संत एकनाथांच्या कथा आणि रचना

Eknath

“दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई।।”
“नणंदेचं कारटं किरकिर करतं, खरूज होई दे त्याला। सत्वर पाव गं मला, भवानी आई, रोडगा वाहिन तुला ।।”
“विंचू चावला, विंचू चावला, काय मी करू? कुणाला सांगू?”
“वारियाने कुंडल हाले, डोळे मोडित राधा चाले ।।”
वरील रचना एका महान संताने लिहिल्या असतील असे या ओळी वाचून कदाचित कोणाला वाटणार नाही. पण ज्या संताने त्या ओळी रचलेल्या आहेत, त्यांचे नांव संत एकनाथ! सोळाव्या शतकात होऊन गेलेल्या एकनाथ महाराजांनी लोकांना आवडतील, त्यांच्या सहज लक्षात राहतील असे आकर्षक मुखडे रचून पुढे त्या कवनांमध्ये अध्यात्माचे दर्शन घडवले आहे. उदाहरणार्थ याच भारुडांच्या खालील ओळी पहा.
“एका जनार्दनी समरस झाले, पण तो रस येथे न्हाई । मला दादला नको ग बाई !”
“कामक्रोध विंचू चावला । तम आंगासी आला ॥ ….ह्या विंचवाला उतारा । तमोगुण मागें सारा । सत्वगुण लावा अंगारा । विंचु इंगळी उतरे झरझरा ॥सत्य उताऱ्या येऊन । अवघा सारिला तमोगुण । किंचित राहिली फुणफुण । शांत केली जनार्दनीं ॥”
संत एकनाथांनी फक्त भारुडांचीच रचना केली नाही, त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा अपार आहे, पण त्यांनी रचलेली भारुडे इतकी अप्रतिम आहेत की चारशे वर्षांनंतर आजसुध्दा ती लोकांना भुरळ पाडतात आणि भारुड म्हंटल्यावर सर्वात आधी एकनाथांचेच नांव डोळ्यासमोर येते.
संत एकनाथांनी लिहिलेले “माझे माहेर पंढरी। आहे भीवरेच्या तीरी ।।”, आणि “काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल। ” हे अभंग पं.भीमसेन जोशी यांच्या अभंगवाणीमधले प्रमुख अभंग आहेत. श्री.राम फाटक यांनी त्यांना अप्रतिम चाली लावून संगीतबध्द केले आहे. नव्या पिढीतले संगीत दिग्दर्शक श्रीधर फडके आणि गायक सुरेश वाडकर यांनी मिळून तयार केलेल्या ध्वनिफितीमध्ये “ॐकार स्वरूपा, सद्गुरू समर्था, अनाथाच्या नाथा, तुज नमो”, “गुरु परमात्मा परेशु”, “रुपे सुंदर सावळा गे माये”, ” माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद”, “येथोनी आनंदू रे आनंदू, कृपासागर तो गोविंदू रे” हे अत्यंत अर्थपूर्ण अभंग आहेत. अलीकडच्या काळात निघालेल्या उत्कृष्ट ध्वनिफितींमध्ये या ध्वनिफितीचा उल्लेख होतो. या अभंगातील शब्दरचना पाहताच सुंदर सोप्या शब्दात उपमा, रूपक आदि अलंकारांचा उपयोग करून त्यांनी भक्तीमार्गाचे सुगम तत्वज्ञान किती सुरेख मांडले आहे हे ध्यानात येईल.
संत एकनाथ हे संस्कृत भाषेचे आणि त्यातील धर्मशास्त्रांसंबंधित ग्रंथांचे प्रकांड पंडित होते, पण त्यांनी संत ज्ञानेश्वरांकडून प्रेरणा घेऊन ते ज्ञान मराठी भाषेत आणण्याचा भरपूर प्रयत्न केला. अठरा हजार आठशे ओव्या रचून त्यांनी भागवत पुराणच मराठी भाषेत आणले. ते एकनाथी भागवत या नांवाने प्रसिध्द आहे. गोष्टीरूप असल्यामुळे तो खूप लोकप्रिय आहे आणि त्याची पारायणे नियमितपणे जागोजागी होत असतात. त्यांनी भावार्थ रामायणाच्या २५००० ओव्या रचल्या होत्या. तरीही ते काम अपूर्ण राहिल्यामुळे त्यांच्या शिष्याने ते पुरे केले. या खेरीज त्यांनी रुक्मिणी स्वयंवर, प्रल्हाद विजय, आनंदलहरी वगैरे अनेक रचना करून ठेवल्या आहेत.
सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या भावार्थ दीपिकेत, म्हणजे आज ज्ञानेश्वरी या नांवाने ओळखल्या जाणाऱ्या ग्रंथात अनेक पाठभेद निर्माण झाले होते. एका हस्तलिखित पोथीवरून दुसरी पोथी लिहितांना त्यात चुका झाल्या होत्या आणि ज्ञानेश्वरांच्या नांवाने त्या पुढच्या पिढीला दिल्या जात होत्या. संत एकनाथांसारखा विद्वानच अधिकारवाणीने त्या दुरुस्त करू शकत होता. एकनाथांनी त्या ग्रंथांच्या प्रतींचे अतिशय काळजीपूर्वक वाचन करून एक निर्दोष प्रत तयार केली आणि तिला प्रमाणग्रंथ समजून यापुढे तिच्याच प्रती काढल्या जाव्यात यासाठी तिचा प्रचार केला. संत एकनाथांच्या प्रयत्नांमुळेच संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेले गीताज्ञान पुढील काळातील जनतेपर्यंत शुध्द रूपात पोचायला मदत झाली.

संत एकनाथांच्या जीवनाबद्दल खूप कांही सांगण्यासारखे आहे ते पुढील भागात लिहीन. आज एकनाथषष्ठी या त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना शतशः साष्टांग दंडवत.
—————————-

संत एकनाथांच्या गोष्टी

संत एकनाथांचा जन्म पैठण या प्राचीन काळापासून प्रसिध्द असलेल्या नगरीत झाला आणि त्यांचे बहुतेक सारे जीवन त्याच गांवात व्यतीत झाले. त्यांनी देवगिरी येथील जनार्दन स्वामींचे शिष्यत्व पत्करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मशास्त्रांचा अभ्यास केला. पुरातन धर्मग्रंथांचे अध्ययन केल्यानंतर मानवता आणि बंधुभाव हेच धर्माचे सार असल्याचे त्यांना जाणवले. आपल्या विविध रचनांमधून त्यांनी हे खुबीने मांडले तर आहेच, पण “जे जे देखिले भूत, तयासी मानि़जे भगवंत” या तत्वाचे त्यानी स्वतःच्या आचरणात पालन केले. यासंबंधी एक अशी आख्यायिका आहे.

एकदा संत एकनाथ काशीहून गंगेच्या पाण्याने भरलेली कावड घेऊन रामेश्वराच्या यात्रेला निघाले होते. तत्कालिन प्रथेनुसार त्यातले गंगाजल रामेश्वरावर वाहिल्यानंतर त्यांच्या तीर्थयात्रेची सांगता होणार होती. पण वाटेतच एका जागी त्यांना तहानेने आसुसलेले एक गाढव मरणोन्मुख अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेले दिसले. महत्प्रयासाने काशीहून जपून आणलेले गंगाजल त्यांनी सरळ त्या गाढवाच्या तोंडात ओतून त्याचे प्राण वाचवले. रामेश्वराला गंगाजलाने अभिषेक करून स्वतःसाठी पुण्य मिळवण्यापेक्षा त्या तृषार्त गाढवाचे प्राण वाचवणे हे जास्त महत्वाचे धार्मिक कार्य आहे असे त्यांना वाटले.

संत एकनाथांनी माणसांमाणसात भेदभाव केला नाही. एकदा एक माणूस नदीच्या पाण्यात वाहून जात असल्याचे पाहताच त्यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता पूर आलेल्या नदीत उतरून त्या माणसाला ओढून बाहेर काढले, पण या चांगल्या कृत्याची प्रशंसा करण्याऐवजी त्यांनी एका अस्पृश्याला स्पर्श केल्यामुळे त्यांना विटाळ झाला असे म्हणून त्या काळातल्या तथाकथित पुढारलेल्या समाजाने त्यांना वाळीत टाकले. संत एकनाथांनी यासाठी प्रायश्चित्त घेऊन शुध्दीकरण करून घ्यावे असा दबाव त्यांच्यावर आणला, पण त्यांनी त्याला जुमानले नाही. यामुळे चिडून त्यांनी एकनाथांचा छळ सुरू केला. रोज सकाळी उठल्यावर आधी गोदावरीत स्नान करून देवपूजा करण्याचा त्यांचा नेम होता. त्यानुसार ते आंघोळ करून घरी परतत असतांना कांही समाजकंटकांनी त्यांच्या अंगावर घाण टाकली. ते शांतपणे परत नदीवर गेले आणि स्वच्छ स्नान करून देवाची स्तोत्रे म्हणत घराकडे फिरले. त्या दुष्ट लोकांनी पुन्हा त्यांच्या अंगावर घाण टाकली, एकनाथ पुन्हा स्नान करून परत आले असेच खूप वेळ चालत राहिले. अखेर ते लोक कंटाळून निघून गेले, पण एकनाथांनी त्यांच्याबरोबर भांडणही केले नाही की त्यांना शिव्याशापही दिले नाहीत. हा प्रकार समजल्यानंतर एकनाथांच्या चाहत्यांनी त्यांची विचारपूस करतांच त्यांनी त्या लोकांना सांगितले, “अहो, यांच्या कृत्यामुळे आज मला अनायासे उपवास घडला, माझे अनेक वेळा गोदावरीत स्नान झाले आणि माझा इतका वेळ परमेश्वराच्या नामस्मरणात गेला, त्यांचे माझ्यावर उपकारच आहेत, मी कशाला त्यांच्यावर राग धरू?”

संत एकनाथांवर घातलेल्या गेलेल्या सामाजिक बहिष्कारामुळे त्यांचा नोकर त्यांच्या घरी येईनासा झाला. तेंव्हा प्रत्यक्ष भगवान विठ्ठल श्रीखंड्या हे नांव घेऊन त्यांच्या घरी कामाला येऊन राहिले. एकनाथांना आपल्या स्वतःच्या सेवेसाठी नोकर नकोच होता, पण वयोमानामुळे रोजच्या रोज देवपूजेसाठी चंदनाचे खोड सहाणेवर उगाळून गंध तयार करणे त्यांना झेपत नव्हते, त्यामुळे एवढे काम त्यांनी श्रीखंड्याला करायला सांगितले. म्हणजे विठ्ठलाच्या मूर्तीवर चंदनाचे विलेपन करण्यासाठी स्वतः विठ्ठलच एका मुलाच्या रूपात एकनाथांच्या घरी येऊन सहाणेवर चंदनाचे खोड घासत राहिले होते.

संत ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे जीवंत समाधी घेतल्यानंतर त्या खोलीचा बंद दरवाजा उघडण्याचे धैर्य कोणीही कधीही केले नव्हते. आजसुध्दा कोणी ते करत नाही. पण त्या भूमीवर उगवलेल्या एका वृक्षाची मुळे खोलवर गेली आहेत आणि त्यांनी समाधिस्थ ज्ञानेश्वरांच्या गळ्याभोंवती फास आवळला आहे असा दृष्टांत संत एकनाथांना झाला. ते त्वरित आळंदीला गेले. कोणाच्या विरोधाची पर्वा न करता त्यांनी ज्ञानेश्वर जिथे समाधिस्थ झाले होते त्या खोलीचे कवाड उघडले आणि ज्ञानेश्वरांच्या गळ्याभोंवती वाढलेल्या मुळ्या छाटून दूर केल्या अशी आख्यायिका आहे. माझ्या तर्काप्रमाणे ज्ञानेश्वरीमध्ये घुसलेल्या चुका काढून टाकून तिचे शुध्द स्वरूप त्यांनी पुन्हा समाजापुढे आणले ही गोष्टच या रूपकातून व्यक्त होते. संस्कृत भाषेत लिहिलेल्या भगवद्गीतेवर भावार्थदीपिका लिहून संत ज्ञानेश्वरांनी ती मराठीत आणली होती. संत एकनाथांनी त्यातले तत्वज्ञान अधिक सोपे करून सामान्य लोकांमध्ये त्याचा प्रसार केला.
———————————

संत एकनाथांच्या रचना

संत बहिणाबाईंनी आपल्या प्रसिध्द अभंगात म्हटले आहे,
संतकृपा जाली | इमारत फळा आली ।।
ज्ञानदेवें रचिला पाया | उभारिले देवालया ।। नामा तयाचा किंकर | तेणे रचिले तें आवार ।।
जनार्दन एकनाथ | खांब दिधला भागवत ।। तुका जालासे कळस | भजन करा सावकाश ।।

ज्ञानेश्वर, नामदेव आणि तुकाराम या संतश्रेष्ठांच्या समवेत संत बहिणाबाईंनी या यादीमध्ये संत एकनाथांचाही समावेश केला आहे. एकनाथ हे भागवत सांप्रदायाच्या किंवा वारकरी पंथाच्या इमारतीतले स्तंभ आहेत. ‘ओवी ज्ञानेशाची’ आणि ‘अभंगवाणी प्रसिध्द तुकयाची’ हे पद्यांच्या त्या दोन वृत्तांमधले (गेल्या कित्येक शतकांमधले) सर्वश्रेष्ठ साहित्य म्हणून नावाजले गेले आहे. संत नामदेव विठ्ठलाचा अत्यंत लाडका भक्त होता. विठ्ठलावरील त्यांच्या प्रेमाचे दर्शन अनेक आख्यायिकांमधून होतेच, त्यांच्या अभंगामधून ते प्रतीत होते. शीखांच्या गुरू ग्रंथसाहेबामध्ये नामदेवांच्या काही रचना दिल्या आहेत. या तीन संतश्रेष्ठांच्या मानाने संत एकनाथ किंचित कमी प्रसिध्द असतील, पण त्यांनी केलेल्या रचनासुध्दा आजही खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या रचनांमधील विविधता हे त्यांचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल.

संस्कृत भाषेमध्ये असलेली भगवद्गीता लोकांना समजावी म्हणून संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेत लिहिलेली ज्ञानेश्वरीसुध्दा तात्विक दृष्ट्या फार उच्च पातळीवर आहे. संत तुकाराम आणि संत नामदेव महाराजांचे अभंग सर्वसामान्य लोकांच्या ओठावर सहज बसावेत असे सोपे आणि सुंदर आहेत. संत एकनाथ महाराजांनी ओवीबध्द ग्रंथरचना केली, भजनामध्ये गायिले जाणारे अभंग लिहिले, त्याशिवाय मनोरंजक अशी भारुडे, गवळणी वगैरे लिहिल्या. घरातल्या देव्हाऱ्यासमोर बसून ज्ञानी पंडित लोकांनी वाचावे असे आध्यात्मिक वाङ्मय, ओसरीवर बसून श्रोत्यांना वाचून ऐकवण्यासाठी पोथ्या, देवळातल्या सभामंटपात भक्तजनांनी टाळमृदुंगाच्या साथीवर भजन करतांना म्हणावेत असे भक्तीपूर्ण आणि रसाळ अभंग आणि लोकगीतांच्या मंचावर शाहीरांनी डफ झांज आणि तुणतुण्याच्या साथीने गाव्यात अशी भारुडे, गवळणी वगैरे अशा विविध जागी संत एकनाथांच्या रचना ऐकायला मिळतात. त्याशिवाय गेल्या शतकातल्या मान्यवर संगीत दिग्दर्शकांनी संत एकनाथांच्या रचनांना सुमधुर चाली लावून त्या दृक्श्राव्य माध्यमांमधून घराघरात पोचवल्या आहेत. अशा काही अत्यंत लोकप्रिय रचना या लेखात दिल्या आहेत.

संतांच्या जीवनावरील चित्रपटांमध्ये त्यांच्या सोज्ज्वळ भूमिका साकारणाऱ्या विष्णुपंत पागनीस या गायक नटाच्या आवाजातले हे गीत किती मनोरंजकसुध्दा आहे पहा. देवाबरोबर इतकी सलगी साधून बोलणारे एकनाथ लटक्या तक्रारीच्या सुरात सांगतात.

असा कसा देवाचा देव बाई ठकडा । देव एका पायाने लंगडा ॥१॥
शिंकेचि तोडितो मडकेचि फोडितो । करी दही-दुधाचा रबडा ॥२॥
वाळवंटी जातो कीर्तन करितो । घेतो साधुसंतांसि झगडा ॥३॥
एका जनार्दनी भिक्षा वाढा बाई । देव एकनाथाचा बछडा ॥४॥

कवी जयदेव आणि सूरदास यांनी राधाकृष्णामधील मधुरा भक्तीवर केलेल्या अनेक गीतरचना लोकप्रिय आहेत. मराठी भाषेत याबद्दल काव्य करणारे संत एकनाथच लगेच डोळ्यासमोर येतात. संगीतकार स्नेहल भाटकर यांनी स्वरबध्द केलेली ही दोन गीते अजरामर झाली आहेत. पहिल्या गीतात ते राधेच्या भूमिकामधून अलगदपणे एकनाथांच्या भूमिकेत जातात.
कशि जाऊ मी वृंदावना । मुरली वाजवी ग कान्हा ॥धॄ॥
पैलतिरी हरि वाजवी मुरली । नदि भरली यमुना ॥१॥
कासे पीतांबर कस्तुरी टिळक । कुंडल शोभे काना ॥२॥
काय करू बाई कोणाला सांगूं । नामाची सांगड आणा ॥३॥
नंदाच्या हरिने कौतुक केले । जाणे अंतरिच्या खुणा ॥४॥
एका जनार्दनी मनी म्हणा । देवमहात्म्य कळेना कोणा ॥५॥

दुसऱ्या गाण्यामध्ये राधा आणि कृष्ण या दोघांचेही देहभान हरपल्यामुळे ते कसे वेडेवाकडे चाळे करत आहेत असे सांगता सांगता एकनाथ महाराज स्वतःच देवाशी एकरूप होतात.
वारियाने कुंडल हाले, डोळे मोडित राधा चाले ।।
राधा पाहून भुलले हरी, बैल दुभवी नंदाघरी ।।
फणस जंबिर कर्दळी दाटा । हाति घेऊन नारंगी फाटा ।।
हरि पाहून भुलली चित्‍ता । राधा घुसळी डेरा रिता ।।
ऐसी आवडी मिनली दोघा । एकरूप झाले अंगा ।।
मन मिळालेसे मना । एका भुलला जनार्दना ।।

आर. एन्‌. पराडकर या गायकाच्या प्रसिध्द भक्तीगीतांमधले संत एकनाथांचे हे गाणेसुध्दा राधाकृष्णाच्या प्रीतीबद्दलच आहे.
नको वाजवू श्रीहरी मुरली ।
तुझ्या मुरलीने तहान-भूक हरली रे ।।
खुंटला वायुचा वेग, वर्षती मेघ, जल स्थिरावली ।।
घागर घेऊन पाणियासी जाता, डोईवर घागर पाझरली ।।
एका जनार्दनी पूर्ण कृपेने, राधा गौळण घाबरली ।।

बाळकृष्णाने आपल्या बासरीमधल्या जादूने सर्व चराचराला कशी मोहिनी घातली होती याचे सुंदर वर्णन या गीतात आहे.
भुलविले वेणुनादे । वेणु वाजविला गोविंदे ॥१॥
पांगुळले यमुनाजळ । पक्षी राहिले निश्र्चळ ॥२॥
तृणचरे लुब्ध झाली । पुच्छ वाहुनिया ठेली ॥३॥
नाद न समाये त्रिभुवनी । एका भुलला जनार्दनी ॥४॥

भारतरत्न स्व.पं. भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेल्या या अभंगाची संगीतरचना राम फाटक यांनी केली आहे.
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल । नांदतो केवळ पांडुरंग ॥१॥
भाव-भक्‍ति भीमा उदक ते वाहे । बरवा शोभताहे पांडुरंग ॥२॥
दया क्षमा शांती हेचि वाळुवंट । मिळालासे थाट वैष्णवांचा ॥३॥
ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद । हाचि वेणुनाद शोभतसे ॥४॥
दश इंद्रियांचा एक मेळ केला । ऐसा गोपाळकाला होत असे ॥५॥
देखिली पंढरी देहीं-जनी-वनीं । एका जनार्दनी वारी करी ॥६॥

किशोरी आमोणकर या शास्त्रीय संगीतामधील श्रेष्ठ गायिकेने थोडी सुगम संगीतातली गीते दिली आहेत यातले एक प्रसिध्द गीत संत एकनाथांच्या रचनांमधून घेतले आहे. पं. रघुनंदन पणशीकर यांनी या गीतात किशोरीताईंना आवाजाची साथ दिली आहे.
कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल । कानडा विठ्ठल विटेवरी ॥१॥
कानडा विठ्ठल नामें बरवा । कानडा विठ्ठल हृदयीं घ्यावा ॥२॥
कानडा विठ्ठल रूपे सावळां । कानडा विठ्ठल पाहिला डोळां ॥३॥
कानडा विठ्ठल चंद्रभागे तटी । कानडा विठ्ठल पहावा उठाउठी ॥४॥
कानडा विठ्ठल कानडा बोले । कानड्या विठ्ठलें मन वेधियेलें ॥५॥
वेधियेलें मन कानड्यानें माझें । एका जनार्दनीं दुजें नाठवेचि ॥६॥

या दोन श्रेष्ठ गायकांच्या नंतर आलेल्या पिढीमधील संगीतकार श्रीधर फडके आणि स्वराची देणगी लाभलेले आजचे आघाडीचे गायक सुरेश वाडकर यांनी तयार केलेल्या आल्बममध्ये त्यांनी संत एकनाथांचे अभंग घेतले आहेत.
गुरु परमात्मा परेशु । ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ॥१॥
देव तयाचा अंकिला । स्वये संचरा त्याचे घरा ॥२॥
एका जनार्दनी गुरुदेव । येथें नाही बा संशय ॥३॥

माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद ॥१॥
तेणो देह ब्रम्हरूप गोविंद, नित्य गोविंद ।
नि जसे रामरूप, नित्य गोविंद ॥२॥
तुटेल सकळ उपाधी, निरसेल आधी व्याधी ।
निरसेल गोविंद, नित्य गोविंद ॥३॥
गोविंद हा जनी-वनी ।
म्हणे एका जनार्दनी ॥४॥

येथोनी आनंदू रे आनंदू । कृपासागर तो गोविंदू रे ॥१॥
महाराजाचे राऊळी । वाजे ब्रम्हानंद टाळी ॥२॥
लक्ष्मी चतुर्भुज झाली । प्रसाद घेऊन बाहेर आली ॥३॥
एका जनार्दनी नाम । पाहता मिळे आत्माराम ॥४॥

रुपे सुंदर सावळा गे माये ।
वेणु वाजवी वृंदावना गोधने चारिता ॥१॥
रुणझुण वाजवी वेणु ।
वेधी वेधले आमुचे तनमनु ओ माये ॥२॥
गोधने चारी हाती घेऊन काठी ।
वैकुंठीचा सुकुमार गोपवेषे जगजेठी ।
वैकुंठीचा सुकुमार गोधने चारीताहे ॥३॥
एका जनार्दनी भुलवी गौळणी ।
करीती तनुमनाची वोवाळणी वो माये ॥४॥

ॐकार स्वरूपा, सद्गुरू समर्था ।
अनाथाच्या नाथा, तुज नमो ।
तुज नमो, तुज नमो, तुज नमो ॥१॥
नमो मायबापा, गुरुकृपाघना ।
तोडी या बंधना मायामोहा ।
मोहोजाळ माझे कोण नीरशील ।
तुजविण दयाळा सद्गुरुराया ॥२॥
सद्गुरुराया माझा आनंदसागर ।
त्रैलोक्या आधार गुरुराव ।
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश ।
ज्यापुढे उदास चंद्र-रवी ।
रवी, शशी, अग्‍नि, नेणति ज्या रूपा ।
स्वप्रकाशरूपा नेणे वेद ॥३॥
एका जनार्दनी गुरू परब्रम्ह ।
तयाचे पैनाम सदामुखी ॥४॥
ॐकार स्वरूपा या गाण्याने तर एका काळात लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. आजही हे गाणे निरनिराळ्या कार्यक्रमांमधून, अगदी नृत्यामधूनसुध्दा सादर केले जातांना दिसते.

