आमची सिंधूताई

सिंधूताई ही माझी सर्वात मोठी बहीण आणि मी तिचा सर्वात धाकटा भाऊ. सिंधूताई आमच्या आईवडिलांचे पहिले अपत्य आणि आजीआजोबांचे पहिले नातवंड. ती गोरी पान, चुणचुणित आणि रूपाने सुरेख, स्वभावानेही गोड आणि लाघवी होती. त्यामुळे तिचे लहानपणी घरात भरपूर लाड आणि कौतुक झाले असणार. ती शाळेत शिकत असतांनाच तिला महादेवरावांनी मागणी घातली आणि ते स्थळ फारच चांगले आहे हे पाहून तिचे थाटात लग्न करून दिले गेले. तेंव्हा माझा जन्मही झाला नव्हता. मला समजायला लागल्यापासून एवढे माहीत झाले होते की त्यांचा गोकाक नावाच्या गावात मोठा वाडा होता आणि निपाणी नावाच्या गावात एक सिनेमाचे थेटर होते. ताई जेंव्हा माहेरपणाला येत असे तेंव्हा घरात खूपच उत्साहाने आणि आनंदीआनंदाने भारलेले वातावरण असायचे.

सगळे चांगले चालले असतांना एक दिवस सकाळीच तारवाला पोस्टमन एक वाईट बातमी घेऊन आला. तो दिवस मला अजून आठवतो. महादेवरावांना हार्टफेल झाला असे त्या तारेत लिहिले होते. आमची आई तर एकदम पार गळून गेली आणि घरातल्या सगळ्यांची रडारड सुरू झाली. कुणीतरी धावाधाव करून सर्व्हिसची गाडी आणली आणि आईला निपाणीला घेऊन गेले. ती सिंधूताई आणि तिच्या मुलांना आपल्याबरोबर जमखंडीला घेऊन आली. पण या वेळी मात्र सर्व घर शोकाकुल झाले होते.

हळूहळू ताईने स्वतःला सावरले, शाळेच्या पुस्तकांचा अभ्यास केला आणि एक्स्टर्नल स्टूडंट म्हणून एसएससी परीक्षेचा फॉर्म भरून ती चांगले मार्क घेऊन उत्तीर्ण झा्ली. त्याबरोबर हिंदीच्या एक दोन परीक्षाही देऊन ती सर्टिफिकिटेही घेतली. त्यानंतर मिरजेला राहून एसटीसी आणि सीपीएड असे दोन कोर्स एकदम केले आणि शाळेत शिक्षिकेची नोकरी धरली. मग ती सोडून सोलापूरला दुसरी नोकरी धरली. त्या काळात अत्यावश्यक असेल तरच प्रवास केला जात असे, त्यामुळे मी लहानपणी यातली कुठलीच गावे प्रत्यक्ष पाहिली नव्हती. पण ही मंडळी दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जमखंडीला येत असत तेंव्हा बोलण्यात त्या गावांची सगळी माहिती येत असे.

ताई आमच्याबरोबर असतांना सगळ्यांची खूपच प्रेमाने विचारपूस करत असे, आमच्याशी गप्पा मारत असे, आमची थट्टामस्करी करत असे, आमच्याबरोबर पत्ते खेळत असे, आम्हाला कोडी घालत असे, आमच्याकडून गाणी म्हणवून किंवा नकला वगैरे करवून घेत असे आणि त्यांचे तोंडभर कौतुक करत असे, प्रसंगी समजूत घालत असे, धीर देत असे. काही वेळा थोडा वादविवाद किंवा वितंडवादही झाला तरी ती बरीच मोठी असल्यामुळे त्यातून भांडण मात्र कधीच झाले नाही. माझ्या आईवडिलांच्या आणि माझ्या वयात जास्त अंतर असल्याने आमच्यामध्ये थोडा जास्तच जनरेशन गॅप होता. ताई मात्र मनाने माझ्या फारच जवळची झाली होती.

मी कॉलेजला मुंबईला गेलो तेंव्हा ताई सोलापूरला स्थायिक झाली होती. जमखंडीहून मुंबईला जाण्यासाठी कुडची स्टेशनपर्यंत बसने जाऊन पुढे रेल्वेने जाणे हा मुख्य मार्ग होता आणि मी पहिल्यांदा जातांना तसाच गेलो होतो, पण सुटीसाठी घरी जातांना मात्र वाट थोडी वाकडी करून आधी सोलापूरला ताईला भेटायला गेलो आणि नंतर पुढे विजापूरमार्गे जमखंडीला गेलो. मी त्या वेळी माझ्या आईपासून पहिल्यांदाच दूर राहिल्यानंतरही ताईला भेटायची ओढ जास्त प्रबळ होती. त्यानंतरही मी बहुतेक वेळा सुटी लागल्यावर आधी ताईकडे जाऊन थोडे लाड करून घेतल्यानंतर जमखंडीला जात होतो.

ताईचे सोलापूरचे घर आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. कसबा या गजबजलेल्या भागातल्या मुख्य रस्त्यावर त्या घराचा मोठा दरवाजा होता, पण आत आल्यानंतर लांबलचक पॅसेजमधली तीन दारे पार करून गेल्यानंतर एक लहानसे अंगण होते आणि त्याच्या पलीकडे समोर ताईच्या घराची एक खोली होती. तिच्या डाव्या बाजूला लहानसे स्वयंपाकघर आणि उजव्या बाजूला आणखी एक लहानशी खोली होती ती अर्धी सामानाने भरली होती. असे आकाराने छोटे घर असले तरी ताईचे मन खूप मोठे होते. तिने आपुलकीने खूप माणसे जोडून ठेवली होती, त्यामुळे नेहमीच तिच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्यांची बरीच वर्दळ असायची.

तिच्या परिचयांमधूनच माझ्या दोन मोठ्या भावांची लग्ने जमली आणि सोलापुरात झाली. त्या लग्नाला आलेल्या सगळ्या नातलगांची रहायची सोय ताईने त्या जागेत आणि वाड्यात केली. त्या वाड्याची मालकीण आणि इतर बिऱ्हाडकरू हे सगळेजण नेहमीच ताईच्या मदतीला तयार असत इतके प्रेमाचे संबंध तिने जुळवून ठेवले होते. माझ्या त्या दोन्ही वहिनींच्या माहेरच्या लोकांशी ताईने अगदी निकटचे संबंध जोडले होते, ते पुढच्या पिढीतही टिकून राहिले आहेत. माझ्या वडिलांच्या शेवटच्या आजाराच्या वेळी त्यांना सोलापूरच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये ठेवले होते आणि त्यांनी आशा सोडल्यानंतर त्यांचे अखेरचे दिवस त्याच घरात गेले. तेंव्हाही बरीच नातेवाईक मंडळी तिथे गोळा झाली होती.

मी नोकरीला लागलो तेंव्हा माझे इतर सहकारी दरवर्षी महिनाभर अर्न्ड लीव्ह घेऊन आपापल्या होमटाउनला आईवडिलांकडे जात असत आणि जिथे ते लहानाचे मोठे झाले त्या त्यांच्या घरी राहून येत असत. आमचे वडील गेल्यानंतर मला असे होमटाउन राहिले नव्हते. वीकएंडला जोडून एकादी सुटी आली की मी पटकन एका झोळ्यात दोन कपडे कोंबून निघत असे आणि सरळ सोलापूरला जाऊन थडकत असे. त्या काळात फोनची सोय नव्हती, त्यामुळे आधीपासून सांगायची किंवा विचारायची सुविधा नव्हतीच. पण वेळी अवेळी केंव्हाही गेलो तरी ताई माझे अत्यंत प्रेमाने स्वागत करत असे. मी अगांतुक गेलो असलो तरी तिच्यासाठी मी पाहुणा नव्हतो, तिने मला तेवढा हक्क दिला होता आणि मी तो निःसंकाचपणे बजावत होतो. पुढे मी लग्न करून संसाराला लागल्यानंतर असे अचानक जाणे कमी झाले. पण मला ऑफिसच्या कामासाठी अनेक वेळा हैद्राबादला जावे लागत असे. तिथून परत येतांना वाटेत सोलापूर स्टेशन आले की मी कधीकधी उतरून जात असे आणि ताईला भेटून काही तासांनी दुसऱ्या गाडीने पुढे मुंबईला जात असे.

एकदा आम्ही एका बारशासाठी पुण्याला गेलो होतो आणि तो कार्यक्रम झाला की लगेच परत जाणार होतो, म्हणून काही कपडे नेले नव्हते. तिथे ताईही आली होती. तिने सांगितले की तिच्या मुलीचा साखरपुडा एक दोन दिवसांनी करायचे ठरले आहे आणि त्याला आम्ही यायलाच हवे. मला तर ऑफिसला दांडी मारणे शक्यच नव्हते, पण पत्नी आणि मुलाला ती आपल्याबरोबर सोलापूरला घेऊन गेली. तिथे गेल्यावर आठवडाभरात लग्नसमारंभ करून टाकायचा असे ठरले. त्या वेळी माझ्याकडे फोनही नव्हता. कसा तरी माझ्यापर्यंत निरोप पोचला आणि मी सर्वांचे कपडे घेऊन तिथे गेलो.

घाईघाईत ठरलेल्या त्या लग्नासाठी कुठले मंगल कार्यालय मिळाले नव्हते. एक हॉल भाड्याने घेतला आणि आचारी, वाढपी, भटजी, वाजंत्री, भांडीकुंडी, स्वैपाकासाठी लागणारे सामान वगैरे सगळ्यांची व्यवस्था आमच्या कर्तबगार ताईने आणि तिच्या वीसबावीस वर्षाच्या मुलाने न डगमगता शांतपणे फक्त चार पाच दिवसात केली, शिवाय आलेल्या पाहुण्यांचीही सोय केली. तसे आम्ही लोक मदतीला होतो, पण बाहेरगावाहून आलेले लोक अशी किती मदत करू शकणार होतो ? सगळ्यांसाठीच तो एक संस्मरणीय अनुभव होता.

मुलीचे शिक्षण आणि लग्न झाले आणि मुलाचे शिक्षण पूर्ण होऊन तो डॉक्टर झाला. त्यानंतर सोलापूरला रहायचे विशेष प्रयोजन राहिले नाही म्हणून तिने नोकरी आणि ते गाव सोडले आणि ती मुलासह गोकाकला रहायला गेली. मला कामाच्या वाढत्या व्यापामुळे वेळ मिळत नव्हता आणि मुंबईहून गोकाकला जाणे येणे एवढे सोपे नसल्यामुळे तिला वरचेवर भेटायला जाणे मला जमत नव्हते. पण परिवारातल्या कुणाकुणाच्या लग्नसमारंभांमध्ये आमच्या भेटी होत राहिल्या. ताई आता फिरायला मोकळी असल्यामुळे कधी मुलाकडे, कधी मुलीकडे जाऊन रहात असे, तर कधी एकाद्या भावाकडे तिचा चार दिवस मुक्काम असे.

ती एकदा माझ्याकडेही आली होती आणि दहा बारा दिवस राहिली होती. सतत काम करत रहायची सवय असल्यामुळे तिला स्वस्थ बसून राहणे अस्वस्थ करायचे, पण आजकाल घरातली सगळी कामे सोपी करणारी यंत्रे असल्यामुळे आमच्याच हातांना जास्त काम नव्हते आणि ती यंत्रेही तिच्या ओळखीची नव्हती. फ्लॅट संस्कृतीमुळे शेजारीपाजारी जरा दूर दूरच असतात आणि त्यात ते सगळे परभाषिक होते. त्यामुळे नवीन ओळखी करून घेणे कठीण होते. पोथ्यापुस्तके वाचत आणि टेलिव्हिजनवरचे कार्यक्रम पहात ती वेळ घालवत होती. पण तेवढ्या दिवसात तिने माझ्या मुलांना मात्र आपला चांगला लळा लावला होता.

माझ्या मुलाचे लग्न नाशिकला झाले त्यावेळी योगायोगाने ताई नाशिकलाच तिच्या मुलीकडे रहायला आली होती. त्याचा आम्हाला आनंद झालाच, तेंव्हा सर्वांना भेटून तिलाही खूपच आनंद झाला. तिला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली होती म्हणून एक पुष्पगुच्छ देऊन आम्ही तिचा नावापुरता छोटासा सत्कार केला. त्या वेळी तिची तब्येत छानच दिसत होती. ती चांगली हिंडत फिरत होती. ही आमची शेवटची भेट असेल अशी पुसटशी कल्पनाही त्या वेळी आम्हाला आली नव्हती. पण नंतर ती गोकाकला मुलाकडे गेली. तिथे असतांना एक दिवस देवासमोर बसून काही प्रार्थना करत असतांना तिने अचानक डोळे मिटले. असा विनासायास अंत होण्यासाठीसुद्धा मोठी पुण्याई लागते म्हणतात. अशा आमच्या प्रेमळ सिंधूताईच्या स्मृतीला शतशः प्रणाम.

अनाग्रही सभ्य भूमिका

‘निवडक आनंदघन’ या माझ्या ह्या ब्लॉगमध्ये मी मुळातल्या ‘आनंदघन’ या ब्लॉगमधले माझेच लेख थोडे संपादन करून पुनर्प्रकाशित करत आलो आहे. आज मी माझ्या त्या ब्लॉगसंबंधित एक जुना लेख देत आहे. माझ्या लेखनातल्या भूमिकेचे विवेचन मी या लेखात केले आहे. त्यात गेल्या आठ वर्षात फारसा बदल झालेला नसल्यामुळे मी आजवर याच भूमिकेत लेखन करत आलो आहे.

मी ‘आनंदघन’ हा ब्लॉग २००६ साली सुरू केला होता. काही वर्षे त्यात लेखन करत गेल्यानंतर त्या प्रयत्नांची दखल घेतली जाऊ लागली. लोकसत्ता या प्रमुख दैनिकामध्ये आठ वर्षांपूर्वी एका स्फुट लेखात माझ्या या ब्लॉगवर लिहून आले होते. ‘वाचावे नेटके’ या मथळ्याखाली दर सोमवारच्या लोकसत्तेमध्ये मराठी ब्लॉग्सची ओळख करून दिली जात होती. दि. ३ सप्टेंबर २०१२ च्या अंकात माझ्या या ब्लॉगबद्दल छापून आले होते. माझ्या पहिल्या पाच सहा वर्षांमधील लेखनाचा एक मार्मिक असा आढावाच त्यांनी या सदरात घेतला आहे. त्या काळात ‘उपक्रम’ या संकेतस्थळावर माझा बराच सहभाग होत असे. मी तिथे दिलेले लेख आणि प्रतिसाद यांचाही उल्लेख या लोकसत्तामधील लेखात आला आहे. अशा प्रकारे एका आघाडीच्या वृत्तपत्रात माझ्या लेखनाबद्दल लिहून आलेले वाचून माझ्या अंगावर मूठभर मांस चढले हे सांगायला संकोच कशाला? या लेखाचे लेखक अभिनवगुप्त यांचा मी अत्यंत आभारी आहे. वाचकांच्या सोयीसाठी हा लेख मी खाली उद्धृत केला आहे. तसेच त्यावर मला काय वाटले हे मी पुढील भागात व्यक्त केले आहे.

सोमवार, ३ सप्टेंबर २०१२

वाचावे नेट-के : अनाग्रही, सभ्य भूमिका

‘मला विचारांचा त्रास वगैरे होत नाही. एखाद्या अनपेक्षित अनुभवाचे नवल वाटणे, त्यावर इतरांच्या प्रतिक्रिया समजून घेणे, त्यावर स्वत: विचार करणे, अखेरीस पटेल तेवढे ठेवून घेणे आणि बाकीचे सोडून देणे हा सारा शिकण्याचा भाग आहे.’ वरवर पाहता साधे वाटणारे हे वाक्य, आनंद घारे यांनी ‘उपक्रम’ या चर्चास्थळावर २०११च्या नोव्हेंबरात लिहिले होते. ‘आनंदघन’ या ब्लॉगवर घारे यांचे भरपूर लिखाण चालू असते. मात्र अशी काही वाक्ये, घारे यांच्या विपुल आणि वैविध्यपूर्ण लिखाणामागचे हेतू स्पष्ट होण्यास उपयोगी ठरतील. वर दिलेले विधान उपयोगी कसे, ते पुढे पाहू. आधी आपल्या वाचनीयतेच्या शोधाबद्दल या ब्लॉगसंदर्भात काही स्पष्टीकरणे गरजेची आहेत.

घारे यांच्या ब्लॉगवरील ‘वैज्ञानिक माहिती देणाऱ्या लेखमालिका’ हा सर्वाधिक वाचनीय भाग. मात्र, अन्य प्रकारच्या नोंदी ‘सामान्य’ ठरवून पुढे जाता येणार नाही, इतपत वेगळेपण या ब्लॉगमध्ये आहे. आत्मचरित्र उलगडेल, अशा प्रकारे लिहिलेल्या जवळपास ४० टक्के नोंदी घारे यांच्या ब्लॉगवर आहेत. जमखंडी येथे जन्म व शिक्षण, कॉलेज शिक्षणासाठी गाव सोडणे, अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर अणुऊर्जा क्षेत्रात नोकरी, त्यादरम्यान ‘कॉलनी’त वास्तव्य आणि उच्चशिक्षित आणि स्थिरस्थावर मुले, प्रवासाची आवड भरपूर प्रमाणात भागवता येईल इतका सुखवस्तू निवृत्तिकाळ अशा अगदी व्यक्तिगत गोष्टी वाचकाला कळतात, पण त्या एकरेषीय पद्धतीने नव्हे. स्वत:च्या काकांबद्दल लिहिताना उच्चशिक्षणाचा उल्लेख घारे करतात, तर होळीबद्दल लिहिताना कॉलनीचा. तारापूरच्या अणुऊर्जा केंद्रात महत्त्वाची जबाबदारी घारे पार पाडत होते, हे वाचकाला कळते ते ‘अणुऊर्जा’ या विषयावर त्यांनी जी माहितीपर मालिका लिहिली आहे, त्यातून! असा- म्हणजे आत्मचरित्राच्या उपबोधाचा- परिणाम साधणारे लिखाण कित्येक मराठी ब्लॉगलेखकांनी आजवर केले आहे.

याखेरीज ‘स्व-समाजवर्णन’ हा शक्यतो खुसखुशीत शैलीत लिहिण्याचा प्रकारही घारे यांनी हाताळला आहे. या दोन्ही प्रकारच्या लिखाणांतून माणूस स्पष्ट होत जातो- म्हणजे अमुक एका समाजातली त्याने स्वत:कडे घेतलेली भूमिका काय आहे आणि ती कितपत खरी आहे, हे कळते. अशा लिखाणाला ब्लॉगवर स्थान देणारे ब्लॉगलेखक वा लेखिका जेव्हा काही मतप्रदर्शन करतात, तेव्हा त्यांनी (त्याआधी/ वारंवार) ब्लॉगवरच रेखलेले आत्मचित्र वाचकासमोर असतेच. हे अनेकदा लेखकांनाही माहीत असते आणि ‘आपण बुवा असे’ असे गृहीतक त्यांच्या लिखाणामागे असल्याचे वाचकही समजून घेतात. यातून पुढे ‘नायकत्वा’ची प्रवृत्ती वाढीस लागू शकते. ‘होय, मी तेव्हाही म्हटले होते आणि आजही म्हणणारच’ आदी सूर अशा नायकत्ववादी ब्लॉगलेखकांच्या लिखाणातून उघड होऊ लागतात. हे असे सूर अंतिमत: कर्कशच ठरणार, याचे भान पाळले गेले नाही, तर ब्लॉगच्या वाचनीयतेवर परिणाम होतो. हे झाले इतरांबद्दल. हा धोका घारे यांच्या लिखाणाला नाही, याचे कारण त्यांचे लिखाण मूलत: अनाग्रही आहे.

अनाग्रहीपणा म्हणजे गुळमुळीतपणा, असा अर्थाचा गोंधळ घारे यांच्या ब्लॉगबाबत होऊ नये. आग्रह हे पसंती आणि नापसंती यांच्याशी संबंधित असतात. गुळमुळीतपणामध्ये पसंती कशाला आणि नापसंती कशाबद्दल हे अस्पष्टच ठेवण्याची सोय असते. पसंती-नापसंतीची स्पष्टता असली की त्यापुढे जाऊन नापसंतीला झोडपणे वा पसंतीला सर्वोच्च मानणे ही ‘आग्रहा’ची पुढली पायरी सहज गाठता येते.. ती पायरी टाळणारे, ते अनाग्रही. घारे अनाग्रही कसे, याचे एक उदाहरण त्यांनी ‘उपक्रम’वरील चर्चेला उत्तर देताना आपसूकच समोर ठेवले आहे.
‘पटेल तेवढे ठेवून घेणे आणि बाकीचे सोडून देणे’ हा घारे यांच्या ‘शिकण्याचा भाग’ असतो, असे ते म्हणतात. ‘पटेल’ आणि ‘बाकीचे’, यात पसंती-नापसंती आलीच, पण हा पसंती-निर्णय अंतिम नाही, तो ‘शिकण्याचा भाग’ आहे.

ब्लॉगलिखाणाची घारे यांची प्रक्रिया २००६ पासून बदलत गेलेली दिसेल. गेल्या तीन-चार वर्षांत, हा ‘शिकण्याचा भाग’ त्यांच्या लेखनप्रक्रियेतही आलेला आहे. घारे लिहितात तो मजकूर एखाद्या चर्चास्थळावरही चर्चेला खुला ठेवतात. चर्चेची सभ्यता पाळतात आणि क्वचित, ‘पटेल तेवढे घ्यावे’ या शिरस्त्याने ब्लॉगवरच्या लिखाणात बदलही करतात. एखाद्या लेखाच्या शीर्षकातच ‘सुधारित’ असा उल्लेख या ब्लॉगवर दिसतो, तोही याचमुळे. बँकेच्या एटीएम मशीनने कार्ड ‘खाऊन टाकल्या’वरचा अनुभव, यावरची घारे यांची नोंद केवळ आत्मरत न होता माहितीपर झाली आहे, तीही चर्चास्थळावर घडलेल्या संवादामुळे.

घारे यांनी कायकाय लिहिले, हे त्यांच्या ब्लॉगवर जाऊन पाहाता येते. (‘वाचावे नेट-के’चा परीघ ‘ब्लॉगचा परिचय आणि प्रसिद्धी’ एवढाच नसल्याने-) इथे वैपुल्य आणि सातत्य याबद्दलच्या एका मुद्दय़ाची चर्चा प्रस्तुत ठरावी. ‘मी लिहिलेली इतकी पुस्तके छापली गेलीत’ अशी संख्या सांगणाऱ्यांकडे जरा संशयाने पाहण्याचा जो दृष्टिकोन मराठी वाचकांपैकी सुजाण समाजाने काळानुरूप विकसित केला आहे, तो ब्लॉगलिखाणाची चर्चा करताना जरा बाजूला ठेवण्यास हरकत नाही, अशी एक विधायक शक्यता घारे यांचा ब्लॉग दाखवतो. घारे यांचे ब्लॉगलिखाण अभ्यासूपणे पाहणे त्यामुळे महत्त्वाचे ठरते.

उत्कृष्ट वैज्ञानिकाचा पुरस्कार स्वत:ला मिळाल्याचे घारे यांनी ब्लॉगच्या परिचय-समासातच, कुठल्याही पानावर दिसेल अशा ठिकाणी नमूद केले आहे. अशा व्यक्तीने ‘ईश्वरी कृपा, पूर्वपुण्याई, सुदैव..’ आदी संकल्पनांबद्दल सकारात्मक सूर लावावा, हे अनेकांना पटणे-पचणे अशक्य होते. तसेच एका चर्चेत झाले. परगावी गेले असता रेल्वे स्थानकात शुद्ध हरपण्याइतका उलटय़ा-जुलाबांचा त्रास होणे आणि त्यापुढे रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात जावे लागून खडखडीत बरे होणे, अशा अनुभवानंतर हा सकारात्मक सूर घारे यांनी लावला. त्या सुराची होणारी चर्चा मान्य केली, पण ‘सोडून देणे’ हा पर्याय इथे बलवत्तर ठरला. ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलची तात्त्विक किंवा आधुनिक तत्त्वज्ञानाधारित चर्चा घारे यांनी इथे केलेली नाही. त्यांना ती करायची आहेच, असेही नव्हे.

माणसाला हा अनुभव या विचारांकडे नेऊ शकतो, एवढेच त्यांना म्हणायचे आहे. इथे पुन्हा, त्यांच्या अनाग्रही भूमिकेचा पैलू दिसतो. अनुभव आणि त्यांचे परिणाम, अशा अनुभवसिद्ध जगण्यात पुन्हा नव्याने येणारे अनुभव आणि त्या नव्या अनुभवांचे परिणाम कोणते होऊ शकतात, याचा वेध घेण्यासाठी इतरांनाही आवाहन, हे घारे यांच्या एकंदर ब्लॉगलिखाणातील महत्त्वाचे संवादसूत्र आहे. त्यांचा ब्लॉग वैज्ञानिक माहिती देणाऱ्या लेख-मालिकांसाठी शिफारसपात्र ठरतोच ठरतो, परंतु ब्लॉगलेखक म्हणून जो सभ्यपणा घारे पाळतात आणि वादांच्या प्रसंगांमध्येही टिकवून ठेवतात, तो त्यांचा विशेष अन्य ब्लॉगलेखकांना अनुकरणीय वाटावा, असा आहे.

तात्पर्य हे की, ब्लॉगलिखाणात अनुस्यूतच- अपेक्षितच- असलेले सातत्य विचारात घेता आपण कोणत्या विषयांवर लिहितो आणि किती शैलीदार लिहितो याखेरीज आपण कोणत्या भूमिकेतून लिहितो याचाही विचार सर्वच ब्लॉगलेखकांनी केल्यास मराठी ब्लॉगांची वाचनीयता वाढेल.

