मेरि ख्रिसमस

मी या विषयावर पूर्वी लिहिलेले लेख एकत्र करून आणि त्यात भर घालून हा लेख ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रकाशित केला आहे.

आमच्या लहान गांवात एकही ख्रिश्चन कुटुंब निदान माझ्या बालपणी तरी रहात नव्हते. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष पहाण्याचा प्रश्नच नव्हता. घरात होणाऱ्या बोलण्यात कधी ख्रिश्चनांचा उल्लेख आलाच तर “त्यांचे आचार विचार आणि त्यांच्यातल्या चालीरीती आपल्याहून वेगळ्या असतात.” असा एक अलिप्तपणाचा सूर तेवढा असायचा. त्यांच्याबद्दल मनात द्वेष निर्माण होईल असे कोणी बोलत नसे. फार फार तर कोणी आपली रूढी मोडून वागायला लागला तर त्याला ‘साहेब’ म्हणून हिणवले जायचे. त्या काळात मुंबईपुण्यासारख्या मोठ्या शहरात राहणाऱ्या माझ्या नातेवाईकांची मुले सुद्धा मराठी माध्यमाच्या शाळेतच जात असत. कॉन्व्हेंट शाळांचे प्रस्थ आजच्या एवढे वाढले नव्हते. त्यामुळे कधी तरी मुंबईहून आलेल्या पाहुण्यांच्या बोलण्यातून देखील माउंट मेरी किंवा पोर्तुगीज चर्च अशा नांवापलीकडे ख्रिश्चनांचा फारसा उल्लेख होत नसे. आमच्या लहान गांवात वैद्यकीय उपचारांची अद्ययावत व्यवस्था नसल्यामुळे रक्त तपासणी, एक्सरे फोटो अशा चांचण्यासाठी किंवा रोग विकोपाला गेला तर बहुतेक लोक मिरजेच्या वानलेस मिशन हॉस्पिटलात जात असत. तिथे जाऊन आलेल्या लोकांच्या तोंडून त्या इस्पितळातील सुव्यवस्थेची प्रशंसाच ऐकायला मिळत असे. त्यामुळे लहानपणी माझ्या मनात ख्रिश्चनांविषयी कोणताही पूर्वग्रह निर्माण झाला नाही.

शालेय पाठ्यपुस्तकांमधले धडे, मासिके आणि अवांतर वाचनामधूनच येशू ख्रिस्ताचे जीवन, त्याची शिकवण आणि ख्रिस्ती धर्म यासंबंधी माहिती मिळत गेली. त्यात आपला श्रीकृष्ण आणि येशू ख्रिस्त यांच्या नांवातल्या साम्याखेरीज आढळलेली इतर साम्यस्थळे पाहून नवल वाटत असे. दोघांच्याही जन्मापूर्वी त्याची भविष्यवाणी झालेली होती. दोघांचेही जन्म काळोख्या मध्यरात्री आणि घरात न होता वेगळ्या प्रकारच्या ठिकाणी झाले, कृष्णाचा कारागृहात तर ख्रिस्ताचा गोठ्यात. दोघांनाही नष्ट करण्यासाठी त्यांचे शत्रू टपून बसले होते. त्यामुळे त्यांचे बालपण त्या संकटाच्या छायेत गेले. दोघांचे बालपणचे सवंगडी अगदी जनसामान्यातले होते. पुढे मात्र श्रीकृष्णाने राजसी वैभवाचा आस्वाद घेतला तर येशूने आपले संपूर्ण जीवन दीनदुबळ्यांच्या सेवेत घालवले. तरीसुद्धा कृष्णाने योगेश्वर होऊन मानवजातीला अखंड मार्गदर्शन करीत राहील असा गीतोपदेश केला आणि येशूने आपले जीवन व प्रवचने यांतून जगाला दिव्य संदेश दिला. या दोघांचीही शिकवण अनंत काळापर्यंत टिकून राहण्यासारखी आहे.

या दोन्हीमध्ये कांही समान धागा असला पाहिजे. श्रीकृष्णाच्या भारतात ख्रिस्ताच्या शिकवणीने चांगले मूळ धरले आहे. ती शिकवण देणाऱ्या संस्था इथे उभ्या राहिल्या असून देशोदेशीचे धर्मसेवक इथे प्रशिक्षण घ्यायला येतात असे ऐकले आहे. इथून शिकून निघालेला कोणी धर्मगुरू उद्या पोपच्या जागेवर निवडला गेला तर मला त्यात आश्चर्य वाटणार नाही. याच्या उलट ख्रिश्चनांच्या पाश्चिमात्य देशात अगदी अल्प स्वरूपात कां होईना, पण हरेकृष्ण मूव्हमेंट सुरू झाली आणि येशूच्या पायाशी मनःशांती न मिळाल्यामुळे कांही लोकांनी मुंडण करून संन्यास घेतला आहे आणि स्वामी अमूकानंद किंवा माँ तमूकमाता अशी नांवे धारण केली आहेत.

कॉलेजात गेल्यानंतर दरवर्षी ख्रिसमसच्या सुटीत मी घरी पळत होतो. त्यामुळे शहरांमध्ये तो कसा साजरा केला जातो हे मी कधी पाहिलेच नाही. “आपली जशी दिवाळी असते ना, तसा त्यांचा ख्रिसमस!” असे नुसते मोघमात ऐकले होते. पण म्हणजे ते नक्की काय करतात ? दिवे लावतात, कां फराळ करतात कां फटाके उडवतात? मी नोकरीसाठी मुंबईला स्थाईक झाल्यानंतर हळू हळू त्याची कल्पना येत गेली. धोबीतलाव किंवा बांद्रा यासारख्या ख्रिश्चन वस्तीत जरी मी रहात नसलो तरी जातांयेतांना तिथली रोषणाई, सजावट वगैरे नजरेला येत असे. एकंदरीत रस्त्यावरून दिसणारा उल्हास पाहिला तर दिवाळी आणि ख्रिसमस यांत मला खरेच विशेष फरक वाटला नाही. तपशीलात फरक असेल पण सेलेब्रेशनचे मुख्य स्वरूप सारखेच वाटले.

इंग्रजी सिनेमात अनेक वेळा ख्रिसमसचे सीन असतात. होम अलोन या चित्रपटाचे कथानकच ख्रिसमसच्या दिवशी घडते. मागे मी एक चित्रपट पाहिला होता. त्याचे नांव आता आठवत नाही. “सँताक्लॉज खरोखर अस्तित्वात असतो कां?” हा वाद या सिनेमामध्ये चक्क कोर्टात नेला जातो. अनेक विनोदी साक्षीपुरावे आणि मजेदार उलटतपासण्या झाल्यानंतर अखेर ज्यूरींना त्यावर निर्णय द्यायचा असतो. “ज्याची श्रद्धा असते त्याच्यासाठी सँताक्लॉज अस्तित्वात असतो” असा निर्णय देणे त्यांना भाग पडते असा त्याचा कथाभाग आहे. दूरदर्शन सुरू झाल्यावर त्यावर नाताळच्या निमित्याने खास कार्यक्रमांचे प्रक्षेपण सुरू झाले. ते आम्ही आवर्जून पाहू लागलो. इतर वाहिन्या आल्यावर प्रत्येकीने त्यात भर टाकली. त्यामुळे देशोदेशी होणारे सोहळे, सजावट, रोषणाई, कॅरॉल्स, पोपचे व्याख्यान वगैरे सगळे घरबसल्या पहायला मिळते.

मॉँजिनीजच्या दुकानात ठेवलेले आकर्षक केक पाहून आम्हीही ते आणून खायला सुरुवात केली. कधी गेटवे ऑफ इंडियाच्या बाजूला गेल्यावर मी ताज केकशॉपमधल्या खास ख्रिसमस केकची चंव घेऊन पाहिली तर कधी ख्रिसमसचे खास पुडिंग चाखून पाहिले. नववर्षासाठी येणाऱ्या कांही सदीच्छापत्रांत “मेरी ख्रिसमस” चा संदेश देखील जोडलेला असतो. अशा प्रकारे आमच्या नकळतच आम्हीसुद्धा थोडेसे “जिंगल बेल जिंगल बेल” करू लागलो.

. . . . . . . . . .

आम्ही गोवा पाहण्यासाठी मुद्दाम ख्रिसमसच्या वेळेतच तिकडे गेलो होतो. एक तर डिसेंबरमध्ये तिथले हवामान उत्तम असते, त्या वेळेस उकाडा किंवा पाऊस नसतो आणि शिवाय ख्रिसमसचा उत्सव. त्यामुळे अर्थातच पर्यटकांची तोबा गर्दी उडते. पण गोव्याचे लोक सगळे सांभाळून घेतात. आम्ही पणजी शहराच्या भरवस्तीत हमरस्त्यावर असलेल्या एका हॉटेलात मुक्काम केला होता. सागरकिनाऱ्यावरील निवांतपणात शांतपणे विश्राम करण्यापेक्षा गजबजलेला भाग पाहून लोकांच्या उत्साहात सहभागी होण्याची आम्हाला इच्छा होती. ती चांगल्या प्रकारे फलद्रूप झाली.

घराघरांवर चांदण्यांच्या आकाराचे आकाशकंदील लावलेले होते. कांही ठिकाणी सुंदर ख्रिसमस ट्री लावून त्यांना छानपैकी सजवले होते. कुठेकुठे बायबलमधल्या गोष्टीमधले देखावे मांडले होते. दुकाने आणि हॉटेले प्रकाशात झगमगत होती आणि गर्दीने फुललेली होती. सगळ्या चर्चेसमध्ये नाताळनिमित्य खास धार्मिक कार्यक्रम ठेवले होते. रस्त्यावर फिरत असलेल्या लोकांत फॅशनेबल आणि आकर्षक पेहराव घालण्याची चढाओढ लागली होती. एकंदरीत गोव्यातल्या वातावरणातच चैतन्य संचारले होते.

त्यापूर्वी दोन वेळा आम्ही नेमके ख्रिसमसच्याच दिवसांत इंग्लंडला गेलो होतो. त्यातल्या एका वर्षी त्या दिवशी हिमवर्षाव झाला आणि सगळीकडे बर्फच बर्फ झाले. याला तिकडे ‘व्हाईट ख्रिसमस’ म्हणतात, तोही पहायला मिळाला. त्या अनुभवात काही तरी पाहण्यापेक्षा थंडीने कुडकुडणेच जास्त होते. कदाचित प्रतिकूल हवामानामुळे असेल, पण तिकडे घरांच्या सजावटीपेक्षा खरेदी आणि एकमेकांना भेटवस्तू देणे यालाच जास्त महत्व दिसले. ज्या लोकांना शक्य असेल ते तर सुटी काढून चक्क कुठल्या तरी उबदार हवेच्या ठिकाणीच फिरायला चालले जातात. घराघरांमध्ये फारशी आकर्षक रोषणाई दिसत नसली तरी शॉपिंग मॉल्समध्ये मात्र या सगळ्याची कसर भरून काढली जाईल इतकी प्रचंड सजावट केली जाते आणि दिव्यांचा नुसता झगमगाट असतो. तिथे दोन तीन मजले उंचीचे अवाढव्य ख्रिसमस ट्री लावतात आणि हजारो शोभिवंत वस्तू त्याला टांगतात. कांही ठिकाणी सांताक्लॉजच्या वेषात पांढरी दाढी लावलेली माणसे हिंडत असतात आणि दिसेल त्याला “मेरि ख्रिसमस” म्हणत शुभेच्छा देत असतात, तर कांही जागी त्याला बसण्यासाठी पुरातनकाळाचा आभास निर्माण करणारी खास सजवलेली गुहा बनवलेली असते. त्याच्या आंत जाऊन त्याला भेटण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असतात. सांताक्लॉजबाबाचे मुखवटे, लाल डगले आणि गोंडा सावलेल्या टोप्या या गोष्टींना या काळात प्रचंड मागणी असते.

कांही हुषार लोक या सणाच्या दिवसांत बाजारात जाऊन कोणत्या नव्या वस्तू आल्या आहेत, कुठल्या गोष्टींना खूप उठाव आहे वगैरे बारकाईने पाहून घेतात आणि फक्त टूथपेस्ट, साबणासारख्या रोज लागणाऱ्या साध्यासुध्या जिन्नसा तेवढ्या घेऊन घरी जातात. उत्सव संपल्यानंतर एक दिवस सुटी घेऊन बाजार पुन्हा उघडला की दुकानांमधला स्टॉक संपवण्याची घाई सुरू होते. बहुतेक सर्व नव्या वस्तूंना ‘मूळ किंमत २० पौंड, ख्रिसमससाठी १५ पौंड आणि आज घेतल्यास ४.९९ पौंड’ अशा प्रकारची लेबले लावलेली असतात. त्यांच्या जोडीला ‘त्वरा करा. ही सवलत साठा शिल्लक असेपर्यंतच’ वगैरे सूचना असतात. जागा अडवणारी खेळणी आणि इतर शोभेच्या वस्तू तर ‘टके सेर भाजी, टके सेर खाजा’ विकणाऱ्या ‘पौंड किंवा डॉलर शॉप’मध्ये जाऊन पोचतात. या वेळेस मात्र ही हुषार माणसे बाजारावर तुटून पडतात आणि तिथला फुगलेला साठा संपवायला मदत करतात. त्यात आपले भारतीय वंशाचे लोक मोठ्या संख्येने दिसतात. या काळात एक दीड पौंडात मिळणाऱ्या वस्तू ते डझनांवारी नेतात. भारतात सुटीला गेल्यावर आपल्या आप्तांना वाटायला ती बरी पडतात. या काळात दुकानातली भारतीयांची गर्दी पाहिल्यावर कुठे कुठे तर आपण कनॉट प्लेस किंवा कुलाबा कॉजवेला आलो असल्याचा भास होतो.

बारा वर्षांपूर्वी मी ख्रिसमसला अमेरिकेत होतो. तिथले वातावरणसुध्दा साधारणपणे इंग्लंडमध्ये दिसले तसेच होते. अमेरिकेमधली दुकाने काहीच्या काही अवाढव्य आहेत आणि त्यांना साजेशी रोषणाईही केलेली होती. तसेच नवनव्या आकर्षक वस्तू मांडून ते मॉल्स खचाखच भरलेले दिसत होते. खरेदी करून परतणाऱ्या बहुतेक लोकांच्या ट्रॉल्या सुध्दा भेटवस्तूंनी भरलेल्या दिसत होत्या.
तिथेही मॉलमध्ये सांताक्लॉज येऊन मुलांना भेटत आणि भेटवस्तू देत होते आणि ते मुलांमध्ये आवडते होते. सन २००८ च्या डिसेंबर महिन्यात ख्रिसमसच्या सुमाराला आम्ही फ्लॉरिडामधल्या सेंट ऑगस्टीयन बीचवर सहलीसाठी गेलो होतो. तिथे गोव्यातल्यासारखेच उत्साही वातावरण होते, पण ते सर्व पर्यटकांच्या गर्दीमुळे झालेले होते. तिथेही थोडी मौजमस्ती धमाल होती, पण ती एकाद्या खेड्यातल्या जत्रेसारखी होती. तिथे छोट्या छोट्या किरकोळ वस्तू विकणाऱ्या लहान लहान दुकानांची, खाद्यपेयांच्या ढाब्यांची आणि त्यामधून फिरणाऱ्या सर्वसामान्य लोकांची गर्दी होती. आम्ही ज्या हॉटेलात उतरलो होतो त्यांनी फारशी काही रोषणाई केली नव्हती. तिथे नाताळच्या रात्री मेजवानी तर नव्हतीच, उलट त्या रात्री त्यांनी सर्व स्वैपाक्यांना सुटी देऊन ठेवली होती. आम्हीही जास्तीत जास्त वेळ समुद्रकिनाऱ्यावर घालवून काढला आणि बाहेरच मनासारखे जेवण घेतले.

मागच्या वर्षी मी पुन्हा अमेरिकेला गेलो होतो. तिथल्या टॉरेन्स या शहराच्या एका विशिष्ट भागातल्या दीड मैल दोन मैलांच्या परिसरात डोळ्यांचे पारणे फिटावे इतकी अपूर्व अशी रोषणाई केली होती. प्रत्येक बंगल्याच्या समोर आणि आजूबाजूला ख्रिमसमशी संबंधित अशी एकाहून एक सुरेख अशी चित्रे आणि देखावे उभे केले होते. सांता क्लॉज आणि रेनडियरच्या गाड्यांचे अनंत प्रकार दाखवले होतेच, इतरही विविध प्रकार होते. रस्त्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत दोन्ही बाजूच्या प्रत्येक झाडावर झगमगत्या दिव्यांच्या असंख्य माळा लटकवून ठेवल्या होत्या. कडाक्याच्या थंडीतसुद्धा शेकडो लोक पायीच फिरत फिरत आणि खाद्यंती करत त्याचा आनंद उपभोगत होते. तिथला रस्ता अरुंद आणि त्यात खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला आमची गाडी उभी करायलाच कुठे जागा मिळत नव्हती म्हणून आम्ही गोगलगाईच्या गतीने गाडी चालवून होन्ही बाजूची अद्भुत दृष्ये पाहून आणि डोळ्यांत साठवून घेतली.

ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी आम्ही लास व्हेगासला गेलो होतो. तिथले सेलिब्रेशन तर अवर्णनीय असे होते. अमेरिकेतल्या लोकांनी फक्त मौजमजा करण्यासाठी ‘लास व्हेगास’ या नावाचे एक शहरच बांधले आहे. अमेरिकेतलेच नव्हे तर जगभरातले शौकीन लोक पैसे उधळून मजा करण्यासाठी त्या गावाला भेट देत असतात. तिथल्या चित्रविचित्र पण आकर्षक अशा भव्य इमारतींवर केलेल्या नेत्रदीपक रोशणाईने त्या झळाळत होत्या. सगळीकडे ख्रिसमससाठी भरपूर सजावट केलेली होतीच. तिथे सगळ्या खंडांमधले निरनिराळ्या वंशाचे आणि निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक निरनिराळ्या चित्रविचित्र पोषाखांमध्ये फिरतांना दिसत होते. बहुतेक ठिकाणी ख्रिसमस ट्री आणि रेनडीयर्सची गाडी वगैरेसारख्या गोष्टी होत्याच. एका ठिकाणी ख्रिसमससाठी एक खास देखावा उभा केला होता. त्यात पाश्चात्य लोकांच्या पुराणातले काही प्रसंग होते. तो हॉल मात्र अप्रतिम होता आणि तो पहाणाऱ्यांची गर्दीसुद्धा खूप होती.

या सगळ्याचा येशू ख्रिस्ताच्या जन्माशी काय संबंध आहे? त्याला जन्माला येऊन दोन हजार वर्षे होऊन गेली. आता त्यात एवढा आनंद वाटण्यासारखे काय आहे? असे प्रश्न बुद्धीवादी किंवा खडूस वृत्तीचे लोक विचारतील. पण हे जगभर सगळीकडेच चालत आले आहे. रामनवमी, गोकुळाष्टमी वगैरे तिथी आपण उत्साहाने साजरे करत होतो, आजकाल गांधी जयंती, शिवजयंती आणि आंबेडकर जयंती यांचा सोहळा होतो. त्या दिवशी त्या देवाच्या मूर्तीची पूजा आणि त्या महात्म्याच्या पुतळ्याला किंवा तसबिरीला हार घालण्यची औपचारिकता आटोपण्यापलीकडे त्यांना किती महत्व दिले जाते आणि त्यांच्या जीवनापासून किंवा शिकवणीपासून पासून कोणता धडा आपण त्या दिवशी घेतो यावर विचार करावा लागेल. पण त्याबाबतीत अगदीच निराश होण्याचे कारण नाही. गांधीजयंतीच्या दिवशी जर दहा लोकांनी दारू पिणे सोडायचे ठरवले असे सांगितले तर त्यातला एकादा तरी पुन्हा त्या मार्गाने जात नाही आणि तीन चार लोकांना पुन्हा घेतांना कुठे तरी त्यांच्या मनाला त्याची टोचणी लागते आणि त्यावर थोडे नियंत्रण येते. त्यामुळे किंचितमात्र तरी फरक पडतोच.

मुख्य म्हणजे जगातल्या सगळ्याच लोकांना या ना त्या प्रकारे मनातला आनंद व्यक्त करायची एका प्रकारची हौस असते. ती पुरवण्यासाठी त्यांना एक निमित्य मिळाले आणि एक सर्वमान्य पद्धत मिळाली तर त्यांना तो एकाच दिवशी एकत्रपणे व्यक्त करता येतो. त्यात तो अनेकपटीने वाढतो. असे असेल तर आपल्यालासुद्धा ख्रिसमसच्या निमित्याने जराशी मौजमजा करायला काय हरकत आहे? आणि शुभेच्छा तर कोणालाही कधीही द्याव्यात. तेंव्हा सर्व वाचकांना ‘मेरी ख्रिसमस!’

कौटुंबिक संमेलन

नऊ वर्षांपूर्वी सात भागात लिहिलेला हा वृत्तांत एकत्रित करून या लेखात दिला आहे.

कौटुंबिक संमेलन – १

अनीशच्या मुंजीला खूप लोक आले होते. त्याच्या आईकडचे आणि वडिलांकडचे नातेवाईक, बिल्डिंगमधले शेजारी, अनीशच्या शाळेतले त्याचे दोस्त, त्याच्या आईवडिलांची आणि आजोबाआजींची घनिष्ठ मित्रमंडळी आणि त्यांच्या ऑफिसांमधले सहकारी वगैरे वेगवेगळ्या कारणांनी त्या कुटुंबाशी जोडले गेलेले लोक आपापल्या ओळखीतल्या लोकांच्या लहान लहान कोंडाळ्यात जमून गप्पा मारत होती. त्यातले काही लोक एक ग्रुप सोडून त्यांच्या परिचयातल्या दुसऱ्या तिसऱ्या घोळक्यांमध्ये सामील होत होते, पण आधीपासून असलेल्या ओळखींच्या पलीकडे कोणीच फारसा जात नव्हता. त्यामुळे तो समुदाय एकजिनसी असा वाटत नव्हता.

प्रसादच्या डोक्यात त्यावेळीच एक कल्पना चमकून गेली की आधीपासून तो ठरवून आला होता कोण जाणे, त्याने आमच्याकडच्या सगळ्या आप्तांना बोलावून एकत्र जमवले. तो पंचवीस तीस लोकांचा जमाव झाला असेल. त्यांच्यापुढे त्याने एक प्रस्ताव मांडला, “इतर कसलेही कारण नसतांना आपण सगळ्यांनी एकदा निव्वळ एकमेकांना भेटण्यासाठी म्हणून एका ठिकाणी जमायचे, आपले जे नातेवाईक आज उपस्थित नाहीत त्यांनाही बोलवायचे आणि एकादा दिवस एकमेकांच्या सहवासात गप्पागोष्टी करण्यात घालवायचा. प्रत्येकजण आपापल्या येण्याजाण्याचा खर्च करतोच, त्या दिवशी राहण्याजेवण्याचा खर्च सर्वांनी समान वाटून घ्यायचा, यात कोणी यजमान नसेल की कोणी पाहुणा नसेल. आदरातिथ्य, मानपान, देणे घेणे असले कांही नाही. किती लोकांची तयारी आहे?”

आधी तर सर्वांना ही कल्पना जराशी धक्कादायक वाटली. पूर्वीच्या काळी वाहतुकीची फारशी सोय नसल्यामुळे प्रवास करणे जिकीरीचे वाटत असे. माझ्या मागच्या पिढीतले लोक फक्त महत्वाच्या कारणापुरता अगदी किमान अत्यावश्यक तेवढाच प्रवास करत असत. माझ्या पिढीतल्या लोकांनी कधी तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्यासाठी, तर कधी निसर्गसौंदर्य, प्रेक्षणीय स्थान किंवा ऐतिहासिक स्थळे पहाण्यासाठी पर्यटन करायला सुरुवात केली होती. कधी ऑफीसकडून मिळणाऱ्या लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशन किंवा असिस्टन्स वगैरेमधून तर कधी स्वतःच्या खर्चाने यासाठी कारणाशिवाय भ्रमण करणे सुरू झाले होते. पुढच्या पिढीमधली मुले एक दोन दिवस मजेत घालवण्यासाठी एकाद्या रिसॉर्टमध्ये सर्रास जायला लागली होती. पण अशा रीतीने सगळ्या आबालवृध्द नातेवाइकांनी एका ठिकाणी जमायचे ही कल्पना भन्नाट वाटत होती. एक दोन सेकंद सारे एकमेकांच्या तोंडाकडे पाहून अंदाज घेत राहिले. सर्वांना ती कल्पना आवडली आणि ती प्रत्यक्षात आणायचे एकमुखाने ठरले. ठरले खरे, पण कशी हा प्रश्न होता. लग्नकार्य वगैरे ज्याच्याकडे असेल ते कुटुंब सारी व्यवस्था करते, पण अशा संमेलनाची व्यवस्था कोण करणार? अशी शंका अनेकांच्या मनांना चाटून गेली.

