असतो. नाणेफेक जिंकूनसुध्दा एकादी टीम हरली तर तिच्या कर्णधाराने चुकीचा निर्णय घेतल्याबद्दल त्याला जबाबदार धरले जाते. हे सगळे वाचतांना मला तरी हसू येते. कोणची टीम जिंकणार हे जर टॉसवरच ठरत असेल तर त्या मॅचला काय अर्थ राहिला? आमच्या लहानपणच्या क्रिकेटमध्ये खेळपट्टीची भानगडच नसायची. गावाबाहेरच्या ज्या सार्वजनिक मोकळ्या मैदानावर आम्ही खेळायला जात असू तिथे मुलांची इतर टोळकीही येत, तसेच फिरायला आलेली माणसेही गवतावर बसून गप्पा मारत. त्यामुळे आमची खेळण्याची जागाच रोज बदलत असे. सोयिस्कर मोकळी जागा बघून त्यातल्या त्यात सपाट अशा जागेवर स्टंप ठोकून आणि त्याच्या आसपासचे दगड धोंडे वेचून ते बाजूला करून आमचे नित नवे पिच तयार होत असे.

खेळाच्या इतर बाबतीतसुध्दा परिस्थितीनुसार नवनवे नियम बनवले जात आणि पाळले जात. दोन्ही बाजूला तीन तीन स्टंप ठेवणे आम्हाला कधीच शक्य होत नसे. त्यामुळे ओव्हर संपल्यानंतर विकेट कीपर त्याच्या जागेवरच उभा रहात असे, सगळे बोलर एकाच बाजूने बॉल टाकत. तिथे पॅव्हिलियन एंड, चर्च एंड अशासारख्या दोन बाजू नसत. ओव्हर झाली की दोन्ही बाजूचे बॅट्समन रन काढल्याप्रमाणे आपल्या जागा बदलत. जिथे खेळपट्टीचाच पत्ता नसायचा तिथे आखलेल्या सीमारेषा कुठून येणार? डाव सुरू करतांनाच काही खुणा ठरवून ती बाउंडरी मानली जात असे. शहरातल्या गल्लीत क्रिकेट खेळणारी मुले सुध्दा पहिल्या मजल्यावर बॉल गेला किंवा कोणाच्या खिडकीची काच फुटली कि बॅट्समन आउट, ठराविक रेषे पर्यंत बॉल गेला कि दोन रन्स, त्याच्या पुढे दुसऱ्या रेषे पर्यंत बॉल गेला कि चार रन्स, रेषेवरून गेला कि ६ धावा असे नियम करतात. फील्डर्सची संख्या कमी असली तर बॉल कुठल्या दिशेने फटकारायचा याचे नियम ठरवले जातात. आमच्या खेळात असेच काही नियम एकदा ठरवले होते, त्या दिवशी मी उशीरा पोचलो होतो. पण माझी क्षमता पाहून मला ते नियम सांगण्याची गरज कुणाला वाटली नाही. नेहमीप्रमाणे सर्वात शेवटी माझी बॅटिंगची पाळी आली. तोपर्यंत अंधार पडायची वेळ झाली होती. नेहमीप्रमाणे दोन तीन चेंडूमध्ये माझी विकेट काढून घरी परतायचा माझ्या मित्रांचा विचार होता. पण त्या दिवशी काय झाले कोण जाणे, पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर पडून उसळतांना मला दिसला आणि काही विचार न करता मी बॅट फिरवली आणि तो चेंडू लाँग लेगच्या दिशेने पार नजरेपल्याड चालला गेला. कित्येक दिवसात मी एवढा दूर फटका मारला नसल्याने मी स्वतःवर भयंकर खूष झालो होतो, पण सगळे मित्र मात्र चिडून माझ्या अंगावर धावून आले. स्टंपच्या मागच्या बाजूला ठेवायला क्षेत्ररक्षक उपलब्ध नसल्याने “कोणीही त्या बाजूला फटका मारायचा नाही, बॉलला फक्त पुढच्या बाजूलाच ढकलायचा.” असा त्या दिवसापुरता नियम केला होता म्हणे. त्यामुळे माझ्या कर्माची शिक्षा म्हणून मलाच एकट्याने मागे जाऊन अंधुक होत असलेल्या प्रकाशात गवत आणि काट्याकुट्यामधून तो चेंडू शोधून आणण्याचे काम करावे लागले. करकरीत तीन्हीसांजेच्या वेळी मनातल्या मनात रामरक्षा म्हणत केलेल्या या प्रायश्चित्ताची आठवण जन्मभर राहिली.
————–

क्रिकेट क्रिकेट – भाग ३

माझ्या लहानपणच्या काळात मामलेदार कचेरी, नगरपालिका कचेरी, पोस्ट ऑफिस आणि एक सहकारी बँक एवढीच ‘ऑफिसे’ आमच्या लहान गावात होती. त्या सगळ्या इमारतींमधले वातावरण थोडे गावठीच असायचे. पट्टेवाले किंवा पोस्टमन यांच्यासारखे मोजके गणवेशधारी सेवक वगळल्यास तिथे दिसणारे बहुतेक लोक अंगात सदरा (शर्ट), डोक्यावर टोपी किंवा पागोटे आणि कंबरेला धोतर किंवा लेंगा (पायजमा) अशासारख्या गावठी पोशाखात असत. गावातल्या पांढरपेशा लोकांची संख्या एकंदरीत कमीच असल्यामुळे पँट धारण करणारे तरुण कमीच दिसत पण त्यांची संख्या दिवसेदिवस वेगाने वाढत जात होती. तरीही फक्त खेळासाठी म्हणून डोक्यावरील कॅपपासून पायातील बुटांपर्यंत नखशिखांत पांढरा शुभ्र ड्रेस घालून क्रिकेटची मॅच खेळू शकणारे युवक त्यांच्यात शोधूनही निघाले नसते. त्या काळात मुलांचे ‘खेळायचे वय’ संपले की त्यांनी पूर्णवेळ ‘कामाला’ किंवा ‘उद्योगधंद्याला’ लागायचे अशी रीत असल्यामुळे त्या गावात मोठ्या माणसांचे मैदानी खेळांचे फारसे सामने होत नसत. मी आमच्या गावातल्या प्रौढांना हुतूतू, कुस्ती आणि व्हॉलीबॉल याव्यतिरिक्त इतर कोणता मैदानी खेळ खेळतांना पाहिल्याचे मला आठवत नाही. त्या काळात भारतात टेलिव्हिजन सुरू झालेला नसल्यामुळे घरबसल्या क्रिकेटचा सामना पाहण्याची सोयही नव्हती. थोडक्यात सांगायचे झाल्यास मी कॉलेजच्या शिक्षणासाठी शहरात आल्यानंतर क्रिकेटचा खरा नियमानुसार असा खेळ पहिल्यांदा पाहिला.

त्या काळात क्रिकेटच्या कसोटी सामन्यांच्या कॉमेंटरीचे प्रसारण रेडिओवर येत होते. पण वर्षभरामध्ये क्रिकेट या खेळाचा फक्त एकच ‘सीझन’ येत असे आणि त्या कालावधीतसुध्दा दोन तीन वर्षांमध्ये एकदा एकादी परदेशी टीम क्रिकेट खेळण्यासाठी भारतात येत असे किंवा आपले खेळाडू ‘फॉरेन टूर’वर जात असत. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांचे संघ माझ्या शालेय जीवनाच्या आठवणीत फक्त एकेकदाच भारतात येऊन गेले असावेत. क्रिकेटची कॉमेटरी हा तेंव्हा आजच्यासारखा रोजचा मामला नव्हता. गावात प्रत्येकाच्या घरी रेडिओ असायचा नाही आणि असला तरी तो घरातल्या मुलांच्या वाट्याला क्वचितच येत असे. चुकून एकाद्या घरातल्या मोठ्या लोकांना क्रिकेटची कॉमेंटरी ऐकण्याचा षौक असलाच तर मग त्या घरातल्या मुलांच्या कानावर कॉमेंटरी पडायची. क्रिकेट टेस्ट मॅचेसच्या दिवसात अभ्यासाचे किंवा खेळायचे निमित्य करून त्या मुलाचे मित्र त्याच्या घरी जाऊन आणि थोडीशी कॉमेंटरी ऐकून धन्य होत. हॉटेले, पानपट्टीचे ठेले, सायकलीची (म्हणजे सायकली भाड्याने देण्याची) दुकाने अशा गावातल्या काही ठिकाणी नेहमीच रेडिओवर सिनेमाची गाणी मोठ्याने लावलेली असत. त्यातले काही लोक मात्र टेस्ट मॅचेस सुरू झाल्यावर गाण्यांऐवजी क्रिकेटची कॉमेंटरी लावून ठेवत. काही उत्साही लोक, मुख्यतः पोरेटोरे दुकानांच्या दारात उभी राहून ती ऐकत असत.

आपल्या देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रजी भाषेचीही हकालपट्टी करायचा चंग त्या काळातल्या राज्यकर्त्यांनी बांधला होता. आम्ही आठवी इयत्तेत गेल्यानंतर एबीसीडी शिकण्यापासून सुरुवात केली. ए टु झे़ड ही सव्वीस अक्षरे गिरवून झाल्यानंतर हळूहळू शब्द, वाक्यरचना, व्याकरण वगैरे थोडे फार शिकेपर्यंत आमचे शालेय शिक्षण संपून गेले. शालांत परीक्षेसाठी इंग्लिश हा एक ऐच्छिक विषय होता. ज्यांनी कॉलेज शिक्षण घेण्याचा विचारही केला नव्हता अशा बहुसंख्य मुलांनी तो घेतलाच नाही. आम्हाला इंग्रजी शिकवणारे अपसंगी, दोडवाड वगैरे सरांची गणना गावामधल्या विद्वान व्यक्तींमध्ये होत असे, पण शेक्सपीयर, शॉ, वर्डस्वर्थ वगैरेंचे साहित्य ते कोळून प्यायले असले तरी एबीसीडी शिकण्याच्या पातळीवरल्या आम्हाला त्याचा काय उपयोग होणार? त्यातून त्यांची मातृभाषा कानडी असल्याने त्यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व नव्हते. आम्हाला इंग्रजी सिनेमा किंवा मालिका, डॉक्युमेंटरीज वगैरेंचे दर्शनही झाले नव्हते. या परिस्थितीत शाळेत असेपर्यंत आमचे इंग्रजी भाषेचे ज्ञान यथातथाच राहिले. शाळेमधला इंग्रजीचा तास सोडल्यास एरवी त्या भाषेतला चकार शब्द बोलण्यात किंवा ऐकण्यात येत नसे. त्या वेळी क्रिकेटच्या कॉमेटरीमधूनच त्या भाषेतली चार वाक्ये कधी तरी आमच्या कानावर पडत होती. त्याचा अर्थ लावायच्या प्रयत्नातून आमचे किंचित ट्रेनिंग होत होते.