अभिनवगुप्त

उल्लेख झालेल्या ब्लॉगचा पत्ता: http://anandghan.blogspot.in

लोकसत्ता वृत्तपत्राच्या सौजन्याने


अनाग्रही सभ्य भूमिका

लोकसत्ता या वर्तमानपत्राच्या ‘वाचावे नेटके’ या सदरात माझ्या या ब्लॉगची ओळख करून देतांना त्या लेखाचा मथळा ‘अनाग्रही सभ्य भूमिका’ असा दिला आहे. श्री.अभिनवगुप्त यांनी माझ्या लेखनामागील भूमिका इतक्या नेमक्या शब्दात पकडलेली पाहून मला त्याची थोडी गंमत आणि कौतुक वाटले. ‘अनाग्रह’ आणि ‘सभ्यपणा’ हा माझ्या नेहमीच्या वागण्यातला भाग असल्यामुळे माझ्या लेखनात तो आपोआप उतरला असावा आणि त्यातला स्थायी भाव झाला असावा. मला ते कधी वेगळे जाणवले नाही की ब्लॉग लिहीत असतांना मी मुद्दाम ठरवून ही भूमिका घेतलेली नाही. ती ठळकपणे उठून दिसेल एवढी महत्वाचीही वाटली नव्हती. त्यामुळे हा मथळा वाचतांना मला आधी किंचित नवल वाटले. अर्थातच या अभिप्रायाशी मी सहमत आहे. ज्येष्ठ नागरिकत्व प्राप्त झाल्यानंतर कुणाचे कौतुक करण्याचा अधिकार मला आपोआप मिळाला आहे असे मला वाटते.

“जे जे आपणासी ठावे ते सर्वाशी सांगावे” आणि “मनात येईल ते लिहून मोकळे व्हावे” या दोन खांबांच्या मुख्य आधारावर माझे ब्लॉगवरील लिखाण होत असते. त्याची वाचनीयता वाढवण्याच्या दृष्टीने रंजकता, खुसखुशीतपणा वगैरेंचे टेकू मी त्याला देत असतो. आपल्याकडे असलेली माहिती इतरांना सांगत असतांना त्यांना ती समजणे महत्वाचे असते. माझे ब्लॉग वाचणारे वाचक भिन्न भिन्न क्षेत्रांमध्ये निरनिराळ्या स्तरावर वावरणारे असतील, किंवा तसे असावेत असे गृहीत धरून सर्वसामान्य सुशिक्षित लोकांना कळावे इतपत सोप्या शब्दात ती माहिती देण्याचा प्रयत्न मी करत असतो. ती माहिती शक्य तेवढी अचूक आणि परिपूर्ण असणे महत्वाचे असल्यामुळे ती पडताळून पाहतो. याला मर्यादा असल्यामुळे माझेकडून काही चुका होतात, उणीवा राहतात. सुजाण वाचकांनी त्या दाखवून दिल्या तर मी त्यांचे आभार मानून आपल्या लेखात दुरुस्ती करणेच योग्य असते. एकाद्या गृहस्थाचे नाव ‘पाटील’ आहे असे कोणाकडून कळले म्हणून मी त्याला त्या नावाने संबोधले आणि तो ‘पटेल’ निघाला तरीसुध्दा तो ‘पाटील’च आहे असे आग्रह धरणे हास्यास्पद ठरेल. अशा वेळी मला जे बरोबर वाटते त्याचा आग्रह मी धरतो, पण माझेच सांगणे बरोबर होते असा हट्ट धरत नाही.

‘मनात येईल ते’ लिहितांना त्यात माझे विचार आणि मते येतात. माझ्यावर झालेले संस्कार, माझे शिक्षण, वाचन, श्रवण, मनन. चिंतन अनुभव वगैरेंच्या मिश्रणातून ते उद्भवतात. या गोष्टी प्रत्येक माणसाच्या बाबतीत निराळ्या असल्याकारणाने प्रत्येकाचे विचार आणि मते वेगळी असू शकतात. आपली मते दुसऱ्याला पटली तर चांगलेच आहे, पण पटली नाहीत तरी त्याच्या मतांचा आदर ठेवला पाहिजे असे मी समजतो. यालाच लोकसत्तेच्या स्तंभलेखकाने ‘अनाग्रह’ म्हंटले असावे. आपल्याला न पटलेल्या निराळ्या मतांची टर उडवणे किंवा त्यांना तुच्छ लेखणे असे प्रकार माझ्या लेखनात नसतात. याला बहुधा ‘सभ्य भूमिका’ असे म्हंटले असावे. कोणाचेही विचार आणि मते ही इतर अनेक गोष्टींवर आधारलेली असल्यामुळे ती जन्मभर एकसारखीच रहावीत असे असणार नाही. आजूबाजूची परिस्थिती, माणसाचे ज्ञान आणि अनुभव यात रोज नवनवी भर पडत असते आणि विचारसरणीवर त्याचा प्रभाव पडणे आणि त्या विषयावरील मत बदलणे हे जीवंतपणाचे लक्षण आहे. त्यामुळे मी मांडलेली मते त्या वेळच्या परिस्थितीत तशी असतात आणि मी ती ठामपणे मांडतो. त्यात गुळमुळीतपणा नसतो हे लेखकाने नमूद केले आहे. ती मते त्या क्षणापर्यंतच्या अनुभवावर आधारलेली असल्यामुळे एकाद्या अनुभवाने ती पार उलटी होणार नाहीत. अनुभवांची गोळाबेरीज बदलायला वेळ लागतो. ही प्रक्रिया संथ असते. त्यामुळे त्यात बऱ्यापैकी सातत्य असते. माझ्या बालपणी मी कोणत्या वातावरणात रहात होतो आणि त्या काळात माझ्या समजुती व विचार कसे होते आणि त्यात कसा आणि किती बदल होत गेला हे सांगणे हा माझा आवडता छंद आहे याची प्रचीती या ब्लॉगवरील अनेक लेखांमध्ये दिसेल.

आणखी एक गोष्ट अशी आहे की कोठल्याही गोष्टीमागे असलेला कार्यकारणभाव आपण एका मर्यादेपर्यंत समजून घेऊ शकतो. त्या पलीकडे जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ तिखट व मसालेदार खाद्यपदार्थ किंवा उत्तेजक द्रवांच्या सेवनामुळे जठरामध्ये जास्त प्रमाणात आम्ल जमते आणि त्यामुळे जळजळ (हायपर अॅसिडिटी) होते हे डॉक्टरांकडून समजते, कोणती काळजी घेतली किंवा औषध घेतले तर कमी प्रमाणात आम्ल तयार होईल, तसेच कोणत्या औषधाने त्या आम्लाचे शमन होईल हे समजण्यापर्यंत आपण मजल मारू शकतो, शरीरशास्त्राचा अभ्यास केल्यास कोणत्या ग्रंथी हे काम करतात हे समजेल, पण मुळात या ग्रंथींची अंतर्गत रचना कशी असते आणि कोणत्या अन्नपदार्थामधून हे आम्ल तयार करण्याचे काम कोणत्या रासायनिक क्रियेने आणि का होते, ते कमी जास्त प्रमाणात कसे होते हे समजाऊन सांगणारा माणूस मला तरी अद्याप भेटलेला नाही. शरीर ठणठणीत आणि मन स्वस्थ असतांना आपली बुध्दी ज्या मर्यादेपर्यंत काम करते तिथपर्यंतसुध्दा काही वेळा आपण पोचू शकत नाही. त्या वेळी काही शारीरिक किंवा मानसिक कारणामुळे आपली बुध्दी व विचारशक्ती क्षीण झालेली असल्यामुळे वेगळे विचार मनात येतात. असे अनुभव सुध्दा येतात आणि ते मान्य करून त्यापासून बोध घेणे शहाणपणाचे असते.

श्री.अनुभव गुप्त यांनी लिहिलेल्या लेखाच्या सुरुवातीलाच माझे एक वाक्य दिले आहे. हे वाक्य मी कोणत्या संदर्भात लिहिले होते हे समजून घेणे थोडे महत्वाचे आहे. माझ्यावर येऊन गेलेल्या एका कठीण प्रसंगाबद्दल मी एक सविस्तर लेख लिहिला होता. त्याचा शेवट खाली दिलेल्या वाक्याने केला होता.
“परमेश्वराच्या कृपेने आणि शिवाय थोरांचे आशीर्वाद, सर्वांच्या सदीच्छा, माझी पूर्वपुण्याई आणि नशीब यांच्या जोरावर मी एका मोठ्या संकटातून सहीसलामत वाचलो असेच उद्गार त्यानंतर मला भेटलेले लोक काढतात आणि मी त्याला लगेच होकार देतो. पण खरेच हे सगळे असते का? असा एक विचार मनातून डोकावतोच!”

हा लेख मी उपक्रम या संस्थळावरसुध्दा प्रकाशित केला होता. त्यावर अनेक उलटसुलट प्रतिसाद आले. त्यातल्या एका मित्राने चांगले विश्लेषण करून झाल्यानंतर अखेर असे वाक्य लिहिले होते, “तुमच्या मनात डोकावणार्‍या विचाराने रंजन होत असेल, तर जरूर डोकावू द्यावा. विचाराने त्रास होत असेल, तर त्या विचाराला थारा देऊ नका.”
त्यावर माझी प्रतिक्रिया अशी होती, “मला विचारांचा त्रास वगैरे काही होत नाही . एकाद्या अनपेक्षित अनुभवाचे नवल वाटणे, त्यावर इतरांच्या प्रतिक्रिया समजून घेणे, त्यावर स्वतः विचार करणे, अखेरीस पटेल तेवढे ठेऊन घेणे आणि बाकीचे सोडून देणे हा सारा शिकण्याचा भाग आहे आणि ते जन्मभर चालतच असते. अशा एका घटनेमुळे माझे वागणे बदलणार नाही.”

एका संभाषणात सहजपणे आलेले हे वाक्य लेखकाला मार्गप्रदर्शक वाटले आणि त्या वाक्याला त्याने आपल्या लेखाच्या अग्रस्थानी जागा दिली यात त्याची गुणग्राहकता दिसून येते. पुन्हा एकदा त्याचे आभार.

. . . . . . . . . आनंद घारे

मानवी संबंध

संबंध या शब्दाची व्याप्ती फार विस्तृत आहे. ते व्यक्तीव्यक्तींमधले असतात तसेच इतर सजीव प्राणी, निर्जीव वस्तू, घटना किंवा विचार, सिद्धांत वगैरे अमूर्त (अॅब्स्ट्रॅक्ट) गोष्टींशीसुद्धा असतात. आपल्या परिचयातल्या काही व्यक्ती त्यांच्या घरात कुत्रा किंवा मांजर पाळतात, ग्रामीण भागात काही लोकांच्या गोठ्यात गायीम्हशी असतात. त्या मुक्या प्राण्यांशी या लोकांचे घट्ट संबंध जुळलेले असतात. आपण त्यांच्याकडे जात येत असलो तर ते प्राणी आपल्याला ओळखायला लागतात आणि आपल्यालाही त्यांच्याबद्दल काही वाटायला लागते. शिवाय ते लोक आपले आहेत असे जरी म्हंटले की त्यांच्याकडल्या प्राण्यांशीसुद्धा आपला अप्रत्यक्ष संबंध जुळतोच. आपले कपडे, पुस्तके, घर वगैरें निर्जीव पदार्थ आपल्याला जीव की प्राण वाटायला लागतात. आपल्या आयुष्यात घडलेल्या महत्वपूर्ण घटनांचा संबंध आपल्याशीच नव्हे तर आपल्या भूतकाल, वर्तमानकाळ किंवा भविष्यकाळाशीही असतो. आपले विचार, मते, इच्छा, आकांक्षा, आवडी निवडी वगैरेंचा आपल्याइतका इतर कोणाशीच निकटचा संबंध नसतो.

आपण आधी त्यातल्या मानवी संबंधांबद्दल विचार करू. बहुतेक वेळा हे संबंध आपोआप किंवा योगायोगाने जुळतात, काही लोक त्याला सुदैवाने किंवा दैवयोगाने असेही मानतात. मूल जन्माला येताच त्याचे आई वडील, भाऊबहिणी, आजोबा आजी, काका. मामा, मावशी, आत्या वगैरे सगळ्या नातेवाईकांशी नातेसंबंध ही जन्माला येतात. शाळाकॉलेजात जाताच शिक्षक, प्राध्यापक, सहविद्यार्थी वगैरेंशी संबंध निर्माण होतात, तसेच नोकरीला लागताच सहकाऱ्यांशी होतात. पति किंवा पत्नी यांच्याबरोबरचे लग्न ठरवून केले जात असले तरी त्या क्षणी सासुरवाडीकडच्या सगळ्या नातेवाईकांशीसुद्धा आपले संबंध आपोआप जुळतात. खरेदी विक्रीचा व्यवहार ठरवून केला गेला तरी त्यामधून ग्राहक आणि विक्रेता यांच्याकडल्या इतर लोकांशीही संबंध येत राहतो. अशा प्रकारे बहुतेक सगळे मानवी संबंध आपोआप जन्माला येतात, अगदी थोड्या लोकांच्या बाबतीत मात्र आपण मुद्दाम प्रयत्न करून तो जुळवून आणतो.

मानवी संबंध आपणहून जन्माला येत असले तरी ते संबंध टिकवून ठेवणे मात्र जवळजवळ पूर्णपणे संबंधित व्यक्तींच्या हातात असते. संबंध आलेल्या व्यक्तीशी आपण कसे वागतो, कसे बोलतो याचप्रमाणे तो कसा प्रतिसाद देतो यावर ते अवलंबून असते. यासाठी दोन व्यक्तींनी सतत एकमेकांच्या संपर्कात राहणे आवश्यक असते, निदान ते उपयुक्त तरी असतेच. संपर्क तुटला की संबंधांवर धूळ साचायला लागते आणि ते विस्मृतीत जायला लागतात. आपल्याला रोजच्या जीवनात जी माणसे भेटतात त्यांच्याशी आपण कधी गरजेनुसार कामापुरते बोलतो किंवा कधी कधी अवांतर गप्पाही मारतो. बोलणे झाले नाही तरी एकादे स्मितहास्य करून किंवा हात हालवून जरी त्याचे अभिवादन केले तरी त्यामधून आपले संबंध टिकून रहायला मदत होते. शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायामुळे अनेक लोकांना घर, गाव किंवा देशसुद्धा सोडून दूर जावे लागते. माझ्या लहानपणी पोस्टाने पत्र पाठवणे एवढाच संपर्कात रहाण्याचा एकमेव मार्ग उपलब्ध होता. पत्र पोचून त्याचे उत्तर यायला कित्येक दिवस लागत असत. यामुळे अशा प्रकारचा संपर्क फक्त अगदी निकटच्या निवडक लोकांशी ठेवला जात असे. मी तिशीमध्ये आल्यानंतर माझ्याकडे टेलीफोन आला आणि मला निदान काही स्थानिक लोकांशी तरी केंव्हाही बोलणे शक्य झाले. क्रमाक्रमाने एसटीडी आणि आयएसडी यांची सोय झाली आणि जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या आपल्या आप्तांशी बोलणे शक्य झाले. सुरुवातीला या सोयी महाग असल्यामुळे त्यांचा उपयोग जरा जपूनच केला जात असे. आता त्याही आपल्या आवाक्यात आल्या आहेत.

इंटरनेट सुरू झाल्यानंतर ई मेलद्वारे संदेश पाठवणे सुलभ आणि फुकट झाले. टेलीफोनच्या सोयी झाल्यानंतर व्यक्तीगत पत्रव्यवहार जवळजवळ संपुष्टात आला होता. ई मेलमधून त्याला एका वेगळ्या रूपामध्ये नवजीवन मिळाले. हाताने पत्रे लिहिण्याऐवजी लोक त्यांना संगणकावर टाइप करायला लागले. ऑर्कुट, फेसबुक, गूगलप्लस वगैरेंमुळे त्याला आणखी उधाण आले आणि आता ट्विटर आणि व्हॉट्सअपवर तर लहान लहान संदेशांचे महापूर यायला लागले आहेत. या सर्वांमध्ये एक अशी सोय आहे की आपण एकच संदेश एकाच वेळी कित्येक लोकांना पाठवू शकतो आणि त्यांचे प्रतिसादसुद्धा एकाच वेळी सर्वांना मिळतात. हे सगळे अगदी क्षणार्धात होते. यामुळे संपर्क साधून आपापसातले संबंध टिकवून ठेवणे आता खूप सुलभ झाले आहे. आंतर्जालावरली किंवा या मायानगरीतली ही माणसे प्रत्यक्ष आयुष्यात कामाला येतात का? असा प्रश्न विचारला अनेक वेळा जातो. त्याचे उत्तर असे आहे की ही सगळीच माणसे खरोखरच आपल्या उपयोगी पडू शकत नसली तरी एकाद दुसरा तरी मदतीसाठी पुढे येतोच. मुख्य म्हणजे आपली अडचण त्याला लगेच समजते. एरवीच्या शांततेच्या काळात या मंडळींशी गप्पा मारून किंवा चर्चा करून आपल्याला एक प्रकारचा मानसिक किंवा बौद्धिक आनंद मिळत असतो. आज माझे सुमारे तीनचारशे अशा प्रकारचे जालमित्र आहेत. त्यांच्याशी निरनिराळ्या विषयांवर गप्पा मारता मारता किंवा फक्त त्यांनी टाकलेल्या पोस्ट वाचत व चित्रे पहात पहातसुद्धा सारा दिवस आरामात चालला जातो.

संबंध टिकवून ठेवणे आपल्या हातात असते आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. ते तोडून टाकणे किंवा वाढू न देणे सुद्धा आपल्याच हातात असते आणि त्यासाठी विशेष काही करावेही लागत नाही. शिवाय आपल्याला ज्यांच्याशी संबंध ठेवायचे असतात तोच जर त्यासाठी उत्सुक नसेल तर मात्र आपण काही करूही शकत नाही. संबंध ठेवले गेले नाहीत तर ते आपल्या आप क्षीण होत होत नाहीसे होतात. काही वेळा काही अप्रिय घटना घडतात त्यामुळे ते तुटले जातात किंवा मुद्दाम तोडले जातात. दुधाने तोंड पोळलेला माणूस ताकसुद्धा फुंकून पितो याप्रमाणे वाईट अनुभव आलेले काही लोक कोणत्याही अनोळखी किंवा अविश्वसनीय व्यक्तींपासून थोडे अंतर राखूनच राहतात. काही वेळा एका काळी जवळची वाटत असलेली माणसेसुद्धा कोणत्याही कारणाने एकमेकांपासून दूर गेल्यामुळेच संपर्कात रहात नाहीत आणि त्यामुळे ती माणसे हळू हळू मनानेही दूर जातात. आत्मकेंद्रित वृत्तीची (इन्ट्रोव्हर्ट) काही माणसे तुसडी किंवा माणूसघाणीच असतात. त्यांचे कुणावाचून काहीसुद्धा अडत नाही याचीच त्यांना घमेंड असली तर त्यांचे कुणाशीही चांगले संबंध जुळतच नाहीत.

संपर्क जोडणे आणि वाढवणे हे गुण लहान मुलांमध्ये भरपूर जास्त प्रमाणात असतात. ती पटकन कोणालाही आपलेसे करतात. पण त्याचप्रमाणे हे सहजपणे जुळलेले संबंध ती लगेच विसरूनसुद्धा जातात. जसजसे वय वाढत जाते, जगाचे अनुभव येत जातात, टक्केटोणपे खाल्ले जातात त्यानुसार माणसे याबद्दल विचार करायला लागतात. कोणाशी किती प्रमाणात जवळचे संबंध ठेवावे हे ठरवायला लागतात. त्या संबंधामधून होत असलेल्या आणि होऊ शकणाऱ्या नफ्यातोट्याचा विचार करायला लागतात. अशा प्रकारचे संबंध किती विशुद्ध आहेत आणि त्यात किती आपमतलबीपणा आहे हे चांचपून पहातात. लहानपणी जुळलेले संबंध सहसा पूर्णपणे तुटत नाहीत. ती व्यक्ती चारपाच दशकांनंतर जरी भेटली तरी पूर्वीच्या आठवणी उसळून वर येतात. हे काही प्रमाणात मोठेपणी भेटलेल्या व्यक्तींसंबंधातसुद्धा घडत असते. पूर्वीच्या काळी जवळ आलेली एकादी व्यक्ती कित्येक वर्षांनंतर नुसती भेटली तरी आपल्याला केवढा आनंद होतो! आपण तिच्याशी पहिल्याच जवळकीने छान बोलतो, त्यानंतर आपण पुन्हा एकमेकांना निवांतपणे भेटू असे नेहमी बोलले जाते. पण क्वचितच ते अंमलात आणता येते. ज्या कारणांमुळे आपले संबंध कमजोर झालेले असतात ती कारणे शिल्लक असली तर ते नव्याने जुळलेले पूर्वीचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी मनापासून खूप प्रयत्न केले जात नाहीत. माझ्या नात्यातली किंवा मैत्रीतली अशी कित्येक माणसे आहेत जी मला अचानक एकाद्या समारंभात भेटतात, त्या वेळी ती अत्यंत आपुलकीने बोलतात, एकमेकांना पुन्हा सवडीने भेटत रहायच्या योजना आखतात आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या एकाद्या समारंभातच भेटतात आणि अशा प्रकारे पूर्वीच्या भेटींची पुनरावृत्ती होत रहाते.

आपण माणसामाणसांमधल्या संबंधांचा विचार करतो त्यावेळी बहुतेक वेळा तो विचार त्यांच्या आपसातल्या चांगल्या संबंधांबद्दल असतो. जवळच्या किंवा सर्वात आतल्या वर्तुळातल्या लोकांशी सर्वांचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि घनिष्ठ संबंध असतात, माणसांमाणसांमधले अंतर जसजसे वाढत जाते तसतशी त्या संबंधांची वीण सैल होत जाते. थोड्या बाहेरच्या वर्तुळातल्या लोकांशी सर्वांचे सलोख्याचे संबंध असतात आणि दूरच्या इतर लोकांशी कामापुरते वरवरचे संबंध असतात. ज्यांच्याबद्दल मनात वैरभाव किंवा द्वेष असतो त्यांच्याशी सहसा कोणी संबंध ठेवतच नाहीत आणि ठेवलेच तर ते औपचारिक तोंडदेखले खोटे खोटे असतात, म्हणजे खरे तर ते नसल्यातच जमा असतात. काही वेळा मात्र एका माणसाला दुसरा माणूस जवळचा वाटत असतो पण तो मात्र पहिल्या माणसापासून दूर दूर रहात असतो असे अनुभवसुद्धा येतात. यामुळे त्यांचे परस्परसंबंध गुंतागुंतीचे होतात. दोन व्यक्तींमध्ये चांगले संबंध प्रस्थापित होत असतांना त्यामधून आपुलकीची भावना निर्माण होते. आपुलकी आणि प्रेमाच्या धाग्याने ते लोक एकमेकांशी बांधले जातात, म्हणून त्यांना संबंध असे म्हणायचे. हे बंधन का आणि कसे होत असेल?

परमेश्वराने किंवा निसर्गाने जगातल्या सर्वच प्राणिमात्रांना स्वतःचा जीव वाचवण्याची एक जबरदस्त अंतःप्रेरणा (Instinct) दिलेली आहे. किडामुंगींपासून वाघ, सिंह. हत्ती वगैरेंपर्यंत प्रत्येक जीव स्वसंरक्षणासाठी सदोदित धडपडत असतो. आपल्या जिवाला धोका आहे असे वाटताच तो लपून बसतो, पळून जातो किंवा शत्रूवर प्रतिहल्ला चढवतो. प्रत्येक सजीव प्राण्याच्या शरीराला अन्नाची गरज असते म्हणूनमुळे ते शोधत तो फिरत असतो आणि त्याला विश्रांती व निद्रा यांची गरज असते म्हणून त्यासाठी तो निवारा पाहतो. या दोन्हींचा समावेशसुद्धा त्या प्राण्याच्या जीव वाचवण्याच्या मूलभूत प्रेरणेबरोबरच करता येईल. या बाबतीत प्रत्येक प्राणी हा मुख्यत्वे स्वार्थीच असतो. सशक्त शाकाहारी प्राणी दुसऱ्या कमजोर प्राण्याच्या समोरचे अन्न बिनदिक्कतपणे खायचा प्रयत्न करतात तर मांसाहारी प्राणी दुसऱ्या प्राण्यांनाच खाऊन टाकतात. निवाऱ्याच्या बाबतीतसुद्धा निसर्गामध्ये बळकावणे चाललेले असते. सगळे नागोबा आयत्या बिळातच घुसून वास्तव्य करतात. तसे पाहता माणूससुद्धा त्याच्या मूळ स्वभावाने स्वार्थीच असतो, संस्काराने त्याच्यात बदल होतात. त्याशिवाय इतरही काही कारणे असतात.

समस्त प्राणीमात्र नेहमी स्वतःचा स्वार्थ पहात असले तरी त्यांना इतर प्राणीमात्रांच्या सोबतीनेही रहायचे असते. कदाचित त्यात त्यांना अधिक सुरक्षित वाटत असेल. म्हणजे हा सुद्धा आपला जीव वाचवण्याचाच एक भाग झाला. तशा प्रकारची दुसरी अंतःप्रेरणाही त्याला मिळत असते. यामुळेच जगातले बहुतेक प्राणी, कीटक, मासे, पक्षी वगैरे जीव कळप करून राहतात. तसे रहात असतांना त्यांना स्वतःच्या स्वार्थाला थोडी मुरड घालणे, थोड्या गोष्टी इतरांसाठी सोडणे, इतरांचा थोडा त्रास सोसणे वगैरे करणे भाग असते. एकाद्याने तसे नाही केले तर कळपातले इतर प्राणी त्याला हुसकावून लावतील अशी भीती असते. बहुतेक सगळी माणसेसुद्धा लहानमोठ्या समूहांमध्ये राहणेच पसंत करतात. आपले कुटुंब, वस्ती, गाव, प्रदेश, देश, जग किंवा कुटुंब, पोटजात, जात, धर्म अशा चढत्या भाजणीने त्यांच्या समूहाच्या व्याख्या बदलत जातात एवढेच. त्याचे वागण्याचे नियम त्यानुसार ठरत जातात आणि ते पाळण्याची गरज त्यांना वाटते. ते करत असतांना स्वार्थाला बाजूला ठेवावे लागतेच.

