ब्रह्मकुमारींचे रक्षाबंधन

मी हा लेख ३ वर्षांपूर्वी  म्हणजे  २०१४ मध्ये लिहिला होता. 

पूर्वीच्या काळात दक्षिण महाराष्ट्र किंवा उत्तर कर्नाटकाच्या आमच्या प्रदेशात रक्षाबंधनाचा प्रघात नव्हता. माझ्या लहानपणी श्रावणी पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे म्हणत असत. आमच्या गावापासून समुद्रकिनाराही शेकडो मैल दूर असल्यामुळे त्या दिवशी समुद्रावर जाण्याचा प्रश्नच नव्हता. कदाचित दहा पिढ्यांपूर्वी कोकणात राहणारे आमचे पूर्वज समुद्राला नारळ अर्पण करतही असतील, आम्ही फक्त नारळीभात खात असू. समुद्रकिनारा खूप दूर आणि पावसाचे प्रमाणही कमी असल्यामुळे त्या भागात नारळाचे उत्पादन होत नसे. ओले खोबरे हा आमच्या घरातल्या रोजच्या जेवणातला भाग नव्हता, कधी तरी ते खाणे हा थोडासा चैनीचा भाग होता. सणावारी केलेल्या मोदक, करंज्या वगैरेतून थोडेसे खोबरे खायला मिळत असे आणि एकाद्या पूजेसाठी किंवा देवदर्शनाच्या वेळी नारळ फोडला गेला तर चटणी, भाजी, आमटीमध्ये खोबरे घालून त्यांची चंव वाढवली जात असे. त्यामुळे पोटभर नारळीभात म्हणजे एक मेजवानी होती आणि हा योग वर्षातून एकदाच येत असल्याने त्याचे मोठे अप्रूप वाटायचे.

त्या काळात संघात जाणारे माझे शाळेतले मित्र श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी शाखेत जाऊन त्यांच्या झेंड्याला राखी बांधायचे. राष्ट्रध्वज नसल्यामुळे तो कशाचे प्रतीक होता आणि माझे मित्र त्याचे रक्षण करणार म्हणजे ते काय करणार आहेत हे काही त्यातल्या कोणाला सांगता येत नसे. शिवाय झेंडा हा शब्द पुल्लिंगी असल्यामुळे त्याला राखी बांधणारे माझे मित्र त्याच्या बहिणी ठरणार म्हणजे कुणी कुणाचे रक्षण करायचे असा घोळ होत असे. मी त्या मार्गाने गेलो नसल्यामुळे त्याबद्दल जास्त विचार केला नाही.

जुन्या काळातली लोकप्रिय नटी बेबी नंदा हिची प्रमुख भूमिका असलेला छोटी बहन हा सिनेमा तुफान लोकप्रिय झाल्यानंतर “भैया मेरे राखीबंधनको निभाना” हे त्या सिनेमातले गाणे लोकांच्या ओठावर आले आणि उत्तर भारतातल्या या सणाचा अखिल भारतात प्रसार झाला. त्यापूर्वी दक्षिणेत हा सण फारसा कोणी पाळत नव्हते. माझ्या लहानपणी आमच्या गावातल्या बाजारात राख्या मिळतही नसत. विणकाम, भरतकाम वगैरे करण्यासाठी घरात आणलेल्या रेशमाच्या धाग्यांपासून मुलींनी घरच्या घरीच राख्या तयार करून घरातल्या आपल्या भावांच्या मनगटावर त्या बांधायला तेंव्हा नुकतीच सुरुवात झाली होती. त्याची व्याप्ती फार तर गावातल्या अगदी जवळच्या नातेवाईकांपर्यंत होत असे. लग्न करून सासरी गेलेल्या बहिणी माहेरपणासाठी श्रावणात माहेरी आल्या असल्या तरच त्यांचा भावाला राखी बांधायचा कार्यक्रम होत असे.

नोकरीला लागल्यानंतरसुद्धा माझ्या बहिणींबरोबर भाऊबीज हा सण मी दरवर्षी नियमितपणे साजरा करत होतो, पण रक्षाबंधन मात्र अगदी क्वचित प्रसंगीच करून घेतले असेल. आमच्या घरी तशी प्रथाच नव्हती. माझी मुले मात्र त्यांच्या चुलत, मावस, आत्ते, मामे बहिणींकडून दरवर्षी राखी बांधून घ्यायला लागली. ती जन्माला आलेल्या वर्षापासूनच त्यांच्या या बहिणींच्या राख्या पोस्टाने यायला सुरुवात झाली आणि त्यांची संख्या वाढत गेली. हा सण अखिल भारतात साजरा व्हायला सुरुवात झाली असली तरी आमच्या ऑफिसला त्या दिवशी सुटी नसायची. माझे उत्तर भारतीय सहकारी कपाळाला कुंकवाचे उभे पट्टे ओढून आणि मनगटापासून कोपरापर्यंत मोठमोठ्या राख्यांची माळ बांधून ऑफिसात यायचे, काही जण मिठाईचे बॉक्सही आणायचे आणि त्यातल्या मोतीचुराच्या लाडवांचे किंवा बर्फीचे तुकडे आम्हाला वाटायचे. त्या दिवशी मला आपले मनगट ओकेबोके वाटायचे, पण कुणाला तरी बळेबळेच बहीण मानून तिच्याकडून राखी बांधून घ्यावी असे मात्र कधी वाटले नाही.

अशी अनेक वर्षे गेल्यानंतर या वर्षी एका वेगळ्या प्रकारच्या रक्षाबंधन सोहळ्याला हजर राहण्याचा योग आला. आमच्या घरापासून जवळच असलेल्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अशे भारदस्त नाव असलेल्या संस्थेकडून आम्हाला एक आमंत्रण मिळाले. मलाही या संस्थेबद्दल आदरमिश्रित उत्सुकता होतीच, तिच्याबद्दल जेवढे कानावर आले होते ते चांगलेच होते, पण प्रत्यक्षात तिथे जाणे झाले नव्हते. त्यामुळे तिथला रक्षाबंधनाचा कार्यक्रम आकर्षित करत होता. आम्ही दोघेही लवकर स्नान वगैरे करून पावन होऊन जायला निघालो. जिन्याच्या पाय-या उतरून खाली उतरलो तेवढ्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. एरवी आम्ही पुन्हा घरी परत जाऊन गरम गरम चहा पीत बसलो असतो, पण या वेळी आमचा निर्धार पक्का होता. दोन तीन मिनिटांत एक रिक्शा मिळाली आणि आम्ही त्यांच्या आश्रमात जाऊन पोचलो.

हा आश्रम म्हणजे एक सिमेंट काँक्रीटची लहानशी पक्की इमारत आहे. तिथल्या पहिल्या मजल्यावरच्या हॉलमध्ये शंभर दीडशे खुर्च्या मांडून ठेवल्या होत्या, त्या अर्ध्याअधिक भरल्या होत्या. स्टेजवर एका महापुरुषाची तसबीर ठेऊन त्याला पुष्पमाला घातल्या होत्या. तीन चार खुर्च्याही मांडून ठेवल्या होत्या. लाउडस्पीकरवर रक्षाबंधनासंबंधी सुमधुर आणि अर्थपूर्ण अशा गाण्यांच्या रेकॉर्ड्स वाजत होत्या. तिथली एकंदर स्वच्छता आणि टापटीप वाखाणण्यासारखी होती. तिथे आलेली सगळी माणसेही डिसेंट दिसत होती आणि गलका न करता शांतपणे बसून ती गाणी ऐकत होती. कार्यक्रमाची सुरुवात होण्याची वेळ येताच पांढरा शुभ्र गणवेष असल्यासारख्या साड्या नेसलेल्या चार महिला आल्या आणि व्यासपीठावर स्थानापन्न झाल्या. त्यांना सगळे दीदी असे म्हणत होते. सर्वांनी त्यांना आणि त्यांनी सर्वांना अभिवादनाची देवाणघेवाण करून झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रजापिता ब्रह्मकुमारी ही संस्था किंवा संप्रदाय जगातल्या किती देशांमध्ये पसरला आहे आणि त्याची किती ठिकाणी केंद्रे आहेत, त्यांचे विचार, ध्येयधोरणे वगैरेंबद्दल संक्षिप्त माहिती देण्यात आली.

त्यानंतर सर्वात ज्येष्ठ दीदींचे सुरस व्याख्यान झाले. त्यांनी अगदी सोप्या भाषेत धर्माचरण, व्यसनमुक्ती वगैरेंवर भर दिला. या दिवशी संस्थेच्या प्रमुखांच्या वतीने त्या दीदी सर्वांना म्हणजे सर्व उपस्थित स्त्रीपुरुषांना राखी बांधणार होत्या पण त्याच्या आधी सर्वांनी एक फॉर्म भरून द्यायचा होता. त्या दिवसापासून आपण अमूक एक व्यसन सोडणार आहोत असे वचन त्या फॉर्मद्वारे द्यायचे होते. माझ्यासारख्या ज्याला कसलेच व्यसन नव्हते त्यांनी एक दुर्गुण सोडायचा निर्धार करायचा होता. हे काम अधिक कठीण होते की कमी कठीण होते कोण जाणे. सर्वांनी फ़ॉर्म भरून तिथे ठेवलेल्या बॉक्समध्ये टाकला आणि रांगेने पुढे जाऊन दीदींकडून पांढरी शुभ्र राखी बांधून घेतली. निरनिराळा संदेश असलेले एक एक कार्डही त्यांनी प्रत्येकाला दिले, हा परमेश्वराने दिलेला आदेश आहे असे मानून त्याचे पालन करण्याचा यथाशक्ती प्रयत्न करावा असे त्यांनी त्यांच्या प्रवचनात आधीच सांगितले होते. सर्वांनी ते कार्ड शिरोधार्य मानले. माला मिळालेले कार्ड हा आदेश नसून एक अभिप्राय होता. तो कितपत योग्य होता हे मला ओळखणारेच सांगू शकतील. सर्वांना प्रसाद म्हणून अल्पसा फराळ वाटला गेला. तो प्रसाद भक्षण करून आणि एक वेगळा अनुभव घेऊन आम्ही घरी परतलो.

जिवतीचा पट आणि कहाण्या

jivatiPatSmall

संपादन दि.२४-०७-२०२० : जिवतीच्या पटाची माहिती देणारा एक वॉट्सअॅपवर आलेला लेख आणि शुक्रवारच्या कहाण्यांवरील माझाच एक वेगळा लेख या लेखात समाविष्ट केले.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत श्रावण महिन्याला एक खास स्थान आहे. जिवतीचा पट आणि कहाण्या या दोन गोष्टींना हा महिनाभर विशेष महत्व प्राप्त होते. शहरातल्या वातावरणात आता पंचांगातल्या महिन्यांना महत्व राहिले नाही आणि जीवनातले सर्व व्यवहार कॅलेंडरबरहुकूम होत असल्यामुळे ते महिनेच बाजूला पडले आहेत असे चित्र दिसत असले तरी निदान ग्रामीण भागात आणि शहरातल्या कांही घरात अजून श्रावण महिना पाळला जातो. पूर्वी तो सरसकट सगळ्यांच्या घरी पाळला जात असे, आता एका बाजूने त्याचे प्रमाण कमी कमी होत आहे असे असले तरी परदेशात गेलेले मराठी लोकसुध्दा त्यातला कांही भाग पाळतात असेही मी पाहिले आहे.

श्रावण महिना लागताच देव्हा-याच्या बाजूला जिवतीच्या पटाची स्थापना होते. पूर्वी तो साध्या कागदावर काळ्या शाईने छापला जात असे. आता तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे गुळगुळीत कागदावर सुबक आणि रंगीत चित्रे असलेले पट मिळतात. हिरण्यकश्यपूचे पोट फाडत असलेले श्रीनरसिंह, त्यांच्या समोर हात जोडून उभा असलेला बालक प्रह्लाद, कालियामर्दनाचा प्रसंग, अनेक बालगोपालांसह दोन जिवत्या, हत्तीवर आरूढ झालेले बुध आणि वाघावर स्वार झालेले बृहस्पती यांची चित्रे या पटावर काढलेली असतात. त्यासाठी याच देवतांची निवड कोणी आणि कां केली वगैरे प्रश्नांची उत्तरे मला कधी मिळाली नाहीत. परंपरांच्या मुळाशी जाऊन पोचणे कठीण असते. तिथी आणि वार पाहून यातल्या एकेका देवतेची पूजा करावी असा विचार कदाचित असेल, पण बहुतेक सगळे लोक रोजच या सर्व चित्रांना गंध, फूल, हळद, कुंकू वाहतात. पूर्वीच्या काळी वापरलेल्या साध्या कागदावरचे चित्र महिनाभरानंतर ओळखू येत नसे आणि त्याचे विसर्जन केले जात असे. आजकाल कांही लोक हा पट लॅमिनेट करून घेतात आणि श्रावण महिना संपल्यानंतर स्वच्छ पुसून तो उचलून ठेवतात. पुढच्या वर्षी श्रावण आल्यानंतर (त्या वेळी तो सापडला तर) पुन्हा त्याची पूजा करावी अशी योजना असते, ती किती यशस्वी होते ते माहीत नाही.

श्रावण महिन्यात संध्याकाळी कहाण्या वाचण्याचा प्रघात मात्र आता मागे पडत चालला आहे. माझ्या लहानपणी संध्याकाळी दिवेलागणी झाल्यानंतर घरातली सगळी मुले एकत्र बसून शुभंकरोती आणि परवचा म्हणत असत. श्रावण महिन्यात त्यानंतर कहाणीवाचनाचा कार्यक्रम ठरलेला असे. त्या वेळी घरातली कांही मोठी माणसे सुध्दा येऊन बसत आणि श्रवण करत असत. पहिली कहाणी नेहमी गणेशाची असे. “निर्मळ मळं, उदकाचं तळं, तेथे गणेशाची देवळंरावळं” अशी त्याची सुरुवात केल्यानंतर “संपूर्णाला काय करावे, पसापायलीचे पीठ कांडावे, त्याचे अठरा लाडू करावेत, सहा देवाला द्यावेत, सहा ब्राम्हणाला द्यावेत, सहाचे सहकुटुंब भोजन करावे.” वगैरे सूचना असत. पण रोज वाचूनसुध्दा त्यावर कोणी अंमलबजावणी केलेली मात्र कधी माझ्या पाहण्यात आली नाही.

त्यानंकर रोज त्या दिवसानुसार वेगळी कहाणी वाचायची. रविवारी आदित्यराणूबाईची, सोमवारी शंकराची, मंगळवारी मंगळागौरीची, नागपंचमीला नागोबाची वगैरे. या सर्व कहाण्या “आटपाट नगर होते.” पासून सुरू होत आणि “ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफल संपूर्ण ” या वाक्याने संपत. त्यात बहुतेक करून तीन चार शब्दांची लहान लहान वाक्ये असत. आटपाट नगर होते झाल्यानंतर “तिथे एक राजा होता. तो खूप शूर होता. त्याला दोन राण्या होत्या.” किंवा “तिथे एक ब्राम्हण रहायचा, तो खूप गरीब होता.” वगैरे सोप्या वाक्यांमधून ती गोष्ट पुढे सरकत असे. त्याचे वाचन करतांना सुध्दा ते एका विशिष्ट लयीत केले जात असे.

कांही कहाण्यांमधून खूप चांगला आशय मनावर बिंबवला जात असे. उदाहरणार्थ शुक्रवारची कहाणी घेता येईल. एका श्रीमंत भावाची दुर्दैवी बहीण अत्यंत गरीब होती. एकदा त्या भावाने रोज सहस्रभोजन घालायला सुरुवात केली, पण आपल्या बहिणीला जेवणाचे आमंत्रण दिले नाही, तिची दैन्यावस्था पाहून लोक आपल्याला नांवे ठेवतील याची भीती त्याला वाटली. आपल्या मुलांच्या पोटात चार चांगले घास जावेत या उद्देशाने अन्नाला मोताद झालेल्या बहिणीने तिथे जायचे ठरवले. पण निमुटपणे रांगेत जाऊन बसलेल्या आपल्या बहिणीच्या आणि तिच्या मुलांच्या अंगावरले कपडे पाहून त्या निष्ठुर भावाला लाज वाटली आणि तिचा राग आला. तिने तिला पुन्हा न यायला सांगितले, पण मुलांनी मामाकडे जायचा हट्ट धरल्यामुळे झालेला अपमान विसरून ती बहीण दुसरे दिवशी पुन्हा सहस्रभोजनाच्या पंक्तीत जाऊन बसली. भाऊ या वेळी जास्तच डाफरला. तिसरे दिवशी तर त्याने तिला हाताला धरून बाहेर काढले.