उपहास आणि विनोदामधून परमार्थाचा मार्ग दाखवता येतो यावर कदाचित विश्वास बसणार नाही, पण संत एकनाथ महाराजांनी पाचशे वर्षांपूर्वी रचलेल्या भारुडांमधून हे काम करून ठेवले आहे. शाहीर साबळे यांनी त्यांच्या काही भारुडांना आकर्षक चाली लावून आणि आपल्या बुलंद आवाजात गाऊन ‘भारुड’ या लोकगीताच्या प्रकारालाच एक महत्वाचे स्थान मिळवून दिले आहे. ‘विंचू चावला’ या सर्वात जास्त लोकप्रिय भारुडामध्ये त्यांनी ‘अगगगगग, देवा रे देवा, काय मी करू’ वगैरे बरीचशी पदरची भर घालून त्याला अधिक उठाव आणला आणि काँटेंपररी बनवले असले तरी एकनाथ महाराजांची मूळ शब्दरचना तशीच राखली आहे. मूळ भारुड खाली दिले आहे. काम, क्रोध इत्यादि तमोगुणांचा विंचू चावल्यामुळे शरीराची (खरे तर मनाची) आग आग झाली. तिला शांत करायचे असेल तर वाईट गुण सोडून सद्गुणांची कास धरावी, त्यातून मनःशांती मिळेल असे या भारुडात सांगितले आहे.
विंचू चावला वृश्चिक चावला । कामक्रोध विंचू चावला । तम घाम अंगासी आला ॥धृ॥
पंचप्राण व्याकुळ झाला । त्याने माझा प्राण चालिला । सर्वांगाचा दाह झाला ॥१॥
मनुष्य इंगळी अति दारुण । मज नांगा मारिला तिने । सर्वांगी वेदना जाण । त्या इंगळीची ॥२॥
ह्या विंचवाला उतारा । तमोगुण मागे सारा । सत्वगुण लावा अंगारा । विंचू इंगळी उतरे झरझरा ॥३॥
सत्व उतारा देऊन । अवघा सारिला तमोगुण । किंचित् राहिली फुणफुण । शांत केली जनार्दने ॥४॥

माणसाच्या अंगातले (मनातले) काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षड्रिपू त्याचा ताबा घेतात, त्याच्यावर सत्ता गाजवतात, त्यांच्या तालावर नाचवतात हे संत एकनाथांनी सासरच्या घरात सुनेवर सत्ता गाजवणाऱ्या किंवा सासुरवास करणाऱ्या नातेवाईकांच्या रूपकामधून सुरेख मांडले आहे. यांच्या जाचामध्ये माणूस इतका गुरफटून जातो की त्याला देवाचे स्मरण करायला भान आणि वेळच उरत नाही. त्यामुळे या सगळ्यांना बाजूला करून मला एकटेच राहू दे, म्हणजे मी तुझी भक्ती करू शकेन असे खाली दिलेल्या भारुडात भवानी आईला सांगून तिला साकडे घातले आहे.

सत्वर पाव गे मला । भवानीआई रोडगा वाहिन तुला ॥१॥
सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥२॥
सासू माझी जाच करती । लवकर निर्दाळी तिला ॥३॥
जाऊ माझी फडफड बोलती । बोडकी कर ग तिला ॥४॥
नणंदेचे पोर किरकिर करिते । खरूज होऊ दे त्याला ॥५॥
दादला मारुन आहुती देईन । मोकळी कर गे मला ॥६॥
एकाजनार्दनी सगळेचि जाऊं दे । एकटीच राहू दे मला ॥७॥

अशाच प्रकारच्या भावना वेगळ्या रूपकामधून खाली दिलेल्या भारुडात व्यक्त केल्या आहेत. आपल्याला हतबल करणाऱ्या, परमेश्वरापासून दूर ठेवणाऱ्या परिस्थितीला यात दादला म्हणजे नवरा असे संबोधून तो नको असे म्हंटले आहे. ईश्वरासी समरस होण्यासाठी या दादल्याच्या तावडीमधून सुटायला पाहिजे असे ते सांगतात.
मोडकेंसे घर तुटकेसे छप्पर । देवाला देवघर नाही ॥१॥
मला दादला नलगे बाई ॥धृ॥
फाटकेच लुगडे तुटकीसी चोळी । शिवाया दोरा नाही ॥२॥
जोंधळ्याची भाकर आंबाडयाची भाजी । वर तेलाची धार नाही ॥३॥
मोडका पलंग तुटकी नवार । नरम बिछाना नाही ॥४॥
सुरतीचे मोती गुळधाव सोने । रांज्यात लेणे नाही ॥५॥
एकाजनार्दनी समरस झाले । तो रस येथे नाही ॥६॥

खाली दिलेल्या भारुडात संत एकनाथांनी तत्कालिन समाजामधील लुच्चेपणावर सणसणीत कोरडे ओढले आहेत, पण हे आजच्या सामाजिक परिस्थितीलाच उद्देशून लिहिले असावे असे वाचतांना आपल्याला वाटते. याचा अर्थ असा की पाचशे वर्षांपूर्वीची माणसेसुध्दा आतापेक्षा फारशी वेगळी नसावीत. त्यांनी कोणता अविचार किंवा हावरेपणा करू नये हे संत एकनाथ सांगतात, याचाच अर्थ त्यांच्या अवती भंवती वावरणारी माणसे तशी स्वार्थबुध्दीने नेहमी वागत असावीत असा होतो. विवेक आणि संयम बाळगण्याबद्दल सगळे सांगून झाल्यावर अखेरीस ते पुन्हा अध्यात्माच्या मुख्य मुद्द्यावर येतात आणि ‘असा कोणाला दाखवण्यातून देव दिसत नसतो, त्याला ज्याने त्याने अंतरात (गुप्तपणे) ओळखायचे असते’ हे सांगतात. यातल्या अनेक ओळी आतापर्यंत म्हणी किंवा वाक्प्रचार झाल्या आहेत.

अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।
आले संत घरी तरी काय बोलुन शिणवावे ?
ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे?
प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे?
गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे?
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।
देव अंगी आला म्हणून काय भलतेच बोलावे?
चंदन शीतळ झाले म्हणून काय उगळुनिया प्यावे?
भगवी वस्‍त्रे केली म्हणून काय जगच नाडावे?
आग्या विंचू झाला म्हणून काय कंठीच कवळावे ?
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।
परस्‍त्री सुंदर झाली म्हणून काय बळेची ओढावी?
सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी?
मखमली पैजार झाली म्हणून काय शिरीच बांधावी?
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना।।
सद्‌गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा?
नित्य देव भेटला म्हणून काय जगाशी दावावा?
घरचा दिवा झाला म्हणून काय आढ्याशी बांधावा ?
एका जनार्दनी म्हणे हरी हा गुप्तची ओळखावा ?
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।

एकाद्या माणसाला भुताने पछाडले की तो भान हरपलेल्या वेड्यासारखे वागायला लागतो. परमेश्वराचा ध्यास लागल्यानेसुध्दा कोणाकोणाची अशीच अवस्था कशी झाली हे त्यांनी ‘भूत’ या भारुडामध्ये मनोरंजक पध्दतीने दाखवले आहे. त्यातसुध्दा अखेरच्या ओळीमध्ये हे भूत (परमेश्वर) जगात सर्वत्र भरलेले आहे अशी त्याची खूण सांगितली आहे.
भूत जबर मोठे ग बाई । झाली झडपड करु गत काई ॥१॥
सूप चाटूचे केले देवऋषी । या भूताने धरिली केशी ॥२॥
लिंबू नारळ कोंबडा उतारा । त्या भूताने धरिला थारा ॥३॥
भूत लागले नारदाला । साठ पोरे झाली त्याला ॥४॥
भूत लागले ध्रूवबाळाला । उभा अरण्यात ठेला ॥५॥
एकाजनार्दनी भूत । सर्वांठायी सदोदित ॥६॥

एकनाथ महाराजांना या अजब भुताने भारलेले होतेच, त्यांनी स्वतःच ते कबूल केले आहे. त्यामुळे त्यांची दशासुध्दा इतरेजनांपेक्षा वेगळी झाली होती. ते सामान्य राहिले नव्हते. त्यांच्या असामान्यत्वाची ‘उलटी खूण’ ते या भारुडामध्ये दाखवतात. यातला गूढ अर्थ समजून घेणे मात्र तितके सोपे नाही.
नाथाच्या घरची उलटी खूण । पाण्याला मोठी लागली तहान ॥१॥
आंत घागर बाहेरी पाणी । पाण्याला पाणी आले मिळोनी ॥२॥
आजी म्या एक नवल देखिले । वळचणीचे पाणी आढ्या लागले ॥३॥
शेतकऱ्याने शेत पेरिले । राखणदाराला तेणे गिळिले ॥४॥
हांडी खादली भात टाकिला । बकऱ्यापुढे देव कापिला ॥५॥
एकाजनार्दनी मार्ग उलटा । जो तो गुरुचा बेटा ॥६॥

पूर्वीच्या काळात ज्योतिषांना ‘जोशी’ म्हणत असत. घरोघरी फिरून किंवा जो जो त्यांच्याकडे येईल त्याला त्याचे भविष्य सांगायचे काम ते करत असत. संत एकनाथांनी मात्र कोणालाही लागू पडेल असा एकच होरा सांगून ठेवला आहे. हे भविष्य खरे ठरण्यासाठी कुठल्याही ग्रहाची किंवा नक्षत्राची गरजही नाही किंवा त्यांची बाधाही होणार नाही. यातली मन आणि वासना यांची रूपके विचार करण्यासारखी आहेत.
मी आलो रायाचा जोशी । होरा ऐका दादांनो ॥धृ॥
तेथूनि पुढे बरे होईल । भक्‍तिसुखें दोंद वाढेल । फेरा चौऱ्यांशीचा चुकेल । धनमोकासी ॥१॥
मनाजी पाटील देहगांवचा । विश्वास धरु नका त्याचा । हा घात करील नेमाचा । पाडील फशी ॥२॥
वासना बायको शेजारीण । झगडा घाली मोठी दारूण । तिच्या पायी नागवण । घर बुडविसी ॥३॥
एकाजनार्दनी कंगाल जोशी । होरा सांगतो लोकांसी । जा शरण सद्‍गुरुसी । फेरा चुकवा चौऱ्यांयशी ॥४॥

‘बुरा मत सुनो, बुरा मत बोलो’ वगैरे आपण महात्मा गांधीजींच्या संदर्भात ऐकले आहे, पण पाचशे वर्षांपूर्वी संत एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या भारुडांमध्ये असे लिहिले आहे की ‘मी वाईट ऐकल्यामुळे बहिरा झालो आणि वाईट बोलल्यामुळे मुका झालो’. कान आणि जीभ असून त्यांचा चांगला उपयोग केला नाही तर ते नसल्यातच जमा नाही का? पण अखेरीस गेलेली वाचा आणि श्रवणशक्ती परत मिळवण्याचा मार्गही त्यांनी दाखवला आहे.

बहिरा झालो या या जगी ॥धृ॥
नाही ऐकिले हरिकीर्तन । नाही केले पुराण श्रवण । नाही वेदशास्त्र पठण । गर्भी बधिर झालो त्यागूने ॥१॥
नाही संतकीर्ती श्रवणी आली । नाही साधुसेवा घडियेली । पितृवचनासी पाठ दिधली । तीर्थे व्रते असोनि त्यागिली ॥२॥
माता माऊली पाचारिता । शब्द नाही दिला मागुता । बहिरा झालो नरदेही येता । एकाजनार्दनी स्मरेन आता ॥३॥

मुका झालो वाचा गेली ॥धृ॥
होतो पंडित महाज्ञानी । दशग्रंथ षड्‍शास्त्र पुराणी । चारी वेद मुखोद्‍गत वाणी । गर्वामध्ये झाली सर्व हानी ॥१॥
जिव्हा लांचावली भोजना । दुग्ध घृत शर्करा पक्वान्ना । निंदिले उपान्ना । तेणे पावलो मुखबंधना ॥२॥
साधुसंतांची निंदा केली । हरिभक्‍तांची स्तुती नाही केली । तेणे वाचा पंगू झाली । एकाजनार्दनी कृपा लाधली ॥३॥

‘अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम’ हाच सर्वधर्मसमभावाचा संदेश संत एकनाथांनी ‘फकीर’ या भारुडामध्ये कसा दिला आहे पहा.
हजरत मौला मौला । सब दुनिया पालनवाला ॥१॥
सब घरमो सांई बिराजे । करत है बोलबाला ॥२॥
गरीब नवाजे मै गरीब तेरा । तेरे चरणकु रतवाला ॥३॥
अपना साती समजके लेना । सलील वोही अल्ला ॥४॥
जीन रूपसे है जगत पसारा । वोही सल्लाल अल्ला ॥५॥
एकाजनार्दनी निजवद अल्ला। आसल वोही बिटपर अल्ला ॥६॥

संत एकनाथांच्या इतक्या विविध प्रकारच्या उद्बोधक तितक्याच मनोवेधक रचना वाचून आपल्याला सर्वथा दिग्मूढ करतात.
——

नवी भर दि.२८-०९-२०२२

🙏🏻 जोगवा🙏🏻
अनादी निर्गुण प्रगटली भवानी|
मोह महिषासुर मर्दना लागोनी|
त्रिविध तापांची करावया झाडणी|
भक्तांलागी तूं पावसी निर्वाणीं!!१!!
*आईचा जोगवा जोगवा मागेन*
द्वैत सारुनी माळ मी घालीन|
हाती बोधाचा झेंडा मी घेईन |
भेद रहित वारीसी जाईन!!२!!
नवविध भक्तिच्या करीन नवरात्रा |
करुनि पोटीं मागेन ज्ञानपुत्रा|
धरीन सद्भाव अंतरींच्या मित्रा |
दंभ सासऱया सांडिन कुपात्रा!!३!!
पूर्ण बोधाची घेईन परडी|
आशा तृष्णेच्या पाडीन दरडी|
मनोविकार करीन कुर्वंडी|
अमृत रसाची भरीन दुरडी!!४!!
आतां साजणी झाले मी निःसंग|
विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग|
काम क्रोध हे झोडियेले मांग|
केला मोकळा मारग सुरंग!!५!!
ऐसा जोगवा मागुनी ठेविला|
जाउनि नवस महाद्वारी फेडिला|
एकपणे जनार्दनीं देखियेला|
जन्ममरणाचा फेरा चुकविला!!६!!
।। जय मुक्ताई ।।
।। ज्ञानोबा तुकाराम ।।
—-


नवी भर दि. १३-०३-२०२३:

भागवत धर्माचे जे चार बळकट खांब आहेत त्यापैकी एक म्हणजे भागवत ग्रंथ प्रदान करणारे संत एकनाथ. कर्नाटकातून विठ्ठल मूर्ती पंढरपूरला आणणाऱ्या भानुदासांच्या संत कुळात त्यांना जन्म घेण्याचे भाग्य लाभले. हा वारसा त्यांनी असा पूढे नेला की ते भगवंत भक्तीचा आधार झालेत.

मातापित्याच्या पश्चात बाराव्या वर्षी पैठणहून गुरु शोधार्थ निघालेल्या एकनाथांना देवगीरी किल्ल्यावर गुरु लाभले ते जनार्दन स्वामी.
“जीवन सुखी होण्यासाठी ‘मी’ आणि ‘तू’ हा भेद नष्ट व्हायला हवा.” जनार्दन स्वामींच्या गुरुप्रसादाने हीच शिकवण दिली. एकनाथांनी ती स्वतः आचरणात आणून लोकांनाही तोच मंत्र दिला. मनुष्य असो वा प्राणी सर्वांमध्ये ते परमेश्वर बघायचे. त्यांच्या मृदु स्वभावाने.. परिस्थिती कशीही उदभवो त्यांच्या शांतीपूर्ण आदर्श वागणूकीने त्यांना ‘शांतीब्रह्म’ ही उपाधी लाभलीय.
स्वप्न दृष्टांताने त्यांनी ज्ञानोबा माऊलींच्या संजीवन समाधी भोवतीचे वेलींचे वेढे सोडविले आणि जातीभेदाचे वेढेही सोडविण्यासाठी प्रत्यक्ष कृती केली. ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत त्यांनी तयार केली. चराचरातील सर्व प्राणीमात्र एकच जीव आहेत हे पंधराव्या शतकात त्यांनी मांडलेय.
भौतिक जगतापासून दूर अशा शांत जीवन जगणाऱ्या भगवंत भक्तांची संख्या वाढावी म्हणून एकनाथांनी लोकांना भगवंत भक्तीचा लळा लावला. त्यासाठीच आपली लेखणी वापरली.
दैवीस्पर्श लाभलेल्या त्यांच्या लेखणीने गहन अध्यात्मही लोकांना रुचेल अशा अत्यंत सुलभ.. रसाळ भाषेत लिहले. अभंग, गौळणी, भारुड, भागवत, भावार्थ रामायण असे विपुल साहित्य अवतरले.
आपल्या कवनात गुरुदेवांचा “एका जनार्दनी” असा उल्लेख करुन ते स्मरण करीत. गुरुंच्याच निर्वाणदिनी स्वतःही देह ठेवला. स्वतःला झालेले परमेश्वराचे दर्शन लोकांना घडविणारे हे श्रेष्ठ संत.
वृंदावनात तो वैकुंठातला सावळा सुंदर सुकुमार.. गोप होवून गोधन चारताना बासरी वाजवतोय. त्या मंजुळ सूरानी आमचे तन मन हरपलेय. त्याच्या हातची काठी ही आम्हाला वळणावर आणण्यासाठी आहे.
त्या गौळीणींची भक्ती एवढी श्रेष्ठ की ‘मी’ ‘तू’ पण खरच हरपले. कृष्णाला ओवाळताना त्या कृष्णामधेच लीन होत आहेत.

🌺🌿🌸☘🌺☘🌸🌿🌺

रूपे सुंदर सावळा गे माये
वेणू वाजवी वृंदावना
वृंदावना गोधने चारिताहे

रुणझुण वाजवी वेणू
वेधी वेधले आमुचे तनमनु ओ माये

गोधने चारी हाती घेऊन काठी
वैकुंठीचा सुकुमार गोपवेषे जगजेठी
वैकुंठीचा सुकुमार गोधने चारिताहे

एका जनार्दनी भुलवी गौळणी
करिती तनमनाची वोवाळणी

🌹🌿🌸☘🌺☘🌸🌿🌹

रचना : संत एकनाथ ✍
संगीत : श्रीधर फडके
स्वर : सुरेश वाडकर

🎼🎶🎼🎶🎼 🎧

🌻🌿🌸🥀🌺🥀🌸🌿🌻

कवितांमधले मन आणि मनावरील कविता

संत ज्ञानेश्वरांपासून आजच्या कवींपर्यंत असंख्य कवींनी मन या विषयावर किंवा त्यासंबंधी काव्ये लिहिली आहेत. अनेक निष्णात संगीत दिग्दर्शकांनी लावलेल्या मधुर चालींवर मोठमोठ्या गायक गायिकांनी गाऊन त्या गीतांना अजरामर केले आहे. अशा प्रसिद्ध काव्यांमधल्या मला आवडणाऱ्या कांही रचनांची एक माळ गुंफायचा प्रयत्न मी या लेखात केला आहे. 

मन म्हणजे काय हे कुणाला सांगायची काही गरज आहे कां? आपल्या सर्वांकडे मन असतेच. अनेक, किंबहुना असंख्य निरनिराळ्या कल्पना, विचार आणि भावनांचे तरंग त्यात सतत उठत असतात तसेच ते विरूनही जात असतात. पण त्यांना थारा देणारे हे मन आपल्या शरीरात नक्की कुठे असते? प्रीतीमुळे प्रेमिकांच्या ‘हृदया’ची स्पंदने (‘दिल’की धडकने) वाढतातच, शिवाय ‘बहरुन ये अणु अणू, जाहली रोमांचित ही ‘तनू’ अशी त्यांची अवस्था होते. एकादी करुण घटना नेहमी ‘हृदय’द्रावक असते आणि ज्याच्या ‘काळजा’ला ती भिडत नाही त्या माणसाला आपण ‘निर्दय’ म्हणतो. आईचे मृदू ‘काळीज’ मायेने ओथंबलेले असते तर क्रूर कर्म करणा-या माणसाला उलट्या ‘काळजा’चा म्हणतात. भीतीपोटी आपल्या ‘पोटा’त गोळा उठतो, ‘पाय’ लटपटतात, चित्तथरारक गोष्टीने ‘सर्वांगा’वर कांटा उभा राहतो, तर रागाने ‘तळपाया’ची आग ‘मस्तका’ला जाते. शरीराच्या वेगवेगळ्या भागावर असा परिणाम करणाऱ्या भावना मात्र इथे तिथे निर्माण न होता फक्त मनातच निर्माण होतात. म्हणजे त्या नेमक्या कुठे उठतात?

या मनाला शरीरातल्या हात, पाय, हृदय, काळीज, मेंदू यासारख्या अवयवांसारखा विशिष्ट आकार नसतो, ते कधी डोळ्यांना दिसत नाही की कानाला ऐकू येत नाही. रंग, रूप, गंध, स्पर्श, चंव, भार, घनता असले जड वस्तूचे कोणतेच गुणधर्म त्याला नसतात. पण जरी त्याचे आकारमान सेंटीमीटर किंवा इंचात मोजता येत नसले तरी एकाद्याचे मन आभाळाहून मोठे असते तर कोणाचे अतीशय संकुचित, अणूरेणूहून तोकडे असू शकते. त्याचे अस्तित्व आपल्याला सतत जाणवत मात्र असते. कुणी तरी म्हंटले आहे,
“शरीराच्या नकाशात मनाला स्थान नाही, पण दुसऱ्या कोणालाही मनाइतका मान नाही.”
असे हे मन ! पाच ज्ञानेंद्रयांकडून आपल्याला सभोवतालच्या जगाची माहिती मिळते आणि आपल्या बुध्दीला त्यातून सगळे समजत असते. पण मनाचे अस्तित्व मनालाच जाणवते, ते समजले असे वाटते पण उमगले याची खात्री वाटत नाही. मग आपले मन कल्पनेनेच त्याचाच शोध घेत राहते. असाच एक शोध कवी सुधीर मोघे यांनी किती सुरेख शब्दात व्यक्त केला आहे !

मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा ?
स्वप्नातील पदर धुक्याचा, हातास कसा लागावा ?

मन थेंबांचे आकाश, लाटांनी सावरलेले ।
मन नक्षत्रांचे रान, अवकाशी अवतरलेले।
मन गरगरते आवर्त, मन रानभूल, मन चकवा ।।

मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ ।
मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल ।
दुबळया, गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा ?

चेहरा, मोहरा ह्याचा कुणी कधी पाहीला नाही ।
धनी अस्तित्वाचा तरीही, ह्याच्याविण दुसरा नाही ।
ह्या अनोळखी नात्याचा, कुणी कसा भरवसा द्यावा ?

या अनिश्चिततेमधून मार्ग काढण्यासाठी सुधीर मोघे यांनीच आपल्या दुसऱ्या एका सुरेख कवितेमध्ये थेट मनालाच असा प्रश्न विचारला आहे. पण हा प्रश्न विचारणारा ‘मी’ म्हणजे कोण असेल आणि त्याला मनाचे मनोगत कसे कळेल हा आणखी एक मोठा गहन प्रश्न आहे.

मना तुझे मनोगत मला कधीं कळेल का ?
तुझ्यापरी गूढ सोपे होणे मला जुळेल का !

कोण जाणे केवढा तूं व्यापतोस आकाशाला ।
आकाशाचा अर्थ देसी एका मातीच्या कणाला ।
तुझे दार माझ्यासाठी थोडेतरी खुलेल का !

कळीतला ओला श्वास पाषाणाचा थंड स्पर्श ।
तुझ्यामधे सामावला वारा, काळोख, प्रकाश ।
तुझे अरुपाचे रूप माझ्यापुढे फुलेल का !

कशासाठी कासाविशी कुणासाठी आटापिटी ?
खुळ्या ध्यास-आभासांचा पाठलाग कोणासाठी ?
तुझ्या मनांतले आर्त माझ्यामनी ढळेल का !
मना तुझे मनोगत मला कधीं कळेल का ?

असे हे मन ! भल्या भल्यांना न कळलेले, बुध्दीच्या आणि जाणीवांच्या पलीकडे असलेले पण तरीही सतत खुणावत राहणारे ! महान कवीवरांनी लिहिलेल्या विविध लोकप्रिय गीतांमधूनच त्यात डोकावून पहाण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न.

. . . . . . . . . . . . . . .

आपल्या मनात उठणाऱ्या निरनिराळ्या भावनांमध्ये प्रेम ही सर्वात उत्कट असते. त्यामुळेच संवेदनशील कवीमनाला ती सर्वात जास्त भुरळ पाडते. या भावनेचीच अगणित रूपे त्यांनी आपल्या रचनांमधून दाखवली आहेत. प्रेमाचा अंकुर मनात कधी फुटला हे एका प्रेमिकेला समजलेसुध्दा नाही. ते जाणता अजाणता घडून गेले, कसे ते पहा. या ठिकाणी हृदय या शब्दाचा अर्थ फक्त मन असाच होऊ शकतो. शरीरविज्ञानातल्या हृदयात चार मोकळे कप्पे असतात आणि ते आळीपाळीने आकुंचन व प्रसरण पावून त्यातून रक्ताभिसरणाचे कार्य करत असतात. प्रीतीच्या किंवा कुठल्याही भावना अज्ञात अशा मनातच जागतात.

राजहंस सांगतो कीर्तिच्या तुझ्या कथा ।
हृदयि प्रीत जागते जाणता अजाणता ।।

पाहिले तुला न मी तरीहि नित्य पाहते ।
लाजुनी मनोमनी उगिच धुंद राहते ।
ठाउका न मजसी जरी निषद देश कोणता ।।

दिवसरात्र ओढणी या मनास लागते ।
तुझीच जाहल्यापरी मी सदैव वागते ।
मैत्रिणीस सांगते तुझी अमोल योग्यता ।।

निमंत्रणाविना पुन्हा हंस येइ तो वनी ।
नादचित्र रेखीतो तुझेच मंद कूजनी ।
वेड वाढवून तो उडून जाय मागुता ।।
हृदयि प्रीत जागते जाणता अजाणता ।।

पण तो अंकुर वेगाने वाढत जातो आणि त्यातून मन मोराचा सुंदर पिसारा फुलतो. तेंव्हा ती प्रेमिका म्हणते.

बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला।

रे मनमोरा, रंगपिसारा, अंगी रंगूनी जीव रंगला।
गोजिरवानी, मंजुळ गाणी, वाजविते बासरी डाळिंब ओठाला।
येडं येडं, मन येडं झालं, ऐकुन गानाला ।।

हे वेडावलेले मन आपल्या मनातले गुपित कुणाला तरी सांगून टाकायला आसुसलेले असते, पण तसे करायची त्याला लाजही वाटत असते. आपल्याला नक्की काय झाले आहे असा संभ्रमही त्याला पडत असतो. जे काहीतरी झाले आहे ते शब्दात कसे व्यक्त करायचे असा प्रश्नसुध्दा त्याला पडतो. ते स्वतःलाच विचारते,

काय बाई सांगू ? कसं गं सांगू ?
मलाच माझी वाटे लाज ।
काही तरी होऊन गेलंय आज !

उगीच फुलुनी आलं फूल ।
उगिच जीवाला पडली भूल ।
त्या रंगाचा, त्या गंधाचा ।
अंगावर मी ल्याले साज ।
काही तरी होऊन गेलंय आज !

जरी लाजरी, झाले धीट ।
बघत रहिले त्याला नीट ।
कुळवंताची पोर कशी मी ।
विसरुन गेले रीतरिवाज ?
काही तरी होऊन गेलंय आज !

सहज बोलले हसले मी ।
मलाच हरवुन बसले मी ।
एक अनावर जडली बाधा ।
नाहि चालला काही इलाज ।
काही तरी होऊन गेलंय आज !
हे तसे अजून तरी एकतर्फी प्रेम आहे. पण ते मनात नवीन इच्छा आकांक्षा निर्माण करते आणि त्यांची पूर्ती होण्यासाठी त्याला तसाच प्रतिसादही मिळायलाच हवा ना ! पण हे कसे घडणार ? आपल्या मनातल्या भावना दुस-या कोणाला सांगण्याआधी ते मन स्वतःलाच विचारते,

मी मनात हसता प्रीत हसे ।
हे गुपित कुणाला सांगु कसे ?

चाहुल येता ओळखिची ती ।
बावरल्यापरि मी एकांती ।
धुंद जिवाला डोळ्यांपुढती ।
नव्या नवतिचे स्वप्न दिसे ।।

किंचीत ढळता पदर सावरी ।
येता जाता माझि मला मी ।
एक सारखी पाहि दर्पणी ।
वेड म्हणू तर वेड नसे ।।

काहि सुचेना काय लिहावे ।
पत्र लिहू तर शब्द न ठावे ।
नाव काढिता रूप आठवे ।
उगा मनाला भास असे ।।

सांगायला जावे तर आवाज फुटत नाही, लिहायला शब्द सुचत नाही म्हणून प्रेमिका एक आगळा मार्ग शोधून काढते. आपल्या मनातल्या अस्फुट भावना प्रियकराला कळाव्यात म्हणून प्रेमिका सांगते

डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे ।
साजाविना कळावे संगीत लोचनांचे !

मी वाचले मनी ते, फुलली मनात आशा ।
सांगावया तुला ते नाही जगात भाषा !
हितगूज प्रेमिकांचे, हे बोल त्या मुक्यांचे ।।

हास्याविना फुटेना ओठांत शब्द काही ।
कळले सखे तुला ते, कळले तसे मलाही ।
दोघांस गुंतवीती, म‍उ बंध रेशमाचे ।।

पद्मासमान जन्मे हे काव्य जीवनी या ।
या जीवनात काव्ये, काव्यात जीवने या !
गंधात धुंद वारा, वा-यात गंध नाचे ।।

थोडी धिटावलेली आणि कल्पक प्रेमिका काव्यमय भाषेत विचारते.

हृदयी जागा, तू अनुरागा, प्रीतीला या देशील का ?

बांधिन तेथे घरकुल चिमणे, स्वर्गाचे ते रूप ठेंगणे
शृंगाराचे कोरीव लेणे, रहावयाला येशील का ?

दोन मनांची उघडी दारे, आत खेळते वसंत वारे
दीप लोचनी सदैव तू रे, संध्यातारक होशील का ?

घराभोवती निर्झर नाचे, जाणुन अपुल्या गूढ मनाचे
झाकुन डोळे एकांताचे, जवळी मजला घेशील का ?

. . . . . . . . . . . . . .

मनातल्या भावना शब्दात व्यक्त केल्या नाहीत, बोलून दाखवल्या नाहीत तरीसुध्दा त्या काही लपून रहात नाहीत. आपला चेहेरा मनाचा आरसा असतो असे म्हणतात. मनातले भाव त्यावर प्रकट होत असतात. शिवाय वागण्यातल्या छोट्या छोट्या बाबीत त्या कशा दिसून येतात हे या कवितेत दाखवले आहे.

लपविलास तू हिरवा चाफा,
सुगंध त्याचा छ्पेल का ?
प्रीत लपवुनी लपेल का ?

जवळ मने पण दूर शरीरे ।
नयन लाजरे, चेहरे हसरे ।
लपविलेस तू जाणून सारे ।
रंग गालिचा छ्पेल का ?

क्षणात हसणे, क्षणात रुसणे ।
उन्हात पाउस, पुढे चांदणे ।
हे प्रणयाचे देणे घेणे ।
घडल्यावाचुन चुकेल का ?

पुरे बहाणे गंभिर होणे ।
चोरा, तुझिया मनी चांदणे ।
चोरहि जाणे, चंद्रहि जाणे ।
केली चोरी छ्पेल का ?
प्रीत लपवुनी लपेल का ?

पण एकादा माणूस मठ्ठ असतो, ही गोष्ट त्याच्या लक्षात येतच नाही. कदाचित त्याला प्रतिसाद द्यायचा नसतो, सगळे समजून उमजून तो आपल्याला काही न कळल्याचे सोंग आणत असतो. त्यामुळे अधीर झालेली प्रेमिका म्हणते,

सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला !
रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला ?

गंधित नाजुक पानांमधुनी, सूर छेडिते अलगद कुणी ।
अर्थ कधी कळणार तुला, धुंदणाऱ्या सुरातला ?

निळसर चंचल पाण्यावरती, लयीत एका तरंग उठती ।
छंद कधी कळणार तुला, नाचणा-या जलातला ।

जुळता डोळे एका वेळी, धीट पापणी झुकली खाली ।
खेळ कधी कळणार तुला, दोन वेड्या जीवातला ।।

मनात येईल तसे वागणे आपल्याला बरेच वेळा शक्य नसते. या जगात रहायचे असेल तर कसे वागायचे हे बहुतेक वेळी बुध्दी ठरवत असते. तसेच अपेक्षाभंग झाला तर मन बेचैन होते त्या वेळी बुध्दी त्याची समजूत घालत असते. मन वेडे असते, अशक्य गोष्टींचा हव्यास धरते, पण बुध्दी शहाणी असते. ती मनाला थाऱ्यावर आणायचा प्रयत्न करते. खरे तर मन आणि बुध्दी या एकमेकींपासून वेगळ्या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत की एकाच गोष्टीच्या दोन बाजू आहेत हे अजून नीटसे समजलेले नाही. मेंदूमधल्या वेगवेगळी कार्ये करणाऱ्या भागांना आपणच ही नावे दिली आहेत. ज्ञानेंद्रियांकडून येणाऱ्या संवेदनांचा सुसंगत अर्थ लावून त्यातून मिळणाऱ्या माहितीचे संकलन बुध्दी करते. पण मन त्यावर विचार करते, तसेच स्वतंत्रपणेही मनात विचार उठत असतात. पण या विचारांचे मूल्यमापन बुध्दीकडून होत असते आणि आपण त्यानुसार निर्णय घेतो. मन स्वभावतः उच्छृंखल असते, पण त्याच्या मोकाट सुटू पहाणाऱ्या वारूला वेसण घालायचे काम बुध्दी करत असते. कृतीवर बुध्दीचे नियंत्रण कदाचित असेलही, पण विचार करायला मन नेहमी तयार असते. श्रीरामाच्या गुणरूपाचे वर्णन ऐकूनच जानकी त्याच्यावर इतकी मोहित होते की त्याला कधी पाहीन असे तिला वाटू लागते. त्या काळातल्या समाजरचनेनुसार तिला प्रत्यक्ष मिथिलानगरीहून अयोध्येला जाणे शक्य नसते. ती कल्पनेनेच तिकडे जाण्यासाठी मनोरथाला आदेश देते,

मनोरथा, चल त्या नगरीला ।
भूलोकीच्या अमरावतिला ।।

स्वप्नमार्ग हा नटे फुलांनी ।
सडे शिंपीले चंद्रकरांनी ।
शीतल वारा सारथि हो‍उनि ।
अयोध्येच्या नेई दशेला ।।

सर्व सुखाचा मेघ सावळा ।
रघुनंदन मी पाहिन डोळा ।
दोन करांची करुन मेखला ।
वाहिन माझ्या देवाला ।।

एकाद्या प्रियकराच्या मनात जेंव्हा त्याच्या सुंदरा प्रियेची श्यामला मूर्ती भरते तेंव्हा ती सतत त्याच्या मनःचक्षूंना दिसायला लागते. तो मनातल्या मनात तिचे चित्र काढून ते रंगवू लागतो.

मानसीचा चित्रकार तो ।
तुझे निरंतर चित्र काढतो, चित्र काढतो ।।

भेट पहिली अपुली घडता ।
निळी मोहिनी नयनी हसता ।
उडे पापणी किंचित ढळता ।
गोड कपोली रंग उषेचे, रंग उषेचे भरतो ।।

मम स्पर्शाने तुझी मुग्धता ।
होत बोलकी तुला नकळता ।
माझ्याविण ही तुझी चारुता ।
मावळतीचे सूर्यफूल ते, सूर्यफूल ते करतो ।।

तुझ्यापरि तव प्रीतीसरिता ।
संगम देखून मागे फिरता ।
हसरी संध्या रजनी होता ।
नक्षत्रांचा निळा चांदवा, निळा चांदवा झरतो ।।

. . . . . . . . . . .

आपली विवेकबुध्दी, तारतम्य, वास्तवाचे भान, संयमी वृत्ती वगैरे गोष्टी जागृत असतांना मनावर अंकुश ठेवतात. मनाला बुध्दीचा थोडा धाक असल्यामुळे ते जरासे सांभाळूनच विचार करत असते. पण निद्रावस्थेत जाताच स्वप्नांमध्ये ते मन स्वैर भरारी मारू शकते. वास्तवाचे दडपण नसल्यामुळे स्वप्नाच्या जगात आपले मन स्वच्छंदपणे मुक्त विहार करू शकते. लहानपणी सिंड्रेला आणि स्नोव्हाइट यांच्यासारख्या परीकथांमध्ये रमलेले बालमन यौवनाच्या उंबरठ्यावर पोचल्यानंतर स्वतःला त्या नायिका समजून त्या कथांमध्ये स्वतःला पाहू लागते. अशा सर्व परीकथांमध्ये अखेरीस श्वेत अश्वावर आरूढ होऊन एक उमदा राजकुमार दौडत येतो आणि खलनायकाचा पाडाव करून त्या नायिकांना आपल्या बरोबर घेऊन जातो. अखेरीस ते दोघे चिरकाल सुखाने राहू लागतात असा सुखांत केलेले असतो. असाच एकादा राजकुमार निदान आपल्या स्वप्नात तरी अवतरावा असे या मुग्धेला वाटते.

परीकथेतिल राजकुमारा,
स्वप्नी माझ्या येशिल का ?
भाव दाटले मनी अनामिक ।
साद तयांना देशिल का ?

या डोळ्यांचे गूढ इषारे ।
शब्दांवाचुन जाणुन सारे ।
‘राणी अपुली’ मला म्हणोनी ।
तुझियासंगे नेशिल का ?

मूर्त मनोरम मनी रेखिली ।
दिवसा रात्री नित्य देखिली ।
त्या रूपाची साक्ष जिवाला ।
प्रत्यक्षातुन देशिल का ?

लाजुन डोळे लवविन खाली ।
नवख्या गाली येइल लाली ।
फुलापरी ही तनू कापरी ।
हृदयापाशी घेशील का ?

लाजबावरी मिटुन पापणी ।
साठवीन ते चित्र लोचनी ।
नवरंगी त्या चित्रामधले ।
स्वप्नच माझे होशील का ?

अशाच दुसऱ्या एका स्वप्नाळू मुलीलासुध्दा मनातून असेच काहीतरी वाटत असते. तिच्या स्वप्नातल्या जगात सारे काही सुंदर असते. निसर्ग आपल्या सौंदर्याने मस्त वातावरणनिर्मिती करत असतो. अशा त्या स्वप्नामधल्या गावात तिचा मनाजोगता जोडीदार मिळाला तर तिच्या आनंदाला किती बहर येईल? याचे सुखस्वप्न ती पहात राहते.

ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा ।
माझ्या मनातला का तेथे असेल रावा ?

जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले ।
अस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले ।
जेथे खुळ्या ढगांनी रंगीन साज ल्यावा ।।

घे साउली उन्हाला कवळून बाहुपाशी ।
लागुन ओढ वेडी खग येति कोटरासी ।
एक एक चांदणीने नभदीप पाजळावा ।।

स्वप्नामधील गावा स्वप्नामधून जावे ।
स्वप्नातल्या प्रियाला मनमुक्त गीत गावे ।
स्वप्नातल्या सुखाचा स्वप्नीच वेध घ्यावा ।।

वरील दोन्ही गाण्यामधल्या नवयुवतीला अजून प्रत्यक्ष जीवनात कोणी साजेसा साजण भेटलाच नसावा. त्यामुळे त्या एक गूढ आणि रम्य असे स्वप्नरंजन करत आहेत. पण एकाद्या मुलीला असा साजण डोळ्यासमोर दिसतो आहे पण तो तिच्यापाशी येत नाही. कदाचित त्याला तिची ओढ वाटत नसेल किंवा काही व्यावहारिक अडचणी असतील. अशा वेळी ती तरुणी त्याला निदान स्वप्नात तरी भेटण्याची इच्छा अशी व्यक्त करते.

स्वप्नात साजणा येशील का ?
चित्रात रंग हे भरशील का ?

मी जीवन गाणे गावे, तू स्वरात चिंब भिजावे ।
दोघांनी हरवून जावे, ही किमया नकळत करशील का ?

ही धूंद प्रीतीची बाग, प्रणयाला आली जाग ।
रोमांचित गोरे अंग, विळख्यात रेशमी धरशील का ?

प्रतिमेचे चुंबन घेता, जणू स्वर्गच येई हाता ।
मधुमिलन होता होता, देहात भरून तू उरशील का ?

या मुलीचे लग्न आता ठरले आहे, मुहूर्ताला अक्षता टाकायचा अवकाश आहे. पण मधल्या काळातला दुरावा तिला असह्य वाटत आहे. लोकलाजेनुसार तिला आपल्या भावी वरापासून दूर रहावे लागत असल्यामुळे ती त्याला स्वप्नातच भेटत राहते आणि भेटल्यानंतर काय काय घडेल याची सुखस्वप्ने पहाण्याचा छंद तिला लागतो.

स्वप्नांत रंगले मी, चित्रात दंगले मी ।
सत्यातल्या जगी या झोपेत जागले मी ।।

हे वेड प्रेमिकांचे गीतात गाइले मी ।
हे गीत भावनेचे डोळ्यात पाहिले मी ।।

या वृक्षवल्लरींना ही ओढ मीलनाची ।
पाहून जाणिली मी भाषा मुकेपणाची ।
माझ्या प्रियापुढे का, लाजून राहिले मी ।।

एकांत हा क्षणाचा, भासे मुहूर्तवेळा ।
या नील मंडपात, जमला निसर्गमेळा ।
मिळवून शब्द सूर, हे हार गुंफिले मी ।।

घेशील का सख्या, तू हातात हात माझा ?
हळव्या स्वयंवराला, साक्षी वसंत राजा ।
या जन्मसोबतीला सर्वस्व वाहिले मी ।।

दोघांचे मीलन झाल्यानंतर त्यांना पुढचे दिसायला लागते. ज्या मुख्य कारणासाठी निसर्गाने हे स्त्रीपुरुषांमधले आकर्षण निर्माण केले आहे त्याची पूर्ती होण्याला प्रत्यक्षात अवधी लागत असला तरी मनोवेगाने ती क्षणात करता येण्याजोगे स्थान म्हणजे स्वप्नच !

काल पाहिले मी स्वप्न गडे ।

नयनी मोहरली ग आशा ।
बाळ चिमुकले खुदकन हसले ।
मीही हसले, हसली आशा ।
काल पाहिले मी स्वप्न गडे ।।

भाग्यवतीचे भाग्य उजळले ।
कुणीतरी ग मला छेडिले ।
आणि लाजले, हळूच वदले ।
रंग सावळा तो कृष्ण गडे ।।

इवली जिवणी इवले डोळे ।
भुरुभुरु उडती केसहि कुरळे ।
रुणुझुणु रुणुझुणु वाजति वाळे ।
स्वप्नि ऐकते तो नाद गडे ।।

अशा प्रकारे मनात उठणाऱ्या वेगवेगळ्या इच्छा, आकांक्षा, भावना वगैरेंची पूर्ती स्वप्नात होत असते अशी रूढ कवी कल्पना आहे. निदान असे गृहीत धरून कवीलोकांनी जागेपणीच अनेक प्रेमगीते लिहिली आहेत. मला स्वतःला मात्र अशा सुखद स्वप्नांचा अनुभव तसा कमीच येतो. कधी तो आलाही असला तरी जाग येताच मी ते सगळे विसरून जातो, त्यामुळे तो लक्षात रहात नाही. मला प्रत्यक्षात अप्राप्य वाटणारी कोणतीही गोष्ट कधी स्वप्नात मिळाली असे आठवत नाही. उलट काही वेळा मी स्वप्नातून खडबडून जागा होतो तेंव्हा मी किंचाळत उठलो असे बाजूचे लोक सांगतात. अर्थातच मी स्वप्नात काहीतरी वाईट किंवा भयावह पाहिले असते. कधी कधी मला स्वतःलासुध्दा असे वाटते की आपण एका अशक्यप्राय अशा कठीण परिस्थितीत सापडलो आहोत असे काहीतरी स्वप्नात दिसले असावे आणि जागा झाल्यानंतर कसलाच प्रॉब्लेम नसल्याचे पाहून मी समाधानाचा सुस्कारा सोडतो. अशा दुःस्वप्नांना इंग्रजीत ‘नाइटमेअर’ असे वेगळे नाव दिले आहे. चांगले आशादायक असे ‘ड्रीम’ आणि भीतीदायक ते ‘नाइटमेअर’!

