मराठी मातृदिन, पिठोरी अमावस्या, आईवरील गाणी

motherSon

मातेची महता सांगणारी काही लोकप्रिय गाणी या लेखाच्या खाली दिली आहेत …  संपादन १७-१२-२०१८

————————

सहज कॅलेंडर पहात असतांना दिसले की परवा ५ तारखेला ‘मातृदिन’ आहे. तीन महिन्यापूर्वीच एक ‘मदर्स डे’ येऊन गेला होता. काही मुलांनी त्या दिवशी त्यांच्या मातांना भेटकार्डे पाठवली होती, तर कोणी आपल्या माताश्रींना (मातोश्री हा शब्द आता जुना झाला असावा आणि आता त्याला एक वेगळाच अर्थ येऊन चिकटला आहे.) घेऊन मॉल्समध्ये गेले होते आणि त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीच्या लिपस्टिक्स, क्रीम्स आदि सौंदर्यप्रसाधने त्यांना घेऊन दिली होती, कांही मायाळू आयांनी तिथल्या रेस्तराँमध्ये आपल्या आवडत्या पदार्थांची खादाडी करून घेतली होती.  त्या दिवसाच्या निमित्याने मी ही एक लेख लिहून मातांची महती सांगितली होती. पण त्यानंतर आता लगेच पुन्हा एक ‘मातृदिन’ आला आहे. अर्थातच हा भारतीय किंवा मराठी संस्कृतीतला सण असणार हे उघड होते.

माझ्या आठवणीत तरी मी हा सण साजरा केलेला मला आठवत नव्हता. मी अजून लहान असतो तर हा प्रश्न माझ्या आईला विचारला असता आणि तिने नक्की त्याचे उत्तर दिले असते. सणवार, व्रतेवैकल्ये या बाबतीत माझी आई तर चालता बोलता ज्ञानकोष होती. तिला सगळ्या कहाण्या तोंडपाठ होत्या. तरीसुध्दा दर वर्षी श्रावण महिन्यात रोज संध्याकाळी घरातल्या मुलांना एकत्र बसवून त्या त्या दिवसाची किंवा तिथीची कहाणी मोठ्याने वाचायला ती मुलांना सांगत असे आणि स्वतः शेजारी बसून भक्तीभावाने त्या ऐकत असे. वाचणा-या मुलाने चूक केली तर ती लगेच दाखवूनही देत असे. पण मला तरी कधी ‘मातृदिनाची कहाणी’ वाचल्याचे आठवत नव्हते.  टीव्ही पहातांना त्यातल्या एका मालिकेतल्या आईला पिठोरी अमावास्येचे व्रत करतांना एकदा दाखवले होते. आपल्या मुलांना उदंड आयुष्य लाभो या इच्छेने माता हे व्रत करतात म्हणून याला ‘मातृदिन’ असे म्हणत असावेत एवढे त्यातून समजले. कधी कधी मनोरंजनातूनही ज्ञानात भर पडते असे म्हणतात ते यासाठीच.

आईला विचारण्याची सोय आता उपलब्ध नसल्यामुळे गुगलवर शोध घेऊन पाहिले. मातृदिन आणि पिठोरी अमावास्येसंबंधी त्रोटक माहिती मिळाली. आपण ‘मदर्स डे’ ऐवजी ‘मातृदिन’ का साजरा करू नये? असा प्रश्नसुध्दा एका अनुदिनी लेखकाने विचारला होता. पिठोरी अमावस्येचे व्रत माता आपल्या मुलांसाठी करतात आणि मदर्स डे हा दिवस मुले त्यांच्या मातांसाठी साजरी करतात हा फरक त्याच्या लक्षात आला नसावा. “फादर्स डे आणि मदर्स डे करून जीवंतपणीच आपल्या आईबापांचे कसते दिवस घालता?” असा प्रश्न मकरंद अनासपुरे एका चित्रपटात आपल्या इंग्रजाळलेल्या मित्रांना विचारतो ते ही आठवले.

या मराठी मातृदिनाच्या दिवशी माता पिठोरी अमावस्येचे व्रत करतात. त्या दिवशी दिवसभर उपवास करून संध्याकाळी आठ कलशांवर आठ मातृका (देवीची रूपे) ठेऊन त्यांची आणि चौसष्ठ योगिनींची पूजा करतात आणि आपले सौभाग्य आणि विशेषतः मुलांसाठी आयुरारोग्य, सुखसंपत्ती वगैरे मागून त्यांच्यासाठी प्रार्थना करतात. व्रतासाठी केलेले पक्वान्न म्हणजे बहुधा पु-या डोक्‍यावर घेऊन “कोण अतिथी आहे काय?’ असे विचारतात. एकेक मुलांनी मागून येऊन उत्तर द्यायचे. “मी आहे.” आणि एक पुरी घ्यायची. अखेर आईने त्या सगळ्या मुलांना पक्वान्ने खायला घालायची. पूर्वी पूजेच्या मूर्ती पिठाच्या करीत, सध्या तशी चित्रे मिळतात. या दिवशी नैवेद्यासाठी सगळी पिठाची पक्वान्ने बनवतात म्हणून या दिवसाला “पिठोरी अमावस्या’ असे नाव पडले असणार.

पुराणकाळात एका स्त्रीला दरवर्षी श्रावण अमावास्येला एक मूल होत असे आणि लगेच ते मरून जात असे. त्याच दिवशी तिच्या आजे सास-याचे श्राध्द असे पण श्राध्दाला आलेले भटजी उपाशीच निघून जात असत. असे ओळीवार सात वर्षे झाल्यानंतर त्या स्त्रीच्या सास-याने तिला तिच्या नवजात अर्भकाच्या शवासकट घरातून हाकलून दिले. निराधार होऊन मरण्यासाठी ती बाई अरण्यात जाते. त्या निराश स्त्रीला रानात चौसष्ट योगिनी भेटल्या. तिने त्यांना आपले दुःख सांगितल्यावर “तुझी-मुले जगतील’ असा योगिनींनी वर दिला. त्या वरामुळे त्या स्त्रीचे सर्व मुलगे जिवंत झाले. मग त्या स्त्रीने आपल्या पुत्रांसह घरी जाऊन चौसष्ट योगिनींची पूजा केली. अशी या व्रताची कथा आहे.

ज्ञात असलेली बहुतेक सगळ्या प्रकारची व्रते करणारी माझी आई हे व्रत का करत नव्हती असा विचार माझ्या मनात आला आणि त्याचे उत्तरही मिळाले. ज्यांची मुले जगत नाहीत अशा स्त्रिया पिठोरीचे व्रत करतात. सर्व स्त्रियांनी केलेच पाहिजे असे हे व्रत नाही. ज्यांची संतती जगत नाही, अशाच स्त्रियांनी हे व्रत करावे. आमच्या घरी हा प्रॉब्लेम नसल्यामुळे हे व्रत कधी झाले नाही.

यासंबंधी अधिक माहिती गूगलवर आणि खालील स्थळांवर मिळेल.
http://marathiakanksha.blogspot.com/2010/08/blog-post_18.html
http://zampya.wordpress.com/


मातेचे गुणगान करणारी कांही अजरामर काव्ये मातृदिनानिमित्य देत आहे.

’आई !’ म्हणोनी कोणी । आईस हाक मारी ।
ती हाक येइ कानी । मज होय शोककारी ।।
नोहेच हाक माते । मारी कुणी कुठारी ।
आई कुणा म्हणू मी ? । आई घरी न दारी !।
ही न्यूनता सुखाची । चित्ता सदा विदारी ।
स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी ।।

चारा मुखी पिलांच्या । चिमणी हळूच देई ।
गोठ्यात वासरांना । या चाटतात गाई ।।
वात्सल्य हे पशूंचे । मी रोज रोज पाही ।
पाहून अंतरात्मा । व्याकूळ मात्र होई ।।
वात्सल्य माउलीचे । आम्हा जगात नाही ।
दुर्भाग्य याविना का ? । आम्हास नाही आई ।।

शाळेतुनी घराला । येता धरील पोटी ।
काढून ठेवलेला । घालील घास ओठी ।।
उष्ट्या तशा मुखाच्या । धावेल चुंबना ती ।
कोणी तुझ्याविना गे । का ह्या करील गोष्टी ?
तूझ्याविना न कोणी । लावील सांजवाती ।
सांगेल ना म्हणाया । आम्हा ’शुभं करोति’ ।।

ताईस या कशाची । जाणीव काही नाही ।
त्या सान बालिकेला । समजे न यात काही ।।
पाणी तरारताना । नेत्रात बावरे ही ।
ऐकूनि घे परंतू । ’आम्हास नाहि आई’ ।।
सांगे तसे मुलीना । ’आम्हास नाहि आई’ ।
ते बोल येति कानी । ’आम्हास नाहि आई’ ।।