ऐकलेल्या कॉमेंटरीमधले फारच थोडे त्या वेळी आम्हाला समजत असे, पण पुन्हा पुन्हा ऐकून आणि शहाण्या लोकांना विचारून विचारून त्यातली क्रिकेटची परिभाषा ध्यानात येऊ लागली. इनस्विंगर, औटस्विंगर, लेग स्पिन, ऑफस्पिन, स्लिप, शॉर्ट लेग, कव्हर, हिट विकेट, क्लीन बोल्ड यासारख्या शब्दांचे अर्थ समजायला लागले. मैदानातल्या कोणकोणत्या जागांवर क्षेत्ररक्षक उभे आहेत (फील्ड प्लेसमेंट्स) हे पुन्हा पुन्हा सांगितले जात असल्यामुळे ते चित्र कल्पनेने डोळ्यासमोर येऊ लागले. पण आम्हाला त्यात त्या काळी फारसे स्वारस्य वाटत नव्हते. कोणती टीम बॅटिंग करते आहे, कोणकोण बॅट्समन खेळत आहेत, त्यांच्या आणि संघाच्या किती धावा झाल्या, किती विकेट्स गेल्या ही माहिती तेवढीच महत्वाची. अखेर कोण जिंकत आहे आणि कोण पराभूत होत आहे हे त्यावरून ठरते. यामुळे सर्वांना त्यातच इंटरेस्ट असायचा.

त्या काळात ‘पियरसन’ अशा इंग्लिश नावाचे एक भारतीय कॉमेंटेटर होते, त्यांचा भरदार आवाज आणि बोलण्याची स्टाईल सर्वांना इंप्रेस्सिव्ह वाटायची. ‘महाराजकुमार ऑफ विजयानगरम्’ एवढे लांबलचक आणि ‘विझी’ असे छोटेसे नाव धारण करणारे गृहस्थ अचाट लांबण लावायचे आणि त्यातले अवाक्षरही आम्हाला समजत नसे. कुठल्याशा जुन्या आठवणी घोळवून सांगता सांगता “दरम्यानच्या काळात चार विकेट पडल्या आहेत आणि आता अमके तमके क्रीजवर आले आहेत” अशी त्या सुरू असलेल्या खेळाबद्दल थोडीशी माहिती ते देत. विजय मर्चंट हे कॉमेंटेटर मात्र सर्वांचे अत्यंत लाडके होते. त्यांच्या खणखणीत आवाजात प्रत्येक शब्दाचा स्पष्ट उच्चार करून ते अक्षरशः ‘बॉल टू बॉल’ कॉमेंटरी करत असत, ते स्वतः एक उत्कृष्ट खेळाडू होते, त्यामुळे त्यांना क्रिकेटमधल्या खाचाखुचा चांगल्या ठाऊक होत्या आणि सोप्या शब्दात ते श्रोत्यांना समजावून सांगत असत. मुख्य म्हणजे रेडिओवरील खरखरीमधून फक्त त्यांचेच बरेचसे उच्चार आम्हाला समजत होते. तटस्थ वृत्ती न बाळगता ते खेळाशी समरस होऊन जात आणि त्यांच्या मनातली देशप्रेमाची भावना त्यांच्या कॉमेंटरीमध्ये उतरत असे.

मला गणितात पहिल्यापासूनच आवड आणि गति असल्यामुळे क्रिकेटच्या आकडेवारीचे थोडेसे वेड होते. क्रिकेटमध्ये जेवढे स्टॅटिस्टिक्स येते तेवढे अर्थकारणातदेखील कदाचित येत नसेल. कोणत्या संघाने किंवा खेळाडूने कुठे कुठे आणि कोणकोणते पराक्रम केले याची सविस्तर जंत्री वर्तमानपत्रांमध्ये, मासिकांमध्ये येत असे. आम्ही ती गोळा करून सांभाळून ठेवत होतोच, पण प्रत्येक सीझनमध्ये कितीतरी जुने रेकॉर्ड्स मोडले जात आणि नवे विक्रम प्रस्थापित केले जात असत. या सगळ्याची इत्थंभूत माहिती आम्हाला तोंडपाठ असे. एकादा बॅट्समन किंवा बोलर जरासा यशस्वी व्हायला लागला की लगेच तो कोणत्या विक्रमापासून किती दूर आहे हे पाहिले जात असे आणि नव्या विक्रमाचे वेध लागत असत. तो सामना जिंकण्याहरण्यापेक्षाही त्या सामन्यात अमूक रेकॉर्ड मो़डला जाणार की नाही याची उत्सुकता कधी कधी जास्त वाटत असे.

त्या काळातली एक मजेदार आठवण आहे. आमच्यातला अरविंद पोटे नावाचा एक मुलगा चांगला क्रीडापटू होता आणि थोडी दादागिरीही करायचा. सुरुवातीपासून शाळा सोडेपर्यंत तोच आमचा कॅप्टन असायचा. एरवी तो स्वतःला देव आनंद समजत असे आणि त्याच्यासारखा केसाचा कोंबडा ठेवून थोडे हावभावही करत असे. क्रिकेटच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू रिची बेनो त्याचा हीरो होता. फील्डिंग करतांना सिली मि़ड ऑफ या जागेवर बॅट्समनच्या अगदी पुढ्यात हा रिची उभा रहात असे आणि एकादा बॉल प्लेड करतांना किंचितसा जरी वरच्या बाजूला उडाला तर हनुमानउडी मारून त्याचा कॅच पकडत असे. अर्थातच कॉमेंटरीमध्ये ऐकून आणि वर्तमानपत्रांमध्ये वाचून ही माहिती आम्हाला मिळाली होती. असले धाडस करणे त्या काळात दुर्मिळ असायचे. आमचा अरव्यासुध्दा एकदा असा रिची बेनोसारखा सिली मि़ड ऑफला उभा राहिला असतांना योगायोगाने माझी बॉलिंगची पाळी आली होती. मलाही वेगाने बॉल टाकता येतो हे दाखवायचे म्हणून मी सगळा जोर लावून चेंडू फेकला आणि कधी नव्हे तितक्या वेगाने तो गेला, पण त्या नादात त्याची दिशा थोडी चुकली आणि सरळ अरव्याच्या पाठीवर दाणकन आपटला.

. . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

क्रिकेट क्रिकेट – भाग ४

कॉन्व्हेंट स्कूल, मिलिटरी स्कूल, पब्लिक स्कूल यासारख्या काही शाळांमध्ये शिक्षणाबरोबरच खेळांनासुध्दा खूप महत्व दिले जाते. अशा शाळांमधून आलेली काही मुले आमच्याबरोबर इंजिनियरिंगला होती, तसेच काही मुलांनी क्लब, जिमखाना वगैरेंमध्ये जाऊन क्रिकेटचे खास प्रशिक्षण घेतलेले होते. यामुळे आमच्या इंजिनियरिंग कॉलेजमधल्या क्रिकेटचा दर्जा खूपच वरचा होता. सिलेक्शन ट्रायल्ससाठी येणाऱ्या मुलांची संख्या आणि प्रत्येकाची तयारी चांगली होती. तिथे लिंबूटिंबूंसाठी काहीच स्कोप नव्हता. मी शिकत असतांना तीनही वर्षी पुणे विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा आमच्या कॉलेजच्या संघानेच जिंकल्या. या कॉम्पिटिशनमधल्या प्रत्येक मॅचच्या वेळी आपल्या खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी आमच्या हॉस्टेलमधून मुलांच्या झुंडी त्या ग्राउंडवर जाऊन पोचायच्या. आर्ट्स अँड सायन्स कॉलेजबरोबर सामना असेल तर त्यांच्या बाजूने मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी मुलीही यायच्या हे एक अॅडेड अट्रॅक्शन असायचे. प्रत्येक चौकार, षट्कार किंवा विरुध्द संघाची विकेट यावर टाळ्या, शिट्या, आरडाओरड, नाच वगैरे मनसोक्त धांगडधिंगा घालण्याची चढाओढ चालत असे. मैदानात आमचा संघ जिंकायचाच, प्रेक्षकांमधल्या धांगडधिंग्याच्या सामन्यातसुध्दा आमचाच आवाज वरचढ असायचा. क्रिकेटमुळे कशी धुंदी चढते हे मी त्या काळात अनुभवले. तसेच प्रत्यक्ष क्रीजवर बॅट आणि बॉल यांच्या दरम्यान नेमके काय घडत असते हे दुरून पाहणाऱ्या प्रेक्षकांना नीट दिसतसुध्दा नाही हेही समजले. हजारो रुपयांची तिकीटे काढून मॅच पहायला स्टेडियमवर गर्दी करणाऱ्यांची मला धन्य वाटते. त्यापेक्षा घरबसल्या टीव्हीवर मॅच पहात असतांना क्लोज अप व्ह्यूमध्ये जास्त चांगले दाखवले जाते. आता तर अॅक्शन रिप्लेमधून ते व्यवस्थित दिसते. स्टेडियममधले प्रेक्षकही ते मोबाईल फोनवर पाहू शकतात.

शाळेत असतांना कधी कधी आमची टीम आणि इतर मुलांच्या टीममध्ये मॅचेस होत असत. अर्थातच त्यातसुध्दा आम्हीच बनवलेल्या नियमांनुसार क्रिकेट क्रिकेटचा स्वैर खेळ होत असे. माझ्या गणितातल्या कौशल्यामुळे मला काही वेळा अशा सामन्यांमध्ये स्कोअररचे काम मात्र मिळत असे आणि माझ्या समजुतीनुसार झालेल्या धावांची संख्या आणि विकेट्स यांची नोंद ठेऊन मी स्कोअरकार्ड तयार करत असे. एका इंटरकॉलेज क्रिकेट मॅचच्या वेळी मी कुतूहलाने स्कोअररपाशी जाऊन बसलो. माझा एक मित्र सुधीर त्यासाठी एक वही घेऊन आला होता आणि प्रत्येक बॉल पिचवर कुठे पडला, त्याला बॅट्समनने कोणत्या दिशेने टोलवले, किंवा त्या बॉलने बॅट्समनला चकवले, तो चेंडू कुठे अडवला गेला, त्यावर किती धावा मिळाल्या वगैरेंची सचित्र नोंद तो ठेवत होता. आजकाल अशा गोष्टी काँप्यूटरच्या सहाय्याने अॅक्शन रिप्लेमध्ये दाखवल्या जातात, कदाचित त्या रेकॉर्डही केल्या जात असतील, पण पन्नास वर्षांपूर्वी केल्या गेलेल्या अशा तपशीलवार नोंदी पाहून मी चाट पडलो होतो.

कॉलेजला गेल्यानंतर क्रिकेटच्या बाबतीत माझी भूमिका फक्त आणि फक्त प्रेक्षकाचीच राहिली. सामन्यांची संख्या जसजशी वाढत गेली, तसतसा त्यातला माझा इंटरेस्ट कमी कमी होत गेला. अजूनही मी काही वेळा टीव्हीवर हा खेळ पहातो, पण आता त्याची तितकी क्रेझ राहिली नाही. वर्ल्ड कप सारखे सामने मात्र आवर्जून पहातो.