पुढे तिच्या कुटुंबाला ऊर्जितावस्था आली. आता मात्र भावाने तिला आग्रहाने आपल्याकडे जेवायला बोलावले. तिच्यासाठी पंचपक्वांनांचा बेत केला. ती जेवायला आल्यावर तिला सन्मानाने पाटावर बसवले. त्या बहिणीने आपला भरजरी शेला, गळ्यातला चंद्रहार, हातातल्या गोठ पाटल्या वगैरे एकेक अलंकार काढून त्या पाटावर ठेवले. मग त्यातल्या एकाला जिलबीचा घास दिला, दुस-याला पुरणाच्या पोळीचा, तिस-याला लाडूचा वगैरे. ती हे काय करते आहे असे भावाने विचारताच त्या मानिनीने उत्तर दिले, “आज तू ज्यांना जेवायला बोलावले आहेस त्यांनाच मी हे जेवण भरवते आहे. माझे जेवण मला सहस्रभोजनाच्या दिवशी मिळाले आहे.” त्या बोलण्याने भावाचे डोळे खाडकन उघडले, त्याने बहिणीची क्षमा मागितली आणि आपल्या वागणुकीत सुधारणा केली.

अशा अनेक बोधप्रद गोष्टी या कहाण्यांमध्ये आहेत. पण आजच्या जीवनात घरातली सारी मंडळी तीन्हीसांजेला घरी परतच नाहीत आणि आल्यानंतर टीव्हीसमोर बसलेली असतात. ते मनोरंजन सोडून त्यांनी जुन्या पुराण्या कहाण्या ऐकाव्यात अशी अपेक्षा धरता येणार नाही.

************

जिवतीच्या प्रतिमेचा भावार्थ

मानवाला अनादी काळापासून घडणाऱ्या घटनांचं कौतुक आणि त्याबद्दल उत्सुकता आहे. याच उत्सुकतेमधून तो नवनवीन आविष्कार आणि गूढ घटना यांबद्दल आदरभाव दाखवत आलेला आहे. या आदराचं रूपांतर त्या अनाकलनीय गूढाचा सत्कार व पूजन करण्यात झालं . यातूनच ते गूढ पिढ्यांपिढ्या पुजले जाऊ लागले . असेच एक गूढ दर पिढ्यांनी पुजलं ते ‘जिवती पूजन’ या रूपात.
कोण हि जिवती? हिच्या पूजनाचा हेतू काय? जिवती प्रतिमेचा नेमका भावार्थ काय? असे बरेच प्रश्न मनात रेंगाळत होते. यासंदर्भात मला जे काही कळलं ते आपल्या पर्यंत पोहोचवण्यासाठी हा लेखन प्रपंच.
आषाढ महिन्याच्या अमावस्येला हे दीपपूजन केलं जातं आणि याच दिवशी जरा-जिवंतिका पूजन सुद्धा करतात. दिवा हे ज्ञानाचं, वृधिंगतेच प्रतीक आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप. तुम्ही एक दिवा उजळा त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता त्यामुळेच याला वंश वृद्धीचं प्रतीक मानतात. या प्रतीकाचं पूजन म्हणजेच आजचं दीपपूजन.
आजची दुसरी पूज्य देवता म्हणजे जिवती. जिवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते. आजपासून संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेच पूजन मातृशक्ती कडून केलं जातं व आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या, वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केलं जाते. यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही. काय रहस्य असेल या प्रतिमा क्रमाचे?

(जिवतीची सर्वत्र पूजा केली जाणारी प्रतिमा. अंतरजालावरून )

जिवती प्रतिमेत नरसिंह, कालियामर्दन करणारा कृष्ण , मुलांना खेळवणाऱ्या जरा- जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध – बृहस्पती(गुरु) यांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पुजलं जाते.

प्रथम भगवान नरसिंहचं का?
भगवान विष्णूंचा चवथा अवतार असलेले नरसिंह, आपल्या बाळ भक्तासाठी प्रगट झाले. हि कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकशिपू पासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षक आणि बाल भक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पुजले जातात.
त्यानंतर येतात कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण-
यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्हीपण श्रावणातील आराध्य दैवते. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन करणारा श्रीकृष्णच का? आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल कि या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असतांना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या- बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, त्याचबरोबर महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळात बागडत असतांना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पुजला जातो.
नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात जसे उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्यादी आणि कालियादमनक कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळतांना येणाऱ्या आपत्ती, पाण्यापासूनचे संकट, सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बचाव करतात. घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात म्हणून जिवती प्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान.

नंतर येतात त्या जरा व जिवंतिका : या यक्ष गणातील देवता. जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते. मगधनरेश बृह्दरथ याला दोन राण्या असतात. दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते. परंतु राजाला पुत्र/ पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतीत असतो. याच सुमारास नगरजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते. राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रगट करतो. ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो. कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा- अर्धा. अशा विचित्र आणि अर्धवट अर्भकांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते. ती दोन्ही अर्भक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोनीही शकलं सांधते. जरा ते सांधलेले अर्भक संध्यासमयास बृह्दरथ राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंघ ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रीत्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मन देतो. त्याच प्रमाणे जरादेवतेचा वार्षिक महोत्सव सुरु करतो, अशी हि जरा देवी. जरेंचीच सखी जिवंतिका. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवते अशा रूपात दाखवतात.

प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध – बृहस्पती..
बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो. तर बृहस्पती (गुरु) वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, अध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते. बुधाचं वाहन हत्ती. हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने, व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरुन लक्षात येते. बृहस्पतीचं वाहन वाघ. हे अहंकाराचा प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो. अहंकार मानवाच्या प्रगतीमध्ये, आध्यात्मिक साधनेत बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या , गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते. म्हणूनच बुध – बृहस्पती यांना सुद्धा जिवती प्रतिमेत स्थान मिळालं.

प्रथम रक्षक देवता, नंतर जन्माबालकेचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा हा जिवती प्रतिमेचा क्रम.
एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जिवती पूजन. जगातील सर्व प्राणिमात्रांच्या उज्वल भविष्याची, रक्षणाची प्रार्थना करून हा लेख प्रपंच थांबवतो……
जरे जीवन्तिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी ।
रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते ।।

वॉट्सअॅपवरून साभार दि. २४-०७-२०२०

श्रावण शुक्रवार कहाण्या

श्रावण महिना सुरू होऊन गेला आहे. घरोघरी देवघरात जिवतीच्या पटाची स्थापना झाली आहे. पुढील महिनाभर त्यांची पूजा केली जाईल. या पटात इतर काही देवांची चित्रे असली तरी जिवतीला सर्वात जास्त महत्व असते, जिवतीच्या नावानेच हा पट ओळखला जातो. जिवती ही मुख्यतः लहान मुलांची जीवनदायिनी देवी अशी तिची प्रतिमा आहे. श्रावण महिन्यामधील दर शुक्रवारी तिची पूजा करून तिला पुरणाचा नैवेद्य दाखवायचा आणि घरामधील सर्व लहान मुलांचे औक्षण करून जिवतीमातेने त्यांचे रक्षण करावे अशी तिला मनोभावे प्रार्थना करायची अशी प्रथा असे.

श्रावण महिन्यात दररोज त्या दिवशीच्या वाराची कहाणी वाचली जात असे. काही लोक अजूनही वाचत असतील. त्या वाराच्या दैवताची आराधना केल्यामुळे तो (किंवा ती) प्रसन्न झाला (किंवा झाली). त्यांची कृपा कोणा भक्तावर झाल्यामुळे त्याला कशाची प्राप्ती झाली याची सुरस गोष्ट त्या कहाणीमध्ये असते. शुक्रवारसाठी दोन कहाण्या आहेत.
एका कहाणीमध्ये एका गरीब स्त्रीला फसवून तिची दायीच तिचे मूल चोरते आणि त्या गावच्या निपुत्रिक राणीला ते नेऊन देते. गरीब बाईच्या पोटी वरवंटाच जन्माला आला असे ती दुष्ट सुईण तिला सांगते. या थापेवर तिचा विश्वास बसत नाही, पण ती काहीच करू शकत नसल्यामुळे नियमितपणे जिवतीची पूजा करत राहते आणि माझा मुलगा जिथे कुठे असेल तिथे तो सुखात आणि सुरक्षित राहू दे अशी प्रार्थना करते. तिचा मुलगा राजपुत्र म्हणून थाटात वाढतो. त्याच्यावर आलेल्या संकटामधून जिवतीच्या कृपेने तो सहीसलामत वाचतो. अखेर एका सार्वजनिक जेवणावळीमध्ये ती स्त्री जेवायला बसलेली असतांना राजपुत्र झालेला तिचा मुलगा पंगतीला पक्वान्न वाढायला येतो. त्याला समोर पाहताच त्या आईला पान्हा फुटतो आणि त्या दुधाचे थेंब त्याच्या ओठावर पडतात. त्या अद्भुत घटनेनंतर त्या राजपुत्राच्या जन्माच्या रहस्याचा खुलासा होऊन तो त्याच्या जन्मदात्या आईला भेटतो.

दुस-या कहाणीमधील बाई दारिद्र्यात रहात असतांना तिचा भाऊ तिचा अपमान करतो. त्याने घातलेल्या गावजेवणासाठी ती आली असतांना तिला पानावरून उठवून माघारी पाठवतो. ती सुध्दा जिवतीची भक्त असते. जिवतीच्या कृपेने त्या कुटुंबाचे वाईट दिवस जाऊन त्यांना समृध्दी प्राप्त होते. त्यानंतर तोच भाऊ त्या बहिणीला सन्मानाने आपल्या घरी जेवायला बोलावतो आणि तिला पाटावर बसवून पंचपक्वांनांनी भरलेले जेवणाचे ताट तिच्यापुढे मांडतो. ती स्वाभिमानी बहीण आपले एक एक अलंकार काढून पाटावर ठेवते आणि ताटामधील पक्वांनांचा एक एक घास त्यांना देते. “हे जेवण तू यांच्यासाठीच मला दिले आहेस, माझे जेवण मी अन्नछत्रात जेवले.” अशी कानउघाडणी केल्यानंतर त्या मतलबी भावाचे डोळे उघडतात.

या दोन्ही कहाण्या मला खूप आवडतात, विशेषतः दुसरी कहाणी. या बहीण भावांच्या गोष्टीत दिव्याच्या अंवसेच्या कहाणीसारख्या इतर कहाण्यांप्रमाणे अचाट चमत्कार नाहीत, बोलणारे पशूपक्षी किंवा निर्जीव पदार्थ यात नाहीत. सगळ्या घटना वास्तवात घडू शकण्यासारख्या आहेत. “आईबापबंधूभगिनी, दारिद्र्यात नसते कोणी।”, त्या वेळी “कुणी कुणाचे नाही।” किंवा “कठीण समय येता कोण कामास येतो।” वगैरे अन्य ऊक्तींमध्ये सांगितलेले जीवनातले कटू सत्य या कहाणीत दाखवले आहे. मोठ्या झालेल्या मुलाला पाहताक्षणी त्याची ओळखदेख नसतांनासुध्दा त्याच्या आईला पान्हा फुटतो एवढा पहिल्या कहाणीमधला अवास्तव भाग सोडला तर चांगल्या आणि वाईट मानवस्वभावांचेच दर्शन त्यात घडते. अर्थातच माणसाने काय करावे आणि काय करू नये याचे मार्गदर्शन या कहाण्यांच्या तात्पर्यामध्ये मिळते.

मराठी मातृदिन, पिठोरी अमावस्या, आईवरील गाणी

motherSon

मातेची महता सांगणारी काही लोकप्रिय गाणी या लेखाच्या खाली दिली आहेत …  संपादन १७-१२-२०१८

————————

सहज कॅलेंडर पहात असतांना दिसले की परवा ५ तारखेला ‘मातृदिन’ आहे. तीन महिन्यापूर्वीच एक ‘मदर्स डे’ येऊन गेला होता. काही मुलांनी त्या दिवशी त्यांच्या मातांना भेटकार्डे पाठवली होती, तर कोणी आपल्या माताश्रींना (मातोश्री हा शब्द आता जुना झाला असावा आणि आता त्याला एक वेगळाच अर्थ येऊन चिकटला आहे.) घेऊन मॉल्समध्ये गेले होते आणि त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीच्या लिपस्टिक्स, क्रीम्स आदि सौंदर्यप्रसाधने त्यांना घेऊन दिली होती, कांही मायाळू आयांनी तिथल्या रेस्तराँमध्ये आपल्या आवडत्या पदार्थांची खादाडी करून घेतली होती.  त्या दिवसाच्या निमित्याने मी ही एक लेख लिहून मातांची महती सांगितली होती. पण त्यानंतर आता लगेच पुन्हा एक ‘मातृदिन’ आला आहे. अर्थातच हा भारतीय किंवा मराठी संस्कृतीतला सण असणार हे उघड होते.

माझ्या आठवणीत तरी मी हा सण साजरा केलेला मला आठवत नव्हता. मी अजून लहान असतो तर हा प्रश्न माझ्या आईला विचारला असता आणि तिने नक्की त्याचे उत्तर दिले असते. सणवार, व्रतेवैकल्ये या बाबतीत माझी आई तर चालता बोलता ज्ञानकोष होती. तिला सगळ्या कहाण्या तोंडपाठ होत्या. तरीसुध्दा दर वर्षी श्रावण महिन्यात रोज संध्याकाळी घरातल्या मुलांना एकत्र बसवून त्या त्या दिवसाची किंवा तिथीची कहाणी मोठ्याने वाचायला ती मुलांना सांगत असे आणि स्वतः शेजारी बसून भक्तीभावाने त्या ऐकत असे. वाचणा-या मुलाने चूक केली तर ती लगेच दाखवूनही देत असे. पण मला तरी कधी ‘मातृदिनाची कहाणी’ वाचल्याचे आठवत नव्हते.  टीव्ही पहातांना त्यातल्या एका मालिकेतल्या आईला पिठोरी अमावास्येचे व्रत करतांना एकदा दाखवले होते. आपल्या मुलांना उदंड आयुष्य लाभो या इच्छेने माता हे व्रत करतात म्हणून याला ‘मातृदिन’ असे म्हणत असावेत एवढे त्यातून समजले. कधी कधी मनोरंजनातूनही ज्ञानात भर पडते असे म्हणतात ते यासाठीच.

आईला विचारण्याची सोय आता उपलब्ध नसल्यामुळे गुगलवर शोध घेऊन पाहिले. मातृदिन आणि पिठोरी अमावास्येसंबंधी त्रोटक माहिती मिळाली. आपण ‘मदर्स डे’ ऐवजी ‘मातृदिन’ का साजरा करू नये? असा प्रश्नसुध्दा एका अनुदिनी लेखकाने विचारला होता. पिठोरी अमावस्येचे व्रत माता आपल्या मुलांसाठी करतात आणि मदर्स डे हा दिवस मुले त्यांच्या मातांसाठी साजरी करतात हा फरक त्याच्या लक्षात आला नसावा. “फादर्स डे आणि मदर्स डे करून जीवंतपणीच आपल्या आईबापांचे कसते दिवस घालता?” असा प्रश्न मकरंद अनासपुरे एका चित्रपटात आपल्या इंग्रजाळलेल्या मित्रांना विचारतो ते ही आठवले.

या मराठी मातृदिनाच्या दिवशी माता पिठोरी अमावस्येचे व्रत करतात. त्या दिवशी दिवसभर उपवास करून संध्याकाळी आठ कलशांवर आठ मातृका (देवीची रूपे) ठेऊन त्यांची आणि चौसष्ठ योगिनींची पूजा करतात आणि आपले सौभाग्य आणि विशेषतः मुलांसाठी आयुरारोग्य, सुखसंपत्ती वगैरे मागून त्यांच्यासाठी प्रार्थना करतात. व्रतासाठी केलेले पक्वान्न म्हणजे बहुधा पु-या डोक्‍यावर घेऊन “कोण अतिथी आहे काय?’ असे विचारतात. एकेक मुलांनी मागून येऊन उत्तर द्यायचे. “मी आहे.” आणि एक पुरी घ्यायची. अखेर आईने त्या सगळ्या मुलांना पक्वान्ने खायला घालायची. पूर्वी पूजेच्या मूर्ती पिठाच्या करीत, सध्या तशी चित्रे मिळतात. या दिवशी नैवेद्यासाठी सगळी पिठाची पक्वान्ने बनवतात म्हणून या दिवसाला “पिठोरी अमावस्या’ असे नाव पडले असणार.

पुराणकाळात एका स्त्रीला दरवर्षी श्रावण अमावास्येला एक मूल होत असे आणि लगेच ते मरून जात असे. त्याच दिवशी तिच्या आजे सास-याचे श्राध्द असे पण श्राध्दाला आलेले भटजी उपाशीच निघून जात असत. असे ओळीवार सात वर्षे झाल्यानंतर त्या स्त्रीच्या सास-याने तिला तिच्या नवजात अर्भकाच्या शवासकट घरातून हाकलून दिले. निराधार होऊन मरण्यासाठी ती बाई अरण्यात जाते. त्या निराश स्त्रीला रानात चौसष्ट योगिनी भेटल्या. तिने त्यांना आपले दुःख सांगितल्यावर “तुझी-मुले जगतील’ असा योगिनींनी वर दिला. त्या वरामुळे त्या स्त्रीचे सर्व मुलगे जिवंत झाले. मग त्या स्त्रीने आपल्या पुत्रांसह घरी जाऊन चौसष्ट योगिनींची पूजा केली. अशी या व्रताची कथा आहे.