“मनी वसे ते स्वप्नी दिसे” अशी म्हण आहे. काही अंशाने ती खरी आहे. कारण एकादा विचार, एकादी कल्पना मनात आली तरच ती स्वप्नात येऊ शकेल. दक्षिण अमेरिकेतल्या कुठल्याशा जंगलातली झोपडी एका आंध्रप्रदेशात जन्म घालवलेल्या मुलाला स्वप्नात दिसली अशा भाकडकथांवर माझा काडीएवढा विश्वास बसत नाही. माणसाला पुनर्जन्म असतो आणि पूर्वीच्या जन्मातले मन किंवा त्याचा अंश तो या जन्मात आपल्याबरोबर घेऊन येतो असल्या गोष्टी शास्त्रीय कसोटीवर सिध्द झालेल्या नाहीत. या जन्मातच जे काही पाहिले, ऐकले, वाचले, अनुभवले त्याच्या अनुषंगाने मनात विचारांचे तरंग उठत असतात आणि ही क्रिया स्वप्नातदेखील चालत राहते, किंबहुना स्वप्नामध्ये तिला वास्तवातले निर्बंध रहात नाहीत.

“मन चिंती ते वैरी न चिंती” अशी आणखी एक म्हण आहे. सध्याच्या परिस्थितीतून पुढे कसे अधिकाधिक चांगले घडेल याची सुखस्वप्ने जसे मन पहात असते, त्याचप्रमाणे अपेक्षित किंवा अनपेक्षित कारणांमुळे कोणते धोके उद्भवू शकतात याचा विचारसुध्दा मनच करत असते. निसर्गाने सजीवांना दिलेले हे एक वरदान आहे. धोक्याची कल्पना असल्यामुळे त्यापासून बचाव करण्याची तयारी ते करू शकतात. पण अनेक वेळा हा धोका अकारण दिसतो आणि त्यामुळे मनाला मात्र घोर लागतो. नाइटमेअर्स अशा प्रकारच्या विचारांमुळेच दिसतात. जास्त काळजीपूर्वक वागायचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना दुःस्वप्ने जास्त प्रमाणात दिसत असावीत आणि बिंदास वृत्तीचे लोक सुखस्वप्ने पहात मजेत राहात असावेत असा माझा अंदाज आहे.

. . . . . . . . . . . .

सुखस्वप्ने पहात रहावे असे सर्वांनाच वाटते, पण ते संपल्यानंतर काय ? सावज हातात सापडल्यानंतर शिकारीतली मजा खलास होते, मुक्कामाला पोचल्यानंतर प्रवासातली गंमत संपते त्याचप्रमाणे स्वप्नपूर्ती झाल्यानंतर त्याचे काही वाटेनासे होते. एकादी गोष्ट विनासायास हाती लागली तर तिचे काहीच मोल वाटत नाही. हा मनाचा विचित्रपणा वाटेल पण तसेच असते. शेवट गोड असो किंवा नसो गोष्ट संपून जाते. तसे होण्यापेक्षा स्वप्न अर्धेच रहावे असे एका कवीला वाटते. या गाण्यात ते सांगतात,

स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा ।
गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा ।।

रेखाकृती सुखाच्या चित्ती चितारलेल्या ।
साशंक कल्पनांनी सहजी विरून गेल्या ।
कधि सोशिला उन्हाळा कधि लाभला विसावा ।।

नैराश्य कृष्णमेघी, आशा कधी बुडावी ।
विरहात चिंब भिजुनी प्रीती फुलोनि यावी ।
काट्याविना न हाती केव्हा गुलाब यावा ।।

सिद्धीस कार्य जाता, येते सुखास जडता ।
जडतेत चेतनेला उरतो न कोणि त्राता ।
अतृप्त भावनांनी जीवात जीव यावा ।।

मनाला जाळणारी चिंता, व्याकुळ करणारी काळजी नेहमीच अनाठायी असते असेही नाही. अनेक वेळा मनातल्या शंका कुशंका खऱ्या ठरतात. एवढेच नव्हे तर कथेला अकल्पितपणे कलाटणी मिळते. सगळे काही मनाजोगे होत असते, पुढे मिळणाऱ्या सुखाची कल्पना करून मनात मांडे खात असलेल्या माणसाच्या पुढ्यात नियती वेगळेच ताट वाढून ठेवते. त्याचे मन आक्रोश करते,

कधी बहर, कधी शिशिर, परंतू दोन्ही एक बहाणे ।
डोळ्यांमधले आसू पुसती ओठांवरले गाणे ।।

बहर धुंद वेलीवर यावा ।
हळुच लाजरा पक्षी गावा ।
आणि अचानक गळुन पडावी,
विखरुन सगळी पाने ।।

भान विसरुनी मिठी जुळावी ।
पहाट कधि झाली न कळावी ।
भिन्न दिशांना झुरत फिरावे,
नंतर दोन दिवाणे ।।

हळुच फुलाच्या बिलगुनि गाली ।
नाजुक गाणी कुणी गायिली ।
आता उरली आर्त विराणी.
सूरच केविलवाणे ।।

जुळली हृदये, सूरहि जुळले ।
तुझे नि माझे गीत तरळले ।
व्याकुळ डोळे कातरवेळ.
स्मरुन आता जाणे ।।

काही दुर्दैवी व्यक्तींच्या बाबतीत तर करायला गेले एक आणि झाले भलतेच असे होत राहते. महाभारतातल्या सत्यवतीची कथा असेच काही सांगून जाते. सामान्य कोळ्याची देखणी पोर मत्स्यगंधा साम्राज्ञी होण्याचे स्वप्न पहाते आणि ते पूर्ण होतेसुध्दा. पण त्यानंतर मात्र सगळे विस्कळत जाते. एकामागोमाग एक एकापेक्षा एक अनपेक्षित घडना घडत जातात आणि तिला त्या पहाव्या लागतात. अखेरीस उद्वेगाने ती म्हणते,

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा ।
धर्म न्याय नीति सारा खेळ कल्पनेचा ।।

ध्यास एक हृदयी धरुनी स्वप्न रंगवावे ।
वीज त्यावरी तो पडुनी शिल्प कोसळावे !
सर्वनाश एकच दिसतो नियम या जगाचा ।।

दैव ज्यास लोभे त्याला लाभ वैभवाचा ।
दैव कोप येता भाळी सर्वनाश त्याचा ।
वाहणे प्रवाहावरति धर्म एक साचा ।।

याहूनही जास्त हृदयविदारक अनुभव आल्यामुळे अत्यंत निरोशेने ग्रस्त झालेले एक मन आक्रंदन करते,

लळा-जिव्हाळा शब्दच खोटे, मासा माशा खाई ।
कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही ।।

पिसे, तनसडी, काड्या जमवी, चिमणी बांधी कोटे ।
दाणा, दाणा आणून जगवी, जीव कोवळे छोटे ।
बळावता बळ पंखामधले, पिल्लू उडूनी जाई ।।

रक्तहि जेथे सूड साधते, तेथे कसली माया ?
कोण कुणाची बहीण, भाऊ, पती, पुत्र वा जाया ।
सांगायाची नाती सगळी, जो तो अपुले पाही ।।

माणुस करतो प्रेम स्वतःवर, विसरुन जातो देवा ।
कोण ओळखी उपकाराते, प्रेमा अन्‌ सद्भावा ।
कोण कुणाचा कशास होतो या जगती उतराई ।।

आशा निराशा हे मनाचे विभिन्न भाव आहेत. आशा, अभिलाशा, अपेक्षा वगैरेंचा निरनिराळ्या प्रकारचा आविष्कार पहिल्या चार भागांमध्ये दिसला, तसेच निराशा, वैफल्य वगैरे भावांची निर्मितीदेखील मनातच होत असते. स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातील दुःखांचा अनुभव सर्वसामान्य लोकांना येतो, पण महान लोक सगळ्या जगाची चिंता वहातात. एका विशिष्ट दुःखाकडे न पहाता एकंदरीत समाजाच्या कष्टांवर बोट ठेवतात. आजचेच जग वाईट आहे असातला भाग नाही. कित्येक दशकांपूर्वी कवीवर्य भा.रा.तांबे यांनी लिहिले आहे,

कळा ज्या लागल्या जीवा, मला की ईश्वरा ठाव्या !
कुणाला काय हो त्याचे ? कुणाला काय सांगाव्या ?

उरी या हात ठेवोनी, उरीचा शूल का जाई ?
समुद्री चहुकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही ।।

जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगद्बंधू !
हमामा गर्जनेचा हो, न नेत्री एकही बिंदू ।।

नदीला पूर हा लोटे, न सेतू ना कुठे नावा ।
भुतांची झुंज ही मागे, धडाडे चौकडे दावा ।।

नदी लंघोनि जे गेले, तयांची हाक ये कानी ।
इथे हे ओढती मागे, मला बांधोनि पाशांनी ।।

कशी साहू पुढे मागे, जिवाला ओढ जी लागे ?
तटातट्‌ काळजाचे हे तुटाया लागती धागे ।।

पुढे जाऊ ? वळू मागे ? करू मी काय रे देवा ?
खडे मारी कुणी, कुणी, हसे कोणी, करी हेवा !

मनासारखे चालले आहे असा कधीकधी भास होत असतो. निदान इतरांना तसेच वाटत असते. सगळे काही व्यवस्थित असतांनादेखील हा माणूस सुखी का नाही असा प्रश्न त्याला पडतो, त्याला त्याचे सुख दुखते आहे असे समजतो. अशा माणसाची व्यथा वेगळीच असते. त्याचे दुखणे त्याला मनातून सतत टोचत असते पण ते व्यक्त करायची सोय नसते. सांगून ते कोणाला कळणारच नाही, ऐकणारा त्याची टिंगल करेल, त्याला मूर्खात काढेल, त्यामुळे त्याला होत असलेल्या त्रासात आणखी भर पडेल याची त्याला जवळ जवळ खात्री असते. त्याचे मन स्वतःलाच सांगते,

काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी ।
मज फूलही रुतावे हा दैवयोग आहे !

सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची ?
चिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे !

काही करु पहातो रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणेही विपरीत होत आहे !

हा स्नेह, वंचना की, काहीच आकळेना ।
आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे !

कदाचित अशा विचाराने म्हणा किंवा दुसऱ्या कोणाची टीका सहन करून घ्यायची त्याच्या मनाची तयारी नसल्यामुळे असेल पण एकादा माणूस नेहमीच आपले ओठ घट्ट मिटून ठेवतो. कदाचित स्वभावानेच तो पक्का आतल्या गाठीचा असेल, आपल्या सुखातही कोणी वाटेकरी नको आणि दुःखातही नको अशी त्याच्या मनाची वृत्ती असेल. आणखीही काही कारणे असतील, तीसुध्दा तो कोणालाही सांगत नाही. कोणालाही काहीही सांगायला तो तयार नसतो. त्याला काही विचारायला कोणी गेला तर तो निर्धाराने म्हणतो,

काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही ।
देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही ।।

माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे ।
पण पाकळी तयाची, कधी फुलणार नाही ।।

नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गूज ।
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही ।।

मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला ।
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही ।।

दूर बंदरात उभे एक गलबत रूपेरी ।
त्याचा कोष किना-यास कधी लाभणार नाही ।।

तुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी ।
त्याच्या निखाऱ्यात कधी तुला जाळणार नाही ।।

. . . . . . . . . . . .

बहुतेक माणसे एका ठराविक चाकोरीतले जीवन जगत असतात, त्यांचे विश्व एका लहानशा चौकटीत सामावलेले असते. त्यातला उजेड कमी झाला की सगळे जग कायमचे अंधारात बुडाले आहे असे त्यांना वाटायला लागते. अतीव नैराश्य, वैफल्य आदींने ते ग्रस्त होतात. मनातली ही भावना टोकाला गेल्यास आत्महत्येचे विचार त्यात यायला लागतात. पण त्यांनी चौकटीच्या बाहेर जाऊन पाहिले तर सुख दुःख ह्या गोष्टी अशा सर्वसमावेशक नाहीत, स्थळकाळाप्रमाणे त्या सारख्या बदलत असतात ते त्यांना समजेल. ते पाहिल्यावर त्यांच्या मनाचा दुबळेपणा झटकून टाकू शकतात आणि जीवनाचा आनंद त्यांना दिसू लागतो. कवीवर्य गदिमांनी ही शिकवण या गाण्यात किती चांगल्या शब्दात दिली आहे पहा.

झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा ।
फुलला पहा सभोती आनंद जीवनाचा ।।

होईल ताप काही मध्यान्हिच्या उन्हाचा ।
अविचार सोड असला कोल्लाळ कल्पनांचा ।
आस्वाद घे सुखाने येत्या नव्या क्षणांचा ।।

पुष्पास वाटते का भय ऊन पावसाचे ।
आयुष्य त्यास आहे एकाच ना दिसाचे ।
हसुनी करी परि ते वर्षाव सौरभाचा ।।

का कालचा उद्याला देसी उगा हवाला ।
द्यावाच वाटतो ना मग जीव दे जिवाला ।
अव्हेर काय करिसी अनमोल या तनाचा ।।

काही महानुभावांचे मन इतके सुदृढ बनलेले असते की दुःखाचे चटके ते हंसत हंसत सोसतात. अंगाला ओरबडणारे कांटे फुलांसारखे कोमल वाटतात. सोबतीला कोणी नसला तरी एकला चलो रे या रवींद्रनाथ टागोरांच्या गीतानुसार आपल्या मार्गावर चालत राहतात. येशू ख्रिस्तासारखे महान लोक आपला क्रूस स्वतःच्या खांद्यावर वाहून नेतांनादेखील यत्किंचित कुरकुर करत नाहीत. असे महान लोक म्हणतात,

वाटेवर काटे वेचीत चाललो ।
वाटले जसा फुलाफुलात चाललो ।।

मिसळुनी मेळ्यात कधी, एक हात धरूनि कधी ।
आपुलीच साथ कधी करित चाललो ।।

आधिचा प्रसाद घेत, पुढची ऐकीत साद ।
नादातच शीळ वाजवीत चाललो ।।

चुकली तालात चाल, लागला जिवास बोल ।
ढळलेला तोल सावरीत चाललो ।।

खांद्यावर बाळगिले, ओझे सुखदुःखाचे ।
फेकुन देऊन अता परत चाललो ।।

मनाने निर्मळ असणे अतीशय महत्वाचे आहे. अनेक दुर्गुणांच्या डागामुळे ते मलीन झाले असेल तर त्या माणसाच्या उन्नतीत त्याची बाधा आल्याशिवाय राहणार नाही. “नाही निर्मळ ते मन तेथे काय करील साबण ?” असे विचारून चित्तशुध्दी करण्याचा उपदेश संतांनी दिला आहे. मनात जर खोटेपणाचा अंश नसेल, त्यात कोणाबद्दल कटुता नसेल, कसला संशय नसेल तर तो माणूस आपले काम करतांना कचरणार नाही, आत्मविश्वासाने प्रगतीपथावर वाटचाल करत राहील आणि जगात यशस्वी होईल. सोप्या ग्रामीण भाषेत हा संदेश असा दिला आहे.

मन सुद्ध तुझं गोस्ट हाये प्रिथिविमोलाची ।
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची ।
पर्वा बी कुनाची ।।

झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला ।
काटंकुटं वाटंमंदी बोचति त्येला ।
रगत निगंल, तरि बि हंसल, शाबास त्येची ।।

जो वळखितसे औक्ष म्हंजी मोटि लडाई ।
अन्‌ हत्याराचं फुलावानी घाव बि खाई ।
गळ्यामंदी पडंल त्येच्या माळ इजयाची ।

मन हे असेच बहुरंगी असते. कधी नैराश्याच्या गर्तेत खोल बुडेल तर कधी गगनाला गवसणी घालायला जाईल. संयम हे शहाणपणाचे लक्षण मनाला आवर घालण्याचा प्रयत्न नेहमी करत असते, पण कधी कधी त्याचा इलाज चालत नाही. वेडे मन त्याला न जुमानता पिसाट होतेच ! ते त्याच्या अडेलतट्टूपणावर ठाम राहते. त्यावेळी मनासारखे वागण्याखेरीज कोणताही पर्याय त्याला मान्य नसतो.

मन पिसाट माझे अडले रे,
थांब जरासा !

वनगान रान गुणगुणले;
दूरात दिवे मिणमिणले;
मधुजाल तमाने विणले रे,
थांब जरासा !

ही खाली हिरवळ ओली;
कुजबुजून बोलू बोली;
तिमिराची मोजू खोली रे,
थांब जरासा !

नुसतेच असे हे फिरणे
नुसतेच दिवस हे भरणे
नुसतेच नको हुरहुरणे रे,
थांब जरासा !

आजच्या पिढीतल्या गुरू ठाकूर यांनी मनाच्या अनेक रूपांचा सुरेख ठाव घेतला आहे. हळवेपणा, बेधुंद वृत्ती, स्वप्नरंजन, विगहाकुलता, आशा. निराशा अशा त्याच्या विविध त-हा त्यांनी किती छान रंगवल्या आहेत !

मन उधाण वाऱ्याचे

मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते,
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !

आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते,
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते
सावरते, बावरते, घडते, अडखळते का पडते ?
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते
अन्‌ क्षणात फिरुनी आभाळाला भिडते !

मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !

रुणझुणते, गुणगुणते, कधी गुंतते, हरवते,
कधी गहि-या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते ?
कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते !
जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते ?
भाबडे तरी भासांच्या मागून पळते !

मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !

पण मन या विषयावर मराठी भाषेतली जितकी गीते मी वाचली किंवा ऐकली आहेत त्या सर्वांमध्ये मला स्व.बहिणाबाईंनी लिहिलेल्या ओव्या जास्त आवडतात. मन म्हणजे दुसरे तिसरे काही नसून प्रत्यक्ष परमेश्वराला जागेपणी पडलेले स्वप्न आहे असे त्या सांगतात. कल्पनेची ही उंच भरारी आणि तिचे असे सुंदर शब्दांकन “माझी माय सरसोती, मले शिकयते बोली, लेक बहिनाच्या मनी किती रुपीतं पेरली।” असा सार्थ दावा करणाऱ्या बहिणाबाईच करू शकतात. मनाबद्दल त्या सांगतात,

मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर ।
किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।।

मन मोकाट मोकाट, याच्या ठाई ठाई वाटा ।
जशा वाऱ्यानं चालल्या, पान्यावऱ्हल्या रे लाटा ।।

मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन ?
उंडारलं उंडारलं, जसं वारा वहादनं ।।

मन पाखरू पाखरू, याची काय सांगू मात ?
आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात ।।

मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर ।
अरे, इचू, साप बरा, त्याले उतारे मंतर !

मन चपय चपय, त्याले नही जरा धीर ।
तठे व्हयीसनी ईज, आलं आलं धर्तीवर ।।

मन एवढं एवढं, जसा खाकसंचा दाना ।
मन केवढं केवढं ? आभायात बी मायेना ।।

देवा, कसं देलं मन, आसं नही दुनियांत !
आसा कसा रे तू योगी, काय तुझी करामत !

देवा आसं कसं मन ? आसं कसं रे घडलं ?
कुठे जागेपनी तूले, असं सपनं पडलं !

. . . . . . . . . . . . .

माणसाच्या आयुष्यात मनाचे स्थान सर्वात मोठे आहे हे सांगून झाले आहेच. आपल्या जीवनाच्या गाडीच्या ड्रायव्हरच्या सीटवर आपले मन बसलेले असते आणि रस्त्यामधले खड्डे किंवा अडथळे चुकवून, प्रसंगी वेग वाढवून किंवा धीमा करून आपल्या जीवनाला ते पुढे नेत असते. इतर लोक दहा मुखांनी दहा सल्ले देत असतात. त्यातला आपल्याला सोयीचा आणि लाभदायक असा सर्वात योग्य कोणता हे मनच ठरवते कारण सर्व परिस्थितीची पूर्ण जाणीव त्यालाच असू शकते. त्यामुळेच “ऐकावे जगाचे आणि करावे मनाचे.” अशी एक म्हण आहे. कोणतीही गोष्ट “करू, करू” असे नुसते तोंडदेखले म्हणणारे लोक सहसा कधी कृती करत नाहीत, पण एकाद्याने ते काम मनावर घेतले तर मात्र तो माणूस ती गोष्ट पूर्ण करतो. त्यासाठी त्याच्या मनाने त्यात सहभागी होणे आवश्यक आहे. सांगाल तेवढेच काम करणाऱ्या सांगकाम्याचा बैल रिकामाच राहतो तसेच यंत्रवत हालचालीमधून केलेल्या विचारशून्य कृतीमधून सहसा फारसे काही साध्य होत नाही. एकाद्या कार्यासाठी कायावाचामनसा वाहून घेतल्यानंतर ते सिध्दीला जाते. तनमनधन अर्पण करणे म्हणजे संपूर्ण समर्पण झाले. अर्थातच त्यात मनाचा वाटा फार मोठा आणि मोलाचा असतो. अनेक मार्गांनी धन मिळवता येते आणि दाम देऊन तन (मनुष्यबळ) विकत घेता येते पण मनावर मात्र दुसरा कोणीसुध्दा ताबा मिळवू शकत नाही. ते ज्याचे त्यानेच स्वेच्छेने अर्पण करावे लागते.

मनाचे हे अनन्यसाधारण महत्व ओळखूनच समर्थ रामदासांनी अनेक मनाचे श्लोक लिहून जनतेच्या मनातल्या सज्जनाला आवाहन केले आणि त्याला उपदेशामृत पाजून सन्मार्गाला जाण्यास उद्युक्त केले. भक्तीमार्गाचा मार्ग धरून अंती मोक्षप्राप्ती करण्याचा उपदेश त्यात आहे असे वर वर पाहता वाटते. पण परमार्थ साधता साधता त्याआधी या जगात कसे वागावे याची सोपी शिकवण त्यात दिली आहे. शतकानुशतके पारतंत्र्यात भरडलेल्या मनांची मरगळ झटकून त्यांना कार्यप्रवृत्त करण्याचा प्रयत्न या सोप्या पण मनाला भिडणाऱ्या श्लोकांमधून समर्थांनी केला होता.

इतर साधूसंतांनीदेखील जनतेच्या मनालाच आवाहन करून भक्तीमार्गावर नेले. मोक्ष, मुक्ति असे कांहीही मिळवण्यासाठी आधी मनाला प्रसन्न ठेवा, त्यात देवाची मूर्ती ठेवा आणि मनोमनी त्याची पूजा करा म्हणजे सगळे तुमच्यामनासारखेच होईल असे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी सांगितले आहे.

मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचें कारण ।
मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ।।१।।

मनें प्रतिमा स्थापिली । मनें मना पूजा केली ।
मनें इच्छा पुरविली । मना माउली सकळांची ।।२।।

मन गुरु आणि शिष्य । करि आपुलेंचि दास्य ।
प्रसन्न आपआपणास । गति अथवा अधोगती ।।३।।

साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात ।
नाहीं नाहीं आन दैवत । “तुका” म्हणे दुसरें ।।४।।

एकदा विठ्ठलाचे चरणी लीन झाल्यानंतर मनाला दुसरीकडे कोठेही जायला नको असे वाटते असे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज दुसऱ्या एका  अभंकात  म्हणतात,

आता कोठे धावे मन । तुझे चरण देखलीया ॥१॥
भाग गेला शीण गेला । अवघा झाला आनंद ॥२॥
प्रेमरसे बैसली मिठी । आवडी लाठी मुखाशी ॥३॥
तुका म्हणे आम्हा जोगे । विठ्ठला घोगे खरे माप ॥४॥

संत एकनाथांनी हाच भाव वेगळ्या शब्दांमध्ये सांगितला आहे. एकदा त्या गोविंदाचा छंद लागला की दुसरी कसली काळजी नाही, दुसरा कसला विचारच मनात आणण्याची गरज नाही.
माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद ॥१॥
तेणो देह ब्रम्हरूप गोविंद नि जसे रामरूप ॥२॥
तुटेल सकळ उपाधी, निरसेल आधी व्याधी ॥३॥
गोविंद हा जनी-वनी, म्हणे एका जनार्दनी ॥४॥

संत गोरा कुंभाराच्या जीवनावरील चित्रपटातल्या गीतात गदिमांनी या भावना अशा व्यक्त केल्या आहेत,

तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम ।
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम ।।

देहधारी जो-जो त्यासी विहीत नित्यकर्म ।
सदाचार नीतीहुनी आगळा ना धर्म ।
तुला आठवावे, गावे, हाच एक नेम ।।

तुझे नाम पांडुरंगा सर्व ताप नाशी ।
वाट प्रवासासी देती स्वये पाप राशी ।
दिसो लागली तू डोळा अरुपी अनाम ।।

तुझ्या पदी वाहिला मी देहभाव सारा ।
उडे अंतराळी आत्मा, सोडुनि पसारा ।
नाम तुझे घेतो गोरा, म्हणूनी आठयाम ।।

तर गोरा कुंभार या नाटकातले अशोकजी परांजपे यांचे पद असे आहे,

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर ।
चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर ।।

बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले ।
वृद्धपणी देवा आता दिसे पैलतीर ।।

जन्म-मरण नको आता, नको येरझार ।
नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडिवार ।।

चराचरापार न्या हो जाहला उशीर ।
पांडुरंग पांडुरंग मन करा थोर ।।

संत तुकारामाचे मन विठ्ठलाच्या चरणी रमले होते तर संत तुलसीदासाचे मन श्रीरामामध्ये विलीन झाले होते. खूप जुन्या काळातल्या तुलसीदास या नाटकातले गोविंदराव टेंबे यांचे पद असे आहे.

मन हो रामरंगी रंगले।
आत्मरंगी रंगले, मन विश्वरंगी रंगले ।।

चरणी नेत्र गुंतले, भृंग अंबुजातले ।
भवतरंगी रंगले ।।

मन या विषयावर असंख्य गीते आहेत. त्यातली माझी आवडती तसेच तुफान लोकप्रिय असलेली काही गाणी निवडून या लेखाचा प्रपंच केला आहे. संत ज्ञानेश्वरांच्या सगळ्याच रचना महान आहेत. त्यात गाठलेली विचारांची उंची आणि शब्दांमध्ये दडलेला गहन अर्थ समजून घेणे सोपे नाही. हे “विश्वचि माझे घर” किंवा “चिंता करतो विश्वाची” असे सहजपणे सांगून जाणाऱ्या ज्ञानेश्वरांनी विश्वरूप परमात्म्याशी त्यांचे मन कसे एकरूप होऊन गेलेले आहे हे या अभंगात सांगितले आहे. यावर आणखी भाष्य करण्याची माझी योग्यताच नाही.

विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले ।
अवघे चि जालें देह ब्रम्ह ॥१॥

आवडीचें वालभ माझेनि कोंदटलें ।
नवल देखिलें नभाकार गे माये ॥२॥

रखुमादेवीवरू सहज नीटु जाला ।
हृदयीं नीटावला ब्रम्हाकारें ॥३॥

. . . . . . . . . . . . . . (समाप्त)

तेथे कर माझे जुळती – ८ – श्री.यशवंत देव

तेथे कर माझे जुळती – ८ – श्री.यशवंत देव (पूर्वार्ध)

YashavantDeo
प्रत्येक लोकप्रिय गाण्यामागे गीतकार, संगीतकार आणि गायक वगैरे अनेक मंडळी असतात हे आता सर्वांना माहीत असते, पण माझ्या लहानपणी आमच्या लहानशा गावात यांची विशेष चर्चा होत नसे. सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर किंवा गायक सुधीर फडके यांनी अमके तमके गाणे गायिले आहे इतपत त्या गाण्यासंबंधीची थोडीशी माहिती केंव्हा केंव्हा मिळायची, काही गाणी शाळेच्या पाठ्यपुस्तकात कविता म्हणून समोर येत असत, त्यांच्या कवींची नावे पाठ करावी लागत, पण गाण्यांना फक्त चाली लावण्याचे सत्कार्य करणारा कोणी वेगळा महान संगीतकार असतो हे मात्र त्या काळात कोणाकडून ऐकले नव्हते. या गोष्टीला काही महत्व असते हेच मुळात मला ठाऊक नव्हते. अशा त्या अज्ञानी बाळपणाच्या काळापासून मी महान कवी, गायक आणि संगीतकार श्री.यशवंत देव यांची कित्येक गाणी आवडीने ऐकत आलो होतो, फक्त ते मला माहीत नव्हते. त्यातली काही गाणी पुन्हापुन्हा गुणगुणून मला तोंडपाठही झाली होती. कॉलेजच्या शिक्षणासाठी शहरात आल्यानंतर गायक, गीतकार आणि संगीतकार काय काय वेगळे करतात ते जरा समजायला लागले. माझे काही मित्र या तीन्ही क्षेत्रातल्या विशिष्ट मोठ्या व्यक्तींचे चाहते असल्यामुळे त्यातला कोण श्रेष्ठ यावर नेहमी त्यांच्यात वाद चालत आणि त्यातून माझ्यासारख्या अज्ञानी मुलांना तत्वबोध मिळत असे.

गीतामधील भाव श्रोत्यांपर्यंत पोचवण्यासाठी संगीतकाराला काव्याची सखोल जाण असावी लागते आणि आपल्या काव्याचे गाणे होण्यासाठी त्यात नादमधुर आणि तालबद्ध शब्दरचना करण्यासाठी कवीला संगीताचे थोडे ज्ञान असणे चांगले असते. गायकाला तर गीतकाराच्या काव्यरचनेतले भाव संगीतकाराने केलेल्या स्वररचनेतून श्रोत्यापर्यंत पोचवायचे असल्यामुळे साहित्य आणि संगीत यांची चांगली जाण असावी लागते. पण कोणत्याही विषयाची उत्तम समज असणे एवढे नवनिर्मितीसाठी पुरेसे नसते. त्यासाठी मुळात प्रतिभा आणि त्यावर घेतलेले परिश्रम, व्यासंग, अभ्यास वगैरेंची साथ असावी लागते. काव्यरचना, संगीतरचना आणि गायन या गोष्टी एकमेकींना पूरक आणि काहीशा परस्परावलंबी असल्या तरी त्या तीन्ही क्षेत्रांमध्ये मोठा नावलौकिक मिळवणा-यांची संख्या फार कमी आहे आणि अशा लोकांमध्ये श्री.यशवंत देव अग्रगण्य असावेत.

ते आकाशवाणीवर काम करत असल्यामुळे त्यांचे नाव रेडिओवर नेहमी कानावर पडत होतेच, दूरदर्शन आल्यानंतर त्यांची सात्विक, सोज्ज्वळ आणि प्रसन्न मूर्ती टीव्हीच्या स्क्रीनवर दिसायला लागली. त्यांचे भावस्पर्शी पण मुद्देसूद बोलणे, आपले विचार समजावून सांगण्याची हातोटी, प्रामाणिकपणाच्या जोडीला बराचसा मिश्किलपणा वगैरेंमुळे त्यांना पहात आणि ऐकत रहावे असे वाटत असे. गायन, चर्चा, मुलाखत अशा कोणत्याही मिषाने ते कार्यक्रमात येणार असले तर मी तो कार्यक्रम आवर्जून पहात असे. तंत्रज्ञान हे माझे कार्यक्षेत्र सर्वस्वी वेगळे असल्यामुळे कामाच्या निमित्याने त्यांची भेट घडण्याची मुळीच शक्यता नव्हती, पण माझ्या मनात त्याची तीव्र इच्छा मात्र होत होती. “इच्छा असेल तर मार्ग सापडतो” असे म्हणतात. या बाबतीत तो आपण होऊन माझ्यासमोर आला.

सुमारे वीस एक वर्षांपूर्वी योजना प्रतिष्ठानतर्फे श्री.यशवंत देव यांच्या मार्गदर्शनाखाली एक सुगम संगीताची कार्यशाळा झाली होती. त्यात अलकाला म्हणजे माझ्या पत्नीला प्रवेश मिळाला. या कार्यशाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी करून ‘बोल संतांचे’ नावाचा एक छान जाहीर कार्यक्रम सादर केला गेला. कर्नाटक संघाच्या हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाची रंगीत तालीम दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये ठेवली होती. ती पहाण्यासाठी कोणाला आमंत्रण नव्हतेच, पण त्यात भाग घेणा-यांना घरी परत जाण्यासाठी सोबत करायच्या निमित्याने माझ्यासारखे मोजके आगांतुक उपटसुंभ पाहुणे आले होते. रंगीत तालीम सुरू होताच सर्व गायक, गायिका, वादक वगैरे मंडळी स्टेजवर गेली आणि संयोजक मंडळी त्याच्या आसपास राहिली. कार्यक्रम पाहण्यासाठी श्री.यशवंत देव समोरच्या खुर्चीवर विराजमान झाले. कदाचित मी इतर लोकांमध्ये वयाने सर्वात मोठा असल्याने मला त्यांच्या शेजारी जागा दिली गेली. ओळख, नमस्कार वगैरे औपचारिक भाग झाल्यानंतर काय बोलावे, कुठून सुरुवात करावी याचा मला प्रश्न पडला होता, तेवढ्यात कार्यक्रमच सुरू झाला.

त्यांनी बसवलेल्या सांगीतिक कार्यक्रमावर कोणत्याही प्रकारचा शेरा मारण्याची माझी पात्रता नव्हतीच, प्राज्ञाही नव्हती. शिवाय मला खरोखर तो इतका चांगला वाटत होता की त्यात कोणती उणीव दिसतच नव्हती. ‘छान’, ‘मस्त’, ‘वा! वा!’ वगैरे उद्गार काढण्यापलीकडे काही करणे मला शक्यच नव्हते. देव सर मात्र प्रत्येक स्वर कान टवकारून ऐकत होते आणि प्रत्येक हालचाल लक्षपूर्वक पहात होते. त्यातल्या सूक्ष्म बारकाव्यांबद्दल नेमक्या सूचना देत होते. वीस बावीस नवशिके गायक आणि पाच सात नवखे वादक यांच्या व्यक्तीमत्वातले किंवा कौशल्यातले सारे कंगोरे एवढ्या कमी अवधीमध्ये घासून पूर्णपणे काढून टाकणे शक्य नव्हतेच, पण काही वेळा देव सरांना ते टोचत होते. या अत्यंत ‘रॉ’ अशा प्रकारच्या ‘मटीरियल’पासून अप्रतिम सांगीतिक शिल्पकृती बनवण्याचे कार्य त्यांनी साकार केले होतेच, त्याला जास्तीत जास्त पॉलिश करण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला दिसत होता. त्यात ते जराही कसूर करत नव्हते. लता मंगेशकर, आशा भोसले, अरुण दाते यांच्यासारख्या कसलेल्या गायकांकडून गाणी म्हणवून घेणारे यशवंत देव या नवख्या, होतकरू आणि हौशी गायकांसाठी एवढी मेहनत घेत असलेले पाहून मला काय वाटले ते शब्दात सांगता येणार नाही.

‘बोल संतांचे’ या कार्यक्रमात अनेक संतांचे अभंग आणि पदे यांना नव्या चाली लावून ती गाणी सादर केली होती. समोर बसलेल्या एक किंवा दोन मुख्य गायक गायिकेने त्यातल्या सर्व ओळी गायच्या आणि बाकीच्या सर्वांनी त्यातील ध्रुपद आणि काही ओळी कोरसमध्ये गायच्या असे ठरवले होते. जास्तीत जास्त नव्या कलाकारांना व्यासपीठावर गाण्याची संधी मिळावी या हेतूने बहुतेक प्रत्येक गाण्यासाठी वेगवेगळे लीड आर्टिस्ट निवडले होते. त्या काळात चांगल्या प्रतीचे कॉर्डलेस माईक मिळत नसावेत. त्यामुळे बोजड स्टँडसकट सात आठ माइक आणले होते आणि त्यातले काही पुढच्या बाजूला आणि काही मागच्या बाजूला पसरून ठेवले होते. एक गाणे संपल्यानंतर पुढच्या गाण्यासाठी एकादा गायक मागून पुढे यायचा आणि आधीचा गायक मागे जाऊन बसायचा. दोन गाण्यामधील वेळात निवेदकाचे बोलणे चालत असतांना हा बदल केला जात होता. हे सुलभ रीतीने व्हावे यासाठी प्रत्येकाच्या जागा ठरवून दिल्या होत्या. एक गायक जागा बदलत असतांना माइकच्या वायरशी किंचित अडखळला ही गोष्ट देवांच्या नजरेने टिपली आणि हे असे का झाले याची त्यांनी चौकशी केली. रिहर्सलला थोडा गोंधळ झाला तरी मुख्य कार्यक्रमात तो होणार नाही असे भोंगळ उत्तर त्यांना मान्य नव्हते. कोणते माइक नेमके कोठे ठेवले जातील आणि त्यांच्या वायरी कशा जोडल्या जातील हे सर्व जातीने पाहून कोणतीही वायर कोणाच्याही पायात येणार नाही याची जबाबदारी एकाने घेतल्यावर त्यांचे समाधान झाले. इतकी पक्की तयारी करून घेतल्यानंतर कर्नाटक संघातला मुख्य कार्यक्रम नुसता निर्विघ्नपणे पार पडला नाही तर तो अप्रतिम झाला हे सांगायची गरजच नाही. प्रत्येक गाण्याला टाळ्यांचा कडकडाट करून श्रोत्यांनी सभागृह डोक्यावर घेतले. यातली सर्व कलाकार मंडळी ही हौशी आणि शिकाऊ आहेत असे मुळी वाटतच नव्हते. इतके ते सफाईदार झाले. श्री.यशवंत देवांचे कुशल मार्गदर्शन आणि योजनाताईंचे योजनाबद्ध संयोजन यांनी ही किमया घडवून आणली होती.

. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .. . . . . .. . . .

तेथे कर माझे जुळती – ८ – श्री.यशवंत देव (उत्तरार्ध)

yashavantDev2

वाद्यसंगीत किंवा शास्त्रीय संगीतातला तराणा यांना भाषा नसते. ख्यालगायनामध्ये असलेली तीन चार ओळींची बंदिश तासभर घोळवूनसुद्धा अनेक वेळा तिच्यातले सगळे शब्द कळत नाहीत. सुगम संगीतात मात्र संगीताबरोबर त्यातील काव्याला खूप महत्व असते. शास्त्रीय संगीताच्या मैफलीतले गवय्ये काही वेळा असे गातात की त्या गाण्यातल्या मनाला स्पर्श करणा-या भावनांपेक्षा त्यांचा मालकंस किंवा मारवाच मनाला जास्त भिडतो. श्री.यशवंत देव यांच्या गाण्यामध्ये मात्र नेहमीच शब्दांना पहिला मान मिळतो. ‘शब्दप्रधान गायकी’ या विषयावर त्यांनी पुस्तकही लिहिले आहे आणि या विषयावर ते प्रात्यक्षिकांसह जाहीर व्याख्याने देत असत. कोणत्याही गाण्यातले शब्द महत्वाचे असतातच, पण फक्त योग्य शब्दरचना करून भागत नाही. त्याच्या उच्चारातील फरकामुळे गाण्यातच नव्हे तर बोलण्यातसुद्धा किती फरक पडतो हे ते अत्यंत मनोरंजक उदाहरणे देऊन दाखवत. त्यातले एक माझ्या अजून लक्षात राहिले आहे. एका वाक्यातले शब्द असे आहेत
हा रामा काल सकाळी का आला नाही?
वेगवेगळ्या शब्दांवर जोर देण्याने त्याचा अर्थ कसा बदलतो पहाः
हा रामा काल सकाळी का आला नाही? … आलेला रामा वेगळा होता
हा रामा काल सकाळी का आला नाही? ….. गोविंदा कशाला आला?
हा रामा काल सकाळी का आला नाही? … आज उगवतो आहे किंवा परवाच येऊन गेला
हा रामा काल सकाळी का आला नाही? …… सायंकाळी किंवा रात्री आला
हा रामा काल सकाळी का आला नाही? …. न येण्याचे कारण काय?

संगीतातले एक मजेदार उदाहरण पहाः तीन वेगवेगळ्या गवयांना चार शब्द दिले होते. रोको मत जाने दो. त्यांनी ते असे गाऊन दाखवले
रोओओओको रोओओओओको रोको, मत जाने दो ……. अरे त्याला थांबवा
रोको मअतअ, रोको मअअअतअ, रोको मअतअ, जाने दो … त्याला जाऊ द्या ना
रोओओओओकोओओ, मअअअतअ, जाआआनेएए, दोओओ … काही ही करा

त्यांनी केलेल्या अनेक स्वररचनांमागे त्यानी केलेला विचार व्याख्यानात मांडून त्यातील चालीत किंवा उच्चारात बदल केल्यास त्या गाण्याचा अर्थ किंवा त्यामधील भावांच्या छटा कशा बदलतात हे सविस्तर सांगतांना ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करायचे. एकाद्या गीताच्या जन्मापासून ते रेकॉर्ड होऊन श्रोत्यांपर्यंत पोचेपर्यंत त्याचा प्रवास कसा होतो याचे मनोरंजक किस्से सांगायचे. हा कार्यक्रम मी टीव्हीवरही पाहिला आणि प्रत्यक्ष समोर बसूनही त्याची मजा घेतली. मला अतीशय आवडलेल्या कार्यक्रमांत तो येतो.

यशवंत देवांनी सुंदर कविता किंवा गीते तर लिहिली आहेतच, अत्यंत मजेदार विडंबने केली आहेत. पत्नीची मुजोरी या नावाने त्यांचा संग्रह प्रसिद्ध आहे. याबद्दल बोलतांना त्यांनी एकदा सांगितले की ते जेंव्हा गायनाच्या कार्यक्रमांना जात असत तेंव्हा श्रोतेगण त्यांना ज्या फर्माइशी करत त्यातली काही गाणी त्यांची नसायची. त्या गाण्यांचे शब्द, सुरुवातीचे आणि अंत-यांमधले वाद्यसंगीताचे तुकडे, त्यातल्या आलाप, ताना, लकेरी यासारख्या सुरेख खास जागा वगैरे सर्व तपशीलासकट ती गाणी तयार असायची नाहीत आणि ते नसेल तर त्यात मजा येणार नाही. शिवाय त्यांची स्वतःची इतकी सुरेल गाणी असतांना त्यांनी इतरांची गाणी काय म्हणून तयार करून ठेवायची ? पण श्रोत्यांना एकदम नाही म्हणून नाराज करण्यापेक्षा त्यांच्या पदरात काही तरी तत्सम टाकावे म्हणून त्यांनी तत्कालीन लोकप्रिय गाण्यांच्या चालीवर स्वतः गाणी लिहिली आणि ती गायला सुरुवात केली. ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ या चित्रपटातले ‘देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघड दार देवा आता उघड दार देवा।’ हे गाणे एके काळी तुफान लोकप्रिय होते. त्याच्या चालीवर देवांनी गाणे रचले, ‘पत्नीची मुजोरी, घडे नित्य सेवा, मरण धाड देवा आता मरण धाड देवा।’ म्हणजे तिजोरीच्या दाराऐवजी स्वर्गाचे दार उघड! गंमत म्हणजे हे गाणे चालले असतांना त्यांच्या सौभाग्यवती करुणाताई बाजूलाच किंवा समोर बसलेल्या असायच्या आणि खिलाडूपणे त्याचा आनंद घ्यायच्या.

आम्ही त्यांच्या निरनिराळ्या कार्यक्रमांना अनेक वेळा उपस्थिती लावली. शक्य तोवर तो चुकवला नाही. ‘असे गीत जन्मा येते’, ‘शब्दप्रधान गायकी’ अशासारख्या कार्यक्रमांमध्ये ते जे सोदाहरण गंमतशीर निवेदन करत असत आणि त्यातले सूक्ष्म बारकावे हसत खेळत श्रोत्यांना समजावून सांगत असत त्यामुळे सुगम संगीताकडे पाहण्याची (किंवा ते ऐकण्याची आणि समजून घेण्याची) माझी क्षमता बरीच बदलली. मला पूर्वी माहीत नसलेल्या बारीक सारीक गोष्टींकडे मी लक्षपूर्वक पाहू लागलो. त्यांच्या आस्वादातून मला मिळणारा आनंद अनेकपटीने वाढला. बहुतेक वेळी यशवंत देवांचा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही स्टेजवर जाऊन त्यांना भेटून येत असू. अशी असंख्य माणसे त्यांना रोज भेटत असतील. पण ते जुनी ओळख असल्याप्रमाणे आपुलकी दाखवून नेहमी हसतमुखाने आमचा प्रणाम स्वीकारत असत आणि एकाद्या वाक्यातून ती ओळख पटवून देत असत. त्यामुळे आम्हाला धन्य वाटत असे.

त्यांना वयाची सत्तरी ओलांडली तेंव्हा एका मोठ्या सभागृहात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. पण त्यांचा दांडगा उत्साह आणि चपळपणा तरुणांना लाजवण्यासारखा होता. त्या कार्यक्रमाला कलाक्षेत्रातले सारे दिग्गज उपस्थित होते. मंगेश पाडगावकर, अरुण दाते, व.पु.काळे, पुरुषोत्तम दारव्हेकर ही नावे मला आठवतात, कदाचित अजूनही काही मोठे लोक असतील. यशवंत देवांना अभीष्टचिंतन करतांना त्या सर्वांनी एकमुखाने म्हंटले, ‘दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचुन झुलायचे।’ यावेळी बोलतांना दारव्हेकर मास्तरांनी एक जुना किस्सा ऐकवला. त्या काळात ते आणि यशवंत देव नागपूरला आकाशवाणीवर काम करत होते. एकदा संगीतकार जोग यांनी यशवंत देवांना अंतर्देशीय पत्रातून नव्या गाण्यासाठी स्वरलिपीतून काही ओळी लिहून पाठवल्या आणि त्यावर योग्य असे गाणे लिहायला सांगितले. त्या ‘दुरुन’ पोस्टाने आलेल्या चालीवर देवांनी गीत लिहून सादर केले, ‘स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी।’

यशवंत देवांच्या अशा खूप आठवणी स्मृतीच्या कप्प्यात साठवून ठेवल्या आहेत. हा लेख लिहिण्याच्या निमित्यांने त्यांना उजाळा मिळाला.