माझ्या मुलांच्या जन्माच्या आधीच आमच्याकडे टीव्ही आला होता आणि ते दोघेही त्यांना समज येण्याच्याही आधीपासून टीव्हीवर भरपूर क्रिकेट पहात होते. अगदी लहान असतांना सुध्दा ते निरनिराळे बोलर, बॅट्समन, फील्डर्स आणि अंपायर यांच्या विशिष्ट लकबी नक्कल करून दाखवत आणि सर्वांना हसवत असत. ते वर्ष दीड वर्षाचे झाले असतांनाच वीतभर लांबीची प्लॅस्टिकची पोकळ बॅट आणि लिंबाएवढा बॉल या वस्तू त्यांच्या खेळण्यांमध्ये जमा झाल्या आणि त्या बॅटने ते बॉलशी ठोकाठोक करायला लागले. पुढे त्या खेळण्यांचे आकार आणि प्रकार बदलत गेले असले तरी बॅटबॉल खेळतच ते लहानाचे मोठे झाले, शाळेत आणि कॉलेजात रेग्युलर क्रिकेट खेळले. ते आता ऑफिसमधल्या सहकाऱ्यांबरोबर खेळत आहेत आणि जिंकून आणलेल्या ट्रॉफीजनी आपल्या दिवाणखान्याची शोभा वाढवत आहेत. ते अगदी लहान असतांना मी घरात किंवा बाहेरच्या पॅसेजमध्ये त्यांच्या बरोबर खेळत होतो, ते थोडे मोठे झाल्यानंतर त्यांच्या मित्रांबरोबर खेळू लागले. शाळा आणि कॉलेजमध्ये सगळ्या नियमांप्रमाणे क्रिकेट खेळत असतांना बिल्डिंगच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत त्यांचे गल्ली क्रिकेटही चालत असे. खेळायला कोणी मित्र नसेल किंवा धो धो पाऊस पडत असेल अशा वेळी ते दोघेच आमच्या एकोणीसाव्या मजल्यावरच्या लिफ्टच्या लॉबीमध्ये खेळायचे. एकाने सरपटत चेंडू टाकायचा आणि दुसऱ्याने तो जमीनीलगतच परत (बॅक टू द बोलर) पाठवायचा. शेजाऱ्याचे दार म्हणजे स्टंप्स, त्याला बॉल लागला की बॅट्समन औट आणि परत केलेला चेंडू बोलरला अडवता आला नाही आणि त्याच्या मागे असलेल्या भिंतीला लागला की एक रन अशा प्रकारचे नियम ते पाळायचे. चुकून बॉल उडाला आणि कठड्यावरून खाली गेला तर मात्र तो मिळायची शक्यता फारच कमी असायची. मग त्या दिवसाचा खेळ बंद.

कधी कधी तर ते डाईस घेऊन काल्पनिक क्रिकेट खेळायचे. जगभरातले उत्तमोत्तम खेळाडू निवडून त्यांचे दोन संच बनवत आणि त्यातल्या एकेकाच्या नावाने डाईस फेकून १, २, ३, ४ किंवा ६ आकडा आला तर तितके रन्स आणि ५ आकडा आला तर औट असे स्कोअर लिहीत असत. हा खेळ एकटासुध्दा खेळू शकतो आणि खेळला जात असे. घरी काँप्यूटर आणल्यानंतर थोड्याच दिवसात क्रिकेट या खेळाची सीडी आली आणि त्यांचे त्यावर व्हर्च्युअल क्रिकेट खेळणे सुरू झाले. काँप्यूटरची क्षमता जसजशी वाढत गेली त्यासोबत या खेळाच्या सॉफ्टवेअरमध्ये अपार सुधारणा होत गेली. अगदी खरेखुरे छायाचित्र वाटेल इतके चांगले खेळाडू आजकाल या खेळामधल्या स्क्रीनवर दिसतात आणि आपण त्यांना आज्ञा देऊ त्यानुसार ते बोलिंग व बॅटिंग करतात. इतकेच नव्हे तर गॅलरीमधले प्रेक्षकसुध्दा टाळ्या वाजवून दाद देतात आणि चीअर गर्ल्स नाचतांना दिसतात. हा एक काँप्यूटर गेम आहे की प्रत्यक्ष होत असलेल्या मॅचचे थेट प्रक्षेपण आहे असा संभ्रम पडावा इतके ते रिअॅलिस्टिक वाटते.

मॅच फिक्सिंगच्या प्रकारांमुळे या खेळात अप्रामाणिकपणा शिरला असला तरी तो एक आकर्षक खेळ आहे आणि आज मनोरंजनाचे एक साधन बनला आहे असा विचार केला तर त्यात भावनात्मक रीत्या गुंतून पडण्याचे (इमोशनली इन्व्हॉल्व्ह होण्याचे) कारण नाही. नाटक सिनेमांमध्ये दाखवले जाणारे सगळेच काल्पनिक असते, त्यांच्या कथांमध्ये आपण सत्य शोधत नाही. आयपीएल हा प्रकार मला तरी यापेक्षा कधीच वेगळा वाटला नाही. त्यातही मुंबई, दिल्ली किंवा चेन्नै या नावाच्या संघांचा त्या गावांशी संबंध नसतो. जगभरातले क्रिकेटर लिलावात विकले जाऊन त्यांच्याकडे येतात आणि भाडोत्री खेळाडू म्हणून खेळतात. त्यामुळे मला त्यातला कुठलाच संघ आपला वाटत नाही आणि एक बाजू आपली नसली तर त्या खेळातल्या कुणाच्या जिंकण्याहरण्याचे आपल्याला काही वाटत नाही. तरी पण बॅट्समनांची अप्रतिम फटकेबाजी आणि फील्डरांनी उड्डाण करून किंवा जमीनीवर सूर मारून घेतलेले झेल यातली कलाकारी पाहण्यासारखी असते.

तर अशा प्रकारे निरनिराळ्या स्वरूपांमध्ये माझ्या जीवनात क्रिकेट आले आणि ते काही त्याने घेऊन ठेवलेला एका कोपऱ्याचा ताबा सोडायला तयार नाही.
. . . . . . . . . (समाप्त)

अशी ही टोलवाटोलवी

आंतर्जालाच्या विकासामधल्या एका टप्प्यावर अनेक मुक्तद्वार संकेतस्थळे स्थापन झाली होती आणि ती अत्यधिक लोकप्रिय झाली होती. त्या काळात मी सुद्धा मनोगत, मिसळपाव, ऐसी अक्षरे यासारख्या काही संकेतस्थळांवर नियमाने हजेरी लावत होतो. तिथे काय काय चालत असे याचे मला जेवढे आकलन झाले होते ते मी एका रूपकाद्वारे या लेखात लिहिले होते. त्या काळात एका पानाच्या किंवा एका ओळीच्या लेखावरसुद्धा पानेच्या पाने चर्चा, वादविवाद, हमरातुमरी किंवा वनअपमॅनशिप चालत असे. आजसुद्धा ही स्थळे जोरात चाललेली असतील. कदाचित त्यांचे स्वरूप पूर्णपणे बदलले असेल, किंवा कदाचित नसेलही. माझ्यासारखे आणखी काही जुने खेळाडू रिटायर झाले असतील आणि त्यांच्या जागी नव्या दमाचे नवे खेळाडू आले असतील, तांत्रिक दृष्ट्या झालेल्या प्रगतीचे प्रतिबिंबही त्यात पडलेले असणारच. पण मी आजकाल तिकडे भेट देत नसल्यामुळे मला त्याची तितकीशी माहिती नाही. पाच वर्षांपूर्वीची परिस्थितिबद्दल लिहिलेला हा एक हलकाफुलका लेख या लेखात कदाचित काही जुन्या खेळाडूंना आवडेल.

अशी ही टोलवाटोलवी

सायबरनगरीतल्या काही मैदानांवर टोलवाटोलवीचा एक अद्भुत खेळ खेळला जात असतो. हा खेळ ‘डे अँड नाइट मॅच’प्रमाणे एका दिवसातले काही तास आणि रात्रीतले काही तास एवढाच वेळ चालत नाही. मैदानाची साफसफाई आणि डागडुजीसाठी एकाद दुसरा दिवस सोडल्यास तो बारा महिने चोवीस तास सतत चालत असतो. यात भाग घेणाऱ्यात मुलामुलींपेक्षा बाप्ये, बाया आणि म्हातारे-कोतारे यांचीच संख्या जास्त असली तरी त्यांचे निरनिराळे गट नसतात, सगळेजण एकत्रच खेळतात. हा खेळ पहायला येणाऱ्यांची संख्या अर्थातच खेळणाऱ्यांच्या काही पटीने तरी जास्त असते.

रात्रंदिवस चालत असलेल्या या खेळात भाग घेणारे सगळेजण आपापल्या सोयीनुसार जमेल तेंव्हा किंवा इच्छा होईल तेंव्हा मैदानावर येऊन, खेळात भाग घेऊन त्यांना हवे तेंव्हा परतही जाऊ शकतात. दिवसा कामावर जाणारे लोक रात्री तिथे येत असतील आणि रात्रपाळीवर काम करणारे दिवसा येत असतील असेच काही नसते. चेंडूफळीचा एकादा मोठा सामना चाललेला असतांना एका कानाने त्याचा वृत्तांत ऐकत नेहमीचे काम करत राहण्याची जुनी आणि थोर परंपरा आपल्याकडे आहे. त्यामुळे काही लोक कामाच्या वेळेतही इथला खेळ पहायला किंवा त्यात भाग घ्यायला आले तर त्यात नवल किंवा काही चुकीचे वाटायला नको. या मैदानांकडे जाण्यात कुंपण, भिंत यासारखा कसलाही अडथळा नसल्यामुळे कोणीही आणि केंव्हाही तिथे जाऊन तिथे चाललेला खेळ अगदी चकटफू पाहू शकतो. खेळ पाहतांना त्याला त्यात आपणही भाग घ्यावा असे वाटले तर तो सरळ मैदानात उतरूही शकतो. पण पहिल्या वेळेला ते करण्याआधी त्याला त्या मैदानाच्या वहीत एक नाव आणि पत्ता लिहून ठेवावा लागतो एवढेच.

सरळ नाकासमोर बघून चालणाऱ्या लोकांना आईवडिलांनी ठेवलेले एकच नाव माहीत असते. त्यांच्या जन्मपत्रिकेपासून ते शाळा, कॉलेज, ऑफीस, सोसायटी वगैरे सगळीकडे त्यांचे तेच नाव असते, रेल्वे किंवा विमानाची तिकीटे काढतांना आणि हॉटेलमध्ये खोली घेतांनासुद्धा ते लोक नेहमी तेच नाव देत असतात. पण काही लोकांना मात्र निरनिराळ्या विश्वांमध्ये निरनिराळी नावे धारण करण्याची हौस असते. कवि, लेखक, नट, दिग्दर्शक वगैरे कलाकारांमध्ये एकादे आकर्षक असे टोपणनाव घेणे पूर्वीपासून प्रचलित आहे. सायबरनगरीतल्या खेळात भाग घेणाऱ्या काही मुलामुलींनासुद्धा या मैदानातल्या विश्वातली त्यांची ओळख वेगळी ठेवायची असते. त्या ठिकाणी त्यांच्यासाठी तशी सोयही करून ठेवलेली आहे. तिथे नाव नोंदवतांना कोणतेही ओळखपत्र (आयडी प्रूफ) द्यायची गरज नसते. फक्त ते नाव आधीच आणखी कोणी घेतलेले नसावे एवढीच साधी अट असते. ‘गौतम बुद्ध’, ‘येशू ख्रिस्त’ किंवा ‘सम्राट अशोक’ यासारख्यांची फारच सुप्रसिद्ध नावे कदाचित तिथे मान्य केली जात नसतील म्हणून माझ्या पाहण्यात आली नाहीत.