आई ! तुझ्याच ठायी । सामर्थ्य नंदिनीचे ।
माहेर मंगलाचे । अद्वैत तापसांचे ।।
गांभीर्य सागराचे । औदार्य या धरेचे ।
नेत्रात तेज नाचे । त्या शांत चंद्रिकेचे ।।
वात्सल्य गाढ पोटी । त्या मेघमंडळाचे ।
वात्सल्य या गुणांचे । आई तुझ्यात साचे ।।

गुंफूनि पूर्वजांच्या । मी गाइले गुणाला ।
साऱ्या सभाजनांनी । या वानिले कृतीला ।।
आई ! करावया तू । नाहीस कौतुकाला ।
या न्यूनतेमुळे ही । मज त्याज्य पुष्पमाला ।।
पंचारती जनांची । ना तोषवी मनाला ।
परि जीव बालकाचा । तव कौतुका भुकेला ।।

येशील तू घराला । परतून केधवा गे !
दवडू नको घडीला । ये ये निघून वेगे ।।
हे गुंतले जिवाचे । पायी तुझ्याच धागे ।
कर्तव्य माउलीचे । करण्यास येइ वेगे ।।
रुसणार मी न आता । जरि बोलशील रागे ।
ये रागवावयाही । परि येइ येइ वेगे ।।
कवी – यशवंत
———————————
आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही ।
म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ, आ, ई ।।
मुलांनो शिकणे अ, आई ।।

तीच वाढवी ती सांभाळी ।
ती करी सेवा तीन त्रिकाळी ।
देवानंतर नमवी मस्तक, आईच्या पायी ।।

कौसल्येविण राम न झाला ।
देवकीपोटी कृष्ण जन्मला ।
शिवरायाचे चरित्र घडवी, माय जिजाबाई ।।

नकोस विसरू ऋण आईचे ।
स्वरूप माउली पुण्याईचे ।
थोर पुरुष तू ठरून तियेचा, होई उतराई ।।

कवी – ग. दि. माडगूळकर
————————————
आई तुझी आठवण येते;
सुखद स्मृतींच्या कल्लोळांनी काळीज का जळते ।।

वात्स्ल्याचा कुठें उमाळा, तव हातांचा नसे जिव्हाळा ।
हृदयांचे मम होऊन पाणी, नयनीं दाटून येते ।।

आई तुझ्याविण जगीं एकटा, पोरकाच मज म्हणति करंटा ।
व्यथा मनींची कुणास सांगूं, काळीज तिळतिळ तुटतें ।।

हांक मारितो आई आई, चुके लेकरूं सुन्या दिशाही ।
तव बाळाची हांक माउली, का नच कानीं येते ।।

सुकल्या नयनीं नुरले पाणी, सुकल्या कंठीं उमटे वाणी ।
मुकें पाखरूं पहा मनाचें, जागीं तडफड करतें ।।

नको जीव हा नकोच जगणें, आईवांचुन जीवन मरणें ।
एकदांच मज घेई जवळीं, पुसुनी लोचनें मातें ।।

कवी – बाळ कोल्हटकर

वटपौर्णिमा, सावित्रीची कथा आणि पर्यावरण

नवी भर दि.१४-०६-२०१९ : वटसावित्री

पतिव्रता सावित्रीचे यजमान सत्यवान याचे प्राण हरण करण्यासाठी यमराज स्वतः येतात. सावित्री त्यांच्यापाठोपाठ जाते यमाशी संभाषण करते आणि त्याला चातुर्याने शब्दांत अडकवून आपल्या पतीचे प्राण परत आणते एवढी कथा सर्वांनाच माहीत असते. त्यात थोडीशी भर अशी आहे.

ही कथा महाभारताच्या वनपर्वात दिली आहे. मार्कंडेय ऋषींनी ही कथा युधिष्ठिराला सांगितली आहे. गायत्री आणि सावित्री या दोघी ब्रह्मदेवाच्या पत्नी असतात, त्यातल्या सावित्रीच्या वरदानाने अश्वपति या राजाला कन्यारत्न प्राप्त होते म्हणून तिचे नांव सावित्री ठेवले जाते. अश्वपति हा मद्र देशाचा राजा असतो. राजकन्या सावित्री अश्वविद्या, शस्त्रविद्या वगैरे सर्वांमध्ये प्रवीण असते. तिला साजेसा वर मिळणे कठीण असते. ती स्वतःच देशभ्रमणाला निघते. तिला एका वनामध्ये रहात असलेला द्युमत्सेन राजाचा पुत्र सत्यवान भेटतो. या राजाला त्याच्या विश्वासू लोकांनीच दगा देऊन पदच्युत केलेले असल्यामुळे तो वनवासी झालेला असतो. सत्यवान हा देखणा, सदाचरणी आणि वीरपुरुष असतो. मी त्याच्याशीच लग्न करणार असा हट्ट सावित्री धरते. त्याला अपमृत्यू येणार असल्याचे भविष्य प्रत्यक्ष नारदमुनींनी सांगितलेले असते, पण ते ऐकूनसुद्धा सावित्रीचा निर्धार ढळत नाही. ती पित्याचा राजवाडा सोडून पतीसोबत अरण्यात रहायला जाते.

ज्येष्ठ पौर्णिमेला त्याचे मरण ठरलेले असते म्हणून त्या दिवशी ती स्वतः सत्यवानाच्यासोबत अरण्यात जाते आणि यमाला भेटून त्याच्याशी संवाद साधते. यम तिला धर्मशास्त्रातले अनेक प्रश्न विचारतात. त्या सर्वांची समर्पक उत्तरे सावित्री देते. प्रत्येक उत्तरानंतर यम तिला एक वर देत जातो, पण तिला सत्यवानाचे प्राण वाचवायचेच असतात. त्यामुळे ती यमाची साथ सोडत नाही. त्याच्याशी तात्विक संवाद करीतच राहते. अखेर खालील पांच वर तिच्या पदरात पडतात.
१. तिच्या सासूसासऱ्यांना दृष्टी प्राप्त व्हावी.
२. तिच्या सासऱ्याला त्याचे राज्य परत मिळावे.
३. तिच्या वडिलांना शंभर पुत्र व्हावेत.
४. तिला तिच्या पतीपासून शंभर पुत्र व्हावेत. आणि अर्थातच यासाठी
५. तिचा पती पुनः जीवित व्हावा.

विदुशी लीनाताई मेहेंदळे यांनी दिलेल्या व्याख्यानावरून साभार.

———————————–

 

वनस्पती जमीनीमधून पाणी आणि हवेतून कर्बद्विप्राणील (कार्बन डायॉक्साईड) वायू शोषून घेतात आणि सूर्यप्रकाशामधून ऊर्जा घेऊन या दोन साध्या अणूंचा संयोग घडवून आणून त्यातून सेंद्रिक (ऑर्गॅनिक) पदार्थांचे प्रचंड गुंतागुंतीचे अणू तयार करतात. या क्रियेमधून प्राणवायूचे विमोचन होऊन हा उपयुक्त वायू हवेत सोडला जातो आणि नव्याने तयार झालेले सेंद्रिय पदार्थ त्या वनस्पतीच्या निरनिराळ्या भागात साठवून ठेवले जातात. शाकाहारी प्राणी त्यांचे भक्षण करून आपला उदरनिर्वाह करतात आणि मांसाहारी पशू त्या प्राण्यांना गट्ट करतात. सर्वच प्राण्यांना जीवंत राहण्यासाठी आवश्यक असलेला प्राणवायू आणि अन्नपदार्थ अशा प्रकारे वनस्पतींपासूनच मिळतात. कोणताही प्राणी थेट हवापाण्यापासून आपले अन्न तयार करू शकत नाही. निसर्गाकडून हे सामर्थ्य फक्त वनस्पतींना मिळाले आहे.

प्राचीन काळात जेंव्हा कारखानदारी अस्तित्वात नव्हती अशा काळात माणसाचे दैनंदिन जीवन पूर्णपणे निसर्गावर म्हणजे वनस्पती विश्वावरच अवलंबून होते. याची जाणीव आपल्या पूर्वजांना होती. झाडांना बोलता येत नसले तरी तेही सजीवच आहेत आणि त्यांचेबद्दल कृतज्ञपणा दाखवणे हे आपले कर्तव्य आहे हे सर्वांना समजावे आणि अधोरेखित केले जावे या हेतूने त्यांनी विविध वृक्षांना आपल्या धार्मिक परंपरांमध्ये महत्वाचे स्थान दिले. वड आणि पिंपळ हे वृक्ष आकाराने प्रचंड असतात. त्यांचे आयुष्य खूप मोठे म्हणजे शतकानुशतके असते. माणसांच्या अनेक पिढ्या त्यांच्या सावलीत सुखावतात तर त्याच्याही अनेकपटीने जास्त पक्ष्यांच्या पिढ्या या वृक्षांवर घरटी करून राहून जातात. बहुतेक सर्व मंदिरांच्या परिसरात वटवृक्ष किंवा पिंपळाचे झाड किंवा दोन्हीही लावली आणि टिकवून ठेवली जातात आणि मंदिरात देवदर्शनाला जाणारे भाविक या झाडांनाही नमस्कार करतात. अशी आपली सांस्कृतिक परंपरा आहे.

ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत केले जाते. वडाच्या झाडाची पूजा हा या व्रतातला महत्वाचा भाग आहे. पुराणकाळामधील सावित्री या महान पतिव्रतेने प्रत्यक्ष यमाशी नम्रतापूर्वक पण सखोल तात्विक वाद घातला, अनेक प्रकारे त्याची मनधरणी केली, कोणत्याही परिस्थितीत आपल्या पतीपासून विभक्त न होण्याचा आपला हट्ट सोडला नाही आणि यमाने हरण केलेले सत्यवानाचे प्राण चातुर्याने परत मिळवले अशी कथा आहे. या गोष्टीत सावित्रीचा निग्रह, तिचे पांडित्य आणि चतुराई दिसून येते. हे नाट्य एका वडाच्या झाडाखाली घडले असावे आणि एवढाच त्याचा संबंध या कथेशी असावा. वटवृक्षाप्रमाणे आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे आणि आपले सौभाग्य अखंड रहावे अशी मनोकामना या व्रताच्या निमित्याने व्यक्त करून व़टवृक्षाचे महत्व लोकांच्या मनावर ठसवावे अशा विचाराने ही परंपरा सुरू झाली असावी.

उद्या वटपौर्णिमा आहे. या निमित्याने स्त्रिया वडाची पूजा करतील, त्या झाडाला दोरा गुंडाळण्यासाठी त्याला प्रदक्षिणा घालतांना त्याचा बुंधा किती रुंद आणि मजबूत आहे हे त्यांच्या लक्षात येईल. विशाल वृक्षाचा भार पेलण्यासाठी त्याचा बुंधा बळकट असणे किती आवश्यक आहे हे त्यांना कळेल. जीवनातील कर्तव्यांचा बोजा पेलण्यासाठी खंबीरपणा कसा आवश्यक आहे याचा वस्तुपाठ त्यांना मिळेल. वडाची एक लहानशी फांदी तोडून घरी आणून तिची पूजा करणा-यांना यातले काहीच मिळणार, कळणार किंवा वळणार नाही. जी फांदी स्वतःच दोन चार दिवसात सुकून नष्ट होणार आहे किंवा त्याच्याही आधी म्हणजे दुस-या दिवशीच कच-याच्या ढिगा-यात टाकून दिली जाणार आहे ती बिचारी कोणाला कसला संदेश, स्फूर्ती किंवा आशीर्वाद देणार?

वडाच्या फांदीची पूजा करणे असे विकृत रूप या व्रताला शहरांमध्ये मिळाले आहे. त्यासाठी आधीच वडाच्या झाडांच्या फांद्या तोडून त्यांना जायबंदी केले जात आहे. ज्याच्याबद्दल कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी ज्याची पूजा करायची, त्याच झाडाची या कारणासाठी मोडतोड करणे हा मूळ उद्देशाचा केवढा विपर्यास आहे? सावित्रीची कथा तर आता विस्मृतीमध्ये हरवून गेली आहे. तिने यमधर्माशी कसली चर्चा केली हे क्वचितच कोणाला माहीत असेल. पतीनिधनाच्या दुर्धर प्रसंगी तिने आपला तोल सांभाळून इतका सखोल तात्विक संवाद केला होता ही गोष्ट कोणाला माहीतसुध्दा नसेल.

माझ्यासारखा वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारा माणूस पुराणातल्या भाकडकथांवर कसा काय विश्वास ठेऊ शकतो? असा प्रश्न काही लोकांच्या मनात येईल. त्यामुळे माझी याबाबतची भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. माणसाच्या आयुष्यात भविष्यकाळात घडणा-या घटना आधीपासून ठरलेल्या नसतात, त्यामुळे त्यांचे अचूक भाकित करता येणे अशक्य आहे. हातावरील रेषा किंवा आकाशातल्या ग्रहांच्या भ्रमणाशी त्याचा काडीमात्र संबंध नसतो असे माझे ठाम मत आहे. सावित्रीच्या कथेमधल्या सत्यवानाचे आयुष्य अल्प आहे असे भाकित त्या काळातील निष्णात ज्योतिष्यांनी केलेले असले तरीही त्याला अखेर चारशे वर्षांचे दीर्घायुष्य लाभते हा विरोधाभास त्या कथेतच आहे आणि पुढे असे सगळे कथानक होणार हे जर आधीच ठरलेले असले तर मग सावित्रीच्या कथेतील हवाच निघून जाईल, तिच्या गुणांना किंवा प्रयत्नांना काही मोलच उरणार नाही.

रेड्यावर आरूढ होऊन साक्षात यमराज तिथे येतात, सत्यवानाच्या शरीरामधून अंगठ्याएवढ्या आकाराचा त्याचा प्राण काढून घेऊन ते परत जायला निघतात, हे सगळे सावित्रीच्या मर्त्य डोळ्यांना दिसते. त्यांच्या मागोमाग तीही तीन दिवस तीन रात्री चालत राहते, यमाशी वाद विवाद संवाद वगैरे करून त्याला शब्दात पकडते आणि सत्यवानाचे प्राण त्याच्या ताब्यातून मिळवून घेते वगैरे कथाभाग विज्ञानाच्या कसोटीवर सत्य घटना ठरू शकत नाही. लहान मुलांना गोष्टी सांगतांना काऊ, चिऊ, वाघोबा, ससुला वगैरे प्राणी माणसांसारखे वागतात आणि बोलतात असे आपण सांगतो तेंव्हा ते खरे नसते हे त्यांनाही माहीत असते, पण मनोरंजक असल्यामुळे मुले त्या गोष्टी आवडीने ऐकून घेतात. नाटक, सिनेमा पाहतांना, कादंब-या वाचतांना त्यातल्या गोष्टी काल्पनिक असतात हे आपल्याला ठाऊक असते तरीही आपण त्यात गुंगून जातो. पुराणातल्या कथासुध्दा अशाच प्रकारे लोकांना आवडाव्यात यासाठी रंजक केलेल्या असतात. ही गोष्ट सुध्दा बहुतेक लोक जाणतात. आजकाल तर यमराज आणि त्याचे वाहन असलेला रेडा हे दोघेही विनोदाचे विषय झाले आहेत आणि त्यांची यथेच्छ कुचेष्टा केली जात असते. कोणालाच त्यांचे भय वाटत नाही. तेंव्हा पुराणामधील कथांमधले अक्षर न् अक्षर सत्य आहे असा अट्टाहास न धरता त्यांचे तात्पर्य आणि त्यातून मिळणारा बोध घेणे महत्वाचे आहे. ज्या कथांमधून असा बोध व मार्गदर्शन मिळते अशाच निवडक कथा एका पिढीकडून पुढच्या पिढीला सांगितल्या जात आपल्यापर्यंत आल्या आहेत आणि त्यांमध्ये असलेल्या मौलिक तत्वांमुळे त्या चिरकाल टिकून राहणार आहेत.

सावित्रीच्या कथेमधला अवास्तव भाग काढून टाकला तरीसुध्दा बरेच काही अद्भूत असे तिच्यात शिल्लक राहते. लाडात वाढत असलेली एक बुध्दीमान राजकन्या ज्ञानप्राप्तीचा मार्ग धरते आणि शिक्षण घेऊन शास्त्रनिपुण बनते, त्या काळात उपलब्ध असलेल्या अनेक विद्या ती संपादन करते. तिचे आईवडील या बाबतीत आडकाठी न आणता तिला प्रोत्साहन देतात. शिक्षणाद्वारे ती इतके उच्च स्थान गाठते की तिला योग्य असा पती शोधणे तिच्या पालकांच्या आवाक्याबाहेर होऊन गेल्यामुळे तिने आपला वर स्वतः शोधावा असे सुचवले जाते. या उद्देशाने देशोदेश धुंडाळल्यानंतर आंधळ्या आईवडिलांसोबत एका पर्णकुटीत राहणा-या रूपगुणसंपन्न आणि सुशिक्षित, सुसंस्कृत अशा सत्यवानाची निवड ती करते. हे स्थळ आईवडिलांना पसंत नसते. इतर काही लोकांनासुध्दा हे आवडत नाही किंवा त्यांना सत्यवानाचा हेवा वाटला असेल. तो अल्पायुषी असल्याचे भाकित पसरवले जाते, पण तरीही सावित्रीचा निर्णय बदलत नाही. राजवाड्यामधील ऐशोआरामाचे जीवन सोडून ती पतीगृही जाते. त्याच्या नित्याच्या कामात त्याला मदत करते. जळणासाठी लाकडे गोळा करायला त्याच्यासोबत अरण्यात जाते. अपघातामुळे तो उंचावरून खाली पडून निष्चेष्ट होतो. गोंधळून न जाता धैर्याने तीन दिवस सतत प्रयत्नांची पराकाष्ठा करून ती त्याचे प्राण वाचवते. घोर निराशेच्या अंधारात सापडलेल्या सासूसास-यांना नवी दृष्टी देऊन त्यांचे वैभव मिळवून देते. हे सगळे अलौकिक आणि दिव्य आहे. ते सगळे खरोखर असेच घडले होते की नव्हते याला माझ्या दृष्टीने फारसे महत्व नाही. सावित्रीच्या कथेमध्ये भेटणारी ही नायिका मला अद्वितीय भासते. वर्षातून एकदा तिची कहाणी ऐकूनसुध्दा अनेकांना त्यातून नवा प्रकाश मिळण्याची शक्यता आहे.