या प्रश्नावर सविस्तरपणे विचार विनिमय झाला. व्यवस्था करण्यासाठी ती किती माणसांची आणि कुठे करायची याचा अंदाज करायचा होता. त्यासाठी या कार्यक्रमात कोणाकोणाला सहभागी करून घ्यायचे हे आधी ठरवायला पाहिजे. एरवी पिकनिकसाठी जातांना एकाद्या भागात राहणारे लोक एका जागी जमून बसने प्रयाण करतात. बसमध्ये जागा शिल्लक असली तर जवळचे आप्त, मित्र वगैरेंना घेऊन जातात, पण तसे केले तर सर्वांना बांधणारे समान सूत्र त्यात राहणार नाही, लहान लहान ग्रुप होतील आणि आम्हाला हे टाळायचे होते. त्यामुळे फक्त जे सगळे एकमेकांचे नातेवाईक आहेत अशांनाच बोलवायचे असे ठरले. माझे आजोबा आणि त्यांची मुले म्हणजे आमचे बाबा, काका आणि आत्या यातले कोणीच आता हयात नाहीत. पण या लोकांच्या पुढल्या पिढीतले आम्ही सर्वजण सख्खे, चुलत, आत्तेमामे भावंडे आहोत. ते आणि त्यांची मुले, नातवंडे एवढाच परिवाराचा आवाका निश्चित करण्यात आला. एकाद्या बहिणीचा दीर आणि तिच्या भावाची मेहुणी असे नातेवाईक त्या लोकांना कितीही जवळ वाटत असले तरी इतरांना ते परकेच वाटणार. त्यामुळे समान सूत्र रहाणार नाही. असा गोंधळ होऊ नये याचा विचार करून नातेवाइकांसाठी ही मर्यादा ठरवण्यात आली. त्या दिवशी मुंजीच्या ठिकाणी ज्या लोकांना या चर्चेसाठी एकत्र आणलेले होते ते सारे या व्याख्येत बसणारे असेच होते. ते आणि त्यांच्या परिवारातले इतर मेंबर किती आहेत त्यांची संख्या मोजली. तसेच जे आले नव्हते त्यांची नांवे लिहून संपूर्ण यादी तयार केली आणि तिथल्या तिथे त्यांना मोबाईलवरून फोन करून त्यांचे मत विचारले गेले. एकंदरीत सगळ्यांनाच उत्साह दिसत असल्यामुळे ही कल्पना पुढे रेटायचे एकमताने ठरले.

माझ्या आजोबांच्या आणि वडिलांच्या काळात संततीनियमन, कुटुंबनियोजन वगैरे शब्दसुध्दा निर्माण झाले नव्हते. त्यामुळे सरसकट सगळ्या कुटुंबांमध्ये आठ दहा मुले असतच. त्यातले अपमृत्यू, वैराग्य, आजारपण वगैरेमध्ये गाळले गेलेले वगळून घरटी सरासरी पाच धरले तरी दोन पिढ्यांमध्ये त्यांची संख्या पंचवीसपर्यंत जायचीच. माझ्या पिढीमधल्या भावंडांची संख्या त्यांच्या जोडीदारांसह पन्नासापर्यंत पोचते. त्यांनी हम दो हमारे दो या मंत्राचा अवलंब केला तरी माझ्या मुलांच्या पिढीत घरातल्या चाळीस पन्नास व्यक्ती आणि तितकेच त्यांचे जोडीदार धरून ऐंशी नव्वद होतात. त्यांच्या पुढच्या पिढीमधल्या म्हणजे आताच्या लहान बालकांची गणना धरून एकंदर संख्या दीडशेच्या वर गेली.

यातली अर्ध्याहून अधिक मंडळी पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर या भागात राहतात आणि उरलेली मंडळी कर्नाटक, गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये विखुरली आहेत. काही जण तर परदेशात गेलेले आहेत, त्यातले कोणी मुद्दाम या संमेलनासाठी येतील अशी शक्यता फार कमी होती. महाराष्ट्रातले ऐंशी टक्के आणि इतर राज्यांमधले पन्नास टक्के लोक येतील असे धरले तरी ऐंशीच्या वर उपस्थिती अपेक्षित होती. सर्वांना येण्याच्या दृष्टीने पुणे हे मध्यवर्ती शहर सोयिस्कर पडत असल्यामुळे त्याची निवड झाली. शहरातल्या एकाद्या कार्यालयात किंवा हॉलमध्ये जमलेले लोक तेवढ्यातल्या तेवढ्यात बाजारात जाऊन खरेदी करायचा, आणखी कुणाला भेटून यायचा किंवा असेच दुसरे एकादे काम करून यायचा विचार करतात असा अनुभव येतो. ते करायची संधी मिळू नये म्हणून शहरापासून दूर एकाद्या निवांत जागी असलेल्या रिसॉर्टवर जमायचे असे सर्वानुमते ठरले आणि पुण्यातल्या उत्साही तरुण मंडळींनी त्याची चौकशी करायची असे ठरले. दोन तीन आठवड्याच्या काळात सर्वांनी आपापल्या कुटुंबातल्या माणसांची संख्या सांगायची आणि लगोलग दर डोई पाचपाचशे रुपये जमा करायचे असेही ठरवण्यात आले.
. . . . . . . . . . . . .

कौटुंबिक संमेलन – २

संमेलनाची जागा ठरवल्यानंतर लगेच सर्वानुमते त्याची तारीखसुध्दा ठरवणे आवश्यकच होते, कारण ही पंचवीस तीस मंडळी आपापल्या घरी गेल्यानंतर पुन्हा सर्वांनी एकत्र जमून परस्पर विचार विनिमय करणे कठीण झाले असते. फार दूरवरचा विचार करण्यात बरीच अनिश्चितता येते आणि तयारी करण्यासाठी किमान थोडा तरी अवधी हवा. या दृष्टीने दीड दोन महिन्यात हे संमेलन भरवून घ्यायचे असे मत पडले आणि ते सर्वांना मान्य झाले. चातुर्मासात अनेक सणवार येतात, कोणाकोणाची व्रते वैकल्ये असतात, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी वगैरेंचे ठरलेले कार्यक्रम चुकवता येत नाहीत वगैरेंचा विचार करता त्याआधीच हे संमेलन भरवायचे ठरले. लगेच कॅलेंडर पाहून २४-२५ जुलैच्या तारखा ठरल्या आणि त्या दिवशी दुसरा तिसरा कोणताही कार्यक्रम कोणीही ठरवायचा नाही असा सर्वांना दम दिला. परगावी राहणाऱ्यांनी आताच रेल्वेचे रिझर्वेशन करून ठेवावे असे त्यांना सांगून टाकले.

हा कार्यक्रम करायचाच असे पक्के ठरवून सगळे आपापल्या घरी परतले. पुढच्या महिन्याभरात नक्की येणाऱ्यांची यादी तयार झाली आणि बरेचसे पैसेही गोळा झाले. कार्यक्रमाची जागा ठरवण्याचे काम पुण्यात रहात असलेल्या संजयने इतर पुणेकर मंडळींशी सल्लामसलत करून केले. सिंहगडाच्या पायथ्याशी, खडकवासला धरणाच्या जलाशयाच्या किनारी आणि पानशेत धरणाच्या रस्त्यावर शांतीवन नावाचे एक रिसॉर्ट आहे. ध्यानधारणा, योगविद्या वगैरेंच्या कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग वगैरे तिथे चालत असावेत. शंभर लोकांची उतरण्याची आणि खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था या जागी ठेवले जाते असे रिपोर्ट मिळाले. ही जागा आमच्या बजेटमध्ये बसतही होती. जागेचे बुकिंग करून सर्वांना कळवून टाकले.

शांतीवनाची जागा इतर दृष्टीने जरी खूप चांगली असली तरी तिथे पोचण्यासाठी आवश्यक असलेली वाहतुकीची व्यवस्था मात्र फारशी सोयिस्कर नाही. किंबहुना ती जवळ जवळ अस्तित्वातच नाही असेही म्हणता येईल. बाहेरगावच्या लोकांनी आधी पुण्यातल्या नातेवाइकांकडे यायचे आणि पुण्याहून तिकडे जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करायची असा विचार सुरुवातीला केला होता. त्यासाठी एक मोठी बस भाड्याने घ्यायची की लहान मिनिबसने दोन तीन खेपा करायच्या असे पर्याय होते. जसजशी संमेलनाची तारीख जवळ येऊ लागली तसतसे लोकांचे कार्यक्रम निश्चित होऊ लागले.

वेळ वाचवण्याच्या दृष्टीने मुंबई, ठाणे परिसरातल्या कांही लोकांनी आपल्या गाडीनेच पुण्याला जाऊन परत जायचा विचार केला आणि आपापल्या गाडीत आणखी कोणाकोणाला आपल्यासोबत घेतले. नाशिक आणि बार्शीची मंडळीही आपापल्या गाड्या घेऊन आली. डोंबिवलीतल्या नातेवाइकांनी ट्रॅक्स किंवा तवेरासारखे वाहन भाड्याने घेऊन एकत्र जायचे ठरवले. म्हणजे ही सगळी मंडळी थेट शांतिवनातच पोचणार असे निश्चित झाले. उरलेल्या कांही जणांनी एक दिवस आधी पुण्याला जाऊन आपल्या आप्तांच्या घरी मुक्काम केला. आता पुण्याहून जाणारी किती मंडळी आहेत आणि त्यातल्या किती जणांच्या मोटारी आहेत यांची मोजणी आणि चर्चा झाली आणि थोडी दाटी वाटी करून बहुतेकजणांना सामावून घेता आले. ते लोक पुण्याच्या वेगवेगळ्या भागात रहात असले तरी कुणी कुणी कुणाकुणाला कुठून कुठून पिक अप करायचे हे ठरवून त्याची पध्दतशीरपणे अमलबजावणी केली. कांही लोकांचे पुण्यात असलेले नातेवाईक आमच्या कुटुंबाच्या परीघात बसत नव्हते, पण त्यांनीही मदत करून काही जणांना शांतीवनापर्यंत पोचवून दिले.

अखेरीस अपवादात्मक दोन तीन लोकच उरले होते, जिथपर्यंत सार्वजनिक बससेवा उपलब्ध होती तिथपर्यंत ते आले आणि कोणीतरी तिथपर्यंत जाऊन त्यांना आपल्या गाडीतून घेऊन आले. मोबाईलवरून सतत एकमेकांच्या संपर्कात असल्यामुळे कोण कोण कुठपर्यंत आणि कसे येऊन पोचले आहेत याची वित्तंबातमी कळत होती आणि एकमेकांना मार्गदर्शन करणे शक्य होते. एकमेकांबद्दल मनात असलेल्या आत्मीयतेचा प्रत्यय या पूर्वतयारीतच दिसून येत होता. ज्याला ज्याला जे जे शक्य होते ते ते तो आपणहून करत होता. कुणालाही कुणाची मदत मागायची गरज पडली नाही की कुणी त्यात आढेवेढे घेतले नाहीत. डझनभर कारगाड्या, काही मोटरसायकली आणि एक व्हॅन यातून लहानमोठी सगळी मिळून नव्वद माणसे संध्याकाळपर्यंत शांतीवनाला जाऊन पोचली.

जुलैमधला दिवस ठरवतांना पाऊस पडण्याची थोडी शक्यता धरली होती आणि त्या दृष्टीने सर्वांनी छत्र्या, रेनकोट वगैरे आणले होते, पण तो आला नसता तरी चालले असते. आदल्या दिवशी पुण्यात पाऊस पडत नव्हता, त्या दिवशीसुध्दा आधी नुसतेच ढगाळ वातावरण होते. त्यामुळे सगळेजण खूष होते. पण घरातून निघण्याच्या सुमाराला रिमझिम पाऊस सुरू झाला. जसजसे खडकवासला जवळ यायला लागले तसतसा पावसाचा जोर वाढत गेला आणि शांतीवनात पोचेपर्यंत तो धो धो कोसळायला लागला. आम्हाला या अगांतुक पाहुण्याचे स्वागत करण्याशिवाय गत्यंतरच नव्हते.

शांतीवनामध्ये वस्तीसाठी अनेक वेगवेगळी कुटीरे आहेत आणि एकत्र येऊन बसण्यासाठी प्रशस्त हॉल आहेत. आमच्या कार्यक्रमासाठी जो हॉल ठरवला होता, त्यात पावसाचे पाणी येऊन साठायला लागले. त्यामुळे त्याऐवजी दुसऱ्या एका जास्त बंदिस्त जागेत आमची व्यवस्था करावी लागली. खरे तर या दुसऱ्या एका हॉलमध्ये गाद्या अंथरून झोपण्याची व्यवस्था केली होती. त्यावरच वाटले तर गप्पा मारत बसावे, वाटले तर पाय पसरावे असे करण्याची सोय होती. पण तिथेच कार्यक्रम करावा लागल्यामुळे सुरुवातीला सर्वांनी स्टेजच्या समोर येऊन बसायचे आणि नंतर ज्याला जेंव्हा झोप येईल तेंव्हा त्याने मागच्या बाजूला पसरलेल्या पथारीवर पहुडावे असे ठरवले. याला दुसरा पर्याय तरी कुठे होता?

निरनिराळ्या दिशेने येणारी मंडळी बरोबर ठरलेल्या वेळी येऊन पोचणार नाहीत हे माहीत होतेच. पुण्याच्या स्थानिक मंडळींनी आधी पुढे जाऊन सर्व व्यवस्था पाहिली. वृध्द, महिला आणि बालकांना आत पाठवून दिले आणि युवकवर्ग येणाऱ्या मंडळींना मार्गदर्शन करण्यासाठी प्रवेशद्वारापाशी उभा राहिला. एक एक ग्रुप येताच आधी आलेल्या मंडळींना भेटत होता. वडिलाधाऱ्यांच्या पाया पडणे, कडकडून मिठी मारणे, मुलांना उचलून घेणे, पाठ थोपटणे वगैरे अनेक मार्गांनी भावना व्यक्त होत होत्या. एकाची विचारपूस होईपर्यंत मागोमाग दुसरे येत होते आणि त्यात सामील होत होते. तासभर तरी हा कार्यक्रम चालला होता. चहा पुरवणाऱ्याला काय इन्स्ट्रक्शन्स होत्या कोण जाणे, बाहेर कोसळणारा पाऊस पाहून खरे तर त्याने चहाबरोबर कांद्याची भजी आणावीत असे वाटत होते, पण चहासुद्धा येता येत नव्हता. याबद्दल कोणाला आणि कोणी सांगायला हवे हे जो तो एकमेकांना विचारत होता. अखेर आमची आर्जवे त्याच्यापर्यंत पोचली आणि चहाने भरलेले पिंप घेऊन तो आला तेंव्हा टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत झाले.

. . . . . . . . . .

कौटुंबिक संमेलन – ३

या कौटुंबिक मेळाव्यासाठी पुण्याजवळील शांतीवनात सर्वजणांनी संध्याकाळी पाच ते सहा पर्यंत पोचायचे अशा सूचना दिल्या होत्या आणि बहुतेक सर्वांनी तसा प्रयत्न केला होता. पण घरातून निघतांना शेवटच्या क्षणी कोणाचा फोन वाजणे, दरवाजा बंद करतांना कांहीतरी लक्षात येणे, जिन्यातून खाली उतरल्यानंतर अचानक काहीतरी आठवणे, लहान मुले असल्यास त्यांना आयत्या वेळी तहान, भूक लागणे किंवा निसर्गाची हाक येणे वगैरे प्रकार होतातच. शिवाय रस्त्यातली गर्दी, पावसामुळे संथगतीने चालणारी रहदारी अशा कारणाने विलंब होत जातो. त्यामुळे स्थानिक संयोजक मंडळी जरी वेळेवर जाऊन पोचली असली तरी सहा वाजेपर्यंत थोडेसेच लोक शांतीवनापर्यंत येऊन पोचले होते. पण त्यानंतर ते एकामागोमाग एक येत गेले आणि अंधार पडण्यापूर्वी म्हणजे सातच्य़ा आत जवळजवळ सगळे आले आणि स्वच्छतागृहाला भेट देऊन ताजेतवाने झाले. बाहेरगावाहून आलेल्या आणि पावसात भिजलेल्या लोकांनी कपडे बदलले. लहान मुलांच्या आयांनी आधीच गोड दिसणाऱ्या आपल्या मुलांना आकर्षक कपडे घालून छान सजवले. चहाचा घोट घशाखाली गेल्यानंतर सर्वांना तरतरी आली आणि औपचारिक कार्यक्रमासाठी सगळे तय्यार होऊन बसले.

इतर कसलेही कारण नसतांना आपण सगळ्यांनी एकदा निव्वळ एकमेकांना भेटण्यासाठी म्हणून एका ठिकाणी जमायचे आणि एकादा दिवस एकमेकांच्या सहवासात गप्पागोष्टी करण्यात घालवायचा. अशी सुरुवात झाली होती आणि त्यासाठी मुबलक वेळ ठेवला होता. तरीसुध्दा हा कार्यक्रम मनोरंजक आणि संस्मरणीय व्हावा, त्यात सर्वांनी उत्साहाने भाग घ्यावा, सर्वांना मनसोक्त आनंद मिळावा म्हणून त्याची एक रूपरेखा आखायचे ठरवले आणि आमच्यातल्या कांही उत्साही तसेच अनुभवी लोकांनी पुढाकार घेऊन फोनाफोनी केली आणि आपसातच कांही गोष्टी ठरवल्या. एकमेकांची माहिती आणि विविधगुणदर्शन ही दोन मुख्य सूत्रे ठरवून कांमाची वाटणी करून घेतली. त्यातले पहिले काम मी करायचे ठरले आणि पंधरा वीस दिवस आधीपासूनच मी त्यासाठी कामाला लागलो.

फार पूर्वीच माझ्या माहितीनुसार मी एक वंशावळ तयार करून ठेवलेली होती. श्रीरंगनानाने त्याच्याकडली लिस्ट पाठवली. दोन्ही पाहून झाल्यावर गरजेप्रमाणे काही लोकांना फोन करून त्यातले कांही तपशील पडताळून पाहिले आणि नव्या सदस्यांची भर घालून ती वंशावळ अद्ययावत केली. आजोबा आजींपासून नवजात बालकांपर्यंत सुमारे दोनशे लोकांची ही यादी कशी सादर करता येईल याचा विचार करत असतांनाच पॉवर पॉइंटमध्ये ते काम करायची कल्पना श्रीने सुचवली आणि मी ती लगेच उचलली. वरपासून सुरुवात करून एक जोडपे आणि त्यांची अपत्ये एवढीच नांवे एका स्लाइडमध्ये घातली. त्यातली एक एक मुले, त्यांच्या पत्नी किंवा पती आणि त्यांची मुले पुढल्या स्लाइडमध्ये दाखवली. अशा वीस पंचवीस स्लाइड्स तयार केल्या. पॉवर पॉइंट या दृष्य माध्यमाचा अधिक उपयोग करून घेण्यासाठी स्लाइडमध्ये दाखवलेल्या नांवांच्या पाठोपाठ त्यांची छायाचित्रे दाखवायचे ठरवले. त्यासाठी माझ्याकडे असलेले सारे आल्बम काढून त्यातले फोटो निवडले. अनेक जणांनी आपापल्या कुटुंबांचे फोटो मेलने पाठवले. चैतन्य आणि उत्कर्ष आपटे कुटुंबाचा आल्बम घेऊन माझ्याकडे आले. माझ्या जन्मापूर्वी काढलेला माझ्या आजीआजोबांचा एक ऐतिहासिक फोटो मिळाला. माझ्या लहानपणच्या आमच्या घरात असलेला ऐतिहासिक आल्बमच बार्शीहून आला. त्यातली लहान लहान बालके आता आजोबा किंवा आजी झाल्या आहेत. त्यातल्या फोटोंचे संकलन करून एक अमूल्य असा ठेवाच मिळाला. आमचे आजोबा आजी आणि आईवडील ज्या खेडेगावांमध्ये रहात होते त्या गावाचे स्थान दाखवण्यासाठी गूगलअर्थवरून नकाशा काढला आणि त्यात खुणा करून कोण कोण कुठे रहात होते किंवा आता राहतात ती गावे दाखवली. हे सगळे काम करतांना जी मजा आली तिचे वर्णन शब्दात करणे अशक्य आहे.

पॉवर पॉइंटवर तयार केलेले हे प्रेझेंटेशन दाखवायची सोय कशी करायची हे पहायचे काम उदयला दिले. शिवाय शंभर लोकांना ऐकू येईल एवढ्या मोठ्याने बोलणे सर्वांना शक्य नसते. त्यासाठी ध्वनिसंवर्धक, ध्वनिप्रक्षेपक असली उपकरणे (माइक, स्पीकर वगैरे) हवीतच. त्यांची सोय शांतीवनाच्या हॉलमध्ये असल्याचे समजले. पण तिथे प्रोजेक्टरची सोय मात्र नव्हती. ती करणे आवश्यक होते. त्या वेळी असा प्रक्षेपक कोणाच्याही घरी नव्हताच आणि कोणीच या व्यवसायात नसल्यामुळे माझ्या काँप्यूटरशी सख्य साधू शकेल असा प्रोजेक्टर शोधून काढून तो भाड्याने आणणे हे एक जास्तीचे काम होऊन बसले. (आज फक्त एक टीव्ही आणि एक मोबाईल स्मार्टफोनवर हे काम करता येते पण तेंव्हा तशी सोय नव्हती.) सोयीच्या दृष्टीने शांतीवनात घेऊन जाण्यासाठी मी आपला लॅपटॉप पुण्याला नेला आणि त्याच्याबरोबर कम्पॅटिबल असा प्रोजेकेटर बाजारात निवडून त्याची ट्रायल घेतली. तोपर्यंत तिकडे जाण्यासाठी निघण्याची वेळ झालीच होती. त्यातून आयत्या वेळी गोंधळ झालाच तर वेळ निभावून नेण्यासाठी पुरेसे प्रिंटआउट काढून नेले होते. त्यात चित्रे आली नसली तरी सुवाच्य अक्षरात नामावली तरी दिसली असती आणि सर्वांना वाचता आली असती.

इतर लोकांनीसुध्दा आपापल्या परीने पुरेपूर तयारी केली होती. गायन वादनात प्रवीण असणारे कलाकार आपापली वाद्ये घेऊन आले. तबले, डग्गे, हार्मोनियम वगैरे आलेच, ढोलक, कोंगो बोंगो, कीबोर्ड आणि गिटार वगैरे सर्व वाद्यांनी सुसज्ज असा वाद्यवृंद तयार झाला. मंचावर त्याची मांडणी करणे, त्यांना वीजपुरवठा जोडणे वगैरे तयारी पाहून आता इथे काहीतरी घडणार आहे हे सर्वांना समजले आणि ते सज्ज होऊन पुढे येऊन बसले.