ज्ञात असलेली बहुतेक सगळ्या प्रकारची व्रते करणारी माझी आई हे व्रत का करत नव्हती असा विचार माझ्या मनात आला आणि त्याचे उत्तरही मिळाले. ज्यांची मुले जगत नाहीत अशा स्त्रिया पिठोरीचे व्रत करतात. सर्व स्त्रियांनी केलेच पाहिजे असे हे व्रत नाही. ज्यांची संतती जगत नाही, अशाच स्त्रियांनी हे व्रत करावे. आमच्या घरी हा प्रॉब्लेम नसल्यामुळे हे व्रत कधी झाले नाही.

यासंबंधी अधिक माहिती गूगलवर आणि खालील स्थळांवर मिळेल.
http://marathiakanksha.blogspot.com/2010/08/blog-post_18.html
http://zampya.wordpress.com/


मातेचे गुणगान करणारी कांही अजरामर काव्ये मातृदिनानिमित्य देत आहे.

’आई !’ म्हणोनी कोणी । आईस हाक मारी ।
ती हाक येइ कानी । मज होय शोककारी ।।
नोहेच हाक माते । मारी कुणी कुठारी ।
आई कुणा म्हणू मी ? । आई घरी न दारी !।
ही न्यूनता सुखाची । चित्ता सदा विदारी ।
स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी ।।

चारा मुखी पिलांच्या । चिमणी हळूच देई ।
गोठ्यात वासरांना । या चाटतात गाई ।।
वात्सल्य हे पशूंचे । मी रोज रोज पाही ।
पाहून अंतरात्मा । व्याकूळ मात्र होई ।।
वात्सल्य माउलीचे । आम्हा जगात नाही ।
दुर्भाग्य याविना का ? । आम्हास नाही आई ।।

शाळेतुनी घराला । येता धरील पोटी ।
काढून ठेवलेला । घालील घास ओठी ।।
उष्ट्या तशा मुखाच्या । धावेल चुंबना ती ।
कोणी तुझ्याविना गे । का ह्या करील गोष्टी ?
तूझ्याविना न कोणी । लावील सांजवाती ।
सांगेल ना म्हणाया । आम्हा ’शुभं करोति’ ।।

ताईस या कशाची । जाणीव काही नाही ।
त्या सान बालिकेला । समजे न यात काही ।।
पाणी तरारताना । नेत्रात बावरे ही ।
ऐकूनि घे परंतू । ’आम्हास नाहि आई’ ।।
सांगे तसे मुलीना । ’आम्हास नाहि आई’ ।
ते बोल येति कानी । ’आम्हास नाहि आई’ ।।

आई ! तुझ्याच ठायी । सामर्थ्य नंदिनीचे ।
माहेर मंगलाचे । अद्वैत तापसांचे ।।
गांभीर्य सागराचे । औदार्य या धरेचे ।
नेत्रात तेज नाचे । त्या शांत चंद्रिकेचे ।।
वात्सल्य गाढ पोटी । त्या मेघमंडळाचे ।
वात्सल्य या गुणांचे । आई तुझ्यात साचे ।।

गुंफूनि पूर्वजांच्या । मी गाइले गुणाला ।
साऱ्या सभाजनांनी । या वानिले कृतीला ।।
आई ! करावया तू । नाहीस कौतुकाला ।
या न्यूनतेमुळे ही । मज त्याज्य पुष्पमाला ।।
पंचारती जनांची । ना तोषवी मनाला ।
परि जीव बालकाचा । तव कौतुका भुकेला ।।

येशील तू घराला । परतून केधवा गे !
दवडू नको घडीला । ये ये निघून वेगे ।।
हे गुंतले जिवाचे । पायी तुझ्याच धागे ।
कर्तव्य माउलीचे । करण्यास येइ वेगे ।।
रुसणार मी न आता । जरि बोलशील रागे ।
ये रागवावयाही । परि येइ येइ वेगे ।।
कवी – यशवंत
———————————
आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही ।
म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ, आ, ई ।।
मुलांनो शिकणे अ, आई ।।

तीच वाढवी ती सांभाळी ।
ती करी सेवा तीन त्रिकाळी ।
देवानंतर नमवी मस्तक, आईच्या पायी ।।

कौसल्येविण राम न झाला ।
देवकीपोटी कृष्ण जन्मला ।
शिवरायाचे चरित्र घडवी, माय जिजाबाई ।।

नकोस विसरू ऋण आईचे ।
स्वरूप माउली पुण्याईचे ।
थोर पुरुष तू ठरून तियेचा, होई उतराई ।।

कवी – ग. दि. माडगूळकर
————————————
आई तुझी आठवण येते;
सुखद स्मृतींच्या कल्लोळांनी काळीज का जळते ।।

वात्स्ल्याचा कुठें उमाळा, तव हातांचा नसे जिव्हाळा ।
हृदयांचे मम होऊन पाणी, नयनीं दाटून येते ।।

आई तुझ्याविण जगीं एकटा, पोरकाच मज म्हणति करंटा ।
व्यथा मनींची कुणास सांगूं, काळीज तिळतिळ तुटतें ।।

हांक मारितो आई आई, चुके लेकरूं सुन्या दिशाही ।
तव बाळाची हांक माउली, का नच कानीं येते ।।

सुकल्या नयनीं नुरले पाणी, सुकल्या कंठीं उमटे वाणी ।
मुकें पाखरूं पहा मनाचें, जागीं तडफड करतें ।।

नको जीव हा नकोच जगणें, आईवांचुन जीवन मरणें ।
एकदांच मज घेई जवळीं, पुसुनी लोचनें मातें ।।

कवी – बाळ कोल्हटकर

श्रावणी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, ओणम् आणि बलरामजयंती

एकादे पुण्यक्रम चातुर्मासात केले तर वर्षभरातील इतर दिवशी मिळेल त्यापेक्षा अधिक फल मिळते आणि श्रावण महिन्यात ते फल त्याहूनही जास्तपटीने मिळते अशी धारणा आहे. त्यामुळे हा संपूर्ण महिना धार्मिक समजला जातोच, शिवाय पूर्णचंद्राच्या प्रकाशामुळे पावन झालेला पौर्णिमा हा दिवस नेहमीच शुभ मानला जातो. अशा दुहेरी महत्वामुळे श्रावणी पौर्णिमेला दुग्धशर्करायोग म्हणता येईल. देशाच्या निरनिराळ्या भागात या दिवशी उत्सव साजरा केला जात असतो.

माझ्या लहानपणीची आठवण म्हणजे या दिवशी श्रावणी हा एक सार्वजनिक विधी होत असे. या दिवशी यज्ञयाग, मंत्रोच्चार वगैरे करून आणि पंचगव्य प्राशन करून देहाचे व मनाचे शुध्दीकरण करायचे आणि जुने यज्ञोपवीत काढून टाकून नवे परिधान करायचे असे. आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास मौंजीबंधनविधी करून मिळालेल्या पौरोहित्याच्या लायसेन्सचे वर्षभरासाठी रिन्यूअल करून घ्यायचे. मला तरी या लायसेन्सचे महत्वही कधी जाणवले नाही किंवा त्याचा उपयोग करण्याची वेळही आली नाही यामुळे मला हा विधी कधीच आवडला नाही. त्यातला पंचगव्य प्राशन करण्याचा भाग तर कमालीचा तिटकारा आणणारा होता.

त्या काळी संघात जाणारे माझे शाळेतले मित्र नेमाने त्या दिवशी शाखेत जाऊन त्यांच्या झेंड्याला राखी बांधायचे. तो राष्ट्रध्वज नसल्यामुळे तो कशाचे प्रतीक होता आणि माझे मित्र त्याचे रक्षण करणार (की तो झेंडा त्यांचे रक्षण करणार) म्हणजे ते काय करणार आहेत हे काही त्यातल्या कोणाला सांगता येत नसे. बेबी नंदाची प्रमुख भूमिका असलेला छोटी बहन हा सिनेमा लोकप्रिय झाल्यानंतर त्यातले भैया मेरे राखीबंधनको निभाना हे गाणे लोकांच्या ओठावर आले आणि या उत्तर भारतातल्या सणाचा अखिल भारतात प्रसार झाला. त्यापूर्वी दक्षिणेत हा सण फारसा कोणी पाळत नव्हते. माझ्या लहानपणीसुध्दा आमच्या गावातल्या बाजारात राख्या मिळत नसत. विणकाम, भरतकाम वगैरे करण्यासाठी आणलेल्या रेशमाच्या धाग्यांपासून मुलींनी घरच्या घरीच राख्या तयार करून आपल्या भावांच्या मनगटावर त्या बांधायला तेंव्हा नुकतीच सुरुवात झाली होती.

त्या दिवशीच्या जेवणात नारळीभात खायला मिळत असल्यामुळे त्या कारणाने मात्र आम्हा मुलांना श्रावणातली पौर्णिमा अतिशय प्रिय होती. सकाळी पंचगव्य प्राशन केल्याशिवाय जेवणात नारळीभात मिळणार नाही असा धाक दाखवला जात असल्यामुळे आम्ही नारळीभातासाठी तेही करायला तयार होत असू. समुद्रकिनारा खूप दूर आणि पावसाचे प्रमाणही कमी असल्यामुळे नारळाचे उत्पादन त्या भागात होत नसे. ओले खोबरे हा त्या भागातल्या आणि त्या काळातल्या लोकांच्या नेहमीच्या जेवणातला भाग नव्हता, ते खाणे हा थोडासा चैनीचा भाग होता. मोदक, करंज्या वगैरेंमधून कधीतरी खोबरे खायला मिळत असे आणि एकाद्या पूजेसाठी किंवा देवदर्शनाच्या वेळी नारळ फोडला गेला तर चटणी, भाजी, आमटीमध्ये ओले खोबरे घालून त्यांची चंव वाढवली जात असे. त्यामुळे जेवणात पोटभर नारळीभात म्हणजे एक खास मेजवानी होती आणि हा योग वर्षातून एकदाच येत असल्याने त्याचे मोठे अप्रूप वाटायचे.

नारळी पौर्णिमा हा सण कोळीबांधवांमध्ये खूप महत्वाचा असल्याचे मुंबईला आल्यानंतर समजले. मे महिन्याच्या अखेरीस मोसमी वारे वहायला लागतात आणि अंदमान, केरळ, कर्नाटक वगैरे करीत जूनच्या पहिल्या आठवड्याअखेर मान्सून कोकणात येऊन दाखल होतो. त्यावेळी सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यांच्याबरोबर समुद्रही खवळलेला असल्यामुळे मासेमारीसाठी दर्यात उतरणे धोक्याचे असते आणि या काळात मत्स्यव्यवसायाला वार्षिक सुटी दिली जाते. दोन महिन्यात पावसाचा आणि वाऱ्याचा जोर कमी होतो आणि धीट मंडळी मासे पकडण्यासाठी समुद्रात खोलवर जाण्याचे कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायला तयार होतात. त्याआधी नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करून आपले रक्षण करण्याची प्रार्थना करतात. उत्सव म्हंटले की त्यानिमित्य नाचगाणे आणि खाणेपिणे आलेच. या बाबतीत कोळी लोक जास्तच उत्साही असतात.

कोकणाप्रमाणेच भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर दक्षिणेला केरळात राहणारे लोक या काळात ओणम हा त्यांचा सर्वाधिक महत्वाचा सण साजरा करतात. त्या भागातले लोक सौर पंचांगानुसार चालतात. सूर्य कोणत्या राशीत आहे यावरून त्यांच्या महिन्यांची नावे ठेवलेली आहेत. श्रावण किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुमाराला सूर्याचे भ्रमण सिंह राशीमधून होत असल्यामुळे या महिन्याचे नाव चिंगम (सिंहम किंवा सिंघम चा अपभ्रंश) असे आहे. वामनावतारात श्रीविष्णूने ज्या बळीराजाला पाताळात घालवून दिले त्याचे राज्य सध्याच्या केरळ प्रदेशात होते अशी समजूत असल्यामुळे बळीराजा हा त्यांचा महानायक आहे. वामनाची आज्ञा शिरोधार्य मानल्यामुळे प्रसन्न झालेल्या श्रीविष्णूभगवानांनी त्याला अमरत्वाचे वरदान दिले आणि दरवर्षी ओणमच्या दिवसात पृथ्वीतलावर येऊन आपल्या प्रजेला भेटण्याची परवानगीही दिली. हा सण दहा दिवस चालत असल्यामुळे बरेच वेळा तो नारळी पौर्णिमेच्या काळात चाललेला असतो. केरळीय लोक या दिवसात पूजाअर्चा वगैरे करतातच, शिवाय खास रांगोळ्या, खाणेपिणे वगैरे होते, तसेच नौकानयनाच्या स्पर्धा होतात. या बोटरेसेस पहायला आता जगभरातून पर्यटक येऊ लागले आहेत.

गेल्या वर्षी मला एक नवीच माहिती मिळाली. उडीशा (ओरिसा) राज्यात होऊन गेलेल्या चैतन्य महाप्रभू यांनी श्रीकृष्णभक्तीचा इतका प्रसार केला की त्यांनाच श्रीकृष्णाचा अवतार समजले जाते. अलीकडील काळात इस्कॉन ही आंतरराष्ट्रीय संघटना उदयाला आली आणि त्यांनी चैतन्यमहाप्रभूंच्या कृष्णभक्तीच्या कार्याला नवीन चालना दिली. या पंथाच्या लोकांनी जगभरात अनेक ठिकाणी मोठमोठी सुंदर देवळे बांधली आहेत आणि तिथे अनेक प्रकारचे उपक्रम चालले असतात. मागील वर्षी या दिवसात मी पुण्याला असतांना आलेल्या श्रावण पौर्णिमेला इस्कॉनपंथीयांनी सर्व ठिकाणी श्रीबलरामजयंती साजरी केली. पुण्यात झालेल्या अशाच एका समारंभात सहभागी होण्याची संधी मला योगायोगाने मिळाली. एका सभागृहातल्या मंचावर श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या इस्कॉन स्टाइलच्या सुबक मूर्ती मांडून ठेवल्या होत्या. त्यांना वाहण्यासाठी पोते भरून फुले आणली होती आणि आलेल्या प्रत्येक इसमाला सढळ हाताने ओंजळ भरून फुले दिली जात होती. एक एक जण पुढे येऊन ती फुले देवांना अर्पण करून येत होता. काही लहान मुलांनी एकमेकांवर फुले उधळायला सुरुवात केल्यानंतर तो प्रकार थांबवण्याची विनंती घोषणेद्वारे केली गेली. पण पूजाविधी संपल्यानंतर एका महंतानेच येऊन उरलेली बरीचशी फुले तिथे उपस्थित असलेल्या मंडळींच्या डोक्यावर उधळली. त्यानंतर चारपाच महिलांनी एक लांबलचक पडदा देवासमोर आडवा धरून त्याला अदृष्य केले. देवांना छप्पनभोग (५६ प्रकारचे नैवेद्य) देण्याचे काम पडद्याआड चालले होते. देवाचे भोजन भक्तांना दिसू नये यासाठी हे केले होते. त्याच वेळी तिथे आलेल्या मुख्य महंताचे प्रवचन सुरू झाले.

प्रवचनाच्या सुरुवातीला त्याने बलरामावताराची माहिती दिली. एका गोष्टीनुसार भगवान विष्णूच्या रामावतारात त्यांच्या शेषनागाने लक्ष्मणाचा अवतार घेऊन आज्ञाधारक लहान भावाची भूमिका उठवून झाल्यानंतर पुढच्या जन्मात विष्णूचा वडील बंधू व्हायचे ठरवले. त्यानुसार कृष्णावतारात बलराम हे त्याचे ज्येष्ठ बंधू म्हणून जन्माला आले. दुसऱ्या कथेनुसार बलराम आणि कृष्ण हे दोघेही मिळून विष्णूचा आठवा अवतार होते. त्यातला बलराम गोरा तर कृष्ण सावळा, बलराम शक्तीशाली तर कृष्ण बुध्दीमान व विद्वान, बलराम सरळमार्गी तर कृष्ण खट्याळ वगैरे वगैरे एकाच परमेश्वराची दोन रूपे होती. कंसमामा, वसुदेव, देवकी, रोहिणी, नंद, यशोदा वगैरेंची कथा अतीशय त्रोटकपणे सांगून झाल्यानंतर महंत आध्यात्माकडे वळले. अथातो ब्रह्मजिज्ञासा वगैरे ऐकून त्यानंतर मी हळूच काढता पाय घेतला, पण शेजारच्या खोलीत जेवणाची व्यवस्था होती आणि प्रसादभक्षण केल्याशिवाय कोणाला बाहेर जाऊ देत नसल्यामुळे मी पानावर जाऊन बसलो. कढीभात, बटाट्याची भाजी आणि खीर असे साधेच पण रुचकर जेवण होते. भोजन करून परत जातांना सभागृहात डोकावून पाहिले तर फेर धरून हरे रामा हरे कृष्णाचा गजर करीत भक्तमंडळी नाचत होती. त्यात तल्लीन झालेली मंडळी किती काळ त्या तंद्रीत राहिली हे पहायला मी तिथे थांबलो नाही.