या बाबतीतली काही लोकांची कल्पकता अचाट असते. एकादा डेढफुट्या नानू आपले नाव ‘ब्रह्मांडाम्लेटभक्षक’ असे ठेवतो तर कोणी आपले नाव ‘डेव्हिडेशुद्दौलासिंगताथा’ असे सर्वधर्मसमभावसूचक ठेवतो. कोणाला फक्त ‘भै’, ‘ठो’ असे एक अक्षर पुरेसे वाटते, आपले नाव प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, स्वल्पविराम, टिंब वगैरेंमध्ये ठेवावे असे कोणाला वाटते. काही लोकांना त्यांच्या कल्पनाशक्तीला जास्त ताण द्यायचा नसतो. आधी दिलेली नावे ते वाचतात आणि त्यावरून त्यांना ‘काळ्या खवीस’ किंवा ‘म्यूमूढमिता’ अशी नवीन नावे स्फुरतात. “उगाच किती नावे लक्षात ठेवायची?” आणि “कुठल्या जागी आपले कोणते नाव आहे हे आयत्या वेळी आठवले नाही तर घोटाळा व्हायचा!” असा सूज्ञ विचार साधेसुधे बापडे करतात आणि आपले नेहमीच्या वापरातले नाव लिहून मोकळे होतात. त्या वहीत पत्ता लिहितांना ‘अॅड्रेस प्रूफ’ देण्याची गरज नसली तरी दिलेल्या पत्त्यावर एक संदेश पाठवला जातो आणि त्यामधून कळीचा शब्द (पासवर्ड) दिला जातो. यामुळे तिथे जो कोणता पत्ता द्यायचा असेल तो सायबरनगरीतल्या पोस्टमनला सापडायला हवा आणि त्याने तिथे टाकलेले पत्र हातात पडायला हवे एवढीशी काळजी मात्र घ्यावी लागते.

एवढे काम करून झाल्यावर एकदा कोणत्याही मैदानाचा बिल्ला मिळाला की त्या नावाचा मुखवटा चेहेऱ्यावर चढवून केंव्हाही तिथे जाऊन खेळायला मिळते. बहुतेक लोक एकाच किंवा निरनिराळ्या नावांनी सगळीकडचे बिल्ले घेऊन ठेवतात आणि आपल्या मर्जीनुसार त्या मैदानावर चाललेला खेळ पहायला किंवा खेळायला जातात. या खेळाची मुख्य गंमत अशी आहे की यात एकाच वेळी कितीही खेळाडू भाग घेऊ शकतात. पहायला गेल्यास पत्यांमधल्या ‘पेशन्स’प्रमाणे तो खेळ सुद्धा एकट्यानेही खेळता येतो, पण दोन चार भिडू मिळाले तर ते बरे असते, खेळ पहायला येणाऱ्यांना त्याशिवाय त्यात फारशी मजा वाटत नाही. बहुतेक वेळा त्या मैदानावर इतर काही खेळाडू काही तरी खेळत असतात आणि एकादा नवा डाव सुरू झाला की त्यातले काहीजण आपणहून त्या डावात भाग घ्यायला येतात. या खेळात जास्तीत जास्त किती खेळाडूंनी खेळावे यावर कसलेच बंधन नसते. क्रॉस मैदान किंवा आझाद मैदानांसारख्या ठिकाणी एकाच वेळी अनेक ठिकाणी स्टंप्स रोवून खेळाडूंचे निरनिराळे गट आपापसात चेंडूफळीचा खेळ खेळतांना दिसतात. त्याचप्रमाणे सायबरनगरीतल्या या टोलवाटोलवीच्या खेळाचेसुद्धा अनेक डाव प्रत्येक मैदानात एकाच वेळी चाललेले असतात. पण यातली दुसरी गंमत अशी आहे की त्यातला कोणताही खेळाडू त्या मैदानांवर अनेक ठिकाणी चालत असलेल्या निरनिराळ्या डावांमध्येसुद्धा एकाच वेळी खेळू शकतो. एक टोला इकडे तर दुसरा टोला तिकडे, तिसरा तिसरीकडे असे मारू शकतो. इतकेच नव्हे तर यातले काही नामवंत खेळाडू रोजच निरनिराळ्या मैदानांमध्ये जाऊन तिथे चाललेल्या वेगवेगळ्या डावांमध्ये थोडा थोडा वेळ खेळतात. काही खेळाडू मात्र नेहमी विशिष्ट मैदानांवर येत असतात. सायबरनगरीतल्या भाषेत सांगायचे झाल्यास ती मंडळी त्या मैदानांमध्ये ‘पडिक’ असतात.

हा खेळ कशा स्वरूपाचा असतो हे आधी थोडक्यात समजून घेऊ. नवा डाव सुरू करण्यासाठी प्रत्येक खेळाडू एकादा रंगबिरंगी झेंडा, बावटा, चवरी किंवा गुढी यासारखी त्याला जमेल तेवढी सुबक आणि कलात्मक अशी एक वस्तू सोबत घेऊन येतो. ती वस्तू जरा बरी दिसावी यासाठी तिला रंगरंगोटी करून, किनार, गोंडे वगैरे लावून, सजवून धजवून आणलेली असते. पण नेहमी असे होतेच असे नाही. कधीकधी एकादी धुणे वाळत घालायची साधी काठीही आणली जाते. आणलेल्या वस्तूचे वर्गीकरण करता येण्यासाठी तिचे एक दोन शब्दांमध्ये वर्णन करावे लागते. नवा खेळ सुरू करण्यासाठी एक छोटासा अर्ज भरून मैदानाच्या कार्यालयात द्यायचा असतो. त्या अर्जात दिलेल्या काही ठराविक शब्दांमधूनच वर्णनाची निवड करायची असते. त्यातल्या त्यात ज्या शब्दाचा त्या वस्तूशी काही संबंध जोडता येईल असे त्याला वाटले की तो त्यावर टिचकी मारून देतो. हा खेळ कुठे मांडायचा हे त्या शब्दानुसार ठरते. मग मैदानाच्या त्या भागात ती कलाकृती रोवून ठेऊन तो खेळाडू तिच्या शेजारी उभा राहतो.

इतर खेळाडू तिथे येऊन नव्या खेळाडूने ठेवलेल्या वस्तूचे थोडे फार निरीक्षण करतात आणि त्यांना ती आकर्षक वाटली तर तिला बारकाईने पाहतात. कोणाला तिचे कौतुक वाटते, कोणाला आदर वाटतो, कोणाला प्रश्न पडतात, तर कोणाला कींव येते. कोणाला हंसू येते, कोणाला रडू येते आणि कोणाला राग येतो किंवा कोणाला त्याचे काहीच वाटत नाही. पाहणाऱ्याच्या मनात अशा नाना प्रकारच्या भावना येतात. त्यानुसार कोणाला त्या खेळाडूची पाठ थोपटावी असे वाटते, कोणाला त्याच्यापुढे नतमस्तक व्हावेसे वाटते, कोणाला साधे तर कोणाला खोचक प्रश्न विचारासे वाटते किंवा त्याला एक ठेऊन द्यावी असेही कोणाला वाटते. इतर खेळाडूंच्या मनात आलेले हे विचार किंवा भावना प्रकट करण्यामधून हा टोलवाटोलवीचा खेळ सुरू होतो आणि चालत राहतो.

ज्यांना जे वाटते त्यानुसार ते खेळाडू निरनिराळ्या आकारांचे आणि प्रकारचे चेंडू त्या नव्या खेळाडूकडे टोलवतात. एकाद्याला ती वस्तू खूप आवडली तर तो फुलाफुलांची चित्रे काढलेला सुंदर चेंडू अलगदपणे त्याच्याकडे सरकवतो. दुसरा कोणी एकादा मऊ चेंडू मंद वेगाने त्याच्या दिशेने ढकलतो, आणखी कोणी फटकारलेला चेंडू गिरक्या घेत येतो आणि साफ चकवतो, तर कोणाचा एकादा वेगवान आणि कडक चेंडू त्याच्या अंगावर उसळून येतो. कोणी टाकलेल्या क्रेझी बॉलचे काहीच सांगता येत नाही आणि काही मुलांनी त्याच्या दिशेने टोलवलेले चेंडू तर त्याच्या पार डोक्यावरून जातात. तो मुलगाही त्याच्याकडे येणाऱ्या चेंडूंची वाट पहात तयार उभा असतो. तो यातल्या काही चेंडूंना त्याच्या हातातल्या फळीने जमेल तसे टोलवतो. या खेळात सराईत झालेला खेळाडू त्याला वाटल्यास जोरकस टोले हाणून काही प्रतिहल्लेही चढवतो. त्या मुलाच्या दिशेने टोलवलेल्या काही चेंडूंना इतर मुले परस्पर इतरांकडे टोलवतात. यातल्या प्रत्येक कृतीची नोंद ठेवली जाते आणि तितके टोल्यांक त्या खेळाडूच्या नावावर जमा होतात. इतर खेळाडूंनी त्याच्याकडे धाडलेल्या चेंडूचे गुण त्याला मिळतात आणि त्याने मारलेल्या टोल्याचेही मिळतात, तसेच इतरांनी परस्पर टोलवलेल्या चेंडूचे टोल्यांकही त्यालाच मिळतात. कधीकधी असेही घडते की हा खेळ मूळात कुठून सुरू झाला किंवा तो कुणी सुरू केला याला नंतर फारसे महत्व उरत नाही. इतर काही खेळाडू त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला उभे राहतात आणि त्यांचे एकमेकांमध्ये जुंपते. त्या वेळी त्यांच्यात चाललेली टोलवाटोलवी खूप प्रेक्षणीय असते. त्याचाही फायदा त्या मूळ खेळाडूला जास्त अंक मिळण्यात होतो.

या खेळात प्राविण्य संपादन केलेल्या मुलांची टोलवाटोलवी पाहण्यासारखी असते. त्यातल्या एकेकाचे हस्तलाघव, पदलालित्य, मुखावरला आविर्भाव वगैरे नमूनेदार असतात. झपाट्याने चाललेली त्यांची ‘अशी ही टोलवाटोलवी’ पाहतांना प्रेक्षकांना खूप मजा येते. कोणत्याही मैदानात एकाच वेळी आजूबाजूला इतर अनेक डाव चाललेले असतात, त्यातले काही चांगले रंगलेले असतात. इतर मुलांनी त्या मजेदार डावांना सोडून नव्याने आलेल्या मुलाकडे आणि त्याच्या झेंड्याकडे लक्ष देणे हेच बहुतेक वेळा कौतुकाचे असते. त्यामुळे त्याच्या टोलवाटोलवीला दहावीस अंक प्राप्त झाले तरी तो खुष होतो. आपला खेळ खेळत असतांनाच इतर मुलांनी सुरू केलेल्या डावात थोडी टोलवाटोलवी करायची मजाही त्याला घेता येते. हा खेळ पहायला येणाऱ्यांची संख्या मोजली जात असते. त्यात कोणता डाव कितीजणांनी पाहिला याची नोंद होत असते. जास्त टोलवाटोलवी न करतासुद्धा आपण ठेवलेली सुंदर वस्तू किंवा आपला थोडासा खेळ चार लोकांना पहावासा वाटला हे पाहिल्यावर त्याचे एक वेगळे समाधान मिळते.

या अद्भुत खेळातला गडी त्याच्या डावामधून कधीच ‘बाद’ होत नाही. यात कोणाचा त्रिफळा उडत नाही की झेल टिपला जात नाही. क्वचित कधी तो खेळाडू ‘जखमी म्हणून निवृत्त’ (रिटायर्ड हर्ट) होतो, पण बहुतेक वेळी दुसऱ्या कोणी तरी टोलवलेल्या चेंडूमुळे जखमी (हर्ट) झालेल्या मुलाला जास्तच चेव चढतो आणि तो त्वेषाने चौफेर फटकेबाजी करू लागतो. त्याच्या टोल्यांना प्रत्युत्तर मिळत जाते. त्यातून त्याची गुणसंख्या वाढतच जाते. काही वेळाने इतर सगळी मुले कंटाळून दुसरीकडे खेळायला गेल्यावर मात्र त्यालाही तिथे थांबायचे कारण उरत नाही. त्या डावामधून तोही निवृत्त (रिटायर) होतो आणि इतरांच्या डावात टोलवाटोलवी करायला जातो किंवा नवा डाव मांडायच्या तयारीला लागतो.