आता आपण वटसावित्रीव्रताकडे पाहू. आपल्या पूर्वजांनी खुबीने या निमित्य सर्व महिलांना वटवृक्षाकडे आकृष्ट केले आहे. वटवृक्षाचे वेगळेपण मी वर दाखवलेले आहेच. माझ्या कल्पनेनुसार पूर्वीच्या काळात सहज उपलब्ध असणारा हा वृक्ष एकंदरीतच वनस्पतीविश्वाचे प्रतीक मानायला हरकत नाही. मध्ययुगामध्ये अशी सामाजिक परिस्थिती निर्माण झाली होती की स्त्रियांना घराबाहेर पडणेच कठीण झाले होते.  मंगळागौर, हरतालिका, व़टसावित्री यासारख्या व्रतांच्या निमित्याने त्यांना आपापल्या घराबाहेत पडून एकत्र जमायची संधी दिली गेली. त्यावेळी इतर महिलांवर छाप पाडण्यासाठी आणि जास्तीत जास्त चांगले दिसण्यासाठी नटणे, उंची वस्त्रे आभूषणे धारण करणे ओघानेच आले. सौंदर्यप्रदर्शनाचा हा महिलांचा आवडता भाग आज सुध्दा सर्वत्र उत्साहाने पाळला जातो असे दिसते. घराबाहेर पडण्यासाठी नवरोबाची संमती मिळावी म्हणून हे सगळे त्याच्याच भल्यासाठी करत असल्याचा आव आणला गेला. म्हणजे त्याचा विरोध राहणार नाही. पुढील सात जन्म दर वेळी हाच पती मिळावा असे सांगण्यामुळे त्याचा अहंभाव जास्तच सुखावला जाईल अशी अपेक्षा होती. (अलीकडे मात्र हा आपल्यावर अन्याय असल्याची ओरड विनोदी नाटकांमध्ये होऊ लागली आहे.) सावित्री आणि सत्यवान दोघेही इतके पुण्यवान होते की एक तर त्यांच्यासाठी स्वर्गात जागा राखून ठेवल्या असतील किंवा त्यांना मोक्षप्राप्ती झाली असेल. त्यांच्या बाबतीत पुढील सात जन्मांचा प्रश्नच नसणार. सगळ्या बाजूंनी मोर्चेबांधणी करून झाल्यावर स्त्रियांना कोंदट माजघरातून बाहेर काढून मोकळ्या जागेत वडाच्या विशालकाय झाडाखाली जमवण्याचे योजले गेले. ज्येष्ठ महिना तसा कडक उन्हाचाच असतो. त्यात डेरेदार वटवृक्षाची शीतल सावली जास्तच आनंददायी वाटते. (या वर्षी मात्र धोधो पाऊस पडत आहे.) या निमित्याने त्या भव्य वृक्षाशी जवळीक निर्माण होते, आपुलकी वाटू लागते. कळत नकळत निसर्गाशी एक नाते जोडले जाते.

पूर्वीच्या काळात वडाची पूजा केल्यानंतर वटसावित्रीची कथा ऐकली जात असे. त्यात सुरस आणि चमत्कृतीपूर्ण कथानक आहेच, सावित्री आणि यमधर्म यांचा संवादसुध्दा असे. हिंदू धर्मशास्त्रांमधील अनेक मुद्दे यातून श्रोत्यांच्या कानावर आपसूक प़डत. पुराणातली सावित्री सर्व शास्त्रांमध्ये पारंगत होती, पण मधल्या काळात स्त्रियांना शिक्षणापासून वंचित केले गेले होते. व्रताचा भाग म्हणून अशा पोथ्यांचे श्रवण केल्यामुळे त्यांना धर्माचे थोडे ज्ञान मिळण्याची संधी मिळायची.
असे अनेक स्तुत्य विचार या सणामागे दिसतात.


नवी भर – दि.१४-०६-२०१९

वट पौर्णिमा – एक मुक्त चिंतन

वड, उंबर, पिंपळ, जांभूळ, आंबा हे पाच अतिशय पवित्र वृक्ष मानले गेलेले आहेत.

उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा पाण्याचे व अन्नाचे दुर्भिक्ष्य असते तेव्हा या घनदाट वृक्षांची सावली असते, यांची फळे पशुपक्षांचे पोट भरतात. यांच्या जवळ पाण्याचे नैसर्गिक स्रोत असतात. या वृक्षांचे जतन करणे सर्वच प्राणीमात्रांच्या साठी आवश्यक असते. यासाठी या वृक्षांच्या सन्निध्यात देवळे असतात व त्यांचे संरक्षण भक्त करतात.

सध्याच्या जंगलतोडीच्या जमान्यात तर या वृक्षांचे महत्व अधिक वाढले आहे त्यांच्या निमित्ताने इतरही सजीव सृष्टीचे महत्व माणसाला कळू शकते.

आदिकालापासून वनांचे रक्षण स्त्रिया करीत आल्या आहेत. त्यांच्या मधील उपजत माया त्यांना झाडांना पाणी घालणे, खत घालणे, त्यांची देखभाल करणे हे करवून घेत आलेली आहे.

वटसावित्रीच्या कथेच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांना आपले वृक्षसंवर्धनाचे काम व त्या निमित्ताने सावित्रीच्या कथेतून बोधन करुन घेण्याची वेळ आली आहे.

सत्यवानाचे गेलेले प्राण परत आणण्याच्या निमित्ताने सावित्री साक्षात यमधर्माशी संभाषण करते. त्याच्या कडून धर्म समजून घेते, त्याची मर्जी संपादन करते व आपल्या इच्छा पूर्ण करवून घेते.

ते सर्वच संभाषण “देवीभागवतात” व्यासांनी दिलेले आहे. ते वाचून चिंतन करण्याजोगे आहे.

शहरी संस्कृतीत वडाची पूजा करणे व पतीसाठी काही प्रार्थना करणे हे हास्यास्पद मानले जाते.
शहरातील गावभाग, व ग्रामीण, निमग्रामीण भागात अजूनही वडांची पूजा महिला करतात. या महिला बहुतेक करुन बाहेर नोकरी-धंदा न करणार्‍या असतात. त्या त्यांचे कुलाचार त्यांच्या घरातील जुन्याजाणत्या स्रियांच्या मार्गदर्शनाखाली अजूनही करताना दिसतात.

शहरातील काही निसर्गप्रेमी सुशिक्षित महिला वडाची रोपे तयार करतात त्यांचे मोफत वाटप करतात. घरातील कुंडीत ते रोप लावून पूजा करतात.

वनविभागही लाखोंच्या संख्येने अशी रोपे तयार करतात व वाटतात.
काही नगरसेवक या निमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्‌घाटन करतात.
—————————————————–

वटपौर्णिमा आणि माध्यमे

सन २०१८मधला अनुभव:
काल वटपौर्णिमेचा सण होऊन गेला. फेसबुक, वॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियावर या सणाची जितकी टिंगल केली गेली तितकी कदाचित कुठल्याच धर्माच्या कुठल्याच सणाची होत नसेल. वट वट सावित्री काय, वडा (मला) पाव काय, कोणीतर चक्क VAT(69) पौर्णिमा करून टाकली. कुणी वडाला सूत गुंडाळण्याला त्याच्या गळ्याभोवती फास आवळणे म्हंटले. यातून वांचण्यासाठी कुणी वडाला शुभेच्छाही दिल्या. “पूजेला जातांना अंगावर फार जास्त दागिने घालून जाऊ नका, नाहीतर दुसऱ्या बायका पुढच्या जन्मात तुमचा नवरा त्या स्वतःसाठी मागतील” असा सूज्ञ सल्ला कोणी दिला. एका वडाच्या झाडाच्या फांद्या तोडून त्याची अनेक बायका पूजा करतात त्यामुळे त्यांना पुढच्या जन्मांमध्ये सगळ्यांच्या नवऱ्यांचे एक एक पार्ट मिळत जातील असा तर्क कुणी लढवला. “सात जन्म एकच नवरा मिळू दे असे म्हणणे हा समस्त नवऱ्यांवर अन्याय आहे, त्यांना कांही व्हरायटी नको का?” हा जोक जुना झाला. या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी आज पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्याला सात उलट्या प्रदक्षिणा घालाव्यात असा मार्ग सुचवला. “आपला हा जन्म सातवा आहे असा मला साक्षात्कार झाला.” असे एका नवऱ्याने आपल्या बायकोला सांगितले. “पुढच्या वर्षी सुद्धा मला हाच नवरा, पण बायको म्हणून मिळू दे, मग मी या जन्माचे चांगले उट्टे काढीन” असे एक म्हणाली, तर “आता बायको होऊन ती दुसरे काय करते आहे?” असा प्रश्न तिच्या नवऱ्याच्या मनात आला. आता “याच जन्मात सात नवरे मिळू देत असे वरदान कुठल्या झाडाची पूजा करण्याने मिळेल?” याची चौकशी सुरू झाल्यामुळे नवरोबांचे धाबे दणाणले आहे.