नागपंचमी

Kobra snakes

संपादन दि.२१-०७-२०२० – नागपंचमीची गाणी हा वेगळा लेख या लेखात समाविष्ट केला.

जीवशास्त्राच्या (बायॉलॉजीच्या) अभ्यासातून असे दिसते की नाग हा एक थंड रक्ताचा आणि सरपटणारा प्राणी आहे. त्याला हात, पाय, सोंड, शिंगे वगैरे बाह्य अवयव नसतात. दोन दात असले तरी त्यांचा उपयोग अन्नाच्या चर्वणासाठी होत नाही. उंदीर, बेडूक यासारखे लहान प्राणी आणि पक्षी, त्यांची अंडी वगैरे तो न चावताच गिळतो. अजगराचा अपवाद सोडल्यास कोणताच साप माणसाला गिळू शकत नसल्यामुळे माणूस हे नागाचे भक्ष्य असत नाही आणि काहीही खाऊ शकणारे चिनी सोडल्यास इतर माणसेही, विशेषतः भारतीय लोक नागाला खायचा विचारही करत नाहीत. त्यामुळे नाग आणि मनुष्य हे एकमेकांचे नैसर्गिक शत्रू नाहीत. नाग कधीही आपण होऊन माणसाच्या वाटेला जात नाहीत. पण स्वसंरक्षणासाठी नागाकडे अत्यंत जालिम असे विष असते. त्याच्यावर कोणी हल्ला करीत आहे असे त्याला वाटल्यास नाग त्या प्राण्याला दंश करतो आणि बहुधा तो प्राणी मरून जातो. या कारणामुळे माणसे त्याला घाबरून असतात आणि नागाला पाहताच शक्य असल्यास त्याला मारून टाकायचा प्रयत्न करतात. माणसाला नागापासून प्रत्यक्ष कोणताही लाभही मिळत नाही. उपद्रवकारी उंदरांना खाऊन त्यांची संख्या कमी करण्याची मदत तो अप्रत्यक्षरीत्या करत असतो. स्वतः जमीन खणण्याचे कसलेही (नखे, शिंग यासारखे) साधन नागाकडे नसते, पण मुंग्या, उंदीर किंवा खेकड्यांनी केलेली वारुळे आणि बिळे त्याला लपून बसायला सोयीची असल्यामुळे तो त्यात जाऊन राहतो. यावरूनच ‘आयत्या बिळात नागोबा’ ही म्हण पडली आहे.

हिंदू धर्मशास्त्रांमध्ये नागाला फार मोठे स्थान मिळाले आहे. श्रीविष्णू नेहमी शेषनागावर शयन करत असतात, तसेच त्यांच्या अवतारांमध्ये शेषनागसुध्दा अवतार घेऊन त्यांच्यासोबत असतात. अमृतमंथन करण्यासाठी वासुकी या नागाचा दोरीसारखा उपयोग केला होता. त्या मंथनाच्या वेळी निघालेले हालाहल विष शंकराने प्राशन केले आणि त्याची बाधा होऊ नये म्हणून ते गळ्यातच साठवून ठेवले. त्या विषामुळे गळ्याचा रंग निळा झाला म्हणून शंकराला नीळकंठ असे नाव पडले. हालाहलामुळे गळ्याचा अतीशय दाह होत होता तो कमी करण्यासाठी शंकराने गळ्याभोवती एक थंडगार नाग गुंडाळून घेतला. शंकराच्या चित्रात हा नाग दाखवलेला असतो. अशा प्रकारे शैव आणि वैष्णव या दोन्ही पंथांमध्ये नागाला खूप महत्व आहे. अर्जुनाने वनवासात असतांना एका नागकन्येशी विवाह केला होता असाही उल्लेख आहे. या पुराणातल्या रूपककथांमधून निरनिराळे अर्थ शोधण्याचे काम विद्वान लोक करत असतात. सर्वसामान्य माणसे नागाच्या प्रतिमेची देव मानून पूजा करतात आणि प्रत्यक्षात तो समोर आला तर भीतीने त्यांची घाबरगुंडी उडते किंवा ते त्याला मारायला उठतात.

नागाबद्दल अनेक अपसमज प्रचारात आहेत. पुराणातल्या काही गोष्टींमध्ये दाखवल्याप्रमाणे काही इच्छाधारी नाग त्यांना पाहिजे असेल तेंव्हा मनुष्यरूप धारण करतात आणि त्यांचे काम झाल्यावर पुन्हा साप बनतात. नाग आणि नागीण यांची जोडी असते आणि त्यातल्या एकाला कोणी मारले तर दुसरा किंवा दुसरी चवताळून डूख धरून राहते, त्या कृत्याचा बदला घेते. जमीनीत पुरून ठेवलेल्या द्रव्याचे रक्षण एकादा नाग करत असतो वगैरे गोष्टी आजच्या संदर्भातसुध्दा रंगवून सांगितल्या जातात. या समजुतीवर आधारलेले चित्रपट तुफान लोकप्रिय होतात. वस्तुतः नागाला पैशांचा किंवा दागदागीने, सोने चांदी वगैरेंचा काहीही उपयोग नसतो. पण अशा प्रकारच्या अफवांमुळे चोरी करायचा उद्देश मनात बाळगणाऱ्या लोकांवर कदाचित थोडा वचक बसत असेल.

नागांपासून माणसांना वाटणारी भीती थोडी कमी व्हावी, त्याच्याबद्दल द्वेष न वाटता आपलेपणा, आदर वाटावा या उद्देशाने कदाचित नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करण्याचा रिवाज निर्माण केला असावा. पण नाग या वन्य प्राण्याला माणसांच्या पूजाविधीचा अर्थ कळत असेल आणि नागाची पूजा करण्याच्या निमित्याने लोकांनी रानातले एकादे वारूळ गाठले तरी त्यातला नागोबा बाहेर येऊन आपली पूजा करवून घेईल असे मला तरी वाटत नाही. पण लोकांना तर नागपंचमीला जीवंत नागाची पूजा करायची असते. त्यामुळे काही निर्भय (आणि निर्दय) गारुडी लोक नागांना पकडून आणून त्यांना घरोघर फिरवतात आणि पूजेसाठी लोकांनी देऊ केलेले दूध, नैवेद्य आणि दक्षिणा घेऊन जातात. नागाला त्यातले काहीही नको असते. वन्यजीवांचे रक्षण आणि भूतदया यांचा विचार करता आता सरकारने यावर बंदी घातली आहे असे ऐकले आहे. ती अंमलात आणली गेली तर बिचाऱ्या नागांचे होणारे हाल थांबतील. बत्तीस शिराळ्याचे लोक काय करतील कोण जाणे.

नागपंचमीच्यासुध्दा दोन कहाण्या प्रचलित आहेत.

पहिल्या कहाणीमध्ये एका ब्राह्मणाला पांच सुना होत्या. पण नागपंचमीच्या दिवशी कोणी आपल्या आजोळीं, कोणी आपल्या पणजोळी, कोणी माहेरीं, अशा सर्व सुना बाहेर गेल्या असतात. धाकट्या सुनेला माहेरचे कोणीच नव्हते. ब्राह्मणाचा वेष घेऊन एक नाग त्या मुलीला नेण्याकरितां आला आणि तिला आपल्या वारुळांत घेऊन गेला. एके दिवशीं नागाची नागीण बाळंत होऊं लागली, तेव्हां तिने त्या मुलीला हातांत दिवा धरायला सांगितलं. पुढे तिची पिले वळवळ करूं लागली. त्यांना पाहून ही मुलगी भिऊन गेली. तिच्या हातांतला दिवा खालीं पडल्यामुळे पोरांची शेपटे भाजलीं. मनुष्यदेह धारण करून नागाने तिला सासरीं पोचती केली. नागाचीं पोरे मोठीं झाल्यानंतर त्याचा सूड घ्यावा म्हणून ते तिच्या घरीं गेले. तो सुध्दा नागपंचमीचा दिवस होता. पाटावर व भिंतीवर नागांची चित्रे काढून ती मुलगी त्यांची पूजा करत होती. हा सर्व प्रकार पाहून पिलांच्या मनांतला सर्व राग गेला. एक नवरत्नांचा हार तिथे ठेवून ते निघून गेले.

दुसऱ्या कहाणीत शेत नांगरत असतांना एका शेतकऱ्याकडून चुकून एक नागाचे बीळ उध्वस्त केले जाते, त्यात नागाची पिले मरतात. त्याचा बदला घेण्यासाठी नागीण त्या माणसाच्या घरी जाऊन सगळ्यांना दंश करून मारून टाकते. त्याच्या बहिणीला मारण्यासाठी नागीण तिच्या घरी जाते. तिथे ती बहीण नागांची चित्रे काढून त्यांची भक्तीभावाने पूजा करत असतांना पाहून तिचा राग मावळतो, ती त्या मुलीला अमृत आणून देते, ते प्राशन करून तिचे सगळे आप्त जीवंत होतात. नागपंचमीला नागाची पूजा करण्यामुळे नागांचे गैरसमज दूर होतात आणि नंतर सगळे सुखाने राहू लागतात अशा कथा या दोन्ही कहाण्यांमध्ये आहेत. त्या कहाणीमधले नाग मनुष्यवेष धारण करून हिंडत असतात, त्यांची पूजा करणाऱ्यांना मदत करत असतात, त्यांच्याकडे अमृत, नवरत्नांचे हार वगैरे असतात अशा अद्भुत कल्पनांमुळे या कहाण्या सुरस वाटतात.

—————————————————–
यानिमित्य खाली दिलेली पौराणिक माहिती माझे ज्येष्ठ बंधू डॉ.धनंजय घारे यांनी पाठवली आहे.

परीक्षित राजाला तक्षक नाग चावल्याने त्याचा मृत्यू झाला या घटनेने कोपाविष्ट होऊन जन्मेजयाने सर्प यज्ञ केला व लाखो कोट्यावधी सर्पांची हत्या केली ही (सांकेतिक पौराणिक ) गोष्ट अर्धवटपणे खूप प्रसिद्ध झाली आहे. पण
अ) “अशी सर्प हत्या हॊऊन अनेक सापांच्या जाती नष्ट होऊ देत” असा शाप प्रत्यक्ष त्या जातीच्या मूळ आईनेच (कश्यप पत्नी कद्रूनेच ) त्यांना दिलेला होता व
आ) शेवटी तो जन्मेजयाने सुरू केलेला सर्पयज्ञ तक्षकाची हत्या न करताच थांबवला गेला वगैरे अनेक संबंधित माहिती मात्र आजच्या पिढीला दिली जात नाही हे योग्य नाही.

प्राचीन संस्कृत ग्रंथांमधून नव नागांना दैवत मानले जाते. वैकुण्ठात विष्णु शेषावर झोपून असतात व कैलासात शंकर शेषांचे भूषण अंगा-खांद्यावर मिरवतात. गणेश लोकात गजानन सर्पाला पोटावर मौंजीबंधन बांधून मिरवतात. पृथ्वीला अंतरीक्षात (बहुधा स्पायरल गॅलॅक्सीजच्या रूपात – हा माझा अंदाज) शेष नागाच्या फ़ण्याचाच (सांकेतिक) आधार व आसरा आहे. कालिया नागाला श्रीकृष्णाने मारले नाही फक्त स्थलांतरित केले. वसुदेव जेंव्हा बाल वासुदेवाला शिरावर धारण करून जोरदार पावसातून यमुना पार करण्याला निघाला तेंव्हा शेषानेच आपल्या फ़ण्याने त्याच्या डोक्यावर छत्री धरून त्याचे संरक्षण केले. सोमवार व्रत कथेतील सुप्रसिद्ध सीमंतिनीचा नवरा (सुप्रसिद्ध ‘नल’ राजाचा नातू ) चन्द्रांगद जेंव्हा यमुनेत बुडाला तेंव्हा त्याला नाग कन्यांनीच वाचवले व नागांच्या राजानेच त्याला त्याचे गमावलेले राज्य परत मिळवून दिले, इत्यादिक सर्पांच्या बाबतीतील शेकडो पौराणिक कथाही त्यांच्याबद्दल “आदर” व “पूज्य” भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने व पद्धतीने मुलांना सांगायला हव्यात.

सर्व जुन्या (विशेषत: प्राचीन प्रसिद्ध ) देवालयांमधून मुख्य दैवताचे पंचायतन व नव नाग व नव ग्रहांची छोटी देवळे असतात. याशिवाय शहरातूनच नव्हे तर अनंत खेड्या पाड्यातून अनेक वडांच्या व पिंपळांच्या पारावरून नव नागांची छॊटी छॊटी मंदिरे (किंवा नुसत्याच मुर्त्या बसवलेल्या सांपडतात ).

श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील नाग चतुर्थी व नागपंचमीचे दोन दिवस नाग या प्राण्याबद्दल “आदर” व “पूज्य” भावना समाजात रुजवण्यासाठी वार्षिक सण म्हणून पाळले जाण्याची परंपरा आहे. तिचा लाभ घेऊन समाजातील (विशेषत: पुढील पिढीच्या मुला बाळांच्या ) मनांतील सर्प जातीबद्दलची गैर समजूत दूर करून त्यांना आपल्या योग्य परंपरांचे योग्य प्रकारे शिक्षण दिले जायला हवे.

नव नाग स्तोत्र :
अनंतं वासुकी शेषं पद्मनाभं च कम्बलं
शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा ।।१।।

एतानि नव नामानी नागानां च महात्मनां
सायंकाले पठेत् नित्यं प्रात:काले विशेषत:
तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत् ।।२।।

नाग पंचमीला वरील स्तोत्र पठण करून पुरणाची दिण्डी बनवून त्यांचा नैवेद्य नाग दैवताला समर्पण करण्याची प्रथा आहे.


नागपंचमीच्या संबंधित काही पारंपरिक आणि काही आजकालच्या कवींनी लिहिलेली लोकप्रिय गाणी खाली दिली आहेत.

नागपंचमी गाणी

खानदेशातल्या शंभर वर्षांपूर्वीच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी तिकडच्या अहिराणी बोलीत अप्रतिम काव्यरचना केली आहे. “माझी माय सरसोती, माले शिकयते बोली।” असे त्यांनीच स्वतःबद्दल लिहिले आहे. त्यांच्यावर सरस्वतीचा वरदहस्त होता. शालेय शिक्षण घेतले नसले तरी त्यांना सणवार आणि देवदेवतांची खूप माहिती होती. त्यांच्या आयुष्यात घडून गेलेल्या एका नाजुक प्रसंगाचे सुरेख चित्रण त्यांनी खाली दिलेल्या ओव्यांमध्ये केले आहे. बहिणाबाई शेतात काम करायला जात असत. तान्ह्या सोपानदेवांना आंब्याच्या झाडाखाली एका टोपलीत निजवून त्या उसाच्या मळ्यात कामाला लागल्या असतांना एक नाग त्या मुलाच्या जवळ आला. ते पाहून लोकांनी ओरडा केला. बहिणाबाई येऊन पाहते तर लहानगा सोपान टोपलीच्या बाहेर येऊन त्या नागाबरोबर खेळत होता. तिने नागोबाला दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि शंकराची शपथ घालून सोपानदेवाला दंश न करण्याची विनंती केली शिवाय कृष्णाचा धांवा करून सांगितले की आपली बांसुरी वाजवून नागोबाची समजूत घाल. तेवढ्यात गुराख्यांनी वाजवलेले पाव्याचे सूर ऐकून नाग तिकडे निघून गेला. बहिणाबाईने नागोबाचे आभार मानून त्याला नागपंचमीच्या दिवशी दुधाची वाटी देईन असे आश्वासन दिले. ते तिने नक्कीच पाळले असणार.