पण या सगळ्यांच्या पलीकडे जाणारी आणखी एक दिव्य अशी अंतःप्रेरणा माणसाला तसेच इतर जीवांना मिळत असते. प्रत्येक प्राणी किंवा पक्षी आपल्या पिलांवर माया करतात, त्यांचे जिवापाड संरक्षण करतात, त्यांच्यासाठी अन्नाची तरतूद करतात. यात त्यांचा कसलाही स्वार्थ नसतो किंवा हा परस्पर सहकाराचा भागही नसतो. यात शुद्ध आपुलकी आणि प्रेम असते. पक्षी जोडप्याने रहात असतात, त्यांनाही आपल्या जोडीदाराविषयीसुद्धा विशेष असे काही वाटत असणार. एका कळपातल्या प्राण्यांमध्ये एक प्रकारची जवळीक निर्माण होत असते. पाळीव प्राणी नेहमीच त्यांना पाळणाऱ्यांशी मायेच्या नात्याने जोडले जातात. हे मुके जीव त्यांच्या डोळ्यांमधून किंवा अंगलटीला येऊन प्रेम व्यक्त करतात. कुत्रा हा प्राणी तर अत्यंत इमानदार समजला जातो. त्यांचे हे वागणे हे नैसर्गिक स्वार्थभावनेच्या विरुद्ध असले तरी होत असते. ते कशामुळे होत असेल ?

सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांचा पगडा सर्व माणसांच्या आचार आणि विचारांवर असतो आणि त्यानुसार ती वागत असतात असे आपल्या प्राचीन शास्त्रांमध्ये लिहिले आहे सांगितले जाते. प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत या तीन गुणांचे प्रमाण मात्र निरनिराळे असते. दुसऱ्याकडील वस्तू हिसकावून किंवा लुबाडून घेणे, तिचा विध्वंस करणे ही राक्षसी वृत्ती माणसातल्या तम या वाईट गुणाच्या प्रभावामुळे येते. आपल्याला हवे असेल ते आपल्या प्रयत्नाने आणि परिश्रमाने मिळवण्याची धडपड सर्वसाधारण माणसे करत असतात. ही मानवी वृत्तीची क्रिया त्यांच्यातल्या रज या गुणामुळे त्यांच्याकडून घडत असते. काही दुर्मिळ लोक स्वतः उपाशी राहून आपला घास भुकेल्यांना भरवतात, इतरांचा फायदा व्हावा यासाठी स्वतः तोशीस सोसतात. इतरांना सुखी करण्यात स्वतःचा आनंद शोधतात. अशा लोकांची गणना देवमाणूस म्हणून केले जाते. परोपकार, दया, माया, भक्ती, सचोटी, कृतज्ञता वगैरे दैवी गुण माणसातल्या सत्त्वगुणामधून येतात. प्रेमाची भावना हे सत्त्वगुणाचे सर्वात सुंदर असे रूप आहे. प्रेमळ लोक सात्त्विक प्रवृत्तीचे असतात किंवा सात्त्विक लोक प्रेमळ असतात असे आपण पाहतोच. प्रत्येक माणसाच्या अंगात काही प्रमाणात सत्त्वगुण असतात आणि जे कोणी लोक त्याला आपलेसे वाटत असतात त्यांच्यासंबंधी त्यालासुद्धा प्रेम, माया, ममता वगैरे वाटत असते, तो त्यांची काळजी करतो आणि घेत असतो.

प्रेम ही भावना बांधून ठेवणारी असते. त्याने माणसे एकमेकांशी जोडली जातात आणि राहतात. माणसांना जन्मतःच आईचे प्रेम मिळते आणि ते मिळत राहते. वडील, भाऊ, बहीण, आजी, आजोबा, काका, काकू वगैरे घरातील इतर व्यक्तींचा लळा त्यांना सहवासातून लागत जातो. त्यात हळूहळू इतर नातेवाईक, शेजारी, शिक्षक वगैरेंची भर पडत जाते. पुढे त्यांचा स्वतःचा मित्रपरिवार निर्माण होतो आणि तो वाढत जातो. तरुण वयात ते आपल्या जोडीदाराची निवड करतात. नैसर्गिक आकर्षणामुळे त्यांच्या एकमेकांवर वसलेल्या प्रेमाचे धागे खूप घट्ट होतात. ते बंध त्यांना इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त महत्वाचे वाटायला लागतात. अगाध मित्रप्रेमाविषयी खूप लिहिले गेले आहे. देश, धर्म यांच्याविषयी वाटणाऱ्या प्रेमासाठी कित्येक भक्तांनी बलिदान केलेले आहे. देवभक्तीमध्ये लीन झालेल्या व्यक्तीला इतर कशाचेच भान रहात नाही. इतकेच काय पण लेखक, कवी, गायक, नटनट्या यांच्यावरील एकतर्फी प्रेमापोटी माणसे वेडी होतात. आवडत्या नेत्याचे अनुयायी आपले तनमनधन त्याला अर्पण करतात.

या सगळ्याच्या मागे असलेले प्रेमबंध हे समान कारण असते. ज्या व्यक्ती, संस्था किंवा समाज यांच्याविषयी आपल्याला आपुलकी वाटत असते, त्याच्या संबंधातले सगळे काही जाणून घ्यायला, ऐकायला, बोलायला आपल्याला आवडते, त्याला काही होणार तर नाही ना किंवा त्याचे कसे होणार याची चिंता वाटते आणि काही बिनसले तर दुःख होते, त्याला यश मिळाले तर आनंद होतो. कारण आपण त्याच्याशी जोडले गेलेले असतो. ग्वाटेमालात एकादा अपघात झाला किंवा सोमालियात दंगल झाली आणि त्यात जीवित वित्त यांची हानी झाली असे आपण बातम्यांमध्ये वाचले किंवा ऐकले तर क्षणभर हळहळ वाटेल, पण तसे काही पुण्यामुंबईला घडले तर आपण बेचैन होऊन जातो कारण ज्यांच्याबद्दल आपल्याला प्रेम वाटते अशा अनेक व्यक्ती तिथे रहात असतात किंवा काही कारणाने तिथे गेलेल्या असतात, आपल्याला त्यांची काळजी वाटते, तिथल्या काही जागांना आपल्या भावविश्वात स्थान असते, त्या ठिकाणच्या नेमक्या परिस्थितीची माहिती मिळवण्यासाठी आपण धडपड करतो. या सर्वांशी आपण बांधले गेलेलो असल्यामुळे तिथे काय घडले याचा आपल्यावर परिणाम होतो.

या विषयावर असंख्य लोकांनी अगणित वेळा अमाप लिहिले असले तरी पुन्हा त्यावर लिहावेसे वाटते कारण या विषयाबद्दल आपल्याला आणि वाचकांना वाटणारा जिव्हाळा आणि प्रेमबंध.

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय

ABGMM

गांधर्व महाविद्यालय (भाग १)

मुंबईचे सी.एस.टी. (पूर्वीचे व्हीटी) स्टेशन, राजाबाई टॉवर, हायकोर्ट वगैरे जुन्या इमारतींनी आपली जन्मशताब्दी साजरी केली असेल. ज्या कारणासाठी त्या बांधल्या गेल्या होत्या त्या रेल्वे, युनिव्हर्सिटी, न्यायालये आदि ब्रिटीशांच्या कालखंडात सुरू झालेल्या संस्था तर नक्कीच शंभर वर्षापेक्षा जुन्या आहेत आणि आजही कार्यरत आहेत. उद्योग व्यवसायक्षेत्रातील कांही घराणीसुध्दा गेल्या शंभर वर्षांपासून चालत आलेली असतील. शंभर वर्षांपूर्वीच्या म्हणजे लोकमान्य टिळकांच्या काळात अनेक देशभक्तांनी समाजाला उपयुक्त पडतील अशा संस्था विविध क्षेत्रात सुरू केल्या होत्या. त्यातल्या कांही संस्थांची त्या वेळी ठरवलेली उद्दिष्टे पूर्ण झाली, कालांतराने बदललेल्या परिस्थितीत त्यांचे महत्व कमी झाले, मूळ संस्थापकानंतर त्याच तळमळीने कार्य करणारे कार्यकर्ते उपलब्ध झाले नाहीत अशा वेगवेगळ्या कारणांमुळे त्यातल्या कांही संस्था अस्तंगत झाल्या, तर कांही संस्थांनी नवनवी कामे हाती घेऊन कार्याचा आवाका वाढवत नेला. आज त्यांचे मोठे वटवृक्ष फोफावले आहेत.

गांधर्व महाविद्यालय ही एक संस्था गेली शंभराहून अधिक वर्षे मुख्यतः मूळ उद्देशाला चिकटून उभी आहे आणि त्याचबरोबर काळानुसार आवश्यक तेवढे बदल घडवून आणून तंत्रज्ञानातल्या प्रगतीचा लाभ घेत आली आहे. इसवी सन १९०१ साली सुरू झालेल्या या संस्थेचा वर्धापन दिन परवा ५ मे रोजी वाशी येथील गांधर्वनिकेतनाच्या प्रांगणात साजरा झाला. हा एक साधेपणाने पण जिव्हाळ्याने घडवून आणलेला आटोपशीर असा समारंभ होता. सुरुवातीला सध्याच्या पदाधिकारी वर्गाने उपस्थित मान्यवरांचे तसेच श्रोत्यांचे स्वागत केले. जास्त लांबण न लावता मोजक्याच पण अर्थपूर्ण शब्दात हा औपचारिक कार्यक्रम आटोपल्यावर पं.गोविंदराव पलुस्कर यांनी आपल्या मुख्य भाषणात श्रोत्यांना थेट शंभर वर्षांपूर्वीच्या काळात नेले.

गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक स्व.विष्णू दिगंबर पलुस्कर हे एक ऋषितुल्य व्यक्तीमत्व होऊन गेले. सन १८८६-८७ च्या सुमारास त्यांनी मिरजेचे स्व.पं.बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण सुरू केले. संगीताचे शिक्षण घेताघेता ते तत्कालीन भारतीय समाजातील परिस्थितीकडे डोळसपणे पहात होते. ( खरे तर त्यांची दृष्टी अधू होती. ती तशी असली तरी मनःचक्षू समर्थ होते).

त्या काळात शास्त्रीय संगीताला समाजात प्रतिष्ठेचे स्थान नव्हते. एका बाजूला भजन, कीर्तन, भारुडे इत्यादी भक्तीसंगीत आणि दुसऱ्या बाजूला शाहिरी पोवाडे, लावण्या वगैरे गाणी अशा पध्दतीने लोकसंगीत जनमानसाच्या रोमारोमात भिनले असले तरी शास्त्रशुध्द संगीत मात्र लोकांच्या कानापर्यंत पोचतच नव्हते. त्या काळात रेडिओ, टीव्ही सारखी प्रसारमाध्यमे नव्हती, ग्रामोफोनच्या रेकॉर्डसुध्दा नव्हत्या. मोठमोठे उस्ताद, खाँसाहेब, पंडित, बुवा वगैरे शास्त्रीय संगीतातले बहुतेक गुणीजन त्या काळातल्या राजेरजवाडे, संस्थानिक, नवाब किंवा किमानपक्षी जहागिरदार, सधन व्यापारी अशा धनाढ्य लोकांच्या आश्रयाने रहात असत. त्यांच्या मनोरंजनासाठी त्यांचे राजवाडे, महाल, हवेल्या वगैरे जागी त्याच्या मैफली होत आणि त्यात मालकांच्या मर्जीतील निवडक मंडळींनाच प्रवेश मिळत असे. यामुळे सामान्य जनतेला अभिजात संगीताचा आनंद मिळत नसे. त्या काळातील या कलाकारांतले कांही महाशय जास्तच लहरी असत, कांही शीघ्रकोपी म्हणून तर कांही चंगीभंगीपणासाठी ओळखले जात. इतर कांही लोकांबद्दल विनाकारण अशा वावड्या उठवल्या जात. एकंदरीत संगीत आणि संगीतकार यांबद्दल सर्वसामान्य सभ्य लोकांचे मत फारसे चांगले नसल्यामुळे ते त्यांच्याशी फटकून वागत असत. संगीत रंगभूमीने शास्त्रीय संगीताची थोडीशी झलक लोकांपर्यंत पोचवायला नुकतीच सुरुवात केली होती. पण नाटकवाल्यांपासूनही लोक थोडे दूरच रहात असत.

स्व.पलुस्करांना याचे फार वाईट वाटत असे. ही परिस्थिती बदलायला पाहिजे, सर्वसामान्य लोकांना दैवी शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेता आला पाहिजे, संगीतज्ञांची प्रतिमा उजळली पाहिजे, त्यांचा जनसंपर्क सुधारला पाहिजे, संगीत आणि संगीतज्ञ यांना प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे असे त्यांना सारखे वाटत असे. यावर गंभीरपणे विचार करून त्यांनी स्वतःला या कार्याला वाहून घ्यायचे ठरवले. नुसतेच ठरवले नाही तर त्या कार्याची दिशा निश्चित केली आणि स्वतःला त्या कार्यात झोकून दिले.
……….

गांधर्व महाविद्यालय (भाग २)

gandahrva

आज झिम्बाब्वे किंवा ग्वाटेमालासारख्या देशात काय चालले आहे ते आपण घरबसल्या टीव्हीवर पाहू शकतो. शंभर वर्षांपूर्वी कसलीच दृक्श्राव्य माध्यमे उपलब्ध नव्हती. त्यामुळे प्रत्यक्ष जाऊन पाहणे किंवा वाचन, श्रवण एवढीच माहिती मिळवण्याची साधने असायची. त्यामुळे स्व.विष्णू दिगंबर पलुस्करांनी आपले ध्येय साध्य करण्यासाठी आधी स्वतः देशभर भ्रमण करायचे ठरवले. त्या कामासाठी आपल्या गुरूजींचा आशिर्वाद आणि निरोप घेऊन त्यांनी मिरज सोडले आणि ते प्रथम बडोद्याला गेले. त्या काळातले बडोद्याचे महाराज त्यांच्या कलासक्तीसाठी प्रसिध्द होते. गायन, वादन, चित्रकला. शिल्पकला आदी सर्व कलांना ते सढळ हाताने मदत करून प्रोत्साहन देत असत. त्यामुळे बडोदा हे शहर पूर्वी अनेक कलाकारांना आकर्षित करीत असे.

असे असले तरी स्व.पलुस्कर थेट बडोद्याच्या महाराजांच्या चरणी मस्तक ठेवायला गेले नाहीत. त्यांनी तिथल्या एका देवळात आपल्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम ठेवला. देवदर्शनाला येणारी भक्तमंडळी व आजूबाजूला राहणारे लोक यांना तोंडी सांगणे, कांही हँडबिले वाटणे, जाहीर फलक लावणे अशा साधनाने प्रसिध्दी करण्यात आली. अशा प्रकारचे संगीत ऐकणे लोकांना नवीनच होते, पण त्यांना ते खूप आवडले व त्यांच्या कार्यक्रमाला गर्दी होऊ लागली. याची बातमी महाराजांना लागली आणि त्यांनी सन्मानाने स्व.पलुस्करांना बोलावणे पाठवले. त्यांचे गायन ऐकून त्यांना राजगायकाचे पद देऊ केले.

त्या काळात ही एक मोठी गोष्ट होती. ते पद स्वीकारल्यावर राहण्याजेवण्याची उत्तम सोय होणार होती आणि आयुष्याची ददात मिटणार होती. महाराजांची मर्जी राखून ठेवण्यापुरते त्यांच्या दरबारात गायन केल्यानंतर उरलेला सारा वेळ संगीताची साधना करण्यात घालवता आला असता. पण पलुस्करांना मनापासून जे कार्य करायचे होते ते असे नोकरीत अडकून पडल्यावर करता आले नसते. त्यामुळे त्यांनी विनम्रपणे नकार दिला आणि आपला मुक्काम हलवला. पुढील तीन चार वर्षे ते भारतभर फिरत राहिले. जागोजागी आपले कार्यक्रम करून दाखवून श्रोत्यांमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी निर्माण करायची तसेच इतर कलाकारांचे गायन ऐकून त्यातल्या बंदिशी, चिजा, गाण्याच्या पध्दती वगैरेंचा अभ्यास करायचा आणि त्यातून आपले ज्ञान व कौशल्य समृध्द करायचे असा दुहेरी कार्यक्रम त्यांनी सुरू ठेवला.

दि.५ मे १९०१ रोजी लाहोरला असतांना त्यांनी गांधर्व महाविद्यालय ही संस्था स्थापन केली आणि तिच्यामार्फत संगीताचे रीतसर शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्या काळी ही कल्पना नवीनच होती. परंपरागत गुरू शिष्य परंपरेने शिकवणारे बुवा किंवा उस्ताद आपापल्या मर्जीप्रमाणे किंवा कल्पनेप्रमाणे आणि शिष्याची कुवत व ग्रहणशक्ती पाहून त्यानुसार त्यांना संगीत शिकवत असत. शाळेय शिक्षणासारखा पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तके, परीक्षा पध्दती वगैरे कांहीसुध्दा या क्षेत्रासाठी त्या काळात अस्तित्वात नव्हते, कदाचित इतर कोणी त्याची कल्पनाही केली नसेल. पलुस्करांनी मात्र हे सगळे योजून ठेवले होते.

त्यांनी संगीताच्या शिक्षणातील प्रगती मोजण्याच्या पायऱ्या निर्माण केल्या. पुढील काळात या कल्पनेचा विकास होऊन प्रारंभिक, प्रवेशिका (प्रथम व पूर्ण), मध्यमा (प्रथम व पूर्ण), विशारद (प्रथम व पूर्ण), अलंकार (प्रथम व पूर्ण) अशा श्रेणी निर्माण झाल्या. सुरुवातीला लहान मुलांच्या लक्षात राहतील अशी गाणी त्यांना चालीवर शिकवायची. यासाठी त्या काळातल्या शास्त्रीय संगीतातल्या अवघड बंदिशी न घेता पलुस्करांनी सोपी भजने निवडून त्यांना रागदारीवर आधारलेल्या चाली लावल्या आणि ती शिकवायला सुरुवात केली. चाली लक्षात राहिल्यावर त्यांच्या आधाराने थोडे आलाप, ताना घ्यायला शिकवायच्या असे करत मुलांना गोडी वाटेल अशी हळू हळू प्रगती करीत त्यांना रागदारीचे ज्ञान ते देत जात असत. गोविंदराव पलुस्करांनी याची कांही उदाहरणे गाऊन दाखवली. अशा गाण्यांच्या छोट्या पुस्तिका स्व.विष्णू दिगंबरांनी खास तयार करवून घेतल्या होत्या.

स्व.विष्णू दिगंबर पलुस्करांनी विद्यार्थ्यांची दोन गटात विभागणी केली होती आणि ते त्यांना वेगवेगळ्या स्तरावर शिक्षण देत असत. सर्वसाधारण विद्यार्थ्यांना वर सांगितलेल्या पध्दतीने शिकवीत असत, तर कांही निवडक विद्यार्थ्यांना ते पुढे जाऊन संगीतशिक्षक बनावेत अशा हेतूने वेगळ्या पध्दतीने शिकवत असत. स्वतः उत्तम गाता येणे आणि शास्त्रशुध्द गायन समजून ते शिकवता येणे या वेगळ्या गोष्टी आहेत हे त्यांना पूर्णपणे माहीत होते. त्यामुळे ज्यांनी शिक्षक बनावे असे त्यांना वाटले त्यांना ते स्वर, ताल, लय यांचेविषयीचे मूलभूत ज्ञान विस्तारपूर्वक देत, रागदारीमधील बारकावे समजावून सांगत, स्वरलिपीमध्ये प्राविण्य मिळवायला शिकवीत अशा अनेक प्रकाराने त्यांची उत्तम तयारी करवून घेत असत. कांही लोकांना दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे जमतात अशीही उल्लेखनीय उदाहरणे आहेत. मात्र परंपरागत पध्दतीत स्वतः अधिकाधिक नैपुण्य मिळवण्यावर भर असे, तर पलुस्करांनी द्रष्टेपणाने संगीतशिक्षकांची पिढी तयार केली आणि संगीताच्या प्रसारकार्यासाठी त्यांना लखनऊ, काशी वगैरे ठिकाणी पाठवून दिले. तिथे जाऊन त्यांनी वेगवेगळ्या संस्थांमधून कार्य करून शास्त्रीय संगीताचा प्रसार केला अशी कांही उदाहरणे गोविंदरावांनी सांगितली.

शास्त्रीय संगीताला आता उच्चभ्रू वर्गात सन्मानाचे स्थान मिळाले आहे. आकर्षक वाटणाऱ्या पाश्चात्य संगीताच्या कोलाहलातसुध्दा अभिजात हिंदुस्थानी संगीत आपली लोकप्रियता टिकवून आहे. हे सगळे होण्यामागे स्व. विष्णू दिगंबर पलुस्करांनी केलेल्या तपश्चर्येचा मोठा वाटा आहे असे म्हणावेच लागेल. त्यांनी सुरू केलेल्या गांधर्व महाविद्यालय या संस्थेने शंभर वर्षाहून अधिक काळ हा ज्ञानयज्ञ प्रज्वलित ठेवला आहे. पुढील काळात या संस्थेचे नामकरण “अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ” असे झाले. येणाऱ्या काळात त्यांचे काम पुढे नेण्यासाठी कांही नव्या योजना विचाराधीन आहेत असे सूतोवाच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले. ठराविक कालावधीने या संस्थेच्या निवडणुका होतात आणि नवी मंडळी तिच्या कार्याची धुरा खांद्यावर घेऊन मोठ्या उत्साहाने आणि समर्थपणे ती वाहून नेतात हे गेली पंचवीस तीस वर्षे मी दुरूनच कां होईना, पण पहात आहे. त्यामुळे ती यापुढेही अशीच चैतन्याने भारलेली राहील अशी मला खात्री वाटते.

आज या संस्थेचा खूप विस्तार झाला आहे. तिचे रजिस्टर्ड ऑफीस मिरज येथे आणि मुख्य कार्यालय वाशी इथे आहे. तिच्याशी संलग्न अशा १२०० संस्था भारताच्या कान्याकोपऱ्यात पसरल्या आहेत आणि ८०० केंद्रांवर तिच्यातर्फे परीक्षा घेतल्या जातात. त्यात दरवर्षी सुमारे एक लाख विद्यार्थी परीक्षा देतात. येणआऱ्या काळातही तिचा विस्तार होत राहो आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचाही प्रसार होत राहो अशा या पोस्टमधून शुभेच्छा.

बाबामहाराज सातारकर यांचे कीर्तन

आजकाल टीव्हीच्या एका वाहिनीवर रोज ह.भ.प.बाबामहाराज सातारकर यांचे (किंवा त्यांच्या कुटुंबीयांचे) कीर्तन सादर केले जात आहे. चार वर्षांपूर्वी एकदा मला त्यांच्या कीर्तनाचा लाभ झाला होता तेंव्हा मी लिहिलेला हा लेख.

“हमको मालूम है जन्नत की हक़ीक़त लेकिन, दिल को बहलाने के लिए “ग़ालिब”, ये खयाल अच्छा है।” असा मिर्झा गालिबचा एक प्रसिद्ध शेर आहे. या बाबतीतले माझे मतही फारसे वेगळे नाही. सौंदर्य, सुख, आनंद वगैरेची अगदी परिसीमा ज्या ठिकाणी असते ती जागा म्हणजे ‘स्वर्ग’ अशी स्वर्गाची व्याख्या किंवा संकल्पना आहे. असा एक अद्भुत स्वर्गलोक आकाशात कुठेतरी असेल असे मला तरी मुळीच वाटत नाही. आता आकाशापलीकडले अवकाशही दूर दूरवरपर्यंत पाहून झाले आहे. त्यात कुणालाही आणि कुठेही स्वर्गलोक, जन्नत, हेवन वगैरे काही आढळलेले नाही. अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेल्या जागा असोत, आश्चर्यचकित करणारी मानवनिर्मित स्थळे असोत किंवा माणसांनी आपल्या चांगल्या वागणुकीमधून निर्माण केलेले आनंदी वातावरण असो, या सगळ्या सुंदर आणि आनंददायी जागा आपल्या पृथ्वीवरच असतात, आपल्याला त्या पहायच्या किंवा घडवायच्या असतात अशी माझी स्वर्गाची कल्पना आहे.

जन्ममरणाच्या चक्रापासून मुक्ती, मोक्ष वगैरेंचे मला कधीच कणभरही आकर्षण वाटले नाही, त्यामुळे मला आध्यात्माची गोडी लागली नाही. पण असे असले तरी मला भजनकीर्तनाचे वावडेही नाही. भक्तीरसात ओथंबलेली मधुर गीते किंवा टाळमृदुंगाच्या तालावर गायिलेले अभंग ऐकणे मला मनापासून आवडते. चांगल्या कीर्तनकारांनी केलेले कथानकाचे रसाळ वर्णन हा उत्कृष्ट प्रकारच्या कथाकथनाचा (स्टोरीटेलिंगचा) नमूना आहे आणि ते कानावर पडले तर ऐकत बसावे असे मला वाटते. कीर्तनातली कथा खरी आहे की काल्पनिक वगैरेंचा विचार करून मी त्यातली मजा घालवत नाही. मजेदार कथानक, चटपटीत संवाद, त्यांचे उत्तम सादरीकरण, मध्येच कर्णमधुर संगीत, एकादा मुद्दा पटवून देण्याची हातोटी अशा अनेक गोष्टी पारंपरिक कीर्तनात असतात. याच प्रकारच्या गोष्टीसाठी आपण मनोरंजनाचे कार्यक्रम पाहतोच ना? शिवाय कीर्तनांमध्ये मनोरंजनाबरोबरच थोडे ज्ञानामृतही मिळते.

दहा पंधरा वर्षांपूर्वी टीव्हीवर एका विशिष्ट वेळेला ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांचे सुश्राव्य कीर्तन लागत असे. त्या वेळी मी घरी असलो तर तो कार्यक्रम आवर्जून पहात आणि ऐकत असे. काही लोकांना हे पाहून त्याचे आश्चर्य वाटायचे. या निमित्याने देवाचे नामस्मरण माझ्या कानावर पडेल आणि त्यातून माझा उद्धार होईल किंवा मी सन्मार्गाला लागेन असेही कदाचित काहीजणांना वाटत असे. तसा मी काही कुठल्याही वाईट मार्गाला लागलेलो नव्हतो किंवा पापाच्या राशी जोडत नव्हतो, पण उपासतापास, नामस्मरण, तीर्थयात्रा वगैरे मार्गाने पुण्य जोडायचा प्रयत्नही कधी करत नव्हतो. सरळ मार्गाने चालून आपली नोकरी, कुटुंब, समाज वगैरेंसाठी माझी जी काही कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडायचा मी प्रयत्न करत असे आणि करत आलो आहे.