पावसाची गाणी – भाग ४

पूर्वीचे भागः भाग १,   भाग २,   भाग ३    अनुक्रमणिका

पूर्वीच्या काळी मुलामुलींची लग्ने खूप लहान वयात होत असत. श्रावण महिन्यात मंगळागौर, नागपंचमी, रक्षाबंधन वगैरे सण येतात, सासरी गेलेल्या नव-या मुली त्या निमित्याने पावसाळा सुरू होण्याच्या आधीच माहेरपणाला येत असत आणि माहेरपणाचे सुख उपभोगून झाल्यावर झाल्यावर सासरी परत जात असत. त्यांच्यासाठी खाऊचे डबे, पापड, लोणची, मुरंबे, परकर-पोलकी किंवा साडी-चोळी वगैरेची गाठोडी बांधून त्यांची रीतसर पाठवणी केली जात असे. या पार्श्वभूमीवर कवी सुधीर मोघे यांनी ‘हा खेळ सावल्यांचा’ या चित्रपटासाठी लिहिलेल्या या गीतात भाताच्या रोपांना नव्या नवरीची उपमा दिली आहे. कोकणात भातशेती करतांना आधी एका लहान जागेत भाताचे खूप दाणे फेकले जातात आणि त्यातून अगदी जवळ जवळ रोपे उगवतात. ती थोडी वर आली की उपटून आणि दोन रोपात पुरेसे अंतर सोडून ओळीत लावली जातात. नव्या जागेवर त्यांची व्यवस्थित वाढ होते, त्यांना बहर येतो, त्यातून भाताचे पीक येऊन समृध्दी येते. भाताच्या रोपांची लावणी म्हणजे त्यांनी माहेरी लहानपण काढून पुढील आयुष्यात सासरी जाण्यासारखेच झाले. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलेल्या अप्रतिम चालीवर आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि साथीदारांनी गायिलेले हे समूहगीत सर्वच दृष्टीने फारच छान आहे.

आला आला वारा संगे पावसाच्या धारा ।
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा ।।

नव्या नवतीचं बाई लकाकतं रूप ।
माखलं ग ऊन जणू हळदीचा लेप ।
ओठी हसू पापणीत आसवांचा झरा ।।

आजवरी यांना किती जपलं जपलं ।
काळजाचं पानी किती शिपलं शिपलं ।
चेतवून प्राण यांना दिला ग उबारा ।।

येगळी माती आता ग येगळी दुनिया ।
आभाळाची माया बाई करील किमया ।
फुलंल बाई पावसानं मुलुख ग सारा ।।

आकाशात आलेल्या मेघमालांना पाहून मोर आनंदाने नाचू लागतात ही एक सर्वमान्य संकल्पना आहेच, केवड्याच्या बागेत एका मोराला नाचतांना पाहून मेघांना गहिवरून आले आणि त्याने वर्षाव केला अशी कल्पना कवी श्री.अशोकजी परांजपे यांनी एका कवितेत मांडली आहे. पुढे मनामधील भावनाविश्वातील तरंगांचे वर्णन आहे. अलीकडच्या काळातील उत्कृष्ट संगीत दिग्दर्शकांमध्ये श्री.अशोक पत्की यांची प्रामुख्याने गणना होते. त्यांनी केलेल्या संगीतरचनेवर सुमन कल्याणपूर यांनी हे अत्यंत गोड गीत गायिले आहे.

केतकीच्या बनी तिथे, नाचला ग मोर ।।
गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर ।।
पापणीत साचले, अंतरात रंगले ।
प्रेमगीत माझिया मनामनात धुंदले ।
ओठांवरी भिजला ग आसावला सूर ।।

भावफूल रात्रिच्या अंतरंगि डोलले ।
धुक्यातुनी कुणी आज भावगीत बोलले ।
डोळियांत पाहिले, कौमुदीत नाचले ।
स्वप्नरंग स्वप्नीच्या सुरासुरांत थांबले ।
झाडावरी दिसला ग भारला चकोर ।।

वरील गाणे खूप वर्षांपूर्वीचे आहे. थोड्याच वर्षांपूर्वी आलेल्या आईशप्पथ या सिनेमासाठी कवी सौमित्र यांनी लिहिलेल्या एका वर्षागीतालाही अशोक पत्की यांनी नव्या प्रकारची छान संगीतरचना केली आहे. त्यांनी दिलेल्या चालीवर साधना सरगम या हिंदी चित्रपटसंगीताच्या क्षेत्रात नावाजलेल्या मराठी गायिकेने हे मधुर गाणे गायिले आहे.

ढग दाटूनि येतात, मन वाहूनी नेतात ।
ऋतु पावसाळी सोळा, थेंब होऊनी गातात ।।
झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची । सर येते माझ्यात ।।
माती लेऊनीया गंध, होत जाते धुंद धुंद ।
तिच्या अंतरात खोल अंकुरतो एक बंध ।
मुळे हरखूनि जातात, झाडे पाऊस होतात ।
ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात ।।
झिम्मड पाण्याची ……

सुंबरान गाऊ या रं, सुंबरान गाऊ या ।
झिलरी झिलरी आम्ही तुम्ही, सुंबरान गाऊ या ।
सुंबरान गाऊ या रं, सुंबरान गाऊ या ।।

जीव होतो ओला चिंब, घेतो पाखराचे पंख ।
साऱ्या आभाळाला देतो एक ओलसर रंग ।
शब्द भिजूनि जातात अर्थ थेंबांना येतात ।
ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात ।।
झिम्मड पाण्याची …….

‘येरे येरे पावसा’ या काही पिढ्यांपासून चालत आलेली पावसावरील बालगीतांची परंपरा चालतच राहिली आहे. ‘पाऊस आला वारा आला’ हे श्रीनिवास खळे यांनी संगीतबध्द केलेले एक गाणे आधीच्या भागात येऊन गेले आहे. त्यांनीच संगीत दिलेले आणि आशा भोसले यांनी गायिलेले श्रीनिवास खारकर यांचे एक गीत असेच अजरामर झाले आहे. अलीकडे सारेगमपच्या स्पर्धेमध्ये बालकराकारांनी हे गाणे सादर केले तेंव्हा ”हे गाणे आमच्या लहानपणी आम्ही गात होतो” असे उद्गार परीक्षकांनी काढले होते.

टप टप टप काय बाहेर वाजतंय्‌ ते पाहू ।
चल्‌ ग आई, चल्‌ ग आई, पावसात जाऊ ।।
भिरभिरभिर अंगणात बघ वारे नाचतात !
गरगर गरगर त्यासंगे, चल गिरक्या घेऊ ।।

आकाशी गडगडते म्हातारी का दळते ?
गडड्‍गुडुम गडड्‍गुडुम ऐकत ते राहू ।।

ह्या गारा सटासटा आल्या चटाचटा ।
पट्‌ पट्‌ पट्‌ वेचुनिया ओंजळीत घेऊ ।।

फेर गुंगुनी धरू, भोवऱ्यापरी फिरू ।
“ये पावसा, घे पैसा”, गीत गोड गाऊ ।।
पहा फुले, लता-तरू, चिमणी-गाय-वासरू ।
चिंब भिजती, मीच तरी, का घरात राहू ?

लतादीदी, आशाताई, उषाताई आणि हृदयनाथ ही चार मंगेशकर भावंडे संगीताच्या क्षेत्रात सर्वोच्च पातळीवर जाऊन पोचली आणि दीर्घकाळ त्यांनी त्या क्षेत्रावर राज्य केले आहे. त्यांनाच मीना खडीकर नावाची एक सख्खी बहीण आहे आणि ती देखील त्यांच्यासारखीच संगीतात प्रवीण आहे या गोष्टीला मात्र तेवढी प्रसिध्दी मिळालेली नसल्यामुळे काही लोकांना ते माहीत नसण्याची शक्यता आहे. या मीनाताईंनी सुप्रसिध्द कवयित्री वंदना विटणकर यांच्या गीताला लावलेल्या चालीवरील खाली दिलेले गाणे गाजले होते. सारेगमपच्या बालकलाकारांच्या स्पर्धेमधून ते अलीकडे पुन्हा ऐकायला मिळाले. ते ऐकतांना मला जगजितसिंगांच्या ‘वो कागजकी कश्ती, वो बारिशका पानी’ या सुप्रसिध्द गाण्याची आठवण आली.

ए आई मला पावसात जाउ दे ।
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे ।।

मेघ कसे बघ गडगड करिती ।
विजा नभांतुन मला खुणविती ।
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे ।।

खिडकीखाली तळे साचले ।
गुडघ्याइतके पाणी भरले ।
तऱ्हेतऱ्हेच्या होड्यांची मज शर्यत ग लावु दे ।।
बदकांचा बघ थवा नाचतो ।
बेडुक दादा हाक मारतो ।।
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करु दे ।।

धारेखाली उभा राहुनी ।
पायाने मी उडविन पाणी ।
ताप, खोकला, शिंका, सर्दी, वाट्टेल ते होऊ दे ।।

आताची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकतात, इंजिनियर, डॉक्टर, एमबीए, सीए वगैरे होऊन पैसे कमावण्याच्या मागे लागतात. त्यामुळे मराठी भाषा, त्यातले साहित्य, विशेषतः काव्य वगैरे लयाला चालले आहे अशी भीती काही जुन्या लोकांना वाटते. अशा या वर्तमानकाळात फक्त कवितांचे वाचन आणि गायन यांचा कार्यक्रम करायचे साहस कोणी करेल आणि त्याला भरपूर श्रोते मिळतील अशी कल्पनासुध्दा कुणाच्या मनात आली नसेल. पण कवी संदीप खरे आणि गायक व संगीतकार सलील कुळकर्णी या जोडगोळीने ‘आयुष्यावर बोलू काही’ या नावाने असा एक अफलातून कार्यक्रम रंगमंचावर आणला आणि मोठमोठ्या सभागृहांमध्ये त्याचे हाऊसफुल प्रयोग करून दाखवले. त्यातल्याच एका पावसावरील बालगीताने या लेखमालेची सांगता करतो. ‘येरे येरे पावसा’ पासून ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ पर्यंतचा हा प्रवास वाचकांना पसंत पडावा अशी त्या इंद्रदेवालाच मनोमन प्रार्थना करतो.

अग्गोबाई ढग्गोबाई, लागली कळ ।
ढगाला उन्हाची केवढी झळ ।
थोडी न्‌ थोडकी लागली फार ।
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार ।।

वारा वारा गरागरा सो सो सूम्‌ ।
ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम ।
वीजबाई अशी काही तोऱ्यामधे खडी ।
आकाशाच्या पाठीवर चमचम छडी ।।

खोलखोल जमिनीचे उघडून दार ।
बुडबुड बेडकाची बडबड फार ।
डुंबायला डबक्याचा करूया तलाव ।
साबु-बिबु नको थोडा चिखल लगाव ।।

. . . . . . . . . . . .. . . . . . . . (समाप्त)

पावसाची गाणी – भाग ३

पूर्वीचे भागःभाग १ , भाग २      पुढील भाग ४       अनुक्रमणिका

“जे न देखे रवि ते देखे कवी” असे म्हणतात. पावसाळ्याच्या दिवसात ढगाआड झाकून गेल्यामुळे सूर्यालाही कदाचित पृथ्वीवरचे स्पष्ट दिसत नसेल, पण अंधारातले किंवा अस्तित्वात नसलेले सुध्दा पाहण्याची दिव्यदृष्टी कवींकडे असते. तरीही ते स्वतः मात्र सहसा फारसे नजरेला पडत नाहीत. बालकवी ठोंबरे ज्या काळात होऊन गेले तेंव्हा दृकश्राव्य माध्यमे नव्हतीच, पण टेलिव्हिजन आल्यानंतरच्या काळातसुध्दा सुप्रसिध्द कवींचेही दर्शन तसे दुर्मिळच असते. स्व.ग.दि.माडगूळकरांना त्यांनी काम केलेल्या चित्रपटांमधील भूमिकांमध्ये मी पाहिले. त्यांच्या सुंदर कविता त्यांच्याकडून ऐकायची संधी कधी मिळाल्याचे आठवत नाही. सुरेश भट, आरती प्रभू, पी.सावळाराम वगैरे नावे हजारो वेळा ऐकली असली तरी त्यांना पडद्यावरसुध्दा क्वचितच पाहिले असेल. यशवंत देव यांना मात्र अनेक वेळा जवळून प्रत्यक्ष पहायची संधी मला सुदैवाने मिळाली, ती एक संगीतकार, गायक, विद्वान, विचारवंत, फर्डा वक्ता वगैरे म्हणून. प्रवीण दवणे यांना निवेदन करतांना पाहिले. मंगेश पाडगावकर, वसंत बापट आणि विंदा करंदीकर या त्रिमूर्तींनी काव्यवाचन या प्रकाराला प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून दिली होती. त्यातील वसंत बापट यांना एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतांना आणि विंदा करंदीकर यांना सत्कारमूर्ती म्हणून मी पाहिले. मंगेश पाडगावकर हे मात्र मला त्यांच्या कविता कळू आणि आवडू लागल्यापासून नेहमी नजरेसमोर येत राहिले आहेत. त्यांचे कार्यक्रम काही वेळा प्रत्यक्ष आणि अनेक वेळा टीव्हीवर पाहिले असल्यामुळे ते जवळचे वाटतात. माझ्या पिढीला मंगेश पाडगांवकरांच्या गीतांनी नुसतीच भुरळ घातली नाही तर जीवनाचा आस्वाद घेण्याची एक नवी दृष्टी दिली. बहुधा प्रथम मराठी आकाशवाणीवर आलेले आणि तुफान प्रसिध्दी पावलेले, अरुण दाते यांनी गायिलेले आणि पाडगावकर यांनी लिहिलेले पावसाच्या संदर्भातले एक अत्यंत भावपूर्ण प्रेमगीत पहा.

भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची ।
धुंद वादळाची होती रात्र पावसाची ।।
कुठे दिवा नव्हता, गगनी एक ही न तारा ।
आंधळ्या तमातुन वाहे आंधळाच वारा ।
तुला मुळी नव्हती बाधा भीतिच्या विषाची ।।
क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती ।
नावगाव टाकुनि आली अशी तुझी प्रीती ।
तुला परी जाणिव नव्हती तुझ्या साहसाची ।।
केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली ।
ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली ।
श्वासांनी लिहिली गाथा प्रीतिच्या रसाची ।।
सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास ।
स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास ।
सुखालाहि भोवळ आली मधुर सुवासाची ।।

अचाट कल्पकता आणि अद्भुत भाषासौंदर्य याचे सुरेख मिश्रण मला त्यांच्या कवितांमध्ये दिसते. मुख्य म्हणजे त्यांची अलंकारिक भाषा आणि त्यातील रूपके, प्रतिमा वगैरे माझ्या पार डोक्यावरून जात नाहीत. वर्षा ऋतूमधील सृष्टीचे रंग आणि गंध आपल्यासमोर साक्षात उभे करणारे पाडगावकरांनी लिहिलेले आणि संगीतकार श्रीनिवास खळे यांनी स्वरबध्द केलेले स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे हे गाणे पहा.

श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा ।
उलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा ।।

जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी ।
जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी ।
माझ्याही ओठांवर आले नाव तुझेच उदारा ।।

रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी ।
निळ्या रेशमी पाण्यावरती थेंबबावरी नक्षी ।
गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा ।।

पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदिचे आले ।
माझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरू झाले ।
मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा ।।

पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा ।
अशा प्रीतिचा नाद अनाहत, शब्दावाचुन भाषा ।
अंतर्यामी सूर गवसला, नाही आज किनारा ।।

संगीतकाराने दिलेल्या तालासुरावर शब्द गुंफून गीतरचना करणे मंगेश पाडगावकर यांना पसंत नव्हते. तसे त्यांनी कधीच केले नाही, त्यांनी लिहिलेल्या कविता त्यांना अंतःप्रेरणेने स्फुरतात असे ते आपल्या कार्यक्रमांमध्ये सांगतात. त्यामुळे त्यांच्या नावावर चित्रपटगीते दिसणार नाहीत. पण कवितेचे गाणे व्हायचे असल्यास तिची रचना एकाद्या वृत्तानुसार किंवा ठेक्यावर केलेली असणे आवश्यक असते. संगीताची उत्तम जाण पाडगावकरांना असणार आणि त्यामुळेच तालावर व्यवस्थित बसणारे नादमय शब्द गुंफून त्यांनी रचना केली आहे हे त्यांची गोड गीते ऐकतांना लक्षात येते. त्यांनी मुख्यतः भावगीते लिहिली असली तरी अगदी विडंबनासकट इतर प्रकारची गाणीसुध्दा लिहिली आहेत. त्यांनी पावसावर लिहिलेले एक मजेदार गाणे ज्यांना लहानपणी अत्यंत आवडले होते असे सांगणारे लोक आता वयस्क झाले आहेत, प्रश्न ऐकून मुंडी हलवणा-या नंदीबैलाला घेऊन रस्त्यावर हिंडणारे लोक आजकाल शहरात तरी दिसेनासे झाले आहेत, त्यामुळे आजच्या काळातल्या मुलांना त्यांचा संदर्भ लागणे कठीण झाले आहे, असे असले तरी या गाण्याचे शब्द आणि चाल यामुळे हे गाणे मात्र अजून लहान मुलांना आकर्षक वाटते.

सांग सांग भोलानाथ
सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचुन, सुट्टी मिळेल काय ?
भोलानाथ दुपारी आई झोपेल काय ?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ?
भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा ,
आठवड्यातून रविवार, येतील का रे तीनदा ?
भोलानाथ उद्या आहे, गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर ?
भोलानाथ भोलानाथ चॉकलेट मिळेल काय ?
आकाशातून वेफर्सचा पाऊस पडेल काय ?
भोलानाथ जादूचा शंख मिळेल काय ?
भोलानाथ परीसारखे पंख देशील काय ?
सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ?

आरती, पूजा, अक्षता यासारखी नावे मुलींना ठेवणे अजून सुरू झाले नव्हते त्या काळात प्रसिध्दीला आलेले आरती प्रभू हे नाव ऐकून ते एका कोवळ्या कॉलेजकुमारीचे नाव असेल असेच त्या काळात कोणालाही वाटले असते, पण चिं.त्र्यं,खानोलकर असे भारदस्त नाव असलेल्या एका प्रौढ माणसाने हे टोपणनाव धारण केले आहे असे समजल्यानंतर आपण कसे फसलो याचा विचार करून त्याला त्याचेच हंसूही आले असेल. त्यांनी लिहिलेल्या एका कवितेवरचा एक लेख मी वाचला होता. त्यात असे लिहिले होते की खाली दिलेल्या कवितेचे ध्रुपद आणि पहिले कडवे खानोलकरांनी खूप पूर्वी लिहिले होते आणि ती अर्धवटच सोडून दिली होती. कदाचित त्या वेळी त्यांना ती तेवढीच कविता पुरेशी वाटलीही असेल. पुढे अनेक वर्षांनंतर त्यांच्या काही गीतांना पं.हृदयनाथ मंगेशकरांनी संगीत देऊन त्यांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या आणि त्यांचे सोने झाले. त्या वेळी ही कविता बाळासाहेबांच्या वाचण्यात आली आणि त्यांनी बोलता बोलता त्याला चाल लावून ती गुणगुणून पाहिली. यातून एक मस्त गीत तयार होईल असे दोघांनाही वाटले आणि ते करायचे त्यांनी ठरवले. पण यासाठी एवढे लहानसे गाणे पुरेसे न वाटल्यामुळे आरती प्रभूंनी आणखी दोन कडवी लिहून दिली. या गाण्याचा अर्धा भाग एका वयात असतांना अंतःप्रेरणेने स्फुरला असेल आणि उरलेला भाग वेगळ्याच वयात आल्यानंतर मार्केटसाठी विचार करून रचला असेल असे हे गाणे ऐकतांना कधीच जाणवले नाही.

ये रे घना, ये रे घना, न्हाउ घाल माझ्या मना ।।

फुले माझि अळुमाळु, वारा बघे चुरगळू ।
नको नको म्हणताना, गंध गेला रानावना ।।
ये रे घना ।।
टाकुनिया घरदार नाचणार, नाचणार ।
नको नको म्हणताना, मनमोर भर राना ।।
ये रे घना ।।
नको नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू ।
बोलावतो सोसाट्याचा, वारा मला रसपाना ।।
ये रे घना ।।

ना.धों.महानोर यांची आता आजकालचे निसर्गकवी अशी ओळख तयार झाली आहे. ग्रामीण भागाचे दर्शन त्यांच्या कवितांमध्ये होत असल्यामुळे त्यात निसर्गाला मोठे स्थान असतेच. पावसाच्या आठवणीतूनच मनाला चिंब भिजवणारे त्यांचे हे सुप्रसिध्द गीत नव्या पिढीमधील संगीतकार कौशल इनामदार यांनी स्वरबध्द केले आहे.

मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले ।
घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले ।।

पाऊस पाखरांच्या पंखांत थेंब थेंबी ।
शिडकाव संथ येता झाडे निळी कुसुंबी ।।
मन चिंब पावसाळी …….

घरट्यात पंख मिटले झाडात गर्द वारा ।
गात्रात कापणारा ओला फिका पिसारा ।
या सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे ।
आकाश पांघरोनी मन दूरदूर जावे ।।
मन चिंब पावसाळी …….

रानात एककल्ली सुनसान सांजवेळी ।
डोळ्यात गल्बताच्या मनमोर रम्य गावी ।
केसात मोकळ्या त्या वेटाळुनी फुलांना ।
राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे ।।
मन चिंब पावसाळी मेंदीत माखलेले
त्या राजवंशी कोण्या डोळ्यात गुंतलेले
मन चिंब पावसाळी ………

निसर्गाचा परिणाम मनावर होतोच, पण कधी कधी मनातल्या भावनांमुळे निसर्गाचे रूप वेगळे भासते. आज तसाच पडत असलेला पाऊस कालच्या पावसाहून वेगळा वाटायला लागतो. संगीता जोशी यांनी लिहिलेल्या आणि श्रीधर फडके यांनी गायिलेल्या या गीताला सुप्रसिध्द संगीतकार श्री.यशवंत देव यांनी अत्यंत भावपूर्ण चाल लावली आहे. श्री यशवंत देव यांनी ‘शब्दप्रधान गायकी’ या विषयावर पुस्तक लिहिले आहे आणि ते यावर प्रात्यक्षिकासह कार्यक्रम करतात. अर्थातच त्यांच्या गाण्यांमधले सर्व शब्द स्पष्ट ऐकू येतात आणि चांगले समजतात.