उचलला हारा, हारखलं मन भारी ।
निजला हार्‍यात, तान्हा माझा शिरीहारी ।।
डोईवर हारा, वाट मयाची धरली ।
भंवयाचा मया, आंब्याखाले उतरली ।।
उतारला हारा, हालकलं माझं मन ।
निजला हार्‍यात, माझा तानका ‘सोपान’ ।।
लागली कामाले, उसामधी धरे बारे ।
उसाच्या पानाचे, हातीपायी लागे चरे ।।
ऐकूं ये आरायी, धांवा धांवा घात झाला ।
अरे, धांवा लव्हकरी, आंब्याखाले नाग आला ।।
तठे धांवत धांवत, आली उभी धांववर ।
काय घडे आवगत, कायजांत चरचर ।।
फना उभारत नाग, व्हता त्याच्यामधीं दंग ।
हारा उपडा पाडूनी, तान्हं खेये नागासंगं ।।
हात जोडते नागोबा, माझं वांचव रे तान्हं ।
अरे, नको देऊं डंख, तुले शंकराची आन ।।
आतां वाजव वाजव, बालकिस्ना तुझा पोवा ।
सांग सांग नागोबाले, माझा आयकरे धांवा ।।
तेवढ्यांत नाल्याकडे, ढोरक्याचा पोवा वाजे ।
त्याच्या सूराच्या रोखानं, नाग गेला वजेवजे ।।
तव्हां आली आंब्याखाले, उचललं तानक्याले ।
फुकीसनी दोन्हीं कान, मुके कितीक घेतले ।।
देव माझा रे नागोबा, नही तान्ह्याले चावला ।
सोता व्हयीसनी तान्हा, माझ्या तान्ह्याशीं खेयला ।।
कधीं भेटशीन तव्हां, व्हतील रे भेटी गांठी ।
येत्या नागपंचमीले, आणीन दुधाची वाटी ।।

ग्रामीण भागातल्या बायका नागपंचमीचा सण वटपौर्णिमेप्रमाणे सार्वजनिक रीत्या साजरा करतात. कोणत्याही मुलीला एकटीने रानात जाऊन नागोबाच्या वारुळापाशी जायला भीती वाटणारच. त्यामुळे सगळ्या सख्या मिळून नागोबाची पूजा करायला जात असतील. कवीवर्य स्व.ग.दि,माडगूळकरांनी या प्रसंगावर एक छान चित्रपटगीत लिहिले आहे. त्यात शेषशायी विष्णूभगवानाच्या शेषाचा उल्लेख आहे. त्याचेच पृथ्वीवरील रूप असलेल्या नागोबाची पूजा करून या मुली त्याच्याकडे मागण्या करतात. कुमारिकांना चांगला नवरा मिळावा, त्यांनी राजाची राणी बनावे आणि सौभाग्यवतींच्या कुंकवाच्या धन्यांना दीर्घायुष्य मिळावे अशा प्रार्थना त्या करतात.

चल ग सखे वारुळाला, वारुळाला, वारुळाला ग ।
नागोबाला पूजायाला, पूजायाला, पूजायाला ग ।।
नागोबाचे अंथरूण निजले वरी नारायण ।
साती फडा ऊभारून धरती धरा सावरून ।
दूध लाह्या वाहू त्याला, वाहू त्याला, नागोबाला ।।
बारा घरच्या बाराजणी, बाराजणी, बाराजणी ।
रूपवंती कुवारिणी, कुवारिणी, कुवारिणी ।
नागोबाची पुजू फणी, कुंकवाचा मागू धनी ।
राजपद मागू त्याला, मागू त्याला, नागोबाला ।।
बाळपण त्याला वाहू, त्याला वाहू, त्याला वाहू ग ।
नागिणीचा रंग घेऊ. रंग घेऊ, रंग घेऊ ग ।
नागोबाला फुलं वाहू, लालमणी माथी लेवू ग ।
औक्ष मागू कुंकवाला, कुंकवाला, बाई कुंकवाला ।।
चल ग सखे वारुळाला, वारुळाला, वारुळाला ।।

स्व. ग. दि. माडगूळकर यांनीच लिहिलेले दुसरे एक सुंदर गीत स्व.गजानन वाटवे यांनी अजरामर केले आहे. एका मुलाखतीमध्ये वाटवे यांनी सांगितले होते की त्यांच्या काळात चांगल्या स्त्रीगायिका होत्या तरीसुध्दा त्यांनीच स्त्रियांची गाणी म्हणावीत आणि पुरुष गायकांनी फक्त पुरुषांचीच गाणी म्हणावी असा लोकांचा आग्रह नव्हता. कवितेमधल्या भावना लोकांपर्यंत पोचवणे एवढे काम स्व. गजानन वाटवे करत होते. मग त्या भावना स्त्रीमनातील असतील तर त्यानुसार त्या कवितेला चाल लावून आणि आवाजात मार्दव आणून ती कविता पुरुषाने सादर केली तरी श्रोते त्या गाण्याला डोक्यावर घेत असत. नागपंचमीच्या सणानिमित्याने जमलेल्या सगळ्या मुली झाडांच्या फांद्यांना झोपाळे बांधून खेळत आहेत, श्रावणमासातल्या आनंदी वातावरणाने सगळे जग उल्हसित झाले आहे, पशूपक्षी, वनस्पती, नदीनाले सगळे सगळे आनंदात आहेत, नायिका तिच्या पतीची आतुरतेने वाट पाहते आहे, पण तो घरी आला नाही म्हणून तिला प्रियाविना उदासवाणे वाटते आहे, तिच्या मनात कुशंकेची पाल चुकचुकते आहे. अशा अर्थाचे हे एक सुंदर विरहगीत आहे.

फांद्यांवरी बांधिले ग मुलिंनि हिंदोळे ।
पंचमिचा सण आला डोळे माझे ओले ।।
श्रावणाच्या शिरव्यांनी, आनंदली धराराणी ।
माझे पण प्राणनाथ घरी नाही आले ।।
जळ भरे पानोपानी, संतोषली वनराणी ।
खळाखळा वाहतात धुंद नदीनाले ।।
पागोळ्या गळतात, बुडबुडे पळतात ।
भिजलेल्या चिमणीचे पंख धन्य झाले ।।
आरशात माझी मला, पाहू बाई किती वेळा ।
वळ्‌चणीची पाल काही भलेबुरे बोले ।।

चातुर्मास

चातुर्मास याचा शब्दशः अर्थ चार महिने. पण चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ किंवा ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अशा कुठल्याही चार महिन्यांच्या काळाला चातुर्मास असे म्हणत नाहीत. आषाढी शुध्द एकादशीपासून ते कार्तिकी शुध्द एकादशीपर्यंत महाराष्ट्रातला चातुर्मास पाळला जातो. त्यात आषाढातले वीस दिवस, श्रावण, भाद्रपद आणि आश्विन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्यातले अकरा दिवस येतात. अशा प्रकारे तो पाच महिन्यांत पसरलेला असतो. उत्तर भारतात काही भागातला चातुर्मास आषाढातील गुरु पौर्णिमेनंतर कार्तिकातील त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत असतो. तिकडच्या पंचांगांतले महिने कृष्ण प्रतीपदेपासून सुरू होऊन पौर्णिमेपर्यंत असतात. त्यामुळे त्यांच्या चातुर्मासात आषाढ महिना येत नाही, त्यांचा चातुर्मास श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक या चारच महिन्यांचा असतो.

माझ्या लहानपणी आमच्या घरात चातुर्मासाचे मोठे प्रस्थ होते. त्या काळात लग्नमुंजी वगैरेंचे मुहूर्त येत नसल्यामुळे हे समारंभ त्यापूर्वी उरकून घेतले जात किंवा लांबणीवर टाकले जात असत. याचा आम्हा मुलांना काही उपसर्ग नव्हता. आमच्या दृष्टीने महत्वाचा एवढाच भाग होता की चार महिने कांदा व लसूण हे पदार्थ घरात आणायलादेखील बंदी असे. बाहेरचे खाणे तर पूर्णपणे निषिद्ध होते. एकादशीच्या दिवशी तोंडालासुध्दा त्यांचा वास येऊ नये किंवा त्याची ढेकरही येऊ नये अशा विचाराने ही बंदी एक दिवस आधीपासून अंमलात आणली जात असे. त्याच्याही आदल्या दिवशीची कांदेनवमी उत्साहाने साजरी केली जात असे आणि कांद्याची थालीपीठे, झुणका, भजी वगैरे करून घरातला कांद्याचा सगळा स्टॉक संपवला जात असे.

घरातली मोठी माणसे, विशेषतः स्त्रीवर्ग चातुर्मासासाठी एकादा ‘नेम’ धरत असत. चार महिने एकादा अन्नपदार्थ खायचा नाही, एका वेळीच जेवण करायचे, रोज एकादे स्तोत्र म्हणायचे, रोज किंवा अमूक वारी एकाद्या देवळात दर्शनाला जायचे, तिथे जाऊन दिव्यात वाटीभर किंवा चमचाभर तेल घालायचे, सूर्योदयाच्या आधी उठून स्नान करायचे अशा असंख्य प्रकारचे नेमधर्म असत. चार महिने मौनव्रत धरणे हे सर्वात कठीण व्रत होते. पुरुषवर्गामधील काही लोकांना एकच नेम करतांना मी पाहिला. तो म्हणजे चार महिने दाढीमिशा आणि केस वाढवणे. चातुर्मासात असले नेम करण्यामुळे त्यापासून मिळणारे पुण्य अनेक पटीने वाढते असे समजले जात असे. “असे का?” या प्रश्नाला “आपल्या आ़जोबा, पणजोबांपासून हे चालत आले आहे, ते लोक मूर्ख होते का?” अशा प्रतिप्रश्नातूनच उत्तर मिळत असे आणि चुकून कोणी “कदाचित असतील.” असे प्रत्युत्तर दिले तर त्याची काही धडगत नसे. असा नेम पाळण्यापासून खरेच पुण्य मिळते का हा एक वेगळा प्रश्न आहे. पण जेवढे पुण्य मिळेल त्यापेक्षाही जास्त पाप हा नेम मोडल्यामुळे मिळेल अशा भीतीमुळे हे नेम जरा घाबरत घाबरतच धरले जात आणि भक्तीभावापेक्षा भीतीपोटीच त्यांचे पालन होत असे. लहान मुलांना मात्र कांदालसूण न खाण्याव्यतिरिक्त कसले नेम करायला सांगत नव्हते.

शिक्षणासाठी घर सोडून बाहेर पडल्यानंतर माझा चातुर्मासाशी दूरान्वयेही कसलाच संबंध राहिला नव्हता. काही  दिवसांपूर्वी आलेल्या एका ढकलपत्राने चातुर्मास सुरू झाल्याची वर्दी दिली. थोडा निवांत वेळ मिळाल्यावर त्याबद्दल आंतर्जालावर थोडी विचारपूस केली. त्यातून असे समजले की आषाढ शुध्द एकादशीला ‘देवशयनी‘ असे नाव आहे. क्षीरसागरात शेषनागाने वेटोळे घालून बनवलेल्या शय्येवर त्या दिवशी श्रीविष्णूभगवान निद्रिस्त होतात आणि चार महिने झोपून झाल्यानंतर कार्तिक महिन्यातल्या प्रबोधिनी एकादशीला ते जागे होतात. माणसांचे एक वर्ष म्हणजे देवांचा एक दिवस असतो आणि चातुर्मास म्हणजे त्यांचे रात्रीतले आठ तास होतात. तेवढी निद्रा घेऊन ते भल्या पहाटे उठून कामाला लागतात. मध्यंतरीच्या काळात जगाचे कार्य व्यवस्थित चालावे अशी पूर्ण व्यवस्था केलेली असतेच.

“देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात. असुरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावे असे धर्मशास्त्र सांगते.” अशी माहिती सनातन संस्था या स्थळावर दिली आहे. “मनुष्याचे एक वर्ष ही देवांची एक अहोरात्र असते. ‘जसजसे एका माध्यमातून दुसर्‍या माध्यमात जावे, तसतसे काळाचे परिमाण पालटते’, हे आता अंतरिक्षयात्री चंद्रावर जाऊन आले, तेव्हा त्यांना आलेल्या अनुभवावरून सिद्धही झाले आहे.” असे सांगून त्यांनी आपल्या कथनाला आधुनिक विज्ञानाची कुबडी देण्याचा अत्यंत दुबळा प्रयत्नही केला आहे. आपल्या पृथ्वीतलाच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवरच सहा महिने दिवस आणि सहा महिने रात्र असते हे मी पन्नास वर्षांपूर्वी एका खेडेगावात शिकत असतांना भूगोलाच्या पुस्तकातून शिकलो होतो. आणि उत्तर ध्रुवाजवळील आर्ट्रिक प्रदेशात एस्किमो नावाची माणसे आणि दक्षिण ध्रुवाजवळील अँटार्क्टिक प्रदेशात पेन्ग्विन नावाचे पक्षी राहतात असेही शिकलो होतो. त्यांचा एक दिवस आणि रात्र देवांच्या दिवस व रात्रींएवढे असतात. तेंव्हा माणूस पृथ्वीच्या कक्षेबाहेरसुध्दा गेला नव्हता. निरनिराळ्या ठिकाणी दिवस व रात्र निरनिराळ्या वेळी आणि वेळांकरता असतात हे समजण्यासाठी चंद्रावर जाण्याची गरज नव्हती.

सनातन संस्था या स्थळावर दिलेल्या माहितीनुसार चातुर्मासात सण आणि व्रते अधिक प्रमाणात असण्याचे कारण असे आहे. “श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक या चार मासांत (चातुर्मासात) पृथ्वीवर येणार्‍या लहरींत तमोगुण अधिक असलेल्या यमलहरींचे प्रमाण अधिक असते. त्यांना तोंड देता यावे; म्हणून सात्त्विकता वाढवणे आवश्यक असते. सण आणि व्रते यांद्वारे सात्त्विकता वाढत असल्याने चातुर्मासात जास्तीतजास्त सण आणि व्रते आहेत. शिकागो मेडिकल स्कूलचे स्त्रीरोगतज्ञ प्रोफेसर डॉ. डब्ल्यु. एस्. कोगर यांनी केलेल्या संशोधनात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या चार मासांत विशेष करून भारतामध्ये, स्त्रियांना गर्भाशयासंबंधी रोग चालू होतात किंवा वाढतात, असे आढळले.” असे चातुर्मासामधील व्रतांसाठी एक ‘शास्त्रीय’ दिसणारे कारणसुध्दा ठोकून दिले आहे. असल्या मिथ्याविज्ञानापासून (सुडोसायन्सपासून) परमेश्वराने या देशाला वाचवावे अशी प्रार्थना करावी  असे आता इथल्या नास्तिकांनासुध्दा वाटेल.

वैद्य बालाजी तांबे आजकाल प्रसिध्दीच्या प्रखर झोतात दिसतात. चातुर्मासात पावसाळा असतो आणि त्याचा परिणाम म्हणून शरीरातील अग्नी मंदावलेला असतो. चेतनाशक्‍ती, वीर्यशक्‍ती इतर ऋतूंच्या मानाने कमी झालेली असते. यावर उपाय म्हणून लंघन, मौन वगैरेंचे पालन करावे आणि तुळस, पिंपळ आदि वनस्पतींच्या औषधी उपयुक्ततेचा लाभ घ्यावा यासाठी चातुर्मासात व्रतवैकल्ये सांगितली आहेत, असे ते म्हणतात. शिवाय सामाजिक आरोग्यासाठीही…
– आरोग्यरक्षणाबरोबर व्रतवैकल्यांच्या निमित्ताने लोक एकत्र येऊ शकतात, त्यातून सामाजिक आरोग्य सुधारते.
– दैनंदिन व्यवहारापेक्षा काही तरी वेगळे करण्याची संधी मिळाल्याने मनाला विरंगुळा मिळतो.
– एकंदरच उत्सवाचे वातावरण अनुभवता येते.
– सर्वात महत्त्वाचे म्हणजे हलक्‍या फुलक्‍या तऱ्हेने मनावर निर्बंध घालण्याचा, शिस्त लागण्याचा सराव होऊ शकतो.
वगैरे लाभ त्यांनी सांगितले आहेत. अर्थातच हे सगळे लाभ आपण वर्षाच्या बाराही महिन्यात घेऊ शकतो असे असतांना त्यासाठी चातुर्मासच कशाला हवा?

प्रत्यक्षात चातुर्मासात इतके सण येतात आणि त्या निमित्याने गोडधोड खाणे चालले असते की लंघनाऐवजी थोडेसे  अतिभोजनच होते. तसेच या काळात जास्तच जनसंपर्क होत असल्यामुळे मौनाच्या ऐवजी जास्तच बोलणे होते. मला असे वाटते की पावसाळ्यात नद्यानाले पुराच्या पाण्याने दुथडी भरून वहात असतात, त्यामुळे पूर्वीच्या काळचे कच्चे रस्ते बंद झालेले असत. पेरणी होऊन गेल्यानंतर पिके उगवून कापणीची वेळ येईपर्यंत शेतात प्रत्यक्ष फार जास्त काम नसते पण पिकांची राखण करण्यासाठी तिथे उपस्थित असणे आवश्यक असते. पावसाळ्यातल्या गढूळ पाण्यामधून साथीचे रोग पसरण्याची शक्यता असते. हवामान झपाट्याने बदलत असल्यामुळे सर्दीखोकला, ताप यासारख्या व्याधी जास्त प्रमाणात होतात. अशा वेळी घरात असलेलेच चांगले म्हणूनही या दिवसात बहुतेक लोक बाहेरगावी जाण्याचे प्रोग्रॅम आखत नसत. आप्तेष्ट येऊ शकणार नाहीत म्हणून लग्नमुंजीसारखे समारंभ ठरवत नसत. घरात काढायचा वेळ सत्कारणी लावण्यासाठी निरनिराळ्या देवांच्या पूजा आराधना करत. अशा प्रकारे चातुर्मासाची सुरुवात झाली असावी असा माझा अंदाज आहे. आजच्या जगात यातल्या कुठल्याच गोष्टींना महत्व उरलेले नसल्यामुळे लोक कसले वेगळे नियमही पाळत नाहीत आणि नेमधर्म वगैरेवर कुणाचा फारसा विश्वास उरलेला नाही. त्यामुळे चातुर्मास कधी आला आणि गेला तेच समजत नाही.