हे काम करता करता स्वतःसाठी आनंदाचे काही कण मिळवणे आणि इतर लोकांनाही थोडा आनंद वाटणे याचाही जमेल तेवढा प्रयत्न मी करत असतो. त्या काळातली बाबामहाराजांची कीर्तने ऐकतांना त्यांचा खणखणीत आवाज, ओघवत्या भाषेमधून होत असलेले सुश्राव्य निवेदन, नर्मविनोद, रोजच्या जीवनातली उदाहरणे देणे, संतवाणीचा प्रचंड व्यासंग, अधून मधून भजनांचे सुमधुर गायन या सगळ्याचा चांगला प्रभाव पडत असे. यामुळे मला कीर्तनाचा तो कार्यक्रम ऐकायला आवडत असे. त्यातून बाबामहाराजांबद्दल कुतुहल वाटत गेले, कधी तरी त्यांचे कीर्तन प्रत्यक्षात ऐकावे अशी एक अंधुक इच्छाही मनाच्या कोपऱ्यात कुठे तरी उगम पावली. पुढे त्या कार्यक्रमाचे टीव्हीवर प्रक्षेपण होणे थांबले किंवा मला तो पहायला वेळ मिळेनासा झाला आणि ती गोष्ट पार विस्मरणात गेली. इतर कोणाच्या बोलण्यातूनही बाबामहाराजांच्या नावाचा उल्लेख माझ्या कानावर कधी आला नाही.

Babamaharaj

वाशीला आमच्या घराजवळ असलेल्या शंकराच्या देवळात दरवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत असतो. आमच्या पोस्टबॉक्समध्ये येऊन पडलेले या वर्षीच्या कार्यक्रमाचे पत्रक पाहिले, तर त्यात पहिल्याच दिवशी म्हणजे रविवारी संध्याकाळी ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असल्याचे वाचले. माझ्या जुन्या आठवणींवर पडलेली विस्मृतीची धूळ थोडी पुसली गेली आणि कधीकाळी मनात उठलेली इच्छा पुन्हा जागी झाली. तिची पूर्ती होण्याची संधी आता आयती माझ्यासमोर चालत आली होती. रात्रीचे जेवण जरा आधीच उरकून घेतले आणि बाबामहाराजांना एकदा प्रत्यक्षात पहावे, त्यांचे चार मधुर शब्द ऐकावे आणि परत यावे असा विचार करून मी घरातून निघालो. शिवमंदिर नजरेच्या टप्प्यात यायच्या आधीच लाउडस्पीकरवरून येणारे सामूहिक भजनाचे सूर कानावर पडायला लागले. थोडे पुढे गेल्यावर त्यातले शब्द कळायला लागले. “शिव हालाहले तापला।” हा एकच चरण आळवून आळवून गायिला जात होता. “नामे तोही शीतल झाला।।” हा पुढचा चरणही अधून मधून त्याच्या सोबतीला ऐकू येऊ लागला.

मंदिराच्या फाटकापाशी जाऊन आत पाहिले. उत्सवातल्या कार्यक्रमांसाठी देवळाजवळ एक तात्पुरते व्यासपीठ उभारले होते. त्यावर दहा बारा टाळकरी उभे राहून भजन गात होते. समोरच्या पटांगणात जाजमे अंथरलेली होती, त्यातल्या निम्म्याहून जास्त भागात दोनतीनशे श्रोते दाटीवाटीने बसले होते. त्यांच्या मागे थोडी जागा सोडून मागच्या बाजूला शंभर दीडशे खुर्च्या मांडून ठेवल्या होत्या, त्या मात्र पूर्णपणे भरलेल्या दिसत होत्या. शिवमंदिराच्या परिसराच्या दुसऱ्या गेटमधून आत जाऊन पाहिल्यावर कोपऱ्यातली एक खुर्ची रिकामी दिसली. मी तत्परतेने जाऊन तिचा ताबा घेतला. स्टेजवरचे तेच भजन अजून सुरूच होते. तो अभंग संपल्यावर जय जय राम कृष्ण हरी या नामाचा घोष सुरू झाला. त्याला श्रोत्यांनीही साथ दिली. दहा बारा मिनिटे हरीनामाचा गजर झाल्यानंतर तो थांबला. बाबामहाराजांचा धीरगंभीर आवाज कानावर पडायला लागला.

सुरुवातीला त्यांनी त्या जागी जमलेल्या श्रोत्यांचे या कार्यक्रमात सहभागी होण्याबद्दल स्वागत केले म्हणण्यापेक्षा त्यांचे अभिनंदन केले. त्यातले बरेचसे लोक हा कार्यक्रम पाहण्यासाठी मुंबई आणि नवी मुंबईच्या इतर भागांमधून वाशीला आले होते. डोक्यावर पागोटे किंवा पांढरी टोपी घालून फिरणारे मराठी लोक आमच्या कॉस्मोपॉलिटन वस्तीत इतक्या मोठ्या संख्येने रहात असतील असे मला वाटत नव्हतेच. श्रोत्यांमधली त्यांची सोठी संख्या पाहून मला जरा नवलच वाटत होते. बाबामहाराजांच्या सांगण्यातून त्याचा उलगडा झाला. काल, परवा, तेरवा कुठे कुठे त्यांचे कीर्तन होऊन गेले आणि उद्या, परवा, तेरवा ते आणखी कुठे कुठे कीर्तन करणार आहेत याची माहितीही त्यांनी दिली. आजही त्यांचे किती भरगच्च कार्यक्रम असतात याची कल्पना त्यावरून आली.

त्यांच्याकडे गडगंज वडिलोपार्जित मालमत्ता आहे, आपल्या कीर्तनासाठी ते कुणाकडेही बिदागी मागत नाहीत, हेसुद्धा त्यांनी सांगितले, ऐंशीचे वय झाले असल्यामुळे आता त्यांच्या पायात शक्ती उरली नाही, चालण्यासाठी आधाराची गरज पडते, पण त्यांना व्यासपीठावर नेऊन बसवले की मग तासन् तास अस्खलितपणे अव्याहत बोलायला मात्र काही अडचण येत नाही. त्यांना मिळालेले तल्लख बुद्धी आणि अस्खलित वाणी यांचे वरदान त्यांनी हे धार्मिक कार्य पुढे चालू ठेवावे यासाठीच देवाने अद्याप शाबूत ठेवले आहे. त्याचा उपयोग देवाच्या कामासाठी करणे हे त्यांचे कर्तव्य आहे या भावनेने ते हा ज्ञानयज्ञ करत आहेत असेही त्यांनी सांगितले. देवाविषयी असलेल्या भक्तीभावानेच सारे श्रोते जमलेले असल्यामुळे त्यांनीही शांत राहून मनोभावे या कीर्तनाचे श्रवण करावे, गडबड गोंधळ किंवा हालचाली करून त्यात व्यत्यय आणू नये, मध्येच उठून जागा बदलू नयेत किंवा बाहेर जाऊ नये वगैरे सूचना केल्या. शिवाय असे केल्यास तो बाबामहाराजांचा नव्हे तर प्रत्यक्ष देवाचा अपमान केल्यासारखे होईल अशी भीतीही घातली. लहान मुलांना हे समजण्यासारखे नसल्यामुळे त्यांची चुळबुळ चालली होती. त्यांनी यापेक्षा घरी जाऊन टीव्ही पहावा, भारत पाकिस्तानची मॅच पुन्हा दाखवत आहेत ती पहावी असेही त्यांनी गंमतीने सांगितले.

ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांचे हे सुश्राव्य कीर्तन एका शिवमंदिरात चाललेल्या महाशिवरात्रीच्या उत्सवामध्ये चालले होते. विठ्ठलभक्त वारकरी सांप्रदायातले बाबामहाराज आज शिवलीलेच्या कोणत्या कथेचे आख्यान लावणार आहेत याची मला उत्सुकता वाटत होती. पण कीर्तन सुरू झाल्यानंतर काही वेळाने लक्षात आले की हरिनाम हाच त्यांच्या या कीर्तनाचा विषय होता. “शिव हालाहले तापला। नामे तोही शीतल झाला।।” अशा प्रकारे त्यात शंकराचा नावापुरता उल्लेख आला होता. कुठल्याही देवाचे किंवा परमेश्वराचे नाव घेणे का आवश्यक आहे हे सांगण्यासाठी त्यांनी वळणावळणाचा मार्ग निवडला होता.

आपल्या डोळ्यांना देव दिसत नाही म्हणून काही लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत, पण जगातल्या सगळ्याच गोष्टी डोळ्यांना दिसतातच असे नाही या सत्याचा आधार घेऊन त्यातून देवाचे अस्तित्व पटवून देण्याचे अनंत तर्क नेहमी सांगितले जातात. आपल्या आजूबाजूच्या हवेपासून ते प्राध्यापकाच्या मेंदूपर्यंत याची अनेक उदाहरणे मी आजवर ऐकली आहेत. “आपल्याला हवा दिसते का? पण ती असते हे आपल्याला माहीत आहे. याचप्रमाणे देव डोळ्यांना दिसत नसला तरी तो असतो.”, “आपल्या या (नास्तिक) प्रोफेसराचा मेंदू कुणी पाहिला आहे का? नाही ना? मग कशावरून त्याच्या डोक्यात मेंदू आहे?” वगैरे वगैरे. बाबामहाराजांनी त्यांच्या कीर्तनात एक वेगळे उदाहरण दिले. ते म्हणाले, “मी आज तुम्हा सगळ्यांना पाहतो आहे, तुमच्यातल्या कुणाच्याच बापाला मी कधी पाहिले नसेल, पण त्यांच्या असण्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे, त्याबद्दल मला जरासुद्धा शंका नाही. मग ज्या देवाने सर्व जगाला जन्माला घातले त्याच्याबद्दल कोणाला का शंका असावी?”

बापावरून सांगतांना बापाचे नाव न घेतल्याने एकदा काय घोटाळा झाला याची एक गोष्ट त्यांनी सांगितली. एका माणसाचे त्याच्या म्हाताऱ्या बापाशी पटत नव्हते. एकदा त्या दोघांमध्ये खडाजंगी वाद झाला आणि “आता मी तुमचे नावदेखील लावणार नाही बघा.” असे तणतणत ते माणूस घराबाहेर पडला आणि ऑफीसला गेला. तो नेमका पगाराचा दिवस होता. पगार घेण्यासाठी तो माणूस कॅशियरकडे गेला. कॅशियरने त्याला सही करायला सांगितले. त्याने त्याच्या सहीमघले बापाचे नाव गाळून सही केली. कॅशियरने त्याला पैसे दिले नाहीत. त्याची सही रेकॉर्डशी मॅच होत नाही असे म्हणाला. तो माणूस तणतणला, कॅशियरशी भांडला, “इथे माझा बाप काम करतो का? मी केलेल्या कामाचे पैसे मला मिळायला नकोत का?” वगैरे वगैरे. कॅशियरने नियमांवर बोट ठेवले आणि आपण त्यात बदल करू शकत नसल्याचे सांगितले.

तो माणूस चिडून मोठ्या बॉसकडे गेला, त्याच्याकडे कॅशियरची तक्रार केली. बॉसने त्याला त्याचे नाव विचारताच त्याने पुन्हा बापाचे नाव वगळून फक्त आपले नाव व आडनाव सांगितले. त्यावर साहेबाने त्याला समजावले, “हे पहा, तू नोकरीला लागलास त्या वेळी आपले पूर्ण नाव दिले होतेस आणि तशी सही केली होतीस. तुझ्या सगळ्या प्रमाणपत्रांमध्ये (सर्टिफिकेट्समध्ये) तुझे तेच पूर्ण नाव लिहिलेले आहे. यामुळे तुझी हीच अधिकृत ओळख (आयडेंटिटी) आहे. तुझ्या आयडेंटिटी कार्डवर हेच नाव आणि सही आहे. तुझे नातेवाईक, जुने शेजारी, गावातले लोक तुला अमक्या माणसाचा मुलगा म्हणून ओळखतात. तू बापाचे नाव टाकलेस तरी तुमचे नाते नाहीसे होणार नाही. तुझी आतापर्यंतची ओळखच शिल्लक राहील. ती नको असेल तर तुला ही नोकरी, हे गाव वगैरे सोडून दूर कुठे तरी जावे लागेल. त्यापेक्षा हा हट्ट सोड आणि नीट सही करून तुझा पगार घेऊन जा.”

हे सांगून बाबामहाराज म्हणाले, “पाहिलेत? आपल्या बापाचे नाव सोडले तर त्या माणसाचा पगार थांबला, नोकरीवर गदा आली. त्यातून त्यालाच राग आला, दुःख झाले, मनस्ताप झाला. त्याने ते घेतले आणि त्याला पुन्हा सगळे मिळाले, त्याचे मन शांत झाले. तुम्ही देवाचे नाव घेतले नाही म्हणून तो नाहीसा होणार नाही, तरीसुद्धा तो तुमची काळजी वहातच राहणार आहे, पण त्याचे नाव घेतलेत तर तुम्हालाच अपूर्व मनःशांती मिळणार आहे..”

हा धागा धरून त्यांनी आपली कथा मूळपदावर आणली आणि पुढले निरूपण चालू ठेवले. “शिव हालाहले तापला। नामे तोही शीतल झाला।।” या अभंगाचा संदर्भ एका पौराणिक कथेशी आहे. समुद्रमंथनाच्या वेळी मेरू की मंदार या पर्वताची रवी करून तिला वासुकी नागाची दोरी गुंडाळली. एका बाजूला देव आणि दुसऱ्या बाजूला दानव यांनी तिला धरून क्षीरसमुद्रात चांगले घुसळले. या मंथनात समुद्रामधून चौदा रत्ने बाहेर निघाली. हलाहल विष हे त्यातले एक होते. देव आणि दानव यांच्यापैकी कोणीच ते घ्यायला तयार नव्हते. त्या जालिम विषाने सगळी सृष्टी नष्ट होण्याचा धोका होता. त्या वेळी सर्वांनी भगवान शंकराची आराधना केली. ते प्रगट झाले आणि त्यांनी ते विष प्राशन केले. त्या विषाच्या प्रभावामुळे त्यांचा गळा निळा पडला म्हणून शंकराला नीलकंठ असेही म्हणतात. ही सगळी कथा थोडक्यात सांगून कीर्तनकारांनी पुढे सांगितले की या वेळी नीलकंठ शंकराच्या अंगाचा प्रचंड दाह होऊ लागला. तो कसा थांबवावा यावर त्यांना नामसंकीर्तनाचा उपाय सापडला. श्रीराम श्रीराम श्रीराम असा जप केल्याने त्यांना शीतलता प्राप्त झाली म्हणे. इतक्या भयंकर प्रसंगावर जर जप करण्याने मात करता येत असेल तर आपल्या जीवनात आपल्याला डिस्टर्ब करणाऱ्या लहान सहान कारणांवर ही मात्रा खचित लागू पडणार नाही का? असा युक्तीवाद त्यांनी केला.

शंकराने हा मंत्र सुरुवातीला कोणालाही न सांगता आपल्याजवळच ठेवला होता, पण जगाच्या कल्याणासाठी तो सर्वांना कळणे आवश्यक होते. हे कसे झाले याची एक कथा बाबामहाराजांनी सांगितली. शंकरभगवान कैलास शिखरावर एकांतात बसून हा जप करायचे आणि त्यातून त्यांना अपूर्व आनंद मिळायचा हे एकदा नारदमुनींनी पाहिले आणि त्यांच्या संवयीप्रमाणे कळ लावायचे ठरवले. त्यांनी पार्वतीकडे जाऊन तिला विचारले, “तुमचा नवरा तुमच्यावर खरेच प्रेम करतो का हो?”
पार्वती म्हणाली, “अर्थातच. तुम्हाला अशी शंका का आली?”
“तसे नाही, पण तुम्ही एकदा त्याची परीक्षा करून पहाल का?”
“त्यासाठी मला काय करायला हवे?”
“त्यांना विचारा की त्यांना कशामधून सर्वात जास्त आनंद प्राप्त होतो. ते ही गोष्ट सांगतात का? हे पहा.”
शंकर भगवान परत आल्यानंतर पार्वतीने त्यांना हा प्रश्न विचारला. शंकराला नामस्मरणाचे गूढ गुप्तच ठेवायचे होते. त्यांनी टाळाटाळ केली. त्यावरून त्या दोघांची जुंपली. अखेर शंकराने हार मानली आणि हा मंत्र पार्वतीला सांगितला. तिथून तो पुढे सर्वांमुखी झाला.

ही गोष्ट सांगतांना बाबामहाराजांनी पदोपदी काँटेंपररी (आजच्या काळातली) उदाहरणे देऊन त्यात रंजकता आणली. समुद्रमंथनाची गोष्ट सांगतांना ते म्हणाले, कुठल्याही (विचार) मंथनामधून जो (यशाचा) लोण्याचा गोळा निघतो तो ह़डपण्यासाठी सगळे हपापलेले असतात, पण त्यातून अपयशाचे कडवट द्रव निघाले तर ते एकमेकांवर ढकलत असतात. ते पिऊन पचवण्यासाठी एकादा खंबीर नीळकंठच पुढे येतो आणि तो पुढे सर्वांच्या आदराचा धनी होतो. शंकराला भोळासांब म्हणतात, पण तो भोळा बिळा नव्हता, तसा कुठलाच नवरा नसतो, पण घरात शांतता रहावी म्हणून आपला बावळटपणा दाखवतो. कुठलेही गुपित एकदा बायकोला कळले की ते गुपित रहाणार आहे का? ही गंमतीची काही उदाहरणे झाली.

श्रीराम हा अवतार फारच आदर्श होता, त्याच्यासारखे असामान्य आचरण करणे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे होते. त्या नंतरचा कृष्ण अवतार लोकांना थोडा जवळचा वाटण्यासारखा होता. विशेषतः त्याचे गोकुळातले बालपण, त्यातला निरागस खोडकरपणा, गोपिकांशी रचलेल्या रासलीला वगैरे गोष्टी मनमोहक होत्या. या दोन्ही अवतारातले मुख्य कार्य दुष्टांचे निर्दाळन हे होते. विठ्ठल अवतारातला देव मात्र फक्त भक्तांच्या कल्याणासाठी कंबरेवर हात ठेऊन विटेवर उभा राहिला. रामाच्या हातात धनुष्यबाण तर कृष्णाच्या तर्जनीवर सुदर्शन चक्र असायचे. विठ्ठलाच्या किंवा हरीच्या हातात कोणतेही शस्त्र नाही. या तीघांची सांगड घालून तयार झालेला रामकृष्णहरी हा मंत्र संत तुकारामांना मिळाला आणि त्यांनी तो वारकरी पंथाला दिला. गेली चारपाचशे वर्षे तो पिढ्यानपिढ्या पुढच्या पिढीतल्या माळकरी वारकऱ्यांना दिला जात आला आहे आणि त्या पंथातले लोक या मंत्राचा नियमितपणे जप करीत आले आहेत. वगैरे माहिती त्यांनी दिली.

बाबामहाराजांनी केलेल्या कीर्तनाचे माझ्या लक्षात आलेले आणि आठ दिवसानंतर टिकून राहिलेले सार देण्याचा एक तोकडा प्रयत्न मी या लेखात केला आहे. कीर्तन संपल्यावर त्यांनी असे आवाहन केले की ज्या लोकांना वारकरी होण्याची इच्छा असेल, किंवा निर्माण झाली असेल त्यांनी लगेच पुढे येऊन त्यांच्यापाशी यावे. त्यांच्या हस्ते त्या लोकांच्या गळ्यात तुळशीची माळ घालण्यात येईल. त्यानंतर त्यांनी काही नियम पाळायचे आहेत. रोज सकाळी गुरुमंत्राचा उच्चार करायचा, मांसाहार करायचा नाही, मद्यपान करायचे नाही, वर्षातून एकदा पंढरीची आणि आळंदीची वारी करायची आणि एकदा दुधिवरे गावी बाबामहाराजांनी उभारलेल्या देवस्थानाचे दर्शन घ्यायचे वगैरे सोपे नियम पाळायचे.

हे नियमही माझ्यासाठी सोपे नव्हते. मी आपला मागच्या पावलांनी परत फिरलो आणि घरी गेलो. .

मोबाइलने कसे केले एप्रिल फूल!

दहाबारा वर्षांपूर्वीच्या एका एक एप्रिलला घडलेली एक घटना. त्या दिवशी दुपारी मस्त जेवण करून मी वामकुक्षीच्या नावाने ताणून दिली होती. कसलीशी चाहूल लागून झोप चाळवली तेंव्हा अलका तयार होऊन बाहेर जायला निघाली असल्याचे दिसले. वाशीमध्येच राहणाऱ्या एका मैत्रिणीला सोबत घेऊन ती मुंबईतल्या मैत्रिणीकडे जायला निघाली होती. त्यांच्या आठदहा मैत्रिणी तिथे जमणार होत्या. मला आता तीन चार तास निवांतपणा मिळणार होता. अलकाला बायबाय करून मी संगणक सुरू केला आणि आंतर्जालावर उड्डाण केले. त्या महासागराच्या लाटांवर सिंदबादप्रमाणे मुशाफिरी करता करता अलीबाबाच्या गुहा शोधत असतांना अमूल्य रत्नांनी भरलेला एक खजिना मला सापडला. ‘तिळा दार उघड’चा मंत्र लिहून त्यावर टिचकी मारणार एवढ्यात फोनची घंटा खणाणली. या अवेळी कोणालाही माझी आठवण आली असण्याची शक्यता मला दिसत नव्हती. अलकाच्याच एकाद्या मैत्रिणीने “निघालीस का? केंव्हा पोचणार आहेस?” अशा चौकशा करण्यासाठी फोन लावला असणार असे वाटले. चार पाच वेळा वाजू दिल्यानंतरसुध्दा घंटा वाजायची थांबली नाही तेंव्हा “काय कटकट आहे?” असे चरफडत उठलो आणि रिसीव्हर उचलला.

अलका स्वतःच फोनवर होती. तिला घरातून निघून दहा मिनिटे सुध्दा झाली नव्हती, म्हणजे ती अजून वाटेतच असणार. तिला अचानक काय झाले असेल या शंकेच्या अनेक पाली मनात चुकचुकल्या. “अहो मी ठीक आहे, पण आपली गाडी ..” ती सांगत होती. “वाशीच्या पुलावर बंद पडली. आता मी काय करू?”
त्यावर मी तिला काय सांगणार? गेली दहा वर्षे ती सराईतपणे गाडी चालवत असली तरी कधीही तिने कारचे बॉनेट उघडून त्यात डोकावून पाहिल्याचे मला आठवत नाही. त्यात दिसणाऱ्या कशाला इंजिन म्हणतात हे तिला ठाऊक असेलच याची मला शाश्वती वाटत नव्हती. आतल्या काळ्याकुट्ट यंत्राच्या कुठल्याही भागाला बोट जरी लावले तरी ते काळे होईल आणि त्याला कसलासा घाणेरडा वास येईल या धास्तीने तिने कधीही त्यातल्या कशालाही स्पर्श केलेला मला दिसला नव्हता. त्यामुळे या वेळी ती स्वतः काही करू शकेल याची मुळीच शक्यता नव्हती.
मी सांगितले, “घाबरू नकोस, तिथेच थांब, मी येतोय्.”
तिला एवढे सांगून मी उघडलेल्या संगणकामधल्या सगळ्या गुहांचे दरवाजे थडाथड बंद केले, संगणकाला निपचित पाडले आणि कपडे बदलले. पण ते करत असतांना माझ्या मनात विचार आला की मी तरी तिथे जाऊन काय करणार आहे? इंजिन कशाला म्हणतात एवढे मला ठाऊक असले आणि फक्त बोटच काय पण शर्टाची बाहीसुध्दा ग्रीसने माखून घेण्याची माझ्या मनाची तयारी असली तरी त्याचा काय उपयोग होता? बंद पडलेले इंजिन सुरू करण्याचे काडीएवढे ज्ञान किंवा पूर्वानुभव माझ्या गाठीसुद्धा नव्हतेच. त्यामुळे सर्व्हिस सेंटरचा फोन नंबर शोधून काढला आणि मेकॅनिकला बोलावून घेतले. तो तयार झाला हे पाहून झाल्यावर त्याला अलकाच्या मोबाईलचा नंबर आणि अलकाला त्याचा नंबर दिला आणि टॅक्सीने घटनास्थळावर जाऊन पोचलो.

तोपर्यंत मेकॅनिक जसबीर तिथे आला होता आणि त्याने गाडीचे बॉनेट उघडून ते पुन्हा बंद सुध्दा केले होते. बहुधा त्याच्या दिव्य स्पर्शानेच इंजिनाचा घरघराट पुन्हा सुरू झाला असावा.
“आता गाडी चालू झाली आहे, आणखी दहा बारा किलोमीटरपर्यंत तरी ती चालायला हरकत नाही. मुंबईत पोचल्यानंतर तिकडच्या मेकॅनिककडून तपासून घ्या. मी त्याला म्हणजे महेशला फोन करून कळवले आहे. तुम्ही जाणार आहात त्या जागी तो येऊन आणखी दुरुस्ती करून देईल. बहुधा फ्यूएल पंपचा प्रॉब्लेम असावा. तुम्ही गाडी घेऊन चला, मी मागेमागे येतोच आहे.” जसबीरने सांगितले. त्याचे इतके सहकार्य माझ्या अपेक्षेच्या बाहेर होते. मला गहिवरून आले.

