नवी भर दि. १०-१२-२०१९ : श्री दत्तगुरूंची गाणी
१, संत तुकारामांनी लिहिलेला अभंग
तीन शिरे सहा हात । तया माझे दंडवत ।।
काखे झोळी पुढे श्वान । नित्य जान्हवीचे स्नान ।।
माथा शोभे जटाभार । अंगी विभूती सुंदर ।।
तुका म्हणे दिगंबर । तया माझा नमस्कार ।।
—————-
जुन्या काळातल्या भक्तीगीतांच्या गायकांमध्ये श्री.आर एन पराडकर हे प्रमुख नाव होते. त्यांची तीन भजने खाली दिली आहेत.
२. माझ्या लहानपणापासून प्रसिद्ध असलेले श्री.आर एन पराडकर यांचे कवी सुधांशु यांनी लिहिलेले भक्तीगीत
दत्तदिगंबर दैवत माझे, हृदयी माझ्या नित्य विराजे ।।
अनुसूयेचे सत्व आगळे
तीन्ही देवही झाली बाळे
त्रैमूर्ती अवतार मनोहर,
दीनोद्धारक त्रिभुवनि गाजे ।।
तीन शिरे, कर सहा शोभती
हास्य मधुर शुभ वदनावरती
जटाजूट शिरि, पायि खडावा,
भस्मविलेपीत कांती साजे ।।
पाहुनि प्रेमळ सुंदर मूर्ती
आनंदाचे आसू झरती
सारे सात्विक भाव उमलती,
हळुहळु सरते मीपण माझे
———————–
३. माझ्या लहानपणापासून मी ऐकलेले आणि गायिलेले श्री.आर एन पराडकर यांचेच पारंपारिक भजन
धन्य हो प्रदक्षिणा सदगुरूरायाची ।
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ॥ धृ ॥
गुरुभजनाचा महीमा नकळे अगमानिगमांसी।
अनुभविते जाणति जे गुरुपदिंचे अभिलाषी ॥ धन्य. ॥ १ ॥
पदो पदी झाल्या अपार पुण्याच्या राशी ।
सर्वही तिर्थे घडली आम्हां आदिकरूनि काशी ॥ धन्य.॥ २ ॥
मृदंगटाळघोषी भक्त भावार्थे गाती ॥
नामसंकीर्तने नित्यानंद नाचती ॥ धन्य. ॥ ३ ॥
कोटीब्रह्महत्या हरती करितां दंडवत ।
लोटांगण घालितां मोक्ष लागे पायांत ॥ धन्य ॥ ४ ॥
प्रदक्षिणा करुनी देहभाव हरवीला ।
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला । धन्य हे प्रदक्षिणा ॥ धन्य ॥ ५ ॥
——————————-
४. श्री.आर एन पराडकर यांचेच आणखी एक पारंपारिक भजन
दत्ता दिगंबरा या हो, स्वामी मला भेट द्या हो ।।
दत्ता दिगंबरा या हो, सावळ्या मला भेट द्या हो ।।
दत्ता दिगंबरा या हो, दयाळा मला भेट द्या हो ।।
तापलो गड्या त्रिविध तापे
बहुविध आचरलो पापे
मनाच्या संकल्प-विकल्पे
काळीज थरथरथर कापे
कितीतरी घेऊ जन्म फेरे
सावळ्या मला भेट द्या हो ।।
तुम्हाला कामकाज बहुत
वाट पाहू कुठवर पर्यंत
प्राण आला कंठागत
कितीतरी पाहशील बा अंत
दीनाची करुणा येऊ द्या हो
नाथा मला भेट द्या हो ।।
संसाराचा हा वणवा
कितीतरी आम्ही सोसावा
वेड लागले या जिवा
कोठे न मिळे विसावा
आपुल्या गावा तरी न्या हो
दयाळा मला भेट द्या हो ।।
स्वामी मला भेट द्या हो
दयाळा मला भेट द्या हो
सावळ्या मला भेट द्या हो
दत्ता दिगंबरा या हो
स्वामी मला भेट द्या हो ।।
———————————————————-
५. श्री अजित कडकडे यांचे प्रसिद्ध पालखीगीत – कवी प्रवीण दवणे
दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा
निघालो घेऊन दत्ताची पालखी ।।
आम्ही भाग्यवान आनंद निधान
झुलते हळूच दत्ताची पालखी ।।
रत्नांची आरास साज मखमली
त्यावर सुगंधी फुले गोड ओली
झुळुक कोवळी चंदनासारखी ।।
सातजन्मांची ही लाभली पुण्याई
म्हणून जाहलो पालखीचे भोई
शांत माया-मूर्ति पहाटेसारखी ।।
वाट वळणाची जिवाला या ओढी
दिसते समोर नरसोबाची वाडी
डोळियांत गंगा जाहली बोलकी ।।
———————————-
६. माझी आई दत्ताची परमभक्त होती. तिच्या स्मरणार्थ तिने रचलेला एक अभंग आज खाली देत आहे.