संपादन दि.१२-०७-२०१९

हे लेख पहा :

श्रावणमास
https://anandghare2.wordpress.com/2012/07/17/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b8/

श्रावण मासातले नेमधर्म आणि सणवार
https://anandghare2.wordpress.com/2012/07/19/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae-%e0%a4%86%e0%a4%a3/

दीप अमावास्या (दिव्याची अंवस) की गटार अमूशा ?

दीप

आपल्याला मदत करणारी माणसे, पशूपक्षी, वनस्पती इतकेच नव्हे तर आजूबाजूच्या निर्जीव वस्तूंबद्दल आपल्याला आत्मीयता किंवा आदर वाटावा आणि आपण तो कृतींमधून व्यक्त करावा अशा प्रथा आपल्या सणवारांमधून पाडल्या गेल्या आहेत. दिवा ही एक अशीच अत्यंत उपयुक्त वस्तू आहे. अंधारात चाचपडत असतांना दिव्याच्या उजेडाने आपल्याला आजूबाजूला काय काय आहे हे दिसते, न ठेचकाळता पुढे जाण्यासाठी आपला मार्ग दिसतो. प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये दीपप्रज्वलन करावे लागतेच, त्या आधी त्या दिव्याची पूजाही केली जाते.

विजेचे दिवे प्रचारात येण्यापूर्वी  रोजच संध्याकाळ झाली की पूर्ण अंधार पडायच्या आधी घरोघरी दिवे लावण्चाया एक कार्यक्रम असे. संधीप्रकाशाच्या त्या वेळेलाच दिवेलावणी असे नाव होते. त्या वेळी “दिवा दिवा दीपत्कार, कानी कुण्डले मोतीहार, दिव्याला देखुन नमस्कार।।” असे म्हणून दिव्याला नमस्कार करण्याची परंपरा आहे, किंवा पूर्वी ती होती असे आता म्हणावे लागेल. रोज देवाची पूजा करताना नीरांजन रूपी दिव्याचा उपयोग केला जातो. साग्रसंगीत देव पूजेच्या प्रारंभी देवासमोर समयी लावून शंख-घंटा पूजना प्रमाणेच दिव्यालाही गंध, अक्षता, फ़ुले वगैरे वाहण्याची  पद्धत आहे. ती करतांना एक श्लोक म्हंटला जातो. तो असा आहे.
“भो दीप ब्रह्म रूप: त्वं ज्योतिषां प्रभु: अव्यय:।
आरोग्यं देहि पुत्रांश्र्च सर्वार्थान् च प्रयच्छ मे ।।
या श्लोकात दिव्यामध्येच परब्रह्माला पाहून त्याच्याकडे आशीर्वाद मागितले आहेत.

दीप अमावास्या आणि दीपावली हे दोन वार्षिक सण “दीप” या दैवताला खास समर्पित आहेत. दोन्हीही सण अमावास्येला येतात. त्या काळ्याकुट्ट रात्रीच्या अंधारात दिवे लावून त्यांच्या प्रकाशाने त्या अंधाराचा नाश करायचा, तमसो मा ज्योतीर्गमय हा संदेश त्यातून सर्वांना द्यायचा असा उद्देश या प्रथेत आहे. त्यातला दिव्याची अंवस हा सण तर खास दिव्यांसाठी साजरा केला जात असे. त्या दिवशी घरातील सर्व समया, निरांजने, लामणदिवे वगैरे घासून पुसून चकाचक करून त्यांची पूजा केली जाते, तसेच कणकेच्या खोलगट आकाराच्या वाट्या तयार करून त्यामध्ये तेल वात घालून ते दिवे लावतात. तसेच पिठाचे दिवे उकडून प्रसाद म्हणून तूप आणि गुळासोबत खाल्लेही जातात. दिव्याच्याच पूजेमध्ये दिव्यानेच दिव्याची आरती आणि दिव्याला दिव्यांचाच नैवेद्य ! काय गंमत आहे ना?

पंचतंत्र किंवा इसापनीतीमधील सगळे प्राणी माणसांसारखे बोलतात आणि वागतात. आपल्या कहाण्यांमध्येही असेच घडते. दिव्याच्या अंवसेच्या कहाणीतले उंदीर आणि दिवेसुध्दा माणसांसारखे बोलतात. यातली गोष्ट थोडक्यात अशी आहे.

एका राजाच्या सुनेने एकदा घरांतला एक अन्नपदार्थ स्वतः खाल्ला, आणि त्याचा आळ उंदरांवर घातला. (राजाच्या सुनेला हे करायची काय गरज होती, तिला हवा तो पदार्थ मागून मिळायला काय हरकत होती?) उंदरांना ते समजले. (कसे?) तिचा सूड घ्यावा म्हणून त्यांनी त्या रात्री तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली. दुसरे दिवशी सासूदिरांनी तिला संशयावरून घरांतून हाकलून दिले. ती सून दिव्यांची चांगली काळजी घेत असे, दिव्यांच्या अंवसेच्या दिवशीं त्यांना चांगला नैवेद्य दाखवत असे. पण ती घरांतून निघाल्यावर ते बंद पडले. पुढे दिव्यांच्या अंवसेच्या दिवशी राजा शिकारीहून परत येत असतांना एका झाडाखाली थांबला. तिथे त्याला दिसले की गांवांतले दिवे अदृश्य रूप धारण करून (मग राजाला ते दिसले कसे?) त्या झाडावर बसून एकमेकांशी गप्पागोष्टी करीत आहेत. राजाच्या घरच्या दिव्याने त्यांना सून आणि उंदरांची गोष्ट सांगितली. दर वर्षी मनोभावे पूजा करणारी सून या वेळी राजवाड्यात नसल्यामुळे तो दिवा दुःखी झाला होता. हा सर्व प्रकार ऐकून आपल्या सुनेच्या चारित्र्याबद्दल राजाची खात्री झाली. त्याने आणखी चौकशी केली आणि सुनेला सन्मानाने घरी परत आणले.

कहाणीतल्या काळात फक्त तेलातुपाचेच दिवे असत. इंग्रजांच्या राजवटीत केरोसीनचे कंदील, चिमण्या वगैरे आल्यानंतर दिव्यांच्या अमावास्येला त्यांचीही पूजा व्हायला लागली होती. विजेच्या दिव्यांमुळे दिव्याखाली अंधार ही म्हणच रद्दबातल करून टाकली. हे दिवे भिंतीवर उंचावर बसवलेले असल्यामुळे आणि शॉक लागण्याच्या भीतीपोटी त्यांना घासण्यापुसण्यात कोणाला रस नव्हता. फक्त एक स्विच दाबताच हे दिवे लागतात किंवा बंद होतात. त्यांना तेल वात वगैरे घालावे लागत नाही, त्यांच्याकडे लक्ष पुरवावे लागत नाही. रोज सायंकाळी दिवे लावणे हे पूर्वीसारखे मोठे काम उरले नाही. विजेची खात्रीलायक उपलब्धता वाढत गेली. त्यामुळे निदान घरात तरी रात्रीचा अंधार राहिला नाही. हे सगळे होत असतांना दिव्याच्या अंवसेचे महत्व कमी कमी होत गेले.

मी मुंबईला आल्यानंतर सुरुवातीच्या काळात एकदा रात्रीचा सिनेमाचा शो पहायला गेलो होतो. बसमध्ये एक विचित्र प्रकारचा उग्र दर्प पसरला होता. थिएटरमध्येसुध्दा तोच घाण वास घमघमत होता. तो अगदी असह्य झाल्याने मी शेजारच्या सभ्य वाटणाऱ्या माणसाला विचारले. त्याने आश्चर्याने मलाच विचारले, “आज गटारअमूशा आहे हे तुम्हाला ठाऊक नाही?” हा गावठी दारूचा दुर्गंध होता हे त्यानंतर माझ्या लक्षात आले. पुढे श्रावणमहिना येणार असल्यामुळे सगळे बेवडे तर्र होऊन फिरताहेत. पक्के दारुडेसुध्दा या बाबतीत खरेच धर्मनिष्ठ असतात की त्यांना पोटात दारू रिचवायला हे आणखी एक निमित्य मिळते तेच जाणोत. मागच्या वर्षी या दिवशी पुण्यातली सर्व मांसाहारी रेस्तराँ खचाखच गर्दीने भरली होती आणि या एका दिवसात अमूकशे की हजार टन चिकन, मटण, मासे वगैरेंचा खप झाला अशा बातम्या वर्तमानपत्रात आल्या होत्या. त्या दिवशी दीप अमावस्या कशा प्रकारे साजरी केली, किती लोकांनी दिव्यांची पूजा केली हे मात्र कोठे वाचले नाही. त्या दिवशी दीप अमावास्या (दिव्याची अंवस) नावाचा एक सण होता याचीच कित्येकांना कल्पना नसावी.

गटारी अमावास्या हे मूळच्या गताहारी अमावास्या या शब्दाचा अपभ्रंश होऊन आलेले रूप आहे असा एक नवा शोध संस्कृतिसंरक्षकांनी लावला आहे. असे मी या वर्षीच (२०२१ मध्ये) पहिल्यांदा ऐकले.

आता बदलत्या परिस्थितीनुसार सणसुध्दा बदलले आहेत.

श्रावणमासातले नेमधर्म आणि सणवार

चातुर्मासात केलेल्या धार्मिक कृत्यांचे फळ जास्त मिळते आणि श्रावण महिन्यात तर ते त्याहून जास्त मिळते अशी भाविकांची श्रध्दा असल्यामुळे या काळात जास्त प्रमाणात व्रतवैकल्ये केली जातात. माझ्या लहानपणी आमच्या घरातल्या बहुतेक प्रौढ महिला दर चातुर्मासाला कसला तरी नेम करायचा असा विचार करून त्याची सुरुवात करीत असत, पण चार महिन्यांचा काळ जरा जास्तच लांब वाटत असल्यामुळे श्रावण महिनाभर तरी तो नेम पाळून मिळेल तेवढे जास्तीत जास्त पुण्य पदरात पाडून घेत असत. या महिन्याची सुरुवात जिवतीच्या पटाने आणि कहाण्या वाचण्याने होत असे हे मी मागील लेखात सांगितले आहेच. महिन्यातल्या वेगवेगळ्या वारी आणि तिथींना तऱ्हेतऱ्हेची व्रतवैकल्ये आणि रूढी पाळायच्या असत.

पूर्वी कधी सुरू केलेली आणि कंटाळा करून घालवलेली सूर्यनमस्काराची संवय श्रावणातल्या रविवारी पुन्हा सुरू केली जाई. त्यासाठी सूर्याची बारा नांवे एका कागदावर लिहून घेतली जात आणि  ॐ मित्रायनमः, ॐ रवयेनमः असे करत एकेकाच्या नावाने साष्टांग नमस्कार घातले जात. श्रावण सोमवारी मोठ्या लोकांचा उपवास असे. हे शिवव्रत एकदा घेतले की मोडता येत नाही अशी श्रध्दा असल्यामुळे आणि ही पोरे मोठी झाल्यावर त्यांना शिंगे फुटणारच याची खात्री असल्यामुळे  मुलांना त्यातून वगळले जात असे. त्यामुळे नेहमीच्या जेवणाबरोबरच साबूदाण्याची खिचडी पण खायला मिळत असे. या दोन्हींमधला धान्यफराळ नावाचा एक तिसरा मार्गही काढला जात असे.

आमच्या जमखंडीपासून कोसभर अंतरावर डोंगरावरील रामतीर्थावर रामेश्वराचे पुरातन मंदीर आहे, श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी त्याचे दर्शन घ्यायचेच अशी प्रथा होती. त्या दिवशी तिथे जत्रा असल्यामुळे त्याचे जास्तीचे आकर्षण असायचे. जत्रेत खर्च करण्यासाठी घरातील प्रत्येक मुलाला एक आणा मिळायचा. त्या काळात इतर कुठल्या पॉकेटमनीची पध्दत नसल्यामुळे त्या आण्याचे अप्रूप वाटायचे. घरातली, शेजारची आणि शाळेतली मित्रमंडळी मिळून सात आठ जणांचा घोळका करून आम्ही जत्रेत फिरत असू. सगळ्यांचे मिळून झालेल्या सात आठ आण्याचे कुरमुरे, फुटाणे, शेंगदाणे वगैरे घेऊन ते खायचे. त्या काळात ते पुरेसे असत. रामतीर्थाच्या परिसरात गुलमोहोराची बरीच झाडे होती. तिथल्या स्थानिक बोलीभाषेत त्याला संकासूर म्हणतात. त्याला उन्हाळ्यात आलेली लालभडक फुले कोमेजून पावसाबरोबर पडून जातात. त्या जागी काळपट लाल रंगाच्या शेंगा येऊन श्रावण महिना येईपर्यंत त्या चांगल्या हातभर लांब झालेल्या असत. त्यातली सर्वात जास्त लांब आणि सरळ शेंग शोधून ती पटकावण्याची चढाओढ लागत असे. त्या शेंगा हातात धरून वाटेवरच्या गवतावर आणि झुडुपांवर त्या तलवारीचे वार केल्यासारख्या सपासपा चालवीत आम्ही घराकडे परतत असू. पण वाटेतच कोणाच्या तरी अंगात मावळा संचारल्यामुळे युध्द सुरू होई आणि त्यात झालेले त्या शेंगांचे तुकडे आसमंतात भिरकावून दिले जात. त्यातून गुलमोहराची किती नवी झाडे उगवली असतील याची गणना करायचा प्रयत्नही कधी केला नाही. पण अभावितपणे कां होईना आम्ही या प्रकारे निसर्गाला साथ दिली होती असे आता सांगता येईल.

मंगळवारी मंगळागौर असायची. गांवात बहुतेक सगळी एकत्र कुटुंबेच होती. त्यातल्या आमच्या घरी, शेजारपाजारी, किंवा गावात राहणाऱ्या काकामामांपैकी कोणा ना कोणाच्या घरी नवीन लग्न झालेल्या लेकी किंवा सुना असायच्या आणि त्यामुळे त्यांच्याकडे मंगळागौरीची पूजा व्हायचीच. त्या निमित्याने आम्हालाही प्रसाद खायला मिळायचा. स्त्रीवर्गामध्ये खेळ, नाचगाणी, उखाणे वगैरेचा कार्यक्रम रंगायचा, त्यात मुली तर उत्साहाने भाग घेतच, मुलांनाही त्याची झलक तरी पहायला मिळत असे. बुधवार आणि गुरुवारची वैशिष्ट्ये आता मला आठवत नाहीत, पण शुक्रवारचा दिवस खास असायचा. त्या दिवशी पुरणाचे दिवे लावून जिवतीला त्याची आरती केली जात असे आणि त्यानंतर मुलांचे औक्षण केले जाई, तसेच लेकुरवाळ्या सवाष्णींना त्यांच्या लेकरांसह भोजनाला बोलावले जात असे. त्या निमित्य पुरणावरणाचा घाट घातला जाई.  शनिवारी ज्वारी किंवा बाजरीच्या कण्या शिजवून त्या ताकाबरोबर खायचा रिवाज होता. कांही जणांना तो पदार्थ आवडत असे, पण बाकीच्यांना त्या दिवशी दोन चार घास तरी खावाच लागत असे. संध्याकाळी मारुतीच्या देवळात नारळ फोडायचा आणि तिथल्या दिव्यात आपले पळीभर तेल घालायचा रिवाज होता. आधीच्या काळात त्यासाठी घरून बुदलीभर तेल न्यावे लागत असे. पुढे त्याचे व्यापारीकरण झाले. देवळाशेजारीच एका तेल्याने दुकान उघडले आणि छोट्या छोट्या अनेक पात्रात तेल भरून ते मारुतीला वाहण्यासाठी तो तयार ठेऊ लागला. शिवाय त्या तेलाची किंमत बाजारभावापेक्षा कमी असे. ते तेल खाण्यासाठी वापरावयाचे नसल्यामुळे त्याच्या दर्जाबद्दल विचार करायचे कारण नव्हते. स्वस्त आणि सुटसुटीत असा हा पर्याय लोकांनी लगेच उचलून धरला.