या खेळात संघ नसले तरी काही अनुभवी मुलांचे गट झालेले असतात, काही वात्रट लोक त्यांना ‘कंपू’ म्हणतात. खरे तर त्यांना सुद्धा अशा गटात सामील होण्याची इच्छा असते, पण ते नाही जमले तर मग ते त्यांच्याबद्दल खंवचटपणे बोलतात. अशा गटातली काही मित्रमंडळी मैदानावर जमल्यावर कोंडाळे करून उभी राहतात. त्यातल्या एकाने एखादी कुठलीही वस्तू आणून ठेवली तरी लगेच दुसरा त्याच्याकडे एक चेंडू टोलवतो, पहिल्याने त्या चेंडूला तिसऱ्याकडे टोलवले तर चौथा त्याला मध्येच अडवून पाचव्याकडे पाठवतो. तेवढ्यात तिसऱ्याने टोलवलेल्या चेंडूला दुसऱ्याने ‘कट्’ (हलकासा स्पर्श) करून चौथ्याकडे धाडलेले असते. अशा प्रकारची अनेक आवर्तने भराभर होत राहतात आणि त्या खेळाडूचे गुण बघता बघता वाढत जाऊन तो शतकवीर होतो. यातली टोलवाटोलवीही सामान्य प्रकारची नसून ती प्रेक्षणीय असते. झपाट्याने चाललेली त्यांची ‘अशी ही टोलवाटोलवी’ पाहतांना प्रेक्षकांना खूप मजा येते. कधीकधी या गटातली मुले दुसऱ्या एकाद्या नवख्या मुलाच्या डावात सामील होतात आणि त्याला बाजूला सारून त्या मुलांची आपापसातली टोलवाटोलवी सुरू होते. हे चालले असतांनाही त्या मुलाची टोलेगुणसंख्या वाढायला लागते आणि आता आपलेही अर्धशतक किंवा शतक झळकणार अशी आशा त्याला वाटायला लागते. पण ती जशी अचानक सुरू होते तशीच जागच्या जागी थांबूनही जाते.

टोलवाटोलवीच्या या अद्भुत खेळाचे काही समान नियम असले तरी प्रत्येक मैदानाचे काही पोटनियम आणि परंपरा असतात. पण त्या खेळावर नियंत्रण ठेवणारे पंच, अंपायर, रेफरी वगैरे कोणी या मैदानावर सदोदित उपस्थित नसतात. जे कोणी असतात ते काही वेळा व्यवस्थापकांच्या कक्षांमध्ये डुलक्या घेत बसलेले असतात. एकाद्या मुलाने कोणताही नियम मोडला असे इतर खेळाडूंना वाटले तर ते आपले मत काळ्या रंगाचा चेंडू फटकारून त्यांच्या टोल्यामधूनच व्यक्त करतात. प्रत्येक मैदानातले काही खेळाडू या विषयातले तज्ज्ञ असतात आणि त्यांचे खेळाकडे बारीक लक्ष असते. ते खेळाडू लाल चेंडू टोलवून इशारा देतात किंवा काळा चेंडू टोलवून निषेध व्यक्त करतात. जरा जास्तच गोंगाट, गलबला वगैरे झाला तर पंच लोकही त्यात लक्ष घालतात. अपवादास्पद परिस्थितीत त्या मुलाला मैदान सोडून जाण्याचा आदेश दिला जाऊ शकतो किंवा त्याने ठेवलेली वस्तू जप्त केली जाऊ शकते. या खेळात कुठल्याही प्रकारचा आणि आकाराचा चेंडू आणला तरी चालत असले तरी कधी कधी एकादा मुलगा सडलेला टोमॅटो किंवा अंडेच चेंडू म्हणून घेऊन आला तर त्यामुळे मैदानाचे वातावरण खराब होते. अशा खेळाडूवर कारवाई केली जाते. पण असे सहसा घडत नाही. कोणाच्या बाबतीत घडलेच तर ते खेळाडू त्या मैदानावर पुन्हा येत नाहीत. पण इतर मैदानांवरचे नियम वेगळे असू शकतात. ते तिथे जाऊन रमतात.

सायबरनगरीतल्या काही मैदानांवर अशी ही टोलवाटोलवी दिवसरात्र चाललेली असते. यात खेळणाऱ्यांना एक वेगळी मजा मिळते तशीच हा खेळ पाहणाऱ्यांनाही.

आपण सारे कोट्याधीश!….. होणार का नाही होणार!

निवडणुकांच्या मोसमात घोषणांमध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे होत असतात त्याचा हा थोडासा उपहास.

मी हा लेख बरोबर दहा वर्षांपूर्वी म्हणजे २००९ साली लिहिला होता. त्या काळात अशी बातमी उडवण्यात आली होती की स्विस बँकांमध्ये १५०० अब्ज डॉलर इतके काळे धन भारतीयांच्या नावाने जमा आहे. या विषयावर सगळ्या माध्यमांवर बराच काथ्या कुटला गेला होता. त्यात बहुतेक लोकांनी त्यांना वाटणारी मनस्वी चीड, सात्विक संताप, टोचणारी खंत, तसेच मत्सर, असूया वगैरे आपल्या मनातील भावनांना वाचा फोडली होती. मात्र कांही मोजके सकारात्मक प्रतिसादसुध्दा आले होते. त्यांतल्या दोन प्रातिनिधिक प्रतिसादांत असे लिहिले होते.
“१.स्वीस बँकेतले हे पैसे काढून सर्व उधाऱ्या (जागतिक बँकेच्या कर्जासहीत) देऊन टाकाव्यात आणि शिल्लक पैशातून, सार्वजनिक सुविधा, बेकारी, इतर सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करावी.”
“२. हा पैसा जर भारतात आणला, समजा जर तो पैसा जनतेमध्ये वाटायचा ठरवला प्रत्येक भारतीयाला तर, सर्वजण लखपती होतील एवढा पैसा आहे हा.”

शेकड्यांनी अब्ज बिब्ज आणि ते सुध्दा डॉलर्स ! (म्हणजे कित्त्त्ती रुपये होतील!) यासारख्या अगडबंब संख्या वाचूनच आपली तर मतीच गुंग होते. पण या चर्चेत भाग घेणाऱ्यांपैकी कोणीही वरील विधानांना मात्र आक्षेप घेतला नाही त्या अर्थी त्यातले आंकडे आणि हिशोब बरोबरच असणार असे समजायला हरकत नसावी. शिवाय भारताच्या एका थोर नेत्याने ही आंकडेवारी जाहीर सभेत सांगून ते पैसे ताबडतोब भारतात परत आणण्याची मागणी केल्याचे वृत्त वाचले. हे सद्गृहस्थ कोणत्याही क्षणी भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी कधीचे सज्ज होऊन बसले आहेत. त्यामुळे ते बेजबाबदार विधाने किंवा अशक्यप्राय मागण्या करणार नाहीत अशी किमान अपेक्षा आहे. पंतप्रधान होताच लगेच याबाबत कारवाई करण्याचे वचनही त्यांनी जाहीरपणे जनतेला दिले. सत्यवचनी प्रभू श्रीरामचंद्र या चांगल्या कार्याला आपले आशीर्वाद देतील, त्यांच्या कृपाप्रसादाने हे नेताजी पंतप्रधानपद भूषवतील आणि दिलेल्या वचनाला जागून या कामासाठी तत्परतेने पाउले उचलतील असे मला त्या वेळी वाटले. त्यानंतर एकदाचा स्विस बँकेतल्या पैशाचा ओघ भारताच्या दिशेने वहायला लागला की एकदम सगळीकडे आबादी आबाद होईल या विचाराने मी हरखून गेलो होतो.

रस्त्यावरल्या दुकानांच्या कांचेच्या खिडक्यांतून दिसणाऱ्या कांही छुटपुट वस्तू कधीपासून मला खिजवत आहेत, पण पैशांअभावी तूर्तास नको म्हणत मी आतापर्यंत त्या घेतल्या नव्हत्या. आता लवकरच आपल्या घरात माणशी रोकड लाखलाख रुपये येणार. ते पैसे आले की एका दमात त्या सगळ्या एकदाच्या घरात आणून टाकता येतील. याबद्दल आश्वस्त झाल्यानंतर “ये दिल माँगे मोअर” या उक्तीप्रमाणे आणखी काय काय मिळू शकते याचे स्वप्नरंजन सुरू झाले. जर स्विस बँकेतले पैसे जप्त करून इकडे आणता येत असतील तर दुबई किंवा मॉरिशससारख्या इतर ठिकाणी दडवलेली संपत्तीसुध्दा ताब्यात घेता येईल. तसे झाले तर आपल्याला किती धनप्राप्ती होऊ शकेल याची आकडेमोड करायला सुरुवात केली. हजारो अब्जावधी, म्हणजे खर्व, निखर्व का काय म्हणतात तसली ही प्रचंड संख्या आपल्याने पेलवली जात नसल्यामुळे बीजगणितातल्या पहिल्या धड्यात शिकल्याप्रमाणे ही संख्या ‘क्ष’ इतकी आहे असे मी समजून घेतले. कोणाला ‘क्ष’ हे जोडाक्षर पसंत नसेल, लिहिता येत नसेल किंवा उच्चार करायला कठीण वाटत असेल तर त्याने ती संख्या (स्वतः नव्हे) ‘ढ’ आहे असे मानले तरी तिच्यात कांही फरक पडत नाही.

जगातल्या कुठल्याही देशातली कुठलीही बँक लोकांनी दिलेले पैसे आपल्याकडे ठेवून घ्यायला नेहमीच तयार असते. ते काम फक्त स्विस बँकांनाच जमते अशातला भाग नाही. अल्बानियापासून झांबियापर्यंत (ए टू झेड्) शेकडो देश या जगात आहेत. कांही माणसे ऊठसूट मॉरिशस, दुबई किंवा सिंगापूरला जात येत असतात म्हणे. सगळ्या पैसेवाल्या लोकांनी स्विस एअरमध्ये जाऊन गर्दी करण्यापेक्षा वेगवेगळ्या दिशांना जाण्याने इतरांपासून आपले तोंड लपवायलाही त्यांना सोयीचे पडत असेल. त्यामुळे स्विट्झरलंडशिवाय जगातल्या इतर देशातील बँकांतसुध्दा त्या लोकांनी बरेचसे पैसे ठेवलेले असण्याची दाट शक्यता वृत्तपत्रातूनच व्यक्त केली जात होती. यासंबंधी निश्चित माहितीच्या अभावी जरी फिप्टीफिफ्टी परसेंट धरले तरी भारतीय कुबेरांची जितकी माया स्विस बँकांत ठेवलेली आहे तितकी तरी इतर सर्व देशांत मिळून आहे असे मानले तर एकंदर ‘२ क्ष’ झाले.

धनवान लोक आपल्याकडचे सगळे पैसे कधीच रोकड्यात ठेवत नाहीत. अनेक प्रकाराने त्याची गुंतवणूक करतात. या लोकांनी सुध्दा परदेशात जमीनी, बागबगीचे, बंगले, हॉटेले, कारखाने, इतर इमारती, मोटारगाड्या, जहाजे, विमाने वगैरे घेऊन ठेवली असतीलच. कांही लोकांनी तर कुठकुठल्या महासागरांमधली अख्खी बेटे विकत घेऊन ठेवली आहेत असे ऐकले. पुन्हा एकदा फिफ्टीफिफ्टीचा फॉर्म्यूला वापरला तर या लोकांची परदेशातली एकंदर मालमत्ता ‘४ क्ष’ इतकी होईल. आज हातात पैसे आले की लगेच ते तिकडे नेऊन ठेवले किंवा कशात गुंतवले असे कोणालाही इतक्या सहजासहजी करता येणार नाही. परदेशाची वारी करण्यासाठी कांही वेळ लागतो आणि खर्च येतोच. त्यासाठी लागणाऱ्या वर्किंग कॅपिटलचा विचार करता या लोकांची परकीय चलनातील संपत्ती ‘५ क्ष’ इतकी असेल असा अंदाज करता येईल.