कल्पवृक्षातळी अत्रीचा नंदनु, सवे कामधेनू शोभतसे ।।
शिरी जटाभार रुद्राक्षांचा हार, चंद्र शिरावर शोभतसे ।।
कटीसी शोभले भगवे वसन, चारी वेद श्वानरूपे आले ।।
शंख चक्र गदा पद्म नी त्रिशूल, शोभतसे माळ हांतामध्ये ।।
सुहास्यवदने पाहे कृपादृष्टी, अमृताची वृष्टी भक्तांवरी ।।
ऐशा या स्वरूपी मन रमवावे, शिर नमवावे पायी त्याच्या ।।
लक्ष्मी ऐशा मनी ध्याउनी स्वरूपा, रमे चित्ती सदा ऐक्यभावे ।।
—————————————–
मूळ लेख : श्रीदत्तगुरूंचे २४ गुरू
बृहस्पती हे सर्व देवांचे गुरू होते असे सांगितले जाते. अत्यंत बुद्धीमान माणसाला बृहस्पतीची उपमा दिली जाते. पण ते नेमके कोणत्या देवांचे गुरू होते हे मात्र समजत नाही. गणपती, मारुती, महादेव, राम, कृष्ण, अंबाबाई वगैरे जितक्या देवतांच्या मूर्ती आपल्या घरातल्या देव्हाऱ्यात किंवा गावातल्या देवळात असतात त्यातल्या कोणीही कधी बृहस्पतीकडे जाऊन शिक्षण किंवा मार्गदर्शन घेतले असा उल्लेख मी तरी ऐकलेला किंवा वाचलेला नाही. दत्तगुरूंना मात्र सर्व जगाचे गुरू असे मानले जाते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींनी मिळून दत्तात्रेयाचे रूप घेतले त्या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा होती. या दिवशी दत्तजन्माचा सोहळा केला जातो. या जगद्गुरू अवधूतांनी स्वतः २४ गुरू केले होते आणि त्यांच्याकडून काही गुण किंवा शिकवण घेतली होती असे त्यांनी यदुराजाला सांगितले होते अशी पुराणातली आख्यायिका आहे. दत्तगुरूंनी मानलेले हे २४ गुरू असे आहेत
१.पृथ्वी. २.वायू, ३.आकाश. ४.पाणी, ५.अग्नी, ६.चंद्र, ७.सूर्य, ८.कबूतर, ९.अजगर, १०.समुद्र, ११.पतंग कीटक (मॉथ), १२.मधमाशी, १३.हत्ती, १४.भुंगा, १५.हरीण, १६.मासा, १७.पिंगला नर्तकी, १८.टिटवी, १९.बालक, २०.बांगड्या, २१.बाण तयार करणारा कारागीर, २२.साप, २३.कोळी (स्पायडर), २४. अळी. या यादीमधील नावे आणि त्यांचा क्रम यात काही पाठभेद आहेत. कोणी यात यमाचा समावेश केला आहे. मला जी एक यादी सहजपणे मिळाली ती मी या ठिकाणी दिली आहे. यातील प्रत्येक जीवंत व्यक्ती, प्राणी किंवा निर्जीव वस्तूपासून काही गुण शिकण्यासारखे आहेत तर काही वाईट गुण ओळखून ते टाळणे आवश्यक आहे. त्यांनाही दत्तगुरूंनी गुरूपद दिले आहे.
सूर्याचे तेज, चंद्राची शीतलता, पृथ्वीची सहनशीलता, अग्नीचे पावित्र्य, सागराचा अथांगपणा, स्त्रीची ममता, बालकाचे निरागसपण, मधमाशीची संग्रहवृत्ती वगैरे काही गुणविशेष प्रसिद्ध आहेत आणि त्यांचे उल्लेख नेहमी होत असतात किंवा त्यांची उदाहरणे दिली जात असतात. यांचे यापेक्षा वेगळे काही गुण दत्तगुरूंना दिसले होते. समुद्र आणि त्यातले पाणी यांची वेगवेगळी गणती केली आहे. समुद्र त्याला मिळणाऱ्या सर्व नद्यांना स्वतःमध्ये सामावून घेतो तर “पानी तेरा रंग कैसा? जिसमें मिलाओ वैसा” या उक्तीप्रमाणे पाणी कशातही मिसळून जाते. हे गुण भिन्न आणि थोडे परस्परविरोधी आहेत. दिव्याच्या ज्योतीवर झेप घेऊन स्वतःला जाळून घेणाऱ्या पतंगाचे उदाहरण प्रेमाचे द्योतक म्हणून दिले जाते, पण क्षणिक मोहाने असा अविचार करू नये हे यातून शिकण्यासारखे आहे. हत्ती हा प्राणी मदांध किंवा कामांध होऊ शकतो. मासा अधाशीपणाने आमिशाला खायला जातो आणि स्वतःच गळाला लागतो. त्याचप्रमाणे हरीण संगीताकडे आकर्षले जाते आणि माणसाच्या (शिकाऱ्याच्या) जवळ येऊन त्याच्या तावडीत सापडते. ही सगळी काय करू नये याची उदाहरणे आहेत.