. . . . . . . . . . . . . .
कौटुंबिक संमेलन – ४

कौटुंबिकसंमेलन
आमचा हा कौटुंबिक मेळावा २४- २५ जुलैला करायचा ठरवला होता आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यातच एक अत्यंत दुःखद अशी घटना घडली. आमच्यातल्या एका अत्यंत घनिष्ठ आणि ज्येष्ठ व्यक्तीचे म्हणजे विमलताईचे देहावसान झाल्याच्या वृत्ताने साऱ्या कुटुंबावर शोकाचे सावट पसरले. आता या मेळाव्याचे ठरल्याप्रमाणे आयोजन करावे की करू नये, यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले. पण दुःखाचा पहिला आवेग ओसरल्यानंतर सर्वांनी फोनवर विचारविनिमय केला. पुढच्या पिढीमधल्या मुलांनी पुढाकार घेऊन या मेळाव्याची आखणी केली होती, त्यांच्या, मागल्या आणि पुढल्या पिढीमधल्या लोकांना एकत्र आणण्याचा त्यातला प्रयत्न आणि उद्देश स्तुत्य आणि महत्वाचा होता हे पाहून त्याला हिरवा कंदील मिळाला आणि नियोजित कार्यक्रमाची गाडी पुढे सरकली. पण आमच्या कुटुंबाच्या एका शाखेतून मात्र कोणीच आले नाहीत. ती मंडळी आली असती तर उपस्थितांची एकंदर संख्या सहज शंभरावर गेली असती. या मेळाव्याबद्दल स्वतः विमलताईला खूप इंटरेस्ट होता आणि प्रकृती तितकीशी ठीक नसतांनाही तिथे यायचे ती ठरवत होती. जर तिला ते शक्य झाले असते तर बाकीचेही सगळेच आले असते आणि आमचे संमेलन परिपूर्ण झाले असते. पण काळाला ते मंजूर नव्हते. त्यामुळे निरुपाय झाला.

या मेळाव्यातल्या औपचारिक कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत गांभिर्याने झाली. सभामंचावरील रंगीत पडद्यावर एक शुभ्र बेडशीट लावून तयार केलेल्या कामचलाऊ स्क्रीनवर आधी विमलताईचे छायाचित्र दाखवले. अदृष्यपणे तीसुध्दा त्या ठिकाणी आली असेल अशी मनात कल्पना करून साश्रु नयनांनी तिला भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आणि त्यानंतर मी माझ्या प्रेझेंटेशनची सुरुवात केली. आमच्या पिढीमधल्या सर्वांचे आजोबा आणि आजी यांची थोडक्यात माहिती सांगून त्यांचे वास्तव्य असलेले खेडेगांव नकाशात दाखवले. आमची पिढी त्या गावाच्या जवळपासच्या परिसरात वाढलेली आहे, पण पुढील पिढीमधल्या मुलांपैकी काहीजणांनी तो भाग पाहिला नसण्याची शक्यता आहे. त्यांच्यासाठी त्या भागाची झलक दाखवली. माझ्या वडिलांच्या पिढीमधले सारेच लोक आजोबांचे खेडे सोडून आधी तालुक्याच्या गावात येऊन स्थाइक झाले होते. नंतरच्या काळात सगळे तिथूनही चारी दिशांना पांगले.

सत्तर वर्षांपूर्वीच्या एका ऐतिहासिक पण अजूनपर्यंत शाबूत असलेल्या छायाचित्रात मागील पिढीतल्या बहुतेक मंडळींचे दर्शन घडले. ती पिढी आता काळाआड गेली आहे. आमच्या पिढीमधले बरेचजण बालकांच्या स्वरूपात या फोटोत दिसतात. त्यातल्याही कांही व्यक्ती आता नाहीत, तर माझ्यासकट कांही भावंडांचे जन्मसुध्दा तेंव्हा झालेले नसल्यामुळे आम्ही त्या फोटोत दिसत नाही. ही सारी मंडळी जवळची आणि नेहमीच्या पाहण्यातली असल्यामुळे त्यांचे जुने बालरूप पाहून त्यातल्या लोकांना बालपणीच्या अंधुक झालेल्या आठवणी ताज्या झाल्या आणि इतरांना ते खूपच मनोरंजक वाटले.

त्यानंतर आमच्या पिढीमधील एक भाऊ किंवा बहिण आणि तो संपूर्ण परिवार यांची नावे स्क्रीनवर आली की त्यांच्यापैकी जेवढे लोक आले आहेत त्यांनी मंचावर यायचे आणि आपली ओळख करून द्यायची, त्यांच्या परिवाराचे निवडक फोटो दाखवायचे, जे आले नसतील त्यांची माहिती सांगायची असा क्रम सुरू केला. भिडस्तपणामुळे स्वतःबद्दल कोणी सहसा जास्त बोलत नाही हे पाहून एकेकाने इतरांबद्दल सांगितले आणि त्यातून निसटलेल्या कांही महत्वाच्या आणि मजेदार गोष्टी मी किंवा प्रेक्षकांमधून कोणीतरी मंचावर येऊन सांगितल्या. अशा प्रकारे हा ओळख करून घेण्याचा कार्यक्रम खूप रंगला आणि जवळ जवळ दोन तास चाललेला होता. तो संपत आलेला असतांनाच अचानक वीज गेल्यामुळे प्रोजेक्टर बंद पडला. तोपर्यंत भोजनाची तयारी झाली होती आणि लोकाच्या पोटात भुकाही लागल्या होत्या. त्यामुळे इमर्जन्सी लाइट्सच्या उजेडात सारे भोजनालयाकडे रवाना झालो.

भोजनालय शांतीवनातल्याच दुसऱ्या ठिकाणी होते. चांगला मोसम असता तर त्या रम्य परिसरात हिंडत फिरत जायला मजा आली असती. पण वरून कोसळणाऱ्या पावसाच्या धारा, खाली शेवाळ साठून निसरडा झालेला रस्ता, तोसुध्दा अनेक जागी उंच सखल, चढउतार आणि पायऱ्या वगैरेंने भरलेला, वीज गेल्यामुळे गुडुप काळोख यामुळे हे लहानसे अंतर चालणेसुध्दा जिकीरीचे वाटत होते. कांही लोकांनी दूरदर्शीपणा दाखवून टॉर्च आणले होते, कांही लोकांनी मोबाइलचा उजेड दाखवला. विशेषतः पायऱ्या असलेल्या जागी कोणी ना कोणी उभे राहून मागून येणाऱ्यांना सावध करत होता. जेवण मात्र छान असल्यामुळे केलेल्या श्रमांचे सार्थक झाले. बहुतेकांच्या आवडीचा कोणता ना कोणता पदार्थ त्यात असल्याने सर्व मंडळी तृप्त होऊन हॉलमध्ये परतली. जास्तच वयोवृध्द लोकांसाठी भोजनाची ताटे भरून त्यांना हॉलमध्ये नेऊन दिली.

कार्यक्रमाची रूपरेषा आखतांना सहा साडेसहाला सुरुवात करायची आणि तासाभरात ओळखीचा भाग संपल्यावर भोजनापूर्वी पुष्कळ वेळ शिल्लक असेल त्यात आपल्या कुटुंबाचा इतिहास थोडक्यात सादर करायचा असा विचार मी केला होता. गेल्या शंभर वर्षांचा त्रोटक आढावा घेतांना त्यातील प्रत्येक दशकातली जागतिक आणि देशामधली परिस्थिती आणि घटना यांच्या बरोबरीने त्या काळखंडात घडलेल्या आपल्या कुटुंबातल्या महत्वाच्या घटना सांगत जाणारा एक माहितीपट मी तयार केला होता. तो ऐकायला कदाचित रुक्ष वाटेल म्हणून त्यातील महत्वाच्या टप्प्यांवर त्या काळात लोकप्रिय असलेले एक गाणे टाकून लोकांचे थोडे मनोरंजन करायची कल्पना होती आणि त्यासाठी बरीच माहिती जमवली होती. चांगल्या आवाजाची देणगी लाभलेल्या मुलांमुलींमध्ये ही गाणी वाटायची, त्यांनी ती तयार करून ठेवायची आणि ठरलेल्या स्लॉटमध्ये गायची असा विचार होता. पण इतर अनेक उद्योग आणि अडचणी सांभाळता सांभाळताच वेळ निघून गेल्यामुळे या कार्यक्रमाचे पध्दतशीर नियोजनच करता आले नाही. रिहर्सल करायचा प्रश्नच उद्भवला नाही. हा कार्यक्रम करण्यासाठी ठेवलेला टाइमस्लॉटही मिळाला नाही. ज्यांनी यासाठी थोडी तयारी केली होती तिचा उपयोग भोजनोत्तर कार्यक्रमात केला.

. . . . . . . . . . . . .

कौटुंबिक संमेलन – ५

MusicProgramblog5F

शनिवार रात्रीचे जेवणखाण उरकून सारी मंडळी शांतीवनातल्या हॉलवर परत येईपर्यंत वीज आली होती, रंगमंचावर तबला, पेटी, सिंथेसाइजर, गिटार वगैरे वाद्यांची मांडणी करून ठेवली होती आणि वादक मंडळी तयारीत होती. लोक परत येताच विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सुरू झाला. रात्रीचे साडेदहा वाजून गेले असले तरी अख्खा बालचमू टक्क जागा होता आणि उत्साहाने या कार्यक्रमाची वाट पहात होता. काही मुलांनी त्यासाठी बरीच पूर्वतयारी केली होती. पाच वर्षाच्या निधीने काही उत्कृष्ट कविता आणि गद्य उतारे पाठ करून ठेवले होते, ते अस्खलित वाणीत सादर केले. पाठांतराची आणि सादरीकरणाची तिची क्षमता बघून सगळे थक्क झाले. सहा वर्षाच्या इराला राधा ही बावरी हे गाणे आधीपासूनच तोंडपाठ होते आणि त्या गाण्याची चालही तिच्या ओठावर होती, तरीही आदले दिवशी ती हे गाणे सतत तासभर ऐकत होती. त्यातल्या आआआ, ईईई, एएए वगैरे खास लकेरींच्या जागा आणि रिकाम्या जागा (पॉजेस) लक्षपूर्वक ऐकून तिने घटवून ठेवल्या आणि वादक साथीदारांनी दिलेल्या ठेक्यावर जशाच्या तशा सादर करून तुफान टाळ्या मिळवल्या. तीन साडेतीन वर्षांच्या चिटुकल्या आणि धिटुकल्या प्रियाने बडबडगीते, प्रार्थना, नर्सरी ऱ्हाइम्स वगैरे जे जे त्या क्षणी सुचेल ते बिनधास्तपणे गाऊन घेतले. अजय-अतुल यांची गाणी श्रेयस आणि सर्वेश ही भावंडे फर्मास गातात. त्यांचे मल्हार वारी तर अफलातून झाले. केतकी, अक्षय, प्रणीता, सानिका वगैरे इतर मुलांनाही या गाण्यांवरून स्फूर्ती मिळाली आणि त्यांनी एकेकट्याने किंवा समूहात निरनिराळी गाणी गाऊन धमाल आणली. शुभंकरोती ते अग्गोबाई ढग्गोबाई आणि ट्विंकल् ट्विंकल ते ऑल ईज वेल् पर्यंत अनेक लोकप्रिय मराठी, हिंदी आणि इंग्रजी गाणी या मुलांनी म्हंटली. त्यात बालगीते, बडबडगीते ते भक्तीगीते आणि चित्रपटगीते वगैरे सगळ्या प्रकारची गाणी झाली. बहुभाषी तृप्तीने मराठी आणि हिंदीशिवाय कन्नड आणि तामीळ भाषेतली गाणी गाऊन दाखवली. जवळजवळ तासभर मुलांनीच रंगमंच गाजवला.

मुलांचा उत्साह ओसरल्यानंतर मोठ्या लोकांना संधी मिळाली. सुधा आणि अलका या पट्टीच्या गायिकांनी अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन रसिक श्रोत्यांची वाहवा मिळवलेली आहे. त्यांनी त्यांची निवडक गाणी गायिलीच, कांही खास गाण्यांची फरमाईशही त्यांना झाली. प्रशांत आणि प्रिया (मोठी) आता तयार झाले आहेत. उदय, जितेंद्र आणि मंजिरी यांचे गळे चांगले आहेत आणि त्यांना गाण्याची आवड आहे. त्यांनी थोड्या गाण्यांची तयारी करून ठेवली होती, ती सराईतपणे सादर केली. शिवाय प्रेक्षकांमध्ये बसलेल्या अनेकांना आग्रह करकरून एक दोन गाणी म्हणायला लावली. सर्वांचा सहभाग हे या कार्यक्रमाचे मुख्य सूत्र होते. एका लहानशा ग्रुपने कार्यक्रम करायचा आणि इतरांनी तो ऐकायचा असे त्याचे स्वरूप नव्हते. ज्यांना मंचावर यायला संकोच वाटत होता त्यांना बसल्या जागी माईक देण्यात आला. सत्तरीतल्या विजयावहिनी आणि सुलभावहिनी यांनीसुध्दा सुरेल गाणी गायिली.

आमच्याकडल्या संगीताच्या घरगुती बैठकींमध्ये हार्मोनियमची साथ नेहमी प्रभाकर करतात, तशी त्यांनी बराच वेळ केली. अधून मधून इतरांनीही पेटी वाजवून त्यांना विश्रांती दिली. प्रशांतला तबलावादनामध्ये तालमणी हा खिताब मिळालेला आहे. त्याला साजेशी कामगिरी थोडा वेळ करून त्याने तबला डग्गा मीराच्या स्वाधीन केला आणि तो स्वतः सिंथेसाइजरवर बसला. पुढले दोन अडीच तास तबला वाजवून मीराने सर्वांना चकित केले. प्राचीने शास्त्रीय संगीताची झलक दाखवली. मैत्रेय अगदी सुरुवातीपासून अखेरपर्यंत गिटार वाजवून साथ देत होता. त्याने कांही सोलो पीसेसही वाजवून दाखवले. अच्युत, मिलिंद, चैतन्य वगैरे अधून मधून इतर तालवाद्यांवर ठेका धरत होते. यातली गंमत म्हणजे ही सगळी मंडळी वेगवेगळ्या गांवाहून आली होती आणि शांतीवनातल्या स्टेजवरच एकत्र जमली होती. त्यांनी कुठल्याच गाण्यांची आधी प्रॅक्टिस केलेली नव्हती. कोणची गाणी कोण गाणार आहे हेच मुळी ठरलेले नव्हते. संगीतसंयोजन, स्वरलिपी वगैरे प्रकार नव्हतेच. सर्वांनीच आपापल्या हातातली वाद्ये उत्स्फूर्तपणे सुचेल आणि जमेल तशी वाजवूनसुध्दा त्यात सुरेख मेळ जमून येत होता. अशा बैठकांमध्ये सूर ताल लय वगैरेंचा फारसा कीस कोणी काढत नाही, पण गोंगाट आणि संगीत यातला फरक कानाला समजतोच. संपूर्ण कार्यक्रमात गोगाटाचा अनुभव अगदी क्वचित आला आणि बहुतेक वेळ सुरेल संगीतच ऐकायला मिळत गेल्याने त्याची रंगत वाढत गेली.

तबला, पेटी, सिंथेसायजर, गिटार वगैरे वाद्ये आणि वादक मंडळींनी तिथला लहानसा मंच भरून गेला असल्यामुळे नृत्य किंवा नाटक सादर करायला जागाच नव्हती. स्टेजच्या समोर असलेल्या लहानशा मोकळ्या जागेत काही लहान मुले उडत्या चालीच्या गाण्यांच्या तालावर नाचून घेत एवढेच. पण गाण्यांखेरीज इतर काही आयटम सुध्दा या कार्यक्रमात सादर झाले. शुक्रतारा मंदवारा या गाण्याच्या चालीवर प्रसाद आणि सुनीतीने ‘दे आता करुनी चहा’ हे विनोदी द्वंद्वगीत गाऊन दाखवले तर देहाची तिजोरीच्या चालीवर यशवंत देवांची ‘पत्नीची मुजोरी’ ही कविता प्रसादने ऐकवली. कोल्हापूर रेडिओस्टेशनवर चालत असलेले पैलवानांच्या शरीरसौष्ठवावरचे भाषण आणि सांगली केंद्रावर चालत असलेली एक पाककृती यातली वाक्ये आलटून पालटून वाचून त्यातून येणारी धमाल या जोडीने ऐकवून पोट धरधरून हसायला लावले. स्वतःचे हंसू आवरून ठरलेली वाक्ये न विसरता गंभीरपणे म्हणणे हे कठीण काम त्यांनी सहज केले. टीव्ही येण्याच्या आधीच्या काळात अशा प्रकारचे विनोदी मिश्रण खूप पॉप्युलर होते. पण जवळ जवळ वेव्हलेंग्थ असलेली दोन आकाशवाणी केंद्रे एकाच वेळी रेडिओवर लागणे शक्य होते, तसे दोन टीव्ही चॅनल लागत नाहीत, शिवाय दृष्य चित्रांची मिसळ करणे जास्त कठीण असते यामुळे रेडिओबरोबरच विनोदाचा हा प्रकार मागे पडत गेला.

कॉलेजकुमार उत्कर्ष मासिकासारखे दिसणारे एक पुस्तक हातात धरून स्टेजवर आला आणि त्याने दोन अर्थपूर्ण कविता वाचून दाखवल्या. तो प्रसादनंतर लगेचच आल्याने त्यानेसुध्दा त्याला आवडलेल्या पण फारशी प्रसिध्दी न मिळालेल्या कविता वाचल्या असाव्यात असे वाटले. त्या कविता त्याने स्वतः रचल्या होत्या, त्याच्या कॉलेजच्या स्मरणिकेत त्या प्रसिध्द झाल्या होत्या आणि प्रत्यक्ष कवीवर्य विंदा करंदीकर यांनी त्याबद्दल त्याला शाबासकी दिली होती हे नंतर बोलण्यातून कळले. माणसाने विनयी असावे, पण आपल्या गुणांची आणि मिळालेल्या यशाची थोडी प्रसिध्दी करावी किंवा खुबीने करवून घ्यावी असा सल्ला मी त्याला दिला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोणीच करत नव्हता. सगळा उत्स्फूर्त मामला होता. पण अधून मधून स्टेजवर येऊन विनोदी चुटके सांगायचे काम मिलिंद करत होता. त्याच्याकडे विनोदी किश्श्यांचा भरपूर स्टॉक होता आणि होऊन गेलेल्या गाण्याशी सांगड घालून त्यातला नेमका जोक नाट्यपूर्ण पध्दतीने सांगण्याचे कसब त्याने आत्मसात केले आहे. त्याच्या खुसखुशीत कॉमेंट्समुळे कार्यक्रमाला जीवंतपणा येत होता.

रंगत गेलेल्या या कार्यक्रमात जेंव्हा सध्याचे टॉपहिट गाणे ‘आता वाजले की बारा’ सुरू झाले तेंव्हा घड्याळात अडीच वाजले होते. त्यानंतर तो आवरता घ्यायचे ठरले. तरीही आणखी एक आणखी एक असे करत भैरवी संपेपर्यंत तीन वाजले होते. हॉलभर गाद्या बिछवून ठेवल्या असल्याने बरीचशी मंडळी गाणी ऐकता ऐकता जागीच आडवी झाली होती. पाच सहा कॉटेजेसमध्ये ज्येष्ठ सदस्यांची सोय केलेली होती. आपापल्या जागी जाऊन निजानीज होईपर्यंत आणखी अर्धा तास गेला. पाऊस पडतच होता. कॉटेजच्या वर पत्र्याचे छप्पर असल्यामुळे तव्यावर लाह्या फुटाव्यात तसे पावसाचे थेंब त्यावर तडतड करत होते. पावसाच्या जोराबरोबर त्याची लय कमी जास्त होत होती. पण त्या लयीवरच निद्रादेवीची आराधना करत असतांना ती प्रसन्न झाली आणि तिने सर्वांना आपल्या आधीन करून घेतले.

. . . . . . .

कौटुंबिक संमेलन – ६

खडकवासला धरणाच्या विस्तीर्ण तलावाच्या किनारीच पानशेतकडच्या बाजूला असलेल्या डोंगराच्या उतारावर शांतीवन उभे केले आहे. सरोवराच्या काठी रम्य दृष्य आहेच, शिवाय मुलांना खेळण्यासाठी अनेक प्रकारची व्यवस्था आहे. रविवारी सकाळच्या वेळी सर्वांनी तिथल्या निसर्गसौंदर्याचा मनसोक्त आस्वाद घेत हिंडावे, फिरावे, मुलांनी खेळावे, बागडावे यासाठी भरपूर वेळ दिला होता. त्यानंतर हॉलमध्ये कांही पार्टी गेम्स खेळायचे योजले होते. दुपारचे जेवण झाल्यानंतर पुन्हा सर्वांनी थोडा वेळ एकत्र बसून जुन्या आठवणी, मजेदार अनुभव, पुढील योजना, सूचना, मार्गदर्शन, चर्चा वगैरे ज्याला जे योग्य वाटेल ते करण्यात तो वेळ सत्कारणी लावायचा आणि चहापानानंतर परतण्यासाठी प्रस्थान करायचे अशी या कार्यक्रमाची सर्वसाधारण रूपरेषा आखली होती. पण पाऊस आणि वीजकपात या गोष्टींनी येत गेलेल्या अडथळ्यांमुळे त्यात आयत्या वेळी बरेच बदल करावे लागले.

आदले दिवशी झोपायला उशीर झाल्यामुळे रविवारी सकाळी लवकर उठण्याची कोणालाच घाई वाटली नाही. ढगाळ हवामानामुळे दिवसाचे उजाडणे मंदच होते. त्या दिवशी लख्ख ऊन पडलेच नाही. त्यामुळे ते अंगावर येण्याचा प्रश्नच नव्हता. एकमेकांच्या आवाजानेच आजूबाजूचे लोक हळूहळू जागे झाले. प्रातर्विधीसाठी थोड्या अंतरावर वेगळा टॉयलेट ब्लॉक होता. त्यात टॉयलेट्सची पुरेशी संख्या असल्यामुळे चाळीत राहणाऱ्या लोकांप्रमाणे लाइनीत नंबर लावून उभे राहण्याची गरज पडत नव्हती. पण सर्वजण गीजर, शॉवर वगैरेंनी युक्त असे पाश्चात्य पध्दतीचे अटॅच्ड बाथरूम बेडरूममध्येच असलेल्या घरात रहात असल्यामुळे सर्वांना आता त्याची संवय झाली आहे आणि नुसता पंचा गुंडाळून बाहेर फिरायला लाज वाटते. त्यामुळे बाहेर जाण्यायोग्य कपडे अंगावर चढवून आणि हातात छत्री घेऊन टॉयलेट ब्लॉकपर्यंत जाणे येणे अडचणीचे वाटले. हवेतल्या गारव्यामुळे आंघोळ करण्याची आवश्यकता तशी कमीच झाली होती. त्यातून आंघोळ करण्यासाठी म्हणून पावसामध्ये आणखी एक फेरी मारण्यापेक्षा गोळ्या घेणेच बरे असे अनेक जणांनी ठरवले.

नाश्त्यासाठी डायनिंग हॉलला भेट देणे गरजेचे होते. गरम गरम इडल्यांचे घाण्यावर घाणे येत होते. प्रत्येकाने किती इडल्या खायच्या यावर बंधन नसले तरी आपल्याला इतरांनी हावरट म्हणू नये म्हणून सगळ्यांनी आधी फक्त दोन दोनच इडल्या प्लेटमध्ये वाढून घेतल्या आणि त्या संपल्यानंतर मात्र कोणी इडलीची, कोणी सांबाराची तर कोणी चटणीची तारीफ करीत बहुतेक जणांनी आपल्या प्लेट पुन्हा भरून आणल्या.

न्याहारी झाल्यानंतर बहुतेक मंडळी थोडा वेळ इकडे तिकडे हिंडून परत आली, पण पाऊस आणि निसरडे रस्ते यांना पाहून तशा अवस्थेत चढउतार करण्याचे धाडस करण्याचे वयस्क लोकांनी टाळले. थोड्या वेळाने जेंव्हा सारे लोक हॉलमध्ये परत आले तेंव्हा दोन चार चेहेरे दिसत नव्हते. ते लोक सकाळी उठल्यानंतर लगेच अंतर्धान पावले होते असे समजले. त्यांच्यामधल्या कोणाची प्रकृती ठीक नव्हती आणि कोणाला अधिक महत्वाचे काम होते. त्यामुळे सर्वांच्या भेटीगाठी होण्याचा मुख्य उद्देश सफळ झाल्यानंतर जास्त गाजावाजा न करता ते पुण्याला परत गेले होते. पावसाचा जोर वाढतच होता, वीज कधी येत होती, कधी जात होती याचा भरवसा नव्हता. सर्वांना रात्री मुक्कामाला वेळेवर आपापल्या गावाला जाऊन पोचणे श्रेयस्कर वाटत होते आणि पावसामुळे प्रवासात कोणत्या अडचणी येऊ शकतील ते सांगता येत नव्हते. त्यामुळे बाहेरगांवाहून आलेल्या बहुतेक सर्व मंडळींनी जेवण झाल्यानंतर लगेच निघण्याचा निर्णय घेऊन तो सांगून टाकला.