परदेशात इतकी अपार माया राखून ठेवणारे लोक आपल्या देशातसुध्दा रुबाबानेच राहणार. कांहींच्या घरातल्या मंडळींच्या अंगावर सोने, हिरे, माणके, मोती वगैरे नवरत्नांचे अलंकार असतील, तर कांही लोकांच्या मालकीचे बंगले, राजवाडे, फार्महाउसेस, मॉल्स वगैरे जागोजागी घेऊन ठेवलेले असणार आणि सुंदर व महागड्या हंड्या, झुंबरे, पुतळे, गालिचे वगैरेंनी त्या इमारती सुशोभित केलेल्या असतील. त्याशिवाय जमीनजुमला, बागबगीचे, बड्या कंपन्यांचे शेअर्स, डिबेंचर्स वगैरे असतीलच. पॅन कार्डाची भानगड सुरू झाल्यामुळे त्यांच्या स्वतःच्या नांवाने त्यातल्या सगळ्या गोष्टी नसतील; त्यांचे आप्तेष्ट, विश्वासू नोकरचाकर, कुत्री, मांजरे, पोपट वगैरेंची नांवे रेकॉर्डवर असतील, पण कसल्या ना कसल्या रूपात ही संपत्ती अस्तित्वात असेलच. पुन्हा फिफ्टीफिफ्टीचा फॉर्म्यूला वापरला तर या लोकांची स्वदेशातली संपत्ती धरून एकंदर मालमत्ता ‘१० क्ष’ होईल.

ही फक्त जे स्विस बँकांत खातेधारक आहेत अशा बड्या लोकांची गोष्ट झाली. बक्षिसी, खुषी, चिरीमिरी, वर्गणी, निधी, हप्ता वगैरे मार्गांनी सामान्य माणसांकडून ज्यांना लाभप्राप्ती होते ते सगळे लोक आपली कमाई थेट स्विस बँकांत नेऊन ठेवू शकत नाहीत. त्यातल्या हजारात फार फार तर एकादा कधीतरी एकदा परदेशी जाऊन आला असेल आणि तिथे खाते उघडून त्यात पैसे ठेवणारा तर दशसहस्रेषु एक सुध्दा मिळेल की नाही याची शंका आहे. या लोकांच्या मानाने बड्या लोकांची क्षमता दहा हजारपट आहे असे जरी धरले तरीसुध्दा जेवढी माया त्यांनी जमवली असेल तेवढी तरी या सर्व लहान सहान लोकांकडे मिळून असेलच. म्हणजे पुन्हा फिफ्टीफिफ्टीचा फॉर्म्यूला वापरला तर या सर्व लोकांनी गैरमार्गाने मिळवलेली एकंदर मालमत्ता ‘२० क्ष’ इतकी होईल. म्हणजेच या अवैध मार्गाने मिळवलेल्या धनाच्या हिमनगाचा ‘क्ष’ इतक्या आकाराचा भाग आता स्विस बँकेतल्या ठेवींच्या रूपात पाण्याच्या वर दिसू लागला असला तरी त्याचा अंतर्गत विस्तार ‘२०क्ष’ इतका असावा.

हा सगळा हिशोब पैसे घेणाऱ्या लोकांचा झाला. पण इतका पैसा त्यांना कोणी आणि कशासाठी दिला असेल? याचाही विचार करायला पाहिजे. कोणाही माणसाच्या मनात कधी वैराग्याची किंवा औदार्याची भावना जागृत झाली तर तो आपली जास्तीची संपत्ती गरीब आणि गरजू लोकांना दान करेल. जेंव्हा त्याला स्वतःला भरपूर लाभ होईल किंवा होण्याची खात्री वाटेल तेंव्हाच तो त्यातला कांही भाग त्या कामात सहाय्य करणाऱ्या दुसऱ्या कोणाला तरी खाऊ घालेल. सर्वसामान्य माणसाला शंभर रुपये मिळाले तर खूष होऊन तो त्यातला एकाद दुसरा रुपया बक्षिसी देईल किंवा पाचदहा रुपये कमिशन कुरकुरत देईल. कशाचा तरी गैरफायदा उठवायचा असेल तर त्यातली टक्केवारी वाढून कदाचित वीसपंचवीसावर जात असेल. म्हणजेच जर पैसे घेणाऱ्या लोकांनी अवैध मार्गाने मिळवलेली मालमत्ता ‘२० क्ष’ इतकी असेल तर ते पैसे देणाऱ्या लोकांना त्यातून ‘१०० क्ष’ इतका फायदा मिळाला असणार. ‘क्ष’चा अर्थ माणशी लाख रुपये असेल तर ‘१०० क्ष’ म्हणजे दर डोई कोटी रुपये इतका झाला. याचाच अर्थ आपला देश केवढा श्रीमंत आहे! अर्थातच हे सगळे धन आपल्या अर्थव्यवस्थेतच कुठे तरी असायला हवे, कदाचित असेलही. आपल्या चर्मचक्षूंना ते दिसून येत नाही, पण अर्थशास्त्रज्ञ ते शोधून काढू शकतील.
आता हरिदासाची कथा मूळ पदावर आणतो. आपले संभाव्य पंतप्रधान स्विस बँकेतून ‘क्ष’ इतकी संपत्ती परत आणणार होते. त्यांनी भारतातल्या सर्व जनतेला ते पैसे वाटले तर आपल्याला प्रत्येकी लाख लाख रुपये मिळाले असते. एकदा कां त्या खातेधारकांची नांवे समजली की आणखी एक पाऊल पुढे टाकून त्यांची ‘१० क्ष’ इतकी सारी बेहिशेबी संपत्ती जप्त करून ती जनतेमध्ये वाटली तर प्रत्येकी दहा दहा लक्ष रुपये मिळतील. लांच खाणे हा जसा गुन्हा आहे तसेच ती देणेसुध्दा गुन्हाच आहे. त्यामुळे ती देऊन ज्यांचे उखळ पांढरे झाले असेल त्यांची संपत्तीसुध्दा (‘१०० क्ष’ इतकी) सरकारने ताब्यात घेऊन लांच घेणारे आणि देणारे यांच्यासकट तमाम जनतेला ती सम प्रमाणात वाटली तरी प्रत्येकाच्या वाट्याला एक कोटी रुपये येतील. मग तर सर्वांची मज्जाच मज्जा ! तिथेही सगळे पैसे मिळाले नाहीत आणि फिफ्टीफिफ्टीचा नियम लावला तरी सुध्दा घरटी एक एक कोटी रुपये येतील.

इतका मोठा पांढरा पैसा विनासायास आणि बिनाटेन्शन मिळाला तर अपवादास्पद अशा कांही फार मोठ्या अब्जाधीश व्यक्ती वगळता बहुतेक सर्वसामान्य पैसेखाऊ लोकसुध्दा खूषच होतील आणि कदाचित आपले आचरण सुधारतीलसुध्दा. लांच देऊन कामे करवून घेणारे लोक कांही न देताच त्यांना मिळणाऱ्या लाभाने नक्कीच सुखावणार. इतर सर्वसामान्य लोकांना तर प्रत्यक्ष देवानेच छप्पर फाडून त्यांचेवर खैरात केल्याचा आनंद मिळेल. अशा रीतीने सर्व जनता सुखसागरात डुंबू लागेल. पण एक अडचण येण्याचा धोका मात्र दिसतो. आपले घरकाम, घराची रखवाली, साफसफाई वगैरे करणारे, कोपऱ्यावरले छोटे दुकानदार, भाजीविके, पेपरवाले, दूधवाले, भेळपुरी किंवा वडापाव विकणारे, रिक्शाचालक, बस ड्रायव्हर-कंडक्टर वगैरे वगैरे वगैरे सगळे सर्वसामान्य लोक एकाएकी कोट्याधीश झाले तर ते पोटासाठी कशाला काम करतील? ते कदाचित आपापल्या कामावर येणार नाहीत, ते कोणीच नसतील तर त्यांच्याविना आपली सारी कामे अडतील, आपल्याला खायला प्यायलाही कुठेच काही मिळणार नाही की कुठे जायची यायची सोय नसेल, घरात किंवा घराबाहेर आपल्याला कोणीच विचारणार नाही आणि आपण कोट्याधीश कशाला झालो? असे वाटायला लागेल.

या भीतीमुळे मी कुणालाही माझे गणित सांगितले नव्हते. पण निवडणुका झाल्यावर ते नेताजी सत्तेवर आलेच नाहीत. तो प्रश्नच आपोआप मिटल्यानंतर मी हळूच एका मित्राच्या कानात पुटपुटलो. त्यावर तो लगेच उद्गारला,”अरे तुला आता वेडा म्हणायचं कां खुळा म्हणायचं? (जाऊ द्या, हे नेहमीचेच आहे आणि हा त्याचा प्रॉब्लेम आहे.) तुझ्या त्या नेताजींनी स्विट्झर्लंडमधले पैसे परत आणू असं म्हंटलं असेल, पण ते तुला मला त्यातले लाख लाख रुपये देतो असे कांही म्हणाले होते कां? त्यांनी पैसे आणलेही असते तरी त्याच्या बातमीनेच महागाई तेवढी वाढली असती मात्र आणि त्याच्या झळा आपल्यालाच लागल्या असत्या. म्हणूनच कदाचित लोकांनी त्यांना निवडून आणलं नसेल!”

तळटीपः- या लेखात वर्तवलेले सगळे निव्वळ अंदाज आहेत, त्यामागे कोठलेही शास्त्र नाही. ते ज्या तर्कांच्या आधारावर केले आहेत ती कारणे वर वर पटण्यासारखी वाटली तरी त्यात कांही ढोबळ मूलभूत चुका आहेत. चाणाक्ष वाचक त्या दाखवून देतीलच.
————————
हा लेख मी २००९ साली लिहिला होता. त्यानंतर २०१४च्या निवडणुका झाल्या. तोपर्यंत दर डोई १ लाखाचा आकडाच फुगून चक्क १५ लाखांवर गेला होता आणि माझ्या गणितानुसार तो १५ कोटी झाला होता. त्या वेळी मात्र हा आकडा सांगणारा नेता (आणि त्याचा पक्ष) चक्क निवडणुका जिंकून सत्तेवर आला आणि त्याने आपल्या खाका वर केल्या. पण त्या दिवसापासून विरोधी पक्षाने मात्र १५ लाखांची मागणी धरून ठेवली आहे. या वर्षीच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या हिणवण्याला जास्तच धार आली आहे. शिवाय त्या विरोधकांनी आता दर महिन्याला बारा बारा हजार रुपये देण्याची घोषणाही केली आहे. अशा रीतीनेही लाखाचे बारा हजार होतील असे वाटले नव्हते. पंधरा लाखांची आशा तर सगळ्यांनी कधीच सोडली आहे, पण बारा हजाराच्या गळाला कोण कोण लागणार आहेत हे काळच ठरवेल.