जो काल इथे आला तो पाऊस वेगळा होता ।
आभाळ निराळे होते, तो मेघ वेगळा होता ।।
ओलेत्या चिंब क्षणीही रक्तात निखारे होते ।
ती जुनीच होती सलगी, पण स्पर्श कोवळा होता ।।
वेचली फुले थेंबांची ओठही फुलांचे होते ।
डोळ्यांत पावसामधला निथळता जिव्हाळा होता ।।

पाऊस असा आला की अद्याप थांबला नाही ।
ह्या अशा पावसासाठी सोसला उन्हाळा होता ।।
जीवनदायी पाऊस कधी कधी रौद्ररूप धारण करतो आणि विध्वंस करतो. अशा धिंगाणा घालू पाहणा-या पावसाला उद्देशून सुप्रसिध्द कवयित्री इंदिरा संत चार गोष्टी एका सुंदर कवितेत सांगतात.  “माझे चंद्रमौळी घरकूल, दारातला नाजुक सायलीचा वेल वगैरेंना धक्का लावू नको, छप्पराला गळवू नको, माझे कपडे भिजवू नकोस वगैरे सांगून झाल्यानंतर माझ्या सख्याला सुखरूप आणि लवकर घरी परतून आण, त्यानंतर वाटेल तेवढा धुमाकूळ घाल, मी तुला बोल लावणार नाही, तुझी पूजाच करीन.” श्री.यशवंत देव यांनी लावलेल्या अत्यंत भावपूर्ण चालीवर गायिका पुष्पा
पागघरे यांनी हे गाणे गायिले आहे.

नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी ।
घर माझे चंद्रमौळी, आणि दारात सायली ।।

नको नाचू तडातडा, अस्सा कौलारावरून ।
तांबे सतेली पातेली, आणू भांडी मी कोठून ।।

नको करू झोंबाझोंबी, माझी नाजूक वेलण ।
नको टाकू फूलमाळ, अशी मातीत लोटून ।।

आडदांडा नको येऊ, झेपावत दारांतून ।
माझं नेसूचं जुनेर, नको टाकू भिजवून ।।

किती सोसले मी तुझे, माझे एवढे ऐकना ।.
वाटेवरी माझा सखा, त्याला माघारी आणा ना ।।

वेशीपुढे आठ कोस, जा रे आडवा धावत ।
विजेबाई कडाकडून मागे फिरव पांथस्थ ।।

आणि पावसा, राजसा, नीट आणि सांभाळून ।
घाल कितीही धिंगाणा, मग मुळी न बोलेन ।।

पितळेची लोटीवाटी, तुझ्यासाठी मी मांडीन ।
माझ्या सख्याच्या डोळ्यांत तुझ्या विजेला पूजीन ।।

आपल्याला हव्या असलेल्या खुबीने सांगण्याचे कौशल्य स्त्रियांमध्ये उपजत असते. सोंगाड्या या चित्रपटातल्या या लावणीत कवी वसंत सबनीसांनी ही गोष्ट किती खुमासदार पध्दतीने दाखवली आहे पहा. तमाशाप्रधान चित्रपटांना संगीत देण्यात हातखंडा असलेल्या राम कदमांनी लावलेल्या चालीवर हे गाणेसुध्दा पुष्पा पागघरे यांनीच गायिले आहे.

नाही कधी का तुम्हास म्हटलं, दोष ना द्यावा फुका ।
अन्‌ राया मला, पावसात नेऊ नका ।।

लई गार हा झोंबे वारा ।
अंगावरती पडती धारा ।
वाटेत कुठेही नाही निवारा ।
भिजली साडी भिजली चोळी, भंवतील ओल्या चुका ।।
अन्‌ राया मला, पावसात नेऊ नका ।।
खबूतरागत हसत बसू या ।
उबदारसं गोड बोलू या ।
खुळ्या मिठीतच खुळे होऊ या ।
लावून घेऊ खिडक्या दारं, पाऊस होईल मुका ।।
अन्‌ राया मला, पावसात नेऊ नका ।।

ग्रामीण चित्रपटांना स्व.दादा कोंडके यांनी एक वेगळेच वळण लावले आणि लोकप्रियतेचे उच्चांक गाठून चमत्कार करून दाखवले. त्यांच्या सगळ्याच गाण्यांनी भरपूर खळबळ माजवली होता, त्यातल्या एका गाण्याने तर काही काळ अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यातला मुखडा सोडला तर कुठेच पावसाचा उल्लेख येत नाही आणि मुखडा पण थोडा विचित्रच वाटतो. कसा ते पहाच.

जसा जीवात जीव घुटमळं ।
तसा पिरतीचा लागतयं बळ ।
तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळं ।
ह्ये बघून दुष्मन जळं ।
वर ढगाला लागली कळ ।
पाणी थेंब थेंब गळं ।।

चल गं राणी, गाऊ या गाणी, फिरूया पाखरासंग ।
रामाच्या पार्‍यात, घरघर वार्‍यात, अंगाला भिडू दे अंग ।
जेव्हा तुझं नि माझं जुळं, पाणी थेंब थेंब गळं ।।

सुंदर मुखडा, सोन्याचा तुकडा, कुठे हा घेऊन जावा ।
काय बाई अप्रित, झालया विपरीत, सश्याला भितुया छावा ।
माझ्या पदरात पडाळंय खुळं, पाणी थेंब थेंब गळं ।।

जमीन आपली, उन्हानं तापली, लाल लाल झालिया माती ।
करूया काम आणि गाळूया घाम, चला पिकवू माणिकमोती ।
एका वर्षात होईल तिळं, पाणी थेंब थेंब गळं ।।

शिवार फुलतय, तोर्‍यात डुलतय, झोक्यात नाचतोय धोतरा ।
तुरीच्या शेंगा दावतात ठेंगा, लपलाय भूईमूग भित्रा ।
मधे वाटाणा बघ वळवळ, पाणी थेंब थेंब गळं ।।

बामनाच्या मळ्यात, कमळाच्या तळ्यात, येशील का संध्याकाळी ।
जाऊ दुसरीकडं, नको बाबा तिकडं, बसलाय संतू माळी ।
म्हाताऱ्याला त्या लागलाय चळ, पाणी थेंब थेंब गळं ।।

झाडावर बुलबुल, बोलत्यात गुलगुल, वराडतिया कोकिळा ।
चिमणी झुरते उगीच राघू मैनेवरती खुळा ।
मोर लांडोरीसंगं खेळं, पाणी थेंब थेंब गळं ।।

थुईथुई नाचते, खुशीत हासते, मनात फुलपाखरु ।
सोडा की राया, नाजूक काया, नका गुदगुल्या करु ।
तू दमयंती मी नळ, पाणी थेंब थेंब गळं ।।

आलोया फारमात, पडलोय पिरमात, सांग मी दिसतोय कसा ।
अडाणी ठोकळा, मनाचा मोकळा, पांडू हवालदार जसा ।
तुझ्या वाचून जीव तळमळं, पाणी थेंब थेंब गळं ।।

. . . . . . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

पावसाची गाणी – भाग २

आधीचा भाग : पावसाची गाणी १    पुढील भाग  : भाग ३,   भाग ४           अनुक्रमणिका

‘आषाढस्य प्रथमदिवसे’ आभाळात ‘मेघमाला’ दिसायला लागतात आणि पाहता पाहता त्याला झाकोळून टाकतात, टप टप, रिमझिम करता करता मुसळधार पाऊस पडायला लागतो, नदी-नाले पाण्याने दुथडी भरून वाहू लागतात. आषाढ संपून श्रावणमास सुरू होईपर्यंत त्याचा जोर जरा ओसरू लागलेला असतो, पण त्याने निसर्गात घडवलेली जादू बहराला आलेली असते. निसर्गकवी म्हणून प्रख्यात झालेले बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी या श्रावणमासाचा महिमा एका सुंदर कवितेत सांगितला आहे. याची परंपरागत चालीमध्ये ध्वनिफीतपण निघाली आहे.

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे ।
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे ।।
वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे ।
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे ।।
झालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा ! तो उघडे ।
तरूशिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे ।।
उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा ।
सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा ।।
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते ।
उतरूनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते ।।
फडफड करूनी भिजले अपुले पंख पाखरे सावरिती ।
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती ।।
खिल्लारे ही चरती रानीं, गोपही गाणी गात फिरे ।
मंजुळ पावा गाय तयाचा श्रावणमहिमा एकसुरे ।।
सुवर्णचंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला ।
पारीजातही बघता भामारोष मनीचा मावळला ।।

एके काळी मराठी चित्रपटगीतांच्या क्षेत्रात स्व.ग.दि.माडगूळकरांचे एकछत्र साम्राज्य होते आणि त्याच काळात गीतरामायणाची रचना करून आधुनिक वाल्मिकी अशी ख्यातीही त्यांना प्राप्त झाली होती. अशा शब्दप्रभू गदिमांनी वरदक्षिणा या चित्रपटासाठी लिहिलेले पर्जन्यराजाचे एक गाणे इतके गाजले की पावसाळा म्हंटले की या गाण्याचेच शब्द चटकन ओठावर येतात. संगीतकार वसंत पवार यांनी वर्षाकालाला अनुरूप अशा मेघमल्हार रागात याची सुरावट बांधली होती आणि हिंदी चित्रपटसंगीतीत शास्त्रीय संगीतावर आधारलेली गीते गाण्यात हातखंडा असलेल्या मन्ना डे यांच्याकडून ते गाऊन घेतले होते.

घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा ।
केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा ॥धृ.।।
कालिंदीच्या तटी श्रीहरी ।
तशात घुमवी धुंद बासरी ।
एक अनामिक सुगंध येतो, ओल्या अंधारा ॥१॥
कोसळती धारा ।।
वर्षाकालिन सायंकाली ।
लुकलुक करिती दिवे गोकुळी ।
उगाच त्यांच्या पाठिस लागे भिरभिरता वारा ॥२॥
कोसळती धारा ।।
कृष्णविरहिणी कोणी गवळण ।
तिला अडविते कवाड, अंगण ।
अंगणी अवघ्या तळे साचले, भिडले जल दारा ॥३॥
कोसळती धारा ।।

पुराणकालीन श्रीकृष्ण, राधा, गोपी, यमुनातट वगैरेंचा संबंध हिंदी किंवा मराठी गीतांमध्ये अनेक वेळा येत असतो, तसाच या गाण्यातसुध्दा गदिमांनी दाखवला आहे. पण आजच्या काळातल्या गोष्टीवर आधारित मुंबईचा जावई या सिनेमासाठी गदिमांनीच लिहिलेल्या एक गाण्यातसुध्दा पावसाचा उल्लेख येतो आणि स्व.सुधीर फडके यांनी मल्हार रागावर याची संगीतरचना करून वर्षाकालाचे वातावरण निर्माण केले आहे. यौवनात पदार्पण केलेल्या मुलीच्या मनात वयानुसार निसर्गाने निर्माण केलेल्या नाजुक भावना यात व्यक्त होतात. आशा भोसले यांनी त्या भावनांना छान उठाव दिला आहे.

आज कुणीतरी यावे, ओळखिचे व्हावे ।।
जशी अचानक या धरणीवर ।
गर्जत आली वळवाची सर, तसे तयाने गावे ।।
विचारल्याविण हेतू कळावा ।
त्याचा माझा स्नेह जुळवा, हाती हात धरावे ।।
सोडुनिया घर, नाती-गोती ।
निघून जावे तया संगती, कुठे तेही ना ठावे ।।
आज कुणीतरी यावे ।।

जेंव्हा स्व.ग.दि.माडगूळकरांचे नाव चित्रपटसंगीताच्या क्षेत्रात गाजत होते त्याच काळात सुप्रसिध्द कवयित्री शांताबाई शेळके यांनी काही चित्रपटांसाठी उत्कृष्ट गीतरचना केली आहे. जैत रे जैत या आदीवासींच्या जीनवावरील एका वेगळ्या प्रकारच्या चित्रपटासाठी त्यांनी ग्रामीण भाषेत हे गीत लिहिले होते किंवा त्यांनी लिहिलेल्या या सुरेख कवितेचा उपयोग केला गेला होता. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलेल्या आगळ्या प्रकारच्या चालींमुळे या सिनेमातली सारीच गाणी तुफान गाजली होती. आशा भोसले यांच्याच स्वरातले हे गाणे सुध्दा सुगमसंगीताच्या कार्यक्रमांमध्ये आजही ऐकायला मिळते.

नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं ।
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात ।।
अशा वलंस राती, गळा शपथा येती ।
साता जल्मांची प्रीती, सरंल दिनरात ।।
वल्या पान्यात पारा, एक गगन धरा ।
तसा तुझा उबारा, सोडून रीतभात ।।
नगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू ।
गाठ बांधला शालू, तुझ्याच पदरा ।।

पं. हृदयनाथ मंगेशकर आणि स्वरसम्राज्ञी लतादीदी यांनी एकत्र येऊन आणि स्व.हेमंतकुमारांनाही साथीला घेऊन तीन कोळीगीतांची एक अप्रतिम ध्वनिमुद्रिका काढली होती. त्या गीतांची रचनासुध्दा शांता शेळके यांनीच केली होती. श्रावण महिन्यात पावसाचा जोर ओसरू लागतो, खवळलेला समुद्र आपले रौद्ररूप सोडून शांत होऊ लागतो. नारळी पौर्णिमेला सागराला नारळ अर्पण करून कोळी बांधव मासेमारीचे काम पुनः सुरू करतात. पण कधी कधी निसर्ग अवचितपणे वेगळे रूप दाखवतो आणि त्याला न जुमानता निधड्या छातीचे वीर आपली नौका पाण्यात घेऊन जातात. अशा वेळी घरी राहिलेल्या त्याच्या सजणीचे मन कसे धास्तावते तसेच त्याच्यावर तिचा भरंवसाही असतो याचे सुंदर वर्णन शांताबाईंनी या कवितेत केले आहे.

वादलवारं सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो ।
भिरभिर वाऱ्यात, पावसाच्या माऱ्यात,
सजनानं होडीला पान्यात लोटलंय् ।।
वादलवारं सुटलं गो !

गडगड ढगांत बिजली करी ।
फडफड शिडात धडधड उरी ।
एकली मी आज घरी बाय ।
संगतीला माझ्या कुनी नाय ।
सळसळ माडांत, खोपीच्या कुडात,
जागनाऱ्या डोल्यांत सपान मिटलं ।।
वादलवारं सुटलं गो !

सरसर चालली होडीची नाळ ।
दूरवर उठली फेसाची माळ ।
कमरेत जरा वाकूनिया ।
पान्यामंदी जालं फेकूनिया ।
नाखवा माजा, दर्याचा राजा,
लाखाचं धन त्यानं जाल्यात लुटलं ।।
वादलवारं सुटलं गो !

शांताबाईंनी लिहिलेल्या कित्येक कवितांना बाबूजींनी म्हणजे स्व.सुधीर फडके यांनी चाली लावलेल्या आहेतच, पण त्यांचे सुपुत्र श्रीधर फडके यांनी नव्या को-या पध्दतीच्या संगीतरचना करून गाणी बसवली, त्यांच्यासाठी देखील शांताबाईंनी गीते रचली. श्रावणाचा महिमा सांगणारे हे आणखी एक गाणे. यालाही आशाताईंनीच स्वर दिला आहे.

ऋतु हिरवा, ऋतु बरवा, पाचूचा वनि रुजवा ।
युग विरही हृदयांवर सरसरतो मधु शिरवा ।। ऋतु हिरवा ।।

भिजुनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती ।
नितळ निळ्या अवकाशी मधुगंधी तरल हवा ।।
मनभावन हा श्रावण, प्रियसाजण हा श्रावण ।
भिजवी तन, भिजवी मन हा श्रावण ।।
थरथरत्या अधरांवर प्रणयी संकेत नवा ।।
नभी उमटे इंद्रधनू, मदनाचे चाप जणू ।
गगनाशी धरणीचा जुळवितसे सहज दुवा ।।

शांता शेळके यांनी पावसावर प्रेमगीते लिहिली, कोळीगीते लिहिली, तशीच बालगीतेही लिहिली. असेच एक गोड गाणे त्या काळातील बालगायिका सुषमा श्रेष्ट हिच्या आवाजात संगीतकार स्व.श्रीनिवास खळे यांनी संगीतबध्द केले होते.

पाऊस आला, वारा आला, पान लागले नाचू ।
थेंब टपोरे गोरे गोरे, भर भर गारा वेचू ।।

गरगर गिरकी घेते झाड, धडधड वाजे दार कवाड ।
अंगणातही बघता बघता, पाणी लागे साचू ।।

अंगे झाली ओलीचिंब, झुलू लागला दारी लिंब ।
ओली नक्षी, पाऊसपक्षी, कुणी पाहतो वाचू ।।

ओसरुनी सर गेली रे, उन्हे ढगांतुन आली रे ।
इंद्रधनुष्यामध्ये झळकती, हिरे माणके पाचू !

. . . . . . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

पुढील भाग
पावसाची गाणी – भाग ३

पावसाची गाणी – भाग १

ही पावसाची लोकप्रिय गाणी मी चार भागांमध्ये संकलित केली आहेत.

अनुक्रमणिका         पुढील भाग :  भाग २,   भाग ३,    भाग ४

ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा ।
पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा ।।
ये गं ये गं सरी, माझं मडकं भरी ।
सर आली धाऊन, मडकं गेलं वाहून ।।
पाऊस पडतो रिम झिम, अंगण झालं ओलं चिंब ।
पाऊस पडतो मुसळधार, रान झालं हिरवंगार ।।

हे गाणे कोणी आणि कधी लिहिले हे मला ठाऊक नाही, पण मला बोबडे बोलता येऊ लागल्यानंतर आणि लिहिण्यावाचण्या किंवा अर्थ समजू लागण्याच्या आधी या मधल्या शैशवकाळात केंव्हा तरी ऐकून ऐकून ते पाठ झाले आणि आजतागायत ते स्मरणात राहिलेले आहे. लहानपणी शिकलेल्या बडबडगीतांचा उगम कधीच माहीत नसतो आणि तो शोधावा अशी कल्पनाही सहसा कधी मनात येत नाही. ‘येरे येरे पावसा’ या गाण्याच्या मुळाचा गूगलवर शोध घेण्यचा प्रयत्न इतक्या वर्षांनंतर मी आता करून पाहिला. त्यात हे गाणे मला चक्क विकीपीडियावर सापडले, पण त्याच्याबद्दल कुठलीच माहिती मात्र मिळाली नाही. पण गंमत म्हणजे हेच्या हेच गाणे गेली निदान साठ वर्षे तरी असंख्य मराठी घरांमध्ये लहान मुलांना जसेच्या तसे शिकवले जात आहे. ‘पैसा’ हे नाणे तर कधीच चलनामधून हद्दपार झालेले आहे, माझ्या लहानपणीसुध्दा त्याला काहीच विनिमयमूल्य नव्हते. त्यामुळे हे गाणे रचले जाण्याचा काळ खूप पूर्वीचा असला पाहिजे. कदाचित माझ्या आजोबा आजींच्या काळात सुध्दा पावसाचे हे गाणे लहानग्यांना असेच शिकवले गेले असेल. या गाण्याच्या पहिल्या दोन ओळींचा सुसंगत अर्थ लावणे कठीण आहे. “पावसाला पैसा कसा देणार?”, “खोट्या पैशाला दुकानदार सुध्दा काही सामान देत नाही, मग तो घेऊन मोठ्ठा पाऊस कसा येईल?” असले प्रश्न  बालगीतांबद्दल विचारायचे नसतात. तरीही असले निरर्थक वाटणारे गाणे अजरामर कसे काय झाले असेल? काव्य, संगीत वगैरेंचा विचार केला तर काही क्ल्यू सापडतील. या गाण्यात एकसुध्दा जोडाक्षर नाही किंवा बोजड शब्द  नाही. लहान मुलांना ऐकून लगेच उच्चारता येतील असे मुख्यतः दोन तीन अक्षरांचे आणि सोपे असे शब्द आणि प्रत्येकी फक्त तीनच शब्द असलेली सोपी वाक्ये त्यात आहेत. हे गाणे ‘एक दोन तीन चार’ अशा चार चार मात्रांच्या ठेक्याच्या चार चार ओळींच्या कडव्यांमध्ये असल्यामुळे त्याला एक सिमेट्री आहे आणि कोणालाही ते ठेक्यावर म्हणतांना मजा येते. गाण्याच्या प्रत्येक दोन ओळींमध्ये यमक साधले आहे. किंबहुना या शब्दांची निवड बहुधा केवळ यमक साधण्यासाठीच केली आहे. कडव्यांच्या शेवटच्या ओळीत अनपेक्षित कलाटणी देणारे असे काही सांगून धक्का दिला जातो, त्यामुळे ते मनोरंजक वाटते.

लहानपणी अनेक वेळा ऐकून तोंडपाठ झालेले आणखी एक गाणे आहे,
नाच रे मोरा, अंब्याच्या बनात,
नाच रे मोरा नाच ।।
ढगांशि वारा झुंजला रे,
काळा काळा कापूस पिंजला रे,
आता तुझी पाळी, वीज देते टाळी,
फुलव पिसारा नाच ।।
झरझर धार झरली रे,
झाडांचि भिजली इरली रे,
पावसात न्हाऊ, काहितरि गाऊ,
करुन पुकारा नाच ।।
थेंबथेंब तळ्यात नाचती रे,
टपटप पानांत वाजती रे.
पावसाच्या रेघांत, खेळ खेळु दोघांत,
निळ्या सौंगड्या नाच ।।
पावसाचि रिमझिम थांबली रे,
तुझि माझि जोडी जमली रे,
आभाळात छान छान, सात रंगी कमान,
कमानीखाली त्या नाच ।।

या गाण्यातला मुखडा (ध्रुवपद) सोडला तर संपूर्ण गाणे पावसावरच आहे. आमच्या गावाला लागूनच आंबराई होती आणि त्यातल्या ‘आम्रतरूंवर वसंतवैभवाचे कूजन’ करणारे कोकीळ पक्षी आपले मधुर संगीत ऐकवायचे, पण मोर हा पक्षी मात्र मी त्या काळात फक्त चित्रातच पाहिला होता आणि आभाळात ढग आले की खूष होऊन तो आपला पिसारा फुलवून नाचतो असे ऐकले होते. मला त्याचे प्रत्यक्ष दर्शन मोठेपणीच झाले. ढग, वारा, पाऊस,
तळे, झाडे वगैरे ओळखीचे असल्यामुळे त्यांचे संदर्भ समजत आणि आवडत होते. त्यामुळे मला तरी हे गाणे मोराबद्दल वाटायच्या ऐवजी पावसाचेच वाटायचे. अत्यंत लोकप्रिय गायिका आशा भोसले यांनी गायिलेले हे मजेदार गाणे महाकवी स्व.ग.दि.माडगूळकर यांनी देवबाप्पा या चित्रपटासाठी लिहिले आणि चतुरस्र प्रतिभेचे धनी असलेले स्व.पु. ल. देशपांडे यांनी याला चाल लावली वगैरे तपशील नंतर समजत गेले. माझ्या लहानपणीचे हे गाणे रेडिओ, टेलिव्हिजन, मुलांचे कार्यक्रम वगैरेंवर आजतागायत अधूनमधून ऐकायला येत राहिले आहे.