आता हातात असलेल्या दीड दोन तासांमध्ये काय करायचे याचा पुनर्विचार केला गेला. शनिवारी संध्याकाळी आलेल्या सदस्यांची ओळख करून देतांना वीज गेल्यामुळे प्रेझेंटेशनचा अखेरचा थोडा भाग दाखवायचा राहून गेला होता. शिवाय परांजप्यांची मोटर वाटेत नादुरुस्त झाल्यामुळे ते कुटुंब शांतीवनात उशीरा येऊन पोचले होते. त्यांची ओळख करणे आणि जोशी कुटुंबाची माहिती दाखवायचे राहिले होते. हे पाहता आदले दिवशी दाखवलेल्या प्रेझेंटेशनच्या स्लाइड्स पुन्हा एकदा भराभर दाखवल्या. परांजपे कुटुंबाची स्लाइड आल्यावर त्यांची सविस्तर ओळख करून घेतली आणि राहून गेलेला भाग पूर्णपणे दाखवला. या प्रेझेंटेशनमध्ये प्रत्येक कुटुंबामागे फक्त एकच चित्र दाखवले होते, पण या निमित्याने जुन्या फोटोंचा खजिना हाती लागला होता. त्याचे एक वेगळे प्रेझेंटेशन तयार केले होते. ते दाखवतांना प्रत्येक फोटोमधल्या व्यक्ती ओळखणे आणि त्यानंतर एकेकाला त्या काळी तू कोण होतास, होतीस आणि आता काय झालास, झालीस असे म्हणतांना खूप गंमत आली. आपल्या आईवडिलांना आणि आजीआजोबांना लहान असतांना पहातांना मुलांना तर खूपच मौज वाटत होती. पण हा प्रोग्रॅम संपण्याच्या आधीच पुन्हा लाइट गेले आणि तो बंद पडला.

वीज गेल्यामुळे प्रोजेक्टरबरोबर माईकही बंद झाला. ऐंशी पंचाऐंशी लोकांना ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात जो कोणी बोलू शकेल असे लोकच आता काही सांगू शकतील हा एक नवा मुद्दा समोर आला. सर्वांना त्यासाठी शक्य तितक्या जवळ बोलावून कोंडाळे केले. त्या दिवशी गुरुपौर्णिमा होती. या निमित्याने सर्वांनी सामूहिक आवाजात गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू हा श्लोक म्हणून गुरुवंदना केली. गुरूंचे महात्म्य आणि आपल्या जीवनातले स्थान, आपल्याला ते कोणकोणत्या रूपात भेटतात, आदर्श गुरू शिष्याला कसे घडवतात, तसे गुरू नाही भेटले तरी आपण कोणाकोणाला गुरुस्थानी मानून एकलव्यासारखे विद्याग्रहण करू शकतो, त्यासाठी मनात विनम्रभाव असणे कसे महत्वाचे आहे वगैरेचे थोडक्यात मार्गदर्शन केले.

. . . . . . .. . . . . . . . . . . . .

कौटुंबिक संमेलन – ७ (अंतिम)

GhareMelava_blog7

मधुकरला पहिल्यापासूनच नाटकाची आवड आणि अभिनयाचे अंग असल्यामुळे तो गेली चाळीस पन्नास वर्षे या क्षेत्रात वावरतो आहे. बरीच वर्षे हैद्राबादला असतांना तो तिथल्या महाराष्ट्रमंडळाचा अत्यंत उत्साही आणि सक्रिय कार्यकर्ता होता. दरवर्षी नवनवी नाटके बसवून तिथल्या मराठी समाजापुढे सादर करण्यात तो नेहमीच पुढाकार घेत असे. पुण्याला स्थायिक झाल्यानंतरही तो त्याच्या वसाहतीतील सांस्कृतिक विश्वात सक्रिय आहे. आमच्या कौटुंबिक संमेलनात त्याच्या अभिनयकौशल्याची झलक दाखवायचे ठरलेलेच होते, पण शनिवारी रात्री झालेल्या विविधगुणदर्शनाच्या कार्यक्रमात संगीताचेच प्राधान्य होते आणि शांतीवनातल्या छोट्याशा मंचावर मांडलेली वाद्ये बाजूला करून मोकळी जागा करणे व पुन्हा ती सारी मांडून त्यांची विजेशी जोडणी करणे बरेच कठीण होते. त्यामुळे मधुकरचा नाट्याविष्काराचा कार्यक्रम रविवारी सकाळी करायचे ठरवले. त्या दिवशीही अनपेक्षितपणे वीज गेली. तरीही मायक्रोफोनच्या मदतीशिवाय त्याने शारदा नाटकातला एक प्रवेश अप्रतिम पध्दतीने सादर केला. त्यातल्या निरनिराळ्या पात्रांच्या बोलण्यातल्या वेगवेगळ्या लकबी आणि हावभावांमधले बारकावे वगैरे सारे त्याने एकट्याने सादर करून शारदा नाटकातला तो प्रसंग केवळ आपल्या अभिनयकौशल्याने जसाच्या तसा उभा करून दाखवला.

नाटकांचे लेखन, दिग्दर्शन, अभिनय वगैरे सबकुछ जबाबदाऱ्या प्रभाकर एकट्याने पेलतात. त्यांनी स्वतः लिहिलेल्या आणि बसवलेल्या एका नाटकातला प्रवेश त्यांनी सादर केला. त्या नाटकाचे कथानक, त्यातली पात्रे आणि तो विशिष्ट प्रसंग वगैरेंचे मार्मिक विवेचन करून त्यांनी नाट्यसृष्टीतले अंतरंग थोडेसे उलगडून दाखवले. नटाने नाटकातल्या एकाद्या भूमिकेत शिरणे वगैरे सगळ्या गप्पा असतात, तसे करणे शक्य तर नसतेच आणि इष्टही नसते, कोणीही तसे प्रत्यक्षात करत नाही. आपल्या अभिनयाच्या जोरावर आणि शब्दांच्या फेकीतून तसा आभास तो निर्माण करतो. नाटक पहातांना आपल्यालाही त्या नटाचे अस्तित्व जाणवल्याशिवाय रहात नाही. असे त्यांनी ठामपणे सांगितले. मागे एकदा पुलंच्या एका मुलाखतीत त्यांनीसुध्दा असेच काहीतरी सांगितल्याचे मला आठवते.

सुधा, शैला वगैरेंनी त्यांच्या बालपणातल्या काही डोळ्यात पाणी आणणाऱ्या हृदयस्पर्शी आठवणी तर गुदगुद्या करणाऱ्या काही खुसखुशीत हकीकती सांगितल्या. इतरांनीही त्यात भर घातली. पंचवीस वर्षांपूर्वी आमच्या आईने रचलेले अंबरीशाचे आख्यान सरोजला अजून तोंडपाठ आहे. ते तिने केवळ स्मरणातून पूर्ण ऐकवले. आईने केलेल्या आणखी कांही निवडक कवनांचे मी वाचन केले. नंतर आपण केलेले एक विडंबनही वाचून दाखवले. मानसीने रंगवलेल्या अप्रतिम चित्रांचे एक लहानसे प्रदर्शन त्या हॉलमध्ये भरवले होते. तिने काढलेली सुंदर चित्रे त्यासाठी रंगमंचावरील पडद्यावरच चिकटवली किंवा टाचली होती. प्रभाकरांनी आपल्या सुवाच्य अक्षरात लिहून आणि रेखाचित्रांनी सजवून प्रदर्शनात ठेवलेल्या कवितांचे नमूनेही हॉलमधल्या भिंतीवर लावले होते.

या प्रसंगी आलेल्या ज्येष्ठ सदस्यांचा त्यांच्या नातवंडांकडून सत्कार करण्यात आला. एक पुष्पगुच्छ आणि नारळ देणे आणि वाकून नमस्कार करणे एवढेच त्याचे स्वरूप होते. ज्यांची नातवंडे हजर नव्हती त्यांचा सत्कार त्यांच्या कुटुंबातल्या तिथे आलेल्या सर्वात लहान असलेल्या व्यक्तींनी केला. या कार्यक्रमाचे संयोजन आणि त्यासाठी सारी धावपळ करणाऱ्या युवकांचाही नामनिर्देश करून वडिलधाऱ्यांच्या हस्ते त्या सर्वांना फूल आणि नारळ दिले. तोपर्यंत भोजनाची व्यवस्था झाली असल्याची वर्दी आली.

पुण्यातले कांही लोक जेवणासाठीही शांतीवनात न थांबता सरळ आपल्या घरी परतले आणि बाहेरगावाहून आलेले काही लोक जेवण आटोपून लगेच परतीच्या प्रवासाला निघाले. त्यामुळे भोजनोत्तर कार्यक्रमासाठी अर्धेच लोक शिल्लक राहिले होते. त्यांनाही परत जावेसे वाटायला लागले होते, पण त्यानंतर जादूचे प्रयोग असल्याची घोषणा केली गेल्यामुळे छोट्या मुलांनी त्यांना जाऊ दिले नाही. हा खेळ शांतीवनातर्फे दाखवला जाणार होता. सर्वांनी भोजनालयात जाऊन आणि जेवण करून परत हॉलमध्ये येईपर्यंत स्टेजवर टेबल ठेवून जादूच्या खेळाची तयारी सुरू झाली होती, पण विजेचा मात्र पत्ता नव्हता. आता मात्र ती येईपर्यंत थांबून तिची वाट पहायची कोणाचीही तयारी नव्हती आणि जादूगारालासुध्दा संध्याकाळी आणखी कुठे जायचे असावे. त्यानेही लाइटिंग आणि माइकशिवायच प्रयोग सुरू करून दिला. कदाचित त्याच्यासाठी हे रोजचेच असेल. तुकडे तुकडे केलेल्या रिबीनीमधून अखंड रिबीन काढून दाखवणे, एकादी वस्तू टेबलावरून अदृष्य करून कोणाच्या खिशातून किंवा टोपीतून ती बाहेर काढणे, रिकाम्या थैलीमधून कबुतरे काढणे वगैरे हातचलाखीचे नमूने दाखवून त्याने छान मनोरंजन केले. यातली ट्रिक शोधून काढण्याचा निष्फळ प्रयत्न करण्यापेक्षा त्या जादूगाराच्या हुषारीची मजा घेत त्याला दाद देणेच मी जास्त पसंत करतो. मुलांना तर ते खरेच वाटते आणि ती विस्मयचकित होतात.

जादूचे प्रयोग संपल्यावर मात्र तिथे जास्त वेळ थांबायची कोणाची तयारी नव्हती. पावसाचा जोर वाढतच होता आणि तो कमी होण्याची लक्षणे दिसत नव्हती. रविवारी संध्याकाळी खडकवासला धरणाच्या काठावर पिकनिकला किंवा भटकंतीला येणाऱ्या पर्यटकांची भरपूर गर्दी असणार हे माहीत होते. त्यामुळे शक्य तितक्या लवकर निघणे चांगले होते. परतीच्या प्रवासात कोणाकोणाच्या गाडीत कोणाकोणाला घ्यायचे याची चर्चा करून ते नक्की केलेले होतेच. आमच्या गाडीमधल्या पॅसेंजरांना गोळा करून आम्हीही परतीला निघालो. बरोबर नेलेल्या सगळ्या सामानाची आवराआवर करून आणि बिले भागवणे वगैरे उरलीसुरली कामे आटोपून शेवटची बॅचसुध्दा तासाभरात परतली.

औपचारिक रीतीने या कार्यक्रमाचा समारोप सोहळा असा झालाच नाही. टेलीफोनवर आणि ईमेल, ऑर्कुट, फेसबुक वगैरे माध्यमातून एकमेकांशी संवाद चालत राहिला आणि अजून तो चालला आहे. एकंदरीत पाहता मजा आली असाच सूर यातून निघत आहे.

———————————————-

हे लिखाण मी नऊ वर्षांपूर्वी केले होते. त्या वेळी जमलेल्यातल्या काही व्यक्ती दुर्दैवाने आज आमच्यात नाहीत. त्यानंतर असे कौटुंबिक संमेलनही पुन्हा होऊ शकले नाही.
. . . . . . . . . . . . .. . . . . . . . . . . . (समाप्त)

जुने वर्ष आणि नवे वर्ष

“नदीच्या त्याच पाण्यात तुम्ही दोन वेळा हात बुडवू शकत नाही.” अशा अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे. याचे कारण नदीचे पाणी सतत वहात असते. आपला हात पाण्यातून बाहेर काढून पुन्हा पाण्यात घालेपर्यंत त्या ठिकाणी आधी असलेले पाणी वाहून प्रवाहासोबत पुढे गेलेले असते आणि त्या जागी नवीन पाणी आलेले असते. कालौघाचा प्रवाहसुद्धा सारखा पुढेच जात असतो. गेलेला क्षण कधीही परत आणता येत नाहीच, काळाबरोबर सगळे जगही सतत बदलत असते. कालचे आपले घरसुद्धा आज अगदी जसेच्या तसे राहिलेले नसते. काही वस्तू इकडच्या तिकडे झालेल्या असतात, काही नाहीशा झालेल्या असतात, तर काही नव्या वस्तू घरात आलेल्या असतात. वर्षभराने पाहिले तर घरातल्या खूप वस्तू बदललेल्या असतातच, शिवाय ते घर एक वर्षाने जुने झालेले असते. भिंतींचा रंग थोडा उडालेला असतो, तिच्यावर काही ठिकाणी डाग तर काही जागी भेगा पडलेल्या असतात. कदाचित घराची डागडुजी आणि रंगरंगोटी करून त्याला नवे रूप दिलेले असते. माझ्या बाबतीत तर असे झाले की मागच्या वर्षी मी पुन्हा एकदा घरच बदलले.

जर निर्जीव वस्तूंमध्येसुद्धा बदल होत असतात, तर माणसांमध्ये ते जास्तच होत असतात. कालच्या दिवसभरात आपल्याला जितकी माणसे दिसली, भेटली, आपल्याशी बोलली ती सगळी आज दिसत नाहीत, त्यातली काही माणसेच आज पुन्हा भेटतात, काही लोक अनेक दिवसांनी, महिन्यांनी किंवा वर्षांनी भेटतात, काही लोक आयुष्यात पुन्हा कधी भेटतही नाहीत. पुन्हा भेटलेली माणसेसुद्धा थोडी किंवा खूप बदललेली असतात. मध्यंतरीच्या काळात इतरांच्या तसेच आपल्याही जीनवात अनेक घटना घडलेल्या असतात, सर्वांनाच वेगवेगळ्या प्रकारचे अनेक अनुभव आलेले असतात. वयोमानानुसार फरक पडलेले असतातच, शिवाय पूर्वी दणकट वाटणारी काही माणसे व्याधीग्रस्त झालेली असतात, तर आजारी असतांना पाहिलेले लोक ठणठणीत बरे झालेले असतात, अनेक अडचणींमुळे चिंताक्रांत असलेले, निराश झालेले कोणी खूप आनंदी आणि उत्साही झालेले दिसतात, तर कोणाच्या बाबतीत याच्या नेमके उलट झालेले असते. माणसाचा मूळ स्वभाव बदलत नाही असे म्हंटले जात असले तरी आलेल्या अनुभवांमुळे काही लोक शहाणे झालेले असतात, कोणी सावध झालेले असतात तर काही लोकांना माज चढलेला असतो किंवा ते वैतागलेले असतात. काही नाही तरी निदान आपल्या भेटीच्या वेळी त्यांचा किंवा आपला मूड वेगळा असतो, त्यामुळे आपला दृष्टीकोन वेगळा झालेला असतो. या सगळ्यांमधून आपले जीवन पुढे चालत असते.

नदीच्या प्रवाहात बंधारे घालून निर्माण केलेल्या जलाशयांमधले पाणी स्थिर झाल्यासारखे दिसते, पण तेही हळूहळू बदलत असते. तळातले थोडे पाणी जमीनीमधून झिरपून जात असते तर पृष्ठभागावरच्या पाण्याची वाफ होऊन ती हवेत उडून जात असते. पावसाने आणि नदीच्या प्रवाहामधून आलेल्या पाण्याने त्यात भर पडत जाते, त्यातले जास्तीचे पाणी बंधाऱ्यावरून पुढे वाहून जाते. आठवणींचेसुद्धा असेच असते. त्या साचत जातात, त्यात भर पडत जाते तशाच त्या विस्मरणात जाऊन नष्ट होतात किंवा सुप्तावस्थेत जातात, त्यातल्या काहींना पुन्हा उजाळा मिळतो. भूतकाळातल्या क्षणाच्या काही आठवणी जाग्या झाल्याने पुनःप्रत्ययाचा आभास निर्माण होत असला तरी प्रत्यक्ष आणि आभास यात फरक असतोच, जेंव्हा आपण कोणाच्या फोटोला नमस्कार करतो तेंव्हा एका कागदाला नमन करत असतो आणि एकाद्या बाळाच्या तसबिरीचे चुंबन घेतले तर कागदाला ओठ चिकटवत असतो. तरीसुद्धा त्यात आपल्याला थोडे समाधान मिळतेच. याच प्रमाणे एकादा क्षण जगणे आणि तो आठवणे यात फरक असला तरी त्यातही मजा असते.

बालपण, यौवन, मध्यमवय, उतारवय यासारखे जीवनाचे ठळक टप्पे असतात आणि आपल्या आठवणी त्यातल्या निरनिराळ्या कप्प्यांध्ये साठवलेल्या असतात. याशिवाय आपण वर्षावर्षांचे कप्पे करून जुन्या आठवणींना त्यात ठेवत असतो. वैयक्तिक जीवनात वयाला खूप महत्व असते. वयाच्या अमक्या वर्षी शाळेत किंवा कॉलेजात प्रवेश घेतला किंवा नोकरीला लागलो, इतके वय असतांना लग्न झाले, एकादा अपघात झाला किंवा मोठे आजारपण आले असे तपशील आपल्या लक्षात राहतात. यासाठी आपले वर्ष जन्मतारखेला सुरू होते. सरकारी आणि उद्योगव्यवसायांचे आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू होते आणि ३१ मार्चला संपते. भारतातल्या शाळाकॉलेजांच्या वर्षाची सुरुवात मे जूनच्या सुमाराला होते. जगभरात वापरले जात असलेले ग्रेगोरियन कॅलेंडर या सर्वांचा आधार असते. इतर बहुतेक सगळ्या सर्वसाधारण घटनांसाठी आपण कॅलेंडरवरील वर्षाचाच उपयोग करतो. इसवी सन २०१८ हे त्यातले वर्ष आता संपत आले आहे आणि काही तासांनीच २०१९ साल सुरू होणार आहे.

कुठलेही वर्ष संपत आले असतांना त्या वर्षाचा एक संक्षिप्त आढावा घेतला जात असतो. विद्यार्थ्यांनी शिकलेल्या विषयामधले किती आत्मसात केले हे समजण्यासाठी वार्षिक परीक्षा घेतली जाते, त्याचे निकाल प्रगतीपुस्तकात नोंदवले जातात, संपलेल्या वर्षात उद्योगव्यवसायांमध्ये किती उलाढाल झाली, किती प्राप्ती आणि खर्च झाला, किती नफा मिळाला की तोटा झाला, त्यात किती वाढ किंवा घट झाली वगैरेंचे हिशोब केले जातात. व्यक्तीगत आयुष्यात किती प्रगती झाली, काय काय कमावले किंवा गमावले, कोणत्या महत्वाच्या घटना घडल्या, त्यांना आपण कसे सामोरे गेलो, आपले किती अंदाज किंवा निर्णय बरोबर ठरले, कोणते चुकले, किती माणसे जवळ आली किंवा नव्याने जोडली गेली आणि किती लोक दुरावले गेले अशा अनेक गोष्टी मनात येऊन जातात. त्यातल्या काही आपल्याला सुखावतात, धीर किंवा हुरूप देतात, तसेच काहीमधून बोध मिळतो. हे सगळे गाठीला बांधून आपल्याला पुढे जायचे असते. इतर बाबतीतही असेच होत असते. सन २०१८ मध्ये आपल्या सभोवतालच्या जगात कोणकोणत्या महत्वाच्या घटना घडल्या यांची उजळणी वर्तमानपत्रे आणि टीव्ही चॅनेल्स करायला लागलेले आहेतच. ती पाहतांना त्यातल्या कोणत्या आपल्याला जास्त जवळच्या किंवा महत्वाच्या वाटतात याचा विचार मनात येतच असतो.

मला समजायला लागल्यापासून आजपर्यंत माझा दिवसभरातला जास्तीत जास्त वेळ कशात जात असेल तर तो वाचन आणि लेखन यात जातो, आधी अभ्यास, मग ऑफिसमधले काम आणि सेवानिवृत्तीनंतर अवांतर, म्हणजे बोलाच्याच चुलीवर बोलाचाच तवा ठेऊन त्यावर लश्करच्या भाकरी भाजणे!
“तू हा उपद्व्याप कशाला करतोस?” असे मला कांही लोक विचारतात.

मी त्यांना सांगतो, “कारण मला इतर ज्या गोष्टी करायला आवडतात, त्या जमत नाहीत आणि कांही गोष्टी जमतात, पण त्यात माझे मन रमत नाही. वाचन आणि लेखन मात्र मला खूप आवडते आणि थोडे फार जमते, म्हणजे कांही लोक मला तसे सांगतात.”
त्यामुळे मी रिटायर झाल्यानंतर अवांतर वाचन आणि लेखन यात आपला बराचसा फावला वेळ घालवायला लागलो. आनंदघन या नावाची अनुदिनी (ब्लॉग) सुरू करून दिली, आणखी कांही खाती उघडली आणि त्यावर चार चार शब्द टाकत राहिलो. ईमेल्स, फेसबुक, वॉट्सअॅप वगैरेंच्या आगमनामुळे ब्लॉगिंग कमी झाले होते. पण फेसबुक आणि वॉट्सअॅप यावरील पोस्ट्स क्षणभंगुर असतात आणि आता ईमेलग्रुप्स कालबाह्य होऊ लागले आहेत. हे पाहता मी पुन्हा ब्लॉगिंगकडे जरासे जास्त लक्ष देऊ लागलो. या ठिकाणी लिहिलेले लेख बराच काळ तिथेच राहतात आणि वाचकांना कालांतरानेसुध्दा ते पाहता येतात. माझे लिहिणे कमी झाल्यानंतरसुध्दा वाचकांच्या टिचक्यांची संख्या वाढतच गेली यावरून असे दिसते. यामुळे मी पुन्हा तिकडे लक्ष द्यायचे ठरवले आहे. त्याशिवाय शिक्षणविवेक या नियतकालिकाच्या वेबव्हर्जनवर लिहायची संधी मिळाली आणि मी शास्त्रीय शोध व संशोधक यांच्यावर एक लेखमालिका सुरू केली. ती वर्षभर अखंडपणे चालवली.

“जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका, सावध! ऎका पुढल्या हाका”
ही कवि केशवसुतांनी फुंकलेली तुतारीसुध्दा शंभर वर्षांहून जास्त जुनी होऊन गेली तरी अजून अभंग आहे. “इतिहासाचे ओझे खांद्यावरून फेकून द्या, त्याची पाने फाडून आणि जाळून टाका” अशी जळजळीत वक्तव्ये अनेकदा कानावर पडतात आणि त्या क्षणी ती बरोबर वाटतात. पण नवे पान उलटले तरी पूर्वीची काही पाने मनाच्या कोपऱ्यात कुठे तरी लपून बसतात. त्यांच्यावर ढीगभर धूळ बसून ती दिसेनाशी झाली तरी अचानक त्यातल्या एकाद्या पानावरची धूळ पुसली जाते आणि आधी लिहिलेले लख्ख दिसायला लागते. इतकेच नव्हे तर त्यांच्या आधाराने नव्या पानांवर नव्या नोंदी लिहिणे सुरू होते असेही काही अनुभव येतात. पन्नास पंचावन्न वर्षे संपर्कात नसलेले कांही मित्र मला गेल्या एक दोन वर्षांमध्ये अचानक सापडले तर कांहींना मी शोधून काढले आणि पुन्हा त्यांच्याशी अरे तुरेच्या भाषेत बोलणे सुरू झाले. ज्या लोकांनी मला माझ्या लहानपणापासून पाहिले आहे अशी मला एकेरीत संबोधणारी माझ्या संपर्कात असलेली माणसे आता तशी कमीच राहिली आहेत आणि दर वर्षी ती कमी की होत चालली आहेत. खूप वर्षांनंतर तसे बोलणारी आणखी कांही माणसे पुन्हा भेटली तर त्यातून मिळणारा आनंद औरच असतो. असा अनुपम आनंद त्या वर्षाची उपलब्धी ठरते.