त्याचे आभार मानून (आणि अर्थातच त्याची व्हिजिट फी देऊन) आम्ही पुढे निघालो. मुंबईच्या हद्दीत जेमतेम येऊन पोचतो तेवढ्यात अलकाच्या मोबाईलवर एक फोन आला. तिच्या शेजारी बसलेल्या तिच्या मैत्रिणीने उचलला. “आमची गाडी आता चालू झाली आहे आणि शिवाय एक मेकॅनिक मागे मागे येतो आहे.” असे सांगून तिने बंद करून टाकला. तो कॉल कुणाचा होता याची चौकशी करावी असे तिला वाटले नाही की त्या माणसाकडे हा नंबर कसा आला असा प्रश्न तिला पडला नाही. “कुणाचा का असेना, आपल्याला काय करायचे आहे?” अशा गुर्मीत ती होती. मी मागे वळून पाहिले तर जसबीर अदृष्य झाला होता. दुपदरी रस्ता असल्यामुळे आमच्या मागे पुलाच्या दुसऱ्या टोकापर्यंत येणे त्याला भागच होते. तिथपर्यंत आल्यानंतर आमची गाडी ठीक चालली आहे हे पाहून तो परत गेला होता. “तो तर गेला, मी पाहिले..” असे उत्तर आले. आम्हाला कोठे जायचे आहे हे अंतर्ज्ञानाने ओळखून तो आमच्या आधीच तिथे जाऊन पोचला असता तर मी त्याला भररस्त्यात साष्टांग नमस्कार घातला असता. पण तसे काही झाले नाही. आम्ही गाडी चालवत चालवत मैत्रिणीच्या घरापर्यंत आलो. वाटेत काही त्रास झाला नाही. जसबीर तिथे येईल अशी माझी अपेक्षा नव्हतीच, आता महेश केंव्हा येणार हे पहायचे होते. त्याचा मोबाइल फोन नंबर अलकाच्या मोबाईलमध्ये नमूद केला होता तो लावला.

“पाच मिनिटांपूर्वी सांगितलेत की तुम्हाला दुसरा मेकॅनिक मिळाला आहे आणि तुमची गाडी ठीक झाली आहे. आता मी कशाला येऊ?” महेशने घुश्श्यातच फोन बंद करून टाकला. पुन्हा जसबीरशी बोलून झालेला गोंधळ त्याला सांगितल्यावर त्याने महेशशी बोलून त्याला राजी केले. गाडी आणि मोबाईल माझ्याकडे सोपवून अलका तिच्या मैत्रिणीसह बिल्डिंगमध्ये चालली गेली आणि मी रस्त्यावर उभा राहून महेशाची वाट पहात राहिलो. दहा पंधरा मिनिटे झाली तरी त्याची येण्याची लक्षणे दिसत नव्हती. त्याला फोन करून चौकशी करावी असा विचार केला. अलकाच्या फोनमधले केलेले आणि आलेले (कॉल्ड आणि रिसीव्ह्ड नंबर्स) कॉल्स यांच्या याद्या पाहतांना महेशचे नाव दिसले आणि मी कॉलचे बटन दाबले. त्यात नेमका काय गोंधळ झाला होता ते मला अजून समजलेले नाही.
हॅलो, हॅलो करून झाल्यावर मी म्हंटले “महेश, तू कुठे आहेस, केंव्हा येणार आहेस?”
पलीकडून “अं.. अं.. कोण महेश?” वगैरे भांबावलेले उद्गार ऐकल्यानंतर “सॉरी, राँग नंबर” असे म्हणून मी फोन बंद केला. सेव्ह केलेल्या लिस्टमधून महेशचा नंबर पुन्हा शोधून काढला. या वेळी त्यात काही चूक नाही याची खात्री करून घेतल्यावर मी कॉलचे बटन दाबणार एवढ्यात फोनची रिंग वाजली. अजयचा फोन होता. त्याच्या संवयीप्रमाणे आता तासभर तरी तो चालू ठेवणार याची गॅरंटी होती. त्याच्या घरातल्या सर्वांबरोबर आमच्या घरातल्या सर्वांनी बोलायचे आणि चुलत, मावस, आते, मामे भावंडांपासून ते वर्ल्डकप आणि सुनामीपर्यंत जगातल्या सगळ्या घटनांवर खुलासेवार चर्चा करायची तर एवढा वेळ लागणारच. एरवी असे तासतासभर बोलायला आम्हालासुध्दा आवडते, पण या वेळी माझ्यापाशी त्यासाठी वेळही नव्हता आणि गप्पा मारायचा मूडही नव्हता. लवकरात लवकर केंव्हा हा महेश प्रसन्न होऊन दर्शन देईल आणि मला उन्हात उभे राहण्याच्या तपश्चर्येपासून मुक्ती देईल असे मला झाले होते. त्यामुळे मी “अरे, आत्ता मी खूप बिझी आहे. थोड्या वेळाने फोन कर” एवढे सांगून त्याचा फोन कट केला आणि महेशाच्या आराधनेला लागलो.

थोड्या वेळाने तो आला आणि मी अजून त्याला आमच्या गाडीची हकीकत सांगत होतो तेवढ्यात मोबाईल वाजला. यावेळी शिल्पा लाईनवर होती. महेशशी चाललेले बोलणे अर्धे सोडून तिच्याशी बोलणे त्या क्षणी मला शक्य नसल्यामुळे “आत्ता मी खूप बिझी आहे. थोड्या वेळाने फोन कर” असेच तिलाही सांगितले. गाडी रिपेअर झाल्यानंतरही महिलामंडळाची सभा संपायला वेळ होता. त्यांच्यामध्ये जाऊन मला ‘बायकात पुरुष लांबोडा’ व्हायचे नव्हते, म्हणून जवळ रहात असलेल्या रश्मीच्या घरी गेलो. मला असा अचानक आलेला पाहून तिला आनंद झाला, आश्चर्य वाटले की रिलीफ वाटला अशा संमिश्र भावना आणि अनेक प्रश्न तिच्या चेहेऱ्यावर दिसत होते.

“काका, तुम्ही कसे आहात आणि मावशी कशी आहे, ती कुठे आहे?” तिने आल्या आल्या माझ्यावर प्रश्नांचा भडिमार केला. असे काय झाले होते ते मलाच समजेना.
“अहो आम्ही सगळे केवढ्या काळजीत होतो?” रश्मी म्हणाली
“आम्ही दोघेही मजेत आहोत” मी सांगितले, “पण तुम्हाला आमची काळजी करायला काय झालं?”
आमची गाडी बंद पडल्याची बातमी सुध्दा एवढ्यात त्यांच्यापर्यंत पोचण्याचे काहीच कारण मला दिसत नव्हते. ती पुलावर उभी असल्याचे कोणी जाणाऱ्या येणाऱ्या ओळखीच्या माणसाने पाहिले असले तरी मग तो मदतीला का आला नाही? आणि ती गोष्ट यांना सांगायची काय गरज होती?
“आत्ता मला माझ्या आईचा फोन आला होता, ती तुमची चौकशी करत होती”
“का?”
“कारण तिला शिल्पाचा फोन आला होता आणि ती सांगत होती की तुम्ही तिच्याशी आणि अजयशीसुध्दा नीट बोलला नाहीत म्हणून!”
“बाप रे!”
“त्या सगळ्यांना असे वाटले की तुम्ही दोघे कसल्या तरी मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहात.”
“तसे असते तर मग आम्ही सांगितले नसते का? बोलणे टाळले कशाला असते? या सगळ्याची सुरुवात कुठून झाली? आधी अजयने मला कशासाठी फोन केला होता?”
माझ्या मनात प्रश्नच प्रश्न उठत होते. पुन्हा सगळ्यांना फोन लावून त्यांच्याशी बोलल्यानंतर हळूहळू त्याचा उलगडा झाला. मेकॅनिक महेशला म्हणून मी केलेला फोन ज्या फोनवर लागला होता लागला होता ते यंत्र त्याच नावाच्या दुसऱ्याच एका माणसाने म्हणजे महेश नावाच्या उदयच्या एका मित्राने त्याला थोड्या दिवसासाठी दिले होते, पण मला याची माहिती नव्हती. मला मिळालेला गोंधळलेला रिस्पॉन्स ऐकून मी माझा फोन राँग नंबर म्हणून कट केला होता. पण “महेश” एवढे नाव उदयने ऐकल्यावर महेशला म्हणजे त्याच्या मित्राला निरोप देण्यासाठी कुणाचा फोन आहे हे पहावे म्हणून उदयने फोन नंबर पाहिला तो ओळखीचा म्हणजे अलकाचाच होता. ही गोष्ट त्याने बाजूलाच बसलेल्या अजयला सांगितल्यावर चौकशी करून घेण्यासाठी त्याने अलकाला फोन लावला, तो तिने न उचलता मी उचलला आणि लगेच बंद केला. तसेच शिल्पाच्या बाबतीतही झाले. माझा फोन या गडबडीत घरीच राहिला होता आणि मी अलकाचा फोन गप्पागोष्टींमध्ये एंगेज करून ठेऊ शकत नव्हतो. पण माझ्या आतापर्यंतच्या सौजन्यपूर्ण वागणुकीमुळे हे वागणे त्या लोकांना अपेक्षित नव्हते आणि त्यामुळे आमच्या काळजीपोटी त्यांनी ते इतर जवळच्या नातेवाईकांना सांगितले होते आणि त्यांना आमच्याबद्दल काही माहिती आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता.

अशा प्रकारे एका मोबाईलधारकाच्या नावामुळे समजुतींचा एवढा घोटाळा झाला आणि आम्ही सगळे एप्रिल फूल झालो!

संत एकनाथांच्या कथा आणि रचना

Eknath

“दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई।।”
“नणंदेचं कारटं किरकिर करतं, खरूज होई दे त्याला। सत्वर पाव गं मला, भवानी आई, रोडगा वाहिन तुला ।।”
“विंचू चावला, विंचू चावला, काय मी करू? कुणाला सांगू?”
“वारियाने कुंडल हाले, डोळे मोडित राधा चाले ।।”
वरील रचना एका महान संताने लिहिल्या असतील असे या ओळी वाचून कदाचित कोणाला वाटणार नाही. पण ज्या संताने त्या ओळी रचलेल्या आहेत, त्यांचे नांव संत एकनाथ! सोळाव्या शतकात होऊन गेलेल्या एकनाथ महाराजांनी लोकांना आवडतील, त्यांच्या सहज लक्षात राहतील असे आकर्षक मुखडे रचून पुढे त्या कवनांमध्ये अध्यात्माचे दर्शन घडवले आहे. उदाहरणार्थ याच भारुडांच्या खालील ओळी पहा.
“एका जनार्दनी समरस झाले, पण तो रस येथे न्हाई । मला दादला नको ग बाई !”
“कामक्रोध विंचू चावला । तम आंगासी आला ॥ ….ह्या विंचवाला उतारा । तमोगुण मागें सारा । सत्वगुण लावा अंगारा । विंचु इंगळी उतरे झरझरा ॥सत्य उताऱ्या येऊन । अवघा सारिला तमोगुण । किंचित राहिली फुणफुण । शांत केली जनार्दनीं ॥”
संत एकनाथांनी फक्त भारुडांचीच रचना केली नाही, त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा अपार आहे, पण त्यांनी रचलेली भारुडे इतकी अप्रतिम आहेत की चारशे वर्षांनंतर आजसुध्दा ती लोकांना भुरळ पाडतात आणि भारुड म्हंटल्यावर सर्वात आधी एकनाथांचेच नांव डोळ्यासमोर येते.
संत एकनाथांनी लिहिलेले “माझे माहेर पंढरी। आहे भीवरेच्या तीरी ।।”, आणि “काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल। ” हे अभंग पं.भीमसेन जोशी यांच्या अभंगवाणीमधले प्रमुख अभंग आहेत. श्री.राम फाटक यांनी त्यांना अप्रतिम चाली लावून संगीतबध्द केले आहे. नव्या पिढीतले संगीत दिग्दर्शक श्रीधर फडके आणि गायक सुरेश वाडकर यांनी मिळून तयार केलेल्या ध्वनिफितीमध्ये “ॐकार स्वरूपा, सद्गुरू समर्था, अनाथाच्या नाथा, तुज नमो”, “गुरु परमात्मा परेशु”, “रुपे सुंदर सावळा गे माये”, ” माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद”, “येथोनी आनंदू रे आनंदू, कृपासागर तो गोविंदू रे” हे अत्यंत अर्थपूर्ण अभंग आहेत. अलीकडच्या काळात निघालेल्या उत्कृष्ट ध्वनिफितींमध्ये या ध्वनिफितीचा उल्लेख होतो. या अभंगातील शब्दरचना पाहताच सुंदर सोप्या शब्दात उपमा, रूपक आदि अलंकारांचा उपयोग करून त्यांनी भक्तीमार्गाचे सुगम तत्वज्ञान किती सुरेख मांडले आहे हे ध्यानात येईल.
संत एकनाथ हे संस्कृत भाषेचे आणि त्यातील धर्मशास्त्रांसंबंधित ग्रंथांचे प्रकांड पंडित होते, पण त्यांनी संत ज्ञानेश्वरांकडून प्रेरणा घेऊन ते ज्ञान मराठी भाषेत आणण्याचा भरपूर प्रयत्न केला. अठरा हजार आठशे ओव्या रचून त्यांनी भागवत पुराणच मराठी भाषेत आणले. ते एकनाथी भागवत या नांवाने प्रसिध्द आहे. गोष्टीरूप असल्यामुळे तो खूप लोकप्रिय आहे आणि त्याची पारायणे नियमितपणे जागोजागी होत असतात. त्यांनी भावार्थ रामायणाच्या २५००० ओव्या रचल्या होत्या. तरीही ते काम अपूर्ण राहिल्यामुळे त्यांच्या शिष्याने ते पुरे केले. या खेरीज त्यांनी रुक्मिणी स्वयंवर, प्रल्हाद विजय, आनंदलहरी वगैरे अनेक रचना करून ठेवल्या आहेत.
सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या भावार्थ दीपिकेत, म्हणजे आज ज्ञानेश्वरी या नांवाने ओळखल्या जाणाऱ्या ग्रंथात अनेक पाठभेद निर्माण झाले होते. एका हस्तलिखित पोथीवरून दुसरी पोथी लिहितांना त्यात चुका झाल्या होत्या आणि ज्ञानेश्वरांच्या नांवाने त्या पुढच्या पिढीला दिल्या जात होत्या. संत एकनाथांसारखा विद्वानच अधिकारवाणीने त्या दुरुस्त करू शकत होता. एकनाथांनी त्या ग्रंथांच्या प्रतींचे अतिशय काळजीपूर्वक वाचन करून एक निर्दोष प्रत तयार केली आणि तिला प्रमाणग्रंथ समजून यापुढे तिच्याच प्रती काढल्या जाव्यात यासाठी तिचा प्रचार केला. संत एकनाथांच्या प्रयत्नांमुळेच संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेले गीताज्ञान पुढील काळातील जनतेपर्यंत शुध्द रूपात पोचायला मदत झाली.

संत एकनाथांच्या जीवनाबद्दल खूप कांही सांगण्यासारखे आहे ते पुढील भागात लिहीन. आज एकनाथषष्ठी या त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना शतशः साष्टांग दंडवत.
—————————-

संत एकनाथांच्या गोष्टी

संत एकनाथांचा जन्म पैठण या प्राचीन काळापासून प्रसिध्द असलेल्या नगरीत झाला आणि त्यांचे बहुतेक सारे जीवन त्याच गांवात व्यतीत झाले. त्यांनी देवगिरी येथील जनार्दन स्वामींचे शिष्यत्व पत्करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मशास्त्रांचा अभ्यास केला. पुरातन धर्मग्रंथांचे अध्ययन केल्यानंतर मानवता आणि बंधुभाव हेच धर्माचे सार असल्याचे त्यांना जाणवले. आपल्या विविध रचनांमधून त्यांनी हे खुबीने मांडले तर आहेच, पण “जे जे देखिले भूत, तयासी मानि़जे भगवंत” या तत्वाचे त्यानी स्वतःच्या आचरणात पालन केले. यासंबंधी एक अशी आख्यायिका आहे.

एकदा संत एकनाथ काशीहून गंगेच्या पाण्याने भरलेली कावड घेऊन रामेश्वराच्या यात्रेला निघाले होते. तत्कालिन प्रथेनुसार त्यातले गंगाजल रामेश्वरावर वाहिल्यानंतर त्यांच्या तीर्थयात्रेची सांगता होणार होती. पण वाटेतच एका जागी त्यांना तहानेने आसुसलेले एक गाढव मरणोन्मुख अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेले दिसले. महत्प्रयासाने काशीहून जपून आणलेले गंगाजल त्यांनी सरळ त्या गाढवाच्या तोंडात ओतून त्याचे प्राण वाचवले. रामेश्वराला गंगाजलाने अभिषेक करून स्वतःसाठी पुण्य मिळवण्यापेक्षा त्या तृषार्त गाढवाचे प्राण वाचवणे हे जास्त महत्वाचे धार्मिक कार्य आहे असे त्यांना वाटले.

संत एकनाथांनी माणसांमाणसात भेदभाव केला नाही. एकदा एक माणूस नदीच्या पाण्यात वाहून जात असल्याचे पाहताच त्यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता पूर आलेल्या नदीत उतरून त्या माणसाला ओढून बाहेर काढले, पण या चांगल्या कृत्याची प्रशंसा करण्याऐवजी त्यांनी एका अस्पृश्याला स्पर्श केल्यामुळे त्यांना विटाळ झाला असे म्हणून त्या काळातल्या तथाकथित पुढारलेल्या समाजाने त्यांना वाळीत टाकले. संत एकनाथांनी यासाठी प्रायश्चित्त घेऊन शुध्दीकरण करून घ्यावे असा दबाव त्यांच्यावर आणला, पण त्यांनी त्याला जुमानले नाही. यामुळे चिडून त्यांनी एकनाथांचा छळ सुरू केला. रोज सकाळी उठल्यावर आधी गोदावरीत स्नान करून देवपूजा करण्याचा त्यांचा नेम होता. त्यानुसार ते आंघोळ करून घरी परतत असतांना कांही समाजकंटकांनी त्यांच्या अंगावर घाण टाकली. ते शांतपणे परत नदीवर गेले आणि स्वच्छ स्नान करून देवाची स्तोत्रे म्हणत घराकडे फिरले. त्या दुष्ट लोकांनी पुन्हा त्यांच्या अंगावर घाण टाकली, एकनाथ पुन्हा स्नान करून परत आले असेच खूप वेळ चालत राहिले. अखेर ते लोक कंटाळून निघून गेले, पण एकनाथांनी त्यांच्याबरोबर भांडणही केले नाही की त्यांना शिव्याशापही दिले नाहीत. हा प्रकार समजल्यानंतर एकनाथांच्या चाहत्यांनी त्यांची विचारपूस करतांच त्यांनी त्या लोकांना सांगितले, “अहो, यांच्या कृत्यामुळे आज मला अनायासे उपवास घडला, माझे अनेक वेळा गोदावरीत स्नान झाले आणि माझा इतका वेळ परमेश्वराच्या नामस्मरणात गेला, त्यांचे माझ्यावर उपकारच आहेत, मी कशाला त्यांच्यावर राग धरू?”

संत एकनाथांवर घातलेल्या गेलेल्या सामाजिक बहिष्कारामुळे त्यांचा नोकर त्यांच्या घरी येईनासा झाला. तेंव्हा प्रत्यक्ष भगवान विठ्ठल श्रीखंड्या हे नांव घेऊन त्यांच्या घरी कामाला येऊन राहिले. एकनाथांना आपल्या स्वतःच्या सेवेसाठी नोकर नकोच होता, पण वयोमानामुळे रोजच्या रोज देवपूजेसाठी चंदनाचे खोड सहाणेवर उगाळून गंध तयार करणे त्यांना झेपत नव्हते, त्यामुळे एवढे काम त्यांनी श्रीखंड्याला करायला सांगितले. म्हणजे विठ्ठलाच्या मूर्तीवर चंदनाचे विलेपन करण्यासाठी स्वतः विठ्ठलच एका मुलाच्या रूपात एकनाथांच्या घरी येऊन सहाणेवर चंदनाचे खोड घासत राहिले होते.

संत ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे जीवंत समाधी घेतल्यानंतर त्या खोलीचा बंद दरवाजा उघडण्याचे धैर्य कोणीही कधीही केले नव्हते. आजसुध्दा कोणी ते करत नाही. पण त्या भूमीवर उगवलेल्या एका वृक्षाची मुळे खोलवर गेली आहेत आणि त्यांनी समाधिस्थ ज्ञानेश्वरांच्या गळ्याभोंवती फास आवळला आहे असा दृष्टांत संत एकनाथांना झाला. ते त्वरित आळंदीला गेले. कोणाच्या विरोधाची पर्वा न करता त्यांनी ज्ञानेश्वर जिथे समाधिस्थ झाले होते त्या खोलीचे कवाड उघडले आणि ज्ञानेश्वरांच्या गळ्याभोंवती वाढलेल्या मुळ्या छाटून दूर केल्या अशी आख्यायिका आहे. माझ्या तर्काप्रमाणे ज्ञानेश्वरीमध्ये घुसलेल्या चुका काढून टाकून तिचे शुध्द स्वरूप त्यांनी पुन्हा समाजापुढे आणले ही गोष्टच या रूपकातून व्यक्त होते. संस्कृत भाषेत लिहिलेल्या भगवद्गीतेवर भावार्थदीपिका लिहून संत ज्ञानेश्वरांनी ती मराठीत आणली होती. संत एकनाथांनी त्यातले तत्वज्ञान अधिक सोपे करून सामान्य लोकांमध्ये त्याचा प्रसार केला.
———————————

संत एकनाथांच्या रचना

संत बहिणाबाईंनी आपल्या प्रसिध्द अभंगात म्हटले आहे,
संतकृपा जाली | इमारत फळा आली ।।
ज्ञानदेवें रचिला पाया | उभारिले देवालया ।। नामा तयाचा किंकर | तेणे रचिले तें आवार ।।
जनार्दन एकनाथ | खांब दिधला भागवत ।। तुका जालासे कळस | भजन करा सावकाश ।।

ज्ञानेश्वर, नामदेव आणि तुकाराम या संतश्रेष्ठांच्या समवेत संत बहिणाबाईंनी या यादीमध्ये संत एकनाथांचाही समावेश केला आहे. एकनाथ हे भागवत सांप्रदायाच्या किंवा वारकरी पंथाच्या इमारतीतले स्तंभ आहेत. ‘ओवी ज्ञानेशाची’ आणि ‘अभंगवाणी प्रसिध्द तुकयाची’ हे पद्यांच्या त्या दोन वृत्तांमधले (गेल्या कित्येक शतकांमधले) सर्वश्रेष्ठ साहित्य म्हणून नावाजले गेले आहे. संत नामदेव विठ्ठलाचा अत्यंत लाडका भक्त होता. विठ्ठलावरील त्यांच्या प्रेमाचे दर्शन अनेक आख्यायिकांमधून होतेच, त्यांच्या अभंगामधून ते प्रतीत होते. शीखांच्या गुरू ग्रंथसाहेबामध्ये नामदेवांच्या काही रचना दिल्या आहेत. या तीन संतश्रेष्ठांच्या मानाने संत एकनाथ किंचित कमी प्रसिध्द असतील, पण त्यांनी केलेल्या रचनासुध्दा आजही खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या रचनांमधील विविधता हे त्यांचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल.

संस्कृत भाषेमध्ये असलेली भगवद्गीता लोकांना समजावी म्हणून संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेत लिहिलेली ज्ञानेश्वरीसुध्दा तात्विक दृष्ट्या फार उच्च पातळीवर आहे. संत तुकाराम आणि संत नामदेव महाराजांचे अभंग सर्वसामान्य लोकांच्या ओठावर सहज बसावेत असे सोपे आणि सुंदर आहेत. संत एकनाथ महाराजांनी ओवीबध्द ग्रंथरचना केली, भजनामध्ये गायिले जाणारे अभंग लिहिले, त्याशिवाय मनोरंजक अशी भारुडे, गवळणी वगैरे लिहिल्या. घरातल्या देव्हाऱ्यासमोर बसून ज्ञानी पंडित लोकांनी वाचावे असे आध्यात्मिक वाङ्मय, ओसरीवर बसून श्रोत्यांना वाचून ऐकवण्यासाठी पोथ्या, देवळातल्या सभामंटपात भक्तजनांनी टाळमृदुंगाच्या साथीवर भजन करतांना म्हणावेत असे भक्तीपूर्ण आणि रसाळ अभंग आणि लोकगीतांच्या मंचावर शाहीरांनी डफ झांज आणि तुणतुण्याच्या साथीने गाव्यात अशी भारुडे, गवळणी वगैरे अशा विविध जागी संत एकनाथांच्या रचना ऐकायला मिळतात. त्याशिवाय गेल्या शतकातल्या मान्यवर संगीत दिग्दर्शकांनी संत एकनाथांच्या रचनांना सुमधुर चाली लावून त्या दृक्श्राव्य माध्यमांमधून घराघरात पोचवल्या आहेत. अशा काही अत्यंत लोकप्रिय रचना या लेखात दिल्या आहेत.

संतांच्या जीवनावरील चित्रपटांमध्ये त्यांच्या सोज्ज्वळ भूमिका साकारणाऱ्या विष्णुपंत पागनीस या गायक नटाच्या आवाजातले हे गीत किती मनोरंजकसुध्दा आहे पहा. देवाबरोबर इतकी सलगी साधून बोलणारे एकनाथ लटक्या तक्रारीच्या सुरात सांगतात.