गंमत म्हणजे स्वतःला संस्कृतिसंवर्धक का काय ते समजणाऱ्या लोकांनी दिलेल्या स्पष्टीकरणांनी हंसून हंसून पुरे वाट केली. म्हणे एकाच जन्मात दर बारा वर्षांनी शरीरातल्या सगळ्या पेशी बदलतात (त्यांना हे कुणी सांगितले?) म्हणजे बायका आपल्या नवऱ्यांसाठी आणखी बारा सत्ते चौऱ्याऐंशी वर्षाचे आयुष्य मागतात. वडाच्य़ा झाडांमध्ये ऑक्सिजन असते आणखी कुठकुठल्या पॉझिटिव्ह एनर्जी असतात आणि त्या वडाभोंवती फेऱ्या घालणाऱ्या स्त्रियांना प्राप्त होतात म्हणे. “हे आपल्या पूर्वजांना माहीत होते, आजच्या सायंटिस्ट लोकांना यातलं कांही तरी कळतं का?” असे पालुपद त्यांच्या प्रत्येक वाक्याला जोडलेले असतेच. हे सगळे जर त्या मार्कंडेय ऋषीला समजले तर कुठून आपण ही कथा युधिष्ठिराला सांगितली असे त्याला वाटले असणार.

————————-

धुळवड आणि होली (रंगोत्सव)

Holi2007

संपादन दि.१७-०३-२०२२ : होळीचा फराळ ही मजेदार गाण्यांची मालिका या लेखात समाविष्ट केली.

होळी आणि धुळवड यांच्याबद्दल मी पूर्वी लिहिलेले दोन लेख देत आहे. हे लेख सन २००७ आणि २०१२ मध्ये लिहिलेले असले तरी त्यातला मजकूर साधारणपणे एकच आहे.  २४-०३-२०१३
————————-

१. रंगोत्सव २००७

माझ्या लहानपणी मी ग्रामीण भागात पाहिलेली होळी हा सगळा बीभत्सरसाचा प्रकार होता. लाकडे, गोवऱ्या, कडबा (ज्वारीचे खुंट), कागद, चिंध्या, सूप, टोपल्या, केरसुणी यासारख्या हाताला लागतील त्या सगळ्या ज्वलनशील पदार्थांचा अस्ताव्यस्त ढीग रचून फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री त्याची होळी पेटवली जायची. गल्लीतले लोक त्याच्या सभोवती घोळक्याने उभे राहून तिथे असतील, नसतील त्या सगळ्यांच्या नावाने अर्वाच्य शिव्या घालून ठो ठो करून जोरजोरात बोंबलत असत.  “होळी रे होळी, पुरणाची पोळी, —–च्या xx मध्ये बंदुकीची गोळी” ही त्यातल्या त्यात सौम्य शिवी!

आमच्या घरात मात्र संस्कृतीसंरक्षणाचे जास्तच स्तोम असल्यामुळे या गोंधळात आम्ही मुलांनी सामील होणे मंजूर नव्हते. “शिवीगाळ करायची नाही.” असे तीन तीनदा बजावून सांगितल्यानंतर बाहेर काय चालले आहे ते फक्त पाहून यायला परवानगी मिळत असे. दुसऱ्या दिवशी धुळवडीला तर त्या होळीच्या राखेत पाणी ओतून केलेला चिखल एकमेकांना फासला जात असे.  अंगावर चिखलफेक करून झाल्यावर किंवा त्याच्यासोबतच त्या चिखलात लोळणे आणि लोळवणे चालत असे. त्या काळात रोगजंतूंची फारशी दहशत बसलेली नव्हती, तरी किळस वाटत असल्यामुळे मी स्वतः होऊनच त्यापासून दूर रहात होतो. एकंदरीतच होळी आणि धुळवड हे कधीच माझे आवडते सण नव्हते.

मुंबईला अणुशक्तीनगर या आमच्या वसाहतीमधले वैज्ञानिकांचे वातावरण पूर्णपणे वेगळे होते. आधी तोंडात बसलेले “आयला मायला” यासारखे अपशब्द तिथे रहायला गेल्यानंतर गळून पडलेच, मला हिंदी किंवा इंग्रजी शिव्यांची बाधाही झाली नाही. सगळे बोलणे परीटघडीचे होऊन गेले. आमच्या बिल्डिंगमधले उत्साही लोक फक्त या सणासाठीच मुद्दाम चक्क बाजारातून लाकडे विकत आणून त्याची होळी पेटवत असत. त्याच्या सभोवती उभे राहून नेहमीच्या विषयांवरल्या गप्पाच चालायच्या, ट्रान्स्फर, प्रमोशन, सेमिनार, फॉरेन टूर वगैरेंवर पुरुष मंडळींच्या आणि भाज्यांचं लोणचं, साड्यांचा सेल वगैरेंवर महिलावर्गाच्या.

दुसरे दिवशी मात्र हिंदी सिनेमात दाखवतात तशी ओल्या आणि कोरड्या रंगांनी ‘होली’ खेळली जात असे. रंग उडवणे, फासणे, ”हॅप्पी होली” म्हणत कडकडून मिठ्या मारणे वगैरे सगळे काही फिल्मी स्टाईलमध्ये त्यात होत असे. ती खेळतांना घरोघरी जाऊन एकेकाला बाहेर ओढले जात असे. ते लोकही तयारच असत आणि पेढे, बर्फी, लाडू, गुजिया, मठरी, कचोरी, जलेबी, गुलाबजाम वगैरेंनी भरलेली ताटे समोर येत. त्यांचे घास घास करत भरपूर खाणे, ठंडाई पिणे वगैरे झाल्यानंतर सर्वांनी एकत्र जमून गाणी , अंताक्षरी, (व्हेज, नॉनव्हेज) विनोद, कोडी, उखाणे वगैरे धमाल केली जात असे. अखेरची काही वर्षे सार्वजनिक भोजनाची व्यवस्थाही होऊ लागली. फराळ झालेला असला तरी केटररने आणलेले दोन घास अन्न खाऊन होलिकोत्सवाची सांगता होत असे.

आता ते दिवसही गेले, त्यावेळी होळी खेळणारे मित्रही रिटायर होऊन निरनिराळ्या ठिकाणी रहायला गेले. होळीच्या दिवशी त्यांच्या आठवणी मात्र आल्याखेरीज रहात नाहीत.


२. धुळवड आणि होली  २०१२

माझ्या लहानपणी ज्या प्रदेशात आम्ही रहात होतो त्या भागात तरी होळी पौर्णिमा किंवा शिमगा या उत्सवाला बरेच बीभत्स स्वरूप आले होते. घरात पुरणाची पोळी आणि कटाची आमटी खायला मिळत असल्याने आम्ही आनंदात असू, पण बाहेर जाऊन रस्त्यात चाललेल्या सार्वजनिक धिंगाण्यात आम्हाला सहभागी होता येत नव्हते. होळीच्या दहा बारा दिवस आधीपासूनच लाकडे आणि लाकडाच्या वस्तूंची पळवापळवी सुरू होत असे. काही वात्रट मुले आपण कुठून काय पळवून आणले याची फुशारकी मारायची, पण त्या वस्तू कुठे लपवून ठेवल्या आहेत याचा थांगपत्ता लागू देत नसत. ते शोधून काढून त्यावर डल्ला मारण्याचे काम आणखी कोणी करत असे. शेवटी सगळे अग्निनारायणाच्याच स्वाधीन करायचे असल्यामुळे तो चोरीचा अपराध समजला जात नसला तरी ते काम करणारा मुलगा सापडला तर त्याला भरपूर चोप मिळायचाच. स्वतःची असो किंवा त्याने ढापलेली असो, पण ज्याची वस्तू पळवली गेली जायची तो पळवणाऱ्याच्या नावाने शंख करायचाच. होळीचा दिवस अगदी जवळ आल्यावर मुलांची टोळकी उघड उघडपणे घरोघरी जाऊन लाकडे जमवून आणत आणि जो कोणी देणार नाही त्याच्या घरासमोर शंखध्वनि करत. त्यामुळे बहुतेक लोक बंबात घालण्यासाठी किंवा चुलीत जाळण्यासाठी ठेवलेल्या ढिगामधून थोडी लाकडे, काटक्या, ढलपे वगैरे देत असत. काही मुले जमवलेल्या ज्वलनशील वस्तूंची राखण करायचे काम करत असत. होळीच्या दिवशी संध्याकाळ झाली की ते ढिगारे भर रस्त्यांत मधोमध आणून पेटवून दिले जात आणि रात्रभर ते जळत रहात. त्यावेळी तिथे जमलेल्या लोकांमध्ये गलिच्छ शिवीगाळ करण्याची चढाओढ चालत असे. आमच्या घरातले वातावरण जास्तच सोवळे असल्याकारणाने त्या गोंधळात सामील होण्याची परवानगी कधीच मिळाली नाही. पण गल्लीत चाललेला गोंधळ कानावर येत असे, घराच्या गच्चीवरून दिसतही असे आणि हळूच थोडासा पाहून येत असू.