नव्या वर्षाचे स्वागत करण्यानिमित्य आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना शुभेच्छा पाठवल्या जातात. कुठल्याही वर्षात फक्त चांगल्याच घटना घडल्या असे आजवर कधी घडलेले नाही आणि पुढल्या वर्षी तरी ते कसे घडणार आहे? पण असे घडावे अशा शुभेच्छा द्यायला किंवा असा विचार करायला काय हरकत आहे? मिर्झा गालिबच्या शब्दात सांगायचे झाल्यास “दिल बहलानेके लिये ये खयाल अच्छा है।” शुभेच्छा, आशीर्वाद वगैरेंचा अगदी किंचितही लाभ मिळत असेल, “दुवाओंका असर” होत असेल तर त्या देण्यात कंजूसी कशाला करायची? मुख्य म्हणजे या निमित्याने आपण इतक्या लोकांच्या संपर्कात येतो, त्यांच्याशी औपचारिक का होईना पण एक संवाद साधला जातो, आपलेही इतके हितचिंतक आपल्या पाठीशी आहेत हे समजते याचेच खूप समाधान मिळते, आधार वाटतो आणि मन उल्हसित होते. काही काही संदेश तर फारच सुरेख असतात. ते वाचूनच छान वाटायला लागते. माझ्या एका मित्राने पाठवलेला हाच संदेश पहा. मला जमेल तेवढा त्याचा अनुवाद मी केला आहे.

नव्या वर्षाच्या शुभेच्छा!
सर्व ऋतूंसाठी, ऊनपाऊस, वादळवारे या सर्वांसाठी शुभेच्छा!
तुम्ही सागरकिनाऱ्यावर फिरत असतांना शुभेच्छा!
तुम्ही आपल्या खुर्चीवर बसून कामात गढलेले असतांना शुभेच्छा!
तुमच्या आसपासचे वातावरण कुंद झाले असतांनाही शुभेच्छा!
तुमचा आनंद अनेकपटीने वाढत जावो, तुमचे सगळे कष्ट नष्ट होवोत, तुम्ही प्रतिकूल परिस्थितीचे रूपांतर संधींमध्ये करून घ्याल, तुम्हाला सुदैवाची साथ मिळेल, तुम्ही यशस्वी व्हाल अशी प्रार्थना.
हे वर्ष आणि हे आयुष्यच तुमच्यासाठी महान ठरो.
(Have a great year, a great life)

दुसऱ्या मित्रांनी पाठवलेल्या शुभेच्छांची गोळाबेरीज पहा.
नववर्षात तुझ्या आणि तुझ्या प्रियजनांच्या सुखसमृद्धीसाठी शुभेच्छा
या नव्या वर्षात तुला अत्यानंद, उत्तम आरोग्य, मनःशांती आणि समृध्दीचे वरदान मिळो.
तू तुझी स्वप्ने, निर्धार आणि वचनांचा मनःपूर्वक पाठपुरावा करशील.
भूतकाळाचे विचार नको .. ते अश्रूंना आणतात
भविष्यकाळाचे विचार नको … त्यातून भीती येते
वर्तमानकाळात जग … त्यामधून आनंद घे
हे वर्ष आणि पुढील अनेक वर्षे तुझ्यासाठी आणू देत
अमर्याद आनंद
कल्पनातीत यश
आरोग्य हीच संपत्ती
संपत्ती हे आभूषण
आणि देव सदैव तुझा पाठीराखा असो
———————————————————–

मागील वर्ष संपता संपता माझ्या मनात आलेले दोन विचार मी फेसबुकावर मांडले होते. ते एकत्र करून या पोस्टमध्ये देत आहे. गतवर्षी माझ्या जवळच्या व्यक्ती दुर्दैवाने दिवंगत झाल्या त्यांच्या आठवणीने माझ्या मनात जे चलबिचल झाले ते पहिल्या लेखात व्यक्त केले आहे आणि इंग्रजी नववर्षदिनाचा जल्लोश लोकांनी करू नये अशी नकारघंटा अनेक लोक वाजवत असतांनासुध्दा बहुतेक लोक हा दिवस का उत्साहाने साजरा करतात याचे कारण शोधण्याचा प्रयत्न मी यातल्या दुसऱ्या लेखात केला आहे.
————————————————–
१. वियोग
नैनम् छिन्दंति शस्त्राणि नैनम् दहति पावकः। न चैनम् क्लेबयंत्यापो न शोषयति मारुतः।।
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृण्हाति नरोपराणि। तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्न्यानि संयाति नवानि देही।।
आत्मा अमर असतो, कपडे बदलल्याप्रमाणे तो शरीरे बदलत असतो वगैरे गीतेमधले तत्वज्ञान सामान्य माणसाच्या मनाची समजूत घालू शकत नाही. जी प्रिय व्यक्ति आपल्याशी बोलते, आपल्याबरोबर खेळते, हंसते किंवा रडते, आपली काळजी करते किंवा घेते, प्रेम करते किंवा रागावते, रुसते वगैरे हे सगळे ती व्यक्ती तिच्या शरीरामार्फतच करत असते आणि ते शरीर नष्ट झाल्यानंतर हे सगळे कायमचे थांबते. त्यानंतर तिचा अमर आत्मा स्वर्गात गेला, परमात्म्यात विलीन झाला, त्याने दुसरा जन्म घेतला किंवा इतर धर्मांत सांगितल्याप्रमाणे तो जजमेंट डे किंवा कयामतची वाट पहात शांतपणे स्वस्थ बसला असला, किंवा इथेच आसपास भरकटत असला, यातले कांहीही झाले असले तरी यापुढे त्याच्याशी आपला कसलाही संपर्क राहणार नाही या विचाराने मन अस्वस्थ होतेच.

शिशिर ऋतूमध्ये झाडांची पाने पिकून गळतात आणि वसंतात त्यांना नवी पालवी फुटते हा निसर्गक्रम असतो. शास्त्रीय भाषेत सांगायचे झाल्यास पानांमधले क्लोरोफिल हे द्रव्य नष्ट होते, ती पाने हवेमधला कार्बनडायॉक्साइड वायू शोषून घेऊन हवेला प्राणवायू देणे थांबवतात, झाडाकडून अन्नपाणी घेणे आणि झाडासाठी अन्नरस तयार करणे ही दोन्ही कामे करत नाहीत. अशी निरुपयोगी झालेली पाने गळून पडतात आणि पाचोळा होतात. माणसांच्या बाबतीत कांहीसा तसाच प्रकार होतो. नट, गायक, चित्रकार, खेळाडू वगैरे मंडळी त्यांच्या बहराच्या काळात जगाला खूप आनंद देतात, पण तो बहराचा काळ ओसरल्यानंतर ते लोक प्रकाशाच्या झोतात रहात नाहीत, वर्षानुवर्षे कुणालाही त्यांची माहिती नसते. कधी तरी त्यांच्या निधनाची बातमी येते तेंव्हा त्यांचे चाहते क्षणभर हळहळतात, पण खरे तर त्या गुणी लोकांचे जीवंत असणे किंवा नसणे याला तोंपर्यंत इतरांच्या दृष्टीने फारसा अर्थ उरलेला नसतो. गेल्या वर्षात अशी किती प्रसिध्द माणसे या जगाचा निरोप घेऊन देवाघरी गेली याच्या याद्या पुढल्या एक दोन दिवसात वर्तमानपत्रांमध्ये येत राहतील.

नोकरीमध्ये माझ्या आयुष्यात आलेले कित्येक लोक पंधरा वीस किंवा त्याहून अधिक वर्षांपूर्वी नोकरी सोडून गेले किंवा सेवानिवृत्त झाले आणि माझ्या संपर्कक्षेत्राच्या बाहेर गेले. त्यानंतर ते कुठे आणि कसे रहात होते की अनंतात विलीन होऊन गेले होते याची मला काहीच माहिती मिळत नव्हती. अशातला एकादा दिवंगत झाल्याची बातमी येते आणि झर्रकन त्याच्या संबंधातल्या जुन्या आठवणी डोळ्यासमोर येऊन जातात एवढेच होते. काही लोकांची प्रत्यक्षात भेट होत नसली तरी सोशल मीडियावर अधून मधून गाठ पडत असते आणि काही लोक अचानकपणे भेटतसुध्दा असतात. त्यांच्या सोडून जाण्याने मनाला जास्त तीव्र चटका लागतो. या दोन्ही प्रकारचे तीन चार मित्र गेल्या वर्षभरात दिवंगत झाले. अशा बातम्यांमुळे दुःख होतेच, पण त्यातले जे आपल्यापेक्षा वयाने लहान असतात त्यांच्या जाण्यामुळे एक प्रकारचा धक्कासुध्दा बसतो.

नातेवाईक कधी नात्यामधून रिटायर होत नाहीत. ते परगावी किंवा परदेशीसुध्दा गेले तरी संपर्कात असतात. त्यांच्याशी किती जवळचे व्यक्तीगत संबंध जुळतात आणि जुळून राहतात ते एकमेकांच्या वागण्याप्रमाणे ठरते. त्यामुळे त्यानुसार कमी जास्त तीव्रतेचे दुःख होते. त्यांचा कायमचा वियोग सहन करणे बरेच कठीण असते.

नोकरीमध्ये चांगली प्रमोशन्स मिळत गेली, व्यवसायात चांगला जम बसला, मुले मार्गाला लागली, घरात सुना, जावई, नातवंडे वगैरे आली म्हणजे माणसाच्या जीवनाची इतिकर्तव्यता संपली. अशी पिकली पाने हे जग सोडून गेली तर त्यांचे सोने झाले असे पूर्वीच्या काळात म्हणत असत. पण अशी वडीलधारी माणसे आपल्याला हवीच असतात. अचानक त्यांच्या निवर्तनाच्या मनाला सुन्न करणाऱ्या वार्ता येतात. काही नातेवाइकांच्या पुढच्या पिढीतल्या कुटुंबांचा संसार अजून पूर्ण झालेला नसतो, त्यांच्या किती तरी आशाआकांक्षा आणि योजना अर्धवट राहिलेल्या असतात. अशा वेळी त्यांच्या संसाररथाचे एक चाक निखळून पडले तर त्यामुळे होणाऱ्या मात्र वेदना सोसवत नाहीत.

मनातून इच्छा नसली तरी अखेर गेल्या वर्षाने दिलेल्या या चटक्यांचा उल्लेख करून डोळ्यांमधले आंसू पुसती ओठावरले गाणे असे म्हणत त्याला निरोप द्यावा लागतो.
———————————————————————————-
२. नकारघंटा
वॉट्सअॅप आणि फेसबुकवर रोज ज्ञानगंगेच्या अनंत धारा धो धो वहात असतात, “मार्केट में नया है” असे सांगून विनोदांच्या शिळ्याच कढीला पुनःपुनः ऊत आणला जात असतो, चमत्कृतिपूर्ण किंवा अविश्वसनीय कामे करणारी नवनवी यंत्रे, अफलातून आकारांच्या इमारती आणि निसर्ग सौंदर्याची किंवा सुंदरींची आकर्षक चित्रे आणि चलचित्रे दाखवली जात असतात, अधून मधून सुरेल गायन वादनसुध्दा ऐकायला आणि पहायला मिळते. पण संगीतामधल्या कुठल्याही वाद्यापेक्षा जास्त वेळा सोशल मीडियावर वाजवले जाणारे एक वाद्य आहे ते म्हणजे नकारघंटा.

नकारघंटा वाजवणाऱ्यांचेसुद्धा अनेक प्रकार आहेत. पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा उपदेश देणारे पोस्ट फटाके नकोत, गोंगाट नको, प्लॅस्टिक नको, थर्मोकोल नको, पाणी वाया घालवू नका, अमूक करू नका, तमूक करू नका वगैरे नकार सांगत असतात. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र वगैरेंच्या काळात या नकारघंटा सतत घणघणत राहतात. त्या प्रचाराच्या तसेच कुठल्याही आधुनिक, पुरोगामी विचारांच्या नांवाने सतत शंखनाद केला जातोच, पण हॅपी या शब्दालाच संस्कृतिसंरक्षणाच्या ऐसपैस छत्रछायेत सरसकट नकारघंटा वाजवली जाते. त्यांच्या दृष्टीने हॅपी बर्थडे, हॅपी दिवाली, हॅपी होली वगैरे म्हणणे म्हणजे शांतम् पापम्. मेरी ख्रिसमस आणि हॅपी न्यू ईयर म्हणणारा तर पुरता धर्मभ्रष्टच नव्हे तर चक्क देशद्रोही असल्यासारखे दाखवले जाते. यामधले मूळ विचार कदाचित थोडे बरोबर आहेत, पर्यावरण आणि संस्कृति यांचे महत्व आहेच. मी सुध्दा माझ्या लहानपणापासून त्यांना सुसंगत असेच वागायचा प्रयत्न करत असतो, पण सतत नकारघंटा वाजवणेही मला आवडत नाही.

काही लेखांमध्ये जरा विनोदी उपाय सांगितले जातात. केकच्या ऐवजी उकडीचे मोदक खा, व्हिस्कीऐवजी कडुलिंबाचा काढा किंवा गोमूत्र प्या, सांताच्या गोंड्याच्या टोपीऐवजी केशरी पटका बांधा वगैरे वगैरे. पण त्यांची तरी काय गरज आहे ? मुळात कोण या पोस्टा तयार करतात कोण जाणे, पण आला संदेश की त्याला ढकल पुढे असे करणारे असंख्य पोस्टमन मात्र तयार झाले आहेत. अशा एकाद्या पोस्टमनला त्याबद्दल विचारलेच तर “मी फॉरवर्डेड अॅज रिसीव्ह्ड असे लिहिले आहे ना !” असे म्हणून बगला झटकतो. जसे काही “आम्ही पालखीचे भोई, आम्ही पालखीचे भोई, पालखीत कोण आम्ही पुसायाचे नाही।” हे त्याचे ब्रीदवाक्य असावे. आज ज्या प्रमाणात साक्षरतेचा आणि मोबाइल फोन्सचा प्रसार झाला आहे ते पाहता हे सगळे संदेश प्रत्येक माणसाकडे नसले तरी बहुतेक सर्व कुटुंबांपर्यंत नक्कीच पोचतात. पण त्यांचा किती परिणाम होतो हा संशोधनाचा गहन विषय आहे.

“आपले लोक म्हणजे ना, गाढवं आहेत. त्यांच्यापुढे कितीही गीता वाचा, त्यांना ढिम्म होत नाही.” असे म्हणणाऱ्यांची मला मजा वाटते. यांना जर इतके समजते तर ते कशाला गीता वाचायला जातात ? या बाबतीत पहायचे झाले तर गाढव आणि माणूस यांच्यातला फरक ते नीट समजून घेत नसावेत. कुणी तरी गाढवांना कधी हंसतांना, गातांना, नाचतांना पाहिले आहे कां ? ती नेहमी एकाद्या स्थितप्रज्ञ योग्याप्रमाणे (ही उपमा स्व.पुलंची आहे) शांत असतात, पण माणसांना मात्र आनंदाने गावे, ओरडावे, नाचावे, उड्या माराव्यात असे मनातून वाटते. त्यांना देवाने किंवा निसर्गाने हे एक प्रकारचे वरदान दिले आहे. गणेशोत्सव, गरबा, लग्नाची वरात, वाढदिवस किंवा नववर्षदिन ही फक्त निमित्ये असतात. त्यात भाग घेणाऱ्या माणसांना आनंदाने धुंद होण्याची हौस असते हे मुख्य कारण आहे आणि ती हौस या ना त्या स्वरूपात व्यक्त होतेच. धनाढ्य लोक एअरकंडीशन्ड डिस्कोमध्ये नाचतील तर गरीब आदिवासी रानातल्या त्यांच्या पाड्यामध्ये, कुणी भाविक टाळमृदुंगाच्या तालावर नाचत भजन करतील तर कुणी ऑर्गनच्या सुरात कॅरोल्स गातील, या सगळ्यांच्या मागे मानवी स्वभावातली आनंद प्रकट करण्याची ऊर्मी असते.

त्यामुळे कोणीही आणि कितीही शंखध्वनि किंवा घंटानाद केला तरी निरनिराळे उत्सव हे उत्साहात साजरे होत जाणारच. दर वर्षीप्रमाणेच या वर्षीही ख्रिसमस साजरा होऊन गेला आणि आता नववर्षदिनाच्या पार्ट्यांचा जल्लोश आणि धिंगाणासुध्दा होईल. आणि मला वाटते की सगळे जग जेंव्हा उल्हासाने भारलेले असेल तेंव्हा आपण तरी काय म्हणून आंबट चेहरा करून काळोखात बसा ?

गणेशोत्सवात होत गेलेले बदल

WhatsApp Image 2018-09-16 at 23.39.05

रोजच्या रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र होते, वर्षभरात उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू येऊन जातात, त्यानुसार वातावरणात बदल होतात, झाडांना नवी पालवी फुटते, जुनी पाने गळून पडतात, फुले उमलतात आणि कोमेजतात, प्राणीमात्रांच्या जीवनात बालपण, युवा आणि वार्धक्य या अवस्था येतात. अशा प्रकारे सतत बदलत राहणे हाच सृष्टीचा स्थायी भाव आहे असे म्हंटले जाते. समाजाची राजकीय, आर्थिक किंवा सामाजिक परिस्थितीसुध्दा हळूहळू बदलत असते आणि त्याचा परिणाम समाजातल्या चालीरीती, घडामोडी वगैरेंवर होत असतो.

१८९३ साल आणि आजच्या सामाजिक परिस्थितीत जमीन अस्मानाइतका फरक पडला आहे. त्या काळातल्या समाजात धर्म, जात, वंश, भाषा वगैरेनुसार असंख्य गट पडलेले होते. प्रत्येक गटातले लोक निरनिराळी आळी, गल्ली, वाडी, मोहल्ला वगैरेंमध्ये गटागटाने आपापल्या संकुचित विश्वात रहात असत. त्यांच्यामध्ये आपापसात विशेष सामंजस्य नव्हते. एकमेकांविषयीचे अज्ञान, गैरसमज, दुरावा यापासून ते वैर आणि तिरस्कारापर्यंत नकारार्थी भावना मनात दडलेल्या असायच्या. साक्षरतेचे प्रमाण फारच कमी होते. त्यातलेही बहुतेक साक्षर लोक आपल्या अक्षरओळखीचा उपयोग पोथ्या, पुराणे, गाथा वगैरेसारख्या धार्मिक वाङ्मयाच्या वाचनासाठीच करत असत. इंग्रजांनी सुरू केलेल्या शिक्षणपध्दतीत ज्यांनी शाळेत जाऊन शिक्षण घेतले होते अशा मूठभर लोकांनाच भारताचा (त्या काळामधील हिंदुस्थानचा) विशाल भौगोलिक विस्तार व उज्ज्वल इतिहास याबद्दल काहीशी माहिती असायची. इतर सर्वसामान्य लोकांचे सामान्यज्ञान त्यांच्या पंचक्रोशीपुरतेच मर्यादित असायचे. त्यापलीकडे पसरलेल्या आपल्याच देशातल्या भूभागाबद्दल किंवा तिथे रहात असलेल्या लोकांबद्दल त्यांनी कधी फारसे ऐकलेलेही नसायचे. त्यामुळे त्यांच्याबद्दल त्यांना आत्मीयता कशी वाटणार? आपण एका मोठ्या देशाचे रहिवासी आहोत याचीच ज्यांना नीटशी कल्पना नव्हती त्यांना त्या देशाबद्दल प्रेम आणि अभिमान तरी कसा आणि किती असणार? भारतातल्या राजेरजवाड्यांच्यात चालत असलेल्या लढायांचा फायदा घेऊन इंग्रजांनी हा देश काबीज केला होता आणि भारतामधील जनतेमध्ये एकजूट न होणेच त्यांच्या हिताचे होते. त्यामुळे येथील जनतेतल्या आपापसातील तेढीला ते खतपाणी घालत राहिले होते.

इंग्रजी शाळांमधून शिक्षण घेतलेले जे सुशिक्षित लोक होते, त्यामधील बरेच लोक सरकारी नोकरी करीत होते आणि इंग्रज सरकारशी इमानदार होते. इतर अनेक विद्वानांना मात्र त्या काळातली सामाजिक परिस्थिती सहन होत नव्हती. त्यांच्यापैकी महात्मा ज्योतीबा फुले आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यासारख्या थोर लोकांनी समाजसुधारणेचा खडतर मार्ग स्वीकारला. समाजाच्या स्त्रीशूद्रादि मोठ्या भागाला त्या काळात शिक्षणापासून वंचित ठेवले गेले होते, त्यांना शिक्षण मिळवून देण्याचे त्या काळातले अत्यंत कठीण काम त्यांनी हाती घेतले. त्यांना पहिली अनेक वर्षे समाजाचा नुसता विरोधच झाला नाही तर त्यांचा छळ करण्यात आला. अशा काळात इंग्रज सरकारचाही रोष ओढवून घेणे त्यांच्या कार्याला हानीकारक होते. टिळकांचे परममित्र असलेले आगरकर यांच्यासारखे काही देशभक्त लोक सभांमधील भाषणे, वृत्तपत्रांमधील लेखन वगैरे मार्गाने समाजाचे प्रबोधन करत होते तसेच सरकारकडे अर्जविनंत्या करून कायदेशीर मार्गाने समाजाचे जास्तीत जास्त हित करून घेण्याचा प्रयत्न करत होते.

लोकमान्य टिळकांचे विचार या सर्वांहून वेगळे होते. त्यांना इंग्रजांच्या जोखडातून देशाला मुक्त करायचे होते. पण तीन चार दशकांपूर्वी १८५७चे स्वातंत्र्ययुध्द होऊन गेले होते. त्यावेळी उत्तर भारतामधील काही भागातील सैनिकांनी एकत्र येऊन त्यात उडी घेतली, पण बाकीच्या फार मोठ्या प्रदेशातील जनता त्यापासून अलिप्त राहिली होती. त्यामुळे इतर प्रदेशातील भारतीय सैनिकांच्याच सहाय्याने इंग्रजांनी ते युध्द जिंकले होते. त्यानंतर इंग्रज सरकार सावध झाले असल्यामुळे त्यांच्या विरोधात सशस्त्र लढा देणे अशक्य झाले होते. हा इतिहास ताजा होता. एकट्यादुकट्याच्या प्रयत्नातून स्वातंत्र्य मिळू शकणार नाही याची जाणीव लोकमान्य टिळकांना होती आणि सर्व समाजाला एकत्र आणून त्यांच्या संघटनेच्या बळावर इंग्रज सरकारला आव्हान दिले पाहिजे हे त्यांनी जाणले होते. सन १८९३ पर्यंत त्यांनी आपली सुप्रसिध्द स्वराज्याची मागणी उघडपणे केलेली नव्हती आणि आधी सर्व भारतीयांना संगठित करायचे, त्यांच्या मनात देशभक्तीची आंच निर्माण करायची आणि त्यांच्या बळावर स्वातंत्र्याची चळवळ पुढे न्यायची अशी टप्प्याटप्प्यांची योजना आखून त्यानुसार ते एक एक पाऊल यशस्वीपणे टाकत होते. त्यांनी १८९३ साली सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव हे त्यातलेच एक महत्वाचे पाऊल होते.