असा कसा देवाचा देव बाई ठकडा । देव एका पायाने लंगडा ॥१॥
शिंकेचि तोडितो मडकेचि फोडितो । करी दही-दुधाचा रबडा ॥२॥
वाळवंटी जातो कीर्तन करितो । घेतो साधुसंतांसि झगडा ॥३॥
एका जनार्दनी भिक्षा वाढा बाई । देव एकनाथाचा बछडा ॥४॥

कवी जयदेव आणि सूरदास यांनी राधाकृष्णामधील मधुरा भक्तीवर केलेल्या अनेक गीतरचना लोकप्रिय आहेत. मराठी भाषेत याबद्दल काव्य करणारे संत एकनाथच लगेच डोळ्यासमोर येतात. संगीतकार स्नेहल भाटकर यांनी स्वरबध्द केलेली ही दोन गीते अजरामर झाली आहेत. पहिल्या गीतात ते राधेच्या भूमिकामधून अलगदपणे एकनाथांच्या भूमिकेत जातात.
कशि जाऊ मी वृंदावना । मुरली वाजवी ग कान्हा ॥धॄ॥
पैलतिरी हरि वाजवी मुरली । नदि भरली यमुना ॥१॥
कासे पीतांबर कस्तुरी टिळक । कुंडल शोभे काना ॥२॥
काय करू बाई कोणाला सांगूं । नामाची सांगड आणा ॥३॥
नंदाच्या हरिने कौतुक केले । जाणे अंतरिच्या खुणा ॥४॥
एका जनार्दनी मनी म्हणा । देवमहात्म्य कळेना कोणा ॥५॥

दुसऱ्या गाण्यामध्ये राधा आणि कृष्ण या दोघांचेही देहभान हरपल्यामुळे ते कसे वेडेवाकडे चाळे करत आहेत असे सांगता सांगता एकनाथ महाराज स्वतःच देवाशी एकरूप होतात.
वारियाने कुंडल हाले, डोळे मोडित राधा चाले ।।
राधा पाहून भुलले हरी, बैल दुभवी नंदाघरी ।।
फणस जंबिर कर्दळी दाटा । हाति घेऊन नारंगी फाटा ।।
हरि पाहून भुलली चित्‍ता । राधा घुसळी डेरा रिता ।।
ऐसी आवडी मिनली दोघा । एकरूप झाले अंगा ।।
मन मिळालेसे मना । एका भुलला जनार्दना ।।

आर. एन्‌. पराडकर या गायकाच्या प्रसिध्द भक्तीगीतांमधले संत एकनाथांचे हे गाणेसुध्दा राधाकृष्णाच्या प्रीतीबद्दलच आहे.
नको वाजवू श्रीहरी मुरली ।
तुझ्या मुरलीने तहान-भूक हरली रे ।।
खुंटला वायुचा वेग, वर्षती मेघ, जल स्थिरावली ।।
घागर घेऊन पाणियासी जाता, डोईवर घागर पाझरली ।।
एका जनार्दनी पूर्ण कृपेने, राधा गौळण घाबरली ।।

बाळकृष्णाने आपल्या बासरीमधल्या जादूने सर्व चराचराला कशी मोहिनी घातली होती याचे सुंदर वर्णन या गीतात आहे.
भुलविले वेणुनादे । वेणु वाजविला गोविंदे ॥१॥
पांगुळले यमुनाजळ । पक्षी राहिले निश्र्चळ ॥२॥
तृणचरे लुब्ध झाली । पुच्छ वाहुनिया ठेली ॥३॥
नाद न समाये त्रिभुवनी । एका भुलला जनार्दनी ॥४॥

भारतरत्न स्व.पं. भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेल्या या अभंगाची संगीतरचना राम फाटक यांनी केली आहे.
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल । नांदतो केवळ पांडुरंग ॥१॥
भाव-भक्‍ति भीमा उदक ते वाहे । बरवा शोभताहे पांडुरंग ॥२॥
दया क्षमा शांती हेचि वाळुवंट । मिळालासे थाट वैष्णवांचा ॥३॥
ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद । हाचि वेणुनाद शोभतसे ॥४॥
दश इंद्रियांचा एक मेळ केला । ऐसा गोपाळकाला होत असे ॥५॥
देखिली पंढरी देहीं-जनी-वनीं । एका जनार्दनी वारी करी ॥६॥

किशोरी आमोणकर या शास्त्रीय संगीतामधील श्रेष्ठ गायिकेने थोडी सुगम संगीतातली गीते दिली आहेत यातले एक प्रसिध्द गीत संत एकनाथांच्या रचनांमधून घेतले आहे. पं. रघुनंदन पणशीकर यांनी या गीतात किशोरीताईंना आवाजाची साथ दिली आहे.
कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल । कानडा विठ्ठल विटेवरी ॥१॥
कानडा विठ्ठल नामें बरवा । कानडा विठ्ठल हृदयीं घ्यावा ॥२॥
कानडा विठ्ठल रूपे सावळां । कानडा विठ्ठल पाहिला डोळां ॥३॥
कानडा विठ्ठल चंद्रभागे तटी । कानडा विठ्ठल पहावा उठाउठी ॥४॥
कानडा विठ्ठल कानडा बोले । कानड्या विठ्ठलें मन वेधियेलें ॥५॥
वेधियेलें मन कानड्यानें माझें । एका जनार्दनीं दुजें नाठवेचि ॥६॥

या दोन श्रेष्ठ गायकांच्या नंतर आलेल्या पिढीमधील संगीतकार श्रीधर फडके आणि स्वराची देणगी लाभलेले आजचे आघाडीचे गायक सुरेश वाडकर यांनी तयार केलेल्या आल्बममध्ये त्यांनी संत एकनाथांचे अभंग घेतले आहेत.
गुरु परमात्मा परेशु । ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ॥१॥
देव तयाचा अंकिला । स्वये संचरा त्याचे घरा ॥२॥
एका जनार्दनी गुरुदेव । येथें नाही बा संशय ॥३॥

माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद ॥१॥
तेणो देह ब्रम्हरूप गोविंद, नित्य गोविंद ।
नि जसे रामरूप, नित्य गोविंद ॥२॥
तुटेल सकळ उपाधी, निरसेल आधी व्याधी ।
निरसेल गोविंद, नित्य गोविंद ॥३॥
गोविंद हा जनी-वनी ।
म्हणे एका जनार्दनी ॥४॥

येथोनी आनंदू रे आनंदू । कृपासागर तो गोविंदू रे ॥१॥
महाराजाचे राऊळी । वाजे ब्रम्हानंद टाळी ॥२॥
लक्ष्मी चतुर्भुज झाली । प्रसाद घेऊन बाहेर आली ॥३॥
एका जनार्दनी नाम । पाहता मिळे आत्माराम ॥४॥

रुपे सुंदर सावळा गे माये ।
वेणु वाजवी वृंदावना गोधने चारिता ॥१॥
रुणझुण वाजवी वेणु ।
वेधी वेधले आमुचे तनमनु ओ माये ॥२॥
गोधने चारी हाती घेऊन काठी ।
वैकुंठीचा सुकुमार गोपवेषे जगजेठी ।
वैकुंठीचा सुकुमार गोधने चारीताहे ॥३॥
एका जनार्दनी भुलवी गौळणी ।
करीती तनुमनाची वोवाळणी वो माये ॥४॥

ॐकार स्वरूपा, सद्गुरू समर्था ।
अनाथाच्या नाथा, तुज नमो ।
तुज नमो, तुज नमो, तुज नमो ॥१॥
नमो मायबापा, गुरुकृपाघना ।
तोडी या बंधना मायामोहा ।
मोहोजाळ माझे कोण नीरशील ।
तुजविण दयाळा सद्गुरुराया ॥२॥
सद्गुरुराया माझा आनंदसागर ।
त्रैलोक्या आधार गुरुराव ।
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश ।
ज्यापुढे उदास चंद्र-रवी ।
रवी, शशी, अग्‍नि, नेणति ज्या रूपा ।
स्वप्रकाशरूपा नेणे वेद ॥३॥
एका जनार्दनी गुरू परब्रम्ह ।
तयाचे पैनाम सदामुखी ॥४॥
ॐकार स्वरूपा या गाण्याने तर एका काळात लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. आजही हे गाणे निरनिराळ्या कार्यक्रमांमधून, अगदी नृत्यामधूनसुध्दा सादर केले जातांना दिसते.

उपहास आणि विनोदामधून परमार्थाचा मार्ग दाखवता येतो यावर कदाचित विश्वास बसणार नाही, पण संत एकनाथ महाराजांनी पाचशे वर्षांपूर्वी रचलेल्या भारुडांमधून हे काम करून ठेवले आहे. शाहीर साबळे यांनी त्यांच्या काही भारुडांना आकर्षक चाली लावून आणि आपल्या बुलंद आवाजात गाऊन ‘भारुड’ या लोकगीताच्या प्रकारालाच एक महत्वाचे स्थान मिळवून दिले आहे. ‘विंचू चावला’ या सर्वात जास्त लोकप्रिय भारुडामध्ये त्यांनी ‘अगगगगग, देवा रे देवा, काय मी करू’ वगैरे बरीचशी पदरची भर घालून त्याला अधिक उठाव आणला आणि काँटेंपररी बनवले असले तरी एकनाथ महाराजांची मूळ शब्दरचना तशीच राखली आहे. मूळ भारुड खाली दिले आहे. काम, क्रोध इत्यादि तमोगुणांचा विंचू चावल्यामुळे शरीराची (खरे तर मनाची) आग आग झाली. तिला शांत करायचे असेल तर वाईट गुण सोडून सद्गुणांची कास धरावी, त्यातून मनःशांती मिळेल असे या भारुडात सांगितले आहे.
विंचू चावला वृश्चिक चावला । कामक्रोध विंचू चावला । तम घाम अंगासी आला ॥धृ॥
पंचप्राण व्याकुळ झाला । त्याने माझा प्राण चालिला । सर्वांगाचा दाह झाला ॥१॥
मनुष्य इंगळी अति दारुण । मज नांगा मारिला तिने । सर्वांगी वेदना जाण । त्या इंगळीची ॥२॥
ह्या विंचवाला उतारा । तमोगुण मागे सारा । सत्वगुण लावा अंगारा । विंचू इंगळी उतरे झरझरा ॥३॥
सत्व उतारा देऊन । अवघा सारिला तमोगुण । किंचित् राहिली फुणफुण । शांत केली जनार्दने ॥४॥

माणसाच्या अंगातले (मनातले) काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षड्रिपू त्याचा ताबा घेतात, त्याच्यावर सत्ता गाजवतात, त्यांच्या तालावर नाचवतात हे संत एकनाथांनी सासरच्या घरात सुनेवर सत्ता गाजवणाऱ्या किंवा सासुरवास करणाऱ्या नातेवाईकांच्या रूपकामधून सुरेख मांडले आहे. यांच्या जाचामध्ये माणूस इतका गुरफटून जातो की त्याला देवाचे स्मरण करायला भान आणि वेळच उरत नाही. त्यामुळे या सगळ्यांना बाजूला करून मला एकटेच राहू दे, म्हणजे मी तुझी भक्ती करू शकेन असे खाली दिलेल्या भारुडात भवानी आईला सांगून तिला साकडे घातले आहे.

सत्वर पाव गे मला । भवानीआई रोडगा वाहिन तुला ॥१॥
सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥२॥
सासू माझी जाच करती । लवकर निर्दाळी तिला ॥३॥
जाऊ माझी फडफड बोलती । बोडकी कर ग तिला ॥४॥
नणंदेचे पोर किरकिर करिते । खरूज होऊ दे त्याला ॥५॥
दादला मारुन आहुती देईन । मोकळी कर गे मला ॥६॥
एकाजनार्दनी सगळेचि जाऊं दे । एकटीच राहू दे मला ॥७॥

अशाच प्रकारच्या भावना वेगळ्या रूपकामधून खाली दिलेल्या भारुडात व्यक्त केल्या आहेत. आपल्याला हतबल करणाऱ्या, परमेश्वरापासून दूर ठेवणाऱ्या परिस्थितीला यात दादला म्हणजे नवरा असे संबोधून तो नको असे म्हंटले आहे. ईश्वरासी समरस होण्यासाठी या दादल्याच्या तावडीमधून सुटायला पाहिजे असे ते सांगतात.
मोडकेंसे घर तुटकेसे छप्पर । देवाला देवघर नाही ॥१॥
मला दादला नलगे बाई ॥धृ॥
फाटकेच लुगडे तुटकीसी चोळी । शिवाया दोरा नाही ॥२॥
जोंधळ्याची भाकर आंबाडयाची भाजी । वर तेलाची धार नाही ॥३॥
मोडका पलंग तुटकी नवार । नरम बिछाना नाही ॥४॥
सुरतीचे मोती गुळधाव सोने । रांज्यात लेणे नाही ॥५॥
एकाजनार्दनी समरस झाले । तो रस येथे नाही ॥६॥

खाली दिलेल्या भारुडात संत एकनाथांनी तत्कालिन समाजामधील लुच्चेपणावर सणसणीत कोरडे ओढले आहेत, पण हे आजच्या सामाजिक परिस्थितीलाच उद्देशून लिहिले असावे असे वाचतांना आपल्याला वाटते. याचा अर्थ असा की पाचशे वर्षांपूर्वीची माणसेसुध्दा आतापेक्षा फारशी वेगळी नसावीत. त्यांनी कोणता अविचार किंवा हावरेपणा करू नये हे संत एकनाथ सांगतात, याचाच अर्थ त्यांच्या अवती भंवती वावरणारी माणसे तशी स्वार्थबुध्दीने नेहमी वागत असावीत असा होतो. विवेक आणि संयम बाळगण्याबद्दल सगळे सांगून झाल्यावर अखेरीस ते पुन्हा अध्यात्माच्या मुख्य मुद्द्यावर येतात आणि ‘असा कोणाला दाखवण्यातून देव दिसत नसतो, त्याला ज्याने त्याने अंतरात (गुप्तपणे) ओळखायचे असते’ हे सांगतात. यातल्या अनेक ओळी आतापर्यंत म्हणी किंवा वाक्प्रचार झाल्या आहेत.

अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।
आले संत घरी तरी काय बोलुन शिणवावे ?
ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे?
प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे?
गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे?
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।
देव अंगी आला म्हणून काय भलतेच बोलावे?
चंदन शीतळ झाले म्हणून काय उगळुनिया प्यावे?
भगवी वस्‍त्रे केली म्हणून काय जगच नाडावे?
आग्या विंचू झाला म्हणून काय कंठीच कवळावे ?
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।
परस्‍त्री सुंदर झाली म्हणून काय बळेची ओढावी?
सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी?
मखमली पैजार झाली म्हणून काय शिरीच बांधावी?
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना।।
सद्‌गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा?
नित्य देव भेटला म्हणून काय जगाशी दावावा?
घरचा दिवा झाला म्हणून काय आढ्याशी बांधावा ?
एका जनार्दनी म्हणे हरी हा गुप्तची ओळखावा ?
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।

एकाद्या माणसाला भुताने पछाडले की तो भान हरपलेल्या वेड्यासारखे वागायला लागतो. परमेश्वराचा ध्यास लागल्यानेसुध्दा कोणाकोणाची अशीच अवस्था कशी झाली हे त्यांनी ‘भूत’ या भारुडामध्ये मनोरंजक पध्दतीने दाखवले आहे. त्यातसुध्दा अखेरच्या ओळीमध्ये हे भूत (परमेश्वर) जगात सर्वत्र भरलेले आहे अशी त्याची खूण सांगितली आहे.
भूत जबर मोठे ग बाई । झाली झडपड करु गत काई ॥१॥
सूप चाटूचे केले देवऋषी । या भूताने धरिली केशी ॥२॥
लिंबू नारळ कोंबडा उतारा । त्या भूताने धरिला थारा ॥३॥
भूत लागले नारदाला । साठ पोरे झाली त्याला ॥४॥
भूत लागले ध्रूवबाळाला । उभा अरण्यात ठेला ॥५॥
एकाजनार्दनी भूत । सर्वांठायी सदोदित ॥६॥

एकनाथ महाराजांना या अजब भुताने भारलेले होतेच, त्यांनी स्वतःच ते कबूल केले आहे. त्यामुळे त्यांची दशासुध्दा इतरेजनांपेक्षा वेगळी झाली होती. ते सामान्य राहिले नव्हते. त्यांच्या असामान्यत्वाची ‘उलटी खूण’ ते या भारुडामध्ये दाखवतात. यातला गूढ अर्थ समजून घेणे मात्र तितके सोपे नाही.
नाथाच्या घरची उलटी खूण । पाण्याला मोठी लागली तहान ॥१॥
आंत घागर बाहेरी पाणी । पाण्याला पाणी आले मिळोनी ॥२॥
आजी म्या एक नवल देखिले । वळचणीचे पाणी आढ्या लागले ॥३॥
शेतकऱ्याने शेत पेरिले । राखणदाराला तेणे गिळिले ॥४॥
हांडी खादली भात टाकिला । बकऱ्यापुढे देव कापिला ॥५॥
एकाजनार्दनी मार्ग उलटा । जो तो गुरुचा बेटा ॥६॥

पूर्वीच्या काळात ज्योतिषांना ‘जोशी’ म्हणत असत. घरोघरी फिरून किंवा जो जो त्यांच्याकडे येईल त्याला त्याचे भविष्य सांगायचे काम ते करत असत. संत एकनाथांनी मात्र कोणालाही लागू पडेल असा एकच होरा सांगून ठेवला आहे. हे भविष्य खरे ठरण्यासाठी कुठल्याही ग्रहाची किंवा नक्षत्राची गरजही नाही किंवा त्यांची बाधाही होणार नाही. यातली मन आणि वासना यांची रूपके विचार करण्यासारखी आहेत.
मी आलो रायाचा जोशी । होरा ऐका दादांनो ॥धृ॥
तेथूनि पुढे बरे होईल । भक्‍तिसुखें दोंद वाढेल । फेरा चौऱ्यांशीचा चुकेल । धनमोकासी ॥१॥
मनाजी पाटील देहगांवचा । विश्वास धरु नका त्याचा । हा घात करील नेमाचा । पाडील फशी ॥२॥
वासना बायको शेजारीण । झगडा घाली मोठी दारूण । तिच्या पायी नागवण । घर बुडविसी ॥३॥
एकाजनार्दनी कंगाल जोशी । होरा सांगतो लोकांसी । जा शरण सद्‍गुरुसी । फेरा चुकवा चौऱ्यांयशी ॥४॥

‘बुरा मत सुनो, बुरा मत बोलो’ वगैरे आपण महात्मा गांधीजींच्या संदर्भात ऐकले आहे, पण पाचशे वर्षांपूर्वी संत एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या भारुडांमध्ये असे लिहिले आहे की ‘मी वाईट ऐकल्यामुळे बहिरा झालो आणि वाईट बोलल्यामुळे मुका झालो’. कान आणि जीभ असून त्यांचा चांगला उपयोग केला नाही तर ते नसल्यातच जमा नाही का? पण अखेरीस गेलेली वाचा आणि श्रवणशक्ती परत मिळवण्याचा मार्गही त्यांनी दाखवला आहे.

बहिरा झालो या या जगी ॥धृ॥
नाही ऐकिले हरिकीर्तन । नाही केले पुराण श्रवण । नाही वेदशास्त्र पठण । गर्भी बधिर झालो त्यागूने ॥१॥
नाही संतकीर्ती श्रवणी आली । नाही साधुसेवा घडियेली । पितृवचनासी पाठ दिधली । तीर्थे व्रते असोनि त्यागिली ॥२॥
माता माऊली पाचारिता । शब्द नाही दिला मागुता । बहिरा झालो नरदेही येता । एकाजनार्दनी स्मरेन आता ॥३॥

मुका झालो वाचा गेली ॥धृ॥
होतो पंडित महाज्ञानी । दशग्रंथ षड्‍शास्त्र पुराणी । चारी वेद मुखोद्‍गत वाणी । गर्वामध्ये झाली सर्व हानी ॥१॥
जिव्हा लांचावली भोजना । दुग्ध घृत शर्करा पक्वान्ना । निंदिले उपान्ना । तेणे पावलो मुखबंधना ॥२॥
साधुसंतांची निंदा केली । हरिभक्‍तांची स्तुती नाही केली । तेणे वाचा पंगू झाली । एकाजनार्दनी कृपा लाधली ॥३॥

‘अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम’ हाच सर्वधर्मसमभावाचा संदेश संत एकनाथांनी ‘फकीर’ या भारुडामध्ये कसा दिला आहे पहा.
हजरत मौला मौला । सब दुनिया पालनवाला ॥१॥
सब घरमो सांई बिराजे । करत है बोलबाला ॥२॥
गरीब नवाजे मै गरीब तेरा । तेरे चरणकु रतवाला ॥३॥
अपना साती समजके लेना । सलील वोही अल्ला ॥४॥
जीन रूपसे है जगत पसारा । वोही सल्लाल अल्ला ॥५॥
एकाजनार्दनी निजवद अल्ला। आसल वोही बिटपर अल्ला ॥६॥

संत एकनाथांच्या इतक्या विविध प्रकारच्या उद्बोधक तितक्याच मनोवेधक रचना वाचून आपल्याला सर्वथा दिग्मूढ करतात.
——

नवी भर दि.२८-०९-२०२२

🙏🏻 जोगवा🙏🏻
अनादी निर्गुण प्रगटली भवानी|
मोह महिषासुर मर्दना लागोनी|
त्रिविध तापांची करावया झाडणी|
भक्तांलागी तूं पावसी निर्वाणीं!!१!!
*आईचा जोगवा जोगवा मागेन*
द्वैत सारुनी माळ मी घालीन|
हाती बोधाचा झेंडा मी घेईन |
भेद रहित वारीसी जाईन!!२!!
नवविध भक्तिच्या करीन नवरात्रा |
करुनि पोटीं मागेन ज्ञानपुत्रा|
धरीन सद्भाव अंतरींच्या मित्रा |
दंभ सासऱया सांडिन कुपात्रा!!३!!
पूर्ण बोधाची घेईन परडी|
आशा तृष्णेच्या पाडीन दरडी|
मनोविकार करीन कुर्वंडी|
अमृत रसाची भरीन दुरडी!!४!!
आतां साजणी झाले मी निःसंग|
विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग|
काम क्रोध हे झोडियेले मांग|
केला मोकळा मारग सुरंग!!५!!
ऐसा जोगवा मागुनी ठेविला|
जाउनि नवस महाद्वारी फेडिला|
एकपणे जनार्दनीं देखियेला|
जन्ममरणाचा फेरा चुकविला!!६!!
।। जय मुक्ताई ।।
।। ज्ञानोबा तुकाराम ।।
—-


नवी भर दि. १३-०३-२०२३:

भागवत धर्माचे जे चार बळकट खांब आहेत त्यापैकी एक म्हणजे भागवत ग्रंथ प्रदान करणारे संत एकनाथ. कर्नाटकातून विठ्ठल मूर्ती पंढरपूरला आणणाऱ्या भानुदासांच्या संत कुळात त्यांना जन्म घेण्याचे भाग्य लाभले. हा वारसा त्यांनी असा पूढे नेला की ते भगवंत भक्तीचा आधार झालेत.

मातापित्याच्या पश्चात बाराव्या वर्षी पैठणहून गुरु शोधार्थ निघालेल्या एकनाथांना देवगीरी किल्ल्यावर गुरु लाभले ते जनार्दन स्वामी.
“जीवन सुखी होण्यासाठी ‘मी’ आणि ‘तू’ हा भेद नष्ट व्हायला हवा.” जनार्दन स्वामींच्या गुरुप्रसादाने हीच शिकवण दिली. एकनाथांनी ती स्वतः आचरणात आणून लोकांनाही तोच मंत्र दिला. मनुष्य असो वा प्राणी सर्वांमध्ये ते परमेश्वर बघायचे. त्यांच्या मृदु स्वभावाने.. परिस्थिती कशीही उदभवो त्यांच्या शांतीपूर्ण आदर्श वागणूकीने त्यांना ‘शांतीब्रह्म’ ही उपाधी लाभलीय.
स्वप्न दृष्टांताने त्यांनी ज्ञानोबा माऊलींच्या संजीवन समाधी भोवतीचे वेलींचे वेढे सोडविले आणि जातीभेदाचे वेढेही सोडविण्यासाठी प्रत्यक्ष कृती केली. ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत त्यांनी तयार केली. चराचरातील सर्व प्राणीमात्र एकच जीव आहेत हे पंधराव्या शतकात त्यांनी मांडलेय.
भौतिक जगतापासून दूर अशा शांत जीवन जगणाऱ्या भगवंत भक्तांची संख्या वाढावी म्हणून एकनाथांनी लोकांना भगवंत भक्तीचा लळा लावला. त्यासाठीच आपली लेखणी वापरली.
दैवीस्पर्श लाभलेल्या त्यांच्या लेखणीने गहन अध्यात्मही लोकांना रुचेल अशा अत्यंत सुलभ.. रसाळ भाषेत लिहले. अभंग, गौळणी, भारुड, भागवत, भावार्थ रामायण असे विपुल साहित्य अवतरले.
आपल्या कवनात गुरुदेवांचा “एका जनार्दनी” असा उल्लेख करुन ते स्मरण करीत. गुरुंच्याच निर्वाणदिनी स्वतःही देह ठेवला. स्वतःला झालेले परमेश्वराचे दर्शन लोकांना घडविणारे हे श्रेष्ठ संत.
वृंदावनात तो वैकुंठातला सावळा सुंदर सुकुमार.. गोप होवून गोधन चारताना बासरी वाजवतोय. त्या मंजुळ सूरानी आमचे तन मन हरपलेय. त्याच्या हातची काठी ही आम्हाला वळणावर आणण्यासाठी आहे.
त्या गौळीणींची भक्ती एवढी श्रेष्ठ की ‘मी’ ‘तू’ पण खरच हरपले. कृष्णाला ओवाळताना त्या कृष्णामधेच लीन होत आहेत.