निवडणुका – भाग ३

निवडणुका – भाग १

निवडणुका – भाग २

सुमारे सव्वाशे वर्षापूर्वीच्या हिंदुस्तानातल्या काही उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित लोकांनी १८८५ साली ‘इंडियन नॅशनल काँग्रेस’ या संघटनेची स्थापना केली. त्या काळातल्या इंग्रज सरकारच्या नोकरीतले एक वरिष्ठ अधिकारी अॅलन ऑक्टेव्हियन ह्यूम यांनीच यात पुढाकार घेतला होता. त्या काळातल्या ‘एतद्देशीय मनुष्यांची’ मते ‘कनवाळू’ इंग्रज सरकारला कळावीत आणि सरकारला त्यानुसार त्यांचे कल्याण करता यावे असा ‘उदात्त उद्देश’ त्यामागे होता. यातल्या सदस्यांनी आपापसात चर्चा करावी, काही उपाय किंवा उपक्रम सुचवावेत आणि त्यासाठी मायबाप सरकारकडे अर्ज विनंत्या कराव्यात अशा स्वरूपाचे काम ती संघटना सुरुवातीला करायची. वीस पंचवीस वर्षानंतरच्या काळात त्या संघटनेच्या कामाचे स्वरूप बदलत गेले. ‘लाल, बाल, पाल’ या नावाने ओळखल्या गेलेल्या लाला लाजपतराय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या झुंजार नेत्यांनी त्या संघटनेत प्रवेश केला आणि तिला नवीन दिशा दिली. त्यानंतर काँग्रेसने सरकारला विनंत्या करून न थांबता मागण्या करायला सुरुवात केली आणि अंतर्गत स्वायत्ततेपर्यंत (होमरूल) त्या वाढवत नेल्या. शिवाय या नेत्यांनी सर्वसामान्य जनतेत मिसळून तिचे संघटन करून त्यांच्या मागण्यांसाठी जनतेचा पाठिंबा मिळवायची सुरुवात केली. त्यांच्यानंतर आलेल्या महात्मा गांधी आणि सरदार पटेल, पं.नेहरू, नेताजी सुभाष आदि त्यांच्या अनुयायांनी सत्याग्रह, चळवळी, आंदोलने वगैरेमधून आपल्या कार्याचा विस्तार भारतभराच्या कानाकोपऱ्यात नेऊन पसरवला, त्या वेळच्या काँग्रेसने देशाच्या संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून तिचा पाठपुरावा केलाच, १९४२ साली इंग्रजांना ‘चले जाव’ असे सांगितले. तोपर्यंत या संघटनेचे राजकीय पक्षात रूपांतर झाले होते आणि तिचे लक्षावधी कार्यकर्ते खेडोपाड्यांमध्ये विखुरलेले होते. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या वेळेस काँग्रेस हाच राष्ट्रीय स्तरावर विकसित झालेला एकमेव पक्ष होता. हिंदुमहासभा नावाचा एक पक्ष होता, पण त्याला देशभरातल्या सर्वसामान्य जनतेचा आधार नव्हता.

रशीयामध्ये झालेल्या रक्तरंजित क्रांतीनंतर त्या देशात कम्युनिस्टांची राजवट सुरू झाली आणि जगभरातल्या सर्व शोषित वर्गांनी एक होऊन उठाव करावा आणि सरंजामशाही आणि भांडवलशाहीचे या जगातून पुरते उच्चाटन करावे असे जाहीर आवाहन त्यांनी वेळोवेळी केले. त्या क्रांतिकारी विचारप्रवाहाचे वारे भारतापर्यंत येऊन पोचले आणि कम्युनिस्ट पक्षाचे लहानसे रोपटे इथेही उगवले. त्या रोपट्याला गिरणीकामगारांच्या युनियनमध्ये आणि तेलंगणासारख्या काही भागांमध्ये काही अंकुरही फुटले. काँग्रेसमधल्या काही जहाल समाजवादी विचारसरणी असलेल्या गटांनी बाहेर पडून समाजवादी, प्रजासमाजवादी यासारखे नवे पक्ष स्थापन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीमधून पुढे आलेल्या हिंदुत्ववादी लोकांनी त्यांच्या विचारसरणीवर आधारलेला भारतीय जनसंघ स्थापन केला. १९५१ साली भारतातल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या तेंव्हा अशा प्रकारे काही इतर पक्ष निर्माण झाले होते, पण त्यांचा प्रभाव फारच मर्यादित प्रदेशांमध्ये होता. भारतात विलीन झालेल्या बहुतेक संस्थानांमधल्या प्रजेची भूतपूर्व संस्थानिकांवर निष्ठा होती. त्याचा फायदा घेऊन ते ही एकाद्या पक्षातर्फे किंवा स्वतंत्रपणे निवडणुकीला उभे राहिले आणि निवडून आले. तरीही या सर्वांना मिळून फक्त १२५ जागा जिंकता आल्या आणि ३६४ जागा जिंकून काँग्रेस पक्षाने दणदणीत विजय मिळवला.

यापूर्वीच्या भागांमध्ये लिहिल्याप्रमाणे पं.नेहरूंच्या जीवनकाळात झालेल्या १९५७ आणि १९६२ साली झालेल्या पुढील दोन निवडणुकांमध्ये याचीच जवळजवळ पुनरावृत्ती झाली. इंदिरा गांधी पंतप्रधानपदी आल्यानंतर अनेक जुन्या नेत्यांनी पक्ष सोडला किंवा त्यांनी इंदिराजींनाच पक्षाबाहेर काढले. अशा प्रकारे काँग्रेस पक्षाची विभाजने होत गेली. तोपर्यंत देशातल्या परिस्थितीमध्ये बराच फरक पडला होता. स्वातंत्र्याच्या लढाईत प्रत्यक्ष भाग घेतलेले बहुतेक सगळे पुढारी दिवंगत झाले होते किंवा जर्जरावस्थेत पोचले होते. जुने मतदारही जाऊन पारतंत्र्याचे दिवस न पाहिलेल्या नव्या मतदारांची बहुसंख्या झाली होती. यामुळे स्वातंत्र्ययुद्धातला सहभाग हा महत्वाचा मुद्दा राहिला नव्हता. काँग्रेसमधल्या जुन्या खोडांना वगळले गेले तरी बहुतेक सगळे सक्रिय कार्यकर्ते इंदिराजींच्याच बाजूला राहिले. तरीही या फाटाफुटीचा परिणान होऊन १९६७ सालच्या निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेसच्या खासदारांची संख्या ३००च्या आत आली, पण ती बहुमतासाठी पुरेशी होती. १९७१ सालच्या युद्धानंतर इंदिरा गांधींना मिळालेल्या अफाट लोकप्रियतेमुळे काँग्रेसच्या खासदारांची संख्या पुन्हा पूर्वीसारखी साडेतीनशेवर गेली. आणीबाणीनंतर झालेल्या १९७७च्या निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेस पक्ष अल्पमतात आला खरा, पण तीनच वर्षांनंतर झालेल्या मध्यावधी निवडणुकीत त्याने पुन्हा उसळी मारून ३५० चा आकडा पार केला. १९८४ साली इंदिरा गांधींच्या दुर्दैवी हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने प्रथमच ४०० चा आकडा ओलांडून लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आणि इतर सगळ्या राष्ट्रीय पक्षांचा पुरता धुव्वा उडवला.

त्यानंतर मात्र भारताच्या राजकारणात एक नवे पर्व सुरू झाले. १९८९ ते २००९ च्या दरम्यानच्या वीस वर्षांमध्ये पाचच्या ऐवजी सात सार्वत्रिक निवडणुका झाल्या, पण त्यातल्या एकाही निवणुकीत कोणत्याच पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेच नाही. दर वेळी इतर पक्षांचे सहाय्य घेऊन मंत्रीमंडळे बनवली गेली आणि त्यातली काही थोडे दिवसच चालली. या काळात सात पंतप्रधान झाले, त्यातल्या नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहनसिंग या तीघांनी पाच वर्षाचा कालावधी पूर्ण केला, पण अटलजींचेसुद्धा पहिले मंत्रीमंडळ १३ दिवसातच गडगडले होते. विश्वनाथप्रतापसिंह, चंद्रशेखर, देवेगौडा आणि आय. के. गुजराल या इतर चौघाचा कारभार प्रत्येकी एक वर्षसुद्धा टिकला नाही. ज्यांनी पाच वर्षे पूर्ण केली त्यांची सरकारेदेखील इतर पक्षांच्या पाठिंब्यावर त्यांच्या सहाय्यानेच चालवलेली असल्यामुळे त्यांच्या डोक्यावर सतत एक अस्थिरतेची टांगती तलवार असायचीच. वरील चौघे आणि त्यापूर्वी पंतप्रधान झालेले मोरारजीभाई देसाई व चरणसिंह हे सगळे पूर्वीच्या काँग्रेसमधूनच फुटून बाहेर पडलेले होते. याचा अर्थ असा की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर २०१४ या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत अटलबिहारी वाजपेयी वगळता इतर सगळे पंतप्रधान आजी किंवा माजी काँग्रेसमनच होते.

१९८९ पासून सलग पंचवीस वर्षे कोणत्याही एका पक्षाला लोकसभेत बहुमत मिळालेले नव्हते. त्यामुळे बहुपक्षी राज्यकारभार चालला होता. पण वेगवेगळ्या पक्षांनी एकत्र येऊन काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीए (युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स) या नावाची आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली एनडीए (नॅशनल डेमॉक्रॅटिक अलायन्स) ही अशा साधारणपणे तुल्यबळ अशा दोन आघाड्या तयार झाल्या होत्या. यातल्या काही घटकपक्षांची संख्या आणि नावे बदलत गेली. पण त्याने लक्षणीय असा फरक पडला नाही. यांच्याशिवाय सगळ्या डाव्या पक्षांनी एकत्र येऊन तिसरी आघाडी करण्याचे प्रयत्नही अनेक वेळा केले गेले, त्यांना फारसे यश कधीच मिळाले नाही. २०१४ च्या निवडणुकी अशा परिस्थितीत झाल्या.
——-

त्यापूर्वी २००८ साली अमेरिकेत झालेली निवडणूक ऐतिहासिक ठरली होती. त्या निवडणुकीत पहिल्यांदाच बरॅक ओबामा हा सावळ्या वर्णाचा माणूस अमेरिकेचा अध्यक्ष म्हणून निवडून आला. त्या निवडणुकीच्या काळात मी अमेरिकेत होतो. त्या काळातली तिथली परिस्थिती मला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. ती अर्थातच भारतातल्या त्यापूर्वी पाहिलेल्या कोणत्याही निवडणुकीपेक्षा बरीच वेगळी होती.

अमेरिकेच्या अध्यक्षांच्या निवडणुकीची चक्रे वर्षभर आधी फिरू लागतात. रिपब्लिकन आणि डेमॉक्रॅटिक या दोन्ही मुख्य पक्षातर्फे ही निवडणूक कुणी लढवायची हे ठरवण्यासाठी प्राथमिक फेऱ्या (प्रायमरीज) सुरू होतात. डेमॉक्रॅटिक पक्षामधल्या काही लोकांची नावे आधी समोर आली, त्यातली बरीचशी वगळून अखेर बरॅक ओबामा आणि हिलरी क्लिंटन ही दोन नावे शिल्लक राहिल्यानंतर त्यातून एक निवडण्यासाठी प्रत्येक राज्यात पक्षांतर्गत डेलेगेट्समधून निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुका सार्वत्रिक निवडणुकांप्रमाणे एकाच दिवशी होत नाहीत. एकेका राज्याचे निकाल जसे जाहीर होत होते तशी परिस्थिती बदलत होती. आज हिलरी क्लिंटन पुढे आहेत तर दुसरे दिवशी लागलेल्या निकालांनुसार बरॅक ओबामा पुढे गेले आहेत असा सस्पेन्स काही दिवस चालल्यानंतर हिलरी क्लिंटन यांनी त्याचा रागरंग पाहिला आणि या शर्यतीमधून माघार घेऊन ओबामांना आपला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मात्र त्या अंतर्गत चुरस बाजूला ठेऊन ओबामांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्याही राहिल्या. रिपब्लिकन पक्षातर्फे विशेष चर्चा न होताच जॉन मॅकेन यांची उमेदवारी जाहीर झाली.