WhatsApp Image 2018-09-16 at 23.38.52

तत्कालीन परिस्थितीत निरनिराळ्या प्रांतांमधील आणि जातीतील लोकांना एका व्यासपीठावर आणणे आवश्यक होते. धार्मिक स्वरूपाचा समारंभ हा त्यांना एकत्र आणण्याचा एकमात्र नामी उपाय होता. एतद्देशीयांच्या धर्मात ढवळाढवळ करायची नाही अशा सूचना सरकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या असल्यामुळे त्याला सरकारकडून मनाई होण्याचा धोका नव्हता. एका ठिकाणी जमलेल्या लोकांना मनोरंजनामधून आपला देश, धर्म, संस्कृती वगैरेंची माहिती मिळावी, त्याबद्दल त्यांना अभिमान वाटावा, प्रेम वाटावे अशा दृष्टीने मेळ्यांचे कार्यक्रम ठेवले. त्यांना आकर्षक वाटावेत तसेच उत्साही लोकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सुरेख आरास आणि सजावटी केल्या, गणपतीच्या मूर्तीचे आगमन आणि विसर्जन यांसाठी वाजत गाजत मिरवणूक काढल्यामुळे या उत्सवाची माहिती गावातल्या सर्वांना कळावी आणि कुतूहलाने त्यांनी त्यात हजेरी लावावी. अशा प्रकारे जास्तीत जास्त लोकांना यात सहभागी करून घेता यावे आणि आपला संदेश खुबीने त्यांच्यापर्यंत पोचवता यावा असा सर्व दृष्टीने विचार करून टिळकांनी या स्वरूपातला उत्सव सुरू केला होता. सिनेमा, रेडिओ, टेलीव्हिजन अशा प्रकारची कोणतीच प्रसारमाध्यमे त्या काळात उपलब्ध नव्हती आणि वर्तमानपत्रे वाचणारा सुशिक्षित वर्ग अत्यल्प होता. अशा त्या काळातील परिस्थितीत मोठ्या प्रमाणात लोकांना एकत्र आणून काही सांगण्याची गरज होती, त्यांच्या संघटित प्रयत्नातूनच देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला चालना देता येणार होती. पुण्यापासून सुरुवात करून हा उत्सव देशभर गावोगावी पोचवता येईल अशा दृष्टीने त्याची रचना केली होती आणि तसे झालेही.

त्यानंतर देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक लढे झाले आणि १९४७ साली आपला देश स्वतंत्र झाला. आता पारतंत्र्याचा मुद्दा राहिला नाही. जातीभेद पूर्णपणे नाहीसा झाला नसला तरी त्याचे स्वरूप बदलले आहे. रोजच्या सामान्य जीवनातील इतर अनेक प्रसंगी सुध्दा जातपात विसरून अनेक लोक घडोघडी एकत्र येतच असतात. त्यासाठी गणेशोत्सवासारख्या वेगळ्या निमित्याची गरज नाही. टीव्ही आणि सिनेमासारखी दृकश्राव्य प्रसारमाध्यमे उदंड झाली असल्यामुळे मनोरंजनाची तसेच प्रचाराची भरपूर सोय, किंबहुना त्यांचा अतिरेक झाला आहे, संगणक आणि आंतर्जाल क्रांतीनंतर माहितीचा महापूर आला आहे आणि मोबाईल फोनमुळे संपर्क अत्यंत सुलभ झाला आहे. त्यामुळे जनसंपर्क, ज्ञान आणि मनोरंजन यासाठी गणेशोत्सवामधील मेळ्यांची गरज नाही. तरीसुध्दा गणेशोत्सव साजरे होतच आहेत, शिवाय त्याच्या आकारात अनंतपटीने वाढच होत चालली आहे. याचे कारण म्हणजे हा उत्सव ही या काळातली गरज राहिलेली नसली तरी त्यातून अनेक प्रकारचे लाभ मिळतात. हे लाभ कशा प्रकारचे आणि कोणाला मिळतात या प्रश्नाला एकच उत्तर नाही. आजच्या सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये अनेक प्रकार आहेत आणि त्या प्रत्येकांमागे निरनिराळे उद्देश असतात, त्यानुसार त्यांचे फायदे संयोजकांना मिळतात.

WhatsApp Image 2018-09-17 at 07.16.03

लोकमान्य टिळकांच्या काळापासून चालत असलेली आणि त्यावरून प्रेरणा घेऊन सुरू झालेली काही गणेशोत्सव मंडळे अद्याप कार्यरत आहेत. समाजसेवेच्या उद्देशाने काम करणाऱ्या सेवाभावी संस्था आहेत. टिळकांच्या काळातली बहुतेक उद्दिष्टे आज शिल्लक राहिलेली नसली तरी वेळोवेळी समाजापुढे असलेल्या मुद्द्यांवर आणि समस्यांवर प्रकाशझोत टाकण्याचे काम ही मंडळी करीत आली आहेत. चित्ताकर्षक देखावे, पोस्टर्स, पॅम्फ्लेटे, व्याख्याने, वादविवाद स्पर्धा, चर्चासत्रे अशा निरनिराळ्या मार्गाने ही मंडळी गणेशोत्सवात समाजाचे प्रबोधन करतात. महात्मा गांधींच्या काळात दारूबंदी, अस्पृश्यतानिर्मूलन, खादी व ग्रामोद्योग यासारखे विषय होते, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पंचवार्षिक योजना, औद्योगिक क्रांती, समाजवादी विचारसरणी, शिक्षणाचा प्रसार यासारखे विषय आले तर चीन आणि पाकिस्तानबरोबर होऊन गेलेल्या युध्दांच्या काळात देशाचे संरक्षण हा ज्वलंत मुद्दा होता. गेल्या दोन तीन दशकांच्या काळात अवकाशात भरारी, संगणकक्रांती, माहितीतंत्रज्ञान, धूम्रपानबंदी, पोलिओचे निर्मूलन, एड्स, स्वाईन फ्ल्यू, अपहरण, दहशतवाद आदि अनेक विषयांकडे लक्ष वेधले गेले होते. पर्यावरणाचे संरक्षण हा तर हल्लीच्या काळातील गणेशोत्सवांमध्ये कळीचा मुद्दा बनून गेला आहे. पॅकिंगसाठी थर्मोकोल आणि बांधकामासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे जेवढे उत्पादन वर्षभर सतत होत असते त्याच्या तुलनेत पाहता या पदार्थांचा गणेशोत्सवामध्ये होणारा उपयोग अगदी नगण्य असतो अशी वस्तुस्थिती असली तरी जणू काही गणेशोत्सवामुळेच पर्यावरणाचा सत्यानाश होणार आहे अशा थाटाचा प्रचार होत असतो. पण या निमित्याने का होईना, पर्यावरणाच्या जपणुकीकडे लोकांचे लक्ष वेधले जात आहे ही चांगली गोष्ट आहे. मी हा लेख सहा वर्षांपूर्वी लिहिला होता त्या वर्षीपासून आम्ही सुध्दा शंभर टक्के पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करीत आलो आहोत. आवर्जून शाडू मातीच्याच मूर्ती आणल्या, कागद, कापूस आणि कापड यांच्यातून देखावा निर्माण करून आरासी केल्या. उत्सव संपल्यानंतर ते पदार्थसुध्दा शक्यतो व्यवस्थित गुंडाळून ठेवले आणि त्या वर्षी गणेशमूर्तीचे विसर्जन तात्पुरत्या उभारलेल्या पाण्याच्या कृत्रिम टाकीत केले. अशा प्रकारे त्या वर्षी आम्ही मुळामुठा नद्यांच्या पात्रात एक कणसुध्दा टाकला नाही. ज्या गणेशोत्सवांमध्ये सामाजिक विषय किंवा तत्कालीन समस्यांकडे लक्ष वेधले जाते त्याचा समाजावर चांगला परिणाम होण्याची शक्यता असते याचे हे एक उदाहरण आहे.

मुंबईमधील लालबागचा राजा आणि पुण्यातला दगडूशेठहलवाई गणेशोत्सव यासारख्या अनेक उत्सवांमधील मूर्ती आता असंख्य भाविकांची श्रध्दास्थाने बनल्या आहेत. हे देव नवसाला पावतात या विश्वासाने त्यांचे दर्शन घेऊन त्यांच्याकडे काही मागण्यासाठी किंवा त्याच्या प्राप्तीनंतर नवस फेडण्यासाठी लक्षावधी लोक त्यांचे दर्शन घेण्यासाठी तास न् तास रांगा लावतात आणि पैसे, सोने, चांदी, दागदागीने वगैरे भरपूर मौल्यवान वस्तू स्वेच्छेने अर्पण करतात. अर्थातच त्या भक्तांच्या गर्दीची सोयीस्कर व्यवस्था करणे आवश्यक ठरते. अशा ठिकाणचे गणेशोत्सव जास्तच धूमधडाक्यात साजरे होतात. त्या ठिकाणी अत्यंत लक्ष्यवेधी सजावट असते, त्या वर्षी दगडूशेठहलवाईच्या गणेशमंदिराला जयपूरच्या हवामहलाचे रूप दिलेले होते. या वर्षी दक्षिण भारतातल्या तंजावूर इथल्या मंदिराचा देखावा होता. हजारो भक्तांनी एकत्र येऊन अथर्वशीर्षाचे पठण करण्याचा धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी होतो. लालबागच्या राजाचा राजवाडासुध्दा नेहमीच प्रेक्षणीय असतो. या उत्सवांनिमित्य होणाऱ्या उलाढाली आता कोट्यवधी रुपयांच्या घरात गेल्या आहेत. त्यांचे आयोजन करणाऱ्या धर्मादाय संस्थांची संस्थाने झाली आहेत असे म्हणता येईल. उत्सवाच्या दहा दिवसांव्यतिरिक्त इतर काळातसुध्दा त्यांच्यातर्फे अनेक समाजोपयोगी कामे केली जात असतात. गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना किंवा गरीब रुग्णांना त्यांच्याकडून मदत केली जाते. काही संस्था आपला वार्षिक ताळेबंद जाहीर रीत्या प्रकाशित करतात. नवस सायास वगैरेंवर व्यक्तीशः माझा विश्वास असो किंवा नसो, पण त्यामधून अनेक लोकांना मानसिक समाधान मिळत असेल, तर ते हिरावून घेण्याचा मला अधिकारही नाही आणि माझी तशी इच्छाही नाही. त्यामुळे अशा प्रकारचे गणेशोत्सवसुध्दा त्या दृष्टीने पाहता समाजाच्या दृष्टीने हिताचेच म्हणता येतील.

WhatsApp Image 2018-09-16 at 23.39.06

शाळा, कॉलेजे, ऑफीसे, कारखाने, सहकारी गृहनिर्माणसंस्थांच्या किंवा सरकारी नोकरांच्या वसाहती अशा अनेक जागी दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. तिथे या काळात एकाद्या स्नेहसंमेलनाचे वातावरण असते. या निमित्याने अनेक लोक सहकुटुंब एकत्र येतात, त्यात काही लोकांच्या भेटी होतात, नव्या ओळखी होतात आणि जुन्या ओळखींना तजेला मिळतो. या निमित्य ठेवल्या गेलेल्या स्पर्धांमध्ये चित्रकला, शिल्पकला, विणकाम, भरतकाम, पुष्परचना, संगीत, नृत्य, वक्तृत्व इत्यादि क्षेत्रांमधील आपापले कला गुण दाखवण्याची संधी अनेक लोकांना, विशेषतः मुलांना मिळते. सजावट, आरत्या, सांस्कृतिक कार्यक्रम, विसर्जन वगैरे गोष्टी सामूहिक रीतीने करतांना लोकांना एकत्र येऊन काम करण्याची संधी आणि अनुभव मिळतो. यातून आनंद मिळतो आणि काही नवे अनुभव, नवी माहितीही मिळते.

बदललेल्या परिस्थितीतील गणेशोत्सवात जर असे सगळे चांगलेच घडत असेल त्याच्या विरोधात इतकी ओरड का केली जाते असा प्रश्न पडेल. ती ओरडही अनाठायी वाटत नाही, कारण काही गणेशोत्सवामध्ये जास्तीत जास्त गोंधळ आणि गोंगाट सुध्दा होत असतो. हे उत्सवाच्या नावाने होत असलेले उरूस अनेक प्रकाराने समाजाला त्रासदायक ठरतात. याची सुरुवात दोन तीन महिन्याआधी वर्गणी गोळा करण्यापासून होते. ती करतांना स्वेच्छेपेक्षा दबावावर जास्त भर दिला जातो. मांडव घालण्यासाठी भर रस्त्यांमध्ये खड्डे खणले जातात आणि ते कधीच बुजवले जात नाहीत. अर्धा रस्ता मांडवात गेल्यामुळे आधीच अरुंद असलेला रस्ता आणखी संकुचित होतो आणि एरवीसुध्दा जिथे वाहनांची गर्दी असते तिथली वाहतूक जवळजवळ बंदच पडते. कर्णकर्कश भोंग्यामधून वेळी अवेळी अभिरुचीहीन गाणी मोठमोठ्याने ऐकवली जातात आणि कधीकधी त्यांच्या तालावर बीभत्स असे नाच केले जातात. या सगळ्या धांगडधिंग्यात मांगल्याचा मागमूसही दिसत नाही आणि याला धार्मिक का म्हणायचे हेच समजत नाही. अशा हिडीस स्वरूपाच्या उत्सवातून समाजाला काही तरी चांगले मिळण्याची फारशी शक्यता नसते. त्याचे आयोजन करणाऱ्यांना त्यातून वैयक्तिक फायदे होतात. त्यांच्या टोळक्यांना दहा बारा दिवस फुकटात मनसोक्त मजा करता येते आणि त्यांच्या म्होरक्यांना मिरवायला मिळते. त्यांचा धाक आणि भाव थोडा वधारतो. सर्वसामान्य माणूस थोडी कुरकुर करण्यापलीकडे काही हालचाल करायला धजत नाही.

गेल्या १-२ वर्षांपासून सरकार आणि न्यायालये यांनी त्यावर अंकुश ठेवण्याचे प्रयत्न केले आहेत आणि त्यांना कांही ठिकाणी कांही प्रमाणात यश मिळत आहे. यात आणखी पुष्कळ सुधारणा होण्याची गरज आहे. आता वाटल्यास गणपतीबाप्पानेच या लोकांना चांगली बुध्दी द्यावी अशी प्रार्थना त्याला हात जोडून करतो. एकादा वैतागलेला लेखक आता पुढल्या वर्षी येऊच नका अशी प्रार्थना गणपतीबाप्पाला करतो. पण अशा स्वरूपाचे उत्सव साजरे करणे हा ज्यांचा धंदा बनला असेल आणि त्यात बरकत असेल तर तो आपला धंदा वाढवतच जाणार. जेंव्हा ते सुध्दा अती होईल आणि सहनशक्तीच्या पलीकडे जाईल तेंव्हा समाजच त्याला आळा घालेल. त्या दृष्टीने प्रबोधन करणेही सुरूच आहे.

WhatsApp Image 2018-09-17 at 20.21.02

आमच्या पांच दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता विसर्जनाने झाली.  त्यासोबत ही लहानशी लेखमालिका संपवत आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रसार

 

माणसांच्या मनात विचार येतात, त्यांना कल्पना सुचतात, अनुभव आणि ज्ञान यांच्या कसोट्यांवर त्यांची पारख होते, विवेक व संयम यांच्या गाळणीतून गाळून घेतल्यानंतर त्यातले इतरांना सांगण्याजोगे असे विचार व्यक्त केले जातात, त्या कल्पना मांडल्या जातात. मनातले हे व्यवहार आपल्या नकळत चालले असतात. भाषेवर चांगले प्रभुत्व, आपले विचार सुसंगतपणे मांडण्याचे कौशल्य, छाप पाडणारे व्यक्तिमत्व आणि वाक्चातुर्य हे गुण अंगी असले तर मनातल्या कल्पना शब्दातून स्पष्टपणे व्यक्त करण्यासाठी त्या गुणांचा चांगला उपयोग होतो, मनात आलेले नवे विचार, नव्या कल्पना प्रभावीपणे मांडल्या जाऊ शकतात. समाजामधील रूढ समजुतींना त्यातून धक्का बसण्याची शक्यता असली तर ते वेगळे विचार व्यक्त करण्याचे धैर्य लागते. लोकमान्य टिळकांसारख्या अलौकिक व्यक्तींमध्ये हे सगळे गुण एकवटले होते, तसेच त्यांच्यासमोर असलेले उद्दिष्ट स्पष्ट होते आणि ते गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची त्यांची तयारी होती, टीका किंवा विरोधाने विचलित न होता आपल्या भूमिकेवर ठामपणे उभे राहण्यासाठी लागणारे मनोधैर्य ही त्यांच्या अंगी होते. यामुळे ते असे नवे विचार समाजापुढे मांडून सामाजिक परिवर्तन घडवून आणू शकले.

कोणत्याही नव्या कल्पनेवर त्या ऐकणाऱ्या लोकांच्या अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येतात. पहिली म्हणजे खूप लोकांकडून तिचे उत्साहाने स्वागत होते. त्यांच्यातल्या ज्यांना ती कल्पना पटलेली आणि आवडलेली असते, ते लोक तिचा पुढे पाठपुरावा करतात, तिला वास्तवात आणण्याच्या कामात सहभागी होतात, त्यात जमेल तेवढी आपली भर टाकतात. अशा लोकांचा नव्या कार्यात हातभार लागतो. पण त्यातल्या इतर अनेक जणांना नव्याची नवलाईच तेवढी प्रिय असते. ती संपली किंवा आणखी एकादी वेगळी कल्पना पुढे आली की त्यांचा उत्साह ओसरतो, मग ते लोक दुसऱ्या नव्या कल्पनेच्या मागे धावतात. अशा लोकांचा पाठिंबा फसवा आणि तात्पुरता असतो. त्यामुळे अवसानघात होतो. त्यांच्यावर विसंबून राहिल्यास ते काम बिघडते किंवा खोळंबून राहते.

काही लोकांना टिंगल, टवाळी, चेष्टा, मस्करी यात खूप गोडी असते. प्रस्थापित गोष्टींच्या तुलनेने नव्या विचारांची टर उडवणे सोपे आणि सुरक्षित असते. असे लोक त्यातील कमकुवत दुवे, त्याबद्दलचे गैरसमज वगैरेंना यथेच्छ झोडून घेतात. त्यात त्यांना गंमत वाटतेच, इतरांनाही ते ऐकतांना मजा वाटते. त्यामुळे कार्यकर्ता नाउमेद झाला तर तो आपले काम सोडून देतो आणि त्याला प्रत्युत्तर देत बसला तर त्यातच त्याचा वेळ आणि श्रम खर्च होतात. त्यामुळेही कार्यातली प्रगती मंद होते.

काही लोकांना विरोध करण्याचीच आवड असते. विशेषतः रूढी प्रिय असणाऱ्या लोकांना कोणताही बदल नको असतो. त्यांना बदलामधील अनिश्चिततेचे भय वाटते. ज्या लोकांचे हितसंबंध आधीच्या व्यवस्थेत गुंतलेले असतात त्यांचे त्यातील बदलामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. असे लोक सरळ सरळ विरोधात उभे राहतात किंवा प्रच्छन्नपणे अडथळे आणतात. ते बलिष्ठ असल्यास नव्या विचारानुसार काम होऊ देत नाहीत किंवा चालू झालेले काम बंद पाडू शकतात. अशा वेळी शक्ती किंवा युक्तीचा वापर करून त्यांच्यावर मात करावी लागते.

अशा प्रकारे बहुतेक सगळ्या नव्या कल्पनांना उत्साह, उपहास, विरोध आणि त्यानंतर स्वीकृती या अवस्थांमधून जावे लागते. त्यात काही दिवस, महिने किंवा कदाचित काही वर्षे जातात. पण ती कल्पना मुळात चांगली आणि उपयुक्त असेल तर ती पहिल्या तीन अवस्थांमध्ये तग धरून राहते आणि अखेर स्वीकारली जाते. त्यानंतर ती खूप फैलावते आणि दीर्घ काळ टिकून राहते. नवी वैद्यकीय उपचारपध्दती, शिक्षणाची नवी पध्दत, विज्ञानातले नवे सिध्दांत किंवा नवे तंत्रज्ञान अशा निरनिराळ्या प्रयोगांमध्ये असेच अनुभव येतात, पंचवीस तीस वर्षांपूर्वी संगणकाचे आगमन झाले तेंव्हाचा इतिहास आपण पाहिला आहेच. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातसुध्दा असे अनुभव येतात. एवढेच काय, घरात आणलेल्या एकाद्या नव्या वस्तूचेसुध्दा कोणाकडून उत्साहाने स्वागत होते, तर कोणी त्याला नावे ठेवतात, कोणी त्यातल्या उणीवा शोधतात, तर कोणाला त्यात धोके दिसतात. पण ते उपकरण खरोखर चांगले असले तर अखेर सगळे त्याचा उपयोग करू लागतात आणि तसे नसले तर ते अडगळीच्या खोलीत जाऊन धूळ खात पडते.

सार्वजनिक गणेशोत्सवाचा जो उपक्रम श्री. भाऊसाहेब रंगारी आणि लोकमान्य टिळकांनी १८९२-९३ साली सुरू केला त्याच्या संदर्भातसुध्दा आपल्याला या चार प्रतिक्रिया दिसतात. त्या वेळी बाळ गंगाधर टिळक अजून ‘लोकमान्य’ झाले नव्हते. झुंजार वृत्तपत्रकार अशी त्यांची ख्याती झालेली होती आणि पुण्यामधील शिक्षणसंस्था, सभा, संमेलने वगैरेंशी त्यांचा निकटचा संबंध असल्यामुळे त्यांची खास प्रतिमा तयार झाली होती. त्यांचा चाहता वर्ग तयार झाला होता. त्या लोकांनी गणेशोत्सवाचा उत्साहाने पुरस्कार केला. पण अनेकांनी त्याचा उपहास आणि विरोधही केला. कर्मठ धर्मनिष्ठांनी त्याला ‘धर्मबुडवा’ म्हंटले तर कुचाळकी करणाऱ्यांनी त्याला जातीयतेचा रंग दिला, कोणी त्याला परधर्मीयांचे अनुकरण ठरवले तर कोणी परकीय लोकांचे. कोणाला मेळ्यामधील कार्यक्रमात बरेच काही आक्षेपार्ह वाटले तर कोणाला सजावट आणि आणखी कोणाला विसर्जनाची मिरवणूक पसंत पडली नाही. त्यांनी या सर्वांची टिंगल केली किंवा त्यांचा निषेध केला. पण त्यांनी केलेल्या निंदेमुळे टिळक विचलित झाले नाहीत की त्यांनी निंदकांना अवास्तव महत्व दिले नाही. ते आपल्या ध्येयाच्या दिशेने शांतपणे आणि खंबीरपणे मार्गक्रमण करत राहिले आणि गणेशोत्सवामुळे समाजाला होणारे फायदे दाखवत राहिले. टिळकांच्या आवाजाचा एक नमूना शतकानंतर अलीकडे आपल्याला ऐकायला मिळाला. त्यावरून असे दिसते की गणेशोत्सवात आलेल्या श्रोत्यांना शास्त्रीय संगीत ऐकायची संधी मिळावी अशी योजना टिळकांनी केली तसेच हे दिव्य संगीत त्यांनी गोंधळ गडबड न करता शांतपणे ऐकून घ्यावे अशी सक्त ताकीदही त्यांनी दिली.

टिळकांचे कळकळीने केलेले सांगणे लोकांनाही पटत गेले आणि अल्पावधीतच गणेशोत्सवाची लोकप्रियता वाढत गेली. टिळकांनी दाखवलेल्या उदाहरणाचे असंख्य लोकांनी अनुकरण केले. वर्षभरानंतर पुण्यातच शेकडो ठिकाणी हा उत्सव साजरा केला गेला आणि त्याच्या पुढल्या वर्षी तो गावोगावी साजरा होऊ लागला. पंढरपूरसारखी यात्रा आणि सार्वजनिक गणेशोत्सव यातला हाच मोठा फरक होता आणि टिळकांनी तो नेमका हेरला होता असे त्यांच्या लिखाणावरून दिसते. देवस्थानांमध्ये जमणारी यात्रा ही फक्त त्या एकाच ठिकाणी भरते पण टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव गावोगावीच नव्हे तर प्रांताप्रांतांमध्ये पसरवायला कसलीच मर्यादा नव्हती. त्या निमित्याने ठिकठिकाणी तिथले अनेक लोक एकत्र येतील आणि त्यांना देशाभिमान व देशप्रेमाची प्रेरणा मिळू शकेल अशी दूरदर्शी व्यवस्था त्यात होती. टिळकांचा हा होरा अचूक ठरला आणि पाहता पाहता गणेशोत्सवाचा प्रसार सर्व दिशांना झाला. त्यांनी लावलेल्या रोपट्याचा फक्त एकच विशाल वृक्ष झाला नाही, त्यातून असंख्य वृक्ष निर्माण झाले.