काही गुणविशेष आपल्या किंबहुना माझ्या समजुतीपेक्षा वेगळे दिसतात. यात अलिप्तपणा हा कबूतराचा (नसलेला) गुण सांगितला आहे. एका कबूतराच्या जोडीच्या पिल्लांना शिकारी घेऊन गेला, त्यांच्यासाठी आणलेला चारा घेऊन कबूतरी आणि तिच्या मागोमाग नर कबूतर त्या शिकाऱ्याकडे गेले आणि त्याच्या ताब्यात सापडले. त्यांच्याकडे अलिप्तपणा असला तर ते स्वतंत्र राहिले असते. या कथेमध्ये निर्भयपणा हा सापाचा गुण सांगितला आहे. त्याचे एक कारण तो निर्धास्तपणे मुंग्यांच्या वारुळात जाऊन राहतो आणि दुसरे म्हणजे आपल्या सर्वांगावरचे कात़डे (कात) काढून टाकतो. बांगड्या आणि एकांतवास यात काय संबंध असेल असे वाटेल. इथे हे लक्षात घ्यायचे आहे की एका हातात दोन किंवा जास्त बांगड्या असल्या तर त्या किणकिण करतात, पण एकच बांगडी असली तर ती आवाज करून कोणाचे लक्ष वेधून घेत नाही. कुंभारमाशीची गोष्ट मी लहानपणी ऐकली होती. ही माशी मातीचे लहानसे घर बांधते आणि त्यात अळी (किंवा अळ्या) नेऊन ठेवते. ही माशी येऊन आपल्याला खाईल या भीतीने ती अळी सारखा तिचा विचार करते आणि त्यात इतकी एकरूप होते की स्वतःच कुंभारमाशी होते अशी ती गोष्ट होती आणि यातल्या अळीप्रमाणे आपण परमेश्वराचे सारखे स्मरण केले तर आपणही त्याच्याशी एकरूप होतो अशी शिकवण त्यातून दिली होती. अंडे, अळी, कोष आणि कीटक असे त्याचे चार जन्म असतात हे त्यावेळी मला माहित नव्हते.
या २४ गुरूंपैकी काही गोष्टींचे संदर्भ मला नवीन होते. पिंगला ही नृत्यांगना (तवाइफ) एका ग्राहकाची आतुरतेने वाट पहात बसते पण तो येत नाही. तेंव्हा तिला असे वाटते की याऐवजी आपण अंतर्मुख होऊन (देवाचे) ध्यान केले असते तर त्याचा फायदा झाला असता, आपला उद्धार झाला असता. एकाग्रचित्ताने बाण तयार करत बसलेला एक कारागीर (लोहार) आपल्या कामात इतका मग्न झाला होता की वाजत गाजत बाजूने जात असलेली राजाची मिरवणूकसुद्धा त्याच्या लक्षात आली नाही. मनाची एकाग्रता (कॉन्सेन्ट्रेशन) हा त्याचा गुण शिकण्यासारखा आहे. एकदा एक टिटवी (लहानसा पक्षी) काही खाद्य खाण्यासाठी उचलून घेऊन आली, तिच्याकडून ते खाद्य हिसकावून घेण्यासाठी कावळे, घारी वगैरे इतर मोठ्या पक्ष्यांनी तिच्यावर हल्ला केला. त्या टिटवीने शहाणपणा केला आणि चोचीमधले खाद्य जमीनीवर टाकून देऊन तिथून पोबारा केला. काळवेळ पाहून क्षुल्लक बाबींचा अशा प्रकारे त्याग करणे हिताचे ठरते. हा बोध यावरून मिळतो.
ही काही उदाहरणे आहेत. माझ्या मते जगातल्या प्रत्येक गोष्टीपासून काही ना काही शिकण्यासारखे असते आणि प्रत्येक प्रसंगातून काही बोध घेण्यासारखा असतो. फक्त आपली इच्छा आणि तयारी असायला हवी.
Filed under: दत्तात्रेय, विवेचन | Leave a comment »