मी अमेरिकेत पोचलो तोपर्यंत निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली होती. मी अधून मधून पर्यटन करण्यासाठी इकडे तिकडे हिडूनही आलो, पण मोठमोठी छायाचित्रे असलेले फ्लॅक्सचे अवाढव्य फलक मला कुठल्याच गावातल्या रस्त्यात कोठेही लावलेले दिसले नाहीत आणि ध्वनिवर्धकांचा कर्कश गोंगाटही कुठेही ऐकू आला नाही. अल्फारेटाच्या मी रहात असलेल्या भागात तरी कधीच कोणाची जंगी मिरवणूक निघाली नाही की मोठी जाहीर सभा झाली नाही. न्यूयॉर्क आणि शिकागोसारख्या महानगरांमध्ये काही ठिकाणी मोठ्या सभा होत असत आणि त्याचे वृत्तांत टी.व्ही.वर दाखवत होते. टी.व्हीवरील कांही चॅनेल्सवर मात्र निवडणुकीनिमित्य सतत कांही ना कार्यक्रम चाललेले असायचे. त्या वेळी प्रचाराचा सर्वाधिक भर बहुधा टी.व्ही.वरच होता. ओबामा आणि सिनेटर मॅकेन यांच्या वेगवेगळ्या तसेच अमोरासमोर बसून घेतलेल्या मुलाखतीसुध्दा झाल्या. २००८ साली फेसबुक किंवा ट्विटर यासारखी माध्यमे अजून अवतरली नव्हती.

प्रेसिडेंट बुश यांच्या कारकीर्दीत अमेरिका गंभीर आर्थिक संकटात सापडली होती असा सर्वसामान्य जनतेचा समज झाला होता. पण त्याचे मोठे भांडवल करण्याचा मोह ओबामा टाळायचे. “प्राप्त परिस्थितीतून बाहेर येऊन पुन्हा आपले गतवैभव प्राप्त करण्याची अमेरिकन जनतेला गरज आहे आणि आपण सर्वांनी मिळून ते काम करायचे आहे.” असे सकारात्मक प्रतिपादन ते करायचे. मॅकेन यांनी मात्र ओबामांच्या भाषणावर आसूड ओढण्याचेच काम मुख्यतः केले. त्यांच्या भाषणातही सारखे ओबामा यांचेच उल्लेख यायचे. ओबामा हे मिश्र वंशाचे आहेत याचा जेवढा गवगवा प्रसारमाध्यमांनी केला तेवढाच त्याचा अनुल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. “मी सर्व अमेरिकन जनतेचा प्रतिनिधी आहे.” असेच ते नेहमी सांगत आले. त्यांनी विचारपूर्वक घेतलेल्या या धोरणाचा त्यांना चांगला फायदा झाला असणार. एकजात सर्व गौरेतरांचा भरघोस पाठिंबा त्यांना मिळालाच, पण तत्कालिन आर्थिक परिस्थितीमुळे असंतुष्ट असलेले बहुसंख्य गौरवर्णीयही मोठ्या प्रमाणात त्यांच्या बाजूला आल्यामुळे ते प्रचंड बहुमताने निवडून आले.

अमेरिकेतल्या या निवडणुकीत आणि २०१४ साली झालेल्या भारतातल्या लोकसभेच्या निवडणुकीत बरेच साम्य दिसल्यामुळे मला त्या सारख्या आठवत होत्या. अमेरिकेत जसा ओबामा यांना आधी त्यांच्या पक्षामधूनच तीव्र विरोध होत होता तसाच भारतात नरेन्द्र मोदी यांनासुद्धा झाला. ओबामांनी अत्यंत शांतपणे आणि मुत्सद्देगिरीने त्या अंतर्गत विरोधावर मात केली आणि इतर प्रतिस्पर्ध्यांना बाजूला सारले तसेच काम मोदींनीही केले. भारताच्या भावी पंतप्रधानाचे नाव निवडणुकीच्या आधीपासून जाहीरपणे सांगण्याची आवश्यकता नसते. तरीसुद्धा या वेळेस भारतीय जनता पक्षाने निवडणूक जिंकली तर नरेन्द्र मोदीच पंतप्रधान होतील असे त्यांनी सर्वांकडून वदवून घेतले. बुश यांच्या राजवटीवर बहुतेक अमेरिकन जनता असंतुष्ट होती, ती काही प्रमाणात चिडलेली होती, त्याचप्रमाणे भारतातली बरीचशी जनता मनमोहनसिंगांच्या सरकारच्या कारभारावर वैतागली होती. अमेरिकेत थेट राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होत असल्यामुळे ती नेहमीच व्यक्तीकेंद्रित होत असते, भारतातल्या निवडणुकांमध्ये आधी एका पक्षाला निवडून द्यायचे असे ठरलेले असले तरी पं.नेहरू आणि इंदिरा गांधींच्या काळातच त्या व्यक्तीकेंद्रित झालेल्या होत्या. त्यानंतर २०१४ साली भारतीय जनता पक्षाने केलेल्या प्रचारात त्या पक्षाऐवजी नरेंद्र मोदी यांच्या नावावरच अधिक भर दिला गेला. “अबकी बार मोदी सरकार” हा त्यातला मुख्य नारा होता. ओबामा यांच्याप्रमाणेच नरेन्द्र मोदीसुद्धा फर्डे वक्ते आणि अत्यंत संभाषणचतुर आहेत. टी व्ही वरील संवादांमध्ये ओबामांच्या पुढे मॅकेन फिके पडत होते, मोदींच्या विरोधात काँग्रेसचा चेहेरा म्हणून उभे केले गेलेले राहुल गांधी तर या बाबतीत फारच तोकडे पडत होते. ओबामांनी झंझावाती दौरे करून जास्तीत जास्त अमेरिकन मतदारांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर मोहनास्त्र टाकून त्यांना आपल्या बाजूला ओढून घेतले. नरेंद्र मोदींनी ओबामांपेक्षाही जास्त प्रभावीपणे या अस्त्राचा यशस्वी वापर केला.

पोस्टर्स, मिरवणुका, सभा, घरोघरी जाऊन प्रचार वगैरे सर्व प्रकारचा प्रचार २०१४ मधल्या भारतातल्या निवडणुकीमध्ये झालाच, विज्ञान आणि तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे त्यात अधिक सुधारणा होऊन जास्त वाढ झाली. पक्षाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, राज्यातले, जिल्ह्यातले, तालुक्यातले प्रमुख, गावातले आणि गल्लीतले म्होरके या सगळ्यांच्या चेहेऱ्यांच्या भाऊगर्दीत कुठे तरी उमेदवाराचा सुहास्य मुखडा दाखवणारे अगडबंब फ्लेक्स सगळ्याच पक्षांतर्फे कोपऱ्याकोपऱ्यांवर लावले गेले होते. ते एकसारखेच दिसत होते. त्यांच्यात काही फरक आहे असे निरखून पाहिल्याशिवाय जाणवत नव्हते. कोणत्याही उमेदवाराच्या जिंकण्याची खात्री असो, आशा असो किंवा डिपॉझिटसुद्धा राखण्याची शक्यता नसो, त्याचा मुखडा अशा फलकांवरून मतदारांना आवाहन करत असतांना दिसायचा. पण मिरवणुका काढण्यासाठी आणि घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी चार लोकांचे जमणे आवश्यक असल्यामुळे हे काम मात्र मोठे पक्षच करू शकत होते. सहा वर्षांपूर्वी अमेरिकेत पाहिलेल्या टीव्ही वरच्या प्रचाराइतकाच किंवा त्याहून कांकणभर जास्तच प्रचार भारतातल्या टीव्हीवर होत होता, पण त्याची क्वालिटी मात्र जेमतेमच होती. एकादे आकर्षक घोषवाक्य घेऊन ते सतत कानावर आदळत राहण्याचा इतका अतिरेक झाला होता की त्यावरील विडंबनांचे पेव फुटले होते. यावेळी मोठ्या पक्षांनीही त्यांच्या प्रचारासाठी इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला होता. फेसबुक, ट्विटर आणि वॉट्सअॅपवरील संवादांना जगात दुसरा कुठला विषयच नसावा असे वाटत होते. त्या माध्यमांवर कोणीही काहीही लिहू शकतो असा समज असल्यामुळे बेछूट विधाने आणि त्यांवर त्याहून भयानक वादविवावाद यांना ऊत आला होता. सेलफोनवर अनाहूत टेक्स्ट मेसेजेसचा वर्षाव होत होता. अर्थातच या सगळ्यांचा परिणाम निवडणुकांवर झाला असणारच.

वरील दोन्ही निवडणुकांचे निकाल पहाण्याची जबरदस्त उत्सुकता सर्वांच्या मनात होती. आम्ही अमेरिका या परदेशाचे नागरिक नव्हतो आणि तिकडे कोणीही निव़डून आले तरी आम्हाला त्याचे कसले सोयरसुतक असण्याचे काही कारण नव्हते. तरीसुद्धा निवडणूक संपल्यानंतर तिच्या निकालांची वेळ होताच आम्ही टेलिव्हिजनच्या समोर ठाण मांडून बसलो होतो आणि डोळ्याची पापणी लवू न देता त्याच्याकडे पहात आणि कान टवकारून निवेदने ऐकत बसलो होतो. २०१४ सालच्या भारतातल्या निवडणुका तर आमचाच भाग्यविधाता ठरवणार होत्या. सर्वांना त्याबद्दल वाटणारी उत्सुकता अनावर होती. पण इथल्या निवडणुका झाल्यानंतर मतमोजणीसाठी मध्ये कित्येक दिवस वाट पहावी लागली होती या गोष्टीचा राग येत होता. निकालाचा दिवस उजाडल्यावर सगळी कामे कशीबशी आटोपून किंवा न आटोपताच आम्ही टेलिव्हिजनकडे धाव घेतली आणि निरनिराळ्या वाहिन्यांवरून दाखवण्यात येत असलेली तीच तीच दृष्ये दिवसभर पहात आणि तेच तेच बोलणे ऐकत राहिलो. अमेरिकेतल्या निवडणुकींमध्ये ओबामा निवडून येतील असे भविष्य बहुतेक सगळ्या पंडितांनी वर्तवलेले असल्यामुळे त्याची अपेक्षा होतीच, पण त्यांना इतके मोठे मताधिक्य मिळेल असे वाटत नव्हते. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील एनडीए (नॅशनल डेमॉक्रॅटिक अलायन्स) ही आघाडी सर्वाधिक जागा मिळवेल इतका अंदाज होता, पण सत्तेवर असलेल्या काँग्रेस पक्षाची पार वाताहात होईल असे वाटले नव्हते. या निवडणुकीमध्ये एनडीएला भरघोस यश मिळालेच, पण त्याचा घटक असलेल्या भाजपला स्वतःला बहुमत मिळाले हे त्यांचे यश अपेक्षेच्या पलीकडले होते.

पंचवीस वर्षांचा अनिश्चिततेचा काळ उलटल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या देशाला स्थिर सरकार मिळणार आहे यातही एक समाधान होते.

. . . . . . . . . . . . . (समाप्त)