. . . . . . . . . .

सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात

पुढील लेख : सार्वजनिक  गणेशोत्सवाचा प्रसार इथे पहा
https://anandghare2.wordpress.com/2018/09/19/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%aa/

कुंभमेळा, पंढरपूरची यात्रा, इतर अनेक ठिकाणच्या जत्रा, उरूस वगैरे धार्मिक स्वरूपाचे मेळावे भारतामध्ये कित्येक शतकांपासून चालत आले आहेत. विशिष्ट तिथीला विशिष्ट दैवतांचे दर्शन घेण्याने महान पुण्य मिळते, पापाचा क्षय होतो, या जन्मात सुखाची प्राप्ती आणि दुःखाचा अंत होतो, तसेच मृत्यूनंतर स्वर्गात जागा मिळते, मनुष्य योनीमध्ये पुनर्जन्म मिळतो किंवा जन्म मरणाच्या चक्रामधून मुक्ती मिळून मोक्षप्राप्ती होते वगैरे आमिषे काही भाविकांना त्यात दाखवली जातात. पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या परंपरा त्यात खंड न पाडता चालवत राहून पुढील पिढीकडे सोपवणे हे आपले परमकर्तव्य आहे आणि काहीही करून ते पार पाडणे अत्यावश्यक आहे अशा निष्ठेने काही लोक या यात्रांना जातात. त्याशिवाय एक वेगळा अनुभव, गंमत, हौस म्हणून जाणाऱ्यांची संख्या सुध्दा मोठी असते. या निमित्याने इतकी माणसे एकत्र येतात, त्यांची सेवा करण्याची संधी, किंवा त्यांच्याकडून काही ना काही अर्थप्राप्ती करून घेण्याचा मोह, अशा विविध कारणांमुळे अनेक लोक या यात्रांमध्ये सामील होतात. हे सगळे कित्येक शतकांपासून आजतागायत चालत आले आहे आणि जसजशा वाहतुकीच्या सोयी वाढत गेल्या तशी त्या यात्रेकरूंची संख्या कैकपटीने वाढत चालली आहे.

हे बहुतेक उत्सव एकाद्या पुरातन आणि जागृत समजल्या जाणाऱ्या देवस्थानाच्या ठिकाणी साजरे होत असतात. त्या यात्रांमध्ये काळ आणि स्थानमहात्म्याला फार मोठे महत्व असते. एकाद्या परमभक्ताला यात्रेच्या काळात त्या ठिकाणी जाऊन पोहोचणे काही कारणामुळे शक्य झाले नव्हते, तेंव्हा देवाने प्रत्यक्ष किंवा त्याच्या स्वप्नात येऊन त्याला दर्शन दिले अशी हकीकत अनेक देवस्थानांच्या बाबतीत सांगितली जाते. त्यातून नव्या श्रध्दास्थानांचा उगम होतो, नवी सुरस कथा बनते आणि नव्या यात्रेकरूंची नवी परंपरा सुरू होते. अशा प्रकारे त्यात भर पडत जाते.

अठराव्या शतकातल्या पेशवाईच्या काळातच गणेशोत्सव साजरा करण्याची सुरुवात झालेली होती. त्यानिमित्य शनिवारवाड्याची सजावट आणि दिव्यांची रोषणाई केली जात असे तसेच भजन कीर्तन, गायन, नृत्य आदि कार्यक्रम होत असत. पेशव्यांचे इतर सरदार हा उत्सव आपापल्या संस्थानांच्या ठिकाणी करू लागले. पुण्यामध्येच कसबा पेठेतील सरदार मुजुमदार यांच्या वाड्यात सन १७६५ साली हा उत्सव सुरू झाला आणि गेली २४८ वर्षे तो चालत आला आहे. लोकमान्य टिळकांच्या काळाच्या आधीपासूनच अशा प्रकारे कांही ठिकाणी गणेशोत्सव साजरा होत होता. पण तो मुख्यतः धार्मिक स्वरूपाचा होता किंवा तो साजरा करणाऱ्या श्रीमंत मंडळींच्या ऐश्वर्याचे प्रदर्शन त्यात केले जात असे. लोकमान्यांनी त्याला लोकाभिमुख आणि मनोरंजक तसेच उद्बोधक असे वेगळे रूप दिले, त्याला देशभक्तीची जोड दिली आणि तो इतका लोकप्रिय केला की सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनकत्व त्यांनाच दिले जात होते. पण पुण्यातला पहिला सार्वजनिक गणेशोत्सव भाऊसाहेब रंगारी यांनी सन १८९२ मध्ये सुरू केला असल्यामुळे लो.टिळकांचा उत्सव पहिला ठरत नाही असा आक्षेप अलीकडे घेतला गेला होता. त्या वेळी जेवढे माझ्या वाचनात आले त्यावरून पाहता ते स्वतः लोकमान्य टिळकांचे चाहते किंवा सहकारी असावेत, प्रतिस्पर्धी किंवा विरोधक नसावेत असाच माझा ग्रह झाला. हे दोन्हीही उत्सव सव्वाशे वर्षांपासून अव्याहत चाललेले आहेत.

लोकमान्य टिळकांच्या मनात देवभक्तीपेक्षा देशभक्तीची भावना जास्त प्रखर होती. जास्तीत जास्त सर्वसामान्य लोकांच्या मनात देशप्रेम आणि देशाभिमान रुजवावे, त्यांना देशकार्यासाठी उद्युक्त करावे हा लोकमान्य टिळकांचा अंतस्थ हेतू होता, पण देशभक्तीवर केलेली भाषणे लोकांना रुक्ष वाटली असती आणि मुळात ती ऐकण्यासाठी फारसे लोक जमलेच नसते. शिवाय तत्कालीन इंग्रज सरकारने त्यावर लगेच अंकुश लावला असता. त्यामुळे लोकांना एकत्र आणण्यासाठी वेगळी युक्ती योजणे आवश्यक होते. धार्मिक स्वरूपाच्या उत्सवांच्या निमित्याने खूप माणसे एकत्र जमतात हे लोकमान्य टिळकांनी पाहिले आणि त्यातून आपल्याला हवी असलेली जनजागृती करता येईल हे त्यांनी ओळखले, पण त्यांचे अनुयायी बनण्यासाठी लोकांनी त्यांना महंत, स्वामी, बाबा अशा प्रकारचा धर्मगुरू म्हणून मखरात बसवावे हा त्यांचा उद्देश नव्हता. स्वतः एकाद्या देवाचे लाडके परमभक्त असल्याचे न भासवता पण ईशभक्तीचे निमित्य पुढे करून लोकांना कसे आकर्षित करावे हा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे होता. सार्वजनिक गणेशोत्सव हा त्यावर एक नामी उपाय त्यांनी शोधून काढला आणि अंमलात आणला.

हे काम वाटते तेवढे सोपे नव्हतेच. ते यशस्वी करण्यासाठी लोकमान्यांना भरपूर परिश्रम करावे लागले, अनेकांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले. एरवी साधा वाडा असलेल्या वास्तूमध्ये काही दिवसांसाठी गणपतीची तात्पुरती प्रतिष्ठापना करणे आणि उत्सव संपल्यानंतर त्याची बोळवण करून त्या जागेत पुन्हा पूर्ववत परिस्थिती निर्माण करणे हे भाविक लोकांना पटणे कठीण होते. गणपती या देवाची पूजा अर्चा ही व्यक्तीगत बाब आहे, ती विधीवत (सोवळे वगैरे नेसून) प्रकारे करायला हवी, त्यातले विशिष्ट पूजाविधी, मंत्रोच्चार वगैरेमध्ये कसलीही उणीव येता कामा नये असे समजणारे आणि सांगणारे लोक शंभरावर वर्षे उलटून गेली तरी आजही आपल्याला भेटतात. लोकमान्य टिळकांच्या काळामधल्या कर्मठ लोकांनी तर यात कसलीही हयगय होणे मान्य केलेच नसते. देवघरातल्या देवाला सार्वजनिक जागी आणून ठेवले आणि कोणीही उठून त्याची पूजा करू लागला. यामुळे पावित्र्याचा भंग झाल्याने गणपतीमहाराज रुष्ट झाले आणि त्या पातकाचे शासन म्हणून त्यांनी प्लेगाच्या साथीला पाठवून दिले असे अकलेचे तारेसुध्दा काही मंडळींनी त्या काळात तोडले होते.

हा विरोध इतर काही वेगळ्या मुद्द्यांवर आणि वेगवेगळ्या स्तरांवर झाला होता. यात पूजेच्या पावित्र्याचा भंग होतो अशी ओरड कर्मठ धर्ममार्तंड करत होते,तर दुसऱ्या बाजूला हा ब्राह्मणांना पुढे पुढे करून समाजावर वर्चस्व गाजवण्याचा टिळकांचा एक कुटील डाव आहे असा दुष्ट आरोप कांही लोक करत होते. ही मुसलमानांच्या मोहरमच्या ताबूतांची नक्कल आहे असे सांगून हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना भडकवण्याचा उद्योग इतर कोणी करत होते. अशा तात्विक मुद्द्यांशिवाय सजावट आणि मेळ्यांचे कार्यक्रम यांचा दर्जा, त्यावर होणारा खर्च आणि त्यात वाया जाणारा वेळ याबद्दल नाक मुरडणारे बरेच लोक होते. या सर्वांनी उडवलेल्या राळीमुळे विचलित न होता त्यांचे मुद्देसूद खंडन करून समाजातल्या जास्तीत जास्त लोकांचा विश्वास संपादन करणे आणि आपल्या या नव्या उपक्रमाला त्यांची मान्यता मिळवून त्यांना मोठ्या संख्येने त्यात सहभागी करून घेणे हे अत्यंत कठीण काम लोकमान्यांनी त्या काळात करून दाखवले. लोकमान्यांनी या गोष्टी कशा प्रकारे लोकांच्या गळी उतरवल्या, त्यासाठी कोणकोणते युक्तीवाद केले हे त्या काळामधील लोकच जाणोत.

भाऊसाहेब रंगारी यांनी सन १८९२ मध्ये आणि लोकमान्य टिळकांनी सन १८९३ मध्ये पुण्यात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आणि वर्षभरानंतर सन १८९४ साली शेकडो ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले गेले. त्यानंतर ते लोण झपाट्याने पसरत गेले. आज जगभरातल्या सर्व खंडांमध्ये (अंटार्क्टिक सोडून) जिथे जिथे भारतीय लोक गेले आहेत तिथे तिथे ते लोक मोठ्या उत्साहाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात.

व्रतबंध

सिलिब्रेटीज हॉटेलच्या प्रेसिडेन्सी बँके हॉलमध्ये बरीच गर्दी जमली होती. लालचुटुक रंगाची मऊमऊ कुशन्स बसवलेल्या शोभिवंत खुर्च्या हॉलभर मांडून ठेवलेल्या होत्या. त्यातल्या बहुतेक खुर्च्यांवर कोणी ना कोणी विराजमान झालेले होते. त्यात पुरुषांची संख्या तशी कमीच होती. गुढग्याच्याही खालपर्यंत पोचणारी पठाणी शेरवानी परिधान केलेले तीन चार जण सोडल्यास इतरांनी चांगल्यापैकी शर्टपँट घातल्या होत्या. महिलावर्गाची संख्या मोठी होती आणि त्यांच्या वेषभूषेमध्ये अगणित प्रकार होते. उत्तरेतील बनारसीपासून दक्षिणेतल्या कांचीपुरमपर्यंत आणि पश्चिमेतल्या पटोलापासून पूर्वेतल्या आसाम रॉसिल्कपर्यंत सर्व त-हेच्या रेशमी साड्या, शालू, पैठणी वगैरे होत्याच, त्याशिवाय विविध प्रकारच्या भारतीय तसेच परकीय फॅशन्सच्या असंख्य ड्रेसेसचे नमूने पहायला मिळत होते. बहुतेकजणी अंगावर ठेवणीतले निवडक आणि आकर्षक दागिने ल्यायल्या होत्या. सर्वांनी चोपडलेल्या सेंट्सच्या सुवासांच्या मिश्रणातून वातावरणात आगळाच गंध दरवळत होता. सौम्य वाद्यसंगीताच्या मधुर लकेरी हॉलमध्ये घुमत होत्या, त्यातच लोकांच्या बोलण्याचे आवाज मिसळत होते. आपल्या आवाजाचे डेसिबल वाढणार नाही याची काळजी घेऊन प्रत्येकजण हळूहळू फुसफुसत असले तरी सर्वांचा मिळून कलकलाट नसला तरी गलबला होत होता. एका लहानशा गावात आयुष्य घालवून साठपासष्ठ वर्षांपूर्वी निवर्तलेल्या रघुनाथशास्त्र्यांचा आत्मा त्या हॉलच्या आसपास घुटमळत होता.

पणतवंडाच्या मुंजीचा सोहळा पाहण्यासाठी स्वर्गातून त्याला पृथ्वीतलावर पाठवले गेले होते. तो आत्मा त्या जागेच्या शोधात हिंडत होता. एकाद्या घराच्या अंगणात बांबू रोवून आणि त्यावर जाजमाचे छत टाकून मांडव घातला असेल, त्याच्या दारापाशी केळीचे खुंट उभे करून ठेवले असतील, आंब्याची पाने आणि झेंडूची फुले यांच्या माळांचे तोरण बांधले असेल, दारापाशी ताशेवाजंत्री वाजत असतील, आत मंत्रघोष चालला असेल, मांडवात यज्ञकुंडाचा धूर भरलेला असेल आणि मागच्या बाजूला पेटलेल्या चुलखंडांचा. उन्हाने रापलेल्या अंगाचे दर्शन घडवणारे उघडबंब ढेरपोटे आचारी त्यावर अगडबंब हंडे आणि पातेली चढवून त्यात अन्न रांधण्यात मग्न असतील, डोक्यावर शेंडी आणि कमरेला लंगोटी किंवा रेशमी चड्डी धारण केलेले अष्टवर्ग बटू धावपळ करत असतील, मोठी माणसे, विशेषतः त्यांच्या आया त्यांच्यावर ओरडून त्यांना शांतपणे बसायला सांगत असतील, वगैरै वगैरे जे दृष्य रघुनाथशास्त्र्यांच्या आत्म्याला अपेक्षित होते ते गावात कुठेच सापडले नाही. प्रेसिडेन्सी हॉलमध्ये मास्टर क्षितिज याची थ्रेड सेरेमनी आहे असे लिहिलेला बोर्ड सिलिब्रेटीज हॉटेलच्या रिसेप्शनपाशी लावला होता, पण इंग्रजी वाचता येत नसल्यामुळे रघुनाथशास्त्र्यांच्या आत्म्याला त्याचा बोध झाला नाही.

रघुनाथशास्त्र्यांच्या आत्म्याला एक गोष्ट ठाऊक नव्हती. ती म्हणजे जेंव्हा त्यांची मुंज लागली होती त्या वेळी त्यांचे खापरपणजोबा बाळंभटाचा आत्मा असाच गोंधळून गेला होता. वैयक्तिक स्वरूपाच्या या धार्मिक विधीसाठी इतकी माणसे का जमली आहेत याचे त्याला नवल वाटले होते. बारा वर्षांसाठी घरापासून दूर जाणार असलेल्या रघूला बालरूपात पाहून घेण्यासाठी हे लोक जमले आहेत म्हंटले तर त्याच्य़ा वियोगाच्या कल्पनेने गंभीर न होता ते इतक्या आनंदात कसे असू शकतात हे त्याला समजत नव्हते. अंगावर उंची नवे कपडे आणि दागिने, डोक्यावर पागोटे वगैरे घालून घोड्यावर बसलेल्या रघुनाथाची बँडबाजाच्या कर्णकर्कश आवाजात मिरवणुक निघाली. तिला भिक्षावळ असे म्हणतात हे ऐकून त्या आत्म्याला झीटच यायची बाकी राहिली असेल.

आतासारख्या दिवसातून ठराविक तास चालणा-या शाळा प्राचीन काळात अस्तित्वात नव्हत्या. शेती, व्यापार, हस्तकौशल्य वगैरे जीवनोपयोगी बाबींचे शिक्षण घरातच मिळत असे. वेदशास्त्रादिकांचे अध्ययन करण्यासाठी चांगल्या गुरूची नितांत आवश्यकता असायची. छापील पाठ्यपुस्तके आणि वह्या वगैरे नसल्यामुळे बहुतेक सारे शिक्षण मौखिक असायचे. गुरूला मुखोद्गत असलेल्या ऋचा, सूक्ते, श्लोक वगैरे शिष्यांकडून तोंडपाठ करून घेणे हा या शिक्षणाचा महत्वाचा भाग असे. त्यातल्या कानामात्रा, -हस्वदीर्घ, अनुस्वार वगैरे प्रत्येक बारकावे अचूक असणे अत्यंत आवश्यक होते. यासाठी शिष्याने एकाग्रचित्त व्हायला पाहिजे. त्याचे मन विचलित होऊ नये, त्याला इतर कशाचा मोह पडू नये म्हणून त्याला कठोर ब्रह्मचर्यव्रत पाळावे लागत असे. त्याने जिभेचे चोचले पुरवायचे नाहीत, मऊ शय्येवर झोपायचे नाही अशा प्रकारची बंधने त्याच्यावर घातली जात. त्या काळातले गुरू म्हणजे ऋषीमुनी नगराबाहेर अरण्यात आश्रम बांधून रहात असत. ज्ञानार्जन करण्यासाठी शिष्यांनाही त्यांच्या आश्रमातच रहावे लागे. त्यांच्या उदरनिर्वाहाचा भार गुरूवर पडू नये म्हणून शिष्यांनी भिक्षा मागून आणावी आणि ती गुरूला अर्पण करावी अशी व्यवस्था केली जात असे. अशी समजूत आहे.

भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा अशी गरीब परिस्थिती असणा-या शिष्यांना या बंधनामध्ये कदाचित फारसे बिकट वाटणार नाही. पण प्राचीन भारतात अन्नधान्य, फळफळावळ, दूधदुभते वगेरेंची रेलचेल होती असेही सांगतात. अशा सुबत्तेत वाढणा-या लाडावलेल्या मुलाने एकदम सर्व मौजमजा आणि आवडीनिवडींचा त्याग करून विरक्त आणि निरीच्छ बनणे हे मला तरी अनैसर्गिक वाटते आणि असल्या नियमांचे किती पालन होत असेल याची शंका वाटते. ज्ञानाची मनापासून अतीव ओढ असलेल्या आणि त्यासाठी पडतील तेवढे कष्ट करण्याची आणि काहीही सहन करण्याची मनाची तयारी असलेल्या एकाद्या असामान्य मुलालाच ते शक्य होत असेल. कदाचित त्या काळात अशा असामान्य मुलांचाच व्रतबंध करून त्यांना गुरूगृही पाठवत असावेत. असे असेल तर व्रतबंधाच्या संस्कारात अशक्यप्राय अशी बंधने सरसकट सगळ्या मुलांवर घालायची रूढी कशी पडली?

जगातील बहुतेक सारे धर्म परमेश्वराला मानतात. तो सर्वसाक्षी, सर्वज्ञ आणि सर्वशक्तीमान देव आणि सामान्य माणूस यांच्या दरम्यान सर्व धर्मांमध्ये काही मध्यस्थ असतात. परमेश्वराची उपासना करण्याव्यतिरिक्त आचरण, आहार वगैरे जीवनातील इतर अनेक अंगांसाठी धर्माच्या नावाखाली असंख्य नियम सांगितले जातात. ते नियम प्रत्यक्ष ईश्वरानेच तयार केले असून ऋषी, मुनी, प्रेषित यांच्या मार्फत ते जगाला सांगितले गेले असल्यामुळे त्यांचे पालन अनिवार्य आहे असेही सांगितले जाते. हे नियम आणि त्यांचा अर्थ सामान्य माणसांना सांगायचे काम हे मध्यस्थ करतात. ही मंडळी धार्मिक वृत्तीची आणि सदाचरण करणारी, देवाच्या जवळची असावी अशी अपेक्षा असते. पुरोहित, शास्त्री, पाद्री, मुल्ला, मौलवी, ग्रंथी, मुनी, भिक्खू वगैरेंच्या रूपात हा वर्ग सर्वत्र दिसतो. या वर्गाला समाजात मानाचे स्थान असते. प्राचीन काळातले भारतातले ऋषीमुनी अरण्यात वनवास करून रहात होते, पण नंतरच्या काळातले धर्मगुरू नगरवासी झाले. त्यांच्या शिष्यांना घर सोडून गुरूगृही जाऊन रहाण्याची आवश्यकता राहिली नाही. या धर्मगुरूंना समाजात आणि राजदरबारी मानसन्मान मिळत होताच, त्याशिवाय द्रव्यप्राप्ती होऊ लागली. आपल्या मुलांनाही असेच सन्माननीय आणि समृद्ध जीवन मिळावे असे सर्वांना वाटणे साहजीक होते.

धर्मगुरूंचे काम सांभाळण्यासाठी विशेष शिक्षण घेऊन दीक्षा घेतली जाते. या शिक्षणाची सुरुवात करण्याची मुंज ही पहिली पायरी असते. ती पार केल्याशिवाय शिक्षणाची सुरुवातच करायची नाही असा परंपरागत निर्बंध होता. आपल्या मुलाला जेवढे जमेल तेवढे तो शिकेल, आपण त्याला संधी उपलब्ध करून दिली पाहिजे असा विचार करून आज प्रत्येक पालक त्याच्या मुलाला शाळाकॉलेजांमध्ये पाठवतो. असाच विचार करून सर्व मुलांचा व्रतबंध करण्याची प्रथा पडली असावी. त्यातले व्रत आणि बंध मागे पडत गेले आणि निव्वळ उपचार शिल्लक राहिला. मेकॉले साहेबाने शालेय शिक्षणपद्धत आणल्यानंतर मुंज आणि शिक्षण यातला संबंध संपला. मुंज केल्यानंतर घेण्याचे शिक्षण फक्त संध्या आणि मंत्र यांच्यापुरते सीमित राहिले. आता ते सुध्दा राहिलेले नाही. एकत्र कुटुंबातल्या घरातल्या आजोबा पणजोबांच्या आग्रहामुळे त्यांच्या समाधानासाठी एक कार्यक्रम केला जाऊ लागला आणि त्याला समारंभाचे स्वरूप प्राप्त झाले. या निमित्याने आप्तेष्टांनी एकत्र जमणे, खाण्यापिण्याची हौस भागवून घेणे, भेटवस्तू देणे, नवे कपडेलत्ते आणि दागिने करणे वगैरे होऊ लागले.

पंचवीस तीस वर्षांपूर्वीच्या काळात थाटात मुंज करण्याचे प्रमाण बरेच कमी झाले होते. गिरगावात एका ठिकाणी सार्वजनिक मुंजी लागत असत आणि प्रत्येक बटूमागे त्याच्या जवळच्या आप्तांसाठी पाच की दहा कूपने मिळत, तेवढेच लोक त्याला उपस्थित रहात असत. काही लोक तीर्थक्षेत्राला जाऊन तिथे मुलाची मुंज लावून येत असत. घरातल्या लग्नकार्याच्या सोबत लहान मुलांच्या मुंजी लावल्या जात. असे काही समारंभ मी पाहिले आहेत. माझ्या परिचयातल्या एका मुलाची मुंज या कशातच झाली नव्हती आणि त्याला त्याचा काही विषादही वाटत नव्हता. पण आधी मुंज झाल्याखेरीज त्याचे लग्न मी लावणार नाही असा भटजीने हट्ट धरला आणि त्याची मुंज, सोडमुंज आणि विवाह हे सगळे विधी एकापाठोपाठ उरकून घेतले.