🌺🌿🌸☘🌺☘🌸🌿🌺

रूपे सुंदर सावळा गे माये
वेणू वाजवी वृंदावना
वृंदावना गोधने चारिताहे

रुणझुण वाजवी वेणू
वेधी वेधले आमुचे तनमनु ओ माये

गोधने चारी हाती घेऊन काठी
वैकुंठीचा सुकुमार गोपवेषे जगजेठी
वैकुंठीचा सुकुमार गोधने चारिताहे

एका जनार्दनी भुलवी गौळणी
करिती तनमनाची वोवाळणी

🌹🌿🌸☘🌺☘🌸🌿🌹

रचना : संत एकनाथ ✍
संगीत : श्रीधर फडके
स्वर : सुरेश वाडकर

🎼🎶🎼🎶🎼 🎧

🌻🌿🌸🥀🌺🥀🌸🌿🌻

हॅप्पी दिवाळीच्या शुभेच्छा

हॅप्पी दिवाली

मागच्या वर्षी माझा वाढदिवस दसरा आणि दिवाळी यांच्यामधल्या दिवसांमध्ये आला होता. त्यामुळे त्या तीन आठवड्यात आधी हॅप्पी दसरा, मग हॅप्पी बर्थडे आणि त्यानंतर हॅप्पी दिवाळी वगैरे मेसेजेसचा एका पाठोपाठ एक नुसता वर्षाव होत होता. त्यात चिंब भिजून गेल्यामुळे मलासुध्दा मनातून थोडं हॅपी हॅपी वाटायला लागलेलं असतांना एक संस्कृतीसंरक्षक गृहस्थ भेटले.
“कसे आहात?” त्यांनी विचारलं, ती एक औपचारिक चौकशी असेल असं मला वाटलं.
मी अजून हॅपी मूडमध्येच होतो. हंसत हंसत म्हणून गेलो, “मजेत!”
ते एकदम स्तब्ध होऊन माझ्याकडे पहात राहिले. बहुधा त्यांना या उत्तराची अपेक्षा नसावी. हे जग, आपला देश, आपले शहर यात रोज उठून केवढ्या भयानक घटना घडत आहेत, आपला समाज अधःपाताच्या खोल रसातळाच्या दिशेने चालला आहे, आपली कुटुंबसंस्था कोलमडून पडायला लागली आहे, आपली शरीरे व्याधींनी आणि मने चिंतांनी पोखरून निघत आहेत आणि या माणसाच्या वाट्याला तरी काय कमी पीडा आल्या आहेत? अशाही परिस्थितीत हा माणूस मजेत कसा असू शकतो? आणि तरीही तोंड वर करून तसं सांगायलाही याला काहीच कसे वाटत नाही? असे प्रश्न मला त्यांच्या चेहेऱ्यावर दिसायला लागल्यामुळे मी थोडासा वरमलो आणि चांचरत म्हणालो, “म्हणजे देवाच्या दयेने माझं तसं ठीक चाललं आहे, आला दिवस पुढे ढकलतो आहे.”
“मग मघाशी काय म्हणालात?” ते मघाचे उत्तर विसरायला तयार नव्हते.
माझ्या हातातला मोबाईल दाखवत मी बोललो, “अहो बघा ना, यात सगळं हॅपी हॅपी भरलंय्, म्हणून …. ”
“हे एक खूळ किती बोकाळलंय् बघा! अहो ख्रिश्चन लोक मेरी ख्रिसमस म्हणतात, मुसलमान लोक ईद मुबारक म्हणतात, त्यांना त्यांच्या धर्माचा केवढा अभिमान आहे आणि आपले लोक? ते अजूनही इंग्रजांच्या गुलामीतून बाहेर पडलेले नाहीत, “हॅप्पी दिवाळी” म्हणायला यांना लाजा कशा वाटत नाहीत?” त्यांच्या सात्विक संतापाचा पारा चढायला लागला होता.
“अहो मला हे संदेश पाठवणारे सगळे लोक आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जन्माला आलेले आहेत. त्यांनी कधीच इंग्रजांची गुलामी पाहिलेलीही नाही.”
“बघा तरीसुध्दा ते हॅपी हॅपीची पोपटपंची करताहेत! आता यांना काय म्हणावं?”
“अहो, आपण तिळगुळ घ्या गोड बोला असं संक्रांतीला म्हणतो, सोन्यासारखं रहा असं दसऱ्याला म्हणतो तसंच एकदा मी एकाला सांगितलं, बाबारे, दिवाळी आली, आता दिवे लाव, उजेड पाड, देव तुझं भलं करो. तर तो माझ्यावरच चिडला की हो. मी त्याला मराठीत काय सांगायला पाहिजे होतं?”
“कां, शुभ दीपावली म्हणता नाही येत?”
“दिवाळी तर शुभ असतेच ना? त्यात मी माझं म्हणून काय सांगितलं?”
“मग दिवाळीच्या शुभेच्छा म्हणावं.”
“आताशी मी तेच करतोय्. मराठीभाषिकांना शुभेच्छा, हिंदीभाषिकांना शुभकामनाएँ लिहितो, पण त्यात मजा, आनंद वगैरे भावना येत नाहीत. शुभेच्छा हा शब्द कुणी शोधून काढला कोण जाणे, तो कृत्रिम आणि कोरडा वाटतो. मी तामीळतेलुगू आणि मल्याळीबंगाली मित्रांचं काय करू? मला त्यांच्या भाषा येत नाहीत आणि त्यांना माझी. नेहमी आम्ही इंग्रजीमधूनच एकमेकांशी बोलतो. ती आता आमची संपर्कभाषा आहे. यात कुणाच्या गुलामीचा संबंध कुठे येतो?”
त्यांना लगेच काही उत्तर सुचले नाही, तेवढ्यात मीच त्यांना विचारलं,
“तुम्ही तर सगळी पोथ्यापुराणं वाचली असतील, त्यात शुभेच्छा, सदीच्छा, शुभकामना हे शब्द कुठे येतात का? म्हणजे रावणाने कुंभकर्णाला किंवा सुभद्रेनं द्रौपदीला कुठल्याशा सणाच्या शुभेच्छा दिल्या होत्या असले उल्लेख आहेत का?”
“अहो, त्या काळात तशी रीत नव्हती.”
“तेंव्हाच कशाला? साठपासष्ट वर्षांपूर्वी माझ्या लहानपणीसुध्दा सणासुदीच्या दिवशी लहान मुलांनी घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांच्या पाया पडायचं आणि त्यांनी मोठा हो, शहाणा हो असे आशीर्वाद द्यायचे अशी पध्दत होती. मी तरी तेंव्हा शुभेच्छा, सदीच्छा, शुभकामना हे शब्द ऐकलेसुध्दा नव्हते. ते संस्कृतमधले असल्यासारखे वाटतात, पण प्राचीन काळातल्या मूळच्या संस्कृत भाषेत ते उपयोगात होते का ?”
“मी म्हंटलं ना की ही आपली संस्कृती नाहीच, हे इंग्रजांचं आंधळं अनुकरण आहे.”
“कदाचित असेलही, पण त्यात काय वाईट आहे? वैदिक काळातले लोक जसे रहात होते तसे आपण आज राहतो का? इंग्रज लोकसुध्दा रोमन साम्राज्याच्या किंवा आठव्या हेन्रीच्या काळात रहायचे तसे आता रहात नाहीत. काळाबरोबर सगळ्याच लोकांची राहणी, त्यातल्या चालीरीती हळूहळू बदलत असतात. त्यातले जे आपल्याला बरे वाटते ते आपण कळत नकळत उचलतो. त्याचा उगाच अंधानुकरण, सांस्कृतिक गुलामगिरी वगैरे मोठा बाऊ कशाला करायचा?”
“पण हॅप्पी दिवाळी असं म्हणायचं नाही म्हणजे नाही. आपली संस्कृतीच सगळ्या जगात श्रेष्ठ आहे. आपण तीच पाळायची.” हरिदासाची कथा मूळपदावर यायला लागली.
“आणि आज थोडी मजा करून घे, आनंदी रहा असे कुणालाही सांगणे ही गोष्टच आपल्या संस्कृतीत बसत नाही. असंच ना?”
हा माणूस वाया गेला आहे, याला काही सांगण्यात अर्थ नाही असा विचार त्यांनी बहुधा केला असावा. मलाही आपला चांगला मूड घालवायचा नव्हता. मी मनातल्या मनात त्यांनाही हॅप्पी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

पण माझ्या मनातलं चक्र फिरतच राहिलं. माणूस हा मुळातच उत्सवप्रिय प्राणी आहे. पूर्वीच्या काळातसुध्दा अनेक उत्सव असायचेच आणि कुठलाही उत्सव कधी एकट्याने साजरा होतच नसतो, त्यात कसलीच मजा नसते. लहानपणी आम्ही शुभेच्छा हा शब्द उच्चारत नसलो तरी गांवातल्या नातेवाइकांना आणि मित्रांना भेटून त्यांच्यासह सणवार साजरे करत होतो. या एकत्र येण्यात, सहवासातच उत्सवाचा खरा आनंद असायचा. पुढे शहरात रहायला लागल्यावर दूर दूर रहात असलेल्या सगळ्या नातेवाईकांना आणि मित्रांना प्रत्यक्ष जाऊन भेटणे शक्य होत नव्हते, पण टेलीफोनचा प्रसार झाल्यावर सणासुदीला त्यांच्याशी टेलीफोनवर बोलून एकमेकांच्या आनंदात सहभागी होणे सुरू झाले. मधल्या काळात रंगीबेरंगी आकर्षक अशी ग्रीटिंग कार्डे बाजारात आली आणि ती तुफान लोकप्रिय झाली. आपल्या मनातल्या भावना मोजक्या शब्दात व्यक्त करायचे एक आयते आणि सोपे साधन मिळाले. एकमेकांना शुभेच्छा देण्याची प्रथा या काळात प्रचलित होत गेली.

प्रत्यक्ष भेटण्याला आणि टेलीफोनवरल्या संभाषणालाही स्थळकाळाच्या मर्यादा होत्याच. इंटरनेटच्या आगमनानंतर त्या मर्यादा अमर्याद विस्तारल्या गेल्या. ईमेल, फेसबुक, वॉट्सअॅप यासारख्या माध्यमांमुळे शेकडो मित्र आणि आप्त जोडले गेले. त्या सर्वांना शब्द आणि चित्रांमधून एकाच वेळी संदेश पाठवणे शक्य झाले. ही माध्यमे मुख्यतः इंग्रजी भाषेत चालत असल्यामुळे त्या भाषेचा प्रभाव पडणारच आणि या संदेशांमध्ये ती भाषा प्रामुख्याने निदान सध्या तरी दिसणारच. आपण तरी तिला परकी मानून तिचा तिरस्कार का करायचा? त्या संदेशांमधल्या भावना आणि उद्देश समजून घेऊन उत्सव साजरा करावा हे जास्त महत्वाचे आहे. तुम्हाला काय वाटते?

विठ्ठल किती गावा ? (भाग १)

हा लेख मी चार वर्षांपूर्वी लिहिला असला तरी आजही तितकाच समर्पक आहे. मूळच्या आठ भागांचे एकत्रीकरण करून तो ३-४ भागांमध्ये देण्याचा प्रयत्न आहे. 

भाग १

बरोबर पंचावन्न वर्षांपूर्वी जून महिन्यात मी पुण्यनगरीत पहिल्यांदा पाऊल ठेवले. त्यापूर्वी या शहराबद्दल माझ्या वाचनात थोडे फार आले होते. ‘शिक्षणाचे माहेरघर’, ‘महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी’ वगैरे पुण्याची ख्याती होतीच. महात्मा फुले, लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे आदि थोर पुरुषांची ती कर्मभूमी होती. ना.सी.फडक्यांच्या कादंबऱ्यांमधली वर्णने वाचतांना ते एक रम्य आणि रोमँटिक ठिकाण वाटत होते. “रोज सकाळी फोडणीच्या वरणासोबत साधा भात आणि संध्याकाळी फोडणीचा भात आणि साधे वरण खाऊन उरलेली पै न पै शिल्लक टाकायची आणि त्या शिल्लकेमधून आयुष्याच्या अखेरीला (त्या काळातल्या गावाबाहेरच्या आणि ओसाड अशा) डेक्कन जिमखान्यावर ‘श्रमसाफल्य’ यासारख्या नावाची एक लहानशी बंगली बांधायची यात जीवनाची इतिकर्तव्यता मानणारा म्हणजे पुणेकर.” अशा अर्थाचे वाक्य पुलंनी एका ठिकाणी असे लिहिले होते. वाचलेल्या अशा काही वर्णनांमधून पुण्याची एक प्रतिमा मनात तयार झाली होती. डेक्कन जिमखाना म्हणजे श्रमपरिहार करण्यासाठी नेहमी निवांतपणे आरामखुर्चीवर बसून राहणाऱ्या वृध्दांचा शांत परिसर असावा आणि त्या भागातल्या शाळाकॉलेजांमधली मुले मुली थोडासा गोंगाट करून त्या शांततेचा भंग करीत असावेत अशी त्या भागासंबंधीची एक विचित्र कल्पना माझ्या मनात होती. त्यापेक्षा फारच वेगळे दृष्य मला पहिल्याच दिवशी तिथे पहायला मिळाले.

इंजिनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमधून निघून जंगली महाराज रोडवरून डेक्कन जिमखान्यापर्यंत फेरफटका मारतांना तो रस्ता माणसांनी तुडुंब भरलेला दिसला. बाजूच्या फर्ग्यूसन रोडवर तर त्याहीपेक्षा जास्त गर्दी होती. त्या काळातसुध्दा मुंबई म्हणजे अती गजबजलेले शहर होते, पण मला पुण्यामधली त्या दिवशीची गर्दी कमालीची वाटली. त्याहूनही जास्त आश्चर्याची गोष्ट अशी होती की धोतर नेसलेले, कपाळावर गंधाचा टिळा आणि बुक्का लावलेले आणि डोक्यावर पांढरी टोपी किंवा पागोटे धारण केलेले पुरुष आणि नऊ वार लुगडी नेसलेल्या स्त्रिया अशा खेडुतांची संख्या त्यात प्रचंड प्रमाणात होती. डेक्कन जिमखान्यासारख्या पॉश समजल्या जाणाऱ्या भागात मला याची अपेक्षा नव्हती. होस्टेलवरच्या अनुभवी विद्यार्थ्यांकडून याचा उलगडा झाला. आळंदीहून निघालेली ज्ञानेश्वर महाराजांची आणि देहूहून आलेली तुकाराम महाराजांची अशा दोन्ही पालख्यांचा त्या दिवशी पुण्यात मुक्काम होता. त्यापूर्वी मला या पालख्यांची माहिती नव्हती. तिथून ते सगळे वारकरी पुढे पायी चालत पंढरपूरला जाणार होते आणि आषाढी एकादशीपर्यंत तिथे पोचणार होते. ‘आषाढीकार्तिकी’ला पंढरपुरात ‘चंद्रभागातीरी’ गोळा होणा-या असंख्य ‘भक्तजनां’विषयी मी ऐकले होते, पण तिकडे जायला निघालेल्या भक्तांचा तो पुण्यातच जमा झालेला महासागर पाहून मी चकित होऊन गेलो. त्या गर्दीतले सगळेच भाविक लोक ‘विठूनामा’चा गजर करीत पंढरपूरपर्यंत चालत जाणारे नसले तरी न जाणारे लोक सुध्दा संतांच्या पालख्यांच्या दर्शनासाठी भक्तीभावाने तिथे जमले होते. मागे राहिलेले विठ्ठलभक्तसुध्दा एकादशीच्या दिवशी उपास करणार, घराजवळच्या देवळात जाऊन विठोबाचे दर्शन घेणार, निदान घरात ठेवलेल्या त्याच्या प्रतिमेची भक्तीभावाने पूजा करणार, त्याच्यासमोर अभंगवाणी गाऊन त्याची स्तुती आणि प्रार्थना करणार होते यात शंका नव्हती.

आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या वारीला पंढरीला जाणाऱ्या भाविकांची गर्दी दरवर्षी वाढत जाते आणि त्याचे नवनवे उच्चांक स्थापित होतात असेच दिसते. इतक्या लोकांच्या मनात हा अमाप भक्तीभाव, ही गाढ श्रध्दा वगैरे भावना कशामुळे उत्पन्न होतात याचा तर्कशुध्द उलगडा मला आजवर झालेला नाही. ज्याला विठ्ठल, विठोबा, विठूराया, पांडुरंग वगैरे अनेक नावांनी त्याचे भक्त आळवतात, विठाई, विठू माउली अशा नावांनीसुध्दा ज्याला संबोधतात, अशा त्या विठ्ठलाचे एवढे जबरदस्त आकर्षण कशामुळे निर्माण होते याबद्दल अनेक संतांनी त्यांच्या रचनांमध्ये सांगून ठेवले आहे. पिढ्यानपिढ्या लहानपणापासून ज्या लोकांच्या कानावर हे अभंग पडत गेले असतील, त्यांच्या मनावर त्यांचा अर्थ खोलवर बिंबत गेला असणार, आपल्या परंपराप्रिय समाजात वारीला जाण्याची प्रथा सुध्दा वडिलांकडून मुलाकडे अशी पुढे पुढे चालत राहिली असणार. पण तो उपक्रम नुसताच जुलुमाचा रामराम असता तर पुढल्या पिढीतल्या लोकांनी एकादे निमित्य दाखवून कधीच बंद करून टाकला असता. तसे न करता अधिकाधिक लोक उत्स्फूर्तपणे यात सामील होऊ लागले आहेत, याचा अर्थ त्यातून त्यांना आर्थिक फायदा नसला तरी मानसिक लाभ तरी मिळत असणार.

दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमाराला मुंबईपुण्यासह सगळ्या शहरांमध्ये खास सांगीतिक कार्यक्रम केले जातात. योजना प्रतिष्ठान या संस्थेतर्फे झालेल्या या अभंगवाणीच्या कार्यक्रमाला मी ओळीने अनेक वर्षे हजेरी लावलेली आहे. स्व.पं.शिवानंद पाटील, योजनाताई, अजित कडकडे, सुरेश वाडकर, साधना सरगम यासारख्या लोकप्रिय गायकांनी गायिलेले अभंग त्यात ऐकले आहेत. एकादशीच्याच दिवशी या कार्यक्रमाला येणे अनेक प्रेक्षकांना सोयीचे नसल्यास त्याच्या तीन चार दिवश आधीपासून ते ठेवले जातात. या मालिकेतल्या सगळ्याच कार्यक्रमांना सर्व वयोगटांमधल्या श्रोत्यांनी चांगली हजेरी लावली आणि नवोदित कलाकारांच्या गायनाला देखील उत्स्फूर्त दाद दिली.

या विठ्ठलाबद्दल इतिहासकाळामधल्या संतांपासून आजच्या युगातल्या गीतकारांपर्यंत अनेकांनी काय सांगितले आहे याचा अत्यंत त्रोटक आढावा या लेखमालिकेत घेण्याचा एक लहानसा प्रयत्न यंदाच्या वारीच्या निमित्याने मी करणार आहे. संतश्रेष्ठ तुकाराम यांच्यासाठी तर विठ्ठल हे त्यांचे सर्वस्व होते. काया, वाचा. मनसा ते सतत त्याचेच ध्यान करत असत. तो त्यांच्या चित्ती वास करत असला तरीसुध्दा त्याचे नाव जिभेवर घेतांना, त्याची गीते गातांना त्यांना अतीशय आनंद वाटत असे. त्यांना लौकिक धनदौलतीचा मोह नव्हताच. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना उंची वस्त्रालंकारांचा नजराणा भेट म्हणून पाठवला तेंव्हा ही संपत्ती आम्हाला तृणासमान आहे असे म्हणून त्यांनी तो साभार परत पाठवला. विठ्ठलाचे भजन गात असतांना साथीसाठी उपयोगी पडणारे टाळ आणि चिरळ्या त्यांच्यासाठी अनमोल द्रव्यासारख्या होत्या. विठ्ठलाचे नाव घेतल्याने त्यांना अमृताचा घोट घेतल्याप्रमाणे संजीवनी प्राप्त होत असे. त्यातून त्यांच्या सर्वांगाला चैतन्य मिळत असे.

विठ्ठल हा चित्तीं । गोड लागे गातां गीतीं ॥१॥
आम्हां विठ्ठल जीवन । टाळ चिपुळिया धन ॥२॥
विठ्ठल विठ्ठल वाणी । अमृत हे संजीवनी ॥३॥
रंगला या रंगे । तुका विठ्ठल सर्वांगें ॥४॥

विठ्ठलाची गीते गातांना त्यांच्या अंतरंगात होणारे परिणाम या अभंगात आहेत, तर या गायनभक्तीमुळे सर्वांचाच उध्दार व्हावा यासाठी खाली दिलेल्या अभंगातून ते सगळ्या जनतेला उपदेश करत असतात. विठ्ठलाचे मनात स्मरण करावे, मुखाने त्याची गीते गावीत आणि विटेवर उभे असलेले त्याचे रूप डोळ्यांनी पहावे असे ते सांगतात. हे करण्यामध्ये त्यांचाच फायदा कसा आहे हे पुढील कडव्यांमध्ये दिले आहे. अनाथ लोकांसाठी तो भाऊ होऊन त्यांची काळजी घेतो. हाच आशय जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे या अलीकडच्या गाण्यामध्ये आहे. आपला सध्याचा जन्म म्हणजे एक पासिंग फेज आहे. याच्या आधी अनेक जन्म होऊन गेले असतील आणि नंतरही होणार आहेत अशी हिंदू धर्माची परंपरागत शिकवण आहे. संत तुकारामाच्या काळात तर याबद्दल कोणालाही शंका नव्हती. त्यामुळे सर्वगुणसंपन्न आणि सर्वशक्तीमान विठ्ठलाला जो कोणी शरण जाईल त्याला तो मुक्ती देईल हे खूपच मोठे आमिष त्यांनी दाखवले आहे. त्याचे नाव घेऊन त्याचे गीत गातांना त्यात तल्लीन होऊन समाधी लागली तर त्या अनुभवामधून तोंड तर गोडावणारच ना ?

विठ्ठल गीतीं गावा, विठ्ठल चित्तीं ध्यावा ।
विठ्ठल उभा पहावा विटेवरी ॥१॥
अनाथांचा बंधु विठ्ठल कृपासिंधु ।
तोडी भवबंधु यमपाश ॥२॥
तो चि शरणांगतां विठ्ठल मुक्‍तिदाता ।
विठ्ठल या संतांसमागमें ॥३॥
विठ्ठल गुणनिधि विठ्ठल सर्वसिद्धि ।
लागली समाधि विठ्ठल नामें ॥४॥
विठ्ठलाचें नाम घेतां झालें सुख ।
गोडावलें मुख तुका म्हणे ॥५॥

https://www.aathavanitli-gani.com/Song/Vitthal_Giti_Gava

मी जो अभंगवाणीचा कार्यक्रम ऐकला होता त्यातल्या गायकाचे अस्पष्ट उच्चार, मायक्रोफोनमधून होणारे डिस्टॉर्शन आणि कदाचित माझ्या ऐकण्यात होणारी गफलत या सगळ्यांचा मिळून असा परिणाम झाला की मला हा अभंग सारखा “विठ्ठल किती गावा” असा ऐकू येत होता. मग मनात विचार आला की संत तुकारामांचे शब्द वेगळे असले तरी निरनिराळ्या संतांनी, कवींनी आणि गायकांनी विठ्ठलाचे गुणगायन किती प्रकारे केले आहे हे सांगणारा एक लेख लिहिण्यासाठी ‘विठ्ठल किती गावा’ हे शीर्षक चांगले आहे.

. . . . . . . . . . . . . . . . . . . . .. . .. .. . . . . .. .

५३० संत

आपल्या संतांच्या काळात फोटोग्राफर नव्हते की प्रिंटिंग प्रेस नव्हत्या. त्या काळातल्या चित्रकारांनी त्या विभूतींची चित्रे रंगवून ठेवली असली तरी ती आता कुठे असतील कोण जाणे? अलीकडल्या म्हणजे गेल्या शंभर वर्षांमधल्या काळात रंगवलेल्या त्यांच्या तसबिरीच आपल्याला घरोघरी पहायला मिळतात. यात संत ज्ञानेश्वर हे बहुधा मांडी घालून बसलेले आणि हातात पोथीचे एक पान धरून ते वाचतांना किंवा काही तरी नवे लिहितांना दिसतात, तर समर्थ रामदासस्वामी हातात कमंडलू घेऊन कुठे तरी जाण्याच्या तयारीत असतात. संत तुकारामांनी एका हातात छोटीशी वीणा आणि दुसऱ्या हातात चिपळ्या धरलेल्या दाखवतात. हे चित्र पाहता ते वीणेच्या झंकाराचा सुर आणि चिपळ्यांचा ताल धरून अभंग गात असावेत किंवा “जय जय रामकृष्ण हरी”, “जय जय विठ्ठल रखुमाई” असा नामघोष करत असावेत असे वाटते. विठ्ठलाच्या नावाचा उच्चार करणे किती आनंददायी आहे, तसेच लाभप्रद आहे हे तुकोबांनी आपल्या अनेक अभंगांमधून सांगितले आहे. “विठ्ठल हा चित्तीं । गोड लागे गातां गीतीं ॥” आणि “विठ्ठल गीतीं गावा, विठ्ठल चित्तीं ध्यावा ॥” या दोन अभंगांबद्दल मी या लेखाच्या वरील भागात लिहिले होते. संतश्रेष्ठ तुकारामांचेच अत्यंत अर्थपूर्ण आणि लोकप्रिय असे आणखी दोन अभंग खाली दिले आहेत.

फक्त वाचेनेच विठोबाचे गोड नाव उच्चारून तिथे थांबू नका, तर शरीराच्या इतर ज्ञानेंद्रियांना आणि मनालासुध्दा त्याचा लाभ घेऊ द्या असे पहिल्या अभंगात त्यांनी सांगितले आहे. डोळ्यांनी त्याची मूर्ती पहा आणि ते सुंदर रूप साठवून ठेवा, पण त्यावेळी मन मात्र त्याच्या चरणापाशी लीन झालेले असू दे, आपल्या जिवाचे कान करून विठ्ठलाचे गुणगान लक्षपूर्वक ऐका, असे केलेत तर देहभान हरपून जाईल, जिवाला विठोबापासून दूर होण्याची इच्छा होणार नाही. असे तुकाराम महाराज या अभंगात सांगतात. पुढल्या काळात पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात भक्तांची इतकी गर्दी होईल की कुणालाही त्याच्या पाया पडून एक मिनिटसुध्दा तिथे थांबू दिले जाणार नाही याची त्यांना कल्पना नसेल. देवाचे दर्शन घेण्यासाठी त्याने मानवाला डोळे दिले आहेत, त्याचे नाव घेण्यासाठी जिव्हा दिली आहे, ते ऐकण्यासाठी कान दिले आहेत, दान देण्यासाठी हात दिले आहेत वगैरे गोष्टी एका प्रसिध्द हिंदी संताच्या रचनेमध्येसुध्दा सांगितल्या गेल्या आहेत. संत तुकारामांचे सांगणे देखील साधारणपणे असेच आहे.

घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचें ॥१॥
डोळे तुम्ही घ्या रे सुख । पहा विठोबाचें मुख ॥२॥
तुम्ही ऐका रे कान । माझ्या विठोबाचें गुण ॥३॥
मना तिथें धांव घेई । राहे विठोबाचे पायी ॥४॥
रूपी गुंतले लोचन । पायी स्थिरावले मन ॥५॥
देहभाव हरपला । तुज पाहता विठ्ठला ॥६॥
तुका म्हणे जीवा । नको सोडूं या केशवा ॥७॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Ghei_Ghei_Majhe_Vache

हाच उपदेश तुकारामांनी खाली दिलेल्या अभंगातही केला आहे. विठ्ठलाच्या दर्शनाने, गुणगानाने मनातले काम. क्रोध लोभ आदी षड्रिपू मनातून चालले जातात आणि त्चांनी रिकामी केलेली पोकळी विठ्ठलाने भरली जाते. भक्त विठ्ठलमय होऊन जातो. असे संत तुकाराम या अभंगात सांगतात.

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥
येणें सोसें मन जालें हांवभरे । परती माघारें घेत नाहीं ॥२॥
बंधनापासुनि उकलल्या गांठी । देतां आली मिठी सावकाश ॥३॥
तुका म्हणे देह भरिला विठ्ठलें । कामक्रोधें केलें घर रीतें ॥४॥

हा अंभंग पं. जितेंद्र अभिषेकी आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर या दोन सुप्रसिध्द गायक गायिकांनी निरनिराळ्या पध्दतीने गायिला आहे हे या अभंगाचे एक वैशिष्ट्य आहे.
http://www.aathavanitli-gani.com/Song/Bolava_Vitthal_Pahava_Vitthal

संत तुकारांमांना स्वर्गलोकी जाऊन तीन साडेतीनशे वर्षे होऊन गेल्यानंतरच्या आजच्या काळातल्या कवींनीसुध्दा विठ्ठलाच्या नामाच्या उच्चारण्याबद्दल गीते लिहिली आहेत. खाली दिलेले गाणे आजच्या काळात लिहिले गेले असले तरी त्यात संतांच्या काळाचेच वर्णन केलेले आहे. “माझा मऱ्हाटाचि बोलू कवतुके। तरी अमृताते पैजा जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।” असे आत्मविश्वासाने लिहिणारे संत ज्ञानदेव, “पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती । चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग।।” असे सांगणारे संत चोखा मेळा आणि “नामा म्हणे तरलो पाही । विठ्ठल विठ्ठल म्हणताची ॥” अशी भावना बाळगणारे संत नामदेव हे सारे जण पंढरपूरच्या इंद्रायणीकाठी वाळवंटावर गोळा झाले आहेत. विठ्ठलाच्या नामसंकीर्तनात दंग झाल्याने ते निस्संग होऊन नाचत आहेत आणि त्यांच्यासाठी एकतारीच विठ्ठलाचे गीत गात आहे असे या गाण्यात कवीने लिहिले आहे. कवीच्या कल्पनेमध्ये हे संत प्रत्यक्षात एकाच वेळी पंढरपूरला एकत्र आले आहेत.

एकतारि गाते, गाते गीत विठ्ठलाचे ।
वाळवंटी ध्वजा, ध्वजा वैष्णवांची नाचे ।।
मराठीचा बोल, बोल जगी अमृताचा ।
ज्ञानियांचा देव, देव ज्ञानदेव नाचे ।।
नाचे चोखामेळा, मेळा नाचे वैष्णवांचा ।
नाचे नामदेव, देव कीर्तनात नाचे ।।
अनाथांचे नाथ, नाथ माझे दीनानाथ ।
भाग्यवंत संत, संत रूप अनंताचे ।।
http://www.aathavanitli-gani.com/Song/Ektari_Gate_Geet_Vitthalache

खाली दिलेल्या गीतात कवीने पांडुरंगाचे वर्णन एका विणकराच्या रूपकात केलेले आहे. एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे या गाण्यात हेच रूपक वापरले आहे. पण माझ्या आठवणीप्रमाणे खाली दिलेले गाणे जास्त जुने असावे. या गाण्यात त्या महान विणकराचे नामस्मरण करण्याचा संदेश दिलेला आहे. अक्षांश आणि रेखांशाचे आडवे, उभे धागे आहेत अशी कल्पना करून यामधून पृथ्वीचा पृष्ठभाग तयार झाला आहे (विठ्ठलाने अशी रचना केली आहे). अशी वेगळी (भौगोलिक स्वरूपाची) कल्पना कवीने केली आहे. आणि पृथ्वीपुरता विचार करायचा झाल्यास तेच सर्वात पहिले विणकाम असे म्हणता येईल. या गाण्याच्या दुस-या चरणात कवी माणसांच्या जगात येतो. हात आणि पाय ही त्याची कर्मेंद्रिये असली तरी मनाने (किंवा बुध्दीने) दिलेल्या आज्ञांचे ते फक्त यंत्रवत पालन करतात, म्हणून त्यांना मागाची उपमा दिली आहे. माणसांनी मनांमध्ये मने गुंतवून त्याचा बहारदार शेला विणावा, बंधुभावाच्या चरख्यावर एकजुटीचा मजबूत धागा तयार करावा वगैरे सूचना केल्या आहेत. त्यात विठ्ठलाच्या भक्तीपेक्षा चांगल्या आचरणावरच जास्त भर दिला आहे.

धागा धागा अखंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया ।।
अक्षांशाचे रेखांशाचे, उभे आडवे गुंफुन धागे ।
विविध रंगी वसुंधरेचे, वस्त्र विणिले पांडुरंगे ।
विश्वंभर तो विणकर पहिला, कार्यारंभी नित्य स्मरुया ।।१।।
करचरणांच्या मागावरती, मनामनांचे तंतू टाका ।
फेकुन शेला अंगावरती, अर्धी उघडी लाज राखा ।
बंधुत्वाचा फिरवित चरखा, एकत्वाचे सूत्र धरूया ।।२।।

http://www.youtube.com/watch?v=vNdCT3psfcA
. . . . . . . . . . . . . . . . . . . .

…………   पुढील भाग २

 

स्मृती ठेवुनी जाती – १० मालिनी खासगीवाले

(मी हा लेख चार वर्षांपूर्वी लिहिला होता.) 

कै.श्रीराम परांजपे हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि ख्यातीप्राप्त इंजिनियर होते, त्यांच्या निधनाची बातमी वर्तमानपत्रांमध्ये छापून आली. कै.मालिनीताई खासगीवाले प्रसिध्दीपासून दूर राहिलेल्या समाजसेविका होत्या. त्या कधी निजधामाला गेल्या हे मलाही समजले नाही. परांजप्यांची ओळख माझ्या नोकरीमध्ये झाली, तर मालिनीताईंची ओळख नातेसंबंधांमधून झाली. परांजपे यांचा आणि माझा परिचय सत्तेचाळीस वर्षांपूर्वी झाला आणि थोडाच काळ राहिला तर गेली चाळीस वर्षे नेहमीच मालिनीताईंची अधूनमधून भेटगाठ होत राहिली होती. माझ्या दृष्टीने पाहता या दोन्ही व्यक्ती मला वडीलधा-या आणि आदरणीय होत्या, त्या कायम लक्षात राहण्यासारख्या वैशिष्ट्यपूर्ण होत्या आणि त्यांचे निधन काही काळापूर्वी झाले एवढाच त्यांना जोडणारा मुख्य धागा म्हणता येईल. यामुळे मी या दोन लेखात या दोघांचा एकापाठोपाठ एक समावेश केला आहे. त्यांचा एकमेकांशी परिचय असण्याची बरीच शक्यता होती, त्या एकमेकांना भेटल्या असाव्यात किंवा वारंवार भेटत असतीलही, पण त्याच वेळी मीसुध्दा त्या जागी उपस्थित होतो असे मात्र कधी झाल्याचे मला आठवत नाही.

माझ्या काही मित्रांना एका प्रॉजेक्टसाठी वर्षभरासाठी फ्रान्सला पाठवायचे ठरले तेंव्हा त्यांच्याकडून एक बाँड घेतला गेला. त्या बाँडवर कोणा वरिष्ठ दर्जाच्या अधिका-याची गॅरंटीयर म्हणून सही पाहिजे होती. त्या मित्रांचे वरिष्ठ अधिकारी स्वतःच त्या टीममध्ये जात असल्यामुळे ते सही देऊ शकत नव्हते. यामुळे इतर मित्रांचे नातेवाईक, नातेवाईकांचे मित्र, शेजारी वगैरेंमधून माझे मित्र त्यांच्यासाठी गॅरंटीयर शोधत होते आणि त्यांना ते मिळाले. त्यातल्या एका मित्राने मला आनंदाने सांगितले, “चला, आज माझं काम एकदाचं झालं, केमिस्ट्री डिव्हिजनमधल्या डॉ.खासगीवाल्यांनी मला सही दिली.”
त्या वेळी डॉ. कारखानावाला नावाचे पारशी सद्गृहस्थ केमिस्ट्री डिव्हिजनचे डायरेक्टर होते. हा खासगीवाला त्यांचाच सगेवाला असावा असे वाटून मी म्हंटले, “हा पारशी कसा काय तयार झाला?”
मित्राने सांगितले, “अरे ते कोणी खासगीवाला नाहीत, पुण्याचे घरंदाज खासगीवाले आहेत.” खासगीवाले हे नाव मी पूर्वी कधी ऐकले नसल्याने मला मराठी वाटत नव्हते. त्यांच्या पूर्वजांमधल्या कोणाला पेशव्यांच्या काळात ही उपाधी मिळाली होती असे स्पष्टीकरण त्यावर मिळाले. माझ्या मित्राशी जुजबी ओळखपाळखसुद्धा नसतांना त्याच्यावर एवढा विश्वास टाकून आर्थिक धोका पत्करणा-या त्या उदार मनाच्या सद्गृहस्थांबद्दल माझ्या मनात आदरयुक्त कुतूहल निर्माण झाले. आपण एकदा त्यांना पहावे, भेटावे असे वाटले, पण माझा मित्र तर फ्रान्सला निघून गेला होता, आता मला त्यांच्याकडे कोण नेणार? यामुळे ते राहून गेले.

माझे लग्न झाल्यानंतर अलकाचे सगळे नातेवाईक माझे आप्त झाले. तिच्या लहान गावातल्या माहेरच्या पुरातन आणि अवाढव्य वाड्यात तीन पिढ्यांमधले बरेचसे लोक रहात असत, अजूनही राहतात. शिक्षण आणि नोकरीच्या निमित्याने बाहेरगावी राहणारी मुले आणि लग्न होऊन सासरी गेलेल्या माहेरवाशिणीसुध्दा वर्षामधून काही काळासाठी सवड काढून तिथे येऊन सर्वांच्या सहवासात रहात आले आहेत. त्यामुळे त्या सर्वांमध्ये खास जवळीक निर्माण झाली आहे. चुलत बहिणींचे दीर, जावा, नणंदा किंवा चुलत चुलत काकूंचे भाऊ, वहिनी यासारखे दूरचे नातेवाईकसुध्दा तिथल्या बहुतेकांना माहीत असतात. एकदा अलकाच्या एका चुलत चुलत बहिणीकडे आम्ही गेलो असतांना त्यांनी मला विचारले, “तुम्ही बीएआरसीमधल्या डॉ.खासगीवाल्यांना ओळखत असालच ना?”
“मी त्यांचं नाव ऐकलं आहे, पण आमची अजून प्रत्यक्ष भेट झाली नाही. आमचं डिपार्टमेंट एवढं मोठं आहे की काम पडल्याशिवाय सहसा कोणाची ओळख होत नाही.”
“अहो, आमचे हे मामा आणि आमच्या या मामीसुद्धा फारच चांगली माणसं आहेत, तुम्ही त्यांना भेटाच.”
त्यावर अलका म्हणाली, “हो, मला ते लोक माहीत आहेत. ते कुठे राहतात?”
“तेसुद्धा तुमच्या चेंबूरलाच राहतात.”
“हो का? मग नक्की भेटू.”
या मामामामी म्हणजे डॉक्टर आणि मालिनीताई खासगीवाले या व्यक्तींची माझी पहिली ओळख ही अशी सांगण्या ऐकण्यातून झाली. मला देखील त्या दोघांना भेटण्याचे कुतूहल आणि इच्छा होतीच, त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी मला एक धागाही मिळाला. पण संधी आणि वेळ मिळत नव्हता. त्यांचा पत्ता वगैरे लिहून घ्यायचेही राहून गेले होते. प्रयत्न करून मला तो मिळू शकला असता, पण तेवढे कष्ट घेतले गेले नाहीत. एकदा मी ऑफिसला गेलेलो असतांना आणि काही कामासाठी अलका कुठेतरी गेली असतांना तिला चेंबूरच्या बाजारात की बसमध्ये खासगीवाले मामी अचानक दिसल्या. समोरासमोर येताच, “मामी!”, “तू अलका ना?” अशा संवादामधून त्यांनी आपल्या स्मरणातले जुने धागे पुन्हा जोडून घेतले. खरे तर मामींना त्या वेळी अलकाला त्यांच्या घरीच घेऊन जायचे होते, पण त्या काळात टेलीफोन, मोबाईल वगैरे काही सोय नसल्याने मला निरोप कसा द्यायचा हा प्रश्न होता आणि मी ऑफीसातून घरी येऊन दारावर लागलेले कुलूप पाहिले असते तर गोंधळ झाला असता. “पुढच्या वेळी आम्ही चेंबूरच्या मार्केटमध्ये येऊ तेंव्हा नक्की तुमच्या घरी येऊ.” असे आश्वासन देऊन अलकाने त्यांच्या घराचा पत्ता आणि जवळपासच्या खुणा विचारून घेतल्या.

त्या काळात आम्ही चेंबूरच्या सिंधी कँपमध्ये रहात होतो. तिथले सगळे वड्डी साँई दुकानदार आमच्यासारख्या भोळ्या भाबड्या ग्राहकांना गंडवायला टपून बसले आहेत असा आमचा ग्रह झालेला असल्यामुळे आम्ही नेहमी खरेदीसाठी चेंबूर स्टेशनजवळच्या बाजारात जात होतो. आम्ही पुढल्या खेपेला तिकडे गेलो तेंव्हा खासगीवाल्यांचे घर शोधून काढले. ते हमरस्त्यावरच असल्यामुळे सहजच सापडले. आम्हाला पाहून त्या दोघांनाही खूप आनंद झाला. त्यांनी अत्यंत आपुलकीने आमचे स्वागत केले. आम्ही कुठे राहतो, तिथे आमचे बस्तान कसे बसले आहे, काही अडचणी आहेत का वगैरेची वडिलधा-या माणसांच्या मायेने चौकशी केली, आमच्या कुटुंबांमधल्या समाईक नातेवाईकांची विचारपूस केली. थोडे बसणे बोलणे झाल्यानंतर “आमच्या स्वैपाकाची तयारी सुरू झालेलीच आहे, आता रात्रीचे जेवण करूनच जा,” असा आग्रहही मामींनी केला. पण असे आगांतुकपणे कुणाच्या घरी जायचे आणि थेट पाटावर जाऊन बसायचे हे माझ्यातल्या जावयाला शोभणारे नव्हते. माझे आढेवेढे पाहून मामांनी ते ओळखले आणि पुढे कित्येक वर्षे ते मला “या जावईबापू !” असेच गंमतीने म्हणत राहिले.

त्या दिवशी मामींनी आम्हाला निदान सूप तरी पिऊन जायला सांगितले आणि पोटात भूक लागलेली असल्याने आम्हीही ते आनंदाने मान्य केले. त्यापूर्वी म्हणजे लहानपणी आमच्या घरी टमाट्याचे सार बनवले जात असे ते रस्समसारखे पाणीदार असायचे. चिनी हॉटेलांमधले सूप चांगले दाट असायचे पण ते बेचव वाटायचे. मामींनी तयार केलेले सूप तसेच दाट होते, पण त्याला मराठी माणसाला आवडावी अशी रुची आणि खास फ्लेव्हर होता, शिवाय त्यात थोडे ताजे लोणी किंवा क्रीम घालून त्याची चंव आणखी वाढवली असावी. असे अप्रतिम सूप मी पहिल्यांदाच चाखून पाहिले होते हे मी मोकळेपणे सांगून टाकले. त्यांना त्याची खात्री असावीच. पहिला बाउल संपताच त्यांनी लगेच तो भरून दिला. त्याबरोबर दिलेल्या साइड डिशेस खाऊन आमचे तसेही जवळ जवळ पोटभर जेवण होऊन गेले. “चेंबूरला बाजार करायला केंव्हाही आलात तर थोडी विश्रांती घ्यायला आमच्याकडे याच, शिवाय तुम्हाला पुन्हा कधी सूप प्यावेसे वाटले तर निःसंकोचपणे मुद्दाम आमच्या घरी म्हणूनही या.” असे मामींनी निरोप देतांना प्रेमाने सांगितले. आमची मुले लहान असतांना आम्हालाही त्यांचे कपडे बदलणे, त्यांना दूध पाजणे वगैरेंसाठी निवा-याची जागा लागत असायची आणि आम्ही खासगीवाल्यांकडे अधून मधून जात राहिलो. एकदा आम्ही बाजारहाट करतांना माँजिनीमधून घेतलेल्या सामानातले सूपस्टिक्सचे पॅकेट मामींनी पाहिले आणि आपणहून सूपसाठी टोमॅटो शिजवायला ठेवले. त्यांनी वेळोवेळी इतर अनेक चविष्ट पदार्थही कौतुकाने करून आम्हाला खाऊ घातले.

मामा तर रसायनशास्त्रातले डॉक्टरेट होतेच, मामीसुध्दा नुसत्या सुग्रण हाउसवाइफ नव्हत्या. त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून काही पदव्या आणि पदविका घेतल्या होत्या आणि त्या महाराष्ट्र शासनाच्या समाजविकास किंवा अशाच एकाद्या खात्यात अधिकारीपदावर होत्या. अनाथ, निराधार बालके किंवा महिलांसाठी चेंबूर मानखुर्द भागातच तीन चार वसतीगृहे आहेत, मुंबईमध्ये आणखी किती तरी असतील. अशा प्रकारच्या संस्थांच्या कामाशी मालिनीताई निगडित होत्या. या कामात त्यांना अनेक बरेवाईट, जास्त करून वाईटच अनुभव अनेक वेळा येत, काही वेळा त्यांना त्या संस्थांमध्ये जाऊन मुक्कामाला तिकडेच रहावे लागत असे. अशा वेळी त्यांची ओढाताण होत असे. एरवी त्या आपला वेळ नोकरी आणि घरगृहस्थी यांमध्ये व्यवस्थितपणे वाटून देत असत, कधी कधी कामामध्ये आणीबाणीचे प्रसंग आले तर मात्र त्यांना ताबडतोब तिकडे धावावे लागत असे. पण हे सगळे काम त्या हंसतमुख राहून, शांत चित्ताने, तळमळीने आणि मन लावून करत असत. त्याबद्दल त्यांनी तक्रारीच्या सुरात बोललेले मी कधीच ऐकले नाही. त्या वसतीगृहांमधल्या दुर्दैवी स्त्रिया आपल्या किंवा सर्वसामान्य लोकांच्या मानाने किती हाल अपेष्टा आणि मानसिक त्रास भोगत आहेत, त्यांच्या जीवनात किती असुरक्षितता आहे याची त्यांना खूप कणव वाटत असे आणि त्यांना कशा प्रकारे मदत करता येईल, त्यांचे कष्ट कसे कमी करता येतील याचे विचार त्यांच्या मनात घोळत असत. उंबरठा हा चित्रपट पाहतांना माझ्या डोळ्यासमोर मालिनीमामी येत राहिल्या. त्या सिनेमातल्या स्मिता पाटीलला तिच्या घरातून तीव्र विरोध झाल्यामुळे तिला घराचा उंबरठा ओलांडून जावे लागले होते. मामींच्या सुदैवाने मामा त्यांच्या पाठीशी उभे असल्याने त्यांच्या जीवनात असले द्वंद्व आले नाही. त्यांना भरपूर कसरत किंवा धावपळ मात्र करावी लागत असे.

खासगीवाले मामा इतके सीनियर होते की त्यांना अणुशक्तीनगरमध्ये चांगले प्रशस्त क्वार्टर सहज मिळू शकले असते, पण मामींना गरज पडताच पटकन कुठेही जाण्यायेण्यासाठी चेंबूर स्टेशनजवळ असलेली लहानशी जागा जास्त सोयीची होती. त्यामुळे ते दोघेही तिथेच राहिले. मामांना रिटायर होऊन आता वीस वर्षे तरी होऊन गेली असतील. त्यांच्या काही काळानंतर मामीही सेवानिवृत्त झाल्या. त्यानंतर ते दोघे पनवेलला बांधलेल्या त्याच्या नव्या आणि मोठ्या घरात रहायला गेले आणि आमच्या भेटी दुर्मिळ झाल्या. मामा शास्त्रज्ञ आहेत त्याबरोबर उत्तम संगीतज्ञही आहेत, ते स्वतः तबला वाजवून अनेक गायक कलाकारांना साथ देत असत. वयोमानानुसार त्यांचे वादन कमी होत गेले तरी चेंबूर भागातल्या सगळ्या मुख्य संगीत सभांना एक जाणकार श्रोता म्हणून ते पनवेलहूनसुद्धा आवर्जून येत राहिले. मामींनाही गायनाची आवड असल्याने बहुतेक वेळी त्यासुद्धा त्यांच्यासोबत येतच असत. अशा ठिकाणी आमच्या भेटी आणि गप्पा होऊ लागल्या.

पण वयोमानानुसार पुढे पुढे ते भेटणे हळूहळू कमी होत गेले आणि त्यांना तसेच आम्हालाही तपासण्या किंवा औषधोपचार यासाठी हॉस्पिटलला जाण्याची जास्त गरज पडू लागली. गेल्या चार पाच वर्षात आमच्या भेटी बहुधा हॉस्पिटलमध्येच झाल्या असाव्यात. मागच्या वर्षीच एकदा आम्ही दोघे हॉस्पिटलच्या मेडिकल ओपीडीमध्ये आमचा नंबर येण्याची वाट पहात बसलो होतो. अलकाची प्रकृती जरा जास्तच खराब झालेली असल्यामुळे ती डोळे मिटून स्वस्थ बसली होती. खासगीवाले मामामामीही त्यांच्या फॉलोअप व्हिजिटसाठी आले होते. आमची नजरानजर होताच मी त्यांना हात दाखवला. पण नेहमीप्रमाणे आम्ही दोघे लगेच त्यांच्याकडे गेलो नाही यावरून काही तरी घोळ आहे हे त्यांच्या लक्षात येताच ते दोघे उठून आमच्याकडे आले. पाठीवरून हात फिरवून धीर दिला, “सगळं ठीक होऊन जाईल, काळजी करू नको” वगैरे सांगितले आणि आमच्याजवळ बसून राहिले. हॉस्पिटलमध्ये आलेले असले तरी ते दोघे तसे ठीकच दिसत होते, मामांच्या शरीरावरल्या वृद्धापकाळाच्या खुणा गडद होत होत्या, त्यांना त्या त्रस्त करतांना दिसत होत्या, त्यांची श्रवणशक्ती मंदावली होती, त्यामुळे संवाद साधणे कठीण जात होते, पण मामी पूर्वीसारख्याच चुणचुणीत दिसत होत्या त्यांना कसलाही त्रास होत नसावा असे त्यांच्या देहबोलीमधून आणि चेहे-यावरून वाटत होते.

दीड दोन महिन्यापूर्वी डॉक्टरांना प्रकृती दाखवण्यासाठी अलका हॉस्पिटलमध्ये गेली होती. त्या दिवशी जरा जास्त गर्दी असल्यामुळे तिचे काम संपायला बराच उशीर झाला. तोंवर जेवायची वेळ होऊन गेली होती. त्यामुळे तिच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने तिला लवकर घरी परतणे आवश्यक होते. हॉस्पिटलमधून बाहेर निघण्याच्या वाटेवर तिला अचानक खासगीवाले मामा भेटले. मामींना वॉर्डमध्ये अॅडमिट केले असून त्यांच्यावर केमोथिरपी होत असल्याचे धक्कादायक वृत्त त्यांनी सांगितले. पण हॉस्पिटलच्या नियमानुसार ती पेशंटला भेटण्याची वेळ नव्हती आणि त्यासाठी तीन चार तास तिथे थांबणे अलकाला शक्यच नव्हते. या ट्रीटमेंटने मामी लवकरच ब-या होतील असेच तेंव्हा वाटत होते. सवडीने पुन्हा जाऊन त्यांना भेटावे असा विचार करून ती घरी आली. पण तिच्या स्वतःच्या आजारपणामुळे आणि त्यातून आलेल्या अशक्तपणामुळे त्या वेळी ते जमले नाही. (आता तीसुध्दा राहिली नाही.) मामा किंवा मामींबरोबर संपर्क नसल्यामुळे त्या हॉस्पिटलमध्ये आहेत की घरी गेल्या आहेत हेही समजायला मार्ग नव्हता. त्यामुळे शक्य झाल्यानंतरसुध्दा त्यांना कुठे जाऊन भेटायचे हे समजत नव्हते.

दहा बारा दिवसांपूर्वी आम्ही तिस-याच एका गावी गेलो असतांना मामांचा एक सख्खा भाचा तिथे आम्हाला भेटला तेंव्हा त्याच्याकडून कळले की मामी कालवश झाल्या. ही दुःखद बातमी मुद्दाम कोणालाही सांगायची नाही असे मामांनी त्यांच्या निकटवर्तीयांना सांगून ठेवले होते. त्या दोघांनीही त्यांच्या सद्वर्तनाद्वारे असंख्य माणसे जोडून ठेवली होती. ही बातमी ऐकून त्या सर्वांना धावत यावेसे वाटेल आणि त्यांना ते कष्ट पडू नयेत असा विचार त्याच्या मागे होता. कदाचित मामींनी स्वतःच तसे सांगून ठेवले असेल. त्या नेहमी दुस-यांचाच विचार करत असत. त्यामुळेच त्यासुध्दा सर्व परिचितांच्या स्मरणात चिरकाल राहणार आहेत यात शंका नाही.