नागपंचमीला वेताच्या गोल डब्यात नागाची वेटोळी ठेऊन ती घेऊन गारुडी लोक घरोघरी जात. इतर वेळी पुढे पुढे करणारी बच्चे कंपनी या वेळी मात्र आईच्या पदराआड दडून विस्फारलेल्या डोळ्यांनी नागाचा उभारलेला फणा पहात असत. आमच्या गावापासून शंभर कोसांच्या अंतरात कोठेही समुद्रकिनारा नव्हता. त्यामुळे नारळी पौर्णिमेचा समुद्राशी कांही संबंध नसायचा. त्या दिवशी भरपूर नारळी भात केला जात असे. इतके चविष्ट आणि सर्वांना आवडणारे पक्वान्न एरवी कधीच होत नसे. ते खाण्यासाठी पुढल्या वर्षाच्या नारळी पौर्णिमेची वाट पहावी लागे. नंदा या नटीची प्रमुख भूमिका असलेला छोटी बहन हा लोकप्रिय चित्रपट आल्यानंतर घरातल्याच रेशमाच्या धाग्यापासून राखी बनवून बहिणी आपल्या भावांना बांधायला लागल्या होत्या. त्या काळात त्या बाजारात मिळत नसत किंवा पोस्टाने येत नसत. ग्रीटिंग कार्ड हा प्रकारच त्या भागात त्या काळी ऐकूनही ठाऊक नव्हता.

गोकुळाष्टमीला कृष्णजन्म होत असे आणि त्याच्या दुसरे दिवशी गोपाळकाला. त्या कार्यक्रमाला येणारीने आपापल्या घरातून निरनिराळे चविष्ट पदार्थ आणून ते एका मोठ्या परातीत मिसळायचे जायचे आणि तो काला चांगला मिसळून सगळ्यांच्या हातावर घास घास ठेवला जात असे. ती एक प्रकारची भेळ असली तरी त्यात कोणते पदार्थ आणि किती प्रमाणात मिसळायचे हे ठरले नसल्यामुळे गोड, तिखट, आंबट, खारट या सगळ्या चवींनी युक्त अशी दर वेळी एक वेगळीच चंव तयार होत असे. याशिवाय श्रावण महिन्यात जास्त फळ मिळण्याच्या आशेने सत्यनारायणादि अनेक प्रकारच्या पूजा केल्या जात असत. सत्यनारायण सोडून जुन्या काळातल्या पूजा अर्चा, एकादष्ण्या, अभिषेक वगैरे इतर अनेक गोष्टी आता बंद झाल्या आहेत, तर संतोषी माता आणि वैभवलक्ष्मी वगैरे नवी कांही व्रते लोकप्रिय होऊ लागली आहेत असे दिसते. ती सुध्दा श्रावण महिन्यातच जास्त प्रमाणात होतात.

श्रावण महिन्यात कर्माचे जास्त फळ मिळत असल्याने सगळे लोक देवाच्या नजरेत गुड बॉय किंवा गुड गर्ल बनण्याच्या प्रयत्नात असत. त्या महिनाभर कांही लोक मद्यपान वर्ज्य करत तर कांही लोक शुध्द शाकाहारी बनत. आमच्या घरात बाराही महिने मद्य आणि मांस या दोन्ही गोष्टींचा उच्चार सुध्दा करायला मनाई होती. तोंडाला बाटली लावण्याचा किंवा एका हाताने दुस-या हाताच्या पंजावर सुरी चालवण्याचा अभिनय करून त्याचा खुणेनेच उल्लेख केला जात असे. त्यामुळे श्रावण महिन्यामुळे त्या बाबतीत कांही फरक पडत नसे. पण कांदा लसूण वर्ज्य केलेले जाणवत असे. चातुर्मासात जमले नाही तर महिनाभर तरी कांही ना कांही सोडायची फॅशनच असायची. न आवडणाऱ्या गोष्टी आधीच जन्मभरासाठी सोडलेल्या असत आणि उपलब्ध नसलेल्या गोष्टी सो़डल्या म्हणून सांगितले तर हंसे होईल. यामुळे कांही प्रौढ महिला चहा किंवा बटाटा यासारखी रोजच्या उपयोगातली एकादी वस्तू सोडत. यात आपण फार मागे रहायला नको म्हणून पुरुषवर्ग महिनाभरात हजामत करून घेत नसत, कांही लोक दाढीमिशादेखील वाढवत.

अशा त-हेने श्रावण महिना चांगला गाजत असे आणि तो संपण्यापूर्वीच गणेशोत्सवाची तयारी सुरू होत असे.

. . . . . . . . . . . . . . . .

हे लेख पहा :

नागपंचमी
https://anandghare2.wordpress.com/2013/08/07/%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%ae%e0%a5%80/

श्रावणी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, ओणम् आणि बलरामजयंती
https://anandghare2.wordpress.com/2013/08/19/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%a8-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%b3%e0%a5%80/

गोकुळाष्टमी
https://anandghare2.wordpress.com/2010/08/29/%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%ae%e0%a5%80/

मराठी मातृदिन, पिठोरी अमावस्या, आईवरील गाणी
https://anandghare2.wordpress.com/2013/09/03/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%83%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%a0%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%80/

श्रावणमास

संपादन दि. २१-०७-२०२० : श्रावणमास या विषयावर लिहिलेले वेगवेगळे लेख एकत्र केले.

आज यंदाचा श्रावणमास सुरू झाला आहे, तरी मला त्या महिन्याच्या सुरू होण्याने विशेष काहीही फरक पडणार नाही हे निश्चित आहे. हे किती विचित्र वाटतंय् ? माझ्या लहानपणी असे होणे शक्यच नव्हते. श्रावणमहिना म्हणजे निरनिराळ्या प्रकारच्या वेगळेपणाने अगदी गच्च भरलेला असायचा. श्रावणाच्या पहिल्याच दिवशी देव्हाऱ्यात जिवतीचा पट लावून रोज तिची पूजा सुरू होत असल्यामुळे श्रावण महिन्याचे आगमन झाल्याचे सर्वांना समजत असे. रोजचा वार आणि तिथीनुसार त्या दिवशीच्या कहाण्या वाचायच्या. महिनाअखेरपर्यंत त्या तोंडपाठ होऊन जात असत. काही कहाण्यांमध्ये मजेदार आणि उद्बोधक गोष्टी असायच्या. शुक्रवारच्या कहाणीवर महादेवशास्त्री जोशी यांनी एक सुंदर कथा लिहिली होती आणि त्यावर मानिनी नावाचा मराठी चित्रपटसुध्दा निघाला होता. श्रावणमहिन्यातल्या बहुतेक वारी जेवणात काही वेगळा मेनू असायचा.

सोमवारी घरातली काही वडीलधारी माणसे उपास करत असत आणि बाकी सर्वांसाठी धान्यफराळ बनत असे. घर सोडल्यापासून गेल्या पन्नास वर्षात ‘धान्यफराळ’ हा शब्दच कधी माझ्या कानावर पडला नाही. ही संकल्पनाच आता कदाचित कालबाह्य झाली असेल. त्यामुळे त्याचे नियम मला आता सांगता येणार नाहीत. पण उपास म्हणजे साबूदाण्याची खिचडी, रताळी, खजूर वगैरे पदार्थ असत त्याऐवजी या धान्यफराळात वेगळे पदार्थ असत. बहुधा पाण्याऐवजी दुधात कणीक भिजवून त्याच्या दशम्या, चुर्मा असे काही तरी केलेले असे. दर सोमवारी आमच्या जमखंडी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या रामतीर्थाची जत्रा असे आणि सगळी मुले टोळकी करून त्या जत्रेला जाऊन मौजमजा करत असू. आमच्या घरात किंवा नात्यात कोणाकडे एकादी तरी नवी सून किंवा माहेरपणाला आलेली मुलगी असायची आणि तिची मंगळागौर थाटाने केली जात असे. त्या कार्यक्रमात मुलांना धुडगूस घालायला वाव नसला तरी गोड धोड खायला तरी मिळायचे आणि दुरून थोडी गंमत पहायला, एकायला मिळत असे. शुक्रवारी पुरणाच्या दिव्याने जिवतीची आरती केली जायची आणि त्यानंतर घरातल्या सगळ्या बाळगोपाळांचे औक्षण व्हायचे. शनिवारी जेवणात ज्वारीच्या कण्या आणि बाजरीची भाकरी असायची. या दोन्ही गोष्टी माझ्या आवडीच्या नसल्या तरी त्यांच्या जोडीला चमचमीत कालवण असल्याने त्यांच्या आधाराने त्या घशाखाली उतरवल्या जायच्या.

तिथीनुसारसुध्दा श्रावण महिन्यात अनेक सणवार येत असत. कर्नाटकात नागपंचमीला तंबिट्टाचे लाडू केले जात. विविध डाळींच्या पिठांना खरपूस भाजून त्यात गुळाचा पाक मिसळून ते तयार केले जात. नारळी पोर्णिमेला जेवणात नारळीभाताचा बेत असे. त्या दिवशी रक्षाबंधन केले जात असे, पण आमच्या भागात (कर्नाटकात)  त्याचा मोठा सोहळा नसायचा. भाऊबीजेला जेवढे महत्व होते तेवढे या कार्यक्रमाला नसायचे. पाऊस पाणी, नद्यांचे पूर वगैरेमुळे या दिवसात प्रवास करणे थोडे अनिश्चित असल्यामुळे परगावाहून कोणीही भाऊ मुद्दाम राखीसाठी येत नसे. श्रावण महिन्यात श्रावणी नावाचा एक धार्मिक विधी असायचा. तो मात्र अनिवार्य असे. त्या विधीमध्ये पंचगव्य प्राशन करणे जिवावर येत असल्यामुळे मला त्याचा भयंकर तिटकारा वाटायचा. गोकुळाष्टमीला रात्रीचे बारा वाजेपर्यंत जागून कृष्णजन्म साजरा करत असू. तोपर्यंत भजन, कीर्तन, गाणी वगैरे चालत असे. बहुतेक लोक श्रावणातल्या निरनिराळ्या एकाद्या दिवशी घरी सत्यनारायणाची पूजा करत असत आणि सर्व आप्तेष्टांना दर्शनासाठी बोलावून तीर्थप्रसाद देत असत. त्या निमित्याने साजुक तुपातला शिरा वरचेवर खायला मिळत असे. एकंदरीत पाहता श्रावण महिन्याते आगळेपण जन्मभर लक्षात राहण्यासारखे असायचे.

२. श्रावणमासी ……..

बालकवी ऊर्फ कै.त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी लिहिलेली श्रावणमासी हर्ष मानसी ही कविता माझ्या लहानपणी शाळेच्या पाठ्यपुस्तकात कोणत्या ना कोणत्या इयत्तेला असायचीच. तेंव्हा तर ती पाठ झालेली होती.

“श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे ।
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे।।”
आषाढात सुरू झालेल्या पावसाचा वेळी अवेळी होणारा धिंगाणा आता कमी झालेला असतो. (या वर्षी आषाढात फारसा पाऊस आलाच नाही ही गोष्ट वेगळी.) उन्हाबरोबर त्याचा पाठशिवणीचा खेळ चाललेला असतो. कधी लख्ख ऊन पडले असतांना मध्येच पावसाची सर येऊन जाते तर पिशवीतली छत्री बाहेर काढून ती उघडेपर्यंत ती ओसरून पुन्हा ढगांमधून उन्हाच्या तिरिपी दिसायला लागतात. ना थंड ना ऊष्म अशा या सौम्य वातावरणात मन प्रसन्न होतेच. आजूबाजूचे निसर्गसौंदर्य पाहून ते अधिकच उल्हसित होते.

बालकवी ठोंबरे यांच्या या प्रसिध्द कवितेत त्यांनी श्रावणातल्या या निसर्गाच्या विलोभनीय रूपाबद्दल जे लिहिले आहे त्याला तोड नाही. त्यांनी दिलेल्या कांही अनुपम उपमा खाली दिलेल्या पंक्तींमध्ये पहायला मिळतात.
“वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे;
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे!”
आकाशातल्या हवेत पाण्याचे तुषार असतील तर त्यातला प्रत्येक सूक्ष्म कण स्फटिकाप्रमाणे काम करतो आणि त्यावर पडलेल्या सूर्याच्या किरणांचे पृथक्करण करून त्यांचे असंख्य रंगांमध्ये परावर्तन करतो. आकाशात सूर्य तळपत असला आणि समोरच्या बाजूला दमट हवा असेल तर आपल्याला त्यातून सप्तरंगी सूर्यधनुष्य दिसते. हे त्याच्या मागे असलेले सायन्स झाले. एकमेकात बेमालूमपणे गुंतलेल्या सात रंगांचा हा गोफ विणला आहे असे बालकवींच्या कवीमनाला वाटते आणि श्रावणराजाच्या आगमनाने आनंदून जाऊन सृष्टीदेवीने आभाळाच्या मांडवावर हे मंगल तोरण बांधले आहे असा भास त्यांच्या संवेदनशील मनाला होतो.

“झालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा तो उघडे ।
तरूशिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे ।।
उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा ।
सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा!”
या कडव्यातसुध्दा ऊनपावसाच्या लपंडावाचेच वर्णन आहे. काळ्या ढगांनी आकाश झाकोळून गेले की सूर्य मावळला असे वाटते, पण क्षणभरात ते ढग बाजूला होऊन सूर्याच्या प्रकाशाला वाट करून देतात आणि आभाळच रंगीबेरंगी होऊन जाते.

“बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते ।
उतरूनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते ।।”
बगळ्यांची माळ अंबरात उडत असतांना ती म्हणजे स्वर्गातल्या कल्पवृक्षाच्या फुलांची माळ आहे किंवा आकाशातल्या चांदण्या, ग्रह, तारे वगैरे रांगेने जमीनीवर उतरत आहेत असे बालकवींना वाटते. या आणखी काही कल्पक उपमा.

“फडफड करूनी भिजले अपुले पंख पाखरे सावरिती ।
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती ।।
खिल्लारे ही चरती रानीं, गोपही गाणी गात फिरे ।
मंजुळ पावा गाय तयाचा श्रावणमहिमा एकसुरे ।।”
रानावनांमधले पशुपक्षी या वातावरणाने प्रसन्न होतात, हिरव्या गार कुरणातून मनसोक्त चरत फिरतांना गायी आणि त्यांची खिल्लारे मौजमस्ती करतातच. त्यांना सांभाळणारे गुराखी आनंदाने गाणी गातात आणि आपल्या बांसरीच्या मधुर आवाजातून श्रावणराजाच्या महात्म्याचे गुणगान करतात.

पुराणातल्या श्रीकृष्ण सत्यभामा आख्यानाचा दाखला देऊन ते म्हणतात,
“सुवर्णचंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला ।
पारीजातही बघता भामारोष मनीचा मावळला ।।”
सोनचाफा फुलला, केवडा दरवळला आणि त्यांच्या सोबतीने पारिजातकांनेसुध्दा बहरून फुलांचा सडा पाडला, पुराणातली सत्यभामा रुक्मिणीच्या अंगणात पडलेली पाहून रुसते पण बालकवींची सत्यभामा “फुले कां पडती शेजारी” असे म्हणत रुष्ट किंवा खिन्न होत नाही. उलट त्या नाजुक फुलांच्या मंद सुगंधाने तिच्या मनात असलेली अढी मावळते.
असे हे श्रावणाचे रूप कोणाला मोहवत नसेल?

“देवदर्शना निघती ललना, हर्ष माइना हृदयात ।
वदनी त्यांच्या वाचुनि घ्यावे श्रावणमहिन्याचे गीत ।।”
श्रावण महिन्यात अनेक सण येतात. त्या निमित्याने देवदर्शनाला निघालेल्या स्त्रियांच्या प्रफुल्लित चेहेऱ्यावरच श्रावण महिन्याचे गीत स्पष्ट दिसते.

इंग्रजी माध्यमात शिकलेल्या लोकांना बालकवी हे जुने नांव कदाचित खास परिचयाचे नसेल. त्यामुळे त्यांच्याबद्दल चार शब्द लिहिले आहेत. त्यांचे पूर्ण नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे. मुख्यतः निसर्गसौंदर्याचे वर्णन त्यांनी आपल्या काव्यांमध्ये केले होते.
हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे ।
त्या सुंदर मखमालीवरती, फुलराणी ही खेळत होती ।।
या गाण्याचा समावेश ती फुलराणी या नाटकात अतिशय सुंदर रीतीने केला आहे. तर
गर्द सभोती रान साजणी, तू तर चाफेकळी । काय हरवले सांग साजणी या यमुनेच्या जळी ।।
हे गाणे मत्स्यगंधा या नाटकात चपखलपणे बसवले आहे.
बालकवींच्या कवितांमध्ये नेहमी एक सकारात्मक विचार असतो.
आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे । आणि
माझे गाणे, एकच गाणे, नित्याचे गाणे ।
या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका अतीशय लोकप्रिय आहेत.

ही पूर्ण कविता सलगपणे खाली दिली आहे.

श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे ।
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे ।।

वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे ।
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे ।।

झालासा सूर्यास्त वाटतो, सांज -अहाहा तो उघडे ।
तरुशिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे ।।

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा ।
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा ।।

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते ।
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते ।।

फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती ।
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती ।।

खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे ।
मंजूळ पावा गाई तयांचा श्रावण महिमा एकसुरे ।।

सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला ।
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला ।।

सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती ।
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती ।।

देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात ।
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत ।।

——————————-

३. श्रावणमास – अनुशासन पर्व

काही लोकांना मात्र श्रावण महिना जाचक वाटत असेल आणि कधी एकदा तो संपतो असेही झाले असेल. ते लोक या महिन्यात दाढी किंवा कटिंग करत नाहीत, मांसाहार करत नाहीत आणि दारू पीत नाहीत. त्यांची व्यथा इथे पहा.