त्याच्या दुसरे दिवशी म्हणजे धुळवडीला गलिच्छपणाचा सुमारच नसे. होळीत जळालेल्या लाकडांची राख त्या दिवशी एकमेकांना फासायची असा पूर्वीचा रिवाज असला तरी त्या राखेतच माती, शेण आणि गटारातली कसलीही घाण मिसळून त्यात ज्याला त्याला लोळवणे चालत असे. ते करणाऱ्या जमावाच्या हातात एकादा अनोळखी इसम सापडला तर त्याची पुरती वाट लावली जाई. असल्या धुडगुसात सामील होण्याचा विचारसुध्दा करणे आमच्या घरी कोणाला शक्य नसल्य़ामुळे धुळवडीच्या दिवशी सकाळी कुठल्याही कारणासाठी कोणीही बाहेर पडत नसे. त्या दिवशी कुठे कुठे कोणकोणते घाणेरडे प्रकार घडले याच्या बीभत्स पण सुरस कहाण्या पुढील काही दिवस कानावर येत रहात. मनातला सगळा ओंगळपणा या वेळी बाहेर काढून टाकायचा आणि त्याची पाटी स्वच्छ करायची हा होळीच्या मागला उद्देश असतो असे सांगितले जात असले तरी त्याचा अतिरेक होत असल्यामुळे तो साध्य होत नसे. उलट त्यातून नवेच हेवे दावे निर्माण होत आणि झालेल्या अपमानाचे पुढल्या वर्षी उट्टे काढण्याचा निर्धार केला जात असे. शिमगा संपला तरी त्याचे कवित्व शिल्लक राहते अशी म्हणच पडली आहे ती त्यामुळेच.

होळी पौर्णिमेच्या दुसरे दिवशी सकाळी (आपल्या धुळवडीला) उत्तर भारतीय लोक रंग खेळतात. हिंदी सिनेमांमध्ये केले जाणारे होलीच्या उत्सवाचे प्रचंड उदात्तीकरण पाहून त्याचे पडसाद मुंबईसारख्या महानगरातील समाजातसुध्दा दिसायला लागले. मुंबईमधून तरी मराठी माणसांची परंपरागत रंगपंचमी आता लुप्तच झाली आहे असे दिसते. पुण्यासारख्या शहरात ती काही प्रमाणात खेळली जात असली तरी हिंदी सिनेमातल्या होलीची सर त्याला येत नाही. अणुशक्तीनगरसारख्या प्रामुख्याने शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांच्या वसाहतीत खूपच सभ्य वातावरणात होली खेळली जात असे. त्या दिवशी एकमेकांना (कडकडून) भेटणे, रंग उधळणे किंवा रंगाने माखणे याबरोबरच घरोघरी निरनिराळ्या मिठाया आणि नमकीन पदार्थ खायला मिळत आणि गाणी, विनोद वगैरेंच्या मैफली अंगावर टाकल्या जाणाऱ्या रंगाइतक्याच रंगत असत. खरोखरच होलीचा त्योहार एक सांस्कृतिक उत्सव या भावनेने साजरा होत असे. उत्तर भारतीय आणि बंगाली लोक यात अमाप उत्साहाने भाग घेत असत आणि आम्हालाही त्यात सामील करून घेत असत. एक दोन वर्षातच आम्हीसुध्दा त्यात त्यांच्याइतक्याच उत्साहाने भाग घेऊ लागलो. माझ्या लहानपणच्या काळात होळी किंवा धुळवड यात सामील होण्यास महिलावर्गाला सक्त मनाई होती. त्या दिवसात त्या कधी चुकूनसुध्दा घराबाहेर पडतसुध्दा नसत. पण अणुशक्तीनगरमधल्या होलीमधील रंगणे, रंगवणे, खाणेपिणे आणि गाणे वगैरे सगळ्या भागात त्या पुरुषवर्गाच्या दुप्पट उत्साहाने भाग घेत असत. मी सेवानिवृत्त होऊन वाशीला रहायला गेल्यानंतरसुध्दा दोन तीन वर्षे आम्ही होलीचा आनंद घेण्यासाठी पूर्वीच्या ठिकाणी जात होतो.

३. होळीचा फराळ

ही गीते मागल्या वर्षी (२०११ मध्ये) हास्यगारवा या ई-(अ)नियतकालिकावर प्रकाशित झाली आहेत.
होळी खेळून झाल्यावर सडकून भूक लागणारच, त्यासाठी लावलेल्य़ा स्टॉल्सवर ऐकवण्यासाठी आजच्या तुफान लोकप्रिय गाण्यांच्या चालीवर जाहिराती. यातली सगळी मूळ हिंदी गाणी आता जुनी झाली असली तरी अजूनसुध्दा ऐकू येतात. ती ओळखणे जड जाणार नाही.

१. चटकदार भडंग

भड भड भडंग भडंग भडंग भडंग, भड भड भडंग भडंग भडंग भडंग
लई चंवदार, लज्जतदार, याची नको तुलना
भड भड भडंग भडंग भडंग भडंग, भड भड भडंग भडंग भडंग भडंग
माझे सरकार, व्हा तय्यार, काढला ताजा घाणा
भड भड भडंग भडंग भडंग भडंग, भड भड भडंग भडंग भडंग भडंग

कुरकुरीत चुरमुरे रे
तळलेले दाणे खारे
मस्त मसाला त्यात घालुनी
केली भडंग भडंग भडंग भडंग, भड भड भडंग भडंग भडंग भडंग

एकदाच तू खाशील रे
चटक तुला बघ लागेल रे
पुन्हा पुन्हा मग येशील रे,
खाण्या भडंग भडंग भडंग भडंग, भड भड भडंग भडंग भडंग भडंग

. .  चाल – दबंग
————————————————————————————-

२. मिठ्ठास बुंदीचे लाडू

बुंदी फर्मास केली, तुझ्यासाठीच रे
बुंदीची चंव खास, ही झक्कास, फर्मास रे
मुद्दाम आज केली, तुझ्यासाठीच रे
बुंदी फर्मास केली, तुझ्यासाठीच रे

बुंदीचा दाणा मोत्यासारखा, मोत्यासारखा
चुरडून घातला मी मेवा सुका, रे मेवा सुका
तुपात तळूनिया, पाकात घोळली ही, तुझ्यासाठी रे
बुंदी फर्मास केली, तुझ्यासाठीच रे

चाल – मुन्नी बदनाम हुई
———————————————————————————–

३. मजेदार भेळ

घेरे मस्त मस्त ही भेळ, घेरे मस्त मस्त ही भेळ
अशी तुला कुठे ना मिळेल, घेरे मस्त मस्त ही भेळ

भेळ फॉर्म्यूला हा माझा, एकदम खासा
तिची चंव वर्णायाला, अपु-या भाषा
घेरे मस्त मस्त ही भेळ, खा रे मस्त मस्त ही भेळ

बनवेन स्पेशल तुझ्या मनासारखी, मनासारखी
झणझणीत रस्सा घालू की ठेवू सुकी, रे ठेवू सुकी
घेरे मस्त मस्त ही भेळ, खा रे मस्त मस्त ही भेळ
अशी तुला कुठे ना मिळेल, घेरे मस्त मस्त ही भेळ

चाल – तेरे मस्त मस्त दो नैन
——————————————————————————————-

४. गोड पेढे

पेढे घे ना, पेढे घे ना, पेढे घे ना रे

पेढ्यांचा गोडवा, वाटतो ना हवा,
चाखून तर पहा, एकदाच
कंदी पेढा हवा, केशरी की नवा,
सर्वांमध्ये खवा, ताजा ताजा
अप्रतीम आणून खास
त्याला भाजला खरपूस
वेलचीचा स्वादसुध्दा, आहे दिला रे
पेढे घे ना पेढे घे ना, पेढे घे ना रे
पेढे घे ना पेढे घे ना, पेढे घे ना रे

चाल – तेरे नैना तेरे नैना
————————————————————————
५. पिझ्झा

I know you want me
And you’ll always get me
हॉटेलात वा घरी
फोनवरूनच, दिलीस ऑर्डर,
होईल होम डिलिव्हरी
आत्ता वाटतोय् ना हवा हा खायला ?
साइडडिश नाही लागत त्याला,
एक प्लेट पुरेल रे तुजला,
तुझी भूक पुरी भागवायला
असा मी कोण ?
What’s my name?
what’s my name?
My name is Pizza, पिझ्झा मेजवानी
I am very tasty, तोंडाला सुटले ना पाणी?