संथ लयीवर बराच काळ पडत राहणा-या पावसाला ‘रिमझिम’ असे विशेषण बहुधा ‘येरे येरे पावसा’ या गाण्यामधून पहिल्यांदा मिळाले असावे. कदाचित ‘चिंब’ या शब्दाशी यमक जुळवण्याच्या दृष्टीने ‘रिमझिम’ हा शब्द आणला गेला आणि तो कायमचा त्याला चिकटून राहिला. त्यावरूनच लिहिलेले माझ्या लहानपणच्या काळात गाजलेले एक गाणे खाली दिले आहे.

रिमझिम पाऊस पडे सारखा,
यमुनेलाही पूर चढे,
पाणीच पाणी चहूकडे, ग बाई,
गेला मोहन कुणीकडे ।।

तरुवर भिजले भिजल्या वेली,
ओली चिंब राधा झाली,
चमकुन लवता वरती बिजली,
दचकुन माझा ऊर उडे ग बाई,
गेला मोहन कुणीकडे ।।

हाक धावली कृष्णा म्हणुनी,
रोखुनी धरली दाही दिशानी,
खुणाविता तुज कर उंचावुनी,
गुंजत मंजुळ मुग्ध चुडे ग बाई,
गेला मोहन कुणीकडे ।।

जलाशयाच्या लक्ष दर्पणी,
तुझेच हसरे बिंब बघुनी,
हसता राधा हिरव्या रानी,
पावसातही ऊन पडे, ग बाई,
गेला मोहन कुणीकडे ।।

पहिल्या कडव्यात दिल्याप्रमाणे यमुनेला पूर येऊन सगळीकडे पाणीच पाणी झाले असतांना कृष्ण कुठेच दिसत नाही म्हणून यशोदेलाच त्याची काळजी वाटत असेल, कारण वेळी अवेळी यमुनेच्या काठी जायची खोड त्याला होती. यामुळे ‘गेला मोहन कुणीकडे?’ हा प्रश्न नक्की यशोदामैयालाच पडला असणार अशी माझी लहानपणी खात्री झाली होती. पुढल्या कडव्यांचा अर्थ समजायला मध्यंतरी बरीच वर्षे जावी लागली. गीतकार स्व.पी. सावळाराम, संगीतकार स्व.वसंत प्रभू आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या त्रयींनी मराठी रसिकांना दिलेली अनेक अप्रतिम गाणी अजरामर झाली आहेत. वसंत प्रभू यांनी संगीत देतांना पी.सावळाराम यांच्या या गाण्यासाठी मात्र आशा भोसले यांची निवड केली होती हे विशेष.

निसर्गामधील बदलांचे परिणाम माणसांच्या मनावरसुध्दा होत असतात. पर्जन्य आणि प्रणयभावना यात तर एक जवळचा संबंध आहे. रिमझिम पाऊस पडू लागल्यावर कृष्णाला भेटण्याची अतीव ओढ राधेला लागली आणि ओली चिंब होऊनसुध्दा ती यमुनेच्या किनारी जाऊन त्याला शोधत राहिली हे वर दिलेल्या गाण्यात आपण पाहिलेच. आषाढाच्या पहिल्या दिवशी मेघांनी आकाश झाकून टाकलेले पाहता मेघदूतामधील यक्षाला त्याच्या प्रियतमेची अत्यंत तीव्रतेने आठवण येते. विरहाचा आवेग असह्य होतो. अशा वेळी प्रियकराशी मीलन झाले तर होणारा आनंदसुध्दा अपूर्व असतो. या भावना व्यक्त करणारे पूर्वीच्या काळातले एक लोकप्रिय गाणे होते.

झिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात।
प्रियाविण उदास वाटे रात ।।

बरस बरस तू मेघा रिमझिम, आज यायचे माझे प्रियतम ।
आतुरलेले लोचन माझे बघती अंधारात ।।
प्रियाविण उदास वाटे रात ।।

प्रासादी या जिवलग येता, कमळमिठीमधि भृंग भेटता ।
बरस असा की प्रिया न जाइल माघारी दारात ।।
प्रियाविण उदास वाटे रात ।।

मेघा असशी तू आकाशी, वर्षातुन तू कधी वर्षसी ।
वर्षामागुन वर्षति नयने, करिती नित बरसात ।।
प्रियाविण उदास वाटे रात ।।

अत्यंत भावपूर्ण असे हे गाणे रचतांना कवी मधुकर जोशी यांनी ‘रिमझिम’ या नेहमीच्या विशेषणाऐवजी ‘झिमझिम’ हा वेगळा शब्द योजून कदाचित ‘झिमझिम झरती’ असा अनुप्रास साधला असावा. पण अनेक लोक हे गाणे ‘रिमझिम झरती ….’ आहे असेच समजतात. एकदा टेलीव्हिजनवरील गाण्यांच्या भेंड्यांच्या एका प्रसिध्द कार्यक्रमात यावर वाद झाला होता, तसेच एका प्रमुख दैनिकाच्या वाचकांच्या पत्रव्यवहारावरसुध्दा यावर चर्चा झाली
होती असे मला आठवते. भावपूर्ण शब्दरचना, स्व.दशरथ पूजारी यांनी दिलेली अत्यंत सुरेल जाल आणि सुमन कल्याणपूर यांचा मधुर आवाज यांचा सुरेख त्रिवेणी संगम या गाण्यात झाला आहे. हे गाणे अनेकांच्या आवडत्या ‘टॉप टेन’ मध्ये असेल.

पर्जन्य आणि विरहामधून येणारी व्याकुळता यांचा संबंध प्राचीन कालापासून आहे. शंभराहून जास्त वर्षांपूर्वी नाट्याचार्य कै.अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी लिहिलेल्या संगीत सौभद्र या नाटकामधील प्रसिध्द पदात देखील त्यांनी याचा उल्लेख केला आहे.

नभ मेघांनीं आक्रमिलें ।
तारांगण सर्वहि झांकुनि गेले ॥

कड कड कड कड शब्द करोनी ।
लखलखतां सौदामिनी ।
जातातचि हे नेत्र दिपोनी ।
अति विरही जन ते व्याकुळ झाले ॥

प्रजन्यराजा जसा विरहाची व्यथा वाढवतो तसाच मीलनाची गोडीसुद्धा जास्त मधुर करतो. दुसरे आद्य नाट्याचार्य कै.गोविंद बल्लाळ देवल यांनी ‘संगीत मृच्छकटिक’ या शंभरी ओलांडलेल्या अजरामर नाटकामधील एका पदात ही गोष्ट काहीशा सोप्या भाषेत थेट सांगितली आहे.

तेचि पुरुष दैवाचे । धन्य धन्य जगिं साचे ॥
अंगें भिजली जलधारांनीं । ऐशा ललना स्वयें येउनी ।
देती आलिंगन ज्यां धांवुनि । थोर भाग्य त्यांचें ॥

नवकवितेच्या आधुनिक काळामधील कवी ग्रेस यांचे काव्य जरासे दुर्बोध किंवा अस्पष्ट असते. वाचकाने किंवा श्रोत्याने त्यातून आपापल्या परीने अर्थ काढून घ्यायचा असतो. त्यांनी लिहिलेल्या एका प्रसिध्द कवितेच्या ओळी अशा आहेत.

पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने ।
हलकेच जाग मज आली, दु:खाच्या मंद सुराने ।।
डोळ्यांत उतरते पाणी, पाण्यावर डोळे फिरती ।
दु:खाचा उडला पारा, या नितळ उतरणीवरती ।।
पेटून कशी उजळेना, ही शुभ्र फुलांची ज्वाला ?
ताऱ्यांच्या प्रहरापाशी, पाऊस असा कोसळला ।।
संदिग्ध घरांच्या ओळी, आकाश ढवळतो वारा ।
माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा ।।

कवी ग्रेस यांच्या पुढे दिलेल्या कवितेत त्यांनी आपल्या वेदना जास्त स्पष्ट केल्या आहेत. कदाचित या दुःखदायी आठवणींमुळेच त्यांना पाऊस कष्टदायी वाटत असावा.

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता ।
मेघांत अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता ।।

ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो ।
त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होता ।।

अंगणात गमले मजला संपले बालपण माझे ।
खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता ।।

. . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

पुढील भाग
पावसाची गाणी – भाग २

पावसाची गाणी – अनुक्रमणिका

पाऊस या विषयाशी संबंधित खूप गाणी आहेत, कविता तर असंख्य असतील. त्यातली माझ्या ओळखीतली प्रसिध्द अशी गीते गेले काही दिवस मी आठवून आठवून आणि आंतर्जालावर शोधून काढून ती माझ्या अभिप्रायांसह माझ्या ब्लॉगवर दिली होती. आता ती या ठिकाणी देणार आहे. या सर्व गाण्यांची यादी संकलित करून या भागात दिली आहे. अर्थातच ही सर्व गाणी फक्त मराठी भाषेतली आहेत.

भाग १ –
१. ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा ।
२. नाच रे मोरा, अंब्याच्या वनात
३. रिमझिम पाऊस पडे सारखा, यमुनेलाही पूर चढे
४, झिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात
५. नभ मेघांनीं आक्रमिले
६. तेचि पुरुष दैवाचे । धन्य धन्य जगिं साचे ।।
७. पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने ।
८. ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता ।

भाग २ –
९. श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे ।
१०. घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा ।
११. आज कुणीतरी यावे, ओळखिचे व्हावे ।
१२. नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं ।
१३. वादलवारं सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो ।
१४. ऋतु हिरवा, ऋतु बरवा, पाचूचा वनि रुजवा ।
१५. पाऊस आला, वारा आला, पान लागले नाचू ।

भाग ३ –
१६. भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची ।
१७. श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा ।
१८. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
१९. ये रे घना, ये रे घना, न्हाउ घाल माझ्या मना ।
२०. मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले ।
२१. जो काल इथे आला तो पाऊस वेगळा होता ।
२२. नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी ।
२३. राया मला, पावसात नेऊ नका ।
२४. वर ढगाला लागली कळ । पाणी थेंब थेंब गळं ।

भाग ४ –
२५. आला आला वारा संगे पावसाच्या धारा ।
२६. केतकीच्या बनी तिथे, नाचला ग मोर
२७. ढग दाटूनि येतात, मन वाहूनी नेतात ।
२८. टप टप टप काय बाहेर वाजतंय्‌ ते पाहू ।
२९. ए आई मला पावसात जाउ दे ।
३०. अग्गोबाई ढग्गोबाई, लागली कळ । ढगाला उन्हाची केवढी झळ ।

जागतिक मराठी दिवसाच्या निमित्याने

दरवर्षी २७ फेब्रूवारी हा दिवस ‘जागतिक मराठी दिवस’ म्हणून साजरा केला जातो. हे कधीपासून ठरले हे मला माहीत नाही. मराठी प्रथम भाषा (मातृभाषा) असणार्‍यांच्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे. मराठी बोलणार्‍या लोकांची एकूण लोकसंख्या नऊ कोटी इतकी होती, आता थोडी वाढलीच असेल. मराठी भाषा सुमारे १३०० वर्षांपासून प्रचलित आहे असे आतापर्यंत मिळालेल्या ऐतिहासिक पुराव्यांवरून समजले जाते, पण त्याच्याही आधीचे काही नवे पुरावे मिळाले असल्याचे नुकतेच वर्तमानपत्रात वाचले. ते कितपत ग्राह्य आणि विश्वसनीय आहेत हे त्या विषयामधले तज्ज्ञच सांगू शकतील. महाराष्ट्राबाहेर गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू व छत्तीसगढ राज्यात आणि दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासीत प्रदेशातील काही भागात मोठ्या प्रमाणात मराठी बोलली जाते.

अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, मॉरीशस व इस्त्राएल या देशातही मराठी भाषिक लोक राहतात. यातील बरेचसे लोक आंतर्जालावर मराठी भाषेत आपले विचार व्यक्त करतात. माझे ब्लॉग्ज वाचणाऱ्या वाचकांच्या देशांच्या यादीत जगभरातील मला माहीत असलेले बहुतेक सगळे देश येतात.

मराठी भाषेत लिहिलेले अनेक प्राचीन शिलालेख, ताम्रपत्रे, दस्तऐवज वगैरे ऐतिहासिक सामुग्री उपलब्ध आहे. ज्ञानेश्वर-तुकारामादि संतकवी, मोरोपंत, वामनपंडित आदी पंतकवी आणि होनाजी बाळा, पठ्टे बापूराव वगैरे तंतकवींच्या पारंपरिक रचना अनेक लोकांना मुखोद्गत असतात. पूर्वीच्या काळात मराठी भाषेत अनेक हस्तलिखित पोथ्या लिहिल्या गेलेल्या आहेत. आता हे बहुतेक सारे वाङ्मय पुस्तकरूपाने उपलब्ध आहे. दैनिक, साप्ताहिक, मासिक, वार्षिक इत्यादी अनेक नियतकालिके मराठीत छापून नियमितपणे प्रसिध्द केली जातात.

मंगल देशा, पवित्रा देशा या सुप्रसिध्द महाराष्ट्रगीतात कवी गोविंदाग्रज म्हणजेच सुप्रसिध्द नाटककार आणि शब्दप्रभू कै. राम गणेश गडकरी यांनी मराठी भाषेचा इतिहास थोडक्यात असा सांगितला आहे.
रसवंतीच्या पहिल्या बाळा मुकुंदराजाला ।
पहिलावहिला अष्टांगांनी प्रणाम हा त्याला ।।
शहर पुण्याच्या, शिवनेरीच्या, पंढरिच्या देशा ।।
अनंत कोटी ग्रंथ रचुनिया जोडि तुझ्या नामा ।
वाल्मीकीचे शत कोटी यश विष्णुदास नामा ।
मयूरकविच्या पूर्ण यमकमय महाराष्ट्र देशा ।
कवि कृष्णाच्या निर्यमका हे महाराष्ट्र देशा ।।
देवी ज्ञानेश्वरी करि जिथे भक्तीचा खेळ ।
तिथेच गीतारहस्य बसवी बुद्धीचा मेळ ।।
जिथे रंगली साधीभोळी जनाइची गाणी ।
तिथेच खेळे श्रीपादांची कलावती वाणी ।।
विकावयाला अमोल असली अभंगमय वाणी ।
करी तुझी बाजारपेठ तो देहूचा वाणी ।।
तुला जागवी ऐन पहाटे गवळी गोपाळ ।
धार दुधाची काढित काढित होनाजी बाळ ।।
मर्दानी इष्काचा प्याला तुझा भरायासी ।
उभा ठाकला सगनभाउ हा शाहुनगरवासी ।।

आपण मराठी असल्याचा अभिमान कवी सुरेश भट या शब्दात व्यक्त करतात.

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ।
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ।।
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी ।
एवढ्या जगात माय मानतो मराठी ।।

आमुच्या मनामनात दंगते मराठी ।
आमुच्या रगारगात रंगते मराठी ।
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी ।
आमुच्या नसानसात नाचते मराठी ।।

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी ।
आमुच्या नहानग्यात रांगते मराठी ।
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी ।
आमुच्या घराघरात वाढते मराठी ।
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी ।।

येथल्या फुलाफुलात हासते मराठी ।
येथल्या दिशादिशात दाटते मराठी ।
येथल्या नगानगात गर्जते मराठी ।
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी ।
येथल्या वनावनात गुंजते मराठी ।
येथल्या तरुलखात सादते मराठी ।
येथल्या कळीकळीत लाजते मराठी ।।

येथल्या नभामधून वर्षते मराठी ।
येथल्या पिकांमधून डोलते मराठी ।
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी ।
येथल्या चराचरात राहते मराठी ।।

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी ।
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी ।
हे असे कितीक खेळ पाहते मराठी ।
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी ।।

संगीतकार कौशल इनामदार यांनी तयार केलेली या गौरवगीताची चित्रफीत इथे पहायला मिळेल.
http://www.aathavanitli-gani.com/Song/Labhale_Amhas_Bhagya

कवी कुसुमाग्रज यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमध्ये असे लिहिले आहे.

माझ्या मातीचे गायन, तुझ्या आकाश श्रुतीनी
जरा कानोसा देऊन, कधी ऐकशील का रे

माझी धुळीतील चित्रे, तुझ्या प्रकाश नेत्रांनी
जरा पापणी खुलून, कधी पाहशील का रे

माझ्या जहाजाचे पंख, मध्यरात्रीत माखले
तुझ्या किनाऱ्यास दिवा, कधी लावशील का रे

माझा रांगडा अंधार, मेघामेघात साचला
तुझ्या उषेच्या कानी, कधी टिपशील का रे

कवी माधव ज्यूलियन यांच्या अजरामर गीताचे बोल असे आहेत.

मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे ।
नसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढें दिव्य आशा असे ।।
जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्‍ताबळें श्रीमती इंग्रजी ।
मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी ।।

जरी मान्यता आज हिंदीस देई उदेलें नवें राष्ट्र हें हिंदवी ।
मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता थोरवी ।।
मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्‍नधर्मानुयायी असूं ।
पुरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटांत आम्ही बसूं ।।

हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी ।
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापे हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं ।।
मराठी असे आमुची मायबोली अहो पारतंत्र्यात ही खंगली ।
हिची थोर संपत्‍ति गेली उपेक्षेमुळें खोल कालार्णवाच्या तळीं ।।

तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्‍नें नियोजूं तयांना हिच्या मंडणी ।
नको रीण, देवोत देतील तेव्हा जगांतील भाषा हिला खंडणी ।।

———————————————————–

मंगेश पाडगांवकरांची गीते

mangeshPadgaokar

कविवर्य मंगेश पाडगांवकर यांना पद्मभूषण हा बहुमान जाहीर झाला आहे. त्यांनी ऐंशीव्या वर्षात पदार्पण केले होते तेंव्हा त्यानिमित्याने त्यांना सादर प्रणाम आणि त्यांनीच एका कवितेत लिहिल्याप्रमाणे ‘सलाम’ करून त्यांच्या काही गीतांमधल्या अजरामर ओळी मी सादर केल्या होत्या. त्या आज या स्थळावर देत आहे.

माझ्या पिढीला मंगेश पाडगांवकरांच्या गीतांनी नुसतीच भुरळ घातली नाही तर जीवनाचा आस्वाद घेण्याची एक दृष्टी दिली. त्यांच्या या कवितांनी किती दिलेला संदेश पहा.

माझे जीवन गाणे, माझे जीवन गाणे !
व्यथा असो आनंद असू दे
प्रकाश किंवा तिमीर असू दे
वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मज जाणे !
—————————-
या ओठांनी चुंबुनि घेइन हजारदा ही माती
अनंत मरणे झेलुन घ्यावी इथल्या जगण्यासाठी
इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे
—————————-

कधी कधी ते जीवन जगण्याची स्पष्ट दिशा दाखवतात.

झाड फुलांनी आले बहरुन, तू न पाहिले डोळे उघडुन
वर्षकाळी पाउसधारा, तुला न दिसला त्यात इषारा
काय तुला उपयोग आंधळ्या दीप आसून उशाशी
हृदयातिल भगवंत राहिला हृदयातून उपाशी
—————————-
वाटेवरी खुणेच्या शोधू नको फुले ती
ना ठेविते फुलांची माती इथे निशाणी
सौदा इथे सुखाचा पटवून चोख घ्यावा
व्यवहार सांगती हा, ही माणसे शहाणी
कळणार हाय नाही दुनिया तुला मला ही
मी पापण्यांत माझ्या ही झाकिली विराणी
त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी
—————————

मनातला आनंद कसा व्यक्त करावा हे या शब्दात पहा.

अर्थ नवा गीतास मिळाला
छंद नवा अन्‌ ताल निराळा
त्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले ?
शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले
—————————
क्षणभर मिटले डोळे, सुख न मला साहे
विरघळून चंद्र आज रक्तातुन वाहे
आज फुले प्राणातुन केशरी दिवा
रोजचाच चंद्र आज भासतो नवा
—————————-
पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेशा
अशा प्रीतिचा नाद अनाहत, शब्दावाचुन भाषा
अंतर्यामी सूर गवसला, नाही आज किनारा
श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा
—————————-
सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास
स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास
सुखालाहि भोवळ आली मधुर सुवासाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
———————-

तर वेदना कशी सहन करावी हे या शब्दात दिले आहे.

निःशब्द आसवांनी समजाविले मनाला
की शाप वेदनेचा प्रीतीस लाभलेला
माझ्याच मी मनाशी हे गीत गायिले
मी बोलले न काही नुसतेच पाहिले
हृदयात दाटलेले हृदयात राहिले
——————-
जन्ममृत्युचे लंघुनि कुंपण
स्थलकालाच्या अतीत उमलुन
प्रवासिनी मी चिरकालाची
अनाघ्रात ही उरले
मी चंचल हो‍उन आले
भरतीच्या लाटांपरि उधळित
जीवन स्वैर निघाले
——————-

दुःखाने खचून न जाता जीवनाकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टीकोण ते देतात.

काय मोर थांबतो मेघ दाटता शिरी ?
भान राधिके नुरे ऐकताच बासरी
बंधनात जन्मतो मुक्तिचा खरेपणा
सर्व सर्व विसरु दे गुंतवू नको पुन्हा
येथ जीव जडविणे हाच होतसे गुन्हा
————————
दुःख नको तुटताना
अश्रु नको वळताना
मी मिटता लोचन हे उमलशील तू उरी
शब्द शब्द जपून ठेव बकुळिच्या फुलापरी
————————

कांही गीतात ते बोलता बोलता जीवनातली कांही सत्ये सहजपणे सांगतात.

हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे ?
हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे !
तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे
————————-
कधी बहर, कधी शिशिर, परंतू दोन्ही एक बहाणे
डोळ्यांमधले आसू पुसती ओठांवरले गाणे
————————–

त्यांनी दिलेल्या कांही प्रतिमा मनाला भिडतात.

तुला ते आठवेल का सारे ?
दवात भिजल्या जुईपरी हे मन हळवे झाले रे
—————————-
वाऱ्यात ऐकतो मी आता तुझीच गाणी
ताऱ्यांत वाचतो अन्‌ या प्रीतिची कहाणी
पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची
जादू अशी घडे ही या दोन लोचनांची
—————————-
मोर केशरांचे झुलती पहाटेस दारी
झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी
सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहु दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावु दे रे
———————–

त्यांची ही ओळ माझ्या डोळ्यात पाणी आणते.

हात एक तो हळु थरथरला
पाठीवर मायेने फिरला
देवघरातिल समईमधुनी अजून जळती वाती
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती
————————–

ऐंशी वर्षाच्या वयातला त्यांचा उत्साह पाहून म्हणावेसे वाटते.

दिवस तुझे हे फुलायचे
झोपाळ्यावाचून झुलायचे
मोजावी नभाची खोली
घालावी शपथ ओली
श्वासात चांदणे भरायचे

थरारे कोवळी तार
सोसेना सुरांचा भार
फुलांनी जखमी करायचे
झोपाळ्यावाचून झुलायचे
————————-

ही अगदी थोडी प्रातिनिधिक उदाहरणे झाली. पाडगांवकरांच्या गीतांचा खजिना अपरंपार आहे.