लहानपणी श्रावणाचा महिना म्हणजे निव्वळ खादाडी, खेळ, उत्सव आणि मजाच मजा वाटत असे. निसर्गसुध्दा या काळात किती रम्य असतो ते बालकवींनी दाखवले आहेच. श्रावण महिन्याला दुसरी एक बाजू असते आणि ती अनेक लोकांना जाचक वाटू शकते असे मात्र तेंव्हा कधी वाटलेच नव्हते. आषाढातल्या पावसाच्या एक दोन झडीत सापडून सचैल स्नान घडले, डोक्यावरचे केस भिजल्याने ओले कच्च राहिले आणि त्यानंतर सर्दी खोकला झाला किंवा तो होईल असे आईला वाटले तर लगेच केशकर्तनालयात नेऊन अगदी बारीक हजामत केली जायची आणि पुढे महिना दीड महिना केसांना वाढू दिले जायचे. त्यामुळे श्रावण महिन्यात कटिंग केली नाही तरी ती गोष्ट लक्षात येत नसावी. त्या काळात दाढीमिशांचा प्रश्नच नव्हता. महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरात आल्यानंतर पंचांगाशी संबंध तुटला होता, श्रावणाचे आगमन झालेलेही समजले नव्हते. नेहमी आपला चेहेरा रोज चांगला घोटून तुळतुळीत ठेवणारे काही लोक ऑगस्ट महिन्याच्या सुमाराला मात्र दाढीचे खुंट वाढवू लागल्याचे मला जाणवले आणि त्याचे थोडे नवल वाटले. मी नेहमीसारखा हेअर कटिंग सलूनमध्ये (त्या काळात त्यांना जेंट्स पार्लर वगैरे नावे नव्हती) गेलो तर तिथे नेहमीसारखी गर्दी नव्हती. मोठ्या अदबीने मला मऊ खुर्चीवर बसवून केशकर्तनकाराने श्रावण महिन्याचे पुराण सुरू केल्यामुळे मला त्याचा उलगडा झाला. निष्कारण त्याच्या पोटावर पाय आणणारा हा असला कसला पायंडा? या त्याच्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नव्हते. श्रावण महिन्याचा आणि दाढी किंवा हजामत न करण्याचा परस्पराशी काय संबंध असू शकतो हे मला आजपर्यंत समजलेले नाही.

आमच्या बाळबोध घरात अभक्ष्यभक्षण आणि अपेयपानच नव्हे तर त्यांचा बोलण्यात उल्लेख करणेसुध्दा वर्ज्य होते. दारू, मांस, अंडे अशा शब्दांच्या उच्चारानेसुध्दा आपली जीभ विटाळायची नाही, अगदीच आवश्यक झाले तर त्या गोष्टी खुणांनी दाखवायच्या असा संकेत होता. ज्या गोष्टी मुळातच कधीच खाल्ल्या प्यायल्या जात नव्हत्या त्या श्रावणमहिन्यात खायच्या प्यायच्या नाहीत असा नियम तरी कुठून असणार ? त्याबद्दल मी अनभिज्ञच होतो. घर सोडून बाहेरच्या जगात रहायला लागल्यानंतर माझे जग बदलले. त्याबरोबर ‘तीर्थ’ आणि ‘प्रसाद’ या शब्दांना नवा अर्थ प्राप्त झाला. आपण ‘तीर्थप्राशन’ केले असल्याच्या बढाया मारणारी काही मुले हॉस्टेलमध्ये असली तरी प्रत्यक्ष ‘पिणारी’ कोणी त्या काळात नव्हती. पण नॉनव्हेजचा समावेश मेसच्या नेहमीच्या खाण्यातच होता. दर रविवारी मिळणा-या फीस्टमध्ये कोंबडीच्या लुसलुशीत तंगडीऐवजी पचपचीत रसगुल्ला खाणारे अगदीच बावळट समजले जायचे. शिवाय पुढे फॉरीनला गेलो तर तिथे दूधभात आणि भेंडीची भाजी मिळणार नव्हती, तिकडच्या लोकांसारखा आहारच घ्यावा लागणार होता आणि तो जास्त पौष्टिक समजला जात असे. असा दूरदर्शी विचार केला आणि थोड्याच दिवसात मी सामिष भोजनावर ताव मारू लागलो. पण श्रावण महिना सुरू झाला आणि आमची टिंगल करणारी काही मुले एकदम शुध्द शाकाहारी बनली. आता त्यांना खिजवायचा चान्स मला मिळाला, कारण माझ्यासाठी श्रावण महिन्यात अमूक तमूक पदार्थ खायचे नाहीत असा वेगळा नियम नव्हताच. अभक्ष्यभक्षण न करण्याचा सर्वसाधारण नियम एकदा तोडल्यानंतर मग श्रावण महिना आहे की भाद्रपद आहे याने काय फरक पडतोय्?

नोकरीला लागल्यानंतर कधी कधी तीर्थप्राशन करण्याचे प्रसंग येऊ लागले. मला त्याची चंव फारशी आवडली नाही आणि परिणामाचेही विशेष आकर्षण कधी वाटले नाही. हिंदी सिनेमातले हीरो ‘गम भुलानेके लिये’ पीत असतात. माझ्या सुदैवाने तसली दुःखे माझ्या वाट्याला आली नाहीत. त्यामुळे मी कधीही पिण्याच्या नादी लागलो नाही. पण एकाद्या पार्टीच्या निमित्याने भरलेला पेला समोर आला तर मग त्यावेळी एकच प्यालामधला सुधाकर आणि तुझे आहे तुजपाशीमधला काकाजी या दोघांचे मनातल्या मनात द्वंद्व चालायचे आणि कधी या बाजूची तर कधी त्या बाजूची सरशी व्हायची. त्यातही श्रावण महिना आल्याने फरक पडत नसे कारण त्याची आठवणच येत नसे आणि श्रावण महिन्यासाठी खास नियम माझ्याकडे नव्हते. ज्या मित्रांना चटक लागली होती आणि श्रावण महिनाभर मद्याला स्पर्शही करायचा नव्हता, त्यांची मात्र पंचाईत होतांना दिसायची.

अशा एका रसखान विडंबनकाराने बालकवींचे शब्द थोडेसे बदलून लिहिले आहे,

श्रावणमासी, विरस मानसी, हळहळ दाटे चोहिकडे ।
क्षणात येते मनात पाप, क्षणात पश्चाताप घडे ।।

खरे तर खाण्यापिण्यामध्ये कसले पाप आले आहे? पण तशी समजूत असेल तर वाटायला लागते. या मनस्थितीचे वर्णन करतांना त्याला वाटते,

पुरण नकोसे, वरण नकोसे, उतरेना कंठी बासमती ।
मटणाच्या त्या रश्श्यावाचून कुंठित होई येथ मती ।।

बिच्चारा ! ! !

तीन लेखांचे एकत्रीकरण आणि संपादन दि. २१-०७-२०२०

. . . . . .  . . . .      . . . . . . . . . . . . .  

हे लेख पहा :

श्रावण मासातले नेमधर्म आणि सणवार
https://anandghare2.wordpress.com/2012/07/19/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae-%e0%a4%86%e0%a4%a3/

जिवतीचा पट आणि कहाण्या
https://anandghare2.wordpress.com/2017/07/27/%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%9f-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%95%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/

नागपंचमी
https://anandghare2.wordpress.com/2013/08/07/%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%ae%e0%a5%80/

गोकुळाष्टमी

आपण दर वर्षी गोकुळाष्टमीला कृष्णजन्म उत्साहाने साजरा करतो. श्रीकृष्ण हा वेगवेगळ्या कारणांनी सगळ्यांनाच खूप आवडणारा, अगदी आपलासा वाटणारा देव आहे. तसा तो भगवान विष्णूचा आठवा अवतार आहे. मत्स्य, कूर्म व वराह या पशूंच्या रूपातील पहिल्या तीन अवतारांबद्दल कोणाला फारसे कांही ठाऊक नसते. नृसिंह आणि वामनावतार थोड्या वेळेपुरते प्रकट झाले आणि कार्यभाग संपताच ते अदृष्य होऊन गेले. विस्तारपूर्वक सांगता येईल असे त्यांचे मोठे चरित्र नाही. परशुराम हा आपल्या जमदग्नी या पित्यासारखाच शीघ्रकोपी म्हणून प्रसिद्ध झालेला असल्यामुळे त्याच्याबद्दल प्रेमापेक्षा भीतीच जास्त वाटते. राम अवतार सर्वगुणसंपन्न आणि आदर्श असे व्यक्तीमत्व आहे. त्याचे संपूर्ण चरित्र हा आदर्श वर्तनाचा वस्तुपाठ आहे. तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून वागण्याचा प्रयत्न करावा असे वाटते, पण सर्वसामान्य माणसाला ते जमणे अत्यंत कठीण आहे. गोपाळकृष्ण मात्र आपल्याला थोडासा आपल्यासारखा वाटतो. त्याच्या लडिवाळ बाललीला, थट्टामस्करी, वात्रटपणा, सवंगड्याबरोबर खेळ खेळणे, गोपिकांबरोबर रास रचणे, पांडवांना समजुतीच्या गोष्टींचे सल्ले देणे हे सगळे मानवी वाटते.

कृष्ण हा विविध वयोगटातल्या आणि मनोवृत्तीच्या लोकांना आवडतो कारण इतक्या वैविध्यपूर्ण घटना त्याच्या चरित्रात आहेत. व्यासमहर्षींनी ते फारच कौशल्याने रंगवलेले आहे. मानवी स्वभावाचे दर्शन आणि चमत्कार यांचे एक अजब मिश्रण त्यात आहे. त्याच्या जन्माची कथा अद्भुतरम्य आहे. कंसाचे निर्दाळण करण्यासाठी त्याचा शत्रु देवकीच्या पोटी जन्म घेणार आहे अशी पूर्वसूचना कंसाला मिळते आणि कृष्णाचा जन्मच होऊ न देण्याचा आटोकाट प्रयत्न तो करतो. त्या सर्वांवर मात करून कृष्ण जन्म होतोच. त्या नवजात शिशूचा जीव वाचवण्यासाठी त्याचा पिता जे प्रयत्न करतो त्याला सर्वोपरीने सहाय्य मिळत जाते. त्याच्या हातापायातील शृंखला गळून पडतात, कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडतात, रखवालदार गाढ झोपी जातात, मुसळधार पावसातून वाटचाल करत असतांना प्रत्यक्ष शेषनाग आपल्या फण्याचे छत्र त्याच्या माथ्यावर धरतो. दुथडीने वाहणारे यमुना नदीचे पाणी दुभंगून त्याला पलीकडे जायला वाट करून देते. गोकुळात गेल्यावर नंद यशोदा निद्रितावस्थेत असतात, पण त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असतो. अशा प्रकारे सर्व अडचणी एक एक करून दूर होत जातात आणि बाल श्रीकृष्ण सुखरूपपणे गोकुळात जाऊन पोचतात. ही कथा किती सुरस आहे पहा! देव आहे म्हणून तो एकदम वसुदेव देवकींना त्यांच्या त्रासातून मुक्त करत नाही की इकडे अदृष्य होऊन तिकडे प्रगट होत नाही.

त्यानंतरसुद्धा आपला शत्रु जन्माला आला आहे आणि गोकुळामध्ये तो वाढतो आहे याची माहिती कंसाला मिळते आणि त्या मुलाला ठार मारून टाकण्याचे अनेक उपाय तो करतो, पण ते सफळ होत नाहीत. यातसुद्धा कृष्णाला मारायला आलेल्या दुष्टांना तो कोठल्याही शस्त्राने न मारता त्यांचाच डाव त्यांच्या अंगावर उलटवतो. त्याला आपले विषारी दूध पाजून मारायला आलेल्या पूतनामावशीचे दूध पितापिताच तो तिचे प्राण शोषून घेतो तर पाण्यात पडलेला चेंडू आणायचे निमित्य करून यमुनेच्या डोहात मुक्काम करून बसलेल्या कालिया नागाच्या फण्यावर नाचून त्याला चेचून काढतो आणि तिथून निघून जायला भाग पाडतो. अखेरीस कंस त्याला मुष्टीयुद्धाच्या खेळात भाग घेण्याचे आमंत्रण देतो. “मर्दका बच्चा होगे तो खुलकर सामने आ।” वगैरे संवाद हल्लीच्य़ा हिंदी सिनेमात असतात तशा प्रकारे दिलेले हे आव्हान स्वीकारून कृष्ण मल्लयुद्धाच्या आखाड्यात उतरतो. डब्ल्यू डब्ल्यू एफ् सारख्या या फ्रीस्टाईल कुस्त्यांना त्या काळात पंच नसत. प्रतिस्पर्ध्याने हार कबूल करेपर्यंत त्याला झोडत रहायचे असाच नियम होता. त्यात कृष्णाचा जीव जाईपर्यंत त्याला झोडपायचा आदेश कंसाने आपल्या आडदांड मल्लांना दिला होता. इथेही तशाच प्रकाराने कृष्णाने त्यांनाच लोळवले. इतकेच नव्हे तर कंसालाही ललकारून त्याचा जीव घेतला. या सगळ्या प्रकारात एक गोष्ट दाखवली आहे. ती म्हणजे गैरमार्गाने मिळवलेल्या राज्यसत्तेचा सुखासुखी उपभोग कंसाला घेता येत नाही. त्याच्या डोक्यावर असुरक्षिततेची तलवार सतत टांगती राहिलेली असते आणि अशाच अवस्थेत त्याचा अंत होतो.

असा प्रकाराने दुष्ट कंसाचा नाश केल्यानंतर कृष्णाने त्याच्या डोक्यावरील राजमुकुट स्वतः धारण केला नाही. उग्रसेन राजाला पुन्हा राजपद दिले आणि विधीवत शिक्षण घेण्यासाठी तो सांदीपनी मुनींच्या आश्रमात चालला गेला. शिक्षण संपवून परत आल्यानंतरसुद्धा त्याने आपल्या सामर्थ्याच्या बळावर मोठा सम्राट बनण्याची महत्वाकांक्षा धरली नाही. वारंवार होणाऱ्या लढायांच्या धुमश्चक्रीमुळे त्रस्त झालेल्या यादवांना सोबत घेऊन त्याने मथुरासुद्धा सोडली आणि दूर सौराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर द्वारका नगरी वसवून तिथे त्यांच्यासह तो स्थाईक झाला. मात्र यादवांना स्थैर्य मिळवून दिल्यावर तो हस्तिनापूरच्या राजकारणात लक्ष घालायला लागला. पांडवांना त्याने हर तऱ्हेने मदत केली. पण कौरवांबरोबरसुद्धा चांगले संबंध राखले. पांडव व कौरवांमधील युद्ध टाळण्यासाठी शिष्टाईचा प्रयत्न केला. अर्जुनाचे सारथ्य करायचे ठरवले.युद्ध अटळ झाल्यावर “न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार।” असे म्हणत तो वरवर तटस्थ राहिला. सुदर्शनचक्र हातात घेऊन प्रत्यक्ष युद्धात उतरला नाही. फक्त अर्जुनाचे सारथ्य करायचे ठरवले. द्वारकेच्या राण्याने आजच्या भाषेत ड्रायव्हर किंवा शोफर होण्यात त्याला कसलीही अप्रतिष्ठा वाटली नाही. ते काम करता करता त्याने युक्तीच्या ज्या चार गोष्टी सांगितल्या त्याला तोड नाही. भीष्मपितामह, गुरु द्रोणाचार्य, कर्ण व दुर्योधन या कौरवांच्या सेनापतींचे कच्चे दुवे नेमके ओळखून त्यांचा पाडाव करण्याच्या युक्त्या श्रीकृष्णाने सांगितल्याच. युद्धाच्या सुरुवातीलाच “सीदंति मम गात्राणि मुखंचपरिशुष्यते।” असे म्हणून शस्त्र टाकून बसलेल्या अर्जुनाला “कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। ” हा भगवद्गीतेचा उपदेश करून युद्ध करण्यास प्रवृत्त केले. हा उपदेश आजतागायत संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शन करत आला आहे.

असा हा चतुरस्र श्रीकृष्ण! दहीदूध चोरण्याचा खट्याळपणा करणारा म्हणून मुलांना प्रिय, गोपिकांची छेड काढणारा आणि त्यांच्याबरोबर रासक्रीडा करणारा म्हणून युवकांना आवडणारा, रुक्मिणीहरण करून प्रेमीजनांना आधार देणारा आणि भगवद्गीता सांगणारा विद्वज्जनांचा योगेश्वर! त्याच्या आयुष्यातील कथा अत्यंत सुरस आणि मनोरंजक तशाच बोधप्रद आहेत व त्यामुळे सर्वांनाच त्या सांगायला तसेच ऐकायला खूप आवडतात. म्हणूनच त्याची जयंती इतक्या उल्हासाने साजरी केली जाते.