काळ आणखी पुढे गेल्यानंतर म्हणजे आतापर्यंत मुंज हा प्रकार इतिहासजमा होईल असे मला त्यावेळी वाटत होते. त्यातल्या व्रत आणि बंध या शब्दांना खरोखर काही अर्थ उरलेला नाही. पण मध्यम वर्गीयांची आर्थिक परिस्थिती चांगली सुधारल्यामुळे समारंभ करण्याचा उत्साह मात्र कमी होण्याऐवजी जास्तच वाढलेला दिसतो. परवा मी एका मुंजीला गेलो होतो. आपल्या आजोबासोबत तिथे आलेल्या एका ७-८ वर्षाच्या मुलीने आजोबांना विचारले, “आपण इथे कशाला आलो आहोत?”
“आपल्या विकीच्या मुंजीला”
“मुंज म्हणजे काय? ती कशाला करतात?”
“ती शिक्षणाची सुरुवात आहे. आता त्याने गुरूकडे शिकायला जायचे आहे.”
“तो तर आधीच थर्ड स्टँडर्डला आहे. आता कसली सुरुवात? त्याला हॉस्टेलमध्ये पाठवणार आहेत का? पण त्यासाठी चकोट कशाला करायला पाहिजे? मुलं त्याला हसणार नाहीत का? माझी मैत्रिण रुची पण हॉस्टेलात राहते, तिची पण मुंज केली होती का? ……….”
नातीचे प्रश्न संपत नव्हते आणि आजोबांना काही केल्या उत्तरे सापडत नव्हती. अखेर मी तिची समजूत घातली, “अगं विकीच्या आईबाबांना एक मोठी पार्टी द्यायची होती, सगळ्या रिलेटिव्ह्जना आणि फ्रेड्सना बोलवायचे होते, आपले नवे ड्रेसेस, ज्युवेलरी त्यांना दाखवायची होती, त्यांच्या नव्या फॅशन्स पहायच्या होत्या. तू नाही का किती मस्त ड्रेस घातला आहेस? हे सगळं एन्जॉय करायसाठी आपण इथे आलो आहोत. “

मौंजीबंधन भाग ५

munj05

मुहूर्त होताच बटूंच्या मस्तकावर सर्वांनी अक्षता टाकल्यानंतर पेढे वाटून झाले. ते खाता खाता सगळी मंडळी पांगली. त्या दिवशी थंडीच्या लाटेने अगदी कहर केला होता. सकाळी आठ साडेआठपर्यंत इतके दाट धुके होते की वीस पंचवीस फुटांपलीकडचे कांही दिसत नव्हते. साडेनऊ दहा वाजता जमीनीवरील धुके निवळून गेले होते, पण आभाळात त्याचे दाट थर शिल्लक होते. पहायला गेले तर आकाश निरभ्र होते, एकही ढगाचा आकार असा दिसत नव्हता, पण सूर्याचे बिंब जेमतेम पौर्णिमेच्या चंद्राइतपतच चमकत होते. कासराभर वर आलेल्या सूर्याचे बिंब त्याच्याकडे टक लावून सहजपणे पाहता येत होते. अशा प्रकारचे दृष्य भारतात मी प्रथमच पहात होतो. यापूर्वी मी बर्फाळ प्रदेश पाहिला आहे, हिमवर्षावाचा अनुभवही घेतला आहे, पण त्या वेळेस लोकरीच्या कापडाने नखशिखांत सर्वांग झाकून घेतले असल्यामुळे त्याचे एवढे कष्ट वाटले नाहीत. या वेळी मात्र अंगात हुडहुडी भरवणा-या कडाक्याच्या थंडीने मला अनपेक्षितपणे गाठले होते. इतर पाहुण्यांचीही हीच अवस्था होती. दुपारी बारा वाजण्याच्या सुमाराला सारे धुके निवळून लख्ख ऊन पडले. तेंव्हा गारठलेल्या हॉलमध्ये बसण्यापेक्षा बाहेर उबदार वाटू लागले. सगळी रिकामटेकडी मंडळी खुर्च्या घेऊन बाहेर आली आणि सकाळचे कोवळे ऊन खात असल्याप्रमाणे समोरच्या उघड्या जागेत भर दुपारी आरामात गप्पा मारत बसली.

बटूंच्या कानात गायत्री मंत्र सांगितल्यानंतर त्यांना गुरूजींच्या ताब्यात देऊन मुलाचे वडील मोकळे झाले आणि पुढच्या कामाच्या तयारीला लागले. सजावट करणा-या कंत्राटदाराच्या माणसांनी सभागृहाचा ताबा घेतला. पुढील होमहवन वगैरे करण्यासाठी एका बाजूला थोडी जागा सोडून उरलेल्या जागेची साफसफाई आणि सजावट त्यांनी सुरू केली. थोडी महिला मंडळी त्यांना दिलेल्या स्वतंत्र खोलीत जाऊन बसली, थोडी बाहेर आली. हॉलमध्ये उरलेली पुरुषमंडळी देखील खुर्च्या घेऊन बाहेर येऊन उन्हात बसली. कांही लोक गांवात फेरफटका मारायला गेले, कांहींनी रेल्वे स्टेशनात जाऊन परतीच्या गाड्यांच्या चौकशा केल्या. पण त्या पिटुकल्या गांवात रस्त्यावरून फिरायला फारसा वाव नव्हता आणि विंडोशॉपिंग करता येण्यासारख्या मॉल्सची तर कल्पनादेखील करता येण्यासारखी परिस्थिती नव्हती. पेन किंवा टूथ पेस्ट यासारख्या अगदी आवश्यक अशा ज्या गोष्टी येतांना बरोबर आणायचे राहून गेले होते त्या कांही लोकांनी बाजारातून विकत घेतल्या.

मुंजीच्या विधीमध्ये नक्की काय चालले होते ते कांही मी पाहिले नाही. पण माझ्या अंदाजाप्रमाणे होम हवन करून विविध देवांची पूजा व प्रार्थना करणे आणि त्या अग्नीदेवाच्या साक्षीने ब्रम्हचर्यव्रताचे पालन करण्याची प्रतिज्ञा करणे वगैरे गोष्टी त्यात असाव्यात. ते सगळे संस्कृत भाषेत असल्यामुळे बटूंना त्याचा अर्थ समजण्याची शक्यता नव्हती आणि ते उमजण्याचे त्यांचे वय नव्हते. सकाळी लवकर उठल्यामुळे रात्रीची झोपही झालेली नव्हती. आळोखे पिळोखे आणि जांभया देत ते सारे विधी संपण्याची ते वाट पहात होते. मातृभोजन केलेले असतांनासुध्दा त्यांच्या पोटात चांगली खडखडून भूकही लागली असावी. परत जाण्याची ज्या लोकांना घाई होती अशा थोड्या लोकांना पहिल्यांदा जेवायला बसवले तेंव्हा छोटा बटू हळूच येऊन त्यातल्या एका पानावर जाऊन बसला आणि त्याने जेवायला सुरुवातही करून दिली.

सर्व पाहुणे मंडळी आणि गांवातले निमंत्रित लोक यांची यथासांग जेवणे झाली. जेवणाचा बेत छानच होता आणि प्रत्येक पदार्थ प्रेमाने भरभरून आग्रह करून वाढणे चालले होते. आजकाल बूफेची संवय झालेली असल्यामुळे असे पंगतीतले जेवण करतांना वेगळ्या मजेचा अनुभव येत होता. सर्वांची जेवणे झाल्यानंतर भिक्षावळीचा कार्यक्रम झाला. व्रतबंध झाल्यानंतर बटूने विद्याध्ययनासाठी गुरूगृही जाऊन रहायचे असे. त्याच्या उदरभरणाचा भार गुरूवर पडू नये म्हणून त्याने पांच घरी जाऊन माधुकरी मागायची आणि मिळेल ते अन्न भक्षण करायचे किंवा मिळालेला शिधा गुरूपत्नीला नेऊन द्यायचा असा संकेत पूर्वीच्या काळी असावा. आपले घर सोडून जातांना बटूने कसल्याही प्रकारची चैनीची वस्तू बरोबर न्यायची नाही. कंबरेला लंगोटी, खाकेत झोळी आणि हातात दंड एवढेच सोबत घेऊन त्याने गुरूगृही जायचे असा दंडक होता. बटु तसा वेष धरून तयार झाले. लंगोटी घालायची आजकाल लाज वाटते म्हणून पायजम्यासारखे नेसता येणारे कद त्यांनी परिधान केले होते आणि कडाक्याची थंडी असल्यामुळे शाल पांघरणे आवश्यक होते. “ओम् भवती भिक्षांदेही” असे म्हणत त्यांनी पाच घरी भिक्षा मागावयाची असा नियम होता. प्रत्यक्षात त्यांची माता पाच वेगवेगळी वस्त्रे परिधान करून आली आणि तिने पांच वेळा तिथे तयार ठेवलेली भिक्षा बटूंच्या झोळीत घातली. त्यानंतर इतर स्त्रीवर्गाने भिक्षावळ घातली. पूर्वीच्या काळी बटूंच्या पायाचे तीर्थ प्राशन करण्याची पद्धत होती. आता बिसलेरी आणि एक्वागार्डच्या जमान्यात सहसा कोणी ते धाडस करत नाही. जमा झालेली सर्व भिक्षावळ गोळा करून भटजींना दिली.

कार्यालयातला भिक्षावळीचा कार्यक्रम संपल्यावर मिरवणूक निघाली. खरे तर संध्याकाळ झाल्यानंतर ती काढतात, पण वीजकपातीमुळे सगळीकडे पसरणारा काळाकुट्ट अंधार आणि संध्याकाळी रस्त्यात वाढणारी रहदारी यांचा विचार करून थोड्या आधीच वरात काढली गेली. सजवलेल्या घोड्यावर दोन्ही बटू विजयी वीरांच्या ऐटीत स्वार होऊन बसले. पुढे बँडवाले आणि मागे सारा परिवार अशी मिरवणूक गांवातल्या एकमेव हमरस्त्यावरून निघाली. अपेक्षेप्रमाणे घराघरांतून लोक कौतुकाने त्यांच्याकडे पहात होते आणि अभिमानाने हात हलवून बटू त्यांना अभिवादन करत होते. बटूंनी प्रथम एका मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले आणि ते वाजतगाजत घरासमोर आले. उत्साही मंडळींनी घरासमोर बँडच्या तालावर नाचून घेतले. थोड्या वेळाने वरात कार्यालयात परत गेली. मुंजीचा कार्यक्रम थाटामाटात साजरा केल्याबद्दल सर्वांनी यजमानांचे तोंडभर कौतुक केले आणि हे मंगल कार्य निर्विघ्न पार पाडल्याबद्दल परमेश्वराचे आभार मानले.

(समाप्त)

मौंजीबंधन भाग ४

munj04

मुंजीच्या दिवशी मात्र भल्या पहाटे उठून कामाची लगबग सुरू झाली. मुंज्या मुलांना उठवून तयार करण्यात आले. त्यांचे मातापिता, करवल्या वगैरे अतिविशिष्ट मंडळींना सगळ्याच कामात अग्रक्रम देणे आवश्यक असल्यामुळे आम्ही इतरेजन आपला नंबर लागण्याची वाट पहात आराम करीत राहिलो. अखेर जमेल तेंव्हा जमतील तेवढी नित्याची कामे उरकून कपडे चढवून तयार होईपर्यंत मातृभोजनाची तयारी सुरू झाली होती. आम्हीही सावकाशपणे आपला नाश्ता घेऊन चवीने खाल्ला. कढईतून तळून निघालेले गरम गरम बटाटे वडे (त्याला तिकडे ‘आलू बोंडा’ म्हणतात) थंडगार वातावरणात जास्तच चविष्ट लागत होते. त्यामुळे सगळ्यांनी त्याची दोन तीन आवर्तने केली.

व्रतबंध झाल्यानंतर मुलगा व्रतस्थ होतो. त्यानंतर कोणाचेही उष्टे खाणे त्याला निषिद्ध असते. यामुळे ते नियम लागू होण्यापूर्वीच त्याची आई, बहीण वगैरेंनी त्याला मायेने मांडीवर बसवून घेऊन आपल्या हांताने दोन चार घास भरवून घ्यावेत, कारण ही संधी पुन्हा मिळणार नाही अशा विचाराने मातृभोजनाचा विधी ठेवला गेला असणार. मुंज्या मुलाला या प्रसंगी धीर यावा यासाठी आठ बटूंना त्याच्यासोबत बसवतात. पण ते बटू आधीच व्रतस्थ झालेले असल्यामुळे त्यांना पारंपरिक सुग्रास अन्न चालणार नाही म्हणून मातृभोजनाचा वेगळा मेनू ठरलेला असतो. मध्यप्रदेशातल्या त्या लहान गांवात यासाठी बटू मिळवणेसुद्धा कठीण काम होते. शिवाय कडाक्याच्या थंडीत उठून यायला कोण तयार होणार? खास त्यांना आणण्यासाठी त्यांच्या घरी गाडी पाठवण्याची व्यवस्था करावी लागली. त्यामुळे त्या दिवशी परगांवाहून आलेल्या कांही पाहुण्यांची थोडी गैरसोय झाली. त्याच्या मागचे कारण माहीत नसल्यामुळे झालेले गैरसमज आणि त्यापोटी झालेले त्यांचे रुसवे फुगवे थोडा वेळ चालले. मुलांना घास भरवण्याच्या बाबतीत यावेळी महिलांना शंभर टक्के आरक्षण मिळते. आजोबा, काका, मामा वगैरेंना कोणी त्यासाठी बोलावले नाही.

मुहूर्त होण्यापूर्वी सर्वात कष्टप्रद अशा कार्यक्रमातून मुंज्या मुलांना जावे लागले. सगळ्या प्रिय गोष्टींचा त्याग करण्याचे प्रतीक म्हणून त्यांना आपला केशसंभार उतरवावा लागला. डोक्यावर तबल्याच्या आकाराचा घेरा ठेऊन बाकी सारे साफ केले गेले. अशा प्रकारची हेअरस्टाईल करणारे कारागीर तिकडे अजून उपलब्ध आहेत याचेच थोडे आश्चर्य वाटण्यासारखे आहे. कदाचित दूरदर्शनवर ‘चाणक्य’ ही मालिका येऊन गेल्यावर त्यांच्या हस्तकौशल्याची उजळणी झाली असावी. ते कार्य चालले असतांना मुलांचे रडवेले झालेले चेहेरे पाहून त्यांच्याबद्दल अनुकंपा वाटत होती. पण महत्व मिळवण्यासाठी कसले तरी कष्ट उपसावे लागतात एवढा वस्तुपाठ त्यांना मिळाला होता.

मुंज लावण्यासाठी एक वेगळी प्रशस्त जागा सुसज्ज करून ठेवली होती. मुहूर्ताची वेळ होताच सगळी मंडळी तेथे जमली. लग्नामध्ये वधू आणि वर हे अंतरपाटाच्या दोन्ही बाजूला उभे असतात. मुहूर्ताच्या शुभ घटीला त्यांच्यामधला अ़डसर दूर करून त्यांनी एकमेकांना पहिल्यांदा पहावे अशी योजना असते. चांगले सजून धजून तयार असल्यामुळे त्यांचे एकमेकांवर फर्स्ट इम्प्रेशन चांगले पडते. परंपरागत रूढीनुसार त्यांनी त्यापूर्वी एकमेकांना पाहिलेसुद्धा नसायचे. पहाण्याचा कार्यक्रम वडीलधारी मंडळीच करत असत. या गोष्टी माझ्याही जन्मापूर्वीच इतिहासजमा झाल्या होत्या. तरी अंतरपाट धरून तो मुहूर्तावर दूर करण्याचा प्रघात चालूच राहिला आहे. मुंजीच्या वेळेला तर अंतरपाटाच्या एका बाजूला मुंजा मुलगा उभा राहिला होता आणि दुस-या बाजूला प्रत्यक्ष त्याचे वडीलच पाटावर बसले होते. त्या दोघांत अंतरपाट धरून कसला सस्पेन्स निर्माण होतो कुणास ठाऊक? त्याचे प्रयोजन कांही कळले नाही.

दोन चार शब्द लिहिण्याची मला संवय असल्यामुळे मंगलाष्टकाची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली होती. त्यासाठी ओढून ताणून यमके जुळवण्यात आदल्या दिवशीचा बराचसा रिकामा वेळ उपयोगाला आला. हिन्दी माध्यमात शिक्षण घेत असलेल्या त्या बटूंना त्यातले काव्यगुण (?) किंवा सदुपदेश समजेल अशी सुतराम शक्यता नव्हती. त्या वेळेला ते समजून घेण्याच्या मनःस्थितीतही कोणी नसते. पण उपचार म्हणून शार्दूलविक्रीडित वृत्तामध्ये कांही ऐकल्याखेरीज कार्यसिद्धी झाल्यासारखे वाटत नाही. उरलेला वेळ भटजींनी “गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा” आणि “रामोराजमणीःसदा विजयते रामम् रमेशम् भजे” वगैरे गात काढला. अखेर “शुभमंगल सावधान ” च्या गजरात आणि “तदेव लग्नं सुदिनं तदेव ” हा मंत्र म्हंटल्यावर अंतरपाट दूर झाला आणि बटूने आपल्या वडिलांच्या गळ्यात हार घातल्यावर सर्व उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या आणि बँडवाल्यांना “वाजवा रे वाजवा”चा इशारा देण्यात आला. त्यांनी केलेला गोंगाट आणि त्या गोंगाटावर मात करून बोलण्याच्या प्रयत्नात असलेले, आतापर्यंत शांतपणे उभे असलेले प्रेक्षक यांच्या आवाजाने सभागृह दुमदमून गेले.

(क्रमशः)

————

मौंजीबंधन भाग ३

munj03

मुंजीच्या निमित्याने आहेर देण्याघेण्याची पद्धत कधी सुरू झाली हा एक संशोधनाचा मनोरंजक विषय ठरावा. पुरातनकाळातल्या कोठल्या कथेत अशा अर्थाचे उल्लेख ऐकल्याचे मला आठवत नाही. हा कार्यक्रम चाललेला असतांना भटजीबुवा बहुधा विश्रांती घेत असतात आणि त्यांच्या जागेवर स्थानापन्न असले तरी ते त्या अर्थाचे कसलेही मंत्र त्या वेळी म्हणत नाहीत. त्यामुळे माझ्या कल्पनेप्रमाणे हा धार्मिक विधी नव्हता. बहुधा प्राचीन काळात आहेराची प्रथा नसावी. मुंज या व्यक्तिगत आणि धार्मिक विधीला जेंव्हा समारंभाचे स्वरूप प्राप्त झाले त्या वेळेला त्यात आहेराचा समावेश झाला असावा. शंभर दोनशे वर्षापूर्वीच्या काळात आपल्याकडे धान्यादि खाद्यवस्तूंची सुबत्ता होती पण इतर खर्चासाठी रोकड रकम सहजासहजी पाहिजे तेवढी उपलब्ध होत नसे. त्या काळात एक मोठा समारंभ साजरा करण्यासाठी कुटुंबप्रमुखाला जो खर्च येत असे त्याचा भार थोडा कमी करण्याच्या उद्देशाने इतर आप्तजन समारंभाच्या सुरुवातीलाच आहेराच्या रूपाने त्यातला अल्पसा वाटा उचलत असावेत असा माझा अंदाज आहे. त्याखेरीज दीर्घकाल आपली आठवण रहावी म्हणून कांही टिकाऊ स्वरूपाची भेट देण्यासाठी हे एक चांगले निमित्य मिळायचे. आता त्याचे स्वरूप इतके बदलले आहे की त्यातला आनंदाचा भाग कमी होत चालला आहे आणि त्यावरून एकमेकांशी तुलना, मान अपमान, गैरसमज वगैरे गोष्टी होऊ लागल्या आहेत. शिवाय जरूरी किंवा उपयुक्त नसलेल्या ढीगभर वस्तूंचे काय करायचे हा प्रश्न उभा राहतो आणि अशा अनावश्यक वस्तूंची अखेर नासाडी होते. त्यामुळे “आपण फक्त आपल्या शुभेच्छा द्याव्यात.” अशी विनंती करण्याची नवी पद्धत आजकाल रूढ होऊ लागली आहे ती स्तुत्य वाटते.

आहेराचा कार्यक्रम आटोपल्यानंतर भोजनाचा बेत होता. पुण्यामुंबईच्या कार्यालयांमध्ये ठरलेल्या वेळेच्या आधीच सगळे अन्नपदार्थ तयार असतातच, शिवाय टेबलखुर्च्या, ताटवाट्या वगैरे सारी जय्यत तयारी असते. जेवण सुरू करण्याचा इशारा मिळाला की लगेच ते सुरू करता येते. पण मध्यप्रदेशातल्या त्या लहान गांवात असे संपूर्ण कामाचे कंत्राट दिलेले नव्हते. कार्यालय म्हणजे फक्त चार भिंतींनी बंदिस्त असा हॉल होता. त्यात बसण्यासाठी खुर्च्या, गाद्या, जाजमे वगैरे वेगळी भाड्याने आणली होती. त्याचप्रमाणे स्वयंपाकासाठी लागणारी मोठी घमेली, कढया, झारे, शेगड्या तसेच जेवणासाठी ताटे, वाट्या , भांडी वगैरे सगळे सामान टेंटहाऊसमधून मागवले होते. स्वयंपाक करणारे आचारी आरामात उशीराने आले ते सुद्धा रिकाम्या हाताने. आल्यावर त्यांनी एकेक गोष्ट मागायला सुरुवात केली. मोठमोठी भांडी कार्यालयात आणतांना पोळपाट, लाटणी, चिमटा, काडेपेटी, केरसुणी असल्या क्षुल्लक वस्तूंकडे कोणी लक्ष दिले नव्हते. एकेक करून लागतील तशा त्या आणून पुरवल्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात झाली.

त्या दिवशी फक्त घरची मंडळी आणि परगांवाहून आलेले निकटवर्ती आप्तेष्ट एवढेच लोक तेथे होते आणि सकाळपासून फराळ चाललेलाच असल्यामुळे कोणाला जेवणाची इतकी घाई नव्हती. त्या दिवशी दुसरा कोणता कार्यक्रम नव्हता. आम्हाला तर जेवण झाल्यावर ताणूनच द्यायची होती. त्यामुळे जेवणाला उशीर झाल्याने विशेष फरक पडत नव्हता. पण स्थानिक मंडळींना दुसरे दिवशीच्या कार्याची भरपूर तयारी करायची होती. बाहेरून आलेल्या मंडळींना कसलीच स्थानिक माहिती नसल्यामुळे या कामात त्यांचा फारसा उपयोग होण्यासारखा नव्हता. संपूर्ण कंत्राट देणे आणि प्रत्येक गोष्टीची जुळवाजुळवी करणे यातला फरक जाणवत होता. अखेर भोजनाचा कार्यक्रम आटोपला. या वेळेस नेमकी कडाक्याच्या थंडीची लाट आलेली असल्यामुळे बोचरे वारे अंगावर घेऊन बाहेर जाऊन फिरण्याचे धाडस करावेसे वाटत नव्हते. त्यामुळे सृष्टीसौंदर्य वगैरे पहाण्याचा मोह कोणाला झाला नाही. हॉलमध्येच गाद्या अंथरून त्यावर लोळत पडल्या पडल्या गप्पा रंगल्या. वेगवेगळ्या गांवाहून आलेल्या पाहुण्यांची चौकशी करून झाली. कांही जुन्या ओळखी जाग्या झाल्या. त्यातून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. कांही नव्या ओळखीही झाल्या. आता कोण कोण कुठे कुठे काय काय करताहेत वगैरेची खबरबात आणि त्यांच्या भविष्यकाळातल्या योजना वगैरे माहितीची देवाण घेवाण झाली. यासाठीच तर आम्ही इतक्या दूर तेथे गेलो होतो!

दुपारची जेवणे होताहोताच सायंकाल झाला होता. त्यामुळे रात्री कोणाला भूक नव्हतीच. थोडेसे अन्न पोटात ढकलून पुन्हा मैफल जमली. त्यात उत्स्फूर्तपणे विविधगुणदर्शनाचे कार्यक्रम झाले. गाणी, नकला, विडंबन, टवाळकी वगैरे सगळ्या प्रकारांनी तो चांगला रंगला. झोपी गेलेली माणसेसुद्धा जागी होऊन उठून बसली आणि त्यात भाग घेऊ लागली. अखेर दुसरे दिवशी लवकर उठायचे आहे याची आठवण करून दिल्यानंतर तो आटोपता घ्यावा लागला.

(क्रमशः)

————-