चाल – माय नेम इज शीला

. . . . . . . . .

श्रावणमासातले नेमधर्म आणि सणवार

चातुर्मासात केलेल्या धार्मिक कृत्यांचे फळ जास्त मिळते आणि श्रावण महिन्यात तर ते त्याहून जास्त मिळते अशी भाविकांची श्रध्दा असल्यामुळे या काळात जास्त प्रमाणात व्रतवैकल्ये केली जातात. माझ्या लहानपणी आमच्या घरातल्या बहुतेक प्रौढ महिला दर चातुर्मासाला कसला तरी नेम करायचा असा विचार करून त्याची सुरुवात करीत असत, पण चार महिन्यांचा काळ जरा जास्तच लांब वाटत असल्यामुळे श्रावण महिनाभर तरी तो नेम पाळून मिळेल तेवढे जास्तीत जास्त पुण्य पदरात पाडून घेत असत. या महिन्याची सुरुवात जिवतीच्या पटाने आणि कहाण्या वाचण्याने होत असे हे मी मागील लेखात सांगितले आहेच. महिन्यातल्या वेगवेगळ्या वारी आणि तिथींना तऱ्हेतऱ्हेची व्रतवैकल्ये आणि रूढी पाळायच्या असत.

पूर्वी कधी सुरू केलेली आणि कंटाळा करून घालवलेली सूर्यनमस्काराची संवय श्रावणातल्या रविवारी पुन्हा सुरू केली जाई. त्यासाठी सूर्याची बारा नांवे एका कागदावर लिहून घेतली जात आणि  ॐ मित्रायनमः, ॐ रवयेनमः असे करत एकेकाच्या नावाने साष्टांग नमस्कार घातले जात. श्रावण सोमवारी मोठ्या लोकांचा उपवास असे. हे शिवव्रत एकदा घेतले की मोडता येत नाही अशी श्रध्दा असल्यामुळे आणि ही पोरे मोठी झाल्यावर त्यांना शिंगे फुटणारच याची खात्री असल्यामुळे  मुलांना त्यातून वगळले जात असे. त्यामुळे नेहमीच्या जेवणाबरोबरच साबूदाण्याची खिचडी पण खायला मिळत असे. या दोन्हींमधला धान्यफराळ नावाचा एक तिसरा मार्गही काढला जात असे.

आमच्या जमखंडीपासून कोसभर अंतरावर डोंगरावरील रामतीर्थावर रामेश्वराचे पुरातन मंदीर आहे, श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी त्याचे दर्शन घ्यायचेच अशी प्रथा होती. त्या दिवशी तिथे जत्रा असल्यामुळे त्याचे जास्तीचे आकर्षण असायचे. जत्रेत खर्च करण्यासाठी घरातील प्रत्येक मुलाला एक आणा मिळायचा. त्या काळात इतर कुठल्या पॉकेटमनीची पध्दत नसल्यामुळे त्या आण्याचे अप्रूप वाटायचे. घरातली, शेजारची आणि शाळेतली मित्रमंडळी मिळून सात आठ जणांचा घोळका करून आम्ही जत्रेत फिरत असू. सगळ्यांचे मिळून झालेल्या सात आठ आण्याचे कुरमुरे, फुटाणे, शेंगदाणे वगैरे घेऊन ते खायचे. त्या काळात ते पुरेसे असत. रामतीर्थाच्या परिसरात गुलमोहोराची बरीच झाडे होती. तिथल्या स्थानिक बोलीभाषेत त्याला संकासूर म्हणतात. त्याला उन्हाळ्यात आलेली लालभडक फुले कोमेजून पावसाबरोबर पडून जातात. त्या जागी काळपट लाल रंगाच्या शेंगा येऊन श्रावण महिना येईपर्यंत त्या चांगल्या हातभर लांब झालेल्या असत. त्यातली सर्वात जास्त लांब आणि सरळ शेंग शोधून ती पटकावण्याची चढाओढ लागत असे. त्या शेंगा हातात धरून वाटेवरच्या गवतावर आणि झुडुपांवर त्या तलवारीचे वार केल्यासारख्या सपासपा चालवीत आम्ही घराकडे परतत असू. पण वाटेतच कोणाच्या तरी अंगात मावळा संचारल्यामुळे युध्द सुरू होई आणि त्यात झालेले त्या शेंगांचे तुकडे आसमंतात भिरकावून दिले जात. त्यातून गुलमोहराची किती नवी झाडे उगवली असतील याची गणना करायचा प्रयत्नही कधी केला नाही. पण अभावितपणे कां होईना आम्ही या प्रकारे निसर्गाला साथ दिली होती असे आता सांगता येईल.

मंगळवारी मंगळागौर असायची. गांवात बहुतेक सगळी एकत्र कुटुंबेच होती. त्यातल्या आमच्या घरी, शेजारपाजारी, किंवा गावात राहणाऱ्या काकामामांपैकी कोणा ना कोणाच्या घरी नवीन लग्न झालेल्या लेकी किंवा सुना असायच्या आणि त्यामुळे त्यांच्याकडे मंगळागौरीची पूजा व्हायचीच. त्या निमित्याने आम्हालाही प्रसाद खायला मिळायचा. स्त्रीवर्गामध्ये खेळ, नाचगाणी, उखाणे वगैरेचा कार्यक्रम रंगायचा, त्यात मुली तर उत्साहाने भाग घेतच, मुलांनाही त्याची झलक तरी पहायला मिळत असे. बुधवार आणि गुरुवारची वैशिष्ट्ये आता मला आठवत नाहीत, पण शुक्रवारचा दिवस खास असायचा. त्या दिवशी पुरणाचे दिवे लावून जिवतीला त्याची आरती केली जात असे आणि त्यानंतर मुलांचे औक्षण केले जाई, तसेच लेकुरवाळ्या सवाष्णींना त्यांच्या लेकरांसह भोजनाला बोलावले जात असे. त्या निमित्य पुरणावरणाचा घाट घातला जाई.  शनिवारी ज्वारी किंवा बाजरीच्या कण्या शिजवून त्या ताकाबरोबर खायचा रिवाज होता. कांही जणांना तो पदार्थ आवडत असे, पण बाकीच्यांना त्या दिवशी दोन चार घास तरी खावाच लागत असे. संध्याकाळी मारुतीच्या देवळात नारळ फोडायचा आणि तिथल्या दिव्यात आपले पळीभर तेल घालायचा रिवाज होता. आधीच्या काळात त्यासाठी घरून बुदलीभर तेल न्यावे लागत असे. पुढे त्याचे व्यापारीकरण झाले. देवळाशेजारीच एका तेल्याने दुकान उघडले आणि छोट्या छोट्या अनेक पात्रात तेल भरून ते मारुतीला वाहण्यासाठी तो तयार ठेऊ लागला. शिवाय त्या तेलाची किंमत बाजारभावापेक्षा कमी असे. ते तेल खाण्यासाठी वापरावयाचे नसल्यामुळे त्याच्या दर्जाबद्दल विचार करायचे कारण नव्हते. स्वस्त आणि सुटसुटीत असा हा पर्याय लोकांनी लगेच उचलून धरला.

नागपंचमीला वेताच्या गोल डब्यात नागाची वेटोळी ठेऊन ती घेऊन गारुडी लोक घरोघरी जात. इतर वेळी पुढे पुढे करणारी बच्चे कंपनी या वेळी मात्र आईच्या पदराआड दडून विस्फारलेल्या डोळ्यांनी नागाचा उभारलेला फणा पहात असत. आमच्या गावापासून शंभर कोसांच्या अंतरात कोठेही समुद्रकिनारा नव्हता. त्यामुळे नारळी पौर्णिमेचा समुद्राशी कांही संबंध नसायचा. त्या दिवशी भरपूर नारळी भात केला जात असे. इतके चविष्ट आणि सर्वांना आवडणारे पक्वान्न एरवी कधीच होत नसे. ते खाण्यासाठी पुढल्या वर्षाच्या नारळी पौर्णिमेची वाट पहावी लागे. नंदा या नटीची प्रमुख भूमिका असलेला छोटी बहन हा लोकप्रिय चित्रपट आल्यानंतर घरातल्याच रेशमाच्या धाग्यापासून राखी बनवून बहिणी आपल्या भावांना बांधायला लागल्या होत्या. त्या काळात त्या बाजारात मिळत नसत किंवा पोस्टाने येत नसत. ग्रीटिंग कार्ड हा प्रकारच त्या भागात त्या काळी ऐकूनही ठाऊक नव्हता.

गोकुळाष्टमीला कृष्णजन्म होत असे आणि त्याच्या दुसरे दिवशी गोपाळकाला. त्या कार्यक्रमाला येणारीने आपापल्या घरातून निरनिराळे चविष्ट पदार्थ आणून ते एका मोठ्या परातीत मिसळायचे जायचे आणि तो काला चांगला मिसळून सगळ्यांच्या हातावर घास घास ठेवला जात असे. ती एक प्रकारची भेळ असली तरी त्यात कोणते पदार्थ आणि किती प्रमाणात मिसळायचे हे ठरले नसल्यामुळे गोड, तिखट, आंबट, खारट या सगळ्या चवींनी युक्त अशी दर वेळी एक वेगळीच चंव तयार होत असे. याशिवाय श्रावण महिन्यात जास्त फळ मिळण्याच्या आशेने सत्यनारायणादि अनेक प्रकारच्या पूजा केल्या जात असत. सत्यनारायण सोडून जुन्या काळातल्या पूजा अर्चा, एकादष्ण्या, अभिषेक वगैरे इतर अनेक गोष्टी आता बंद झाल्या आहेत, तर संतोषी माता आणि वैभवलक्ष्मी वगैरे नवी कांही व्रते लोकप्रिय होऊ लागली आहेत असे दिसते. ती सुध्दा श्रावण महिन्यातच जास्त प्रमाणात होतात.

श्रावण महिन्यात कर्माचे जास्त फळ मिळत असल्याने सगळे लोक देवाच्या नजरेत गुड बॉय किंवा गुड गर्ल बनण्याच्या प्रयत्नात असत. त्या महिनाभर कांही लोक मद्यपान वर्ज्य करत तर कांही लोक शुध्द शाकाहारी बनत. आमच्या घरात बाराही महिने मद्य आणि मांस या दोन्ही गोष्टींचा उच्चार सुध्दा करायला मनाई होती. तोंडाला बाटली लावण्याचा किंवा एका हाताने दुस-या हाताच्या पंजावर सुरी चालवण्याचा अभिनय करून त्याचा खुणेनेच उल्लेख केला जात असे. त्यामुळे श्रावण महिन्यामुळे त्या बाबतीत कांही फरक पडत नसे. पण कांदा लसूण वर्ज्य केलेले जाणवत असे. चातुर्मासात जमले नाही तर महिनाभर तरी कांही ना कांही सोडायची फॅशनच असायची. न आवडणाऱ्या गोष्टी आधीच जन्मभरासाठी सोडलेल्या असत आणि उपलब्ध नसलेल्या गोष्टी सो़डल्या म्हणून सांगितले तर हंसे होईल. यामुळे कांही प्रौढ महिला चहा किंवा बटाटा यासारखी रोजच्या उपयोगातली एकादी वस्तू सोडत. यात आपण फार मागे रहायला नको म्हणून पुरुषवर्ग महिनाभरात हजामत करून घेत नसत, कांही लोक दाढीमिशादेखील वाढवत.

अशा त-हेने श्रावण महिना चांगला गाजत असे आणि तो संपण्यापूर्वीच गणेशोत्सवाची तयारी सुरू होत असे.

. . . . . . . . . . . . . . . .

हे लेख पहा :

नागपंचमी
https://anandghare2.wordpress.com/2013/08/07/%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%ae%e0%a5%80/

श्रावणी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, ओणम् आणि बलरामजयंती
https://anandghare2.wordpress.com/2013/08/19/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%a8-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%b3%e0%a5%80/

गोकुळाष्टमी
https://anandghare2.wordpress.com/2010/08/29/%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%ae%e0%a5%80/

मराठी मातृदिन, पिठोरी अमावस्या, आईवरील गाणी
https://anandghare2.wordpress.com/2013/09/03/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%83%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%a0%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%80/

विजयादशमी

आमच्या लहानपणी दसऱ्यावर एक कविता होती. तिची सुरुवात “सोने लुटुनी सायंकाळी मोरू परतुनि आला” अशी होती. त्यानंतर बहीण काशीने त्याचे ओवाळून स्वागत केले वगैरे वर्णन होते.  ते वाचून दसरा हा केवळ लुटारू लोकांचा सण आहे की काय अशी शंका कुणाला येईल. मराठी भाषेत लुटणे म्हणजे लुबाडणे असा गैरसमज होऊ शकतो. पण लुटणे याचा मनमुरादपणे घेणे असाही अर्थ आहे. एखाद्या पदार्थाची लयलूट झाली असे आपण म्हणतो तेंव्हा तो मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे असा अर्थ होतो. दसऱ्याच्या सुमारास खरीप हंगामातील पिके आलेली असतात. वर्षा ऋतूच्या कृपेने भरपूर पाणी मिळाल्याने सगळीकडे हिरवळ दाटलेली असते. निसर्ग आपल्याला अनंत हस्ताने पाने, फुले, फळे देत असतो. सगळ्यांची लयलूट झालेली असते. ज्यांना हे प्राप्त होते त्यांची ते दुसऱ्या लोकांना वाटण्याची मनस्थिती असते. आपल्याला मिळालेल्या गोष्टींचा फक्त स्वतः उपभोग करून न घेता तो इतरांना वाटण्यामध्ये मजा असते याची जाणीव करून घेण्याचा व या सगळ्यांचा प्रियजनासमवेत मनसोक्त उपभोग घेण्याचा हा उत्सव आहे. म्हणूनच एकमेकांना प्रतीकात्मक सोने देऊन सोन्यासारखे रहा म्हणण्याची पध्दत आहे.

दुष्ट प्रवृत्तींवर सुष्ट शक्तींचा विजय हे दसऱ्याच्या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. रामाद्वारे रावणाचा वध आणि दुर्गा मातेने महिषासुर राक्षसाचे केलेले निर्दाळन या दिवशी साजरे केले जाते. दुर्जनांच्या अत्याचारापुढे हतबल होत असलेल्या सर्वसामान्य लोकांना त्यातून एक दिलासा मिळतो. या सगळ्या वाईटाचा घडा भरून शेवटी त्याचा निश्चितपणे अंत होणार आहे असा विश्वास मिर्माण होतो आणि त्यासाठी लढण्याची उमेद मिळते. प्रयत्नाने मिळालेला असा आनंदाचा क्षण स्मरणात रहावा यासाठी जल्लोषात घालवला जातो.

आयुधपूजा व सीमोल्लंघन हे दसऱ्याच्या सणाचे अविभाज्य भाग आहेत. पूर्वीच्या काळची राजकीय परिस्थिती वेगळी होती. आजच्या प्रमाणे राज्यांच्या सीमारेखा निश्चित नव्हत्या. “कालौ निरर्वधिः विपुलाच पृथ्वी” अशी समजूत होती. त्यामुळे आपापल्या राज्यांचा विस्तार करणे नैसर्गिक मानले जायचे. त्यात निसर्गावर मात करून नवीन भूमी लागवडीसाठी आपल्या अंमलाखाली आणणे आणि शत्रुराष्ट्राचा युध्दात पराभव करून त्याचेकडून भूभाग हिसकावून घेणे हे दोन्ही आले. पावसाळ्याच्या दिवसांत नदीनाल्यांना आलेल्या पुरांमुळे सैन्याने कूच करणे शक्य असायचे नाही. भूसंपादनासाठीही विशेष कांही करता येण्यासारखे नसायचे. पावसाच्या धारेमुळे सुतार, लोहार, गवंडी वगैरेंच्या कामात मंदी असायची. घरी बसून राहिल्याने किंवा शेतात काम करत राहिल्याने शस्त्रास्त्रांकडे थोडेसे दुर्लक्ष्य झाले असण्याची शक्यता असते. ती बाहेर काढून, साफसूफ करून, धार वगैरे लावून जोमाने काम सुरू करायची वेळ आल्यावर आपल्या संस्कृतीनुसार आधी त्यांचे पूजन करायची प्रथा सुरू झाली. याच दिवशी अज्ञातवासात असलेल्या अर्जुनाने आपले बृहन्नडेचे रूप टाकून देऊन वीर योध्याचे मूळ रूप धारण केले व लुटारू कौरवांना पिटाळून लावले अशी पौराणिक कथा आहे. त्यात बरेच कांही शिकण्सासारखे आहे.

आजच्या परिस्थितीत अशा प्रकारचे युध्द कालबाह्य झाले आहे. पण प्रत्येकजण आपआपल्या क्षेत्रांत कांहीतरी करून दाखवण्यासाठी धडपडत असतोच. त्यातील अडचणीवर मात करून पुढे पाऊल टाकणे, नवीन कांही तरी करणे, यशाचे उच्च शिखर गाठणे हे सुध्दा सीमोल्लंघनच आहे. यासाठी दसऱ्यासारख्या मुहूर्ताची वाट पहात बसण्याची गरज नसते. पण असे दिवस या ध्येयाची आठवण करून देतात व एक स्फूर्ती देतात. त्या दिशेने मार्गक्रमण करावे असा संदेश देतात.